Thursday, October 8, 2009

अपूर्ण

सध्या इथे छान हवा आहे. ना धड उन्हाळा, ना धड थंडी. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा. पानगळ होऊन फांद्यांचे सांगाडे उरलेल्या झाडांना पुन्हा नवी पालवी फुटायला लागली आहे. पुन्हा एक नवा उभार, पुन्हा एक नवा उत्साह आणि मग पुन्हा एक पानगळ. निसर्गाचं चक्र पूर्ण फिरलेलं इथे पहिल्यानेच पाहतेय. उन्हाला अजून नकोसा उष्मा चिकटला नाहीये आणि वाऱ्याला आलेली बोचरी धार बोथट होत चालली आहे. कधी मध्येच सदासर्वदा अंगात अडकवलेला स्वेटर बाजूला फेकून जरा मोकळ्या ढाकळ्या कपड्यात बाहेर जायचा उत्साह वाटायला लागलाय.

झापड लावून कॅलेंडरवरचे दिवस ढकलणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही निसर्गातला हा बदल इतका जाणवावा तर पशू पक्ष्यांची काय कथा? हल्ली सकाळी उठले की खिडकीबाहेर ऊन खात पडलेल्या बागेचं दर्शन होतं. आमच्या घराच्या बाहेरच रस्त्यावर एक मोठं झाड आहे. आणि झाडावर ह्या ना त्या पक्ष्यांचा अड्डा नेहमीच बसलेला.

इथले कावळ्यासारखे दिसणारे पण काळे पांढरे मॅग्पाय पक्षी फार. कधी पोपटासारखे रंगीबेरंगी पक्षी. कधी गवतातले किडे खात लॉनवर इथून तिथे फिरणाऱ्या टिटव्या, तर कधी कबुतराच्या कुळातले वाटणारे काही पक्षी झाडावर हमखास ठेवलेले. बऱ्याच दिवसांनी सगळी नातवंड एकत्र घरी आली की आमचे आजो (म्हणजे आजोबा) व्हायचे तसं वाटतं ह्या झाडाकडे बघून. अगदी अंजारून गोंजारून सगळ्यांना आपल्या फांद्यांवर खेळवतं ते झाड. बाहेर जाताना किंवा बाहेरून येताना उगाचच हात त्या झाडाला लागतात. आपलं काही मिळाल्याचा आनंद होतो.

तर हल्ली सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग येते. मग दात घासायच्याही आधी आमच्या ह्या अजोबाचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आज कोण कोण आलंय ते पाहिलं की मग दिवसाची सुरुवात काय मस्त होते. गेले काही दिवस मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत कुठे तरी हरवून गेल्यासारखं वाटलं. म्हणजे कधी कधी गाणं चालू असताना तबला उतरल्यावर कसा बेसुरा वाटतो, तसंच.

घरून काम करण्याचा एक फायदा म्हणजे हवं तिथे बसून काम करता येतं. मी हल्ली मुद्दामच झाडाच्या समोरच्या खिडकीत जाऊन बसते. दुनयाभरच्या आकडेमोडीने आणि मेलामेलीने डोकं विटलं की पटकन समोर आजोबा नातवंडांचा निर्व्याज खेळ पाहता येतो. परवा अशीच बसले होते तर एक गोष्ट लक्षात आली. झाडावर फक्त मॅग्पाइज होते. बाकी सगळे पक्षी एकतर लॉनवर नाहीतर शेजारच्या झाडावर होते. पहिल्याने वाटलं हवाबदलासाठी दुसरीकडे बसले असतील. मग लक्षात आलं मामला थोडा गंभीर होता.

झाडाच्या बेचक्यांत घरट्यासारखं काही दिसलं. दुर्बीण काढून बघितलं तर होयकी, मॅग्पाइजनी चक्क घरटं बांधलं होतं. इतर सर्व पक्ष्यांना आजोबांवरून त्यांनीच उडवलं होतं. त्यांच्याच दादागिरीमुळे किलबिलाटातलं संगीत वगैरे हरवून बसलं होतं. आता काय नवीनच चाळा लागला. घरटं बघत राहणं आणि काही विशेष घडतंय का ते पाहणं.

एक दोन दिवस असेच गेले. मी बाहेरून घरी येत होते आणि नेहमीसारखा माझा हात झाडाकडे वळला अन काय झालं काही कळलं नाही एकदम कावळ्यासारखा रागीट ओरडण्याचा आवाज आला आणि एक मॅग्पाय चक्क वरून माझ्याकडे येत असलेला पाहिला. मला वाटलं हा माझ्या डोक्यावर आपटणार, पण तेवढं न करता फक्त डोक्याला वारा घालून तो निघून गेला. त्याचा तो अवतार बघून मी प्रचंड घाबरले आणि अंगणात पळाले. डेव्ह आजोबांनी माझी ही गंमत पाहिली. ते म्हणाले की पक्ष्यांनी घरटं बांधलंय आता ते ओव्हरप्रोटेक्टिव्ह होतात, माणसांसारखेच.

झालं, तेव्हापासून जरा लांबूनच. मॅग्पायभाऊ आणि मॅग्पायीण्वहिनींना धोकादायक वाटणार नाही अशा अंतरावरून येणं जाणं आणि दुर्बिणीतून घरटं बघणं चालू होतं. साधारण आठवडा झाला असेल. थोड्याच दिवसात बाळ मॅग्पाय जन्माला येणार होतं. माझ्या नवऱ्याला ह्यात भारी उत्साह. तो अगदी रोज न चुकता मला अपडेट विचारायचा.

शनिवार सकाळ झाली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. जन्मात पहिल्यानेच पडायला मिळतंय असा तो पंधरा मिनिटं पडला. हंतरुणात पडल्या पडल्या पावसाचा आवाज छान वाटत होता. थोड्या वेळाने पाऊस सरला आणि लख्ख ऊन पडलं. मी उठले आणि नेहमीसारखं खिडकीतून घरटं पाहिलं. घरटं तसंच होतं पण मॅग्पायभाऊ आणि वहिनी बहुतेक विकली शॉपिंग करायला गेले होते. दुपारी परत पाहिलं तर चक्क झाडावर इतर नेहमीचे पक्षी बसलेले. काय झालं कळेना. संध्याकाळी बाहेर पडलो तर झाडाखाली अंड्याची टरफलं दिसली. नुसती टरफलं.

मी म्हटलं झाडावरून पडली अंडी. पिलं व्हायच्याआधीच गेली. नवरा म्हणाला नाही पिलं झाली असतील नाहीतर नुसती टरफलं नसती पडली. विचारणार कुणाला? झाडाला विचारलं असतं त्याला उत्तर देणं शक्य असतं तर.

हल्ली सकाळ किलबिलाटानंच होते. मीही खिडकी उघडून बघते छान ऊन पडलेलं असतं. निरनिराळे पक्षी बागडत असतात. त्यात एखादा मॅग्पाय बघितला की उगाचच ती टरफलं आठवतात.

ना नात्याची ना गोत्याची, पण ही अपूर्ण गोष्ट मात्र कधीच पूर्ण होणार नाही.

Thursday, October 1, 2009

सीमोल्लंघन

परवा दसरा झाला. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ह्याचं महत्त्व. हा साडेतीन मुहूर्त हा काय प्रकार आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे वगैरे मला अजूनही माहीत नाही. पण दसऱ्याला बरीच लग्न दर वर्षी लागत असतात हा मुख्य मुद्दा. लग्नानंतरचा पहिला दसरा. लग्नानंतरचे पहिल्या वर्षीचे जे काही सण आहेत ते सगळे आमचे इथेच व्हायचेत. म्हणजे थोडक्यात जी काही पहिल्या सणाची मजा असते ती हुकलेय.

माझ्या घरी म्हणजे माहेरीपण दसऱ्याचं काही वेगळं महत्त्व नव्हतंच. घरच्या घरी साधी पूजा, दुपारी पणशीकरांचे श्रीखंड, मग मस्त झोप आणि संध्याकाळचा घरीच करायचा टाइम पास. ह्यात गप्पा, गाणी ते नुसतंच बसून राहणं सगळं सगळं आलेलं. जग कसं बदलतं. मी आणि माझा भाऊ आणि आई बाबा असं आमचं चौरस घर. प्रत्येकाचा कोपरा वेगळा, पण दुसऱ्यांच्या कोपऱ्यांकडे बघत उभा असलेला. प्रत्येकाचं महत्त्व तेच नेमकं, नव्वद अंशाचं आणि त्यावर घराचा तोल बरोबर सांभाळलेला. चौरसाचा त्रिकोण आणि त्रिकोणाची सरळ रेषा कधी झाली हे कुणालाच समजलं नाही. असेच काहीसे डिप्रेसिंग विचार येत राहिले.

तसं काम होतंच, त्यामुळे दिवस कसा गेला कळलं नाही. पण नेमकं नवऱ्याला कामानिमित्त बाहेरगावी जायला लागलेलं. एवढ्या मोठ्या घरात एकटी मी. बरं इथल्या घरांची गंमत आहे. लाकडी असल्याने मधून मधून करकरल्याचे आवाज येतात. आणि ते आवाज मोजत मोजतंच माझी रात्र जाते. झोपायचं राहूनंच जातं. कधी एखादा पोसम छपरावर येऊन आपलं नृत्यकौशल्य दाखवतो तर कधी घोंघावणारा वारा माझी झोप उडवतो. खूपच बोर झालं. मग सरळ फोन उचलला आणि आजीला फोन लावला.

भारतातही खूप असं कंटाळवाणं वाटलं की मी सरळ आजीकडे जायचे. आजी म्हणजे आईची आई. तिच्या घरी दुपारच्या सुमाराला जायचं आणि तिला चहा करायला सांगून मस्त चहा पिता पिता गप्पा ठोकायच्या असं कित्येक वेळा केलंय. अगदी परीक्षेच्या दिवसात तर खासंच. कारण दुपारी इतकी झोप यायची की स्कूटी काढून थेट आजीकडे.

फोन केला बराच वेळ गप्पा मारल्या. तिला म्हटलं असं सणाच्या वेळी खूप कंटाळा येतो वगैरे वगैरे. तर म्हणे कशी, तुझ्या आजोबांची नात शोभतेस. ते आणि आजी त्यांच्या कोंकणातल्या गावातून इकडे आले. आजोबांना सतत आठवण यायची गावाची, घराची, थोडीशी शेती होती त्याची. आंब्यांची, फणसांची, नारळी, फोफळीच्या झाडांची. आंब्यांना तर त्यांनी नावं दिली होती एकेक. नावानेच बोलायचे आंब्यांबद्दल. इतका जिव्हाळा होता आणि एकदम सगळं सोडून मुंबईला आले. म्हणाली तुमचं तरी दुसरं काय आहे. कोंकणातून त्या काळी मुंबईला येणं म्हणजे आजच्या काळी परदेशी जाण्यासारखंच होतं. त्यांनी तेव्हा सीमोल्लंघन केलं, तुम्ही आता केलं.

हो म्हणाले. पण एक विचित्र विचार घुमत राहिला डोक्यात. माणसं सीमोल्लंघन का करतात? दसरा आहे म्हणून? नसलेलं काही मिळविण्यासाठी? काही सिद्ध करण्यासाठी? पूर्वीच्या काळी राजे रजवाड्यांनी हेच केलं. आम्हीही आता हेच करतोय. पण का? कशासाठी? असे प्रश्न त्यांनी आणि आम्ही विचारलेत का? कधी वाटतं आपण उगीच हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो. कधी वाटतं, प्रवाही असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नक्की काय बरोबर? काय चूक? आमच्या कक्षांच्या सीमा ओलांडून साजरा केलेला दसरा अधिक चांगला की घरच्यांसोबत पणशीकरांचं श्रीखंड खाऊन साजरा केलेला अधिक चांगला? असले बेसिक पण उत्तर न देता येणारे प्रश्न पडतात. तेव्हाही तसंच झालं.

बराच वेळ अशी वैचारिक लंगडी घातल्यावर एकदाची झोप लागली. पण झोप लागते न लागते तोच मोबाईल खणखणला. त्रासानेच उचलला, पण बरं झालं उचलला, भावाचा होता. मग झोप विसरून खूप वेळ गप्पा मारल्या. त्याला म्हटलं काय रे दसरा कसा साजरा केलास? म्हणाला ताई, चिल. दसराच साजरा करायचा असता तर भारतातच राहिलो नसतो का? म्हणाला व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण. म्हटलं हुश्शार आहेस तू.

पण मला पटलं त्याचं थोडंसं. हे हॅविंग केक आणि इटिंग इट टू सारखं झालं. विच इज ऍन ऍबस्युल्युट इंपॉसिबिलिटी.

सीमा न ओलांडता सीमोल्लंघन करता येत नाही हेच खरं.

मग एकदम शांत झोप लागली.