Showing posts with label समस्या. Show all posts
Showing posts with label समस्या. Show all posts

Thursday, February 19, 2009

शॉर्टकट

लग्न म्हणजे एक रोलर कोस्टर राइड आहे. बरंचसं सुख आणि त्याला दुःखाची किनार. म्हणजे नवऱ्याचा विरह संपल्याचा आनंद आणि घरापासून दूर गेल्याचं दुःख. पार्टनर मिळाल्याचा आनंद पण स्वातंत्र्य गेल्याचं दुःख. शेअर करता येतंय हा आनंद पण अवलंबी झाल्याचं दुःख. कधी भेटला नाही असा उधाणलेला समुद्र आणि त्याने अस्ताव्यस्त केलेला किनारा. समुद्राच्या उधाणाचा आनंद, किनारा अस्ताव्यस्त झाल्याचं दुःख. कधी कधी मला वाटतं हे सगळ्यांचंच होतं की हा माझाच प्रॉब्लेम आहे? सुख नाही असं नाही, पण दुःख नाही असंही नाही अशी काहीशी विचित्र परिस्थिती.

जाऊदे. नवा भिडू, नवं राज्य. माझा मुंबईचा मुक्काम संपत आला. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कामावर रुजू होईन. परका देश परके लोक आणि एकटी मी. इथेसुद्धा फिफ्टी फिफ्टी आहे. आपल्या लोकांपासून दूर जायचं हे दुःख पण सासरी राहण्याचं जे अवघडलेपण आहे, त्यातून सुटका होण्याचा आनंद. कदाचित मी खूप सेल्फ सेंटर्ड वगैरे वाटत असीन. पण स्वतःचं विश्व निर्माण करताना होणारे कष्ट अपार आनंद देऊन जातात. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात सामावून जाण्यातले कष्ट खूप त्रासदायक आहेत.

हे सगळं सांगावं तरी कुणाला? आईला सांगितलं तर आई म्हणणार मुलीच्या जातीला हे सगळं करावंच लागतं. नवऱ्याला ह्याची डेप्थ समजणार का? त्याच्या दृष्टीने त्याचं विश्व चांगलंच आहे. आणि चांगलं आहेच. वाईट काहीच नाहीये, पण ते माझ्या विश्वापेक्षा खूप वेगळं आहे म्हणूनही त्रास होऊ शकतो ते त्याला कसं पटवायचं? हा अनुभव आल्याशिवाय कळावं तरी कसं किती अवघड आहे हे सगळं? म्हणून त्याला काही बोलत नाही. बाबाला सांगावं खूप वाटतं पण त्याच्या डोक्याला त्रास नको म्हणून नाही सांगत. जीवाभावाच्या मैत्रिणीही आता जवळ राहिल्या नाहीत की उचलला फोन आणि बोललं तासभर. एकंदरीत सुखमय शोक किंवा शोकमय सुख असं काहीसं आयुष्य झालंय.

पण लवकरंच ते बदलेल. तिथून निघतानाचा विमानतळावरचा उत्साह इथून निघताना नक्कीच नसेल. का कुणास ठाऊक, भारत सोडताना मी नेहमी भावुक होते. विमान उडाल्यावर मुंबईचे दिवे, झोपड्या ढगाआड जाईपर्यंत बघत राहते. पुन्हा कधी दिसाल? असं त्यांना विचारत राहते. ह्या वेळी नवऱ्याचा विरहही सोबतीला असेल. गंमत आहे. सोबत नसली म्हणजे होतो तो विरह आणि अशा विरहाचीही सोबत. निदान दोन अडीच महिनेतरी सोबतीला राहीलच तो.

पुन्हा तिकडे गेल्यावरचं काम, एकटेपण, कंटाळा, सगळं सगळं डोळ्यासमोर दिसतंय. मी जेव्हा शाळेत होते अगदी लहान असताना तेव्हा वाटायचं आज जोरात पाऊस पडूदे आणि शाळा बुडूदे. तसंच काहीसं वाटतं, काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि रद्दच व्हावं जाणं. मग समोर दिसतो एक डोंगर, माझ्यासारख्या कित्येकींनी चढलेला. स्वतःला दुसऱ्या एका साच्यात कोंबायचा.

मग एक मन पळपुटं होतं. म्हणतं जाऊदे तो डोंगर, पळायची संधी मिळतेय, पळ काढ. मग एकदम खूप खूप उदास वाटतं. मनापासून प्रमाने वागवणारे सासू सासरे, मी त्यांच्यात स्वतःला सामावून घ्यावं अशी रास्त अपेक्षा बाळगणारा नवरा. ह्यांचा आपण कुठेतरी अपेक्षाभंग करतोय असं वाटत राहतं. एक न्यूनगंडही येतो. आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खरंच त्रास होण्याची गरज नाही, पण आपल्यालाच तो होतो, म्हणजे आपणंच कुठेतरी चुकतो आहोत. असा.

जाऊदे, सध्या तरी जे जमत नाही त्याला सामोरं जाण्याऐवजी त्याला पाठ दाखवण्याचा शॉर्टकट मी घेतलाय. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघता येईल. सध्या शोवटच्या काही दिवसातली मुंवई आणि नवरा मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करतेय.

- संवादिनी

Thursday, February 12, 2009

नो प्रॉब्लेम

नवऱ्याचं ऑफिस पुन्हा सुरू झालं. मला अजून पंधरा दिवस सुट्टी आहे. पण सुट्टीची अशी मजा येत नाहीये. उगाचच आपण सुट्टी घेऊन घरी बसलो असं फिलिंग येतंय. पण सुट्टी नाही तर मी मुंबईत राहू शकणार नाही. म्हणजे थोडा वेळ का होईना जो नवऱ्याबरोबर घालवता येतोय तेही जमणार नाही. सासरेही ऑफिसला जायला लागले. त्यांचं खरंतर सतत काम चालूच होतं घरूनही पण आता ऑफिसला जायला लागलेत. सासूबाई घरीच असतात आणि सूनबाईही.

खूप छान आहेत त्या म्हणजे सासू ह्या संस्थेच्या पारंपरिक इमेजला पूर्ण विरुद्ध आहेत. मला स्वैपाकात गती नाही हे त्यांना माहिती आहे. पण मला जास्त सला वगैरे देत नाहीत. त्या करतानाच मला एकेक सांगत जातात की असं केलं तर असं होतं तसं केलं तर तसं होतं. तुझं चूक माझं बरोबर असा ऍटिट्युड नाहीये. बऱ्याच गोष्टी आमच्यापेक्षा जरा वेगळ्या करतात त्या. पण मी त्यांना तसं भासवून देत नाही.

एकदा
पिक्चरला पण घेऊन गेल्या, त्यांच्या मैत्रिणींबरोबर. मला एवढं ऑकवर्ड झालं होतं. पण काय सांगा? कधी कधी असं वाटतं सुट्टी वाया चाललेय. आई बाबांची भेट होत नाही आणि नको त्या (सासूबाई नव्हे, त्यांच्या मैत्रिणी) लोकांबरोबर वेळ घालवावा लागतोय.

अर्थात आठवड्यात दोन वेळा घरी जाऊन आलेच. माहेरी जाण्याची मजा काय आहे ते आता कळतंय. सासरी भिजल्या मांजरीसारखी असणारी मी घरी पोचले की मस्त अघळ पघळ पसरते. दुपारी गेले तर आई नसतेच, पण बाबा असतो. मग काय? आपल्या राजकन्येसाठी राजा चहाही बनवायचे कष्ट घेतो. अगं हे घे, ते घे, कचोरी आणलेय मुद्दाम तुला आवडते म्हणून, गायवाडीतली नानकटाई आणलेय, आयडिअलचे वेफर्स आणलेत आणि काय नि काय. पोहे बनवू का? नाहीतर शिरा बनवतो, की परशुराम वाडीचा वडापाव आणू? असे असंख्य प्रश्न. मी त्याला म्हणते अरे जाऊदे रे, माझ्याशी गप्पा मार. मीच चहा बनवते आणि आपण मस्त ग्लूकोज ची बिस्किटं खाऊ.

लग्नाआधी आभाळ खाली आलं तरी चालेल किचन मध्ये जाणार नाही म्हणणारा बाबा चक्क मला चहा बनवू का म्हणून विचारतो ना, तेव्हा कसंसंच होतं. एकदम बिचारा वाटतो तो मला. आणि डोळ्यात पाणी येतं. मग एकमेकांपासून डोळे लपवायचा खेळ खेळायचा. तोपर्यंत आई येते. मग पुन्हा हे करू की ते करू सुरू होतं तिचं.

लग्नाआधी काढलेला आमच्या चौघांचा एक मस्त फोटो त्याने फ्रेम करून आणलाय. तो एक बदल झालाय. बाकी घर तसंच आहे. शेजारी पाजारीही तसेच आहेत. रहाटगाडगं चालतं आहे. गाडग्यातलं एक भांडं पडलं म्हणून इतरांचं काम थांबत नाही. त्रास फक्त त्या भांड्याला होतो आपण त्या चक्रात नाही म्हणून.

एकदा मी आणि आई होतो तेव्हा आई सांगत होती, बाबाला बिलकूल करमत नाही. मग जुनं कुठलंतरी रेकॉर्डिंग काढून बसेल, नाहीतर फोटो बघत बसेल. खरंतर तिलाही करमत नसणार, पण ती कबूल करणार नाही.

संध्याकाळी दोघंच एकटे घरी असताना काय वाटत असेल त्यांना? मुलगा इथे आहे पण तोही बाहेर जायचं म्हणतोय, मुलीचं लग्न झालेलं, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं. तानपुरा नसलेला माझा कोपरा, रिकामं झालेलं माझं कपाट, आईने हौसेने माझ्यासाठी आणलेल्या काही बाही वस्तू. सगळं सगळं आठवतं आणि खूप खूप रडायला येतं. पण आदर्श सूनबाईच्या कर्तव्यात सतत हसतमुख राहणे हेही येतंच. मग कढ आवरायला लागतात, आवंढे गिळायला लागतात.

मग
तो बांध कधीतरी बाथरुमच्या भिंतीआड फुटतो किंवा रात्रीच्या अंधारात नवऱ्याच्या शर्टाची बाही भिजवून जातो. त्याला वाटतं काही प्रॉब्लेम आहे का?

पण त्याला कसं समजावणार की काहीही प्रॉब्लेम नसूनही प्रॉब्लेम्स असतातच..

- संवादिनी

Thursday, October 9, 2008

To be or not to be..

To be or not to be, that is the question;
Whether 'tis nobler in the mind to suffer
The slings and arrows of outrageous fortune,
Or to take arms against a sea of troubles,
And by opposing, end them. To die, to sleep;

जगावं की मरावं हा एकंच सवाल. जगाच्या उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळीचा तुकडा होवून जगावं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर?

अजून आठवतं. सहा वर्षाची असेन मी तेव्हा. हे स्वगत सुरू झालं की मला एकदम रडायलाच यायचं. मी विंगेत असायचे. बहुतेक माझ्या एंट्रीला थोडा अवकाश पण असायचा. पण विसरून जायला व्हायचं आपण कोण ते. एकदम खरीच आजोबांची ढमी झाले असं वाटायचं आणि आपल्या आजोबाचं हे काय झालं म्हणून डोळ्यात पाणी यायचं. नाटकातल्या आईचा आणि बाबांचाही खूप खूप राग यायचा. खरंतर मला ते काम करायला मिळालं कारण नाटकातल्या माझ्या आईबाबांची मी खरी खुरी मुलगी होते. पण तरीही मला राग यायचाच. माझ्याच आई बाबांचा.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, शेक्सपिअरला वेगळ्या अर्थाने पडलेला हा प्रश्न, मला आज वेगळ्या अर्थाने पडतो आहे.

आपण का लिहितो असा प्रश्न कधी कुणीतरी विचारला होता. तेव्हा मी लिहिलं होतं की मला माझं आयुष्य डॉक्युमेंट करून ठेवायचंय म्हणून मी लिहिते. पण आज बऱ्याच दिवसांनी कुठेतरी मनातून कळतंय की मी खरंच का लिहिते. लिहिता लिहिताच मी कशी आहे हे थोडंसं मलाही उलगडायला लागलेलं आहे. त्यात सगळ्यात लख्खपणे मला जाणवली ती माझी व्हल्नरॅबिलिटी. ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द मला सुचला नाही. मी अतिशय व्हल्नरेबल आहे. आणि ते वारंवार ह्या ब्लॉगवर उघडही झालेलं आहे.

पण बाहेरच्या जगात आपली व्हल्नरॅबिलिटी उघड झाली तर चालेल का? नाही. जग ही एक मोठी पॉलिटिकल जागा आहे. आपण सगळेच तिथे एक मुखवटा घेऊन वावरत असतो. मीही एक मुखवटा घेऊन तिथे वावरते. तो मुखवटा एका धीट, कॉन्फिडंट, गो गेटर मुलीचा आहे. ते नाटक मी योग्यतेने पार पाडते. कुणाला पत्ता देखील लागू देत नाही माझ्या व्हल्नरॅबिलिटीचा. म्हणजे माझा जो पिंड आहे तो मी दडपून टाकते. माझी सेन्सिटिव्हिटी पुरून टाकते आणि मग उरते एक भयाण ठसठस. ज्वालामुखीची. ती ठसठस आणि हा ब्लॉग ह्याचा खूप गहिरा संबंध आहे.

आपण जे आहोत तसं वागण्याचा बोलण्याचा हा एक प्रयत्न आहे असं आज मला वाटतं. ती व्हल्नरंबिलिटी, जी मी कुणाकडेच उघड करू शकत नव्हते, ती मी इथे उघड करत राहिले. ती माझी गरजच बनली. वाचकांना ती आवडायला लागली. हो. व्हल्नरॅबिलिटीच. म्हणजे माझ्या व्हल्नरॅबिलिटिचं ग्लोरिफिकेशन इथे व्हायला लागलं. तेही मला आवडायला लागलं. तुमचे सल्ले, तुमच्या कमेंट्स ह्यांची मी ऍडिक्ट बनले. पण ह्या सगळ्याचा पायाशी होती ती मनातली ठसठस, जी दडपण्यासाठी एक मुखवटा मी घातला होता बाहेरच्या जगात. आणि गंमत म्हणजे ती उघड करण्यासाठीही मी एक मुखवटा घातला संवादिनीचा.

पण आता माझ्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मी त्याला भेटणं, त्याने मला विचारणं आणि माझा होकार हे सगळं ह्या ब्लॉगने पाहिलं. पण आता जेव्हा मला तो मिळाला आहे. त्याच्यापासून लपवण्यासारखं काही नसावं अशी एक इच्छा आहे आणि अपेक्षाही आहे. ह्याचाच अर्थ ही व्हल्नरॅबिलिटी उघड करायची संधी मला ह्यापुढे मिळत राहील.

आतापर्यंत लिहिण्याचं मोटिव्हेशन जे होतं ते यापुढे नसेल. मग मी लिहीत राहावं की थांबावं?

टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन.

- संवादिनी

Thursday, September 18, 2008

सिंदबाद, द्रौपदी आणि तिठा

काम नसण्याचा प्रचंड कंटाळा कधी तुम्हाला आलाय? मला सध्या भयंकर कंटाळा येतोय, काहीच करायला नसण्याचा. तसा म्हणायला माझा दिवस इथे साडेचारच्या ठोक्याला सुरू होतो. पहाटेच्या साडेचारच्याच. बरोबर साडेचाराला "थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले" चा गजर सुरू होतो. हे गाणं साधारण दोन ते तीन वेळा ऐकल्यावर मी उठते आणि जो काही वेळ उरला असेल त्या वेळात तयार होऊन आमची स्कूल बस पकडायला धावते. स्कूल बस म्हणजे आम्हाला ऑफिसला नेण्यासाठी कंपनीने दिलेली व्हॅन.

मी इथे फक्त एक महिना आहे. दोन आठवडे झालेत आणि दोन आठवडे अजून आहेत. मला स्टॉप गॅप म्हणून इथे पाठवलं असल्याने मला कुणी काही काम दिलेलंच नाही. मग माझं काम म्हणजे मदतनिसाचं. कुणाला काही मदत हवी असेल तर ती करायची. नको असेल तर लोकसत्ता, म. टा., जीटॉक ह्यांच्या साहाय्याने वेळ काढायचा. पण हे सगळं चालतं साधारण दहा वाजेपर्यंत. साडेदहाला ट्रेनिंग सुरू होतं. आणि माझं सो कॉल्ड कामही.

तुम्ही टी. व्ही वरचे गेम शोज बघत असाल तर तुम्हाला माझा रोल साधारण लक्षात येईल. त्यांनी नाव दिलंय असिस्टंट ट्रेनर. पण जसं टी. व्ही. वर गेम शोजमध्ये मार्क सांगायला, उगाचच हसायला आणि नुसतंच इथे तिथे मिरवायला एक सुंदरी ठेवलेली असते, तसंच काहीसं माझं काम (सुंदर वगैरे नसूनही). म्हणजे असिस्टंट असल्याने मेन ट्रेनर ट्रेनिंग देतो. (मुळात मला येतंय कुठे काही दुसऱ्याला शिकवायला? ). माझं काम ट्रेनिंग मटेरिअल वाटणं, एक्सरसाइज शीटस वाटणं आणि इन जनरल अडल्या नडलेल्याला मदत करणं. तेही सगळं ठीक आहे. पण खरी गोची तर पुढे आहे.

ट्रेनर म्हणून मला स्टेजवर बसायला लागतं. पहिला अर्धा पाऊण तास लोकं लक्ष देऊन ट्रेनिंग घेतात. मग इथे तिथे बघायला लागतात. जांभया देतात. लोकांना जांभया देताना बघून मलाही भरपूर जांभया येतात. पण इतक्या लोकांसमोर आपल्याच कंपनीच्या ट्रेनरच्या ट्रेनिंगमध्ये जांभया तरी कशा देणार?

माझंही ट्रेनिंगमधलं लक्ष उडतं आणि विचारांचं चक्र सुरू होतं. काय म्हणून मी इथे आहे? हेडकाउंड? कंपनीला एका माणसाला असिस्टंट म्हणून बसवलं की पैसे मिळतात म्हणून? इथपासून ते समोर बसलेल्या एखाद्या अरबाने पांढऱ्या च्या ऐवजी पिंक झगा घातला आणि डोक्याला फ्लोरोसंट रिंग घातली तर तो कसा दिसेल इथपर्यंत.

मध्ये एक लंचचा म्हणून ब्रेक असतो. म्हणजे अनॉफिशिअल. रमादान मध्ये इथे बोलायलाही तोंड उघडताना भीती वाटते, खाण्याचं सोडाच. एक पँट्री आम्हा काफरांसाठी उघडी ठेवलेली असते. तिच्यात सगळ्यांनी कोंडून घ्यायचं. दरवाजा घट्ट लावायचा आणि आपापले डबे काढायचे. सख्त ताकीद अशी की जेवणाचा वास येईल असं काहीही आणायचं नाही. म्हणजे पाव आणि त्यात जे जे काही घालता येईल ते. मी भारतातून आणलेले बेसनाचे लाडू अजून संपले नाहीयेत. मी रोज लंचला एक लाडू, एक फळ आणि मेथीचे ठेपले खातेय. मला सॅड्विच खाऊन भयंकर वीट आलाय.

यथावकाश आमचं काम संपतं. साधारण साडेतिनाला आमची स्कूलबस परत येते. घरी नेऊन सोडते. मग संध्याकाळी आम्ही कॉर्निशला फिरायला जातो. कॉर्निश म्हणजे इथला मरीन ड्राइव्ह. मस्त वाटतं. संध्याकाळ झाली की थोडा गारठा पण वाटतो. पण अंधार पडायच्या आत आम्ही घरी येतो. मग तिथे खूपच गर्दी वाढते. म्हणजे उपास सुटल्यावर. घरी आलो की जेवण. ते झालं की मात्र मी माझ्या खोलीत पळते.

घरी फोन करते. बाबा असतोच. कधी विन्या असतो. आईला सध्या खूप काम आहे तिला रोज उशीर होतोय. उशीरा फोन केला तरी ती कधी कधी भेटत नाही. बाबा मला दिवसभरात घडलेलं सगळं सगळं सांगतो. मग मीही सांगत राहते ट्रेनिंगच्या गमती जमती. रमादान ची गंमत. आमच्या बिल्डिंगमध्ये इफ्तार होता त्याला गेलेले त्याची मजा सांगितली. सगळं झाडून खाल्लं. खाल्ल्यावर विचारायचा प्राणी कोणता होता म्हणून. बाबाला सगळं सांगते पण आईला नाही सांगत. तिला उगाच चिंता लागून राहणार मुलीचा धर्म बुडाला म्हणून.

घरचा फोन झाला की त्याला मिस्ड कॉल द्यायचा. मग तो फोन करतो. तो खास उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबतो, कारण फोन फुकट. मग मी आणि तो खूप वेळ बोलत राहतो. बाबाला ऐकवलेली टेप पुन्हा त्याला पूर्ण ऐकायला लागते. तो ऐकायला वाघ आहे. मी कितीही बडबड केली तरी त्याला अजिबात कंटाळा येत नाही. तो फार बोलत नाही. पण नेमकं बोलतो. विचार करायला लावणारं बोलतो. कधी मला गाणं म्हणायचा आग्रह करतो. मीही जास्त आढेवेढे न घेता एखादं छानसं गाणं म्हणते. मग मी त्याला गाणं म्हणण्याचा आग्रह करते आणि तो ऐकतोही. हम दिल दे चुके सनम मधल्या वनराज सारखं थेट. पण मला आवडतं त्याचं गाणं. निदान म्हणतो तरी.

रोज रात्री आयुष्य असं तिठ्यावर येऊन थांबतं. आपण सगळेच असतो कधी ना कधी एखाद्या तिठ्यावर उभे? दोन वाटा समोर दिसत असतात आणि दोन्हीही आकर्षक, हव्या हव्याश्या वाटणाऱ्या. एक वाट सिंदबादची असते. धाडसाने भरलेली, जग दाखवणारी, आव्हानात्मक, स्व जोपासणारी आणि दुसरी वाट असते स्वार्पणाची, स्व विसरायला लावणारी, द्रौपदीची, सीतेची, समर्पणाची. स्व जोपासणं ही जशी माझी गरज आहे तशीच विरघळून जाणं हीदेखील माझी गरज आहे. विचारात झोप विस्कटून जाते आणि पुन्हा "थोडी सागर निळाई" सुरू होते.

मग मी पुन्हा घाईने उठते. उठताना फक्त मनाला एकंच समजावते.

विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू ह्या वळणावर, ह्या वळणावर..

- संवादिनी

Thursday, May 29, 2008

आनंदीआनंद आणि मी

मैत्री कशी, कुठे, कुणाशी व्हावी काय सांगता येतंय? पुण्यामध्ये आले तेव्हा मित्र कॅटेगरीमध्ये असणारी एकही व्यक्ती नव्हती. आल्यापासून शोधत होते मैत्र. पण ती काय चण्याची डाळ आहे की गेले किराणा दुकानात आणि घेतली एक किलो? तसंच माझं झालं. शोधत राहिलं की मिळत नाही आणि ध्यानीमनी नसताना अलगद पदरी पडतं.

आगाऊपणे मला बंगाली का? म्हणून विचारणारा तो. तो नको, फारच रुक्ष वाटेल सतत तो म्हटलं तर. एखादं छानसं नावच देऊन टाकूया त्याला इथल्यापुरतं. काय बरं? हं, आनंद म्हणूया. तर मला हा आनंद भेटला. मुंबईचा, मराठी आणि मराठीत बोलायची अजिबात लाज न वाटणारा. मग झालीच की मैत्री. ह्याला म्हणायचं काखेत कळसा आणि गावाला वळसा. बरं माझ्या समोरच बसतो तो. म्हणजे मध्ये क्यूबिकलची भिंत आणि पलीकडे तो. पण कळलाच नाही मला तो. भिंती, कमी असलेली अंतरं किती वाढवून टाकतात ना?

कंपनी असली आणि ती चांगली असली तर किती बरं वाटतं ना? नाहीतर एकटीने जा चहाला, सहसा एकटी नाहीच पण इतरांच्याबरोबर गेलं तरी मला एकटंच वाटायचं. आपल्याला नाही ब्वा रस, नव्या टेक्नॉलॉजीच्या गप्पा ठोकण्यात. त्यापेक्षा मस्त एखाद्या पुस्तकावर बोलावं. झालंच तर गाणं आहे, कविता आहेत. त्यामुळे माझं आणि आनंदचं जमतं. तो अजिबात कामाबद्दल बोलत नाही. स्वतः कलाकार आहे असं नाही, पण आवड आहे. विचारत राहतो, हे कसं करता, ते कसं करता, पडदा कसा पडतो, विंग कशाला असतात. फुटकळ प्रश्न, पण मला माझ्या कंफर्ट झोनमध्ये असल्यासारखं वाटतं.

आणि बरं मुंबईचा आहे, पण पुणं सगळं पाठ आहे. मग काय सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हादडणे आणि भटकणे हा कार्यक्रम चाललाय. परवाच आम्ही वैशाली मध्ये गेलो. मस्त आहे हं. म्हणजे मुंबईच्या दही बटाटा पुरीची चव नाही त्या एसपीडीपीला पण हेही नसे थोडके. अजून दोनतीन ठिकाणी जाऊन आले. युनिव्हर्सिटी खूप छान आहे. ओशो पार्कपण आवडला. घरी टीव्ही नाही. मग करायचं काय? भटका. आता कायनेटिकही आहे. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालतो.

हे झालं ऑफिसमधलं. गेल्या आठवड्यापासून एक नवा उद्योग सुरू केलाय. माझ्या बाबांचे एक मित्र आहेत इथे. सहज बोलत बोलता ते असं म्हणाले की ते सकाळी बॅडमिंटन खेळतात. मी लगेच त्यांना विचारलं मी येऊ का म्हणून? ते म्हणाले जरूर. तिथे जायला सुरवात केलेय. ह्या वेळी मुंबईहून येताना माझी जुनी रॅकेट विथ नवं गटिंग घेऊन आलेय. गेले दोन दिवसतरी रेग्युलर आहे. आता पाहूया किती दिवस चालतं हे फॅड.

माझ्या बाबांचे मित्र म्हणजे माझ्या वयाचं कोणी त्यांच्या बरोबर खेळत नसणारंच. पण पहिल्याच दिवशी त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी ओळख झाली. तीही रोज खेळते पण ह्या लोकांबरोबर नाही. त्यांचा ग्रुप वेगळा. असली गट्टी जमलेय ना तिच्याशी की सांगायची सोय नाही. म्हणजे आम्ही भेटून दोनच दिवस झालेत असं वाटतंच नाही. काल तिच्या घरी गेले होते. अगदी माझ्या घरीच गेल्यासारखं वाटलं. काका काकू, तिचा भाऊ आणि ती. एकदम घरचीच आठवण झाली. पण आताशा आठवणी येऊन मन उतू जात नाही. आठवण येते तशीच जाते.

तर असे हे माझे दोन नवे मित्र. आनंद, आणि तिला आनंदी म्हणूया. कारण माझ्या लिखाणात नक्कीच ह्या दोघांचा पुन्हा पुन्हा उल्लेख होणारे. नशीब माणसाला कुणा कुणाची भेट घालून देतं बघा. मी कुठे होते? हे दोघं कुठे होते? आम्ही भेटलो कसे? आणि आम्ही एकमेकांचे मित्र झालो कसे? आता त्यांच्या मित्रांशी ओळख होईल, ते माझे मित्र होतील आणि मैत्र वाढत जाईल. कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं कोण जाणे.

ऑफिसमध्ये काम नाही, सहज एकदा जीटॉक उघडून बसले होते, तर एका ब्लॉगरने हॅलो केलं, त्याच्याशी थोडा वेळ बोलले तर अजून एका ब्लॉगमैत्रिणीने हॅलो केलं, जितका वेळ ऑनलाईन राहिले तितका वेळ एकेक लोकं भेटत गेले. खूप छान वाटलं. आपण ज्या लोकांचं लेखन वाचतो, त्या लोकांशी बोलताना त्यांचे वेगळे पैलू सापडतात असं वाटलं. वेळ इतका छान जातो. आपण एकटे आहोत ही भावनाच विसरायला होते. हे आणखी एक मैत्र.

मुंबईला ह्या वेळी मुद्दाम सकाळी आमच्या नाना नानी ग्रुपला आणि माझ्या समुद्राला भेटायला गेले. जग्गू नाही भेटले. खरं मला त्यांना खूप सांगायचं होतं, कसं काय झालं पुण्याला आणि मी कसं मॅनेज केलं ते. खूप खूश झाले असते. त्यांना फोन केला. गुडघे दुखतायत म्हणाले. पुढच्या आठवड्यात भेटून येईन. आईलाही जरा बरं नव्हतं. सर्दी खोकला आणि तपासारखं वाटत होतं. पण आता बरंय म्हणाली फोनवर.

एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागलेय आताशा की माझी एक्सक्लूसिव्ह विश्व तयार व्हायला लागलीत. मुंबईचं विश्व वेगळं, पुण्याचं वेगळं, पुण्याला ऑफिसचं वेगळं, ऑफिसआधीचं वेगळं, ऑफिस नंतरचं वेगळं, आणि घरी गेल्यावर माझ्या एकटीचं एक अजूनच वेगळं विश्व. पूर्वी ह्या सगळ्यात एक सुसूत्रता होती. पण आता म्हणजे मीच माझ्या वेगवेगळ्या विश्वात वेगवेगळी वागायला लागलेय असं वाटतं. अगदी नाटकातल्यासारखं. प्रसंगाला अनुरूप. कप्पे आहेत हवाबंद. ह्या भागाचा त्या भागाशी संबंध नाही आणि त्याचा ह्याच्याशी.

का?

- संवादिनी

Thursday, March 27, 2008

मी आणि माझं आभाळ

काल अजून एक इंटरव्ह्यू झाला. हल्ली आठवड्याला एकदोन होतायत त्यामुळे त्याबद्धल काही लिहिण्यासारखं नाहीच आहे. हल्ली इंटरव्ह्यू वाढलेत ह्याचं कारण म्हणजे, मी, मुंबईच हवी, ही माझी नोकरीची अट कमी केलेली आहे. गेलाबाजार पुणं तरी मिळावं एवढीच अपेक्षा आहे. तसं लांब जायला काही हरकत नाही, पण पुण्यावरून कसं? कधीही घरी पळता येईल. नाही म्हटलं तरी मराठी. चेन्नई, कलकत्त्यापेक्षा कधीही जवळचं वाटतंच.

गेले बरेच दिवस ह्या विषयावर आमच्या घरी चर्चासत्र घडत होती. म्हणजे मी एकटीने जाऊन नोकरीसाठी परगावी राहावं का? आई म्हणे अजिबात नको. हल्ली काय एकेक ऐकायला येतं? तिच्यावर हल्लीच्या नव्या हिंदी सिनेमांचा प्रचंड परिणाम झालाय. आपली मुलगी वाईट संगतीला तर नाही ना लागणार ही तिची भीती.

बाबांनी तरी माझी बाजू घ्यावी की नाही? तेही नाही. ते म्हणे, उद्या तुझं लग्न होणार आणि मग तू जाणार तोपर्यंत तरी तू इथे राहा. उद्या लग्न कुठल्या शहरात होईल माहित नाही. मग तेवढा सहवास मिळेलच असं नाही. मला एवढा राग आला ना त्यांचा. नेहमीसारखं बोलणंच बंद केलं मी. फक्त कामापुरतं. त्यांना बहुतेक वाईट वाटलं.

विन्या म्हणे सुंठीवाचून खोकला गेला. म्हणाला जायचंच असेल तर परदेशी जा. हे पुणंबिणं नको. पुणं तेथे सगळंच उणं. स्कूटर चालवता येणार नाही रस्त्यात म्हणाला. अतिरेकी बायकांसारखे बुरखे घालून स्कूटर चालवायला लागेल.

असं तिघांनी मिळून नकारघंटाच लावली.

आताशा मला वाटायला लागलंय की थोडं स्वतंत्र व्हायला हवं. म्हणजे घरात मला कसली बंदी आहे असं नव्हे. पण आपलं एक वेगळं आभाळ असावं असं प्रत्येकाला वाटतंच ना. स्वप्नांचे पंख लावावेत आणि द्यावं झोकून. सोडावं आपलं गाव, आपलं घरटं. उडावं उंचच उंच. अर्थात घरट्यावरचं प्रेम त्यामुळे कमी होणार नाहीच. पण नवे अनुभव, नव्या शक्यता, जबाबदाऱ्या, प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स. सगळं कोरं करकरीत नवं हवंय.

मग मी काय केलं? वाद घालणं बंद केलं आणि तडक आजीचं घर गाठलं. आजीचं घर म्हणजे मामाचं घर. आईची आई. बाबांची आई कधीच गेली. तिचं आभाळ अजून वेगळं. तर आजीकडे गेले. सगळ्यात मोठी नात म्हणून आजीची मी लाडकी आहे.

तिला सांगितलं. तिसऱ्या जनरेशन चे प्रॉब्लेम्स, दुसऱ्या जनरेशनला कळत नाहीत, पण पहिल्या जनरेशनला कळतात हे कसं काय? तिला माझं म्हणणं पटलं. लगेच फोन लावला तिने आईला आणि चांगली ओरडली. आईला लग्नाआधी नोकरी करायची होती. दादा नाही म्हणाले. तेव्हा, आता मी जशी भांडतेय, तशी ती आजीशी आणि दादांशी भांडली होती.

एकदा हाय कमांडनी आदेश काढला की मग आमच्याकडे काही चालत नाही. आजी हो म्हणाली आणि सगळा विरोध मावळला.

घरी गेले नंतर तर आई बाजूला घेऊन म्हणाली. हे बघ, आजी म्हणतेय म्हणून मी तुला परवानगी देतेय. पण उद्या भलतीकडे कुठे नोकरी मिळाली तर सांभाळून राहा. वाईट मित्रमंडळींपासून दूर राहा. लहान वयात काही कळत नाही काय चांगलं काय वाईट ते. दोनदा विचार कर काहीही करण्याआधी. मला खुदकन हसायला आलं. म्हटलं आई अजून मला कोणीही नोकरी दिली नाहीये. अत्तापासूनच एवढी चिंता. खरंच जायला लागलं तर काय होईल?

विन्या पुन्हा म्हणाला. ते पुणं सोडून काहीही बघ हं ताई. तू अतिरेकी आहेस, पण अतिरेकी दिसलीस तर जाम वाईट वाटेल मला.

बाबांना मनातून माझं पटलं होतंच. त्यांनी चक्क मला इंटरनेटवर सॉरी कार्ड पाठवलं. खाली लिहिलं होतं.

"उडणाऱ्या पिलाचे पंख बांधून ठेवल्याबद्दल पिलाच्या बाबाकडून सॉरी"

- संवादिनी

Thursday, January 31, 2008

मी आणि भविष्याचं भूत

गेल्या आठवड्यात उगाचंच उदास उदास वाटत होतं. कशामुळे? काही कळलं नाही. कदाचित नव्या वर्षात तो एकदाही दिसला नाही म्हणून असेल. पण त्याच्यामुळे मी उदास व्हायचं काहीच कारण नाही. मग काय झालं?


कदाचित काहीच झालं नाही म्हणून असेल. जेपींनीही मला विचारलं, काही बिनसलंय का म्हणून, जग्गूंनीही विचारलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विन्यानी सुद्धा विचारलं. बाकी दोघांचं ठीक आहे पण बाळराजे त्यांच्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन चक्क माझी चौकशी करतात म्हणजे खासच.


हा बाळराजे शब्द माझा नाही बरं का. नुकतीच मिलिंद बोकिलांची "शाळा" वाचली. अगदी गेल्या रविवारी वाचायला घतली आणि सोमवारी रात्री दोन वाजता संपली. त्यातल्या त्या मुलला त्याची बहीण बाळराजे म्हणते, मला तो शब्द आवडला. उचलला. मुळात ते पुस्तकंच आवडलं. कधी कधी वाटलं शिरोडकर म्हणजे मीच, अगदी शेवटी हुरहूर लावणारी गोष्ट आहे. खरंतर कुणीतरी हीच गोष्ट शिरोडकरची म्हणून लिहायला हवी. मी नक्की वाचेन.


सध्या एकंदरित पुस्तकांचा दुष्काळ आहे. आईला सध्या मासिकं वाचायचं वेड लागलंय म्हणून पुस्तकं बंद. आमच्या लायब्ररीत सगळी इंग्लिश पुस्तकं आहेत. परवाच हिटलरच आत्मचरित्र आणलं. ओ की ठो कळत नाहीये. म्हणजे एक लाईन तीन तीन वेळा वाचल्यावर कळतंय त्याला काय म्हणायचंय ते. खरंतर फिलॉसॉफीचं पुस्तक वाटतंय ते. एवढा मोठा (आणि छोटाही) माणूस, ओरॅटर पण लेखन एकदम सपक वाटलं. की ही भाषांतरकाराची किमया? थोडं थोडं त्याचं म्हणणं पटलंसुद्धा. आपण नाही का युपी बिहार मधून आलेल्यांच्या नावाने शंख करत?


महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा बायो डेटा अपडेट करून टाकला. बघुया कॉल येतात का ते? जेपींना सांगितलं, तर ते म्हणाले कशी तुम्ही आजची मुलं, दोन वर्षात नोकऱ्या बदलता? त्यांनी फक्त एकाच ठिकाणी नोकरी केली आणि शेवटी कंपनीने नारळ दिला. असुदे, प्रत्येकाच्या निष्ठा असतात. त्यांची तिथे. आईला पण तिच्या कंपनीत वीस वर्ष होऊन गेली असतील. गमतीत आम्ही म्हणतो सुद्धा, बरेच चेअरमन आले आणि गेले पण त्यांची सेक्रेटरी एकच आहे वीस वर्ष. विन्या फक्त म्हणाला, ताई बदल बदल, नोकरी बदल, लोक बघ कुठे कुठे अमेरिका, युरोपला जातायत. तुलाही नक्की चान्स मिळेल.


खरंच मिळेल? म्हणजे एकटीने राहायचं, स्वतः सगळं मॅनेज करायचं. मदतीला आई नाही, सल्ला द्यायला बाबा नाहीत, खोड्या काढायला विनय नाही. माझा डेस्क नाही, मैत्रिणी नाहीत आणि....तोही नाही. ग्लॅमरस आहे पण तितकंच घाबरवणारं.


हं, कदाचित ह्याच्यामुळेच मला उदास उदास वाटतंय

Friday, December 28, 2007

प्राक्तन आणि चिल पिल

आमच्या चाळीत सध्या एक नवं खूळ आलंय. सकाळी काही ना काहीतरी व्यायाम करायचा. म्हणजे तसं हे सुरू होऊन तीन चार आठवडे झालेत पण किती दिवस टिकेल काय सांगा म्हणून आधी लिहिलं नाही.


आमच्या घरातल्या चक्क चारही लोकांनी भाग घ्यायचा ठरवला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या आठवड्यात बरेच आरंभशूर including विन्या बाद झालेले आहेत. आई घरच्या कामापुढे वेळ काढू शकत नाहीये आणि ते काम करतानच तिचा भरपूर व्यायाम होत असल्याने तिला फिरायला वगैरे जाण्याची गरज नाही हे तिला लक्षात आलंय. त्यामुळे राहता राहिले दोघं रिकामटेकडे सकळीक, जेपी (बाबा) आणि मी.


बरोब्बर सहा वाजता जेपी मला गदागदा हलवून घराबाहेर पडतात. त्या भूकंपसदृष्य अनुभवामुले मला उठावंच लागतं. मी साडेसाहाला बाहेर पडते. मग ते चर्चगेटला बसलेले असतात मी पॉइंटापर्यंत जाऊन येईपर्यंत बसतात आणि मग आम्ही एकत्र घरी.


जेपींचे बरेच मित्र आहेत तिथे. त्यांना उगीचंच माझी वाट पाहत बसायला लागतं. म्हणून हल्ली आम्ही वेगवेगळे येतो. त्याहीपेक्षा मला एक माझा ग्रूप मिळालाय. चार आजोबा आणि दोन आजी आणि मी. पॉइंटाला बसतात ते बऱ्याच वेळा. पाच दिवस रोज बघून हसायला लागले. सहाव्या दिवशी चक्क मला त्यांनी जिलबी खायला बोलावलं. बरोबर ओळखलंत. गुज्जूच. पण सगळे नाहीत दोन मराठी आजोबा आहेत. आणि जिलबी म्हणजे माझा weak point मग काय झाली दोस्ती


मस्त वाटतं त्यांना भेटून. आपलं बघा एक विश्व असतं. त्याला आपण चौकटी पाडून घेतो. विटांच्या भिंती बांधतो म्हणजे बाहेरचं काही दिसत नाही. कधी काही लोकं काचेच्या भिंती लावतात. पण डोळ्याला पट्टी बांधून घेतात. मलाही तसंच वाटलं त्यांच्याकडे बघून. आपण फार फार स्वयंकेंद्रीत वगैरे झालोय असं वाटायला लागलं मला. कामात बिझी असलेली मुलं, सुना, नातवंडं, आपल्या संसारात रमलेल्या मुली ह्यांना वेळ कुठाय ह्या जुन्या खोडांकडे बघायला? प्रत्येकाची काही व्यथा आहे. पण जिलबीच्या बकाण्यात दडपून टाकतात. मीही असं करेन का? म्हणजे जेपी, आई, लग्न झाल्यावर सगळ्यांना विसरेन का? माझ्याच जगण्यात मश्गुल होऊन जाईन मी?

बाबांना विचारलं, म्हटलं, बाबा तुम्हाला असं वाटतं का की नवी पिढी जुन्या पिढीकडे लक्ष देत नाही वगैरे. ते म्हणाले प्राक्तन आहे. तुम्ही आणि आम्ही वेगळे आहोत. वयाचा फरक आहे. वयामुळे विचारांत फरक आहे. माझ्या आणि माझ्या वडिलांच्यातही होता, त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्याही होता तेव्हा कदाचित त्यांनाही वाटलं असेल नवी पिढी नालायक आहे म्हणून. ते त्याचं प्राक्तन. आता हे आमचं प्राक्तन आणि वाईट वाटून घेऊ नकोस कराण उद्या असंच तुमचंही प्राक्तन असेल काहीतरी. मग काय करणार? त्याची सल मनात ठेऊन जगणार का आनंदाने जगणार?

सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणी म्हणत?


मला ते बोलले ते फरसं काही कळलं नाही पण शेवटचा प्रश्न कळला.

मी लगेच उत्तर दिलं गाणी म्हणंत. मग म्हणाले चल एक छानसं गाणं म्हणून दाखव. मग त्यांचं आवडतं उगवला चंद्र पुनवेचा म्हटलं.

पटलं. गाणी म्हणंतच जगायला हवं.

मग आईला विचारलं. आई म्हणाली, एकदम बरोबर आहे. हल्लीच्या पिढीला मोठ्यांबद्दल काही आदरंच राहीलेला नाही. आम्ही सांगतो ते तुमच्या भल्यासाठीच ना? तरीही तुम्ही काहीही ऐकत नाही. गाडी आता मी तिच्या, मी लग्न करण्याच्या, आग्रहाला दाखवलेल्या कात्रजच्या घाटाच्या अंगाने जातेय हे बघून मी तो विषय आवरता घेतला.

विन्याला पण विचारलं. विन्या म्हणाला ताई टेक अ चिल पिल. तुला हे काय झालंय? आर यू ओके?

उद्या आमच्या नाना नानी ग्रूपला हा प्रश्न विचारते.

Monday, November 5, 2007

खाज, सूख आणि बोच

दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष. किती दिवस मी हेच काम करत राहणार आहे? हा प्रश्न मनात अनेकवेळा येतो.

का? खरंतर वाईट असं काहीच नाहीये. म्हणजे कंपनी चांगली, पगार चांगला, बरेचसे लोकही चांगले, समुद्रकिनारी ऑफिस, चार्टर्ड अकौंटन्टला जितपत क्रिएटिव्ह जॉब मिळू शकेल तितपत जॉब. मग आणखी काय पाहिजे?

कॉलेजमधे असताना नाटकात कामं करायचे. दिवस रात्र केलेल्या तालमी. अजून आठवतं आय. एन. टी. च्या नाटकासाठी सिलेक्शन ला गेले होते. डिरेक्टरने माझी ऑडिशन न घेताच मला निवडली होती. आनंद आणि भीती. मलाच का सिलेक्ट केली एकही वाक्य न म्हणता? काही वेडंवाकडं तर नसेल ना डोक्यात त्याच्या? घाबरत घाबरतंच पहिल्या तालमीला गेले. पहिला उतारा वाचला आणि तो असा उचकला माझ्यावर? ज्या ज्या म्हणून शिव्या देता येत असतील त्या त्या दिल्या. अरे मुलगी म्हणून तरी जीभ आवरेल की नाही तुझी? ढसाढसा रडले होते मी. निघून आले तिथून. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले, पण पुन्हा कधीच रडले नाही. डिरेक्टर लोकं असतातंच सर्किट, त्यांना काही मनावर घ्यायचं नसतं.

वाटायचं आपण तर बाबा क्रिएटिव्ह फिल्ड मधे जाणार. आय.एन.टी., मग यवसायिक नाटक, मग मराठी सिरियल्स, मग हिंदी, जमलंच तर चित्रपट. शेखचिल्लीच्या गगन भराऱ्या दुसरं काय? कॉमर्स ला जाऊन क्रिएटिव्ह फिल्ड?

जहाँ पनांनी (म्हणजे बाबांनी) ऑर्डर काढली. सी.ए. इज अ मस्ट. मीही काय विरोध वगैरे केला नाही. कारण नाटक चालू राहणारंच होतं. अजूनही आहे. पण व्यवसाय म्हणून नाही. खाज म्हणून. खाज आल्यावर खाजवल्याने जेवढं समाधान मिळतं तेवढं अजूनही मिळतंच नाटकातून. पण मग ती ओढाताण. ऑफिसमधून सुटा ते तालमीला जा, मग उशिरा घरी. आई कावणार, JP कावणार नाहीत पण जरा लवकर येत जा सांगणार.

आणि दिवसा ऑफिसमधे बसून ह्या सगळ्याचा मी विचार करणार. जसा अत्ता करतेय. कामं राहणार आणि माझा बॉस मला शिव्या देणार. अता तो मला फायर करताना इतका विनोदी दिसतो. एक तर तो आहे पाच फूट. किडकिडीत. मला त्याच्या फायरिंग चं टेन्शन यायच्या एवजी हसायला येतं. मग तो मला विचारतो, हसायला काय झालं? मग मी सांगणार, प्लीज तू मला फायर करू नको, तुला ते जमत नाही. मग तो म्हणणार, उद्यापासून दोरीच्या उड्या मारतो, आणि चहाला घेऊन जाणार. म्हणजे तात्पर्य काय? तर काम काही होणार नाही.

असेच दिवस, अशीच वर्ष. लग्न झाल्यावर कदाचित शहर बदलेल. पण स्क्रीप्ट हेच राहणार ना? डेबिट व्हॉट कम्स इन ऍन्ड क्रेडिट व्हॉट गोज आऊट. क्रिएटिव्हीटीच्या दृष्टीने सगळंच तोट्यात.

मला असे गहन (मझ्या दृष्टीने) प्रश्न पडले की मी बाबांना विचारते. त्यांना कधी पडले होते का प्रश्न. ते म्हणाले सूख सुखासुखी मिळालं की टोचतं.

त्यांचं खरंही असेल. देवाच्या दयेने फार लवकर मला स्थिरता आली. नोकरीची पैशाची. मग सूख बोचायला लागतं का? की आयुष्यात काही थ्रील राहत नाही म्हणून ते बोचतं? माहीत नाही.

आहे काही उपाय?