Thursday, February 21, 2008

मँगलोर आणि मंजूनाथाची कृपा

आपल्याला वाटतं आपण एकटे असतो. कुणाचीतरी सोबत असावी असं वाटत असतं. पण ती सोबत खूप खूप दूर आहे हे माहीत असतं. सगळं कसं बेचव, निरस वाटत राहतं.

आणि कसल्या चाव्या फिरतात कोण जाणे?

आले मंजूनाथाच्या मना तेथे कोणाचे चालेना. अचानक वसंत बहरतो, कळ्यांची फुलं होतात, फुलांच्या सुगंधाने आसमंत दरवळतो, सूर्यसुद्धा शीतल वाटायला लागतो, दिवसा चांदण्यांची स्वप्न पडतायत की काय असं वाटायला लागतं. पण ते स्वप्न नसतंच मुळी. आपणंच आपल्या हाताला चिमटा काढून बघतो. आणि दुखलेल्या चिमट्याच्या वळातच आपल्याला सर्वाधिक सूख मिळतं. कारण जे अशक्य वाटत असतं ते घडतं.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

आता एवढंच. पुढच्या आठवड्यात मुंबईत आले की सविस्तर लिहिणं होईलंच.

Thursday, February 14, 2008

मी आणि बाबा

आपण ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडू शकतो असे थोडेच जण असतात. माझ्यासाठी माझे बाबा तसेच आहेत. खरंखरं सांगायचं तर मला आईपेक्षा बाबा जवळचे वाटतात. म्हणजे आई आवडत नाही असं नाही. पण बाबा इज समवन स्पेशल. लहानपणापासूनच मला त्यांचा ओढा जास्त. आरडाओरड्याचं काम आईचं. ती म्हणते तसा सगळा वाईटपणा तिनं घ्यायचा. आणि त्यावर मलम लावायला बाबा. त्यामुळे नाही म्हटलं तरी बाबांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाच.

पण ते आहेतच तसे. त्यांना काही चुकतंय असं वाटलं तर ते फक्त त्यांना तसं वाटतंय हे सुचवतात. कुणाची चूक आहे. कशी सुधारायची वगैरे निर्णय ते माझ्यावर सोपवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी केलेल्या चुका ते आम्हाला सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. स्वतःच्या चुका मान्य करणं किती कठीण आहे.

ह्या रविवारी मी दुपारी नाटकाच्या तालमीवरून आले. चहा पीत निवांत लोकरंग वाचत बसले होते. चार साडेचार झाले असतील. तर हे आले. उगाचच नाटक कुठपर्यंत आलंय वगैरे चौकश्या केल्या. मग म्हणाले चल पाणी पुरी खायला जाऊ. मी कशाला नाही म्हणतेय. आईला विचारलं, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणाली. विनयला क्रिकेट खेळायला जायचं होतं, त्यामुळे तो आला नाही.

सहा वाजता मी आणि बाबा गेलो बाहेर. पाणी पुरी खाल्ली, नेहमीप्रमाणे एक प्लेट झाल्यावर दुसरी अर्धी अर्धी खाल्ली. मग म्हणाले चल कॉफी पिऊ. म्हटलं चला. नेहमी मी म्हणते कॉफी कॉफी. आज हे म्हणतायत तर जाऊया. सीसीडी मध्ये गेलो. तिथे माझी मैत्रीण भेटली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि मी आमच्या तातांसोबत. जरा ऑकवर्ड झालं. का? माहीत नाही? कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल.

मी माझी नेहमीची ट्रॉपिकल आईस्बर्ग घेतली. थंडीचं कारण देत बाबांनी मलाच कोणती तरी गरम गरम कॉफी ऑर्डर करायला सांगितली. एकात एक विषय गुंफत त्यांनी तो माझ्या करिअर आणि लग्नावर आणून सोडला. मला कळलंच नाही. मी त्यांना सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधी करायचंय? म्हटलं माहीत नाही. मग हसत हसत म्हणाले, ठीक आहे.

उगाचच मला त्यांना त्या मिशीवाल्याबद्दल सांगावंसं वाटलं. मग विचार केला आता नको. अजून नीट ओळखही नाही त्याची. जाऊदे. मग मीच त्यांना त्यांच्या कॉलेजातल्या मैत्रिणींबद्दल विचारलं. तसं अनेकदा ऐकलंय पण बाबा सांगायला लागले की ऐकायला मजा येते. तेपण बिंधास्त एखाद्या मित्राला सांगावं तसं त्यांचं तरुणपण मला, विन्याला सांगतात.

एकंदरीत काय तर संध्याकाळ मजेत गेली. पण एक वॉर्निंग देऊनच. कारण जेव्हा बाबा कॉफी प्यायला घेऊन जातात आणि एखादा विषय काढतात. समजावं की आता खरंच काहीतरी ऍक्शन घेणं जरूरीचं आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांना काय म्हणायचंय हे बरोबर त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंच. त्यांच्या हसण्यातून. तिढा वाढत चाललाय. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही? सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.

आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेले तर एक मोठा धक्का. पुढच्या आठवड्यात मँगलोरला जायचंय कामाला. अजून मी ऑफिसच्या कामाला, शिवडी, वाशी आणि नरिमन पॉइंट सोडून कुठेही गेले नाहीये आता एकदम मँगलोर. तिथे म्हणे नवं ऑफिस सुरू झालंय तिथे ट्रेनिंग द्यायचंय. खरंतर आमच्या बुटकोबाला (साहेबाला) सांगितलं होतं जायला. पण तो साहेब असल्याने त्यांनी पार्सल मला पास केलं.
कोंकण रेल्वे ने जायचं हेच त्यातल्या त्यात बरं आहे. आम्ही चार जण आहोत आणि काही लोकं विमानानं येणार आहेत. आम्ही पडले तळा गाळातले कामगार म्हणून आम्ही रेल्वेने. पण कोंकणात जायचं तर विमानापेक्षा रेल्वेचीच मजा.

एकंदरीत वादळ गिरगावात आलं तरी मी मँगलोर ला असेन, त्यामुळे आनंदातच आहे.

पुढच्या आठवड्यात गुरुवारी मी तिकडे असेन. कदाचित ब्लॉग लिहिता येणार नाही. पण इंटरनेट मिळालं तर काहीतरी पोस्ट करीनच.

आणि हो. हॅपी व्हलेंटाईन्स डे!!

मला शिवसेना आवडते पण आज शिवसेना मुर्दाबाद! व्हॅलेंटाइन झिंदाबाद!

ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!



- संवादिनी

Friday, February 8, 2008

मी आणि माझी (न मिळालेली) नवी नोकरी

बायो डेटा वेबसाईट्वर टाकून दोन दिवस नाही झाले तर फोन यायला सुरुवात झाली. तसा नोकरी शोधण्याचा अनुभव मला शून्य. कारण CA झाल्या झाल्या ही नोकरी चालत आली. मीही जास्त विचार न करता जॉइन केलं. आठवडे, महिने, वर्ष झाली. तोच डेस्क, तेच चेहरे, तशीच कामं. अर्थात कुठे कंटाळवाणं झालं नाही. आधीचा बॉस जाम पिडू होता, पण हा बुटकोबा आल्यापासून मस्त चाललं होतं. नोकरी बदलायची इच्छाही कधी मनात आली नव्हती आणि सगळं सूख बोचलं म्हणून आता नोकरी बदलायची.


परवाच एक फोन आला इंटरव्ह्यू साठी. हाय हॅलो वगैरे झालं.


ती - आता बोलू शकतो का आपण?
मी - हो चालेल ना. (मला कधीही बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कामच नाहीये जास्त)
ती - जरा तुझ्या अनुभवाबद्दल सांगशील?
मी - बेडकीला जेवढं फुगता येईल त्या प्रमाणात माझा अनुभव अगदी फुलवून (की फुगवून) सांगितला
ती - वाह! फारंच छान!
मी - थॅंक यू (बऱ्याच थापा पचलेल्या दिसतायत)
ती - आता आमचे डोमेन एक्स्पर्ट तुम्हाला प्रश्न विचारतील.

मी - हो चालेल ना (मग ही का मला प्रश्न विचारत होती इतका वेळ? मरा, आता सगळ्या थापा बाहेर पडणार)
तो - एक अधिक एक किती? (प्रश्न प्रतिकात्मक. खरे नव्हेत)
मी - दोन.
तो - बरोब्बर. छान. (इतका सोपा प्रश्न तर मला यायला हवाच ना?)
तो - बरं पाच गुणिले दोन?
मी - अम्म...... बहुतेक दहा
तो - खूपच छान. (नोकरी मिळालीच बहुतेक)
तो - एकविस भागिले सात?
मी - खरंतर मी अशा प्रकारची कामं केली नाहीयेत म्हणून निटसं सांगता येत नाही.
तो - तीन. (स्टडी मटेरिअल नीट वाचायला हवं. मलाही तीनच वाटत होतं. जाऊदे. माणूस चांगला दिसतोय. बोलतोय तरी गोड गोड. देईल नोकरी)
मी - मलाही तसंच वाटलं, पण कॉंफिडन्स नव्हता
तो - बरं. आता सांग. तेरा गुणिले एकोणीस भागिले सतरा.
मी - .....
तो - अशा प्रकारची कामं करणारी लोकं आम्हाला हवीत.
मी - ..... (आता काय करू? नाही येत सांगितलं तर नोकरी जाणार, पण उत्तर तर येतंच नाहीये)
तो - तेरा गुणिले एकोणिस भागिले सतरा?
मी - ....... मला असं वाटतं..... म्हणजे..... असा अंदाज...... म्हणजे..... साधारण बारा ते पंधरा च्या मध्ये असेल बहुतेक....... असं मला वाटतं......
तो - ......
मी - हॅलो

तो - हे बघ, तुला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने नगण्य आहे, बरोबर उत्तर काय आहे ते सांग. किंवा येत नाही म्हणून सांग. (आयला, चिडलाच हा?)
मी - मी अशा प्रकारचं काम केलेलं नाही, म्हणून मला वाटतं असं म्हंटलं (मी पण चिडलेच थोडीशी)
तो - .......

ती - बरं. टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. आता मला सांग तुझा पगार किती?
मी - दहा रुपये.
ती - दहा रुपये? (आवाजात आश्चर्य लपत नाही)
मी - हो
ती - अपेक्षा किती आहे?
मी - तेरा रुपये
ती - बरं (अगदी तुच्छतेने. म्हणजे येत तर काही नाही पण पगार भरपूर पाहिजे अशा आविर्भावात)
ती - आम्ही कळवू तुला सगळे इंटरव्ह्यू झाल्यावर.
मी - बरं
ती - खडाक
मी - खडाक - हुश्श्य..... सुटले.

असा इंटरव्ह्यू झाल्यावर जे व्हायचं तेच झालं. साभार नकाराचा फोन आला. अर्थात त्यांचं काही चुकलं नाही म्हणा. त्यांना जे काम येणारी व्यक्ती हवी होती ती मी नव्हतेच. पण वाईट वाटतंच ना?

संध्याकाळी घरी पोचले तर बाबा एकटेच होते. मजल्यावरही कुणी दिसलं नाही. हात पाय धुवून बाबांसमोर येऊन बसले. त्यांना कळलंच की काहीतरी बिनसलंय माझं. मग त्यांनी उगिचच शेअर मार्केट च्या गप्प सुरू केल्या. टी.व्ही. लावू का म्हणाले. मी काहीच बोलले नाही. मग माझ्या बाजूला येऊन बसले आणि खांद्यावर हात ठेवला. मग मला राहवलं नाही. अगदी लहान मुलीसारखी मी मनापासून रडले. त्यांच्याच शर्टाला डोळे पुसले. मग त्यांना झाला प्रकार सांगितला.


सगळं शांतपणे ऐकून झाल्यावर मला म्हणाले मोठं नुकसान झालं. मी म्हटलं, एवढं काही नाही. मी ही नोकरी घेतली असती असं नाही. पण नकाराचं वाईट वाटलं.

"मी कुठं म्हटलं तुझं नुकसान झालं म्हणून?" ते म्हणाले.
"मग?"
"बाळा, नुकसान त्यांचं झालं, तुला 'नाही' म्हणून. मला एक सांग, तू मूर्ख म्हणून CA ला मेरिटमध्ये आलीस? मूर्ख म्हणून तुला सध्याच्या कंपनीने नोकरी दिली?"
"..."
"आपला आत्मविश्वास घालवून बसायचं नाही. प्रत्येक व्यक्ती तिच्या जागी चांगलीच असते. गरज आहे ती त्या व्यक्तितला चांगलेपणा ओळखायची. तारे जमीन पर पाहिलास ना?"

मग मी तशीच त्यांच्यासोबत बसून राहिले. ते बोलत गेले, त्यांच्या नोकरीच्या कथा. त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका. खरं सांगते आजपर्यंत अनेकदा ऐकलंय. पण ते पुन्हा सांगायला लागले तरी ऐकत राहावसं वाटतं. पण त्याबद्दल पुढच्या वेळी लिहीन, आता खूप उशीर झालाय.

Thursday, January 31, 2008

मी आणि भविष्याचं भूत

गेल्या आठवड्यात उगाचंच उदास उदास वाटत होतं. कशामुळे? काही कळलं नाही. कदाचित नव्या वर्षात तो एकदाही दिसला नाही म्हणून असेल. पण त्याच्यामुळे मी उदास व्हायचं काहीच कारण नाही. मग काय झालं?


कदाचित काहीच झालं नाही म्हणून असेल. जेपींनीही मला विचारलं, काही बिनसलंय का म्हणून, जग्गूंनीही विचारलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विन्यानी सुद्धा विचारलं. बाकी दोघांचं ठीक आहे पण बाळराजे त्यांच्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन चक्क माझी चौकशी करतात म्हणजे खासच.


हा बाळराजे शब्द माझा नाही बरं का. नुकतीच मिलिंद बोकिलांची "शाळा" वाचली. अगदी गेल्या रविवारी वाचायला घतली आणि सोमवारी रात्री दोन वाजता संपली. त्यातल्या त्या मुलला त्याची बहीण बाळराजे म्हणते, मला तो शब्द आवडला. उचलला. मुळात ते पुस्तकंच आवडलं. कधी कधी वाटलं शिरोडकर म्हणजे मीच, अगदी शेवटी हुरहूर लावणारी गोष्ट आहे. खरंतर कुणीतरी हीच गोष्ट शिरोडकरची म्हणून लिहायला हवी. मी नक्की वाचेन.


सध्या एकंदरित पुस्तकांचा दुष्काळ आहे. आईला सध्या मासिकं वाचायचं वेड लागलंय म्हणून पुस्तकं बंद. आमच्या लायब्ररीत सगळी इंग्लिश पुस्तकं आहेत. परवाच हिटलरच आत्मचरित्र आणलं. ओ की ठो कळत नाहीये. म्हणजे एक लाईन तीन तीन वेळा वाचल्यावर कळतंय त्याला काय म्हणायचंय ते. खरंतर फिलॉसॉफीचं पुस्तक वाटतंय ते. एवढा मोठा (आणि छोटाही) माणूस, ओरॅटर पण लेखन एकदम सपक वाटलं. की ही भाषांतरकाराची किमया? थोडं थोडं त्याचं म्हणणं पटलंसुद्धा. आपण नाही का युपी बिहार मधून आलेल्यांच्या नावाने शंख करत?


महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा बायो डेटा अपडेट करून टाकला. बघुया कॉल येतात का ते? जेपींना सांगितलं, तर ते म्हणाले कशी तुम्ही आजची मुलं, दोन वर्षात नोकऱ्या बदलता? त्यांनी फक्त एकाच ठिकाणी नोकरी केली आणि शेवटी कंपनीने नारळ दिला. असुदे, प्रत्येकाच्या निष्ठा असतात. त्यांची तिथे. आईला पण तिच्या कंपनीत वीस वर्ष होऊन गेली असतील. गमतीत आम्ही म्हणतो सुद्धा, बरेच चेअरमन आले आणि गेले पण त्यांची सेक्रेटरी एकच आहे वीस वर्ष. विन्या फक्त म्हणाला, ताई बदल बदल, नोकरी बदल, लोक बघ कुठे कुठे अमेरिका, युरोपला जातायत. तुलाही नक्की चान्स मिळेल.


खरंच मिळेल? म्हणजे एकटीने राहायचं, स्वतः सगळं मॅनेज करायचं. मदतीला आई नाही, सल्ला द्यायला बाबा नाहीत, खोड्या काढायला विनय नाही. माझा डेस्क नाही, मैत्रिणी नाहीत आणि....तोही नाही. ग्लॅमरस आहे पण तितकंच घाबरवणारं.


हं, कदाचित ह्याच्यामुळेच मला उदास उदास वाटतंय

Thursday, January 24, 2008

मी आणि तो

लिहिण्याचा बॅकलॉग भयंकर वाढत चाललाय. आता नवं वर्ष उलटून किती दिवस गेले पण अजून माझं लिखाण तिथेच रेंगाळतंय. गेल्या आठवड्यातंच खरंतर लिहिणार होते, पण जरा जास्तंच झालं असतं म्हणून आता लिहिते.

ह्या वेळी एकतीस तारखेला आमच्या ऑफिसची पार्टी होती. जुहूलाच होती. अर्थात विनयभंग वगैरे झाले तेव्हा आम्ही सगळे, सगळ्यांचं माहीत नाही पण मी तरी घरी शांत झोपले होते. आम्ही नववर्ष संध्याकाळीच साजरं केलं. तर ह्या पार्टी निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटची लोकं एकत्र आली.

नवी गर्दी मिळाली की चेहेरे शोधण्याचं काम फक्त मुलंच करतात असं नाही. माझ्यासारख्या काही मुलीही त्यात सहभागी असतातंच की. अर्थात माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या डिपार्टमेंटला काम करते तिथे पस्तिशीच्या खालचं कुणी फिरकंतच नाही. CA असल्याचा साइड इफेक्ट आहे हा. त्यामुळे दुसऱ्या डिपार्टमेंटातून नजर फिरवणं आलंच.

काही बरे चेहेरे दिसले, पण एक विशेष. चेहेरा म्हणण्यापेक्षा एक विशेष माणूस भेटला. दिसायला तर चांगला होताच, पण बोलायलाही छान वाटला.

मला नेहेमीप्रमाणे गाणं म्हणण्याचा आग्रह झालाच आणि आपल्याला काय स्टेज आणि श्रोते मिळाले की कॅसेट सुरू. मग एका साहेबाने एका डुएटची फर्माइश केली. आता साहेब लोकांना कोण समजावणार की डुएट दोघं गातात म्हणून. मी म्हंटलं सर हे डुएट आहे, तर त्यांनी चक्क "त्या"ला आग्रह केला गाणं म्हणण्याचा. म्हणजे हा गातो पण? डुएट छान झालं, माझा आवाज कापत होता इतकंच, पण त्याला काही पर्याय नव्हता.

नंतर सगळा वेळ नजर त्यालाच शोधत राहिली. खरंतर मुद्दाम नाही, पण तो काय करत असेल, त्याचे मित्र कोणते? (त्यात एखादा ओळखीचा आहे का?), तो कसा बोलतो, कसा हसतो, सबकॉन्शसली मी माझ्या एक्स्पेक्टेशन्स मॅच करत गेले. काही मॅच झाल्या, काही नाही, शेवटी तडजोड ही करावी लागणारच कधी ना कधी, असं म्हणून तो उद्योगही सोडला. आनंद ह्याचाच आहे, की मी मोकाट इथे सगळं लिहू शकतेय. एरवी कुणाला सांगितलं असतं?

म्हंटल्या गाण्यासरशी ओळख झालीच. नाव कळलं, मराठी असल्याचंही कळलं. बरं वाटलं. कोब्रा नाही हेही कळलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, गाणं म्हणतो म्हणजे जेपींनाही (बाबांना) नाही, त्यांना मराठी पुरे आहे. विन्याचा तर प्रश्नच नाही. राहता राहिली आई. ती फार जातीनिष्ठ आहे, तेव्हा तिला मॅनेज करणं कठीण.

ह्याला काय म्हणतात? सुतावरून स्वर्ग गाठणे.

पण मला तो आवडला. एकंच प्रॉब्लेम आहे. मिशी! मला बिलकूल आवडणार नाही नवऱ्याने मिशी बिशी ठेवलेली. पण ते सगळं नंतर.

क्रश तरी नक्कीच आहे. प्रेमाचं काही माहीत नाही. बघुया पुढे काय घडतं ते.

Thursday, January 17, 2008

मी आणि माझे संकल्प

पुन्हा एकदा वर्ष संपलं.


म्हटलं, ह्या वर्षीचा लेखा जोखा मांडावा. मी गेल्या वर्षी काय केलं? तसं बरंच काही केलं आणि काहीच केलं नाही.

घराच्या आघाडीवर मी अक्षरशः काहीही केलं नाही. कधी बाबांचं टॅक्स रिटर्न भरून दे, आईला भाजी चिरून दे, विन्याच्या डिफिकल्टीज सोडव, असले फुटकंळ उद्योग केले, नाही असं नाही. पण ते सोडलं तर काहीही नाही. माझा पगार पण नाही. कारण तो माझ्या अकाउंट मध्ये जातो आणि त्यातून कधीच पैसे काढले जात नाहीत.


मग मी माझ्या घरासाठी काय केलं तरी काय गेल्या वर्षी? तशी माझ्याकडून काही अपेक्षा नाहीच, पण आपण ज्या संस्थेचा भाग आहोत आणि ज्या संस्थेच्या जिवावर आपण उड्या (फार उंच गेल्या नाहीत तरीही) मारतो, त्या संस्थेचं आपण काही देणं लागतो की नाही?

मला वाटतं माझा आळस नडतो. बऱ्याच वेळा वाटतं आईला मदत करावी. पण मग कोचावर बसून टी.व्ही. कोणी बघायचा. कोणीच बघत नाही, म्हणून त्याला (टी.व्ही. ला) वाईट वाटेल, म्हणून मी आपली टी.व्ही. बघत बसते. ते काही नाही. नव्या वर्षी केबल बंद. थोडं का होईना घरचं काम करायचं. थोडी बाबांनाही मदत करायची म्हणजे बिलं भरणं बँकेत जाणं असली कामं कधीतरी करायला काही हरकत नाही. आणि विन्याचं? छ्या त्याचं काही काम करायला नकोय, जमल्यास त्यानेच मला माझ्या कामात मदत करावी. तसा करतो तो मदत पण अजून.

हे झालं घरचं, नोकरी फ्रंटवर? सध्या नोकरी म्हणजे रुळावर चालणाऱ्या आगगाडीसारखी झालेय. रुळ सोडता येत नाही, दिशा बदलता येत नाही. रुळ नेतील तिथे जायचं. बदल हवाय एवढं नक्की. जग्गू (ओळखीसाठी मागील ब्लॉग वाचा) भेटल्यावर तर अजूनच जाणवलं, काहीतरी बदल हवाय आयुष्यात. त्यामुळे नव्या वर्षीचा संकल्प म्हणजे नोकरी बदलणे. जग्गूला सांगितलं तर ते काय खूष झाले. म्हणाले तुला लवकर समजलं. बऱ्याच जणांना रिटायर होताना समजतं. कठीण आहे पण. म्हणजे तिथले लोकं, ती जागा, माझा डेस्क आणि कंप्युटर सगळं सोडताना कसं वाटेल? आपलाच एक भाग सोडून चाललोय असं वाटेल. वाटूदे. आणखी एक अनुभव दुसरं काय?

नाटक आणि गाणं. गेलं वर्षभर बंद आहे गाणं. ह्या खात्यात शून्य मार्क. काही चांगले कार्यक्रम ऐकले हे खरं पण, रियाज अजिबात नाही. नवीन काही शिकणं तर नाहीच नाही. ठरलं. आजच बाईंना फोन करते आणि परत जायला सुरुवात करते. वेळ काढला नाही, तर वेळ मिळणार नाही हेच खरं.

नाटकाच्या दृष्टीने मात्र हे वर्ष प्लस. चार एकांकिका केल्या, खूप झाल्या. ह्याच्या उप्पर करणं काही शक्य नाही. एका सिरियलच्या शूटला पण गेले होते. पण एकंदरित ते मला झेपेलसं वाटत नाही. नाटक त्यापेक्षा खूपच छान. शूटींग भयंकर त्रासदायक आणि वेळकाढू प्रकार वाटला. आणि ती सिरियल कचऱ्याच्या टोपलीत गेली हे दुसरं. अर्थात एका एपिसोडमध्ये का होईना पण माझ्यासारख्या लोकांना घेतल्यावर सिरियल कचऱ्याच्या टोपलीतच जाणार.


आणि हो. शेवटचं राहिलंच. हा ब्लॉग सुरू केला. मजा वाटते लिहायला. डायरी लिहितेय असंच वाटतं. कोणाशी गप्पा माराव्यात तसं वाटतं आणि इतरांच्या प्रतिक्रिया वाचायला पण आवडतात. पुढच्या वर्षी इतर सगळे ब्लॉग वाचायचे हा संकल्प. काही चाळले मी. कवितांचं अमाप पीक आहे, त्यात काही चांगल्या कविता लपून जातात. गद्य पण काही इतकं सुंदर लिहितात की क्या बात है! त्यांच्यापुढे माझा ब्लॉग म्हणजे एखाद्या सुंदर कादंबरीसमोर जनरल लेजर. असो जनरल लेजर तर जनरल लेजर, माझ्यासारख्या मुलीला हेही नसे थोडके.

जेपींना (बाबांना) विचारलं की त्यांचा संकल्प काय नव्या वर्षीचा. तर म्हणाले, कोणताही संकल्प करायचा नाही, हाच त्यांचा संकल्प. कारण त्यांच्या मते त्यांनी एखादा संकल्प केला की तो हटकून पुरा होत नाही. मग विनूला विचारलं. तर म्हणाला ताई, बस इक सनम चाहिये आशिकी के लिये. हाच माझा संकल्प. कप्पाळ माझं. आशिकी करतायत. मग आईला विचारलं. ती म्हणाली, माझं (म्हणजे माझंच) लग्न करून देणे. नेहमीप्रमाणे जास्त काही न बोलता मी तिथून सटकले.


अजून थोडं लिहायचं होतं पण आता खूप उशीर होतोय. तेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.

विश यू ऑल अ व्हेरी हॅप्पी (अँड व्हेरी बिलेटेड) न्यू इयर....



- संवादिनी

Friday, January 11, 2008

मी, जग्गू आणि हॅट्स...

ह्या आठवड्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फिरण्याचा संकल्प अजूनही चालू आहे. तशी मला व्यायामाची वगैरे आवड नाहीच आहे. पण काय आहे, माणसांचं व्यसन मला आहे. जिथे जिथे चांगली माणसं भेटतात, तिथे तिथे मी कष्ट झाले तरी जाते. मग ते, सकाळी सकाळी छान झोपायच्या वेळी उठून, चालून चालून, पायांना दिलेले का असेना.


सकाळचा आमचा ग्रूप एवढा छान जमलाय की एक दिवस सुद्धा चुकवत नाही. कधी कधी तर गप्पांच्या भरात ऑफिसला जायला उशीरही होतो. पण ऑफिसची वेळ ही वेळेवर जाण्याकरता नसतेच. उद्या एक तास उशीराने सुरू झालं ऑफिस तरी मला लेट होणारच.


तर मी ह्या माझ्या नव्या मित्रांबद्धल लिहिणार होते आज. सगळे सत्तरीच्या वरचे आहेत. पण आनंदी. आपल्या व्यथा वेदना बाजूला ठेवतात आणि मगच फिरायला येतात. आणि त्या सगळ्या ग्रूप ची मी नात आहे. मी सगळ्यांना आज्जी आणि आजोबाच म्हणते. पण एक सोडून. म्हणजे आमच्या गिरगावातले एक आजोबा आहेत तिथे. त्यांना नाही आजोबा म्हणत. म्हणजे त्यांनीच मला सांगितलंय, त्यांना नावाने हाक मारायची. "जगजीवन". मी त्यांना म्हटलं तुमचं नाव फर मोठं आहे. "आजोबा" छोटं आणि सुटसुटीत आहे. मग म्हणाले की "जग्गू" म्हण. आता एवढ्या मोठ्या माणसाला जग्गू कसं म्हणणार? बाकी सगळे त्यांना जग्गू म्हणतात. ते ठीक आहे. एक दिवस ते आपल्या नातीला घेऊन आले. लहान आहे. तीही त्यांना जग्गूच म्हणते. मग मी पण सुरू केलं.


खरंतर एखाद्याला त्याच्या नावानं हाक मारण्यात काहीच वाईट नाही. नाही का? पण आपलं कंडिशनिंगच असं झालंय की अहो जाहो येतंच तोंडात हटकून. आपल्याला जे लहानपणापासून शिकवलंय योग्य म्हणून त्याच्या व्यतिरिक्त काही योग्य असू शकतं, ही शक्यताच आपण ध्यानात घेत नाही. किमान मी तरी घेत नाही. पण घ्यायला हवी. चौकटीबाहेर जाऊन वस्तूनिष्ठपणे (कसला शब्द आठवलाय, सही!!) प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. मला कधी जमेल देवालाच माहीत.


तर जग्गूही गिरगावातच राहत असल्याने आम्ही दोघं हल्ली एकत्रच परत येतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी अधिक माहिती आहे. वल्ली आहे. म्हणजे बघा, ते तबला वाजवतात, मिलिट्रीतून रिटायर झालेले आहेत (काय म्हणून विचारलं की हवालदार म्हणतात, पण हुद्दा सांगत नाहीत). हॉटेल चालवून झालं, क्रिकेट कोच म्हणून काम करून झालं. मोटरमनच्या नोकरीसाठी त्यांना अर्ज करायचा होता पण वय आड आलं. असं केलं तर माझ्यासारख्या मुलीचं, एक ना धड भाराभार चिंध्या असं व्हायचं, जग्गूचं नाही. सगळीकडे यशस्वी. यश मिळालं की ज्याच्यात यश मिळालं ते काम सोडायचं आणि पुढचं वेगळं काहीतरी धरायचं.


परवाच मी त्यांना विचारलं की, त्यांना अस्थिरता इतकी का आवडते? एवढा नव्याचा हव्यास कशासाठी? जग्गूनी मला विचारलं, तुझा पुनर्जन्मावार विश्वास आहे? मी म्हटलं, अजून विचार केलेला नाही. मग म्हणाले, त्यांचा नाही. आणि जगात एवढ्या चांगल्या चांगल्या अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत, की खूप प्रयत्न केले तरी पाच सहा गोष्टीच नीट मनसोक्त करता येतात. सतत नवनवे अनुभव घेत राहयचं. आयुष्याचा दुसरा उद्देश काय आहे? फक्त आपला जोडीदार सोडून सगळं बदलून पाहायचं आणि जोरजोरात हसले आगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत.


मग मी न विचारताच त्यांच्या नातीबद्दल, मुलीबद्दल बोलत राहिले. म्हणाले तुला पाहिलं की मला माझी मुलगी आठवते लग्नाआधीची. म्हणून तुला जग्गू म्हणायला सांगितलं.


मला कौतूक वाटलं त्याचं, आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पत्नीचं, की इतकं मनसोक्त आयुष्य जगणाऱ्या माणसाचा संसार सांभाळणारी बाई किती खमकी असेल? पण आपल्याला आवडून गेले ते. एकच आयुष्य, वेळ कमी, मग जास्तीत जास्त गोष्टी करायच्या, बदलून पाहायच्या, पण जोडीदार सोडून.


त्यांना मी विचारलं त्यांच्या जोडीदाराबद्दल. चर्नीरोडच्या ब्रीज वर चढलो की आम्ही वेगेवेगळ्या दिशेला वळतो. तिथेच विचारलं. काहीच बोलले नाहीत. हसले आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी लवकरंच पॉइंटाला पोहोचले आणि इतर आजोबांना विचारलं ह्याबद्दल. ते म्हणाले की जग्गूची बायको लग्नानंतर दोन वर्षातच गेली.


मला प्रचंड धक्का बसला. मी जवळ जवळ रडलेच तिथे. प्रेम असावं तर कसं? असं. ते आता सत्तरीच्या वर आहेत म्हणजे किमान चाळीस वर्षांपूर्वी त्यांची बायको गेली आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या ह्या माणसाला एकदाही वाटू नये की आपण दुसरं लग्न कराव? कदाचित वाटलंही असेल, पण त्यांनी केलं नाही हे नक्की.


आता लिहिताना पण मी सुन्न झालेय. रडतेय.


हॅटस ऑफ जग्गू. हॅटस ऑफ!!

Friday, December 28, 2007

प्राक्तन आणि चिल पिल

आमच्या चाळीत सध्या एक नवं खूळ आलंय. सकाळी काही ना काहीतरी व्यायाम करायचा. म्हणजे तसं हे सुरू होऊन तीन चार आठवडे झालेत पण किती दिवस टिकेल काय सांगा म्हणून आधी लिहिलं नाही.


आमच्या घरातल्या चक्क चारही लोकांनी भाग घ्यायचा ठरवला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या आठवड्यात बरेच आरंभशूर including विन्या बाद झालेले आहेत. आई घरच्या कामापुढे वेळ काढू शकत नाहीये आणि ते काम करतानच तिचा भरपूर व्यायाम होत असल्याने तिला फिरायला वगैरे जाण्याची गरज नाही हे तिला लक्षात आलंय. त्यामुळे राहता राहिले दोघं रिकामटेकडे सकळीक, जेपी (बाबा) आणि मी.


बरोब्बर सहा वाजता जेपी मला गदागदा हलवून घराबाहेर पडतात. त्या भूकंपसदृष्य अनुभवामुले मला उठावंच लागतं. मी साडेसाहाला बाहेर पडते. मग ते चर्चगेटला बसलेले असतात मी पॉइंटापर्यंत जाऊन येईपर्यंत बसतात आणि मग आम्ही एकत्र घरी.


जेपींचे बरेच मित्र आहेत तिथे. त्यांना उगीचंच माझी वाट पाहत बसायला लागतं. म्हणून हल्ली आम्ही वेगवेगळे येतो. त्याहीपेक्षा मला एक माझा ग्रूप मिळालाय. चार आजोबा आणि दोन आजी आणि मी. पॉइंटाला बसतात ते बऱ्याच वेळा. पाच दिवस रोज बघून हसायला लागले. सहाव्या दिवशी चक्क मला त्यांनी जिलबी खायला बोलावलं. बरोबर ओळखलंत. गुज्जूच. पण सगळे नाहीत दोन मराठी आजोबा आहेत. आणि जिलबी म्हणजे माझा weak point मग काय झाली दोस्ती


मस्त वाटतं त्यांना भेटून. आपलं बघा एक विश्व असतं. त्याला आपण चौकटी पाडून घेतो. विटांच्या भिंती बांधतो म्हणजे बाहेरचं काही दिसत नाही. कधी काही लोकं काचेच्या भिंती लावतात. पण डोळ्याला पट्टी बांधून घेतात. मलाही तसंच वाटलं त्यांच्याकडे बघून. आपण फार फार स्वयंकेंद्रीत वगैरे झालोय असं वाटायला लागलं मला. कामात बिझी असलेली मुलं, सुना, नातवंडं, आपल्या संसारात रमलेल्या मुली ह्यांना वेळ कुठाय ह्या जुन्या खोडांकडे बघायला? प्रत्येकाची काही व्यथा आहे. पण जिलबीच्या बकाण्यात दडपून टाकतात. मीही असं करेन का? म्हणजे जेपी, आई, लग्न झाल्यावर सगळ्यांना विसरेन का? माझ्याच जगण्यात मश्गुल होऊन जाईन मी?

बाबांना विचारलं, म्हटलं, बाबा तुम्हाला असं वाटतं का की नवी पिढी जुन्या पिढीकडे लक्ष देत नाही वगैरे. ते म्हणाले प्राक्तन आहे. तुम्ही आणि आम्ही वेगळे आहोत. वयाचा फरक आहे. वयामुळे विचारांत फरक आहे. माझ्या आणि माझ्या वडिलांच्यातही होता, त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्याही होता तेव्हा कदाचित त्यांनाही वाटलं असेल नवी पिढी नालायक आहे म्हणून. ते त्याचं प्राक्तन. आता हे आमचं प्राक्तन आणि वाईट वाटून घेऊ नकोस कराण उद्या असंच तुमचंही प्राक्तन असेल काहीतरी. मग काय करणार? त्याची सल मनात ठेऊन जगणार का आनंदाने जगणार?

सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणी म्हणत?


मला ते बोलले ते फरसं काही कळलं नाही पण शेवटचा प्रश्न कळला.

मी लगेच उत्तर दिलं गाणी म्हणंत. मग म्हणाले चल एक छानसं गाणं म्हणून दाखव. मग त्यांचं आवडतं उगवला चंद्र पुनवेचा म्हटलं.

पटलं. गाणी म्हणंतच जगायला हवं.

मग आईला विचारलं. आई म्हणाली, एकदम बरोबर आहे. हल्लीच्या पिढीला मोठ्यांबद्दल काही आदरंच राहीलेला नाही. आम्ही सांगतो ते तुमच्या भल्यासाठीच ना? तरीही तुम्ही काहीही ऐकत नाही. गाडी आता मी तिच्या, मी लग्न करण्याच्या, आग्रहाला दाखवलेल्या कात्रजच्या घाटाच्या अंगाने जातेय हे बघून मी तो विषय आवरता घेतला.

विन्याला पण विचारलं. विन्या म्हणाला ताई टेक अ चिल पिल. तुला हे काय झालंय? आर यू ओके?

उद्या आमच्या नाना नानी ग्रूपला हा प्रश्न विचारते.

Thursday, December 13, 2007

१२ डिसेंबर आणि मी

काही तारखा मनाच्या कॅलेंडरमध्ये नेहेमीच मार्क केलेल्या असतात. तशीच ही तारीख १२ डिसेंबर. वाढदिवस लक्षात न राहण्याचा अवगूण माझ्यात ठासून भरलेला आहे. विनूचा लक्षात आहे. आई बाबांचा आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच महिन्यात असल्याने नेहेमी थोडा गोंधळ उडतो. बाकी मैत्रीणींचे वाढदिवस मी नेहेमी विसरते. पण १२ डिसेंबर नाही.

खरंतर माझ्या जगात ह्या दिवसाला आता काहीच महत्त्व नाही. फार फारतर एखादा इ-मेल किंवा ऑर्कूट्वर स्क्रॅप बस. पण कधीतरी महत्त्व होतं. कधी म्हणजे? फार फार पूर्वी. जेव्हा मी शाळेत होते तेव्हा.


आठवीत किंवा नववीत असेन तेव्हा. ते वय विचित्रच असतं ना? म्हणजे आपण मोठ्या तर झालेल्या नसतो, पण मोठं झाल्यासारखं वाटत असतं. पौगंडावस्था. माझी आजीच्या शब्दकोषात ह्याला एक चांगला शब्द होता. अशा मुलांना ती "आडबाप्या" म्हणायची. पण मुलींना? मी विचारलं होतं तिला ती म्हणाली, माहीत नाही, पण आडबाई म्हणायला हरकत नाही. तस असं हे आड whatever वय.


परिकथेतल्या स्वप्नांना शक्यतेचे कोंब फुटायला लागलेले असतात. प्रेम, प्रेम जे काय म्हणतात ते एकदा चाखून पाहायचं असतं. उत्सुकता असते, दडपण पण असतं. मी अनुभवलंय. म्हणजे कुणावर प्रेम वगैरे बसण्याचे ते दिवस नसतातंच. कारण आपल्य स्वतःच्या आवडी निवडीच आपल्याला नक्की माहीत नसतात. पण प्रेमात पडणं मात्र अनुभवायचं असतं. अशा नेमक्या वेळी आपल्याला तो दिसतो.


आता एका शाळेत म्हणजे लहानपणापासूनच त्याला बघितलेलं असतं. पण आता जसा तो उलगडतो तसा पूर्वी कधी उलगडलेला नसतो. त्याचा तो चष्मा, गोड स्माईल वगैरे सगळं दिसायला लागलेलं असतं. तसा तो हुषार असतोच. खेळात अगदीच आघाडीवर नसला तरी बिघाडीवरही नसतो. हळुहळू तो आवडायला लागतो. अं हं. तो आवडण्यापेक्षा त्याच्या प्रेमात पडण्याची कल्पना आवडायला लागते.


मनातली ही कल्पना कोणत्यातरी बेसावध क्षणी शब्दात उतरते. नाही. अजून त्याला सांगायचं धैर्य झालेलं नसतं. पण हे आपलं गुपित अलगद मैत्रिणींना समजतं. मग सुरू होते चिडवा चिडवी. लटका राग.
कसा कोण जाणे मग त्याला ह्या गोष्टीचा वास लागतो. मग तोही प्रेमात पडतो, प्रेमात पडण्याच्या संकल्पनेच्या. दिवस जातात आठवडे जातात. महिने जातात. कधीतरी शाळेची पिकनिक निघते. गाण्याच्या भेंड्या सुरू होतात. मैत्रिणी तिला आणि मित्र त्याला चिडवत राहतात.


शेवटी तो तिला प्रपोज करतो. आता शब्द आठवत नाहीत पण ती हो म्हणतंच नाही. फक्त हसते. हो कसं म्हणायचं हेसुद्धा तिला माहित नसतं. कोणी तरी आपल्या प्रेमात पडलंय ही किती सुखावणारी भावाना आहे हे तेव्हा कळतं.


आणि हे प्रेमप्रेकरण तिथेच संपतं. कारण त्यात पुढे काही होण्यासारखं नसतंच मुळी. शाळा संपते, दोघांचं कॉलेज वेगवेगळं असतं. विश्व विस्तारतात आणि जुनी विश्व अवास्तव, खुजी वाटायला लागतात. ह्या विश्वातून त्या विश्वात जाताना होणाऱ्या गदारोळात ही प्रेमात पडल्याची भावना विरून जाते.


आता तो कधी कधी तिला मेल करतो. ती त्याला उत्तर देते. वाढदिवस, त्याचा आणि त्याच्या लग्नाचा, ती विश करते. अर्थात लग्नाचा वाढदिवस आता लक्षात राहत नाही पण वाढदिवस मात्र राहतो.
कारण त्या मंतरलेल्या दिवसात त्याच्या वाढदिवसाला कधीतरी तिने स्वतःच्या हाताने काढलेलं स्केच दिलेलं असतं कुठल्याश्या हिंदी चित्रपटाच्या कॅसेटवरच्या चित्राचं. अर्थात तो चित्रपट म्हणजे प्रेमकथा असते.


ती तो चित्रपट आणि ते स्केच दोन्हीही विसरलेली असते. त्याच्याकडे अजूनही ते जपून ठेवलेलं असावं असं मात्र तिला का कोण जाणे वाटत राहतं. फक्त तो दिवस तिच्या लक्षात राहतो १२ डिसेंबर.


तसाच हा दिवस माझ्याही लक्षात राहिला. १२ डिसेंबर. आठवून वाटतं. किती वेडी होते मी तेव्हा. नाही. हा सगळा वयाचा परिणाम. पण जे काही घडलं ते मी मनापासून एन्जॉय केलं. ते महत्त्वाचं. पात्र कोण होती हे महत्त्वाचं नाही. अनुभव महत्त्वाचा.

कधी कधी वाटतं, काहीच जरी कळत नसलं तरी त्या दिवसातलं प्रेम किंवा क्रश किंवा whatever खरा असावा, कारण त्याला मोजमापं नसतात. पगाराची, उंचीची, जातीची, वयाची, शरीराची. कदाचित तेच खरं असेल. कुणी सांगावं?

Thursday, December 6, 2007

मी, नाटक आणि ती

गेल्या आठवड्यात आमच्या नाटकाबद्दल काही लिहिता आलं नाही, आणि ह्या आठवड्यात लिहिण्यासारखं काही विशेष घडलं नाही, म्हणून आता नाटकाबद्दलंच लिहिते.


ह्या महिन्याची एकांकिका बरी झाली. म्हणजे तशी चांगलीच झाली, पण "आपली आपण करी जो स्तुती तो सर्व जगी मूर्ख मानावा" असं कोणीतरी, बहुतेक रामदासांनी, म्हटलेलं आहे, म्हणून एकांकिका बरी झाली असं म्हणायचं. तसं रामदासांचं सगळंच मला पटत नाही. ते "टवाळा आवडे विनोद" म्हणतात. म्हणजे सगळे मराठी नाटकवाले आणि त्यांचे प्रेक्षक टवाळंच झाले की हो. असो, तर आमची एकांकिका बरी झाली.


माझा रोल तसा वेगळा नव्हता. म्हणजे रोल चांगला होता. पण तो माझ्यासारखाच होता. म्हणजे माझ्याच वयाची मुलगी, प्रेमात पडते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे कमी मेहेनत घ्यावी लागली. अर्थात, कामच्या व्यापामुळे ते माझ्या पथ्यावरंच पडलं. शंभरात पंच्याण्ण्व वेळा असतं तसं हे नाटकही पुरुषप्रधानच होतं. म्हणजे जे काही नाट्य बिट्य घडू शकतं ते पुरुषांच्या बाबतीतच घडू शकतं. स्त्रीया फक्त मम म्हणायला. असं काहीसं. बहुदा नाटकात, विषेशतः एकांकिकांमध्ये स्त्री लेखकांची, किंवा लेखकांची वानवा आहे. दिग्दर्शनातही तेच. त्यामुळे असेल, पण अशीच परिस्थिती आहे.


असो मेली, सांगायचा मुद्दा काय तर साधा रोल होता, करायला मजा आली. जबाबदारी कमी, गंमत जास्त. दिरेक्टरच्या शिव्या कमी, ओव्या जास्त.


एक मी असते, माझ्यासारखीच, तिला एक तो भेटतो, काजूवडीसारखा (संदर्भ न लागल्यास मागचे ब्लॉग वाचणे). त्याला मी आवडते, मला तो आवडतो आणि आम्ही प्रेमात पडतो.


जे माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात घडायला पाहिजे ते सगळं नाटकात घडतं. शेवटी नाटक इज अ फॅन्टसी. मग मी माझी फॅन्टसी नाटकातच जगून घेते. तीच होऊन जाते. समोरचा मुलगा समोरचा राहतच नाही. तो माझा काजूवडी होतो. प्रत्यक्षातल्या उर्मी रेषा बनून चेहेऱ्यावर उमटतात. उमटलेल्या रेषा प्रेक्षकांना त्यांच्या उर्मींची जाणीव करून देतात. कधी प्रकट झालेल्या, कधी प्रकट न झालेल्या आणि नाटक प्रेक्षकांना भावतं. everyone lives their fantacy, मी, तो आणि प्रेक्षक सुद्धा. तेव्हा नाटक चांगलं होतं. भावतं.


आणि माझ्यासाठी नाटक म्हणजे त्याहीपेक्षा काही जास्त आहे. कल्पना करा. अर्ध्या पाऊण तासासाठी का होईना, आपण स्वतःला विसरायचं. स्वतःची नोकरी, कुटुंब, मुलं, समस्या, राग, लोभ, अहंकार सगळं विसरायचं. आणि जो रोल करायचा असेल ती व्यक्ती व्हायचं. राणी, भिकारीण, बायको, मुलगी, वेष्या काहीही. मग माझे विचार, माझं व्यक्तिमत्त्व, माझ्यावर झालेले संस्कार हे सगळं सोडून मला त्या व्यक्तीसारखं वागणं भाग होतं. परकाया प्रवेश वगैरे जे म्हणतात ना तसं काहीसं. Getting into shoes of someone else.


मग बाकीच्या जगाचं अस्तित्व पुसलं जातं. समोरचा अंधार, डोक्यावरचे लाईटस आणि आपण. मध्येच प्रेक्षकांतून येणारी हास्याची लकेर किंवा कान फुटतील इतकी जाणवणारी निःशब्द शांतता. ह्यांचंच एक वेगळं विश्व. एक फॅन्टसी, एक नाटक, एक आयुष्य. पार्श्वसंगीत, पार्श्वसंगीत नव्हे, माझ्या भावना, डोळ्यातून ओघळणाऱ्या, रडणाऱ्या, भेकणाऱ्या, हसणाऱ्या, वेडावणाऱ्या, धुंद आणि मी नव्हे, ती, जीचा रोल मी करतेय.


नाही ना काही कळलं? त्या जाणीवा व्यक्त करण्यासारख्या नाहीतच मुळी. किंवा त्या व्यक्त करण्याईतकी माझी भाषा संपन्न नाहीये. शेवटी काय भा.पो. ना? (भा.पो. म्हणजे भावना पोहोचल्या), मग ठीक.