Thursday, October 9, 2008

To be or not to be..

To be or not to be, that is the question;
Whether 'tis nobler in the mind to suffer
The slings and arrows of outrageous fortune,
Or to take arms against a sea of troubles,
And by opposing, end them. To die, to sleep;

जगावं की मरावं हा एकंच सवाल. जगाच्या उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळीचा तुकडा होवून जगावं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर?

अजून आठवतं. सहा वर्षाची असेन मी तेव्हा. हे स्वगत सुरू झालं की मला एकदम रडायलाच यायचं. मी विंगेत असायचे. बहुतेक माझ्या एंट्रीला थोडा अवकाश पण असायचा. पण विसरून जायला व्हायचं आपण कोण ते. एकदम खरीच आजोबांची ढमी झाले असं वाटायचं आणि आपल्या आजोबाचं हे काय झालं म्हणून डोळ्यात पाणी यायचं. नाटकातल्या आईचा आणि बाबांचाही खूप खूप राग यायचा. खरंतर मला ते काम करायला मिळालं कारण नाटकातल्या माझ्या आईबाबांची मी खरी खुरी मुलगी होते. पण तरीही मला राग यायचाच. माझ्याच आई बाबांचा.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, शेक्सपिअरला वेगळ्या अर्थाने पडलेला हा प्रश्न, मला आज वेगळ्या अर्थाने पडतो आहे.

आपण का लिहितो असा प्रश्न कधी कुणीतरी विचारला होता. तेव्हा मी लिहिलं होतं की मला माझं आयुष्य डॉक्युमेंट करून ठेवायचंय म्हणून मी लिहिते. पण आज बऱ्याच दिवसांनी कुठेतरी मनातून कळतंय की मी खरंच का लिहिते. लिहिता लिहिताच मी कशी आहे हे थोडंसं मलाही उलगडायला लागलेलं आहे. त्यात सगळ्यात लख्खपणे मला जाणवली ती माझी व्हल्नरॅबिलिटी. ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द मला सुचला नाही. मी अतिशय व्हल्नरेबल आहे. आणि ते वारंवार ह्या ब्लॉगवर उघडही झालेलं आहे.

पण बाहेरच्या जगात आपली व्हल्नरॅबिलिटी उघड झाली तर चालेल का? नाही. जग ही एक मोठी पॉलिटिकल जागा आहे. आपण सगळेच तिथे एक मुखवटा घेऊन वावरत असतो. मीही एक मुखवटा घेऊन तिथे वावरते. तो मुखवटा एका धीट, कॉन्फिडंट, गो गेटर मुलीचा आहे. ते नाटक मी योग्यतेने पार पाडते. कुणाला पत्ता देखील लागू देत नाही माझ्या व्हल्नरॅबिलिटीचा. म्हणजे माझा जो पिंड आहे तो मी दडपून टाकते. माझी सेन्सिटिव्हिटी पुरून टाकते आणि मग उरते एक भयाण ठसठस. ज्वालामुखीची. ती ठसठस आणि हा ब्लॉग ह्याचा खूप गहिरा संबंध आहे.

आपण जे आहोत तसं वागण्याचा बोलण्याचा हा एक प्रयत्न आहे असं आज मला वाटतं. ती व्हल्नरंबिलिटी, जी मी कुणाकडेच उघड करू शकत नव्हते, ती मी इथे उघड करत राहिले. ती माझी गरजच बनली. वाचकांना ती आवडायला लागली. हो. व्हल्नरॅबिलिटीच. म्हणजे माझ्या व्हल्नरॅबिलिटिचं ग्लोरिफिकेशन इथे व्हायला लागलं. तेही मला आवडायला लागलं. तुमचे सल्ले, तुमच्या कमेंट्स ह्यांची मी ऍडिक्ट बनले. पण ह्या सगळ्याचा पायाशी होती ती मनातली ठसठस, जी दडपण्यासाठी एक मुखवटा मी घातला होता बाहेरच्या जगात. आणि गंमत म्हणजे ती उघड करण्यासाठीही मी एक मुखवटा घातला संवादिनीचा.

पण आता माझ्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मी त्याला भेटणं, त्याने मला विचारणं आणि माझा होकार हे सगळं ह्या ब्लॉगने पाहिलं. पण आता जेव्हा मला तो मिळाला आहे. त्याच्यापासून लपवण्यासारखं काही नसावं अशी एक इच्छा आहे आणि अपेक्षाही आहे. ह्याचाच अर्थ ही व्हल्नरॅबिलिटी उघड करायची संधी मला ह्यापुढे मिळत राहील.

आतापर्यंत लिहिण्याचं मोटिव्हेशन जे होतं ते यापुढे नसेल. मग मी लिहीत राहावं की थांबावं?

टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन.

- संवादिनी

Thursday, October 2, 2008

उत्तर आणि प्रश्न

दाटून आलेला होकार,
ओठांशी येऊन थांबला

त्याने प्रश्न विचारताच,
वेंधळ्यागत सांडला.




- संवादिनी

Thursday, September 25, 2008

प्रश्न, उत्तर आणि बेड्या

हा माझा इथला अखेरचा आठवडा. काम संपलं असं म्हणू शकत नाही कारण प्रोजेक्ट चालू राहणारंच आहे. मी एकटीच परत चाललेय. पुढच्या मुक्कामाची कागदपत्र तयार होईपर्यंत मला इथे पाठवली होती. ती तयारी होत आलेली आहे. मलाही इथे कंटाळा आलेलाच होता. घराची ओढ होतीच आणि त्याला भेटायचीही.

तो म्हणजे बाबाच्या सीसीआय मधल्या मित्राचा मुलगा. मी दिल्लीला जायच्या आधी बाबा मला हिंदू जिमखान्यावर डिनर ला घेऊन गेला होता. तिथेच बाबाने त्याला आणि त्याच्या आई बाबांनाही बोलावलं होतं. उद्देश हा होता की आमची ओळख व्हावी आणि त्यातून पुढे काही जमलं तर बघावं. पण बाबाने मला असं काहीही सांगितलं नव्हतं. हॅरी पॉटर थोडासा इंडियन झाला, त्याने थोडा वेगळा चस्मा लावला आणि थोडासा तो गंभीर झाला तर कसा दिसेल? तसा दिसला तो मला. म्हणजे बघून आवडला. पण त्यात सीरियस काहीच नव्हतं.

अर्थात आम्ही एकाच वयाचे म्हणून बोलायला लागलो. म्हणाला जिमखान्याला चक्कर मारून येऊया का? नक्कीच. बोलता बोलता तो उलगडत गेला. खरंतर मीच बोलत होते, पण ऐकणंसुद्धा अर्थपूर्ण असू शकतं की नाही? खूप छान वाटलं त्याच्याबरोबर बोलून. खूप नम्र वगैरे वाटला. मी असं केलं नि मी तसं केलं अशा बढाया मारणाऱ्यातला नाही. इतरांचं कौतुक करणारा, माझं कौतुक करणारा असा वेगळाच पण रोमँटिक नाही.

दुसऱ्या दिवशी बाबाने मला सगळा प्लॉट सांगितला. मला तशी थोडी कल्पना आलीच होती. तेव्हा हे सगळं ब्लॉगवर लिहावं असं खूप वाटलं, पण नाही लिहिलं. तेव्हाची परिस्थितीच अशी होती की अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागला नसता.

आम्ही पुन्हा दोघंच भेटलो. विसाव्या मजल्यावरून मुंबई खूपच सुंदर दिसत होती. काचेच्या भिंतीशेजारचं टेबल, क्वीन्स नेकलेस आणि माझ्यासमोर तो. अजिबात मोठ्याने न बोलणारा. मोजकंच बोलणारा पण योग्य ते बोलणारा. त्याचं तिथे ते असणं, बोलणं इतकं भारावणारं होतं की माझा माझ्यावरचा ताबा सुटतोय की काय असं वाटायला लागलं. हाच का तो? ज्याच्याबरोबर माझं अख्खं आयुष्य जाणार? त्याने मला घरी सोडलं तेव्हाही मी मंतरल्यासारखीच झाले होते. त्याने मला तो प्रश्न विचारला नाही. मी विचारण्याचा प्रश्न नव्हताच, पण त्याने विचारल्याशिवाय मी उत्तर देणार नव्हते हेही नक्की ठरवलं.

कदाचित त्याला मी आवडले नसेन? असेनही. पण त्याचं जग माझ्या जगासारखं असेल का? माझं जग वेगळंच आहे. माणसांनी बनलेलं आहे ते. नाती माझ्यासाठी लाख मोलाची आहेत. पैसा तितकासा नाही. बाबाने स्वतःच्या वागण्यातून हे आम्हाला शिकवलंय. उंबरठ्याशी नाळ कधीही न तोडण्याची त्याची वृत्ती उंबरठे ओलांडूनही आमच्यात मुरली आहेच. तो, त्याचे आई, बाबा, सगळं छान आहे. घरही छान आहे. प्रभादेवी म्हणजे गिरगावापासून फार लांब नाही.

मी मुंबई सोडली आणि आमचं रेग्युलर चॅटिंग व्हायला लागलं. हा मिडिआ त्रासदायक छान आहे. त्या दोन महिन्यात आम्ही एकमेकांना जसे उलगडलो तसे कदाचित रोज भेटूनही उलगडलो नसतो. पुन्हा मुंबईला गेले, पुन्हा त्याला भेटले. मग इथे आले. फोनाफोनी चालूच होती. आणि त्याने मला शेवटी सांगितलं ही वॉंटस टू मॅरी मी. जोपर्यंत प्रश्न विचारला नव्हता तोपर्यंत सगळं छान होतं. मुंबईला भेटू तेव्हा सविस्तर ह्याबाबत बोलू असं सांगून मी वेळ टाळली.

खरंच मी लग्नाला तयार आहे का? मला तो आवडला, पण लग्नाच्या जोखडात स्वतःला गुंतवून घ्यायला मी खरंच तयार आहे का? भांडून, झगडून करिअरसाठी मी घराबाहेर पडले. नशिबाचे फासे चांगले पडत गेले, प्रगती झाली. मुंबईत चार वर्षाच्या नोकरीत जेवढा अनुभव नाही आला तो गेल्या सहा महिन्यात मिळाला. उद्याची चिन्ह आशादायक आहेत. दोनंच आठवड्यात मी पुढच्या मोठ्या मुक्कामाला जाईन. तिथे मोठी जबाबदारी, मोठं शिक्षण, मोठा अनुभव. आपण काहीतरी कंस्ट्रक्टीव्ह करत आहोत हे फिलिंग? ते सगळं सोडून देऊ? नाही म्हटलं तरी लग्न म्हटलं म्हणजे नवऱ्याच्या दावणीला बांधून घेणं आलं. नोकरी करू शकेन पण मुंबई सोडू शकेन का? तडजोड करावीच लागेल आणि लग्न झाल्यावर तडजोड करायची जबाबदारी फक्त मुलीच्याच अंगावर पडते ना?

मला खूप मोठं व्हायचंय मग आताच माझ्या पायात मी लग्नाच्या बेड्या अडकवून घेऊ का? बरं त्याला माझ्यासाठी टांगवत ठेवणं मला मान्य नाही. उद्या मी ज्या प्रोजेक्टवर जाणार आहे तिथे किमान दोन वर्ष राहावं लागेल असं सांगितलंय. एवढे दिवस तो थांबेल? माहीत नाही. विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलेय.

मला वाटायचं की आय ऍम समवन हू कॅन हॅव द केक अँड इट इट टू. बट आय गेस आय कांट.

- संवादिनी

Thursday, September 18, 2008

सिंदबाद, द्रौपदी आणि तिठा

काम नसण्याचा प्रचंड कंटाळा कधी तुम्हाला आलाय? मला सध्या भयंकर कंटाळा येतोय, काहीच करायला नसण्याचा. तसा म्हणायला माझा दिवस इथे साडेचारच्या ठोक्याला सुरू होतो. पहाटेच्या साडेचारच्याच. बरोबर साडेचाराला "थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले" चा गजर सुरू होतो. हे गाणं साधारण दोन ते तीन वेळा ऐकल्यावर मी उठते आणि जो काही वेळ उरला असेल त्या वेळात तयार होऊन आमची स्कूल बस पकडायला धावते. स्कूल बस म्हणजे आम्हाला ऑफिसला नेण्यासाठी कंपनीने दिलेली व्हॅन.

मी इथे फक्त एक महिना आहे. दोन आठवडे झालेत आणि दोन आठवडे अजून आहेत. मला स्टॉप गॅप म्हणून इथे पाठवलं असल्याने मला कुणी काही काम दिलेलंच नाही. मग माझं काम म्हणजे मदतनिसाचं. कुणाला काही मदत हवी असेल तर ती करायची. नको असेल तर लोकसत्ता, म. टा., जीटॉक ह्यांच्या साहाय्याने वेळ काढायचा. पण हे सगळं चालतं साधारण दहा वाजेपर्यंत. साडेदहाला ट्रेनिंग सुरू होतं. आणि माझं सो कॉल्ड कामही.

तुम्ही टी. व्ही वरचे गेम शोज बघत असाल तर तुम्हाला माझा रोल साधारण लक्षात येईल. त्यांनी नाव दिलंय असिस्टंट ट्रेनर. पण जसं टी. व्ही. वर गेम शोजमध्ये मार्क सांगायला, उगाचच हसायला आणि नुसतंच इथे तिथे मिरवायला एक सुंदरी ठेवलेली असते, तसंच काहीसं माझं काम (सुंदर वगैरे नसूनही). म्हणजे असिस्टंट असल्याने मेन ट्रेनर ट्रेनिंग देतो. (मुळात मला येतंय कुठे काही दुसऱ्याला शिकवायला? ). माझं काम ट्रेनिंग मटेरिअल वाटणं, एक्सरसाइज शीटस वाटणं आणि इन जनरल अडल्या नडलेल्याला मदत करणं. तेही सगळं ठीक आहे. पण खरी गोची तर पुढे आहे.

ट्रेनर म्हणून मला स्टेजवर बसायला लागतं. पहिला अर्धा पाऊण तास लोकं लक्ष देऊन ट्रेनिंग घेतात. मग इथे तिथे बघायला लागतात. जांभया देतात. लोकांना जांभया देताना बघून मलाही भरपूर जांभया येतात. पण इतक्या लोकांसमोर आपल्याच कंपनीच्या ट्रेनरच्या ट्रेनिंगमध्ये जांभया तरी कशा देणार?

माझंही ट्रेनिंगमधलं लक्ष उडतं आणि विचारांचं चक्र सुरू होतं. काय म्हणून मी इथे आहे? हेडकाउंड? कंपनीला एका माणसाला असिस्टंट म्हणून बसवलं की पैसे मिळतात म्हणून? इथपासून ते समोर बसलेल्या एखाद्या अरबाने पांढऱ्या च्या ऐवजी पिंक झगा घातला आणि डोक्याला फ्लोरोसंट रिंग घातली तर तो कसा दिसेल इथपर्यंत.

मध्ये एक लंचचा म्हणून ब्रेक असतो. म्हणजे अनॉफिशिअल. रमादान मध्ये इथे बोलायलाही तोंड उघडताना भीती वाटते, खाण्याचं सोडाच. एक पँट्री आम्हा काफरांसाठी उघडी ठेवलेली असते. तिच्यात सगळ्यांनी कोंडून घ्यायचं. दरवाजा घट्ट लावायचा आणि आपापले डबे काढायचे. सख्त ताकीद अशी की जेवणाचा वास येईल असं काहीही आणायचं नाही. म्हणजे पाव आणि त्यात जे जे काही घालता येईल ते. मी भारतातून आणलेले बेसनाचे लाडू अजून संपले नाहीयेत. मी रोज लंचला एक लाडू, एक फळ आणि मेथीचे ठेपले खातेय. मला सॅड्विच खाऊन भयंकर वीट आलाय.

यथावकाश आमचं काम संपतं. साधारण साडेतिनाला आमची स्कूलबस परत येते. घरी नेऊन सोडते. मग संध्याकाळी आम्ही कॉर्निशला फिरायला जातो. कॉर्निश म्हणजे इथला मरीन ड्राइव्ह. मस्त वाटतं. संध्याकाळ झाली की थोडा गारठा पण वाटतो. पण अंधार पडायच्या आत आम्ही घरी येतो. मग तिथे खूपच गर्दी वाढते. म्हणजे उपास सुटल्यावर. घरी आलो की जेवण. ते झालं की मात्र मी माझ्या खोलीत पळते.

घरी फोन करते. बाबा असतोच. कधी विन्या असतो. आईला सध्या खूप काम आहे तिला रोज उशीर होतोय. उशीरा फोन केला तरी ती कधी कधी भेटत नाही. बाबा मला दिवसभरात घडलेलं सगळं सगळं सांगतो. मग मीही सांगत राहते ट्रेनिंगच्या गमती जमती. रमादान ची गंमत. आमच्या बिल्डिंगमध्ये इफ्तार होता त्याला गेलेले त्याची मजा सांगितली. सगळं झाडून खाल्लं. खाल्ल्यावर विचारायचा प्राणी कोणता होता म्हणून. बाबाला सगळं सांगते पण आईला नाही सांगत. तिला उगाच चिंता लागून राहणार मुलीचा धर्म बुडाला म्हणून.

घरचा फोन झाला की त्याला मिस्ड कॉल द्यायचा. मग तो फोन करतो. तो खास उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबतो, कारण फोन फुकट. मग मी आणि तो खूप वेळ बोलत राहतो. बाबाला ऐकवलेली टेप पुन्हा त्याला पूर्ण ऐकायला लागते. तो ऐकायला वाघ आहे. मी कितीही बडबड केली तरी त्याला अजिबात कंटाळा येत नाही. तो फार बोलत नाही. पण नेमकं बोलतो. विचार करायला लावणारं बोलतो. कधी मला गाणं म्हणायचा आग्रह करतो. मीही जास्त आढेवेढे न घेता एखादं छानसं गाणं म्हणते. मग मी त्याला गाणं म्हणण्याचा आग्रह करते आणि तो ऐकतोही. हम दिल दे चुके सनम मधल्या वनराज सारखं थेट. पण मला आवडतं त्याचं गाणं. निदान म्हणतो तरी.

रोज रात्री आयुष्य असं तिठ्यावर येऊन थांबतं. आपण सगळेच असतो कधी ना कधी एखाद्या तिठ्यावर उभे? दोन वाटा समोर दिसत असतात आणि दोन्हीही आकर्षक, हव्या हव्याश्या वाटणाऱ्या. एक वाट सिंदबादची असते. धाडसाने भरलेली, जग दाखवणारी, आव्हानात्मक, स्व जोपासणारी आणि दुसरी वाट असते स्वार्पणाची, स्व विसरायला लावणारी, द्रौपदीची, सीतेची, समर्पणाची. स्व जोपासणं ही जशी माझी गरज आहे तशीच विरघळून जाणं हीदेखील माझी गरज आहे. विचारात झोप विस्कटून जाते आणि पुन्हा "थोडी सागर निळाई" सुरू होते.

मग मी पुन्हा घाईने उठते. उठताना फक्त मनाला एकंच समजावते.

विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू ह्या वळणावर, ह्या वळणावर..

- संवादिनी

Thursday, September 11, 2008

बाप्पा आणि मी

ही गणेश चतुर्थी वेगळीच होती.

....गणेश चतुर्थीच्या आदला दिवस. संध्याकाळची धामधूम आहे. रस्त्यात गर्दी. दुकानं सजलेली. खरेदी चाललेली. आम्ही चौघं मादुस्करांच्या गणपतीच्या कारखान्याच्या समोर उभे आहोत. समोरच्या हातगाडीवर एक गणपतीची मोठी मूर्ती ठेवलेय. समोर काही वाद्य वाजतायत. आम्ही दुकानाच्या समोर उभे. मदुस्करांकडे कधीच बुकिंग करून ठेवलंय. गणपतीची मूर्ती बाबाच्या हातातल्या पाटावर बसते. बाबा पुढे आम्ही तिघं मागे. माझ्या हातात झांजा. बाबा ओरडतो गणपती बाप्पा मोरया....

....थर्माकोलचा ढीग समोर पडलाय. विन्या आमचा लीडर, कारण आईकडून चित्रकला त्याने उचललेय. त्याच्या मनात मखर केव्हाच तयार झालेलं. मी म्हणजे त्याची मदतनीस. हरकाम्या. अगदी जा आईकडून खळ घेऊन ये, ते कागदाची फुलं बनव, थर्माकोल काप, तो मखर जोडत असताना दोन्ही बाजूंनी ते धर, असली फुटकळ कामं करायला. आज त्याचा दिवस आहे, मग मी त्याला उलटून बोलणार तरी कशी? चाळीच्या अंगणात सगळी मुलं गणेशोत्सवाचं मखर बनवतायत. तिथलेही विनोबा हेच. मग मला कामाला लावून तो खाली जातो, त्यांना कामाला लावून वर येतो. मध्येच आई येऊन बघून जाते. तिच्यासमोर मात्र त्याचं काही चालत नाही. ती म्हणाली रंग बदल, आकार बदल काहीही बदल तरी तो मुकाट्याने ऐकतो. बाबा दारावरती माळ लावतोय. त्यातला कुठलासा दिवा लागत नाहीये. तो विन्याला पकडतो आणि बाहेर जाऊन दुसरा बल्ब घेऊन यायला सांगतो. माझं मखर कुठेतरी चुकतं. विन्या संधी मिळाल्यासरशी खेकसतो आणि बाहेर पडतो. गणपती परवावर आणि मखर जस्ट सुरू झालंय. मी पटकन शेजारी जाऊन तयारी बघून येते. त्यांचं मखर पूर्ण. मला टेन्शन....

....गणेश चतुर्थीची संध्याकाळ. मी स्कूटरवर. दुपारचं जेवण सुस्ती आणणारं. मोदकाची चव अजूनही जिभेवर. उकडीचे मोदक. आईने बनवलेले उत्तम, पण आजीच्या हाताची चव काही औरच. सहा साडेसहाला लोक यायला सुरुवात होते, त्याआधी मी आजीकडे पोचते. आजी वाट बघतेच आहे. पटकन समोर देवाला नमस्कार करते. आजीकडची मूर्ती आमच्यापेक्षा थोडी छोटी आहे. पण मादुस्करांचीच आहे. डोळे अगदी आमच्या बप्पांसारखेच आहेत. तेवढ्यात आजी आतून माझ्यासाठी केलेले मोदक गरम करून आणून देते. मामी आतून तूप घेऊन येते. मोदकाची शेंडी मी फोडते, आतमध्ये तूप पडतं. मोदक पोटात जातो. कितीही पोट भरलं असलं तरी आजीच्या मोदकाला मी नाही म्हणूच शकत नाही. मोदक संपतात न संपतात तर आजी निवगऱ्या घेऊन येते. गोड मोदक आणि तिखट निवगऱ्या ह्यांचं काँबिनेशन भलतंच सही.....

....गणपतीच्या दुसऱ्या दिवसाची सकाळ. तानपुरा सुरात लागलाय. तोडीचे आलाप असे काही जमून जातात की देवालाच माहीत. घरातलं ते वातावरण, धुपाचा वास, कापराचा वास, समोर बसलेली गणपतीची मूर्ती, सगळं सगळं खोल आतून कुठूनतरी सुरांची निर्मिती करतं. अगदी उचंबळून आल्यासारखे आलाप येतात. सरसरून ताना येतात आणि डोळे पाणावतात. साक्षात गुरुचं गाणं असं विद्येच्या देवतेच्या समोर ऐकणं ह्यापेक्षा सुंदर काय असू शकेल. खरंतर मीही गाणं म्हटलेलं असतं. पण ह्या अनुभवाची तुलना त्या अनुभवाशी होणंसुद्धा शक्य नसतं. मी फक्त स्तंभित होऊन अनुभवत राहते.....

.... गणेश चतुर्थीची सकाळ. बाबाने सोवळं नेसलेलं आईने सोवळ्याची साडी, नाकात नथ. मी आईचीच पण माझी आवडती साडी नेसलेली. नुकतीच पूजा होऊन गेलेली. अचानक खालून लेझिमचा आवाज येतो. मी पळत गॅलेरीत जाते. चाळीचा गणपती गेटपाशी पोचलेला. त्याच्यापुढे तीसेक मुलं मुली लेझीम खेळत. बाळ काकांच्या गाडीवर पुढे दोघंजणं बसलेले आणि त्यांच्या मध्ये गणपती. गणपती समोर दोन दोनच्या पंधरा जोड्या. सगळ्यात पुढे दोन्ही लाईनींच्या मध्ये, श्रीपाद शिटी वाजवत ताल देताना. आणि त्याच्याही पुढे अण्णा आणि राजा. अण्णांच्या हातात मोठा डफ आणि राजादादाच्या हातात तो वाजवायच्या काड्या. गाडीच्या मागेच लेझीम न खेळणारी इतर लोकं चालत येताना. त्यात एक अनोळखी पण ओळखीचा चेहरा. कुणाचातरी कुणीतरी. कधीतरी चाळीत येणारा. लंबा चौडा, गोरापान. शोभणारा कुर्ता पायजमा, धारदार नाक आणि मध्येच गॅलेरीकडे चोरून वळणारी नजर...

... आम्ही सगळे गाडीतून उतरतो. गाडी मी चालवतेय कारण बाप्पा बाबाच्या हातात. मामा आमची वाट बघत गॅलेरीत उभा. आम्हाला बघताच, तो आत जातो, त्यांच्या बाप्पाला उचलतो आणि घराबाहेर पडतो. आमचे गणपती एकत्रच जातात. दीड दिवसाच्या गणपतींची तुरळक गर्दी असते. पुढल्या वर्षी लवकर या. मोरया मोरया. भजनं म्हटली जातात, टाळ वाजत राहता. पावलं चालत राहतात. चौपाटीचा फिरत्या पायऱ्यांचा ब्रिज दिसला की पोटात कालवाकालव होते. तसेच आम्ही चौपाटीला पोचतो. दोन्ही बाप्पांना वाळूवर ठेवलं जातं. समोर एक खड्डा खणून त्यात कापूर घातला जातो. शेवटची आरती होते. प्रसाद वाटला जातो. मग गंभीर आवाजात बाबा देवाला पुन्हा लवकर यायचं आमंत्रण देतो. सगळं जग विसरायला होतं आणि गळ्यात एक आवंढा दाटून येतो. गणपती विसर्जन करून देणारी पोरं पुढे होतात. घासाघीस करायला लागतात. बाबा आणि मामा गणपती घेऊन समुद्राकडे निघतात. आतापर्यंत जातात. लांबवर मूर्ती दोनदा पाण्यात बुडवून बाहेर काढतात, तिसऱ्या वेळी नुसताच पाट बाहेर येतो. पाण्यात बुडी मारून बाबा गणपतीची म्हणून खालची वाळू उचलतो. पाटावर ठेवून परत येतो. तो पाट बघवत नाही. दर वर्षी गणपती जाताना असंच होतं. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावतात. ती संध्याकाळ एकदम भकास होऊन जाते....

पुन्हा पुन्हा ही चित्र डोळ्यासमोर येत राहतायत. माझ्या उण्या पुऱ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात एकदाही गणपती हुकला नाही. पण ह्यावर्षी मी घरी नाही. घाबरत घाबरतंच माझ्याबरोबर आणलेली बाप्पांची छोटी मूर्ती आहे. तिची पूजा केली. बाहेर रमादान म्हणून उपास चाललेले. ऑफिस होतंच. मोदक काय, काहीही खायचं असेल तरी क्लायंटने उपकार म्हणून दिलेल्या एका खोलीत जाऊन खायचं. तीन दिवस मन सैरभैर झालं. पण सांगायचं कुणाला? बाप्पाच्या मूर्तीलाच ना?

खरंच ही गणेश चतुर्थी वेगळीच होती.

- संवादिनी

Thursday, August 28, 2008

जाणं, राहणं आणि गुंता

काल घर सोडायला हवं होतं. म्हणजे सांगितलं तसंच होतं की बुधवारी निघायचं. सोमवारपासून जोरदार तयारी चालू होती. खरेदी तर दिल्लीहून परतल्यापासून थांबतच नाहीये. त्यात परदेशी कामाला जायचं असल्याने कंपनीने काही जास्त अलावन्स दिलाय. कुणी खरेदी करायला असेच पैसे दिले तर कोण सोडेल. अगदी शेवटच्या पैपर्यंत तो अलावन्स मी संपवला. त्याची बिलंही पाठवून दिली.

पुढचा प्रोजेक्ट ट्रेनिंगचा प्रोजेक्ट आहे. नेहमीप्रमाणे मी काय करणार आहे ह्याची मला अजिबात कल्पना नाहीये. त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे एकच महिना तिथे जायचंय. मग काही दिवस भारतात परत यायला मिळणारे. पण ट्रेनिंगचा प्रोजेक्ट असल्याने, आम्ही सर्व प्रेसेंटेबल दिसणं आवश्यक आहे. त्या प्रकारचे फॉर्मल्स खरेदी करणं आलं. ब्लेझर वगैरे बाप जन्मात कधी घातलं नव्हतं ते आता घालायला लागेल. गंगा वाहतेच आहे तर हात धुऊन घ्या म्हणून माझी उंची दीड इंचाने वाढवणारे हिल्स आणि गिरगावात राहणाऱ्या मुलीच्या मानाने तोकडे वाटणारे (तरीही चांगलेच लांब) असे स्कर्टस घेऊन झाले. अर्थात घेतानाच दोन सेमी फॉर्मल घेतलेत, म्हणजे ऑफिसात आणि ऑफिसाबाहेर चालतील.

गेला आठवडाभर आई नुसती सुटलेय. माझ्या पाककलेच्या ज्ञानात दर रोज काही ना काहीतरी भर पडतेय. मी आईला म्हटलं, मला हे सगळं काही लक्षात राहणार नाही. तर म्हणाली, राहील. करून करूनच येतं. तिथे गेल्यावर बाहेरचं खाऊ नको. घरीच बनवत जा. तब्बेतीला चांगलं नाही बाहेरचं. मी हो म्हटलं. ही बाबाची पॉलिसी. आई जे म्हणेल त्याला तो हो म्हणतो. आणि स्वतः शेवटी हवं तेच करतो. मीही तसंच करते आणि विन्याही तसंच करतो.

मला कधी कधी खूप वाईट वाटतं आईचं. ती एवढं करते आमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही तिला सीरियसली घेत नाही. बाबाची पण चूक आहे. तोपण सतत तिची थट्टा करत राहतो आणि आम्हीपण. पण तरीही ती आमचं मनापासून करते. आम्ही सल्ले मानत नाही माहीत असूनही सल्ले देते. वाईट वाटलं की मग मी दोन दिवस शहाण्यासारखं वागते. तिला उलटून बोलत नाही. तिने सांगितलेलं ऐकते, पण दोन दिवसांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

तर आईने सगळं किराणा मालाचं दुकान खरेदी करून आणलंय. मी तिला म्हटलं आई वीसच किलो नेता येतं. तर म्हणते असूदे. नाही मावलं तर घरी वापरता येईल पण मावत असेल तर ऐन वेळी दुकानात जायला नको. मी आपलं बरं म्हटलं.

काल निघायचं होतं. परवापासूनंच घरात निरोपाची भाषा चालली होती. बाबा म्हणाला मला, नीट राहा, शहाण्या मुलीसारखी राहा, फोन करत जा, अगदी रोज नाही जमला तरी आठवड्यातून एकदा तरी कर. मेल रोज कर. त्याच्या डोळ्यात दिसतं की आभाळ भरून आलंय म्हणून. मन भरून येणं हा संसर्गजन्य रोग आहे. मग मला त्याची बधा झाली नाही तरच नवल.

खरंतर घरापासून दूर राहूनंच मी आता परत आलेय. पहिल्यांदाच एकटी कुठे जातेय असं नव्हे. बाहेर एकटं राहायची भीती आहे, अनुभव नाही असं अजिबात नाही. तरीही मला दिल्लीला जाताना जितकं हळवं व्हायला झालं होतं तितकंच कालही झालं.

आईने, विन्याने सुट्टी घेतली होती. दुपारी जेवणं झाल्यावर मात्र मला अगदी असं वाटायला लागलं की मरूदे ती नोकरी. इथेच राहावं मजेत. मुंबईत नोकऱ्यांची कमी नाही. कशाला उगाचच घरापासून दूर राहून स्वतःला त्रास करून घ्यायचा. तरीही शेवटची आवरा आवर चाललेली होती. संध्याकाळचं विमान होतं. तिनाच्या सुमाराला घरातून निघायचं होतं. पासपोर्ट एअरपोर्टवर मिळायचा होता. आणि साधारण अडीच वाजता फोन आला, व्हिसा झाला नाही, आज जाता येणार नाही.

दुसऱ्या कुणाचं असं झालं असतं तर मला वाटलं असतं काय पचका झाला. माझ्या बाबतीत झालं, तेव्हा मात्र मला असं काहीही वाटलं नाही. झाला असेल तर थोडा आनंदच झाला. एक दिवस अजून घरी राहायला मिळणार म्हणून. फोन करणारा असंही म्हणाला, की उद्या जर काम झालं नाही व्हिसाचं तर रविवारीच होईल, कारण शुक्रवार, शनिवार तिथे सुट्टी आहे.

एकीकडे वाटलं, उद्या यायलाच हवा. दुसरीकडे वाटलं, नकोच यायला, तेवढं जाणं अजून लांबेल. जायचं तर आहे पण घरी राहायचं पण आहे.

असा सगळा गुंता आहे.

- संवादिनी

Thursday, August 21, 2008

मी आणि मधली सुट्टी

शाळेत होते तेव्हाची गोष्ट. माझी शाळा घरापासून फार लांबही नाही आणि फार जवळही नाही. रमत गमत चालत गेलं तर पंधरा मिनिटं, भरभर चालत गेलं तंर दहा मिनिटं. शाळा दुपारची असायची तेव्हा. एकाच्या ठोक्याला सुरू व्हायची सहाच्या ठोक्याला संपायची. साधारण साडेतीनला मधली सुट्टी व्हायची. सगळ्या मैत्रिणी डबा आणायच्या, पण बहुतेक वेळा मी घरी पळायचे. अर्ध्या तासाची मधली सुट्टी, म्हणजे दहा मिनिटं जायला, दहा यायला आणि मध्ये दहा मिनिटं घरी, चहा प्यायला.

मी एकलकोंडी होते, मैत्रिणी आवडायच्या नाहीत असं अजिबात नाही. पण घरी जायचं एक ऍट्रॅक्शन होतं. वीस मिनिटाची धावाधाव करून घरी घालवलेली दहा मिनिटं मोलाची वाटायची.

दिल्लीहून घरी पोचले गेल्या आठवड्यात. खरंतर पंधरा ऑगस्ट दिल्लीत साजरा करायचा विचार होता. आई, बाबा उत्तरेतच होते. ते तिथून दिल्लीला येणार होते. पण ऐन वेळी सगळं रद्द केलं. कारण मला घरी जायचं होतं. घरापासून दूर इतके दिवस राहिले मग अजून चार दिवस चालू शकलं असतं. माणसाची माया माणसांना बोलावते असं म्हणतात. घराची मायाही माणसांना बोलावते हे अनुभवलं.

दिवस मजेत गेले, पण जसा सोमवार आला तसं घराबाहेर पडणं जीवावर यायला लागलं. ऑफिसमध्ये जाऊन काही कागदपत्र द्यायची होती, काही फॉरमॅलिटीज पुऱ्या करायच्या होत्या, ते सगळं केलं, पण संध्याकाळी परत घरी आले. करमलंच नाही तिथे. आनंद अमेरिकेला गेलाय. तो भेटला नाही. आनंदी भेटली. घाईत होती आणि मीही. पण तिथे गेल्यावर बरं वाटलं. जुनं काहीतरी पुन्हा भेटल्याचा आनंद.

आईच्या आग्रहाखातर अजून एका मुलाला भेटले. मुलगा चांगला आहे. दिल्लीला असताना रोज फोन, चॅट चालू होतं. महिन्याभराने मी परत आले की पुन्हा भेटायचं ठरवलंय. कनेक्शन वाटलं असंही नाही आणि वाटणारच नाही असंही नाही, असं दोघांचही मत पडलं. निदान, मला त्याच्याशी ह्या विषयावर फ्रीली बोलता येतंय हेही नसे थोडके. आणि अत्ता वेळ कुणाला आहे ह्या भानगडीसाठी?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई बाबा आणि विन्याबरोबर पूर्वीसारखी मजा करता आली. विनाकारण (म्हणजे विन्यामुळे) भरपूर हॉटेलिंग झालं. गप्पा झाल्या. आजीकडे जाऊन आले. उरल्या सुरल्या मैत्रिणींना भेटले. दोन अडीच महिने केलं नाही ते सगळं केलं. पण कुठेतरी एक बोच मनाला लागून राहिली होती. माझ्याच नाही, सगळ्यांच्याच. सगळी धावपळ चालली होती, एका आठवड्यात मागचे दोन आणि पुढचा एक महिना बसवायची.

पुढच्या आठवड्यात मी पुढच्या मुक्कामाला जाईन. नवं शहर, नवी जागा, नवी माणसं, नवं काम आणि नवं स्वातंत्र्य. घरी असताना सतत असं वाटतंय की माझी जागा इथे नाही. मला आता परत निघायचंय, उडायचंय. दिल्लीत होते तेव्हाही मी उडत होते, पण आपलं घरटं आहे आणि महिन्या दोन महिन्यानी आपण परत तिथे पोचू असा दिलासा होता. अता पुढच्या वर्षभराचा कार्यक्रम लागलेला आहे. घरी असूनही आठवड्यानी परत जायचंय ह्याचंच दुःख जास्त वाटतंय.

विनूला विचारलं मी की विन्या मिस केलंस का रे मला? तर म्हणाला, अजिबात नाही. सुठीवाचून खोकला गेला. गम्मत करत होता तो, पण मला वाईट वाटलं, त्याला कळलं. मग सॉरी म्हणाला. आईची खरेदीची घाई चाललेली. तिथे हे मिळणार नाही आणि ते मिळणार नाही म्हणून भंडावून सोडलंय. आमचं सगळं किचन बहुतेक बॅगेत कोंबून देणारे मला.

बाबाचं काय लिहू. बऱ्याच दिवसांनी त्याच्याशी मनमोकळं बोलताना एवढं बरं वाटलं सांगू? एवढा चांगला बाबा असताना महिनोन महिने आपण त्याच्यापासून दूर राहायचं म्हणजे शिक्षाच आहे मला.

त्याला मी म्हटलं, बाबा तू एवढा छान बोलतोस, लिहून काढ ना सगळं, मी टाईप करून देईन तुला. त्याच्या गमती जमती, कॉलेजमधले किस्से, चळीतले किस्से. एक अख्खं पुस्तक होईल तयार. तर म्हणाला, कारकुनांचं काम लिहिण्याचं. अनुभवलेलं जे आहे ते गेलं. गंगेला मिळालं. त्याच्या पोकळ आठवणी काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ दुसरं काहीतरी छान अनुभवण्यात घालवायचा. बऱ्याच दिवसांनी मला त्याचं हे पटलं नाही. मी वाद घातला. मग म्हणाला, समज तू एखाध्या अत्तराचा वास घेतलास, तर तुला तो सुवास कसा होता हे तसंच्या तसं लिहिता येईल? तू लिहिशील मोगऱ्यासारखा होता. पण मोगऱ्याचा प्रत्येकाला आलेला अनुभव वेगळा आहे. त्यामुळे वाचणाऱ्याला मोगऱ्याचा जो अनुभव आला तो तुला आला असावा असं त्याला वाटणार. पण तो तुझा ओरिजिनल अनुभव नाहीच ना? मग लिहिण्याचा सगळा खटाटोप कशासाठी?

तो म्हणतो ते बरोबर आहे आणि नाहीही.

दुपारी एकटीच गॅलेरीत उभी होते. माझ्याच शाळेतली एक चिंगी, लाल रिबिनी बांधलेल्या दोन वेण्या उडवत कुठेतरी चालली होती. कुठेतरी का? नक्की मधली सुट्टी असणार आणि ती घरीच चालली असणार. मला वाटलं मीही तिच्यासारखीच आहे. मधल्या सुट्टीत घरी अलेली. उद्या परवा ही सुट्टी संपेल आणि मी पुन्हा शाळेत निघून जाईन जगाच्या. तिथे नवे मित्र असतील, नवं शिक्षण असेल, पण घरात मिळणारे दोन निवांत क्षण. आईच्या हातचे मोदक, बाबाची विस्डम आणि विन्याची टशन काहीही नसेल.

पण मीही येत जाईनच की मधल्या सुट्टीत, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा?

- संवादिनी

Thursday, August 14, 2008

दुःखारंभ आणि दुःखांत

प्रवाही विचारांसारखं नदीचं पाणी वाहत होतं. पण तो प्रवाह माझ्या विचारांसारखा नव्हता. तो प्रवाह एखाद्या प्रगल्भ व्यक्तीच्या संपृक्त विचारांसारखा गर्भार होता. माझे विचार खळखळणाऱ्या पाण्यासारखे आहेत. कदाचित उथळही असतील.

पाण्याच्या बाजूला एक संगमरवरी इमारत उभी होती. भली मोठी, प्रचंड, पण छाती दडपून टाकणारी नाही. देहभान विसरायला लावणारी. कुणी बनवलं असेल हे अद्वितीय वास्तुशिल्प? एखाद्या चुंबकाकडे लोहकणानं आकर्षित व्हावं, तशी मी त्या इमारतीकडे खेचली गेले. त्या इमारतीच्या रुंद, चंद्रधवल, भिंतीला हात लागला तेव्हाच मी समाधानले. अगदी चुंबकाला चिकटलेल्या लोहकणाप्रमाणे.

कुणाचातरी स्पर्श मला जाणवला. खरंतर स्पर्श करणारं कुणी नव्हतं पण काहीतरी फार मोठं, मनाला स्पर्शून जात होतं. कुणाचेतरी बलदंड पीळदार स्नायू, लोहाराच्या भात्यासारखी वरखाली होणारी छाती, घणाचे घाव, घामाचा दर्प. नाही, दर्प नाही, गंध. प्रचंड, अत्युत्तम, सृजनशील काम करताना येणाऱ्या घामाला दर्प तरी कसा येईल? सुगंधच तो. निर्मितीचा.

कुणीतरी म्हटलेली प्रेमकाव्य. पण त्याला लावलेल्या दूरावरून ऐकू येणाऱ्या तराण्यासारख्या हृदयद्रावक चाली. मृत्यूचं दुःख, प्रेमाचं दुःख की दुःखावरचं प्रेम? तुटलेले हात, कळवळणारे आवाज, अमर्याद दुःख, असीम दुःख.

अत्युत्तम नवनिर्मितीला दुःखाचा शाप असावाच लागतो का?

आजूबाजूचं जग आपल्याच आनंदात होतं. मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. जगाला आश्चर्यचकित करणारं ते शिल्प. त्याच्या सान्निध्यात आल्यावर लोकांना आनंद झाला नाही तरच नवल. कुणी त्याची नजाकत डोळ्यात तर कुणी कायमची साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतं. कुणी प्रेमात पडलेले जीव, आपल्या प्रेमाला त्या शिल्पाची उपमा देण्यात मशगुल होते. मला आश्चर्य वाटत होतं ह्या गोष्टीचं की प्रेमाच्या ह्या भरजरी शालूला लावलेलं दुःखाचं ठिगळ लोकांना दिसत कसं नव्हतं?

चंद्रकिरणांसारखे असणारे चार मीनार माझ्याकडे पाहत होते. कदाचित कीव येत असेल त्यांना माझी. कारण मला तिथे आनंद कुठे दिसतंच नव्हता. विरहाचं दुःख. प्रियेच्या मृत्यूचं दुःख, आणि दुःखातून झालेली नवनिर्मिती. अप्रतिम सौंदर्याची आठवण म्हणून निर्माण केलेलं आणखी एक सौंदर्य. त्या सौंदर्यातून निर्माण झालेला अहंकार आणि त्या सौंदर्याची पुनरुक्ती कुठेही होऊ नये म्हणून अहंकारातून जन्मलेलं हजारो तुटल्या हातांचं दुःख. भळभळणाऱ्या जखमा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडवणारं दुःख.

दुःखारंभ आणि दुःखांत.

ते चंद्रधवल शिल्प अचानक मला पांढुरकं वाटायला लागलं. अगदी साधारण. नपुंसक.

त्या दुःखाकडे पाठ फिरवून मी चालत राहिले. चालत चालत बरीच दूर आले. एका दुसऱ्या इमारतीपाशी पोचले. ह्या इमारतीच्या चिरा न चिरा लाल दगडातून तासलेला होता. मघा जाणवलेल्या पांढऱ्या रक्ताचा, लाल रंग वेगळा आणि हा लाल रंग वेगळा. उद्दाम, उन्मत्त, शासक लाल रंग.

आता मी लोहकण झाले नाही. आपल्याच तंद्रीत मी इमारतीत चालत गेले. इथेही इतर लोक होतेच. काय बघत होते कोण जाणे. मला मात्र उत्सुकता होती, पांढरं दुःख निर्माण करणाऱ्याचं दुःख बघायची.
वाट काढत काढत मी एका खोलीत पोचले. इथेच त्याचा अंत झाला होता म्हणे. पांढरं दुःख निर्माण करणाऱ्याचा. पण तिथलं दुःख वेगळंच होतं.

माणसाचं सर्वात सृजनशील काम कोणतं? दुसऱ्या माणसाला जन्माला घालणं. त्या जन्माला आलेल्या माणसावर जन्मदात्या माणसाचा केवढा जीव? आपला अंश, आपल्या मांसाचा गोळा म्हणून जन्माला आलेल्या माणसाला वाढवायचं. हे जन्मदात्याचं खरं शिल्प. त्या पांढुरक्या इमारतीहूनही सुंदर अशी ही कलाकृती. तीच जन्मदात्याचा जिवावर उठली तर? तसंच झालं त्याचं. त्याने जन्माला घातलेल्या मांसाच्या गोळ्यानेच डांबून ठेवलं त्याला.

खिडकीतून मी बाहेर पाहिलं. लांबवर नदीच्या काठी ते पांढरं शिल्प उभं होतं. चार मीनार, मधला गोल घुमट सगळं काही स्पष्ट दिसत होतं.

तुटलेले कळवळणारे हात, थोडेसे शांत झाल्यासारखे वाटले. हाच नियतीचा न्याय असावा. अप्रतिम वास्तू बनवणारे हात ज्या हातांनी तोडले, त्या हातांत बेड्या अडकवण्याचं काम, त्याच्या स्वतःच्या निर्मितीने, त्याच्या मुलाने करावं, हाच तो न्याय.

दुःखांत ते दुःखांत.

मनातलं मळभ सरलं. आसमंतात कवित्व तेवढं भरून राहिलं.

- संवादिनी

Thursday, August 7, 2008

शांतक्षण आणि ती

गिरगावांतलं एक मॅटर्निटी होम. लेबरमध्ये गेलेली एक आई. दरवाज्याबाहेर अधीरतेने फेऱ्या मारणारा एक बाबा. बराच वेळ लागलेला. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चाललेले. डॉक्टरांनी दिलेली तारीख देऊन सतरा दिवस झालेले. संध्याकाळची वेळ. बाबाच्या चेहऱ्याला चिंतेचं ग्रहण लागलेलं. आईच्या वेदनांची काळजी तर होतीच, पण नवीन येणाऱ्या जीवाचीही तितकीच काळजी होती.

बाहेर एक वेगळीच संध्याकाळ रंगात येत होती. कसलातरी उत्सव. लोकं भेटत होते, आनंद साजरा करीत होते. त्यांना चिंता होती वेगळीच घटका भरण्याची.

त्या आईची शर्थ चालली होती. चेहरा घामाने भिजून गेलेला. स्वतःची तिला पर्वा नव्हती, स्वतःच्या बाळाची मात्र होती. ह्या त्रासातून सुटका तर हवी होती, पण पराभवाचा विचारही तिच्या मनाला शिवत नव्हता. अचानक आजूबाजूचं विश्व गरगरा फिरायला लागलं, त्या आईने पराकाष्ठा केली. आता बाळाच्या रडण्याचा मंजूळ आवाज ऐकायला येणार होता. काहीच ऐकू आलं नाही. पुन्हा तिने प्रयत्न केला. शांतता. हळूच मान वर करून ती बघायचा प्रयत्न करीत होती पण काहीच दिसलं नाही. डॉक्टर हळूच तिच्या कानात म्हणाले, मुलगी आहे, पण रडत नाही. आम्ही प्रयत्न करतोय.

मिनिटभर तिथं सन्नाटा पसरला. एक क्षण शांततेचा सरला आणि बाळाने भोकांड पसरलं.

.........

एक आजी खूप आजारी होती. खूप म्हणजे खूप. तिच्या नातीला ती वेगळीच वाटायची आजारी पडल्यापासून. तिचे लाड करणारी, तिचं हवं नको बघणारी, तिच्या केसांना तेल लावून मस्त दोन चंपू वेण्या बांधणारी आजी खरी की गालफडं आत गेलेली, बिछान्यावरून उठूही न शकणारी, नातीला कधी मधी न ओळखणारी, आल्या गेल्याकडे रडून मरणासाठी भेकणारी ही आजी खरी.

कालच डॉक्टर येऊन गेलेले. नात खूप लहान होती. तिला कुणी काही सांगितलं नाही. तिनं आपल्या बाबाला विचारलं. बाबाच्या एका डोळ्यात चमकलेला एक अश्रू तिने पाहिला. पण बाबावर तिचा विश्वास होता. तो तिला म्हणाला, लवकरच आजी ह्या त्रासातून सुटेल. नातीला खूप आनंद झाला. पुन्हा आपली जुनी आजी आपल्याला मिळणार म्हणून ती खूश झाली. तिने आपल्या सगळ्या मैत्रिणींना पण सांगितलं.

आज सकाळापासूनच आजी तिच्याशी छान बोलत होती. डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम झाला असणार, नातीला वाटलं. तीपण मजेत आजीशी बोलत होती. दुपारी आजीने नातीला बोलावलं आणि पाणी मागितलं. नातीने आनंदाने आजीला पाणी आणून दिलं. समाधानाने आजी ते पाणी प्यायली. नातीला तिने जवळ बसवून घेतलं. थोडा वेळाने आजीला उचक्या यायला लागल्या, आजीची नजर छताकडे लागलेली. नातीने आजीला विचारलं की आजी अजून पाणी देऊ का? आजी काही बोललीच नाही, पण तिच्या उचक्या थांबल्या.

दुसरा क्षण शांततेचा गेला.

नात आजीचा हात घेऊन तशीच बसून राहिली. तितक्यात तिथे नातीचा बाबा आला. त्याच्या डोळ्यातलं पाणी तिला स्पष्ट दिसलं. त्याने तिचा हात सोडवला आणि तो तिला तिच्या लाडक्या काकूंकडे घेऊन गेला. मागाहून तिला कळलं की आजी देवाघरी गेली. पण तो आजीचा हात धरून घालवलेला एक शांत क्षण मात्र तिच्या डोक्यात कायमचा राहिला.

................

एक मुलगी, शांततेच्या मंदिरात बसलेली. सत्तावीस संगमरवरी पाकळ्यानी बनलेलं ते एक कमळ होतं. आणि त्या कमळाच्या पोटात ठासून भरली होती अशक्य शांतता. आवाज येत होते ते श्वासांचे, स्वतःच्या. डोळे मिटून ती बसली होती. सगळं लक्ष स्वतःच्या श्वासांवर एकवटलं होतं.

तिला अनुभवायची होती शांतता जी त्या कमळाबाहेर कुठेच नव्हती. बाहेर होतं एक अक्राळ विक्राळ जग, अशांत, सतत कशाच्यातरी पाठी पळणारं. धावतं, स्वतः धावणारं आणि तिलाही धावडवणारं. क्षणभर शांतता तिच्यात पाझरतेय की काय तिला वाटलं.

शांततेचा तिसरा क्षण.

पण शांततेच्या चौथ्याच क्षणी तिला असेच काही शांततेचे क्षण आठवले, आजीचा थंडगार हात आठवला, आईच्या बाबाच्या तोंडून अगणित वेळा ऐकलेली तिच्या न रडण्याची गोष्ट आठवली.

पुढचे शांततेचे क्षण मोजण्याचं भानही तिला राहिलं नाही.

- संवादिनी

Thursday, July 24, 2008

गुड न्यूज आणि त्रांगडं

एक गुड न्यूज.

सोमवारी आमच्या मिशन इंपॉसिबलचा दी डे आहे. आमच्या परीने जे करता येईल ते सगळं केलेलं आहे. बहुतेक काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत.

पण खरी गंमत तर पुढे आहे. दिल्लीमध्ये राजकीय गरमागरमी चालू असताना, आम्ही इथे असून त्यापासून दूर कसे राहू शकू? आमच्या प्रोजेक्टमध्ये सोमवारापासून सत्तापालट आहे. जुन्या लीडला डच्चू देण्यात आला आहे आणि अस्मादिकांना लीडपदाची सूत्र हाती घ्यायचा आदेश मिळालेला आहे. उरलेले दोन आठवडे मी लीड असेन. इतकंच नव्हे तर ह्या प्रोजेक्टनंतर इथेच एक नवा प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे. त्यात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी काम करावं अशी क्लायंटची फर्माइश आहे.

ही झाली बातमी.

आता ह्यामागचं राजकारण. आम्ही इथे आलो तेव्हा मी होते ह्या कंपनीतली एक नवखी नोकर आणि ती होती अनुभवी. साहजिकच ती पुढारी झाली. पण अनुभवी असणं आणि पुढारी असणं ह्यात फरक आहे की नाही? स्वतःचं काम स्वतः करणं आणि दुसऱ्यांकडून ते करून घेणं ह्यात फरक आहे.

मुळात पुढाऱ्याविषयी जनतेला प्रेम वाटायला हवं. विश्वास वाटायला हवा. आमच्या पुढारणीच्या हे गावीही नव्हतं. ती आम्हा सगळ्यांना आणि क्लायंटलाही गृहीत धरून चाललेली होती. माझ्या आणि तिच्या दुर्दैवाने आमच्या दोघांचं फील्ड सेम. मग साहजिकच तुलना होत गेली. मी फार हुशार आहे असं नाही. हवंतर वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणूया, पण मी वरचढ ठरत गेले. आमच्या टीमलाही हे दिसत होतं, क्लायंटलाही हे दिसत होतं. कुठेतरी आपण कमी पडतोय ह्याची जाणीव तिला व्हायला लागली आणि तिथेच माशी शिंकली.

तिचं उणं लोकांना दिसावं म्हणून मी हे करीत नव्हते. हे आपोआप होत होतं. पण तिच्या मनात ते बसलं. मी हे सगळं मुद्दाम करतेय असं तिने स्वतः ठरवून टाकलं. आणि सुरू झालं एक युद्ध. अर्थातच तिचं पारडं जड होतं. सगळे प्रोजेक्ट रिव्ह्यू तिच्याकडून वर जात होते. ऑन फील्ड काहीही होत असलं तरी ती सांगेल तो इतिहास होणार होता. मला मानसिकरीत्या खच्ची कसं करता येईल ह्याचाच ती विचार करायला लागली आणि त्यातून जन्माला आलं राजकारण. ते इतक्या खालच्या थराला गेलं, की मी क्लायंट साइडच्या एका बड्या अधिकाऱ्याशी लगट करत असते अशी अफवाही पसरवली गेली.

इथे लिहिलं नव्हतं, पण खूप त्रास झाला. मी जवळ जवळ प्रोजेक्ट सोडून निघून जाणार होते. इतक्या हलक्या दर्जाचं राजकारण मी कधी अनुभवलं नव्हतं. पण माझे इतर कलीग्ज मदतीला धावून आले. त्यांनी मला समजावलं. ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि देअर वॉज अ डिफरंट मी आफ्टर दॅट. मी माझी लढाई स्वतः खेळले आणि जिंकले.

जेव्हा मला ही बातमी समजली की तिला डच्चू दिलाय, मला खूप आनंद झाला. थोडी "ग"ची बाधाही, खोटं कशाला बोलू? तिथेच प्रोफेशनॅलिझम सुटला. सगळं व्यक्तीगत झालं.

रात्री घरी फोन केला. जे चाललं होतं ते अर्थात घरी माहीत होतंच. सगळे खूश झाले. आई फक्त म्हणाली, जास्त हवेत उडू नकोस. आता संपलं ना सगळं? मग जाऊन बोल तिच्याशी. मला अजिबात तिच्याशी बोलायची इच्छा नव्हती.

फक्त आई म्हणाली म्हणून मी तिच्याकडे गेले. रूमचा दरवाजा नॉक केला. काहीच रिस्पॉन्स नाही. पुन्हा नॉक केला. थोड्या वेळाने तिने दरवाजा उघडला. मला बघून ती शॉक्डच झाली. गेला आठवडा आम्ही फक्त मेलमधूनच बोलतोय. तिने मला आत बोलावलं. मी तिच्या बेडवर जाऊन बसले. काय बोलावं काही सुचत नव्हतं. तिला ते सगळं सहन झालं नाही आणि ती एकदम रडायलाच लागली. मग मलाही भरून आलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती अजून रडायला लागली. मी तिला सॉरी म्हटलं आणि माझ्या मनात तिच्याविरुद्ध काहीही नाही असंही सांगितलं. ती अजूनच रडायला लागली.

मग मलाही रडायला आलं. मी तिला सगळं पहिल्यापासून सांगितलं. मी तिच्याविरुद्ध कुठेही चुगल्या केल्या नाहीत हेही सांगितलं. तिला खूप वाईट वाटत होतं. मग मात्र तिने माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. पण त्या अफवेबद्दल मात्र ती काहीच बोलली नाही. मी तिला स्पष्ट तसं विचारलं तर तिने स्वतःच्या मुलीची शपथ घेऊन सांगितलं की तिने असं काहीही केलं नाही म्हणून.

मी तिला माझा हात दिला. तिनेही तो हातात घेतला आणि मनापासून सॉरी म्हणाली. ते मला तिच्या डोळ्यात दिसलं. असा रडत रडत आमच्या भांडणाचा सुखांत झाला. ती ह्या आठवड्यानंतर प्रोजेक्ट सोडून जाईल आणि मी तिची जागा घेईन असं वरून कळलं.

आनंद झाला पण तिच्यासाठी खूप वाईट वाटलं. आई म्हणाली म्हणून मी तिच्याशी बोलले. नाहीतर हा द्वेष मनात कायम राहिला असता, तिच्या आणि माझ्याही. हेच जर आम्ही आधी केलं असतं तर? तिच्या मनात असलेले माझ्याविषयीचे गैरसमज आणि माझ्या मनात असलेले तिच्याविषयीचे गैरसमज आम्ही रोखठोक एकमेकींना विचारले असते तर? नक्कीच हे सगळं ह्या थराला पोचलं नसतं.

असो, एक धडा मिळाला. वरवर माझं काहीही चुकलेलं नाहीये. पण आपली चूक नसेल तरीही आपण पुढाकार घेऊन बोलायला काय हरकत आहे? बोलूनही काही फरक पडला नाही तर गोष्ट वेगळी.
सगळं त्रांगडं झालंय आता. मलाच गिल्टी फीलिंग येतंय. आनंद तर होतोय, पण दुसऱ्या कुणालातरी खाली खेचून तो मिळालाय असं वाटतंय. आई म्हणाली तेच खरं, पाय जमिनीवरच ठेवायला हवेत, यशातही आणि अपयशातही.

हल्ली जरा माझे पोस्टस ऍब्सर्ड होतायत का? कारण मी जे लिहिते ते न वाचता पोस्ट करतेय, वेळ नाहीये म्हणून. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका आणि टायपोजसाठी क्षमस्व. हल्ली लिहिण्यासारखंही फार घडत नाहिये असं वाटायला लागलंय. त्यामुळे काहीतरी साहित्यिक वगैरे लिहावं असं वाटायला लागलेलं आहे. कसं लिहायचं माहीत नाही, जमेल का माहीत नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? म्हणून पुढच्या आठवड्यात नो दैनंदिनी. पुढच्या आढवड्यात काहीतरी साहित्यिक वगैरे. बाबा म्हणतो, की कलाकृती कळली नाही की तिचं फार कौतूक होतं. बघुया, न समजणारं काही लिहिता येतंय का ते.

- संवादिनी

Thursday, July 17, 2008

गारठलेल्या सकाळी आणि धमाल

सकाळी सहाचा गजर वाजतो. मी तो ऐकते आणि तसाच बंद करून टाकते. शेवटची फिरायला कधी गेले होते ह्याची मनाशी नोंद होते. परवाच गेले होते, मग आज नको, झोपूया, असं म्हणून पांघरूण डोक्यावर घेते. रात्रभर घुरघुरणाऱ्या एसीने रूमचा डीप फ्रीजर करून टाकलेला असतो, पण तरीही मला उठून तो एसी बंद करावासा वाटत नाही. स्नूझ झालेला गजर पुन्हा एकदा वाजतो, सव्वा सहा. काल किती वाजता घरी आले मी? रात्री बारा. मग आज थोडं उशिरा पोचलं तरी चालेल. पुन्हा थंडी, पुन्हा पांघरूण, पुन्हा गजर, पुन्हा स्नूझ आणि पुन्हा थंडी. माझ्या सगळ्या सकाळी सध्या अशा गारठून गेलेल्या आहेत.

डोक्यावरचं काम प्रचंड वाढतंय. दिवस सुरू झाला की कधी मावळतो आणि संध्याकाळी त्याच्या घरी पळालेला सूर्य, विश्रांती घेऊन पुन्हा कधी उगवतो, हेच कळत नाही. सकाळचा ब्रेकफास्ट करायला मिळाला तर ठीक, नाहीतर ऑफिसमध्ये पोचायचं, पहिला चहा होतो न होतो, मेल चेक केले न केले, इतक्यात कुणीतरी येऊन टपकतो.

काल तू असं सोल्युशन दिलं होतंस, तसं प्रोग्रॅम करणं अशक्य आहे. दुसरं डिझाइन दे. अरे, शक्य नव्हतं तर काल का तसं नाही सांगितलं? इतकं डोकं आपटून मी ती स्पेक बनवली ती आता कचऱ्याच्या टोपलीत? हा विचार मनातल्या मनात करून, अगदी हसऱ्या चेहऱ्याने, असं का? बरं. बघूया काय जमतंय असं म्हणून मी त्याला वाटेला लावते.

त्याची पाठ दिसते न दिसते तर दुसरं कुणी येतं. म्हणे मॅडमनी बोलावलाय. मॅडम म्हणजे आमच्या टीमची लीड. अडलंय माझं खेटर? मॅडमला हवं असेल तर येईल झक मारत, असं मनातल्या मनात म्हणते आणि निरोप्याला, आलेच असा उलट निरोप पाठवते. शेवटी झक मारत मीच जाते मॅडमना भेटायला. तिच्या आज्ञेचं पालन मला करायला लागलं ह्याचा आसुरी आनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसतो. तो आनंद, तिला मला पाहून झाला आहे, असं स्वतःला खोटंच समजावत मीही खोटं हसते.

बहुदा मॅडमचं घोडं (की गाढव? ) कुठल्यातरी खड्ड्यात पडून अडकलेलं असतं. मग मॅडम अडकलेलं घोडं खड्ड्याबाहेर काढायच्या कामाला मला जुंपून, अजून एखादा घोडा कसा खड्ड्यात टाकता येईल ह्याचा विचार करायला निघून जातात. आम्ही इमानदारीत एकदा घोड्याची शेपूट पकड तर एकदा लगाम, असं करत यथाशक्ती यथामती त्याला बाहेर काढायचं काम करू लागतो.

ते आवरेपर्यंत जेवणाची वेळ होते. पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. मग दुपारच्या जेवणाचा घाट. जेवणात पनीर नसेल तर ह्या लोकांना अपचन होतं की काय कोण जाणे? प्रत्येक गोष्टीत पनीर. सगळ्यात घाणेरडं मी खाल्लेलं इथलं पनीरचं काँबिनेशन म्हणजे पनीर बैंगन. पण अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने, वदनी कवळ घेता, जी काही चव लागेल ती गोड मानून, समोर असेल ते गिळते आणि अन्नदाता सुखी भव म्हणत पुन्हा घाण्याला जुंपून घेते.

दुपारची मज्जा तर काय वर्णावी? रात्रीची कमी झालेली झोप डोळ्यात उतरायला लागते आणि वाचतेय काय, टंकतेय काय आणि बोलतेय काय? ह्याचा काही ताळमेळच राहत नाही. डुलक्यांचे हल्ले परतवून डोळे उघडे ठेवण्यात यश मिळालं तरी बरं वाटतं. असा सरता न सरणारी दुपारची वेळ जाऊन चहाची वेळ होते आणि मनाला पुन्हा एक उभारी मिळते.

चहा आणि ग्लूकोजची बिस्किटं. अहाहा. वाफाळलेल्या चहाच्या घोटांनी आणि माझ्या लाडक्या ग्लूकोजच्या बिस्किटांनी विस्कटलेल्या दुपारची घडी इस्त्री केल्यासारखी बसते आणि संध्याकाळची चाहूल लागायला लागताच, डोक्यावर साचलेल्या कामाच्या डोंगराची आठवण होऊन मी पुन्हा माझ्या वर्क स्टेशनकडे वळते.

सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या अंगाखांद्यावर खेळलेली मी, ह्या कामाच्या डोंगराला मात्र नाकं मुरडते. पण तरीही कामाला लागते. आज करायचं म्हणून ठरवलेल्या कामाला हात लावायला सकाळपासून वेळच झालेला नसतो. त्यात लीडरबाईंचं घोडं आणि पुन्हा करायची स्पेक ह्याचं टेन्शन डोक्यावर असतंच. केसांचा गुंता सोडवायचं काम, रोजच्या रोज केस आणि हेअरकलर मात्र बदलत जातात. एक गुंता सुटतोय तर दुसरा दत्त म्हणून हजर.

संध्याकाळ होते. लोकं घरी परतायला लागतात. ऑफिस उदासवाणं वाटायला लागतं. बाहेर पडायला लागलेला अंधार, सगळी संध्याकाळ काळ्या रंगात रंगवून काढायला लागतो. आता चहाची सोबतही नसते. ग्लूकोजची बिस्किटं तेवढी माझ्या पर्स मध्ये गुपचूप पडलेली असतात. शेवटी आज सकाळी सुरुवात करायच्या कामाला हात लावायला वेळ मिळतो. डोकं चालेल की नाही ह्याची खात्री नसल्याने मी घुलाम अली कानाला लावते.

दिनभर तो मै दुनियाके धंदोमें खोया रहा,
जब दीवारोसे धूप ढली, तुम याद आये, तुम याद आये.

खुर्चीत मी मागे जराशी रेलते, समोरचा स्क्रीन धूसर होतो. उगाचच आईची आठवण येते. संध्याकाळच्या वेळी, घरी गेल्यावरचा चहा, बाबाच्या गमती जमती, एकेकांना टपल्या मारणं. विन्या असेल तर त्याच्याशी मुद्दाम उकरून काढलेलं भांडण, सगळं सगळं डोळ्यासमोर येत जातं. टीम मेंबर्सच्या गराड्यात एकदम एकटं वाटायला लागतं. पुण्याची आठवणही येतेच, आनंद आठवतो, आनंदी आठवते, कुठे अडकून पडलो असं होतं.

तितक्यात मागून कुणीतरी येऊन खांद्यावर चापटी मारतं. मॅडम सो गयी क्या? हमारी डिजाईन तो आपने बनायीही नही? एक दीर्घ श्वास घेऊन मी पुन्हा कामाला लागते. घुलाम आली आपल्याच तंद्रीत गात असतो, त्याचा आवाज फक्त एक आभास बनून कानात घुमत राहतो.

पुन्हा एकदा जेवणाची वेळ होते. बाहेरून आणलेलं काही बाही आम्ही सगळेच बकाबका खातो. कामाला लागतो, घरी जाण्याआधी मला निदान ते डिझाइन पूर्ण करायचं असतं. मध्यरात्रीपर्यंत ते काम संपतं. ईमेल टाकून मी ऑफिसमधून निघते. बाहेर ड्रायव्हर पेंगत बसलेला असतो. त्याला जागं करून घरच्या रस्त्याला लागते. मोजून तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. मी तशीच माझ्या रूममध्ये जाते, कपडे बदलते आणि बिछान्यावर पडते.

आजचं न झालेलं काम, अजूनही खड्ड्यात अडकून बसलेलं घोडं, ऑफिसमधलं राजकारण, सगळं माझ्या मनात घर करून राहतं. डोळ्यावर झापड तर येत असते, पण झोप काही येत नाही. घुलाम अलीसुद्धा काही करू शकत नाही. मग मी खिडकी उघडते आणि बाहेर बघत बसते. कधीमधी दिसणारा चंद्र हिरव्या पानांवर सांडलेला काय झकास दिसतो. जवळ जवळ रात्रीचा एक वाजत आलेला असतो, तरीही मी फोन घेते आणि बाबाला फोन लावते.

तो झोपला असणार मला माहीत असतं, पण तरीही, तो फोन उचलतो, मी बराच वेळ त्याच्याशी बोलत राहते. आज ऑफिसमध्ये काय काय झालं, ते सगळं सगळं सांगते, तोही बिचारा ऐकून घेतो. मग तो घरी काय काय झालं ते सांगतो. शेवटी तो विचारतो कशी आहेस? मला माहीत असतं त्याला काय उत्तर हवंय. मी सांगते मजेत आहे.

कोणत्याही कठीण क्षणाचीही एक मजा असते. ती मजा अनुभवायला शीक, म्हणजे आपले सगळे दिवस मजेत जातात. कधीतरी, कुठेतरी त्याला मी विचारलेलं असतं, की तुला कधीही कसा आहेस विचारलं की तू मजेत असं कसं सांगतोस? तेव्हा त्याने सांगितलेलं कारण आठवतं.

मी फोन ठेवते, पण सगळा शीण कुठच्या कुठे पळालेला असतो. पुन्हा बिछान्यावर पडते. स्वतःलाच विचारते. हाऊ वॉज युअर डे? आतून उत्तर येतं "धमाल". त्या विचारातच कधी झोप लागते समजतंच नाही.

आणि पुन्हा एक गारठलेली सकाळ उजाडते.


- संवादिनी

Thursday, July 10, 2008

पडदे, पुस्तकं आणि चुकलेला अंदाज

दिल्लीत मनाजोगतं फिरणं ह्या विकेंडला झालं. आमच्या बॉसने कंपल्सरी शनिवारी ऑफिसला न जाण्याचा हुकूम दिला. भाग्य लागतं की नाही असा बॉस मिळायला? म्हणाला तुम्ही करताय ते खूप आहे. पण चांगलं काम करायला, मनही फ्रेश हवं. जर तुम्ही कंटाळून गेला असाल तर दहा मिनिटांचं काम करायला तासभर लावाल. आम्हाला काय? पडत्या फळाची आज्ञा.

खूप शॉपिंग केलं, खूप खाल्लं आणि खूप भटकलो. चांदनी चौक, लाजपतराय मार्केट धुंडाळून काढलं. खूप खरेदी केली. माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. बाबासाठी एक खास झब्बा घेतला. त्याला ग्लॉसी काही आवडत नाही. मग खादीचाच पण जरा उच्चीचा वाटावा असा झब्बा. मुंबईला खादी ग्रामोद्योगमध्ये वगैरे मिळतात तसे. स्वस्त मिळाला असं वाटलं. अर्थात, हे मी आईला सांगितलं की ती म्हणणारच की जास्त दिले म्हणून. मला ना कधी कधी तिच्याबरोबर शॉपिंगला जायची लाज वाटते. दुकानदार पाचशे म्हणाला की ही शंभर पासून सुरू करते. पण खरं सांगायचं तर तिला ती नॅक आहे. मला पाचशेचे तीनशे करतानापण धाकधूक वाटते.

तर बाबासाठी झब्बा, विन्यासाठी त्याने खास पत्ता दिलेल्या दुकानातून आणि मुंबईहून फोन करून ऑर्डर करून घेतलेली इंग्लिश विलो बॅट, आईसाठी साडी आणि उरलेली सगळी खरेदी माझ्यासाठी. उन्हाळ्याचा मुहूर्त साधून बरेच स्वेटर्स घेतले. स्वस्तात मिळाले. चुडीदार, कुर्तीज मस्त मिळाल्या. मी काही स्वस्तातलं आणलं की बाबा म्हणतो की आधी कापड धू आणि मग तुला झालंच तर चांगलं मिळालंय म्हण.

दिल्ली हाटला तर मी अक्षरशः वेडावून गेले. रंगाची तर नुसती उधळण. राजस्थानी रंग, गुजराती रंग, काश्मिरी रंग, मराठी रंग. सगळं थोडं महाग वाटलं, पण अशा सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळणं कठीण आहे, आणि बघून शेवटी घ्याव्याश्या वाटतातच. त्यामुळे बऱ्याचशा नको असलेल्या आणि काही हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या. त्यातले राजस्थानी पडदे तर खासंच आहेत. ते लावायला खिडक्याच नाहीयेत अजून, पण तरीही घेतले. गिरगावात तर काही लावता येणार नाहीत. पुढे झालंच स्वतःचं घर तर वापरता येतील. नाहीतर कुणाला गिफ्ट म्हणून देता येतील.

तिथले फूड स्टॉल्स तर भन्नाट आहेत. म्हणजे चव ठीक ठाक. पण व्हरायटी काय आहे? मी चक्क बिहारी कचोऱ्या वगैरे खाल्ल्या. बाकी चरणं सुरूच होतं. चाट, गोल गप्पे, समोसे. सगळं झकास.

एका मस्त वेगळ्या ठिकाणी पण गेले. आमच्या टीम मधल्या क्लायंट साइडच्या एकाच्या वडिलांचं जुन्या अँटिक पुस्तकांचं दुकान आहे. बाकी कुणाला पुस्तकांत वगैरे रस नव्हता. मग मीच त्याला म्हटलं की मला घेऊन चल. साहेबांची फटफटी आहे. मग हेल्मेट घालून मी त्याच्या मागे (केस\चेहरा जाम खराब होतात हेल्मेट घातलं नाही तर. घातलं तर घामाने होतात, पण चालतं). कसलं दुकान होतं ते. कसले जुने जुने ग्रंथ. सगळ्या भाषांतले. मराठीही होते. काही जुनी हस्तलिखितं होती. प्रिंटींग होत नसे तेव्हाची. मोडी भाषेतली होती. काहीही कळलं नाही.

पण चटकन मनात आलं, कुणी कोणे एके काळी लिहिलेली ती पत्र, त्यानंतरची कित्येक वर्ष, निसर्गाला तोंड देत टिकून राहतात काय आणि आजच्या जेट युगातली मी, ती बघते काय? ह्यालाच विधीलिखित म्हणत असावेत. किती पावसाळे पाहिले असतील त्या पत्रांनी? माझ्या आजोबांचे आजोबासुद्धा जन्माला आले नसतील तेव्हा.

इतरही अनेक पुस्तकं होती तिथे. वेगळंच विश्व वाटलं ते. वर्तमानातून एकदम भूतकाळात जाऊन येता येईल असं टाइम मशीन. मग तो कलीग त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचं बनिया कुटुंब. वडिलांची जरब, भिजल्या मांजरासारखी दिसणारी आई, त्याची लग्नाच्या पहिल्या काही महिन्यातंच प्रेग्नंट झालेली बायको. डोक्यावर पदर. माझ्यापेक्षा लहान असेल ही, पण तिचं विश्व किती वेगळं? पोटातलं मूल, मुलाचा बाप, ह्यांच्या पलीकडे ती विचार करत असेल का? असेलही करत तरी ते व्यक्त करायची तिला परवानगी असेल का? ऑफिसमध्ये एकदम नॉर्मल वाटणारा तो कलीग, घरात एकदम वेगळाच वाटला. कसलातरी मुखवटा घातलेला किंवा काढलेला. नक्की कळलं नाही.

ह्यालाच लग्न म्हणायचं का? सहजीवन म्हणायचं का? कुणाच्यातरी दावणीला स्वतःला बांधून घ्यायचं का? एक ना अनेक, कित्येक प्रश्न मनात येत गेले. त्याच्याकडून बाहेर पडले, त्याने पुन्हा आमच्या अपार्टमेंट पर्यंत सोडलं. त्याला मी विचारलं बायको काय करते? तर म्हणाला अजून शिकतेय. म्हटलं काय? तर म्हणाला यूपीएससी देतेय ती.

घरात पदर डोक्यावर घेऊन राहत असली तरी तिचं विश्व त्या पदराएवढं मर्यादित नाही. मलाच माझं हसू आलं, आपण किती पटकन मतं बनवतो, काही माहिती नसतानाही. पण बरं वाटलं. दिल्ली हाटातल्या राजस्थानी पडद्यांवरचे रंग एकदम उजळून निघाले असं वाटलं. कधी कधी आपले अंदाज चुकतात. पण अंदाज चुकल्याचा खूप आनंद झाला.

- संवादिनी

Thursday, July 3, 2008

स्वातंत्र्य आणि एक कन्फेशन

जेव्हा मी खूप लहान होते तेव्हाची गोष्ट. पहिली दुसरीत असेन तेव्हा. बोलण्यामध्ये एकदम पुढे होते तेव्हा मी. साहजिकच, गाणी म्हणणं, भाषणं करणं, ह्यासाठी नेहमी निवड व्हायची. असाच एकदा गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यासाठी प्रत्येकाने घरून तयारी करून या असं शाळेत सांगितलं. आपल्या मुलीने अशा कार्यक्रमात चमकावं ही आईची जबरदस्त इच्छा. झालं, ती एक छान गोष्टीचं पुस्तक घेऊन आली. लहानपणी मला हातात पुस्तक मिळालं की ते क्रेयॉन्सने रंगवून काढायचं हा माझा छंद होता. त्यामुळे हे पुस्तक मला मिळालं असतं, तर त्याचा कधीच मी रंग दे बसंती करून टाकला असता. म्हणून आईने ते माझ्यापासून लपवून ठेवलं.

मीही हुशार मला ते कुठे ठेवलंय ते दिसलं. स्टूलवर उभं राहून कपाटाला चावी लावून वगैरे ते मी मिळवलं. घरी आजी होती फक्त. तिला बिचारीला काय कल्पना मी काय करतेय ह्याची? ते पुस्तक मी रंगवलं मात्र नाही. नुसतंच पाहिलं. मिळत नव्हतं तोपर्यंत हवंहवंसं वाटणारं पुस्तक, एकदा पहिल्यावर तितकंसं आकर्षक राहिलं नाही. मी ते तसंच कुठेतरी टाकून दिलं आणि खेळायला गेले.

संध्याकाळी भाषणाची तयारी करून घेण्यासाठी आईने कपाट उघडलं तर पुस्तक नाही. माझ्या ते लक्षात आलं, पण मी पुस्तक कुठे टाकलंय हे मलाही आठवेना. आईला नक्कीच कळलं की पुस्तक मी घेतलंय, पण आता ते हरवलं हे जर तिला कळलं तर मात्र माझी धडगत नव्हती. तिने मला विचारलं की तू पुस्तक घेतलंस का? मी हो म्हटलं. तिने का घेतलंस विचारलं, आता काय सांगा? मी ठोकलं, बाईंनी बघायला मागितलं शाळेत म्हणून नेलं. मग ती म्हणाली कुठंय ते? पुन्हा नवी थाप. म्हटलं शाळेत ते फाटलं. मग फाटलं तर फाटकं पुस्तक कुठाय? अजून एक थाप, मी तिथेच टाकून दिलं. हे सगळं आईचा ओरडा वाचवण्यासाठी.

ते पुस्तक मीही विसरले आणि आईही. भाषण चांगलं झालं, बक्षीस मिळालं आणि अचानक एके दिवशी साफ सफाई करताना बाबाला ते पुस्तक सापडलं. अजून देवापुढे उभी राहून रडत रडत पुन्हा मी कधी कधी खोटं बोलणार नाही, असं म्हणणारी मी मला आठवतेय. ही आठवण कायमची कोरली गेली मनावर आईचा मार, मग हे कन्फेशन.

आई भयंकर चिडली होती. बाबा मला नंतर म्हणाला होता. काळजी करू नको, मीपण खोटं बोलल्याबद्दल आजोबांचा मार खाल्लाय. सगळेच चुकतात कधी ना कधी. पण सगळेच चूक मान्य करीत नाहीत. जे करतात, ते पुढे जातात, जे नाही करत, ते चुकाच करत राहतात. तेव्हापासून कन्फेशन ही माझी गरज झालेय.

हे सगळं लिहायचं कारण म्हणजे असंच एक कन्फेशन. शनिवारी रात्री क्लाएंटने पबमध्ये पार्टी ऍरेंज केली होती. मी फक्त वाइन पिते. तेसुद्धा घरच्यांच्या सोबत. एकटी, मित्र-मैत्रिणींसोबत, ऑफिसमध्ये कधीच मी प्यायले नव्हते. पण त्या दिवशी काय वाटलं कोण जाणे? घरी जायचं नव्हतं, आईचा धाक नव्हता, बाबाची नजर नव्हती. म्हटलं आपण घरी एखादा ग्लास आईबाबांबरोबर घेतो, इथेही एखादा घ्यायला काय हरकत आहे. गप्पा गप्पांमध्ये आग्रह झाला, दुसरा ग्लास झाला.

त्यानंतर सगळे डान्स करायला लागले, मीही गेले. पण डान्स केल्यावर काय झालं मला कळलंच नाही. माझा पूर्ण कंट्रोलच गेला. म्हणजे अक्षरशः झेलपाटायला लागले मी. नाटकाचे डायलॉग्ज काय म्हटले, पूर्णपणे गॉन केस. अनुनी घरी आणलं सांभाळून. दुसऱ्या दिवशी सगळे जणं चेष्टा करीत होते माझी. तशी म्हटलं तर गंमत होती, पण आतून मी पूर्ण हादरून गेले होते.

आपण कोण आहोत? आपण काय करायला इथे आलो आहोत? आणि आपण काय करतो आहोत? ह्या प्रश्नांनी दिवसभर माझा पिच्छा पुरवला. घरी फोन केला तेव्हा बाबाने विचारलं पार्टी कशी झाली. मी सांगितलं चांगली झाली, बाकी काही बोलले नाही. आईनेही विचारलं तिलाही काही सांगितलं नाही. इकडचं, तिकडचं बोलत राहिले. फोन ठेवला आणि मला एकदम रडायलाच आलं. मी तसं करायला नको होतं. मला स्वातंत्र्य हवं होतं, ते मला मिळालं, पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग मी केला. खूप वाईट वाटलं, एकटीच कुढत बसले होते बराच वेळ.

शेवटी हिय्या करून घरी फोन केला. आईने उचलला. ती काही बोलायच्या आतच मी जे घडलं ते तसंच्या तसं तिला सांगितलं. ती एक शब्द बोलली नाही आणि बाबाला फोन दिला. बाबाने शांतपणे ऐकून घेतलं, मग असं करू नको तसं करू नको, असं काहीबाही सांगत राहिला. अगदी आईसारखं. त्याला खूप काळजी वाटली असणार. आणि ते इतके दूर काही भलतं सलतं झालं तर. एकदम हळवा झाला असणार तो. शेवटी आईने फोन घेतला. म्हणाली झालं ते झालं. चूक झालं की योग्य झालं ते तुला कळलेलंच आहे. तेवढं लक्षात ठेवून राहा. तुला आता अमुक करू नको तमुक करू नको हे सांगायचं तुझं आणि आमचं दोघांचंही वय नाहीये, त्यामुळे बहकून जाऊ नको. मोकळ्या हवेतही माणसं गुदमरून गेल्याची अनेक उदाहरणं आहेत.

एवढंच बोलली आणि फोन ठेवला. मला खूप वाईट वाटलं, पण एकीकडे बरंही वाटलं. मला नेहमी स्पून फीडिंग करणारी माझी आई मला म्हणाली, की मी माझे निर्णय घ्यायला सक्षम आहे. नेहमी बाबा जसा बोलतो तशी आज आई बोलली. एकदम मला पटेल असं. चूक न दाखवता चूक दाखवणारं आणि मला मोकळीक आणि जबाबदारी दोन्ही देणारं. खूप काही बोलावंसं वाटत होतं. पण कुणाशी? माझ्या टीम मेंबरना मी केलं त्यात काही वावगं वाटलंच नाही. मग एकटीच रडत बसले.

रडत रडतंच माझ्या जवळच्या गणपती बाप्पाला सांगितलं, मी पुन्हा कधी, आईला त्रास होईल, बाबाला त्रास होईल, विन्याला मान खाली घालावी लागेल, असं बेजबाबदार वागणार नाही, म्हणून. अगदी थेट लहान असतानासारखं.

स्वातंत्र्य हे दुधारी तलवारीसारखं असतं हेच खरं.

- संवादिनी

Thursday, June 26, 2008

मिशन इंपॉसिबल आणि हम पांच

दिल्लीला येऊन एक आठवडा होऊन गेला. एका आठवड्याने परत जायला मिळेल असं येताना वाटलं होतं तो फुगा फुटला. प्रोजेक्ट आताच सुरू झालाय आणि अजून किमान एक महिना माझं काम असेल. कदाचित त्याहून अधिक. आनंदाची गोष्ट हीच की क्लायंट चांगला आहे. त्यांनी चक्क दोन छानसे तीन बेडरूमचे फ्लॅट आमच्यासाठी भाड्याने घेतलेत.

आम्ही पाच जणं आहोत आणि मोठा साहेब सहावा. मोठा म्हणजे खूपच मोठा साहेब आहे तो. पण चांगला आहे. टकलू आहे पण तरीही हँडसम. बरीच वर्ष अमेरिकेला राहून परतलाय म्हणून इंग्रजी जरा इस्टाइलमध्ये बोलतो इतकंच. आमच्या कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावर आहे. ह्या हिमालयासमोर आम्ही सगळे अगदी मलबार हिलच्या टेकडीसारखे आहोत.

पण आमच्या सगळ्यात त्यातल्या त्यात उंच टेकडी म्हणजे अनु. तिचं पूर्ण नाव अनुसया का काहीतरी आहे. त्यापुढे अनु बरं वाटतं. तिला ह्या कंपनीत तीन वर्ष काढून झालीत. ती आणि मी दोघीही फंक्शनल. फंक्शनल कंसल्टंट चा शिकलेला नवा शॉर्ट फॉर्म फंकी. तर आम्ही दोघी फंकी. अजून नीटसा अंदाज आलेला नाही नक्की कशी आहे त्याचा. पण बोलायला, वागायला बरी वाटते. ती आमच्या टीमची पुढारी. लीडर. आता पुढारी आले म्हणजे राजकारण येणार की काय? कल्पना नाही. सो फार सो गुड.

आम्ही दोघी फंकी आणि अजून तिघं टेकी. तिघेही मुलं. दुःखाने विशद करायची गोष्ट अशी की एकही इंटरेस्टिंग नाही. एक मल्याळी ख्रिश्चन. त्याचं लग्न नुकतंच झालंय. बायको केरळात आहे. नेहमी तिचीच स्वप्न बघत असतो. तिच्याबद्दलच बोलत असतो. चांगला वाटतो पण खूप डिप्लोमॅटिक आहे. ओठावर एक आणि मनात एक असा वाटतो. अजून तरी माझा अंदाज बरोबर आहे असं मला काहीही आढळलेलं नाही. म्हणून सध्या मी त्याला संशयाचा फायदा देणार आहे. ह्याचं नाव टॉम.

दुसरा मराठी आहे. नागपुरकडचा असावा. पण मराठी आहे, म्हणून जवळचा वाटतो. त्याच्याशी चांगली मैत्री झालेय. नाव नीतिन. लग्न झालंय. बायको पुण्याला. एक लहान मुलगापण आहे त्याला. हा त्यातल्या त्यात अनुभवी टेकी. म्हणून तो टेकींचा पुढारी.

शेवटचा उडीया आहे. कृष्णा उर्फ क्रिश. भुवनेश्वरचा. सिंगल अँड लुकिंग. ह्याच्यापासून सावधान! असं मला माझ्या मनाने पहिल्या दिवशीच सांगितलंय, म्हणून मी जरा लांब लांबच आहे त्याच्यापासून. पण पुन्हा आतापर्यंत तरी त्याने माझ्या संशयाला पुष्टी देण्यासारखं काहीही केलेलं नाही. म्हणून मीही त्याला संशयाचा फायदा देत आहे. मला नाही म्हणा उगाचच नको ते वाटून घेण्याची जुनी खोड आहेच.

आणि आमच्या घराच्या काळजीवहनासाठी आहे दुबे. त्याचं नाव दुबे नाहीच आहे. पण त्याला पाहिल्यावर मॉन्सून वेंडिंगमधला दुबे आठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून त्याचा दुसरा नामकरण सोहोळा केलाय, तो हा दुबे. पोरगेलसाच आहे. पण मनापासून कामं करतो. हा भेटल्यावर भय्या लोकांबद्दलची माझ्या मनातली आढी थोडी कमी झालेय.

तर अशी ही आमची टीम. नवा डाव सुरू. नवा राजा, नव्हे राणी. आणि नव्या राणीची मी जुनीच सबऑर्डिनेट.

क्लायंटचेही काही लोकं आहेत. काही चांगले काही वाईट. पण त्यातली एक बंगाली मुलगी मला खूप आवडलेय. तिचं नाव कला. म्हणजे तिला म्हणतात कला. काय मस्त नाव आहे नं? कला. आर्ट. आणि नावाप्रमाणेच कलाकार मुलगी आहे. रविंद्रसंगीत म्हणून दाखवणार आहे ती मला. टिपीकल बंगाली मुलींसारखी नाजूक आणि दिसायला खूप सुंदर. धारदार बुद्धी आणि जीव ओवाळून टाकावा असे डोळे. अगदी थेट कोकणा सेनसारखे. तशी ज्युनिअर आहे पण हुशार आहे.

काम तर जोरात सुरू झालेलंच आहे. मला पहिल्यांदा कसं वाटलं माहितेय? कुणी तुम्हाला अंधाऱ्या खोलीत सोडलं आणि सांगितलं, की ह्या खोलीत कुठच्या एका कोपऱ्यात एक दरवाजा आहे आणि तो उघडणारा रिमोट खोलीत कुठेही असू शकेल. कुणालाच माहीत नाही. दोन महिन्यात दरवाजा उघडून दाखवा. तसंच वाटलं. दरवाजा उघडायचा हे माहीत आहे, दोन महिने आहेत हेही माहीत आहे. पण कसा? ते स्वतः शोधून काढायचं. कठीण आहे पण तितकंच चॅलेंजिंग.

सुरवातीला कठीण गेलं पण आता त्या खोलीच्या लांबीरुंदीचा अंदाज यायला लागलाय. आणि तिथे आपण एकटेच नाही अजून दहा बारा जणं आहेत हा दिलासापण मिळतोय. सकाळी उठणे, दुबेने दिलेला नाश्ता करणे, ऑफिसात जाणे, काम काम काम, मग कुठूनतरी मागवलेलं जेवणे, पुन्हा काम काम काम, संध्याकाळी घरी एखादा फोन वगैरे कामाच्या मधे, मग रात्रीचं जेवण मागवणे ऑफिसातच, आणि बाराच्या सुमाराला घरी जाऊन बिछान्यावर टेकणे.

हेक्टिक आहे, टायरिंग आहे, पण सॅटिस्फायिंग आहे. सगळेच आम्ही नवे आहोत. जोश आहे. स्वतःला सिद्ध करायची जिद्द आहे. अर्थात नुसती जिद्द असून काम भागत नाही. जिद्दीला क्षमतेची जोड असणंही आवश्यक आहे. आम्हाला कळतंय की काही बाबतीत आमच्या क्षमता कमी आहेत. काही बाबतीत आमचं संख्याबळ कमी आहे. पण त्याही स्थितीत पुढं जाण्याचे प्रयत्न चालले आहेत.

आमच्या बॉसचं तर पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आहे. त्याला पाहिल्यावरच जाणवलं, खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर आमच्या कंपनीसाठी एक नवी इंडस्ट्री मार्केट म्हणून उघडू शकेल. त्यामुळे स्टेक्स आर हाय. असं बॉस नेहेमी म्हणत असतो. आम्ही मात्र त्याच्या नकळत ह्या प्रोजेक्टला "मिशन इंपॉसिबल" असं नाव दिलेलं आहे.

उद्या थोडा श्रमपरिहार म्हणून क्लायंटतर्फे पबमध्ये पार्टी आहे. त्याचीच वाट बघतेय मी आतुरतेने.

कधी कधी ना मला एकदम गंमत वाटते ह्या सगळ्या प्रकाराची. प्रोजेक्ट चॅलेंजिंग आहे, सॅटिस्फायिंग आहे हे कबूल. पण कशासाठी? आम्ही एवढं पोटतिडकीने काम करतो? आम्हाला जास्त पैसे मिळतात का ते करण्याचे? नाही? मग कशासाठी हा जिवाचा आटापिटा. ना आम्ही कंपनीचे मालक, ना आमचा बॉस. फायदा मालकांचा होणार, मग आम्ही आमच्या घरचंच कार्य असल्यासारखं का खपतोय?

- संवादिनी

Thursday, June 19, 2008

दिल्ली आणि नेलपॉलिश

विमानतळावर उतरले आणि माझ्यावर अचानक बरीच लोकं चाल करून आली आणि आपण मुंबईत नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं. सगळे दिल्ली चे ठग मला (आणि इतरांनादेखील) ठगवण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले. अर्थात मीपण मुंबईत तयार झालेली असल्याने त्यांना भीक न घालता प्रीपेड टॅक्सीच केली.

गेला आठवडाभर दिल्ली अभी दूर नही चाललेलं. एकदाची येऊन पोचलेच. अर्थात दिल्ली काही मला नवी नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी मी दिल्लीला आलेली आहे. कधी आईबरोबर, तिच्या कामासाठी. बाबा खास सव्हीस जानेवारीची परेड पाहायला घेऊन आला होता तेव्हाची. इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या ऑडिटोरिअमध्ये कडकडून टाळ्या वाजवणारी.

पण आजची दिल्ली खूप वेगळीच वाटली. एकटी अशी मी दिल्लीला कधी आलेच नाहीये म्हणून असेल. पोचले दिल्लीत पण मनातून मुंबई जाईना. मुंबई तर मुंबई, अगदी पुणंपण आठवत राहिलं. पुण्याला येऊन फार दिवस नाही झालेत पण आता परत जायला मिळेलच असं नाही. इथे आठवड्यासाठी म्हणून पाठवलंय. पण जातानाच सायबाने सांगितलंय की कदाचित महिनाही लागू शकेल. वर अजून काही प्रोजेक्टसंबंधी बोलणी चालू आहेतच. दरम्यानच्या काळात तिथे नंबर लागला तर थेट तिथेच जावं लागेल.

बरं पुण्याला सगळी गंमत जंमत होती. इथे तसं काही नाहीये. भरपूर काम माझी वाट पाहतंय. दर आठवड्याला घरी जाता येणार नाही. आनंदी नाही आणि आनंदही. उगाचच हाताकडे बघत राहिले. नवं नेलपॉलिश लावायचं राहूनंच गेलं.

बराच वेळ विचार करत होते की ही गोष्ट लिहावी का? पण शेवटी हिय्या करून लिहितेय. मला बॉसने सांगितलं की सोमवारी पोचायचं दिल्लीला. आनंद झाला तसं वाईटही वाटलं. शुक्रवारी परत घरी जायचं होतं, म्हणून गुरुवारी सेलेब्रेशन करायचं ठरलं. आनंदकडे. आनंदी होती. ऑफिसातली अजून दोघं तिघं होती. आनंदीचा भाऊही होता. मजा आली. माझ्या जाण्याच्या नावाखाली धांगडधिंगा, बाकी काही नाही. खूप उशीरापर्यंत बसले होते सगळे. घरी जायला निघालो. आनंद म्हणाला मी सोडतो तुला, एकटी जाऊ नको म्हणून. पण माझं घर एक एकदम जवळ आहे तिथून. म्हटलं मी एकटीच जाते. सगळे खाली पोचलो. आनंदीला अच्छा करून मी कायनेटिक सुरू करायला गेले तर ती हटून बसली. कशीबशी मेन स्टँडला लावून किक मारायला सुरवात केली आणि लक्षात आलं की टायर पंक्चर आहे. झालं. आता काय करणे?साहेबांना फोन केला. साहेब उचलेनात. म्हणून पुन्हा वर गेले.

आनंदने दरवाजा उघडला. नेहमीसारखी माझी व्यवस्थित खेचून झाल्यावर साहेब तयार होऊन निघाले माझ्यासोबत. मला म्हणाला गाडी इथेच ठेव. मी पंक्चर काढून तुझ्या बिल्डिंगच्या खाली लावून ठेवीन, तू यायच्या आधी. म्हटलं ठीक. घरी पोचल्यावर म्हटलं ठीके आता भेटू उद्या. तर म्हणाला चल एक कॉफी मारू. वर आलो कॉफी केली. तो उगाचच काहीतरी बोलत राहिला. मला झोप येत होती पण त्याचं मन मोडवत नव्हतं म्हणून बसलेले. शेवटी एकदाचा तो निघाला. दरवाज्याशी पोचल्यावर म्हणाला विसरणार नाहीस ना मला? म्हटलं काय रे जास्त झालेय का तुला? तुला कशी विसरेन. काहीच बोलला नाही. मी वाट पाहत राहिले तो कधी निघतो त्याची.

मला काही कळायच्या आत एकदम गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेतला. मला जे नको होतं तेच घडणार होतं. आता हा मला प्रपोज करणार. मग मी ह्याला नाही म्हणणार, मग ते नेहमीचं रडगाणं. मग समजावणं. न दुखावता दुखावणं. हे सगळं लख्ख दिसायला लागलं. माझी नाराजीही चेहऱ्यावर स्पष्ट दिसली असेल कोण जाणे. दिल्लीचं डिक्लेअर झाल्यापासून मला असं होईल असं वाटत होतं. आणि शेवटी ते घडलंच.

दोन क्षण त्याने कसलातरी विचार केला. मग हाताकडे बघत म्हणाला कसलं फडतूस नेलपॉलिश लावलंय. दिल्लीला जाताना तरी चेंज कर.

हसावं की रडावं? माझ्या मनातलं कसं बरोबर ओळखलं त्याने. काही लोकं इतकी निरागस असतात ना, की त्यांचा चेहराच आपल्याला सगळी गोष्ट सांगतो. त्याचा चेहराही सगळी गोष्ट सांगत होता. मी न बोलता त्याला घरात घेतलं. त्याने न विचारताच ह्या घडीला प्रेम, लग्न वगैरे मला करायचं नाही. तू चांगला मुलगा आहेस, आपण मित्र आहोत पण धिस इज समथिंग डिफरंट, असे घिसे पिटे डायलॉग्स बोलत गेले. तो ऐकत गेला. शेवटी मी थांबले. माझं बोलायचं तेवढं बोलून झालं. तो उठला. दारापर्यंत गेला. जाताना वळला मात्र. म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदल मात्र. जड पावलाने त्याला पायऱ्या उतरताना बघून मलाच रडायला आलं.

दुसऱ्या दिवशी दबकत दबकतंच त्याच्यासमोर गेले, तर तो पूर्वीसारखाच अगदी काही झालं नाही असा माझ्याशी बोलला. दिवसभर मला खूप वाईट वाटलं. तो माझ्याशी बोलला नसता. चिडला असता, ओरडला असता तरी जितकं वाईट वाटलं नसतं, तितकं त्याच्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मला वाटलं. मुंबईला एकत्रच आलो. सगळा प्रवास मी गप्प आणि तो नेहमीप्रमाणे. शेवटी निरोप घेताना मीच त्याला सॉरी म्हटलं. नेहमीचं त्याचं खळखळून हसला. म्हणाला तू कशाला सॉरी. मीच सॉरी. तुझ्यासाठी. चांगला चान्स हातचा घालवला राव तुम्ही. असं म्हणून पुन्हा जोरात हसला आणि जायला निघालासुद्धा. मी तशीच बघत राहिले त्याच्याकडे. दोन पावलं चालून परत आला.

म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदलून जा. उगाच आठवण येईल माझी. निघून गेला.

खडूने गिरगिटलेली पाटी हाताने कितीही पुसली तरी स्वच्छ होत नाही ना तसं झालं माझं पहिले दोन दिवस. हळूहळू मन रुळावर आलं. आता नेलपॉलिशही बदलायला हवं!

- संवादिनी

Thursday, June 12, 2008

.

गेल्या शुक्रवारी सकाळी उत्साहाने ब्लॉग उघडला. मला एक निकटचा वाटलेला अनुभव ब्लॉगवर टाकलेला. वाटलं वाचणाऱ्यांना तो आवडेल. ब्लॉग आवडला अशा काही कमेंट्स येतील. हावरटपणे सकाळी ब्लॉग उघडून पाहिला. कमेंट्स वाचल्या. आणि खूप वाईट वाटलं. अगदी मनापासून.

आपण सगळेच का लिहितो? का वाचतो? आपल्याला आपल्या लिहिण्यातून आणि वाचनातून काही आनंद मिळतो म्हणून. माझ्या ब्लॉगवर मला वाटेल तसं, मला सुचेल तसं लिहिता यावं, माझ्या कुवतीप्रमाणे म्हणून हा ब्लॉग सुरू केला. माझ्या लिखाणाची उडी सरड्याप्रमाणे कुंपणापर्यंतच आहे हेही माहीत होतं. मग तरीही का लिहायला सुरवात केली? कारण आपली जी गोष्ट आहे ती कोणत्याही आडपडद्याशिवाय सांगावी. कठीण वाटलं हे करणं, म्हणून स्वतः पडद्याआड राहायचं ठरवलं.

सुरवातीला प्रतिसाद चांगला मिळाला. माझा हुरूपही वाढला. दर आठवड्याला लिहीत गेले. सुरवातीला दर आठवड्याला दाद देणारी मंडळी हळूहळू बाजूला झाली आणि ते अपेक्षितही होतं. कारण आहे काय हो माझ्या ब्लॉगमध्ये मी सोडून? ना कलात्मक भाषा, ना सृजनशील विषय. बऱ्याच वेळा मी लिहिलेलं मला स्वतःलाही आवडलं नाही, तर इतरांनी त्याला दाद द्यावी ही अपेक्षाच चूक आहे. त्यामुळे कुण्या एका मुलीने केलेली स्वयंकेंद्रित बडबड कितीशी आकर्षक असणार? आणि कोण ती वाचणार? ज्यांना ती आवडली नाही त्यांनी अगदी आवडली नाही असं जरी लिहिलं असतं ना, तरीसुद्धा वाईट वाटलं नसतं. कारण तसा हट्ट कधीच नव्हता.

पण गेले काही आठवडे जे चाललंय ते मला स्वतःला फार अस्वस्थ करणारं आहे. केवळ मी पडद्याआड राहणं पसंत करते, म्हणून मी कुणीतरी खोटारडी आहे, लोकांना फसवायला मी इथे असं करते, अशा प्रकारच्या काही तिरक्या कमेंट्स आणि इ-मेल्स मला यायला लागले. पहिल्यांदी मी हे हसण्यावारी नेलं. पण प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतंच चाललंय आणि ह्या कालच्या कमेंट्स म्हणजे त्यावरचा कळस झाला.

तुम्हाला वाटत असेल ना, मी हे जे लिहितेय ते खरं घडलेलंच नाहीये, सगळं काल्पनिक आहे. तर तसं समजा. लिहिलेलं वाचून पाच मिनिटं करमणूक तरी होते ना, तेवढी करून घ्या आणि सोडून द्या. मी कोण? मला पडद्याआड राहायला का आवडतं? आणि तसं मला आवडतं म्हणजे मी खोटारडी, असे विचार आणि आरोप कृपया करू नका. ह्याचा खूप त्रास होतो. मनापासून सांगतेय. तुम्हाला अतिशय क्षुल्लक वाटूही शकेल पण मला होतो.

जसं कुणी म्हणालं की एखादा सीए निकम्मा असेल तरच त्याची अवस्था माझ्यासारखी किंवा ह्या ब्लॉगमधल्या हिरॉइनसारखी होईल. म्हणजे मी माझ्या मनातली काही सल सांगितली, त्याची किंमत शून्य? वर मीच खोटारडी. मी सीए नाहीच आणि मला सीए लोकांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल काहीच माहीत नसल्याने मी मारलेली थाप पचली नाही अशा आशयाची कमेंट माझ्याच ब्लॉगवर?

बरं कमेंट्स मॉडरेशन वर ठेवणं माझ्या स्वतःच्या तत्त्वात बसत नाही. मला आवडेल ते पब्लिश करायचं आणि मला न आवडेल ते दाबून टाकायचं ही ठोकशाही झाली. आणि आपण सर्वच जबाबदार व्यक्ती आहोत. लोकं जबाबदारीनं नोंदी करतील अशी अपेक्षा ठेवणं काही चूक नाही. काही लोकांनी सुचवलं की कमेंट्स मॉडरेशनवर टाकाव्यात. पण त्रास कमेंट लोकांना दिसल्यावर नाही होत. त्रास ती कमेंट मी जेव्हा पहिल्यांदा वाचते तेव्हा होतो. ती इतर वाचतात की नाही हा मुद्दाच गौण आहे.

ज्यांना संवादिनी पटली त्यांचे आभार, ज्यांना ती नाही पटली त्यांचेही आभार. वाचणाऱ्यांचे आभार, न वाचणाऱ्यांचेही आभार. न चुकता कमेंट्स टाकणाऱ्यांचे आभार, तुम्हा सगळ्या ब्लॉगर्सचे आभार, कारण खूप चांगलं चांगलं वाचायला मिळालं. अगदी रोजच्या आयुष्यातले व्हावेत असे तुम्ही सगळे जण झालात. माझ्यासाठी भांडलातसुद्धा. भरून पावले. असाच लोभ इतरांवर ठेवा. फक्त उद्या कुणी माझ्यासारखं पडद्यामागे राहून लिहायचं ठरवलं तर त्यांना खोटारडे ठरवून, त्यांच्यावर संशय घेऊन, तुमच्यापासून दूर ठेवू नका, तोडू नका. एवढीच विनंती.


धन्यवाद!

- संवादिनी

Thursday, June 5, 2008

ते तिघं आणि आम्ही तिघं

मिळतं ते नको असणं आणि नसलेलं हवं असणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. मीही अमानूष कॅटेगरीतली नसल्याने, माझाही अनुभव काहीसा असाच आहे. काल नाकापर्यंत कामात बुडालेली असल्याने, एखादा दिवस बिनकामाचा आला तर किती मजा होईल असा वाटायचं, इथे आल्यापासून काही फुटकळ कामं सोडली तर तसं काहीही काम केलेलंच नाही. पहिल्यांदा मजा आली. आता त्याचाही कंटाळा यायला लागलाय. केवळ पगार मिळतो म्हणून त्या जागेत जायचं. जमेल तसा वेळ काढायचा.

सतत अनिश्चिततेची टांगती तलवार डोक्यावर. कुठे पाठवतील याची. पुणं म्हणजे, मी पुण्यातच राहीन हा जो माझा गैरसमज होता तो पूर्णपणे मावळलाय. म्हणे पुण्यात काही प्रोजेक्टस नाहीत. जास्तीत जास्त काम बेंगलोर, हैद्राबाद आणि चेन्नईला आहे. तिथेच बहुतेक जावं लागेल. रोज एक नवी बातमी. एकदा साहेब म्हणाले, अमेरिकेला जाशील का सहा महिने? पण आल्यावर सहा महिने चेन्नईला राहावं लागेल? ठीक म्हटलं. तिथे बायो डेटा पाठवला. क्लायंटने रिजेक्ट केला. मग युरोपातला एक प्रोजेक्ट होता. तिथलं काही कळलं नाही अजून. मग म्हणाले आठवडाभर दिल्लीला जाशील का? म्हटलं जाते. तिथूनही होकार आलेला नाही. एक आखातातला पण प्रोजेक्ट आहे, तिथेही नंबर लावून ठेवलाय माझा. रोज ती धाकधूक घेऊन ऑफिसात जायचं आणि नो न्यूज इज द बेस्ट न्यूज म्हणत घरी जायचं. खूप चिडचिड व्हायला लागलेय हल्ली.

आणि ह्या सगळ्याचा त्रास माझ्यापेक्षा आनंदला जास्त होतोय, कारण मी एवढं डोकं खाते त्याचं दिवसभर की विचारू नका. त्या दिवशी असंच झालं. भयंकर वैतागले होते. त्याला म्हंटलं, माझ्याबरोबर चल जरा. तर नाही म्हणाला. त्याचंही बरोबर आहे त्याला कामं असतात. तो बाकावर नाही. माला जरा रागच आला. तावातावाने आनंदीला फोन केला. तिचं ऑफिस जवळच आहे. साधारण पाच वाजत आलेले ती नक्की भेटेल असं वाटलं तिला फोन केला, ती उचलेना. खूप चिडचीड झाली.

मी थोडावेळ आनंदची वाट पाहिली, तो मिटींगमधून बाहेर पडण्याची काही चिन्ह नव्हती. वैतागून एकटीच खाली उतरले. म्हटलं सरळ सिनेमाला जाऊन बसू. म्हणून निघाले खरी. पण एकटीनेच कसं जाणार? बाजूला कोण असेल? नसत्या शंका यायला लागल्या. स्कूटरवर बसले खरी, पण जायचं कुठे हा मोठा प्रश्नच होता. म्हटलं बालगंधर्व ला जाऊन बघावं. तिथे गेले, तर तिथंही काही खास नव्हतं. चालत चालत संभाजी पार्कात गेले.

तिथे नेहमीची संध्याकाळ चालली होती. कुणी फिरायला आलेले, कुणी प्रेम करायला आलेले, आणि कुणी माझ्यासारखेच काहीच करायला नाही म्हणून आलेले. बसून राहिले एकटीच. लोकांना बघत. त्यांच्या मनात काय चाललं असेल त्याचा अंदाज घेत.

बघता बघता एका ग्रूपने माझं लक्ष वेधून घेतलं. तिथे चौथरा आहे ना तिथे बसले होते. चौघं होते. तीन मुलगे, एक मुलगी. त्यांच्याकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे ते एकमेकांशी खाणाखूणांनी बोलत होते. माझं कुतुहल थोडंसं चाळवलं. मी त्यांच्या मागेच, त्यांच्याकडे पाठ करून बसले. ते एक अक्षरही बोलत नव्हते. खाणाखूणा आणि मध्येच एखादी ग्रंट. हळूहळू ते मुकबधीर आहेत हे मला समजलं. आणि ते काय बोलत असतील ह्याच्याविषयी माझ्या मनात प्रचंड कुतुहल निर्माण झालं.

गम्मत बघा. त्या बिचाऱ्यांना, ज्यांना बोलता आणि ऐकता येतं, ती लोकं काय बोलत असतील, ह्याचं कुतुहल नेहेमीच वाटत असेल. आणि आज त्यांच्या बाजूला बसून माझीही परिस्थिती तशीच झाली. पण माझी पाठ त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या खाणाखुणा मला दिसत नव्हत्या. मी मध्येच मान वळवून बघायचा प्रयत्न करीत होते. आणि त्यांच्यातल्या त्या मुलीशी पटकन माझी नजरानजर झाली. ती हसली. मीही हसले. मला एकदम ऑकवर्ड वाटलं. का कुणास ठाऊक पण मी वळले आणि चक्क त्यांच्याबाजूला जाऊन उभी राहिले. ती तिघंही माझ्याशी खाणाखुणांनी बोलायचा प्रयत्न करीत होती आणि मीही. नकळत मी त्यांच्यात कशी रमले मलाच कळलं नाही. ऐकू येत असूनसुद्धा आजूबाजूचं काहीही ऐकू येईनासं झालं. फक्त त्यांचे फेशिअल एक्स्प्रेशन्स. हातवारे एवढंच.

थोड्या वेळानं त्यांची जायची वेळ झाली. बहुदा ते तिथे भेटतात बऱ्याच्दा असं त्यांना सांगायचं होतं. निटसं कळलं नाही. मीही त्यांना पुन्हा विचारलं नाही. पण एक वेगळंच जग होतं त्यांचं. बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण हसता येतं, खिदळता येतं. खाणाखुणा करता येतात. लिप मुव्हमेंटस वरून समोरचा काय बोलतोय ह्याचा अंदाज घेता येतो.

एकदम मला बाबाची खूप आठवण झाली. तो काय म्हणाला असता हे पाहून? सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

जिला देवाच्या कृपेने, चांगलं गाणं म्हणता येतं ती मी, माझ्या क्षुल्लक समस्या घेऊन किती चिडचिडी होऊन तिथे गेले? आणि डोंगराएवढ्या समस्येचं ओझं डोक्यावर घेऊन जगणारे ते तिघं. त्यांना गाणं कधीच म्हणता येणार नाही असा शाप देवानं दिलेला, पण गाणं म्हटल्यासारखं आयुष्य जगत होती. हसत होती, एकमेकांची चेष्टाही करीत होती, अगदी माझ्यासारखं किंवा इतर कुणाहीसारखं आयुष्य जगायचा प्रयत्न करीत होती.

मी तिथेच बसून राहिले बराच वेळ. एकटीच. मोबाईल वाजायला लागला. आनंदचा होता. तो खूप सॉरी म्हणाला. मीही आढ्यतखोरपणा दाखवला नाही. आनंदीचाही फोन आला. ती म्हणाली, तीही पार्काजवळच आहे. ती आली. आनंदही आला. नेहमीच्या थट्टा म्हस्करीला ऊत आला. आमच्या तिघांच्या.

मी हसत होते, बोलत होते, पण मनात मात्र घर करून राहिले ते तिघं, अगदी घरी पोचेपर्यंत.

- संवादिनी

Thursday, May 29, 2008

आनंदीआनंद आणि मी

मैत्री कशी, कुठे, कुणाशी व्हावी काय सांगता येतंय? पुण्यामध्ये आले तेव्हा मित्र कॅटेगरीमध्ये असणारी एकही व्यक्ती नव्हती. आल्यापासून शोधत होते मैत्र. पण ती काय चण्याची डाळ आहे की गेले किराणा दुकानात आणि घेतली एक किलो? तसंच माझं झालं. शोधत राहिलं की मिळत नाही आणि ध्यानीमनी नसताना अलगद पदरी पडतं.

आगाऊपणे मला बंगाली का? म्हणून विचारणारा तो. तो नको, फारच रुक्ष वाटेल सतत तो म्हटलं तर. एखादं छानसं नावच देऊन टाकूया त्याला इथल्यापुरतं. काय बरं? हं, आनंद म्हणूया. तर मला हा आनंद भेटला. मुंबईचा, मराठी आणि मराठीत बोलायची अजिबात लाज न वाटणारा. मग झालीच की मैत्री. ह्याला म्हणायचं काखेत कळसा आणि गावाला वळसा. बरं माझ्या समोरच बसतो तो. म्हणजे मध्ये क्यूबिकलची भिंत आणि पलीकडे तो. पण कळलाच नाही मला तो. भिंती, कमी असलेली अंतरं किती वाढवून टाकतात ना?

कंपनी असली आणि ती चांगली असली तर किती बरं वाटतं ना? नाहीतर एकटीने जा चहाला, सहसा एकटी नाहीच पण इतरांच्याबरोबर गेलं तरी मला एकटंच वाटायचं. आपल्याला नाही ब्वा रस, नव्या टेक्नॉलॉजीच्या गप्पा ठोकण्यात. त्यापेक्षा मस्त एखाद्या पुस्तकावर बोलावं. झालंच तर गाणं आहे, कविता आहेत. त्यामुळे माझं आणि आनंदचं जमतं. तो अजिबात कामाबद्दल बोलत नाही. स्वतः कलाकार आहे असं नाही, पण आवड आहे. विचारत राहतो, हे कसं करता, ते कसं करता, पडदा कसा पडतो, विंग कशाला असतात. फुटकळ प्रश्न, पण मला माझ्या कंफर्ट झोनमध्ये असल्यासारखं वाटतं.

आणि बरं मुंबईचा आहे, पण पुणं सगळं पाठ आहे. मग काय सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हादडणे आणि भटकणे हा कार्यक्रम चाललाय. परवाच आम्ही वैशाली मध्ये गेलो. मस्त आहे हं. म्हणजे मुंबईच्या दही बटाटा पुरीची चव नाही त्या एसपीडीपीला पण हेही नसे थोडके. अजून दोनतीन ठिकाणी जाऊन आले. युनिव्हर्सिटी खूप छान आहे. ओशो पार्कपण आवडला. घरी टीव्ही नाही. मग करायचं काय? भटका. आता कायनेटिकही आहे. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालतो.

हे झालं ऑफिसमधलं. गेल्या आठवड्यापासून एक नवा उद्योग सुरू केलाय. माझ्या बाबांचे एक मित्र आहेत इथे. सहज बोलत बोलता ते असं म्हणाले की ते सकाळी बॅडमिंटन खेळतात. मी लगेच त्यांना विचारलं मी येऊ का म्हणून? ते म्हणाले जरूर. तिथे जायला सुरवात केलेय. ह्या वेळी मुंबईहून येताना माझी जुनी रॅकेट विथ नवं गटिंग घेऊन आलेय. गेले दोन दिवसतरी रेग्युलर आहे. आता पाहूया किती दिवस चालतं हे फॅड.

माझ्या बाबांचे मित्र म्हणजे माझ्या वयाचं कोणी त्यांच्या बरोबर खेळत नसणारंच. पण पहिल्याच दिवशी त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी ओळख झाली. तीही रोज खेळते पण ह्या लोकांबरोबर नाही. त्यांचा ग्रुप वेगळा. असली गट्टी जमलेय ना तिच्याशी की सांगायची सोय नाही. म्हणजे आम्ही भेटून दोनच दिवस झालेत असं वाटतंच नाही. काल तिच्या घरी गेले होते. अगदी माझ्या घरीच गेल्यासारखं वाटलं. काका काकू, तिचा भाऊ आणि ती. एकदम घरचीच आठवण झाली. पण आताशा आठवणी येऊन मन उतू जात नाही. आठवण येते तशीच जाते.

तर असे हे माझे दोन नवे मित्र. आनंद, आणि तिला आनंदी म्हणूया. कारण माझ्या लिखाणात नक्कीच ह्या दोघांचा पुन्हा पुन्हा उल्लेख होणारे. नशीब माणसाला कुणा कुणाची भेट घालून देतं बघा. मी कुठे होते? हे दोघं कुठे होते? आम्ही भेटलो कसे? आणि आम्ही एकमेकांचे मित्र झालो कसे? आता त्यांच्या मित्रांशी ओळख होईल, ते माझे मित्र होतील आणि मैत्र वाढत जाईल. कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं कोण जाणे.

ऑफिसमध्ये काम नाही, सहज एकदा जीटॉक उघडून बसले होते, तर एका ब्लॉगरने हॅलो केलं, त्याच्याशी थोडा वेळ बोलले तर अजून एका ब्लॉगमैत्रिणीने हॅलो केलं, जितका वेळ ऑनलाईन राहिले तितका वेळ एकेक लोकं भेटत गेले. खूप छान वाटलं. आपण ज्या लोकांचं लेखन वाचतो, त्या लोकांशी बोलताना त्यांचे वेगळे पैलू सापडतात असं वाटलं. वेळ इतका छान जातो. आपण एकटे आहोत ही भावनाच विसरायला होते. हे आणखी एक मैत्र.

मुंबईला ह्या वेळी मुद्दाम सकाळी आमच्या नाना नानी ग्रुपला आणि माझ्या समुद्राला भेटायला गेले. जग्गू नाही भेटले. खरं मला त्यांना खूप सांगायचं होतं, कसं काय झालं पुण्याला आणि मी कसं मॅनेज केलं ते. खूप खूश झाले असते. त्यांना फोन केला. गुडघे दुखतायत म्हणाले. पुढच्या आठवड्यात भेटून येईन. आईलाही जरा बरं नव्हतं. सर्दी खोकला आणि तपासारखं वाटत होतं. पण आता बरंय म्हणाली फोनवर.

एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागलेय आताशा की माझी एक्सक्लूसिव्ह विश्व तयार व्हायला लागलीत. मुंबईचं विश्व वेगळं, पुण्याचं वेगळं, पुण्याला ऑफिसचं वेगळं, ऑफिसआधीचं वेगळं, ऑफिस नंतरचं वेगळं, आणि घरी गेल्यावर माझ्या एकटीचं एक अजूनच वेगळं विश्व. पूर्वी ह्या सगळ्यात एक सुसूत्रता होती. पण आता म्हणजे मीच माझ्या वेगवेगळ्या विश्वात वेगवेगळी वागायला लागलेय असं वाटतं. अगदी नाटकातल्यासारखं. प्रसंगाला अनुरूप. कप्पे आहेत हवाबंद. ह्या भागाचा त्या भागाशी संबंध नाही आणि त्याचा ह्याच्याशी.

का?

- संवादिनी

Thursday, May 22, 2008

काल आणि आज

नव्याच्या नवलाईने जुन्याच्या नसण्याचं दुःख हळूहळू बोथट होत जातं. नाही? नव्या ऑफिसात आले तेव्हा पहिले दोन दिवस जुनं ऑफिसच आठवत राहिलं. जुहूचा तो समुद्रकिनारा, वाऱ्यावर डोलणारी नारळाची झाडं. जुहू तारा रोडवरची माझी डबल डेकर बस. आमची टीम, बुटकोबा, सगळं सगळं आठवत राहिलं. हळूहळू इथे रुळायला लागले. पहिल्यांदा नकोशी वाटणारी ती मशीनची फुकट कॉफी आता आवडीची झालेय. नुसतीच कॉफीच नाही, तर एरवी ब्लॅक टी ला नाकं मुरडणारी मी हौसेनं आता ब्लॅक टी विथ लेमन घ्यायला लागलेय.

माझ्या काकाचा एक मित्र आहे. त्याची जुनी कायनेटिक त्याने मला दिलेय वापरायला. त्यामुळे खूप मस्त वाटतंय. म्हणजे त्या पुण्याच्या बसेस आणि रिक्षा नकोच. त्यापेक्षा आपलं वाहन असलेलं बरं. तसं रूटीन पण सेट झालंय. सकाळी सकाळी उठून ऑफिसात धडकणे. जर मेल वेल चेक करून ब्रेकफास्ट. काम अक्षरशः काहीही नाही. मी बाकावर आहे सध्या. म्हणजे बेंचवर. त्यामुळे टिवल्या भावल्या करणे, दुपारी जेवणे आणि संध्याकाळी घरी जाणे. स्वैपाक करायचा कंटाळाच आहे. पण एकटीला जाऊन रात्रीचं बाहेर जेवायला बरं नाही वाटत म्हणून फोन वरून ऑर्डर देणे आणि घरी येऊन ते खाणे, की झाली झोपायची वेळ.

तरी हा लॅपटॉप सोबतीला आहे म्हणून नाहीतर मी वेडीच झाले असते. कारण इथे टी. व्ही देखील नाहीये. पण कालच ऑफिसमध्ये काही पुस्तकं विकायला ठेवली होती. मराठीही होती. बरं वाटलं. एकदोन चाळून पाहिली. छावा घेतलं. खूपच छान आहे. आणि मला एकदा पुस्तक आवडलं की त्याचा फडशा पडायला वेळ लागत नाही. बहुतेक मुंबईला जायच्या आत संपेल.

पण हे सॉफ्टवेअर कंपनीचं विश्व भन्नाट आहे. जो तो स्वतःला विकतोय, विकायचा प्रयत्न करतोय. बॉसला काम, की आम्हाला कामाला लावणं. आमचं काम, आम्हीच अमुक एक कामाला कसे योग्य आहोत हे सिद्ध करणं आणि इतरांवर कुरघोडी करून ते काम स्वतःसाठी मिळवणं. कारण शेवटी तुम्ही किती पैसे कंपनीला मिळवून देता ह्यावर कंपनी तुम्हाला किती बोनस देईल हे अवलंबून आहे. मला एकदम विचित्र वाटलं पहिल्यांदा. आता सवय होतेय. म्हणजे नाही जरी आवडलं तरी करून घ्यायला लागतेय.

काही लोकांच्या ओळखी झाल्या. माझ्यासारख्याच बाकांवर बसलेल्यांना काही उद्योग नाहीये. मग आम्ही काहीजणं टवाळक्या करत बसलेलो असतो. मराठी टक्का खूप कमी आहे. पण माझं मराठी मराठी नाहीच आहे. आपल्याला कोणतीही भाषा बोलणारी चांगली कंपनी चालते. पण मैत्री म्हणावी अशी नाही. ट्रेनमध्ये लांबच्या प्रवासाला निघालेले लोकं कसे टाइम पास करण्यापुरतं बोलतात. तसंच काहीसं.

कारण सर्वांनाच माहितेय की ही सोबत काही दिवसांचीच आहे. पुढे नवा प्रोजेक्ट नवं राज्य, नवा राजा आणि नवी प्रजा. मग मैत्री करायचे कष्ट आतापासून कशाला घ्या? बरं मीच कशी ग्रेट आणि मीच कसा फंडू, हे सांगायची अहमहमिका लागते. मी आपलं ऐकते. शेवटी सगळेच बोलले तर ऐकायचं कोणी? त्यामुळेच असेल, पण लोकं स्वतःहून माझ्याशी बोलायला येतात. आपल्या स्वतःचं स्वतःबद्दलचं बोलणं, दुसऱ्या कुणीतरी शांतपणे ऐकून घेणं ही खरोखरच माणसाची गरज आहे का हो?

आमचे साहेब तसे बरे आहेत. चक्क मराठी आहेत. मला अहो जाहो करतात. मी त्यांना नको सांगितलं तरी ऐकत नाहीत. माझ्यासाठी स्थळ शोधतायत. अंहं, ते स्थळ नव्हे, त्यांच्या परिभाषेत, स्थळ म्हणजे प्रोजेक्ट आणि त्यांचं काम वधूवर सूचक मंडळासारखं.

आज बुधवार आला. उद्याचा एक गुरुवार गेला की मग आलाच शुक्रवार. इंद्रायणी - घर - शनिवार - रविवार - इंद्रायणी - पुणं आणि मग पाच दिवस आणि चार रात्रींसाठी एक वेगळंच विश्व. मागणी आणि पुरवठ्याच्या तालावर नाचणारं. एक मार्केट इकॉनॉमी. डिमांड आणि सप्लाय. मोर द डिमांड मोर द प्राइस, मोर द सप्लाय, लेस द प्राइस. आणि मग चालणारी चढाओढ, माझी डिमांड जास्त कशी आणि माझ्या स्किल्स चा सप्लाय कमी कसा? आणि म्हणून माझी किंमत जास्त कशी?

मीही नकळत कधी ह्यात ओढली जाते. मग अधेमधे कुठेतरी लक्षात येतं. आपण तसे नाहीच मुळी. कशाला तसं वागायचा प्रयत्न करायचा? हाथी चले अपनी चाल प्रमाणे आपण चालत राहायचं. आमचे एक सर नेहमी सांगायचे. पैशाच्या अपेक्षेनं काही करू नका. जे काही कराल ते सर्वोत्तम करा. पैसा तुमच्याकडे चालत येईल. जितकं तुम्ही त्याच्या मागे लागाल तितकं दूर पळेल. बघूया सरांचं तत्त्वज्ञान काळाच्या कसोटीवर उतरतं का ते?

पण ह्या सगळ्यातसुद्धा जवळचे वाटावे असे लोकही आहेत. मी जिथे राहते तिथल्या शेजारच्या काकू. म्हणाल्या कधीही कंटाळा आला तर आमच्याकडे येत जा. टी. व्ही. बघायला. जेवायला. खूप बरं वाटलं. ऑफिसातही एक इंटरेस्टिंग मुलगा भेटला. मी मराठी पेपर वाचत बसले होते, तर मागून आला आणि म्हणाला तू बंगाली आहेस का म्हणून? मला जरा विचित्रंच वाटलं, अगदी मराठी वाचता येत नसलं तरी देवनागरी आहे स्क्रीनवर एवढं तरी समजतंच ना? मी नाही म्हटलं. तसा म्हणाला, मला वाटलंच, तू मराठी असणार म्हणून. बंगाल्यांना अजून मराठी वाचता कुठे येतं? साहेब स्वतः मराठी. ओळख करून घेण्याची ही अनोखी पद्धत पाहिल्यावर माझी खात्री होती की ये भिडू मुंबईकाही है. आणि तसंच झालं. पण त्याच्याविषयी पुढच्या वेळी. उद्या काम नसलं तरी ऑफिसला तर जायचंच आहे म्हणून आता झोप.

Thursday, May 15, 2008

वाघ आणि बेडूक

आपलं भोवताल बदललं की आपण बदलतो की नाही? बहुतेक बदलतो. गेल्या पोस्टपर्यंत मी माझ्या घरात माझ्या टेबलवर आईने बनवून दिलेला गरम गरम चहा भुरकत भुरकत लिहीत होते. आज मी इथे एकटीच आहे. कधीतरी गरम होती, असा जरासुद्धा संशय येऊ न देणारी इडली आहे, आंबट ढाण सांबार आणि तिखट जाळ चटणी. अर्थात त्या दोघांच्या वाटेलाही मी जात नाहीये हा मुद्दा वेगळा, पण ह्यामुळे माझं लिखाणसुद्धा थंडगार होऊन जाणार असं वाटतंय.

असो, सांगायचा मुद्दा हा, की आमचं पार्सल पुण्यनगरीत येऊन पोहोचलं, सगळंच धक्कादायक आहे. अजूनही मी सावरतेय.

पहिल्या दिवशी सकाळी सकाळी इंद्रायणीने इथे पोहोचले. ऑफिसतर्फे पहिल्या दोन ट्रिपा स्पॉन्सर्ड आहेत, त्यामुळे एसी चेअरकारनी आले. पण खिडक्या उघडता येणाऱ्या डब्यांची मजा इथे नाहीच. निसर्गाचा रंग कसा लख्ख दिसायला हवा. जसा आहे तसा. मध्ये ती टींटेड काच आली, की सगळं सपक दिसायला लागतं. त्याच रंगात असल्यासारखं.

आधीच मला नव्या नोकरीचं टेन्शन, त्यात एवढ्या लवकर उठायची नसलेली सवय, त्यामुळे झोपेतच शिवाजीनगरला उतरले. सामान काही जास्त बरोबर नेलंच नव्हतं कारण आई बाबा गाडीने विकेंडला पोहोचणार होते, माझ्या सामानासकट. पहिला धक्का. पुण्यातला रिक्षावाला माझ्याशी हिंदीत बोलला. आणि तो मराठी होता हे त्याच्या उच्चारांवरून स्पष्ट कळत होतं. म्हणजे मी मराठी दिसत नाही की काय? काळे डोळे सोडले तर बाकी सगळंच एकदम चित्पावनी. त्यामुळे पुण्यातले लोकं आपल्याला पुणेकरंच समजतील असा एक फाजिल समज झाला होता, तो त्या पुणेरी रिक्षावल्याने माझ्याशी हिंदीत बोलून चुकीचा सिद्ध करून दाखवला.

असो, हा धक्का फारसा धक्कादायक नव्हता. खरा धक्का तर पुढेच बसला. ऑफिसात शिरून एच आर डिपार्टमेंटमध्ये शिरले. एक अतिशय नकोसा वाटावा असा माणूस बसलेला. बोलण्यात उर्मटपणा, उपकार करतोय असा वागत होता. त्याला जाऊन माझं नाव वगैरे सांगितलं, मेडिकल करायची वगैरे तेही सांगितलं. त्यानंतर तो मला जे काही म्हणाला ते ऐकून झीट येऊन पडायचीच वेळ आली. तो म्हणाला की त्याला कोणी कळवलंच नाहीये की मला रिक्रूट केलंय म्हणून.

मनात म्हटलं, अरे माणसा, मी माझी सोन्यासारखी नोकरी सोडून, सकाळी सकाळी उठून, तडफडत तडफडत, इथे येऊन पोचले आणि तू मला म्हणतोस की तुला कोणी सांगितलंच नाहीये की मी येणारे म्हणून? मी म्हणजे ऑलमोस्ट रडणारंच होते, पण कसंबसं रोखलं. शेवटी नावात घोटाळा झाल्याचं कळलं. साठ्ये चं चक्क शेट्टी? पण शेवटी मीच ती, हे ऐकून मला हायसं वाटलं.

बाकी सगळा दिवस मेडिकल, जॉइनिंग फॉरमॅलिटीज मध्ये गेला. संध्याकाळी अस्मादिक ह्या आमच्या गेस्ट हाउस वर पोहोचले. जुन्या कंपनीने वाईट सवयी लावलेल्या. तिथे म्हणजे राजेशाही कारभार, हवंतर राणीशाही म्हणा, पण इथे? एवढी मोठी ही कंपनी पण गेस्ट हाउस कसलं? एखाद्या कॉलेजचं हॉस्टेलही ह्यापेक्षा खूप चांगलं असेल. पुन्हा एकदा रडायलाच यायला लागलं. मी एवढी रडी आहे हे मला इथे आल्यावरच कळतंय.

जरा फ्रेश होऊन बाहेर पडले, घरी फोन केला. विन्याने उचलला. एकदम खूश झाला. त्याच्याशी थोडा वेळ बोलले, मग बाबाशी बोलले, आईशी बोलताना मात्र तिला सांगितलं म्हटलं शुक्रवारी नाही, उद्या परवाच या. इथे राहणं मला शक्य नाहीये इतकं टुकार गेस्ट हाउस आहे. हो नाही करता करता गुरुवार ठरला. गुरुवार म्हणजे उद्या ते इथे येतील. मग माझ्या काकाचा रिकामा फ्लॅट आहे, कचरा डेपोला, तिथे मी एकटी राहणार आहे, तिथे सगळं सेटिंग करतील आणि मग आम्ही शुक्रवारी सगळेच मुंबईला जाऊ. काय पण एरीआ आहे? कचरा डेपो?

बाबाने मला हा लॅपटॉप घेऊन दिला. मस्त आहे. आणि बॅकग्राउंड म्हणून आमचा चौघांचा फोटो लावून ठेवलाय, सिडनी ला घेतलेला. मी सीए झाल्यावर आम्ही ट्रीपला गेलो होतो तेव्हाचा. पाठी ऑपेरा हाऊस आहे. पण मी बघतच नाही तो. उगाचच आठवण येते आणि पुन्हा रडायला येतं. मला खरंच वाटलं नव्हतं, की एवढी सतत आठवण येईल, रडू येईल. अर्थात आता जरा बरं वाटतंय कारण उद्या सगळेच इथे येतील.

नेहमी कळपात राहणाऱ्या प्राण्याला एकदम एकटं राहायला सांगितलं तर कसं होईल? तसं माझं झालंय. ऑफिसात कुणी ओळखत नाही, एकदम जाऊन कुणाशी मैत्री करण्याचा माझा स्वभाव नाही. मित्रमंडळात खूप बडबडी असले तरी अनोळखी लोकांच्यात माझी एकदम भिजलेली मांजर होते. उगाचच हसायला टॅक्स पडत असल्यासारखा माझा चेहरा मग लंबाचौडा होतो. त्यामुळे पटकन ओळखी होत नाहीत, लोकांना मी कदाचित थोडी आखडूही वाटत असेन. सेल्फ रिअलायझेशन का काय ते म्हणतात ते हेच असेल? आपल्या डबक्यात शेर असलेला बेडूक, डबक्याबाहेर पडला की त्याला आपलं बेडूकपण जाणवतं. डबक्यात त्याला वाघ म्हणणारेच सगळे असतात आणि डबक्याबाहेर कुणी बेडूकही म्हणायला तयार नसतं.

तसा झालाय माझा डबक्याबाहेरचा बेडूक.

असं काही झालं की मला महाभारतामधला "मै समय हुं" वाला हरीश भिमाणीचा आवाज आठवतो. समय हेच सगळ्यावरचं एकमेव सोल्यूशन, परवापेक्षा काल, आणि कालच्यापेक्षा आज खूपच बरा वाटतोय. उद्या कदाचित इथलेही लोकं ह्या बेडकाला शेर शेर म्हणायला लागतील कुणी सांगावं?

- संवादिनी

Thursday, April 24, 2008

आजी आणि अर्धविराम

परवाच आजीकडे गेले होते. आजी म्हणजे माझी एकदम मैत्रीणच आहे. चक्क ऑफिसला दांडी मारली आणि तिकडे गेले. तसंही ऑफिसमध्ये काम कमी झालंय. रजा फुकट जायची ती घेऊन टाकली. खूप गप्पा मारल्या. ती म्हणाली दमतेस किती? सतत इकडे तिकडे धावत असतेस? म्हटलं आजी, त्यातच मजा असते. घरी बसून काय करायचं? नुसतं बसून वेळ फुकट जातो काहीतरी करत राहिलं की वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान मिळतं.

तशी ती मला तिच्या आईची गोष्ट सांगायला लागली. तिची आई म्हणजे माझी पणजी. मी तिला फार पाहिलं नाही, पण तिची मला भीतीच जास्त वाटली होती. कारण मी होते तीन-चार वर्षांची आणि ती नव्वदीतली. आलवण नेसायची ती. बहुतेक आलवणंच म्हणतात त्याला. म्हणजे कोंकणातल्या विधवा बायका पूर्वी घालायच्या ना, तो साडीचा प्रकार. डोकं सतत झाकलेलं. त्या साडीचा तो विचित्र रंग. ती आली की रडायलाच लागायचे मी. तिची गोष्ट.

अगदी शंभर वर्षाची झाली तरी एकटी राहायची कोंकणातल्या तिच्या घरात. एवढं मोठं ते घर. लाकडी होतं. माडीवर चालायला लागलं की करकर वाजायची ती लाकडं. घरासमोरच एक दोणी होती. दोणी म्हणजे एकदम छोटासा हौद. मी तीन-चार वर्षाची असतानापण पुरती बुडायचे नाही इतका छोटा. आणि त्या दोणीवर नेहमी एक भला थोरला बेडूक यायचा. त्याची मात्र भीती वाटायची नाही. बेडूक आला की मी तिकडे धावायची आणि आई मागेमागे. अर्थात मला त्या बेडकाबद्दल कितीही प्रेम असलं तरी मला बघून तो पळूनच जायचा.

घरामागेच एक टेकडी होती. मामा तिथे मला फिरायला घेऊन जायचा. माझा मामा एवढा उंच. त्याच्यापुढे तर मी एकदमच छोटी दिसायचे. लाल तपकिरी माती असावी बहुतेक तिथे. नीटसं आठवत नाही, पण खूप मस्त जागा होती ती. कधी बंदरावर घेऊन जायचा. तिथला मासळीचा वास बिलकुल आवडायचा नाही मला. किती छोट्या छोट्या गोष्टी आणि इतक्या वर्षांपूर्वीच्या कुठे रेकॉर्ड होऊन जातात डोक्यात कुणास ठाऊक? पणजी आजीची गोष्ट सांगता सांगता कुठे येऊन पोचले.?

तर अशी आमची ही पणजी आजी. तिला स्वस्थ बसवत नसे. सतत काहीनं काहीतरी करत राहायचं. विश्रांती माहीतच नाही. आणि पूर्वी कामंपण जास्त असतील, जात्यावर पीठ दळण्यापासून ते जमीन सारवणे, लिंपणे सगळं सगळं एकटीच करायची, अगदी शेवटपर्यंत. कुणी तिला सांगितलं की आजी थोडा आराम कर, तर ऐकायची नाही. शेवटी शेवटी तिला अल्झायमर झाला होता. जुनं आठवायचं, नवं आठवायचं नाही. आजीला पण ओळखायची नाही बऱ्याच वेळा. तेव्हा सतत म्हणत राहायची ती. जरा पाच मिनिटं आडवी होते. मुलांचं करता करता, घरातल्यांचं करता करता, बाहेरच्यांचं सांभाळता सांभाळता, शांत बसायचं राहूनच गेलं तिचं. ते असं शेवटच्या दिवसात बाहेर आलं. म्हणायची मला कुणी पाच मिनिटं स्वस्थ बसू देत नाही.


मला एवढं वाईट वाटलं हे ऐकून. कधी कधी काही लोकं आपल्या दृष्टीने अस्तित्वातच नसतात. मला एकदम वॉटर पिक्चरमधली ती आजीबाई आठवून गेली. तिला लाडू खायचा असतो पण तिला शेवटपर्यंत तो मिळत नाही. त्यासाठीच ती जगत असते आणि लाडूचा एक घास गिळल्यावर सुखाने मरते. तसं काहीसं, खूप आत आत धक्का देणारं.


आजी म्हणाली, ऐक माझं. आता थोडे दिवस सगळं बंद कर, विश्रांती घे. शरीर दमतंच. आपण समजावत राहतो स्वतःला की मी दमत नाही. माझी शक्ती अफाट आहे म्हणून. ताबडवत राहतो आपल्याच शरीराला. तसं करू नकोस. म्हणाली एक अर्धविराम घे. मॅट्रिकसुद्धा न झालेली माझी आजी. कसे चपखल शब्द वापरते. अर्धविराम. कुणी शिकवलं असेल तिला?


म्हणूनच, सगळ्या आवांतर ऍक्टिव्हीटीज काही दिवस बंद करायचं ठरवलंय. ह्या महिन्याच्या नाटकात मी म्युसिक करणार होते. त्यांनाही नाही सांगून टाकल. हा ब्लॉगही अवांतरच नाही का? मग इथेही एक पॉज घ्यायचं ठरवलंय. किती शक्य होतं ते माहीत नाही. पण प्रयत्न करून बघेन. इथे लिहिण्याचं व्यसनच लागलंय मला. पण तरीही. त्यामुळे पुढची भेट कदाचित मी पुण्याला गेल्यावरच होईल. कदाचित नाहीही. कारण तिथे काँप्युटर नाहीच आहे. ऑफिसमध्ये आहे, पण तिथे मराठी लिहिता येईल असं नाही. नव्या ऑफिसमध्ये सुरवातीला का होईना काम करण्याचं सोंग घ्यावं लागेल. त्यामुळे तसंही जमेलसं वाटत नाही. त्यामुळे माझा हा अर्धविराम.

पुन्हा भेटूच;

कधीतरी.

Thursday, April 17, 2008

सेंड ऑफ, समुद्र आणि पूर्व"पुण्या"ई

सध्या धमाल चालली आहे. मी पुण्याला जाणार हे लोकांनी फारच मनावर घेतलेलं आहे. ऑफिसमध्ये ठीक आहे पण माझ्या इथल्या मैत्रिणी, आमचे शेजारी, एवढंच काय? मामा, काका, आत्या, ह्या सगळ्यांनी असं ठरवूनच टाकलंय की आता मी पुण्याला गेले म्हणजे गेलेच. परत यायचे काही चान्सेस नाहीत. त्यामुळे सेंड ऑफ्स चाललेत सध्या. आणि त्याबरोबर मिळणारी आवडती गोष्ट म्हणजे गिफ्ट्स. अर्थात बऱ्याच जणांनी तारखा बुक करून ठेवल्यात त्याच्यामुळे अजून काही विशेष हाती लागलं नाहीये. पण येत्या काही आठवड्यात नको असलेली बरीचशी आणि हवी असलेली थोडीशी अशी गिफ्ट्स मिळणार आहेत.

हल्ली माझं सकाळी फिरणं पुरतं बंद झालेलं आहे, त्यामुळे आमच्या आजी आजोबा ग्रुपची भेट होत नाही. पण मुद्दाम त्यांना सांगायला म्हणून सोमवारी पॉइंटाला गेले. सगळ्यांना खूप आनंद झाला. जग्गूंना तर खूपच. त्यांनी तर एकदम मस्त प्लॅन ठरवलाय. चौपाटीला मफतलाल बाथ आहे ना, तिथे मला ब्रेकफास्ट ट्रीट आहे.

तिथला जिलबी फाफडा म्हणजे फर्स्ट क्लास. मी शाळेत होते ना? तेव्हा बाबा मला आणि विन्याला घेऊन सायकलिंगला यायचा. आणि घरी जाता जाता मफतलाल मध्ये थांबून जिलबी आणि फाफडा. आणि त्याच्यावर कडी म्हणजे नीरा. असलं काँबिनेशन फक्त बाबाच जाणे आणि आम्ही त्याचेच चेले, मग काय?

घरी येता येता उशीर झाला. उगाचच जरा समुद्रावर रेंगाळले. खरंतर समुद्राकडे बघत मी अख्खा दिवस घालवू शकेन. समुद्र आहेच तसा. सखा, सोबती, फ़्रेंड अँड फिलॉसॉफर. माझे कित्येक प्रॉब्लेम्स समुद्राने सोडवलेत. सीए चा अभ्यास करता करता कोणत्याही वेळी, अगदी टळटळीत दुपारी सुद्धा मी आलेय इथे. किती वेळा मुरूडला त्याच्या बाहूपाशात रमलेय, त्याचं ते अंजारणं, गोंजारणं, कधीकधी चिडून एखादा फटका मारणं, त्याचं ते संध्याकाळचं नयनरम्य रूप. खवळलेला तो, धीरगंभीर तो, मुलायम तो, रंगेल तो, रगेल तो. आयुष्याचा सोबती कसा हवा? समुद्रासारखा.

तो खारा वारा अंगावर घेत बसून राहायचं. एकदम फ्रेश वाटतं. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतात. पुण्याला हा माझा सखा नसेल.

गाण्याच्या बाईंना फोन केला. तसंही मी त्यांच्याकडे जाणं जवळजवळ बंदच केलं होतं पण फोन, कधीमधी भेट चालूच असते. त्या एकदम खूश झाल्या. त्या म्हणाल्या बरं आहे, तुझं नाटक सुटेल आता. तानपुरा घेऊन जा तिथे. तिथल्या एका प्रसिद्ध गुरुंना त्या माझ्यासाठी सांगणार आहेत. त्यांच्याकडे गाणं शिकायचं म्हणजे ड्रीम कम ट्रू आहे खरंतर. माझ्यापेक्षा बाबाला जास्त आनंद होईल कारण तो तर त्यांचा नंबर वन फॅन आहे. बघूया कसं जमतं ते.

आणि हल्ली माझे कुकिंग क्लासेस सुरू झालेले आहेत. रोज संध्याकाळी आईबाईंच्या शाळेत आमची हजेरी असते. हळूहळू पोळ्या गोल व्हायला लागल्यात. मीठ, तिखटाची समज यायला लागली आहे. मी आईला म्हटलं, आई, समज विनय गेला असता पुण्याला, शिकवलं असतंसं काय त्याला? तर म्हणाली, तो म्हणाला असता तर शिकवलं असतं. पण तो वेगळा आणि तू वेगळी.

म्हटलं काय वेगळं आहे? मला अजिबात पटत नाही हे. सगळे सारखेच ना. उद्या विन्याचं लग्न झाल्यावर तो काय घरात तंगड्या वर करून बसून राहणार? त्याला नको यायला हे सगळं. मलाही यायला पाहिजे हे मान्य, पण कायदा सगळ्यांना सारखा नको का? हे मला तिचं पटत नाही आणि तिला माझं. आईला खरंतर एक बाई म्हणून माझं म्हणणं पटलं पाहिजे. पण आमच्याकडे उलट आहे. बाबाला पटतं. खरंतर तो मी म्हटलेलं काहीही पटवून घेतो, हेही खरंच. कितीही पटलं नाही तरी.

म्हणाली, उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तर शिकायला लागेलच ना? हं. गाडी आली परत रुळावर. पण माझी पूर्वपुण्याई (की पूर्व"पुण्या"ई?) थोर म्हणून काही दिवस तरी गाडी यार्डातच राहील.

एकंदरीत काय तर सध्या ऑफिसमध्ये काम कमी होत चालल्यामुळे मजा, घरी कौतुक होतंय म्हणून मजा. सगळी मजा. पण कुठेतरी काहीतरी आतमध्ये जळतंय, सगळ्यांच्याच. माझ्याही. नव्या जगाची भीती, जुनं सोडायची हुरहूर. कदाचित लग्न होताना पण असंच वाटत असेल. नक्की. पण सध्या लगीन नव्या नोकरीच, मग जमलं तर माझं...

- संवादिनी

Thursday, April 10, 2008

नोकरी आणि भिजलेली रात्र

मिळाली. शेवटी मिळालीच.

गेल्या आठवड्यात लिहिलं नाही, पण नव्या नोकरीची बोलणी जवळ जवळ जमत आलेली होती. ह्या आठवड्यात ऑफर लेटर आलं. खूप छान वाटतंय. म्हणजे दहादा नाही ऐकल्यावर, दोन तीन वेळा नाही म्हटल्यावर, हो ऐकून, हो म्हणायचा आनंद काही वेगळाच असतो ना? तसा काहीसा आनंद झालाय मला.

कालच ऑफिसमध्ये सांगितलं. आमचा बुटकोबा तर एकदम सेंटीच झाला. म्हणाला, अभी मेरेसाथ कॉफी पिने कौन जायेगा? तशी काय मी त्याच्याबरोबर रोज नाही जायचे पण कधी कधी खूप वैताग आला सगळ्याचा की मला घेऊन जायचा कॉफी प्यायला. सगळ्या जगाला शिव्या घालायचा आणि मग शांत व्हायचा. त्याला माहीत होतं की मी इथली गोष्ट कधीही तिथे करणार नाही. आपल्याला काय, फुकट ते पौष्टिक. कॉफी आणि ऑफिसच्या पॉलिटिक्सचं ज्ञान फुकट कोण नाही म्हणेल?

त्याला सांगितलं, मग डिपार्टमेंट हेड कडे जाऊन रीतसर राजीनामा वगैरे दिला. आपण कुणीतरी मोठ्ठे झालोत असं वाटलं. त्यांनी विचारलं का चाललीस. काय उत्तर द्यायचं? का चालले? सूख खुपलं? अहं, असं काही मी बोलले नाही. मी सांगितलं, पगार चांगला आहे. आपली कंपनी पण छान आहे, पण तेवढा पगार नसता मिळाला म्हणून सोडतेय. खोटंच सांगितलं. पगार चांगला आहे, पण पगारासाठी नाही मी नोकरी सोडली. माझं आभाळ शोधण्यासाठी सोडली.

मग सगळ्या ऑफिसमध्ये बातमी पसरली. एकेक फोन यायला लागले. त्याचाही आला. मिशीवाल्याचा. ऑल द बेस्ट म्हणाला. काहीबाही बोलत गेला. पण त्याचं बोलणं काही डोक्यात गेलंच नाही. फक्त तो बोलत असल्याचा फील.

नेहमीची टेप लावायची. कुठली कंपनी, काय रोल, कुठलं शहर? मग पुणं म्हणून सांगितलं की मग तू एकटी राहणार? आमच्यासाठीपण बघा ना काहीतरी नव्या कंपनीत, इथपर्यंतच्या गप्पा. दिवस मोठा मजेत गेला.

घरी जायला निघाले, तेव्हा मात्र हुरहूर लागली. बरोबर पाच आठवडे राहिले. पाच आठवड्यांनंतर मी ह्या इथे येणार नाही. कुठेतरी दुसरीकडे जाईन. पण जग बदलणार नाही. तसंच राहील. लोकं ऑफिसात येतील, आपली कामं करतील आणि घरी जातील. मी मात्र इथे नसेन. माझा डेस्कही असेल, कॉमही असेल आणि तिथे दुसरंच कुणीतरी? छे, ही कल्पनाच असह्य आहे.

घरी पोचले. कालपासून घरी तशी शांतताच आहे. मी पुण्याला जाणार महिन्यांनी म्हणून. बाबाला मी म्हटलं, काय शोकसप्ताह वगैरे साजरा करताय का? नुसताच हसला. तो असा हसला ना की मला खूप वाईट वाटतं. खूप बिचारा वाटतो तो. बाबा. मुलगी जायला तर नकोय पण अडवायचं पण नाहीये अशी काहीशी हतबलता. काहीच बोलला नाही. मग मीच मुघल ए आझम ची सीडी लावली. ऐकत राहिला डोळे मिटून.

कधी नव्हे ते आत जाऊन आईला मदत केली थोडी. बाबापेक्षा आई ठीक वाटली. म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलंय की मी जाणारे म्हणून. मग पोळ्या लाटल्या. अर्ध्या आईने पुन्हा लाटल्या. पण आमटी मात्र मीच बनवली. आता माझा स्वैपाक मलाच करायला लागेल ना ह्यापुढे?

आणि आज चक्क मी बनवलेल्या आमटीचं विन्यानी तोंडभरून कौतुक केलं. जेवणं झाली. नेहमीच्या गप्पा काही रंगल्या नाहीत. बाबा तर गप्प गप्पच होता. विन्या फुटकळ बोलत होता पण त्यालाही म्हणावा तसा उत्साह नव्हता. आई तर काय कामातच असते नेहमी ती तशी होतीच.

झोपायच्या आधी देवाला नमस्कार करायला गेले. म्हटलं बरोबर निर्णय घेतलाय ना? मला कोण उत्तर देणार? पाठी विन्या उभा होता. म्हणाला ताई तू आता अतिरेकी होणार पुण्याला जाऊन. आता मी कुणाशी भांडणार? कुणाच्या कुरापती काढणार? आय विल मिस यू यार.

आय विल मिस यू टू.

बिछान्यावर पडले तर झोप लागेना. खूप रडायला आलं. खूप खूप. सगळं आठवलं, माझा रिसल्ट, सेलेब्रेशन. बाबा तर अक्षरशः नाचला होता. आईच्या कंपनीत नोकरी, वेगळी वेगळी ऑफिसेस, आमचा बुटकोबा, मोठे सर, नवखी मी, रुळलेली मी, निराश मी, उत्साही मी, माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेय ही नोकरी. आणि तीच कापून दूर करायची?

पूर्ण रात्र भिजून निघाली.

- संवादिनी

Wednesday, April 2, 2008

मी आणि पिंपळपान

मी का लिहिते?

.....................................................................................

ऐलतीराच्या कुशीला, माझ्या काळजाचा ठाव
उगवतीच्या दिशेला, माझा जीवलग गाव

तिथे सोनेरी सकाळ, चढे चंदेरी दुपार
मन फिरे रानोमाळ, नाही काळजी चकार

बाबा मोठा तालेवार, त्याचा चिरेबंदी वाडा
माय मायेची फुंकर, दारी प्राजक्ताचा सडा

दृष्ट पडावी कुणाची, असा सखा भाऊराया
चौकोनी गुणांची, माझ्या वाड्याची हो माया

वाड्याच्या अंगणाला, आहे पिंपळाचं धन
आल्या गेल्या दिवसाला, एक पिंपळाचं पान

चोपडीत हो सारीलं, एक पिंपळाचं पान
एक पिंपळाचं पान, माझं तन मन धन

.....................................................................................

कदाचित माझं लिहिणं म्हणजे पिंपळपानं जपण्याची गरज असेल. हातात असलेलं निसटून चाललंय ही हतबलता असेल. मुठीत वाळू कधीच राहत नाही मला माहितेय. प्रयत्न वाळू पकडण्याचा नाहीये. प्रयत्न कधीतरी वाळू हातात होती ह्याची आठवण ठेवण्याचा आहे.

मी मनात येईल ते इथे लिहिते, कारण खऱ्या आयुष्यात खरं आणि स्पष्ट बोलण्याची ताकद माझ्यात नाही. मग भागवून घेते एक हौस, खरंखुरं बोलण्याची, प्रांजळ बिंजळ लिहिण्याची.

ही गरज शब्दात पकडणं कठीण आहे. कलाकाराला अव्यक्त राहण्यासारखी शिक्षा नाही. अव्यक्त व्यक्त करण्याची गरज म्हणून मी लिहिते. पण गंमत अशी की अव्यक्त ते व्यक्त करण्याच्या भानगडीत मी स्वतः अधिकाधिक अव्यक्त होत जातेय. कोंबडी आधी की अंडं? मी की माझ्या आयुष्यातलं अव्यक्त? माझ्यासाठी मी गौण आहे. माझ्या आयुष्यातलं अव्यक्त महत्त्वाचं आहे, म्हणून लिहिते, स्वतःला संवादिनीच्या सुरात लपवून.

उद्या खरंच भविष्य आलं वर्तमानात, तर उघडेन मी माझी चोपडी आणि पाहीन माझ्या गावातल्या पिंपळाचं विटलेलं, जराजर्जर पिंपळपान. हिरवेपणा हरवला असेल कदाचित पण तिथल्या सोनेरी सकाळी, चंदेरी दुपारी, चिरेबंदी वाडा आणि प्राजक्ताचा सडा तरी नक्कीच दिसतील त्या पानाच्या वृद्ध शिरांमध्ये.

कुठेतरी एखादी हास्याची लकेर, कुठे डोळ्यात ओघळलेला एखादा अश्रू, कुठे एखादा जमलेला मालकंस, एखादा विश्वासघातकी ब्रूटस, कधी एवढं एवढंसं झालेलं मन, हे सगळे हायलाईटस आहेत माझ्या आयुष्याचे. ते रेकॉर्ड करून ठेवावे आणि कधी निवांत रिप्ले करून बघता यावेत, म्हणून लिहिते. मी कशी आहे ह्याची आठवण व्यवहारी जगात कुठे गेलीच हरवून, तर ती इथे सापडेल, म्हणून मी लिहिते.

पण नकळतंच ह्या लिहिण्याला नवी किनार प्राप्त झालेय. कुणीतरी ते वाचण्याची. लिहिण्याला सुरुवात केली तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की कुणी हे वाचेल. कुठल्यातरी गजबजलेल्या हिडीस शहरातल्या एका कोपऱ्यातल्या खुराड्यात घडणारी गोष्ट, कुणाला वाचावीशी वाटते, बरं वाटतं. एका कोणत्याही सामान्य कुटुंबासारखं असावं असं आमचं कुटुंव. त्यातल्या आईला, विन्याला, बाबाला आणि मलादेखील थोडं ग्लॅमर प्राप्त होतं ह्या ब्लॉगवर म्हणून लिहिते.

अगदी जसं घडतं तसं. माझ्या गावातल्या पिंपळाच्या पानासारखं.

माझा खो यशोधराला

आणि मला खो दिल्याबद्धल थँक यू गं, जास्वंदी!

- संवादिनी

Thursday, March 27, 2008

मी आणि माझं आभाळ

काल अजून एक इंटरव्ह्यू झाला. हल्ली आठवड्याला एकदोन होतायत त्यामुळे त्याबद्धल काही लिहिण्यासारखं नाहीच आहे. हल्ली इंटरव्ह्यू वाढलेत ह्याचं कारण म्हणजे, मी, मुंबईच हवी, ही माझी नोकरीची अट कमी केलेली आहे. गेलाबाजार पुणं तरी मिळावं एवढीच अपेक्षा आहे. तसं लांब जायला काही हरकत नाही, पण पुण्यावरून कसं? कधीही घरी पळता येईल. नाही म्हटलं तरी मराठी. चेन्नई, कलकत्त्यापेक्षा कधीही जवळचं वाटतंच.

गेले बरेच दिवस ह्या विषयावर आमच्या घरी चर्चासत्र घडत होती. म्हणजे मी एकटीने जाऊन नोकरीसाठी परगावी राहावं का? आई म्हणे अजिबात नको. हल्ली काय एकेक ऐकायला येतं? तिच्यावर हल्लीच्या नव्या हिंदी सिनेमांचा प्रचंड परिणाम झालाय. आपली मुलगी वाईट संगतीला तर नाही ना लागणार ही तिची भीती.

बाबांनी तरी माझी बाजू घ्यावी की नाही? तेही नाही. ते म्हणे, उद्या तुझं लग्न होणार आणि मग तू जाणार तोपर्यंत तरी तू इथे राहा. उद्या लग्न कुठल्या शहरात होईल माहित नाही. मग तेवढा सहवास मिळेलच असं नाही. मला एवढा राग आला ना त्यांचा. नेहमीसारखं बोलणंच बंद केलं मी. फक्त कामापुरतं. त्यांना बहुतेक वाईट वाटलं.

विन्या म्हणे सुंठीवाचून खोकला गेला. म्हणाला जायचंच असेल तर परदेशी जा. हे पुणंबिणं नको. पुणं तेथे सगळंच उणं. स्कूटर चालवता येणार नाही रस्त्यात म्हणाला. अतिरेकी बायकांसारखे बुरखे घालून स्कूटर चालवायला लागेल.

असं तिघांनी मिळून नकारघंटाच लावली.

आताशा मला वाटायला लागलंय की थोडं स्वतंत्र व्हायला हवं. म्हणजे घरात मला कसली बंदी आहे असं नव्हे. पण आपलं एक वेगळं आभाळ असावं असं प्रत्येकाला वाटतंच ना. स्वप्नांचे पंख लावावेत आणि द्यावं झोकून. सोडावं आपलं गाव, आपलं घरटं. उडावं उंचच उंच. अर्थात घरट्यावरचं प्रेम त्यामुळे कमी होणार नाहीच. पण नवे अनुभव, नव्या शक्यता, जबाबदाऱ्या, प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स. सगळं कोरं करकरीत नवं हवंय.

मग मी काय केलं? वाद घालणं बंद केलं आणि तडक आजीचं घर गाठलं. आजीचं घर म्हणजे मामाचं घर. आईची आई. बाबांची आई कधीच गेली. तिचं आभाळ अजून वेगळं. तर आजीकडे गेले. सगळ्यात मोठी नात म्हणून आजीची मी लाडकी आहे.

तिला सांगितलं. तिसऱ्या जनरेशन चे प्रॉब्लेम्स, दुसऱ्या जनरेशनला कळत नाहीत, पण पहिल्या जनरेशनला कळतात हे कसं काय? तिला माझं म्हणणं पटलं. लगेच फोन लावला तिने आईला आणि चांगली ओरडली. आईला लग्नाआधी नोकरी करायची होती. दादा नाही म्हणाले. तेव्हा, आता मी जशी भांडतेय, तशी ती आजीशी आणि दादांशी भांडली होती.

एकदा हाय कमांडनी आदेश काढला की मग आमच्याकडे काही चालत नाही. आजी हो म्हणाली आणि सगळा विरोध मावळला.

घरी गेले नंतर तर आई बाजूला घेऊन म्हणाली. हे बघ, आजी म्हणतेय म्हणून मी तुला परवानगी देतेय. पण उद्या भलतीकडे कुठे नोकरी मिळाली तर सांभाळून राहा. वाईट मित्रमंडळींपासून दूर राहा. लहान वयात काही कळत नाही काय चांगलं काय वाईट ते. दोनदा विचार कर काहीही करण्याआधी. मला खुदकन हसायला आलं. म्हटलं आई अजून मला कोणीही नोकरी दिली नाहीये. अत्तापासूनच एवढी चिंता. खरंच जायला लागलं तर काय होईल?

विन्या पुन्हा म्हणाला. ते पुणं सोडून काहीही बघ हं ताई. तू अतिरेकी आहेस, पण अतिरेकी दिसलीस तर जाम वाईट वाटेल मला.

बाबांना मनातून माझं पटलं होतंच. त्यांनी चक्क मला इंटरनेटवर सॉरी कार्ड पाठवलं. खाली लिहिलं होतं.

"उडणाऱ्या पिलाचे पंख बांधून ठेवल्याबद्दल पिलाच्या बाबाकडून सॉरी"

- संवादिनी

Thursday, March 20, 2008

मी, ती आणि फुलपाखरू

लाटा. भरती आणि ओहोटीच्या. म्हणजेच का आयुष्य?

एक दिवस येतो. उनाड फुलपाखरासारखा. वाटतं आपणही फुलपाखरू व्हावं. ह्या फुलावरून त्या फुलावर जावं. शोषून घ्यावा सगळा मध. फुलपाखराचं आयुष्य ते किती? दोन दिवस? मग ह्या दोन दिवसात पर्वा कुणाची करायची आणि का? आपण आपल्या मस्तीत जगावं आणि आपण आपल्या मस्तीत मरावं.

आपण मरावं? खरंच आपण मरू का? सगळं जग मर्त्य आहे हे माहित आहे. पण मीसुद्धा? हो खरंच मीसुद्धा. मग मी घाबरावं का मरणाला? सगळेच मरणार. कुणाच्या मरणाला घाबरायचं मी? माझ्या? का?

आप मरे जग बुडे.

आपण मेलो तर संपलंच ना सगळं. मग भीती कुणाच्या मरणाची. इतर फुलपाखरांच्या?

दुपरचे दोन वाजलेत. मी ऑफिसला गेलेच नाहीये. प्रचंड उकडतंय. शरीराला आणि मनालाही. वरचा पंखासुद्धा हैराण वाटतोय ह्या उकाड्यानं. बाबा घरी नाही. आईसुद्धा नाही. बाबा गेलाय तयारी करायला. आई त्यांच्याकडे. विनय त्याच्या कामाला गेलाय.

ते एक वेगळं फुलपाखरू. जग बुडलं तरी काही फरक पडायचा नाही त्याला.

आणि मी इथं बसलेय काहीही न करता. माझ्याच तंद्रीत. आठवणींची जळमटं झाडत बसलेय. आठवणींना जळमटं म्हणायचं का? किती जवळच्या असतात काही आठवणी. पण जळमटंच. ज्या आठवणी रडू आणतात, त्या जळमटांसारख्याच झाडून टाकायला हव्यात. मी त्वेषाने झाडू फिरवतेय, पण जळमटं काही तुटेनात. उलट मीच त्या जळमटांत गुरफटंत चाललेय. असह्य होतं सगळं

आणि मग, ती असहायता बाहेर पडते, एक थेंब बनून, डोळ्यातून. एक मग दुसरा मग तिसरा.

आई मला बोलवायला येते. माझी असहायता कुणाला दिसू नये म्हणून मी त्या तिघांना पुसून टाकते. बाहेर जाते.

अंगणामध्ये गर्दी असते. त्यात बाबाही असतो. विनूही असतो. तो दिसल्यावर मला उगाचंच बरं वाटतं. तपशील पुसट होत जातात. डोळ्यांच्या काचांवर धुकं जमतं. आई बाजूलाच असते. जरा आधार वाटतो. खरा मला बाबा हवा असतो कारण मला रडायचं असतं मनसोक्त. पण तो खाली अंगणात असतो. काहीबाही काम करीत.

राम बोलो भाई राम.

संगीतात आकंठ बुडून जाणारी मी, ह्या खर्जातल्या सुरांनी विषण्ण होते.

तिला घेऊन जात असतात. तीच. माझी कुणीही नसलेली ती. शांत झोपलेली असते. सगळ्या विवंचनेतून सुटलेली. एखाद्या फुलपाखरासारखी.

रांगणाऱ्या मला पटकन कडेवर उचलून घेणारी ती, दुपारी दंगा करून तिची झोपमोड केली म्हणून मला ओरडणारी ती, तिच्या मुलाला भाऊबिजेला राखी बांधते म्हणून माझं कौतूक करणारी ती, माझ्यासाठी न चुकता वांग्याची भाजी आणून देणारी ती, दोन दात बाहेर काढून प्रेमळपणे हसणारी ती, कुणाच्या लग्नात मुलाकडची असूनही मुलीची पाठवणी होताना रडणारी ती, प्रेमळ ती, घाबरट ती, शरणागत ती.

शेवटच्या आजारात हॉस्पिटलमध्ये असाहाय झालेली ती आणि तिची असहायता माझ्या डोळ्यात उतरवणारे ते तीन पुसलेले थेंब.

मी बघत राहते. पांढरं कोरं करकरीत कापड. इतकं करकरीत की बांबूत घुसवताना करकरणारं. करकचून बांधलेली सुतळ. अबीर, बुक्का, फुलांच्या माळा. डोक्याला लावलेलं ठसठशीत कुंकू. आणि ती जायला निघते.

पुन्हा ते कर्णकर्कश संगीत. तिचा मुलगा पुढे. बाबा चटकन पुढे होतो एक बाजू पकडतो. एवढा पहाडासारखा कणखर माझा बाबा, पण त्याच्याही एका डोळ्यात पाणी चमकतं. त्याच्या मोठ्या बहिणीसारखी ती.

ती निघून जाते. आई बायकांच्या घोळक्यात सामील. मी तिथेच. एकटी.

फुलपाखरू पण एकटं.

दोन घटका सगळीकडे सामसूम असते.

बाहेरून गोड खिदळण्याचा आवाज येतो. मी बाहेर जाते. तिची नात जोरजोरात खिदळत असते. दोन वर्षाची ती. तिला काय समज?

तेही एक फुलपाखरू. मीही. बाबाही, आईही आणि विनयही. सगळेच. बांबू बांधणारे, पांढरं कापड करकरवणारे, अबीर बुक्का सांडणारे आणि ते कर्णकर्कश्श संगीत म्हणणारे.

आणि सगळे एकटे.

- संवादिनी