काल अजून एक इंटरव्ह्यू झाला. हल्ली आठवड्याला एकदोन होतायत त्यामुळे त्याबद्धल काही लिहिण्यासारखं नाहीच आहे. हल्ली इंटरव्ह्यू वाढलेत ह्याचं कारण म्हणजे, मी, मुंबईच हवी, ही माझी नोकरीची अट कमी केलेली आहे. गेलाबाजार पुणं तरी मिळावं एवढीच अपेक्षा आहे. तसं लांब जायला काही हरकत नाही, पण पुण्यावरून कसं? कधीही घरी पळता येईल. नाही म्हटलं तरी मराठी. चेन्नई, कलकत्त्यापेक्षा कधीही जवळचं वाटतंच.
गेले बरेच दिवस ह्या विषयावर आमच्या घरी चर्चासत्र घडत होती. म्हणजे मी एकटीने जाऊन नोकरीसाठी परगावी राहावं का? आई म्हणे अजिबात नको. हल्ली काय एकेक ऐकायला येतं? तिच्यावर हल्लीच्या नव्या हिंदी सिनेमांचा प्रचंड परिणाम झालाय. आपली मुलगी वाईट संगतीला तर नाही ना लागणार ही तिची भीती.
बाबांनी तरी माझी बाजू घ्यावी की नाही? तेही नाही. ते म्हणे, उद्या तुझं लग्न होणार आणि मग तू जाणार तोपर्यंत तरी तू इथे राहा. उद्या लग्न कुठल्या शहरात होईल माहित नाही. मग तेवढा सहवास मिळेलच असं नाही. मला एवढा राग आला ना त्यांचा. नेहमीसारखं बोलणंच बंद केलं मी. फक्त कामापुरतं. त्यांना बहुतेक वाईट वाटलं.
विन्या म्हणे सुंठीवाचून खोकला गेला. म्हणाला जायचंच असेल तर परदेशी जा. हे पुणंबिणं नको. पुणं तेथे सगळंच उणं. स्कूटर चालवता येणार नाही रस्त्यात म्हणाला. अतिरेकी बायकांसारखे बुरखे घालून स्कूटर चालवायला लागेल.
असं तिघांनी मिळून नकारघंटाच लावली.
आताशा मला वाटायला लागलंय की थोडं स्वतंत्र व्हायला हवं. म्हणजे घरात मला कसली बंदी आहे असं नव्हे. पण आपलं एक वेगळं आभाळ असावं असं प्रत्येकाला वाटतंच ना. स्वप्नांचे पंख लावावेत आणि द्यावं झोकून. सोडावं आपलं गाव, आपलं घरटं. उडावं उंचच उंच. अर्थात घरट्यावरचं प्रेम त्यामुळे कमी होणार नाहीच. पण नवे अनुभव, नव्या शक्यता, जबाबदाऱ्या, प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स. सगळं कोरं करकरीत नवं हवंय.
मग मी काय केलं? वाद घालणं बंद केलं आणि तडक आजीचं घर गाठलं. आजीचं घर म्हणजे मामाचं घर. आईची आई. बाबांची आई कधीच गेली. तिचं आभाळ अजून वेगळं. तर आजीकडे गेले. सगळ्यात मोठी नात म्हणून आजीची मी लाडकी आहे.
तिला सांगितलं. तिसऱ्या जनरेशन चे प्रॉब्लेम्स, दुसऱ्या जनरेशनला कळत नाहीत, पण पहिल्या जनरेशनला कळतात हे कसं काय? तिला माझं म्हणणं पटलं. लगेच फोन लावला तिने आईला आणि चांगली ओरडली. आईला लग्नाआधी नोकरी करायची होती. दादा नाही म्हणाले. तेव्हा, आता मी जशी भांडतेय, तशी ती आजीशी आणि दादांशी भांडली होती.
एकदा हाय कमांडनी आदेश काढला की मग आमच्याकडे काही चालत नाही. आजी हो म्हणाली आणि सगळा विरोध मावळला.
घरी गेले नंतर तर आई बाजूला घेऊन म्हणाली. हे बघ, आजी म्हणतेय म्हणून मी तुला परवानगी देतेय. पण उद्या भलतीकडे कुठे नोकरी मिळाली तर सांभाळून राहा. वाईट मित्रमंडळींपासून दूर राहा. लहान वयात काही कळत नाही काय चांगलं काय वाईट ते. दोनदा विचार कर काहीही करण्याआधी. मला खुदकन हसायला आलं. म्हटलं आई अजून मला कोणीही नोकरी दिली नाहीये. अत्तापासूनच एवढी चिंता. खरंच जायला लागलं तर काय होईल?
विन्या पुन्हा म्हणाला. ते पुणं सोडून काहीही बघ हं ताई. तू अतिरेकी आहेस, पण अतिरेकी दिसलीस तर जाम वाईट वाटेल मला.
बाबांना मनातून माझं पटलं होतंच. त्यांनी चक्क मला इंटरनेटवर सॉरी कार्ड पाठवलं. खाली लिहिलं होतं.
"उडणाऱ्या पिलाचे पंख बांधून ठेवल्याबद्दल पिलाच्या बाबाकडून सॉरी"
- संवादिनी
Thursday, March 27, 2008
Thursday, March 20, 2008
मी, ती आणि फुलपाखरू
लाटा. भरती आणि ओहोटीच्या. म्हणजेच का आयुष्य?
एक दिवस येतो. उनाड फुलपाखरासारखा. वाटतं आपणही फुलपाखरू व्हावं. ह्या फुलावरून त्या फुलावर जावं. शोषून घ्यावा सगळा मध. फुलपाखराचं आयुष्य ते किती? दोन दिवस? मग ह्या दोन दिवसात पर्वा कुणाची करायची आणि का? आपण आपल्या मस्तीत जगावं आणि आपण आपल्या मस्तीत मरावं.
आपण मरावं? खरंच आपण मरू का? सगळं जग मर्त्य आहे हे माहित आहे. पण मीसुद्धा? हो खरंच मीसुद्धा. मग मी घाबरावं का मरणाला? सगळेच मरणार. कुणाच्या मरणाला घाबरायचं मी? माझ्या? का?
आप मरे जग बुडे.
आपण मेलो तर संपलंच ना सगळं. मग भीती कुणाच्या मरणाची. इतर फुलपाखरांच्या?
दुपरचे दोन वाजलेत. मी ऑफिसला गेलेच नाहीये. प्रचंड उकडतंय. शरीराला आणि मनालाही. वरचा पंखासुद्धा हैराण वाटतोय ह्या उकाड्यानं. बाबा घरी नाही. आईसुद्धा नाही. बाबा गेलाय तयारी करायला. आई त्यांच्याकडे. विनय त्याच्या कामाला गेलाय.
ते एक वेगळं फुलपाखरू. जग बुडलं तरी काही फरक पडायचा नाही त्याला.
आणि मी इथं बसलेय काहीही न करता. माझ्याच तंद्रीत. आठवणींची जळमटं झाडत बसलेय. आठवणींना जळमटं म्हणायचं का? किती जवळच्या असतात काही आठवणी. पण जळमटंच. ज्या आठवणी रडू आणतात, त्या जळमटांसारख्याच झाडून टाकायला हव्यात. मी त्वेषाने झाडू फिरवतेय, पण जळमटं काही तुटेनात. उलट मीच त्या जळमटांत गुरफटंत चाललेय. असह्य होतं सगळं
आणि मग, ती असहायता बाहेर पडते, एक थेंब बनून, डोळ्यातून. एक मग दुसरा मग तिसरा.
आई मला बोलवायला येते. माझी असहायता कुणाला दिसू नये म्हणून मी त्या तिघांना पुसून टाकते. बाहेर जाते.
अंगणामध्ये गर्दी असते. त्यात बाबाही असतो. विनूही असतो. तो दिसल्यावर मला उगाचंच बरं वाटतं. तपशील पुसट होत जातात. डोळ्यांच्या काचांवर धुकं जमतं. आई बाजूलाच असते. जरा आधार वाटतो. खरा मला बाबा हवा असतो कारण मला रडायचं असतं मनसोक्त. पण तो खाली अंगणात असतो. काहीबाही काम करीत.
राम बोलो भाई राम.
संगीतात आकंठ बुडून जाणारी मी, ह्या खर्जातल्या सुरांनी विषण्ण होते.
तिला घेऊन जात असतात. तीच. माझी कुणीही नसलेली ती. शांत झोपलेली असते. सगळ्या विवंचनेतून सुटलेली. एखाद्या फुलपाखरासारखी.
रांगणाऱ्या मला पटकन कडेवर उचलून घेणारी ती, दुपारी दंगा करून तिची झोपमोड केली म्हणून मला ओरडणारी ती, तिच्या मुलाला भाऊबिजेला राखी बांधते म्हणून माझं कौतूक करणारी ती, माझ्यासाठी न चुकता वांग्याची भाजी आणून देणारी ती, दोन दात बाहेर काढून प्रेमळपणे हसणारी ती, कुणाच्या लग्नात मुलाकडची असूनही मुलीची पाठवणी होताना रडणारी ती, प्रेमळ ती, घाबरट ती, शरणागत ती.
शेवटच्या आजारात हॉस्पिटलमध्ये असाहाय झालेली ती आणि तिची असहायता माझ्या डोळ्यात उतरवणारे ते तीन पुसलेले थेंब.
मी बघत राहते. पांढरं कोरं करकरीत कापड. इतकं करकरीत की बांबूत घुसवताना करकरणारं. करकचून बांधलेली सुतळ. अबीर, बुक्का, फुलांच्या माळा. डोक्याला लावलेलं ठसठशीत कुंकू. आणि ती जायला निघते.
पुन्हा ते कर्णकर्कश संगीत. तिचा मुलगा पुढे. बाबा चटकन पुढे होतो एक बाजू पकडतो. एवढा पहाडासारखा कणखर माझा बाबा, पण त्याच्याही एका डोळ्यात पाणी चमकतं. त्याच्या मोठ्या बहिणीसारखी ती.
ती निघून जाते. आई बायकांच्या घोळक्यात सामील. मी तिथेच. एकटी.
फुलपाखरू पण एकटं.
दोन घटका सगळीकडे सामसूम असते.
बाहेरून गोड खिदळण्याचा आवाज येतो. मी बाहेर जाते. तिची नात जोरजोरात खिदळत असते. दोन वर्षाची ती. तिला काय समज?
तेही एक फुलपाखरू. मीही. बाबाही, आईही आणि विनयही. सगळेच. बांबू बांधणारे, पांढरं कापड करकरवणारे, अबीर बुक्का सांडणारे आणि ते कर्णकर्कश्श संगीत म्हणणारे.
आणि सगळे एकटे.
- संवादिनी
एक दिवस येतो. उनाड फुलपाखरासारखा. वाटतं आपणही फुलपाखरू व्हावं. ह्या फुलावरून त्या फुलावर जावं. शोषून घ्यावा सगळा मध. फुलपाखराचं आयुष्य ते किती? दोन दिवस? मग ह्या दोन दिवसात पर्वा कुणाची करायची आणि का? आपण आपल्या मस्तीत जगावं आणि आपण आपल्या मस्तीत मरावं.
आपण मरावं? खरंच आपण मरू का? सगळं जग मर्त्य आहे हे माहित आहे. पण मीसुद्धा? हो खरंच मीसुद्धा. मग मी घाबरावं का मरणाला? सगळेच मरणार. कुणाच्या मरणाला घाबरायचं मी? माझ्या? का?
आप मरे जग बुडे.
आपण मेलो तर संपलंच ना सगळं. मग भीती कुणाच्या मरणाची. इतर फुलपाखरांच्या?
दुपरचे दोन वाजलेत. मी ऑफिसला गेलेच नाहीये. प्रचंड उकडतंय. शरीराला आणि मनालाही. वरचा पंखासुद्धा हैराण वाटतोय ह्या उकाड्यानं. बाबा घरी नाही. आईसुद्धा नाही. बाबा गेलाय तयारी करायला. आई त्यांच्याकडे. विनय त्याच्या कामाला गेलाय.
ते एक वेगळं फुलपाखरू. जग बुडलं तरी काही फरक पडायचा नाही त्याला.
आणि मी इथं बसलेय काहीही न करता. माझ्याच तंद्रीत. आठवणींची जळमटं झाडत बसलेय. आठवणींना जळमटं म्हणायचं का? किती जवळच्या असतात काही आठवणी. पण जळमटंच. ज्या आठवणी रडू आणतात, त्या जळमटांसारख्याच झाडून टाकायला हव्यात. मी त्वेषाने झाडू फिरवतेय, पण जळमटं काही तुटेनात. उलट मीच त्या जळमटांत गुरफटंत चाललेय. असह्य होतं सगळं
आणि मग, ती असहायता बाहेर पडते, एक थेंब बनून, डोळ्यातून. एक मग दुसरा मग तिसरा.
आई मला बोलवायला येते. माझी असहायता कुणाला दिसू नये म्हणून मी त्या तिघांना पुसून टाकते. बाहेर जाते.
अंगणामध्ये गर्दी असते. त्यात बाबाही असतो. विनूही असतो. तो दिसल्यावर मला उगाचंच बरं वाटतं. तपशील पुसट होत जातात. डोळ्यांच्या काचांवर धुकं जमतं. आई बाजूलाच असते. जरा आधार वाटतो. खरा मला बाबा हवा असतो कारण मला रडायचं असतं मनसोक्त. पण तो खाली अंगणात असतो. काहीबाही काम करीत.
राम बोलो भाई राम.
संगीतात आकंठ बुडून जाणारी मी, ह्या खर्जातल्या सुरांनी विषण्ण होते.
तिला घेऊन जात असतात. तीच. माझी कुणीही नसलेली ती. शांत झोपलेली असते. सगळ्या विवंचनेतून सुटलेली. एखाद्या फुलपाखरासारखी.
रांगणाऱ्या मला पटकन कडेवर उचलून घेणारी ती, दुपारी दंगा करून तिची झोपमोड केली म्हणून मला ओरडणारी ती, तिच्या मुलाला भाऊबिजेला राखी बांधते म्हणून माझं कौतूक करणारी ती, माझ्यासाठी न चुकता वांग्याची भाजी आणून देणारी ती, दोन दात बाहेर काढून प्रेमळपणे हसणारी ती, कुणाच्या लग्नात मुलाकडची असूनही मुलीची पाठवणी होताना रडणारी ती, प्रेमळ ती, घाबरट ती, शरणागत ती.
शेवटच्या आजारात हॉस्पिटलमध्ये असाहाय झालेली ती आणि तिची असहायता माझ्या डोळ्यात उतरवणारे ते तीन पुसलेले थेंब.
मी बघत राहते. पांढरं कोरं करकरीत कापड. इतकं करकरीत की बांबूत घुसवताना करकरणारं. करकचून बांधलेली सुतळ. अबीर, बुक्का, फुलांच्या माळा. डोक्याला लावलेलं ठसठशीत कुंकू. आणि ती जायला निघते.
पुन्हा ते कर्णकर्कश संगीत. तिचा मुलगा पुढे. बाबा चटकन पुढे होतो एक बाजू पकडतो. एवढा पहाडासारखा कणखर माझा बाबा, पण त्याच्याही एका डोळ्यात पाणी चमकतं. त्याच्या मोठ्या बहिणीसारखी ती.
ती निघून जाते. आई बायकांच्या घोळक्यात सामील. मी तिथेच. एकटी.
फुलपाखरू पण एकटं.
दोन घटका सगळीकडे सामसूम असते.
बाहेरून गोड खिदळण्याचा आवाज येतो. मी बाहेर जाते. तिची नात जोरजोरात खिदळत असते. दोन वर्षाची ती. तिला काय समज?
तेही एक फुलपाखरू. मीही. बाबाही, आईही आणि विनयही. सगळेच. बांबू बांधणारे, पांढरं कापड करकरवणारे, अबीर बुक्का सांडणारे आणि ते कर्णकर्कश्श संगीत म्हणणारे.
आणि सगळे एकटे.
- संवादिनी
Thursday, March 13, 2008
मी, वाढदिवस आणि आई
आईचा वाढदिवस झाला. मला माझा स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला अजिबात आवडत नाही. पण इतरांचा मात्र मनापासून आवडतो. आपण असं सेंटर ऑफ अटेन्शन झालेलं मला नाही आवडतं. आणि माझा वाढदिवस हे एक प्रकारचं खाजगी प्रकरण आहे असंच मला वाटतं. अर्थात मी जे फंडे माझ्या वाढदिवसाला लावते ते दुसऱ्यांच्या वाढदिवसाला लावत नाही. म्हणूनच घरातल्या बाकी तिघांचेही वाढदिवस जोरात साजरे व्हावेत असं मला मनापासून वाटतं.
तसा आईच्या वाढदिवसालासुद्धा. तिला गिफ्ट काय द्यायचं, इथपासून साजरा कसा करायचा इथपर्यंत, सगळ्या तयाऱ्या गेले काही दिवस चालू होत्या अर्थात तिला थांगपत्ता न लागू देता. सुटीच्या वारी वाढदिवस असल्याने बरंच होतं.
सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरू झालं म्हणजे सकाळी लवकर उठून विन्याने चहा करायचा आणि मग आईला उठवायचं. चहा त्याने केला, पण तो करताना मला दहा वेळा उठवून पंधरा प्रश्न विचारले. आणि वाढदिवसाचं सार्वजनिक कार्य असल्याने नेहमीप्रमाणे मला त्याच्यावर उचकता आलं नाही. अर्थात मी काही चहा एक्स्पर्ट नव्हे. पण त्याच्यापेक्षा मी दहा पंधरा कप जास्तच बनवले असतील म्हणून माझा सल्ला. आयता चहा झकासंच होतो तसा विनयचाही झाला. मग बाबांनी त्यांच्या जेपी स्टाइलमध्ये जाहीर केलं की आज आईला स्वैपाकघरात बंदी.
सुटीच्या दिवशी सकाळी पेपरसाठी आमच्या घरात शब्दशः मारामारी होते पण आज नाही. मी स्वतःहून जाऊन तिला हवा तो पेपर घेऊ दिला. तिने मराठी पेपर घेतला. डी.एन.ए. च्या झकपक आफ्टर अवर्स पुरवण्या विन्याकडे सरकवून मला उरलेला पेपर मिळाला. इंग्रजी पेपर वाचायला मला आवडत नाही. पण आज कुणाला काही सांगायची सोय होती का?
बाबांनी पोह्यांचा घाट घातला होता. मी त्यांना आडून आडून फ्रेंच टोस्ट किंवा ऑम्लेट किंवा तत्सम सोपे पदार्थ करायचा सल्ला दिला होता पण तो त्यांनी धुडकावला. रुचिरात बघून कांदे पोहे कुणी केलेले तुम्ही ऐकलेत. बाबांनी केले. आणि ते सपशेल फसले. अर्धे जळून पातेल्यालाच चिकटले. आणि आईला आज स्वैपाकघरात बंदी. मग सगळी निस्तरपट्टी माझ्या वाट्याला लागली. बाबा जाऊन चक्क स्कूटरवरून जाऊन इडली घेऊन आले.
दुपारची महत्त्वाची जबाबदारी माझी होती. ती म्हणजे स्वैपाकाची. माझ्यासारखी बल्लवाचारीण असल्यावर काय बनवायचं हा मोठा प्रश्न. कारण जे बनेल ते खाता आलं पाहिजे, बनवायला एकदम सोपं हवं आणि नंतरची निस्तरपट्टी कमीत कमी हवी. ह्या सगळ्या अटी पाळत पाळत शेवटी पावभाजी ठरली. तरी हा दुपारी जेवायला खायचा पदार्थ नाही, असा मोडता विन्याने घातलाच. माझी स्वस्तात सुटका झालेली त्याला कधीच पाहवत नाही. पण शेवटी, प्रॉपर जेवायचे पदार्थ फेल जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बाबांनी मला पाठिंबा दिला. पावभाजी झकास झाली. थोडी तिखट झाली. त्यामुळे पाण्याबरोबर खावी लागली. मला खूप आवडली. आईला माहीत नाही आवडली का. पण ती म्हणाली तरी, नाक पुसत पुसत.
संध्याकाळी मी आई बाबांसाठी पिक्चरची तिकिटं काढली. ती दोघं तिथं गेली. विन्या क्रिकेट खेळायला (बाबांच्या शब्दात उकिरडा फुंकायला) गेला. मग घरात काय आम्ही दोघंच मी, और मेरी तनहाई. मग काय? जश्या अक्सर करतो, तश्या आम्ही बाते करीत बसलो.
एक दिवस आई किचनमध्ये नाही तर किती गोंधळ उडाला. गोष्टी चुकत नाहीत तोपर्यंत त्या बरोबर चालल्यात हे कळतंच नाही. किती कष्ट आहेत किचन सांभाळण्यात? अशा दिवशीच ते कळतं. वळेल तेव्हा खरं.
वाटलं जेवढं ती माझ्यासाठी करते तेवढं मी तिच्यासाठी करते का? तिचं ऐकते का? तिच्या बोलण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष का करते? मग फोटो काढून बसले जुने. एक आई बाबांचा तरुणपणाचा फोटो आहे. मी अगदी पाच सहा वर्षांची असेन तेव्हा. खूप आवडतो मला. आईच्या डोळ्यात जिद्द दिसते एक. संसार उभा करायची. पिचून गेली असेल का ही जिद्द आमचं करता करता?
मग जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत गेल्या. मला शाळेत घेऊन जाणारी आई. इतर मुलांच्या आया मधल्या सुट्टीत येतात, पण माझी आई नाही म्हणून तिच्याकडे रडणारी मी. माझ्यासाठी कुणाशीतरी भांडणारी आणि भांडण्याचा मुळात पिंडच नसल्याने डोळ्यात आलेलं पाणी लपवणारी आई, अभ्यास घेणारी आई, ओरडणारी आई, माझ्याशी भांडणारी आई. असे काही विचार आले की एकदम रडायला येतं. लाटांवर लाटा येत राहतात अगदी भरती ओसरेपर्यंत.
अगदी तारे झमीन पर मधल्या इशान सारखं...
मै कभी बतलाता नही, पर अंधेरेसे डरता हूं मै मा.
युं तो मै, दिखलाता नही, पर तेरी परवाह करता हूं मै मा.
तुझे सब है पता है ना मा. मेरी मां....
मग रात्री आई बाबा आल्यावर, मी आईला, खास कुणालाही न सांगता आणलेली भेट दिली. एक कॅन्व्हासची वही आणि स्केचींगची पेन्सिल. तिची चित्रकला खूप छान आहे. पण कुठे हरवून बसली कोण जाणे? ती देणगी दादांची. दादा म्हणजे आईचे बाबा. अप्रतिम चित्र काढायचे. तिला सांगितलं की चित्र काढ. मनात असेल ते काढ. खूप आनंद झाला तिला. मनापासून.
एकंदरीत वाढदिवस जोरात साजरा झाला.
- संवादिनी
तसा आईच्या वाढदिवसालासुद्धा. तिला गिफ्ट काय द्यायचं, इथपासून साजरा कसा करायचा इथपर्यंत, सगळ्या तयाऱ्या गेले काही दिवस चालू होत्या अर्थात तिला थांगपत्ता न लागू देता. सुटीच्या वारी वाढदिवस असल्याने बरंच होतं.
सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरू झालं म्हणजे सकाळी लवकर उठून विन्याने चहा करायचा आणि मग आईला उठवायचं. चहा त्याने केला, पण तो करताना मला दहा वेळा उठवून पंधरा प्रश्न विचारले. आणि वाढदिवसाचं सार्वजनिक कार्य असल्याने नेहमीप्रमाणे मला त्याच्यावर उचकता आलं नाही. अर्थात मी काही चहा एक्स्पर्ट नव्हे. पण त्याच्यापेक्षा मी दहा पंधरा कप जास्तच बनवले असतील म्हणून माझा सल्ला. आयता चहा झकासंच होतो तसा विनयचाही झाला. मग बाबांनी त्यांच्या जेपी स्टाइलमध्ये जाहीर केलं की आज आईला स्वैपाकघरात बंदी.
सुटीच्या दिवशी सकाळी पेपरसाठी आमच्या घरात शब्दशः मारामारी होते पण आज नाही. मी स्वतःहून जाऊन तिला हवा तो पेपर घेऊ दिला. तिने मराठी पेपर घेतला. डी.एन.ए. च्या झकपक आफ्टर अवर्स पुरवण्या विन्याकडे सरकवून मला उरलेला पेपर मिळाला. इंग्रजी पेपर वाचायला मला आवडत नाही. पण आज कुणाला काही सांगायची सोय होती का?
बाबांनी पोह्यांचा घाट घातला होता. मी त्यांना आडून आडून फ्रेंच टोस्ट किंवा ऑम्लेट किंवा तत्सम सोपे पदार्थ करायचा सल्ला दिला होता पण तो त्यांनी धुडकावला. रुचिरात बघून कांदे पोहे कुणी केलेले तुम्ही ऐकलेत. बाबांनी केले. आणि ते सपशेल फसले. अर्धे जळून पातेल्यालाच चिकटले. आणि आईला आज स्वैपाकघरात बंदी. मग सगळी निस्तरपट्टी माझ्या वाट्याला लागली. बाबा जाऊन चक्क स्कूटरवरून जाऊन इडली घेऊन आले.
दुपारची महत्त्वाची जबाबदारी माझी होती. ती म्हणजे स्वैपाकाची. माझ्यासारखी बल्लवाचारीण असल्यावर काय बनवायचं हा मोठा प्रश्न. कारण जे बनेल ते खाता आलं पाहिजे, बनवायला एकदम सोपं हवं आणि नंतरची निस्तरपट्टी कमीत कमी हवी. ह्या सगळ्या अटी पाळत पाळत शेवटी पावभाजी ठरली. तरी हा दुपारी जेवायला खायचा पदार्थ नाही, असा मोडता विन्याने घातलाच. माझी स्वस्तात सुटका झालेली त्याला कधीच पाहवत नाही. पण शेवटी, प्रॉपर जेवायचे पदार्थ फेल जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बाबांनी मला पाठिंबा दिला. पावभाजी झकास झाली. थोडी तिखट झाली. त्यामुळे पाण्याबरोबर खावी लागली. मला खूप आवडली. आईला माहीत नाही आवडली का. पण ती म्हणाली तरी, नाक पुसत पुसत.
संध्याकाळी मी आई बाबांसाठी पिक्चरची तिकिटं काढली. ती दोघं तिथं गेली. विन्या क्रिकेट खेळायला (बाबांच्या शब्दात उकिरडा फुंकायला) गेला. मग घरात काय आम्ही दोघंच मी, और मेरी तनहाई. मग काय? जश्या अक्सर करतो, तश्या आम्ही बाते करीत बसलो.
एक दिवस आई किचनमध्ये नाही तर किती गोंधळ उडाला. गोष्टी चुकत नाहीत तोपर्यंत त्या बरोबर चालल्यात हे कळतंच नाही. किती कष्ट आहेत किचन सांभाळण्यात? अशा दिवशीच ते कळतं. वळेल तेव्हा खरं.
वाटलं जेवढं ती माझ्यासाठी करते तेवढं मी तिच्यासाठी करते का? तिचं ऐकते का? तिच्या बोलण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष का करते? मग फोटो काढून बसले जुने. एक आई बाबांचा तरुणपणाचा फोटो आहे. मी अगदी पाच सहा वर्षांची असेन तेव्हा. खूप आवडतो मला. आईच्या डोळ्यात जिद्द दिसते एक. संसार उभा करायची. पिचून गेली असेल का ही जिद्द आमचं करता करता?
मग जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत गेल्या. मला शाळेत घेऊन जाणारी आई. इतर मुलांच्या आया मधल्या सुट्टीत येतात, पण माझी आई नाही म्हणून तिच्याकडे रडणारी मी. माझ्यासाठी कुणाशीतरी भांडणारी आणि भांडण्याचा मुळात पिंडच नसल्याने डोळ्यात आलेलं पाणी लपवणारी आई, अभ्यास घेणारी आई, ओरडणारी आई, माझ्याशी भांडणारी आई. असे काही विचार आले की एकदम रडायला येतं. लाटांवर लाटा येत राहतात अगदी भरती ओसरेपर्यंत.
अगदी तारे झमीन पर मधल्या इशान सारखं...
मै कभी बतलाता नही, पर अंधेरेसे डरता हूं मै मा.
युं तो मै, दिखलाता नही, पर तेरी परवाह करता हूं मै मा.
तुझे सब है पता है ना मा. मेरी मां....
मग रात्री आई बाबा आल्यावर, मी आईला, खास कुणालाही न सांगता आणलेली भेट दिली. एक कॅन्व्हासची वही आणि स्केचींगची पेन्सिल. तिची चित्रकला खूप छान आहे. पण कुठे हरवून बसली कोण जाणे? ती देणगी दादांची. दादा म्हणजे आईचे बाबा. अप्रतिम चित्र काढायचे. तिला सांगितलं की चित्र काढ. मनात असेल ते काढ. खूप आनंद झाला तिला. मनापासून.
एकंदरीत वाढदिवस जोरात साजरा झाला.
- संवादिनी
Thursday, March 6, 2008
आजी, गाणं आणि दुःख
मला एकदम निराश बिराश वाटायला लागलं की दोनच गोष्टी मदतीला येतात. नाटक चालू असेल तर नाटक नाहीतर तानपुरा. अर्थात दुःखाची नवलाईही पाच दिवसाचीच असते. पहिले दोन दिवस आपल्याला वाटत होतं ते न घडण्याचं दुःख आणि उरलेले तीन बॅक टू नॉर्मल येण्यासाठी लागतात म्हणून.
रविवारी संध्याकाळी असंच डिप्रेसिंग वाटत होतं. हो नाही करता करता तानपुरा काढलाच. यमनाचे आलाप सुरू केले. "म" बरोबर लागतोय असं वाटलं. विनयला म्हटलं बस जरा तबला घेऊन. "ओरी आली पियाबिना" सुरू केलं. एवढं बरं वाटलं ना? सगळं सगळं विसरवून टाकायची जादू आहे संगीतात नाही? तो एक "नि", तो एक "म" बस्स. बाकी काही दिसतंच नाही डोळ्यापुढे.
तेवढ्यात बाबा आले, ते बसले, आई आली, तीही बसली. आमच्या मजल्यावरचे भावे काका आहेत त्यांनाही बाबांनी बोलावलं. ते उत्तम पेटी (खरंतर संवादिनी म्हणायला हवं) वाजवतात. बैठक जमली. अजूनही दोघं तिघं आली ऐकायला. मी काही फार गायले नाही. पण बाबांनी त्यांची हुकमी नाट्यगीतं म्हटली, देवाघरचे ज्ञात कुणाला, रम्य ही स्वर्गाहून लंका. मग मला खास भावेकाकांसाठी "का धरला परदेस" गायला लागलं. त्यांचं अतिशय आवडतं गाणं.
किती दिवस झाले अशी मैफल जमली नव्हती. ह्या मैफलीला ना उत्तम गायक ना श्रोते. आम्हीच गायक, आम्हीच वादक, आम्हीच सबकुछ. पण तरीही आनंद अगणित. वर्णनच करता येणार नाही. अर्थात बऱ्याच दिवसांनी झाली म्हणून मजा आली. दर रविवारी झाली असती तर कदाचित इतकी मजा आलीही नसती.
पण असं काही उत्स्फूर्तपणे घडलं की फार छान वाटतं. एकदम "जिप्सी". खावं, प्यावं, गाणी म्हणावीत, गप्पा माराव्यात, पुढच्या गावी जावं, पुन्हा तेच करावं. तो अभ्यास, ती नोकरी, लग्न, असल्या कटकटी कुणी निर्माण केल्या कुणास ठाऊक?
अर्थात आमच्या ह्या बैठकीची निस्तरपट्टी आईला करायला लागली. नाही म्हटलं तरी चहा पाणी करावंच लागतं.
असो तर सांगायचा मुद्दा हा, की रात्रीपर्यंत माझं डिप्रेशन कुठल्या कुठे पळालं. पुन्हा नवं वाटायला लागलं. आता नवं वाटायला लागलं म्हणजे काय? लिहिणं कठीण आहे.
उगाचंच आजीची आठवण आली. तिच्या भावंडांपैकी सगळे ह्या ना त्या प्रकारे शास्त्रीय संगीताशी जोडलेले. पण तिला काही जमलं नाही, एवढं वाईट वाटायचं तिला त्याचं. जाऊदे. आजी गेली तिच्याबरोबर तिला न जमलेलं गाणंही गेलं.
लाईफ जस्ट मूव्हस ऑन.
तिच्या गाण्यासाठी थांबलं नाही आणि माझ्या दुःखासाठीही.
- संवादिनी
रविवारी संध्याकाळी असंच डिप्रेसिंग वाटत होतं. हो नाही करता करता तानपुरा काढलाच. यमनाचे आलाप सुरू केले. "म" बरोबर लागतोय असं वाटलं. विनयला म्हटलं बस जरा तबला घेऊन. "ओरी आली पियाबिना" सुरू केलं. एवढं बरं वाटलं ना? सगळं सगळं विसरवून टाकायची जादू आहे संगीतात नाही? तो एक "नि", तो एक "म" बस्स. बाकी काही दिसतंच नाही डोळ्यापुढे.
तेवढ्यात बाबा आले, ते बसले, आई आली, तीही बसली. आमच्या मजल्यावरचे भावे काका आहेत त्यांनाही बाबांनी बोलावलं. ते उत्तम पेटी (खरंतर संवादिनी म्हणायला हवं) वाजवतात. बैठक जमली. अजूनही दोघं तिघं आली ऐकायला. मी काही फार गायले नाही. पण बाबांनी त्यांची हुकमी नाट्यगीतं म्हटली, देवाघरचे ज्ञात कुणाला, रम्य ही स्वर्गाहून लंका. मग मला खास भावेकाकांसाठी "का धरला परदेस" गायला लागलं. त्यांचं अतिशय आवडतं गाणं.
किती दिवस झाले अशी मैफल जमली नव्हती. ह्या मैफलीला ना उत्तम गायक ना श्रोते. आम्हीच गायक, आम्हीच वादक, आम्हीच सबकुछ. पण तरीही आनंद अगणित. वर्णनच करता येणार नाही. अर्थात बऱ्याच दिवसांनी झाली म्हणून मजा आली. दर रविवारी झाली असती तर कदाचित इतकी मजा आलीही नसती.
पण असं काही उत्स्फूर्तपणे घडलं की फार छान वाटतं. एकदम "जिप्सी". खावं, प्यावं, गाणी म्हणावीत, गप्पा माराव्यात, पुढच्या गावी जावं, पुन्हा तेच करावं. तो अभ्यास, ती नोकरी, लग्न, असल्या कटकटी कुणी निर्माण केल्या कुणास ठाऊक?
अर्थात आमच्या ह्या बैठकीची निस्तरपट्टी आईला करायला लागली. नाही म्हटलं तरी चहा पाणी करावंच लागतं.
असो तर सांगायचा मुद्दा हा, की रात्रीपर्यंत माझं डिप्रेशन कुठल्या कुठे पळालं. पुन्हा नवं वाटायला लागलं. आता नवं वाटायला लागलं म्हणजे काय? लिहिणं कठीण आहे.
उगाचंच आजीची आठवण आली. तिच्या भावंडांपैकी सगळे ह्या ना त्या प्रकारे शास्त्रीय संगीताशी जोडलेले. पण तिला काही जमलं नाही, एवढं वाईट वाटायचं तिला त्याचं. जाऊदे. आजी गेली तिच्याबरोबर तिला न जमलेलं गाणंही गेलं.
लाईफ जस्ट मूव्हस ऑन.
तिच्या गाण्यासाठी थांबलं नाही आणि माझ्या दुःखासाठीही.
- संवादिनी
Thursday, February 28, 2008
मँगलोर, तो आणि पंचावन्न पाढे
काल परत आले. आम्ही सगळेच आलो. मागच्या पोस्ट मध्ये लिहिलं नाही पण तोही मँगलोरला आला होता. त्याच्या डिपार्टमेंटच्या कामासाठी.
खूप मजा आली आणि नाहीही. तो खरंच खूप चांगला आहे. खूप गप्पा मारल्या त्याच्याशी मी. भटकलो खूप. त्याचं आजोळ आहे मँगलोर! आणि जुनं घरपण आहे त्याच्या आजोबांचं. तिथे तो घेऊन गेला. बीचवर घेऊन गेला. म्हणजे मला एकटीलाच नाही, सगळ्यांनाच. पण त्याच्याशी खूप छान मैत्री झाली. रविवारी म्हणाला फिश खायला जाऊ. बाकी सगळे कट्टर व्हेजी लोकं. मग दोघंच गेलो.
ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. जी व्यक्ती तुम्हाला आवडते तिच्यासोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?
पहिली धडधड, त्यात वेंधळेपणा करणं, हेही मी साग्रसंगीत केलं, नेहेमीप्रमाणे. मग हळूहळू तो बोलत गेला आणि मीही. माझं घर, आई, बाबा, विनय, माझी चाळ, माझी शाळा, मैत्रिणी, पुस्तकं, नाटक, गाणं, सगळं सगळं.
तोही बोलत गेला. त्याच्याबद्दल. त्याच्या बायकोबद्दल!
हो. त्याचं लग्न झालंय. गेल्याच वर्षी. आधी चौकशी..
जाऊदे. काय लिहू आणि काय नाही? मला तो आवडतो. त्याचं बोलणं, वगणं, हसणं, गाणं, खिदळणं. सगळं सगळं मनापासून आवडतं. पण त्याने काहीही फरक आता पडणार नाही. पुढचे सगळे रस्तेच खुंटलेत.
फार वाईट अवस्था झाली माझी तिथे. अचानक लक्षच उडालं सगळ्यातलं. तो काय बोलतोय मी काय बोलतेय? काय खातेय? खातेय ते चांगलं आहे की वाईट? काही काही कळत नव्हतं. हॉटेलवर परत आले तर रडायचीसुद्धा खोटी. माझी रूम पार्टनर होतीच. मग काय? खोटं खोटं हसत सांगावं लागलं फिश खूप आवडलं म्हणून.
रात्रभर झोप नाही. सतत डोक्यात तेच चालू होतं. तो मिळणार नाही म्हणून दुःख की मी सपशेल गंडले म्हणून दुःख? ते शेवटपर्यंत कळलं नाही. खरंतर मी त्याला पुरेशी ओळखत नव्हतेच प्रेम बीम करायला, मग मी का गुरफटत गेले?
पण मग विचार केला. जर मला माहीत असतं की त्याचं लग्न झालंय आधीच, तरीही आवडलाच असता ना तो मला? म्हणजे एक चांगला मित्र झालाच असता ना? नाही झालाच तो चांगला मित्र माझा. सगळंच मोठं विचित्र आहे. मी स्वतःलाच समजवू शकत नाहीये की मी त्याच्याशी मैत्री करू शकतेच ना? देअर कॅन बी लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे लग्न. लाईफ पार्टनर वगैरे अशक्य आहे. ते तर मी कधीच डोक्यातून काढलं आहे. पण ते नाही म्हणून अजिबात बोलायचंच नाही असं थोडीच आहे? आणि त्याला बिचाऱ्याला तर यातलं काही माहीत सुद्धा नाही.
प्रेमभंग नाही म्हणता येणार पण जवळपासचं काहीतरी अनुभवायला मिळालं. खूप त्रास झाला. पण मलाच बरं वाटलं. मी स्थितप्रज्ञपणे विचार करू शकले म्हणून.
घरी गेल्यावर आई म्हणाली. तिच्या मैत्रिणीने एक स्थळ सुचवलंय म्हणून. फोटो पसंत आहे त्यांना भेटायचंय. खरंतर डोक्यात तिडीक जायला हवी होती, पण चक्क बरं वाटलं. आपण कुणालातरी आवडलो ही भावना अशा वेळी हात देते. आईने फोटो दाखवला. मुलगा चांगला वाटला. पण तो परदेशी आहे. आई वडील येणारेत त्याचे, जर मला फोटो आवडला तर. मी सांगितलं आईला, नीट बघते आणि सांगते.
सध्यातरी मी सरळ रेषेत विचार करू शकेन कशाबद्धलही असं वाटत नाहीये. कुणी चांगली शंभर ठिपके शंभर ओळींची नक्षीदार रांगोळी काढायला घेतली आणि ती पूर्ण व्हायच्या आतच वाऱ्यावर उधळली गेली, तर काढणाऱ्याला कसं वाटेल? तसंच काहीसं मला वाटलं. रांगोळी पुन्हा काढता येईल, दहादा काढता येईल, पण ती अशीच जमेल ह्याची काय खात्री?
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
- संवादिनी
खूप मजा आली आणि नाहीही. तो खरंच खूप चांगला आहे. खूप गप्पा मारल्या त्याच्याशी मी. भटकलो खूप. त्याचं आजोळ आहे मँगलोर! आणि जुनं घरपण आहे त्याच्या आजोबांचं. तिथे तो घेऊन गेला. बीचवर घेऊन गेला. म्हणजे मला एकटीलाच नाही, सगळ्यांनाच. पण त्याच्याशी खूप छान मैत्री झाली. रविवारी म्हणाला फिश खायला जाऊ. बाकी सगळे कट्टर व्हेजी लोकं. मग दोघंच गेलो.
ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. जी व्यक्ती तुम्हाला आवडते तिच्यासोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?
पहिली धडधड, त्यात वेंधळेपणा करणं, हेही मी साग्रसंगीत केलं, नेहेमीप्रमाणे. मग हळूहळू तो बोलत गेला आणि मीही. माझं घर, आई, बाबा, विनय, माझी चाळ, माझी शाळा, मैत्रिणी, पुस्तकं, नाटक, गाणं, सगळं सगळं.
तोही बोलत गेला. त्याच्याबद्दल. त्याच्या बायकोबद्दल!
हो. त्याचं लग्न झालंय. गेल्याच वर्षी. आधी चौकशी..
जाऊदे. काय लिहू आणि काय नाही? मला तो आवडतो. त्याचं बोलणं, वगणं, हसणं, गाणं, खिदळणं. सगळं सगळं मनापासून आवडतं. पण त्याने काहीही फरक आता पडणार नाही. पुढचे सगळे रस्तेच खुंटलेत.
फार वाईट अवस्था झाली माझी तिथे. अचानक लक्षच उडालं सगळ्यातलं. तो काय बोलतोय मी काय बोलतेय? काय खातेय? खातेय ते चांगलं आहे की वाईट? काही काही कळत नव्हतं. हॉटेलवर परत आले तर रडायचीसुद्धा खोटी. माझी रूम पार्टनर होतीच. मग काय? खोटं खोटं हसत सांगावं लागलं फिश खूप आवडलं म्हणून.
रात्रभर झोप नाही. सतत डोक्यात तेच चालू होतं. तो मिळणार नाही म्हणून दुःख की मी सपशेल गंडले म्हणून दुःख? ते शेवटपर्यंत कळलं नाही. खरंतर मी त्याला पुरेशी ओळखत नव्हतेच प्रेम बीम करायला, मग मी का गुरफटत गेले?
पण मग विचार केला. जर मला माहीत असतं की त्याचं लग्न झालंय आधीच, तरीही आवडलाच असता ना तो मला? म्हणजे एक चांगला मित्र झालाच असता ना? नाही झालाच तो चांगला मित्र माझा. सगळंच मोठं विचित्र आहे. मी स्वतःलाच समजवू शकत नाहीये की मी त्याच्याशी मैत्री करू शकतेच ना? देअर कॅन बी लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे लग्न. लाईफ पार्टनर वगैरे अशक्य आहे. ते तर मी कधीच डोक्यातून काढलं आहे. पण ते नाही म्हणून अजिबात बोलायचंच नाही असं थोडीच आहे? आणि त्याला बिचाऱ्याला तर यातलं काही माहीत सुद्धा नाही.
प्रेमभंग नाही म्हणता येणार पण जवळपासचं काहीतरी अनुभवायला मिळालं. खूप त्रास झाला. पण मलाच बरं वाटलं. मी स्थितप्रज्ञपणे विचार करू शकले म्हणून.
घरी गेल्यावर आई म्हणाली. तिच्या मैत्रिणीने एक स्थळ सुचवलंय म्हणून. फोटो पसंत आहे त्यांना भेटायचंय. खरंतर डोक्यात तिडीक जायला हवी होती, पण चक्क बरं वाटलं. आपण कुणालातरी आवडलो ही भावना अशा वेळी हात देते. आईने फोटो दाखवला. मुलगा चांगला वाटला. पण तो परदेशी आहे. आई वडील येणारेत त्याचे, जर मला फोटो आवडला तर. मी सांगितलं आईला, नीट बघते आणि सांगते.
सध्यातरी मी सरळ रेषेत विचार करू शकेन कशाबद्धलही असं वाटत नाहीये. कुणी चांगली शंभर ठिपके शंभर ओळींची नक्षीदार रांगोळी काढायला घेतली आणि ती पूर्ण व्हायच्या आतच वाऱ्यावर उधळली गेली, तर काढणाऱ्याला कसं वाटेल? तसंच काहीसं मला वाटलं. रांगोळी पुन्हा काढता येईल, दहादा काढता येईल, पण ती अशीच जमेल ह्याची काय खात्री?
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
- संवादिनी
Thursday, February 21, 2008
मँगलोर आणि मंजूनाथाची कृपा
आपल्याला वाटतं आपण एकटे असतो. कुणाचीतरी सोबत असावी असं वाटत असतं. पण ती सोबत खूप खूप दूर आहे हे माहीत असतं. सगळं कसं बेचव, निरस वाटत राहतं.
आणि कसल्या चाव्या फिरतात कोण जाणे?
आले मंजूनाथाच्या मना तेथे कोणाचे चालेना. अचानक वसंत बहरतो, कळ्यांची फुलं होतात, फुलांच्या सुगंधाने आसमंत दरवळतो, सूर्यसुद्धा शीतल वाटायला लागतो, दिवसा चांदण्यांची स्वप्न पडतायत की काय असं वाटायला लागतं. पण ते स्वप्न नसतंच मुळी. आपणंच आपल्या हाताला चिमटा काढून बघतो. आणि दुखलेल्या चिमट्याच्या वळातच आपल्याला सर्वाधिक सूख मिळतं. कारण जे अशक्य वाटत असतं ते घडतं.
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
आता एवढंच. पुढच्या आठवड्यात मुंबईत आले की सविस्तर लिहिणं होईलंच.
आणि कसल्या चाव्या फिरतात कोण जाणे?
आले मंजूनाथाच्या मना तेथे कोणाचे चालेना. अचानक वसंत बहरतो, कळ्यांची फुलं होतात, फुलांच्या सुगंधाने आसमंत दरवळतो, सूर्यसुद्धा शीतल वाटायला लागतो, दिवसा चांदण्यांची स्वप्न पडतायत की काय असं वाटायला लागतं. पण ते स्वप्न नसतंच मुळी. आपणंच आपल्या हाताला चिमटा काढून बघतो. आणि दुखलेल्या चिमट्याच्या वळातच आपल्याला सर्वाधिक सूख मिळतं. कारण जे अशक्य वाटत असतं ते घडतं.
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
आता एवढंच. पुढच्या आठवड्यात मुंबईत आले की सविस्तर लिहिणं होईलंच.
Thursday, February 14, 2008
मी आणि बाबा
आपण ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडू शकतो असे थोडेच जण असतात. माझ्यासाठी माझे बाबा तसेच आहेत. खरंखरं सांगायचं तर मला आईपेक्षा बाबा जवळचे वाटतात. म्हणजे आई आवडत नाही असं नाही. पण बाबा इज समवन स्पेशल. लहानपणापासूनच मला त्यांचा ओढा जास्त. आरडाओरड्याचं काम आईचं. ती म्हणते तसा सगळा वाईटपणा तिनं घ्यायचा. आणि त्यावर मलम लावायला बाबा. त्यामुळे नाही म्हटलं तरी बाबांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाच.
पण ते आहेतच तसे. त्यांना काही चुकतंय असं वाटलं तर ते फक्त त्यांना तसं वाटतंय हे सुचवतात. कुणाची चूक आहे. कशी सुधारायची वगैरे निर्णय ते माझ्यावर सोपवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी केलेल्या चुका ते आम्हाला सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. स्वतःच्या चुका मान्य करणं किती कठीण आहे.
ह्या रविवारी मी दुपारी नाटकाच्या तालमीवरून आले. चहा पीत निवांत लोकरंग वाचत बसले होते. चार साडेचार झाले असतील. तर हे आले. उगाचच नाटक कुठपर्यंत आलंय वगैरे चौकश्या केल्या. मग म्हणाले चल पाणी पुरी खायला जाऊ. मी कशाला नाही म्हणतेय. आईला विचारलं, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणाली. विनयला क्रिकेट खेळायला जायचं होतं, त्यामुळे तो आला नाही.
सहा वाजता मी आणि बाबा गेलो बाहेर. पाणी पुरी खाल्ली, नेहमीप्रमाणे एक प्लेट झाल्यावर दुसरी अर्धी अर्धी खाल्ली. मग म्हणाले चल कॉफी पिऊ. म्हटलं चला. नेहमी मी म्हणते कॉफी कॉफी. आज हे म्हणतायत तर जाऊया. सीसीडी मध्ये गेलो. तिथे माझी मैत्रीण भेटली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि मी आमच्या तातांसोबत. जरा ऑकवर्ड झालं. का? माहीत नाही? कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल.
मी माझी नेहमीची ट्रॉपिकल आईस्बर्ग घेतली. थंडीचं कारण देत बाबांनी मलाच कोणती तरी गरम गरम कॉफी ऑर्डर करायला सांगितली. एकात एक विषय गुंफत त्यांनी तो माझ्या करिअर आणि लग्नावर आणून सोडला. मला कळलंच नाही. मी त्यांना सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधी करायचंय? म्हटलं माहीत नाही. मग हसत हसत म्हणाले, ठीक आहे.
उगाचच मला त्यांना त्या मिशीवाल्याबद्दल सांगावंसं वाटलं. मग विचार केला आता नको. अजून नीट ओळखही नाही त्याची. जाऊदे. मग मीच त्यांना त्यांच्या कॉलेजातल्या मैत्रिणींबद्दल विचारलं. तसं अनेकदा ऐकलंय पण बाबा सांगायला लागले की ऐकायला मजा येते. तेपण बिंधास्त एखाद्या मित्राला सांगावं तसं त्यांचं तरुणपण मला, विन्याला सांगतात.
एकंदरीत काय तर संध्याकाळ मजेत गेली. पण एक वॉर्निंग देऊनच. कारण जेव्हा बाबा कॉफी प्यायला घेऊन जातात आणि एखादा विषय काढतात. समजावं की आता खरंच काहीतरी ऍक्शन घेणं जरूरीचं आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांना काय म्हणायचंय हे बरोबर त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंच. त्यांच्या हसण्यातून. तिढा वाढत चाललाय. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही? सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.
आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेले तर एक मोठा धक्का. पुढच्या आठवड्यात मँगलोरला जायचंय कामाला. अजून मी ऑफिसच्या कामाला, शिवडी, वाशी आणि नरिमन पॉइंट सोडून कुठेही गेले नाहीये आता एकदम मँगलोर. तिथे म्हणे नवं ऑफिस सुरू झालंय तिथे ट्रेनिंग द्यायचंय. खरंतर आमच्या बुटकोबाला (साहेबाला) सांगितलं होतं जायला. पण तो साहेब असल्याने त्यांनी पार्सल मला पास केलं.
कोंकण रेल्वे ने जायचं हेच त्यातल्या त्यात बरं आहे. आम्ही चार जण आहोत आणि काही लोकं विमानानं येणार आहेत. आम्ही पडले तळा गाळातले कामगार म्हणून आम्ही रेल्वेने. पण कोंकणात जायचं तर विमानापेक्षा रेल्वेचीच मजा.
एकंदरीत वादळ गिरगावात आलं तरी मी मँगलोर ला असेन, त्यामुळे आनंदातच आहे.
पुढच्या आठवड्यात गुरुवारी मी तिकडे असेन. कदाचित ब्लॉग लिहिता येणार नाही. पण इंटरनेट मिळालं तर काहीतरी पोस्ट करीनच.
आणि हो. हॅपी व्हलेंटाईन्स डे!!
मला शिवसेना आवडते पण आज शिवसेना मुर्दाबाद! व्हॅलेंटाइन झिंदाबाद!
ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!
- संवादिनी
पण ते आहेतच तसे. त्यांना काही चुकतंय असं वाटलं तर ते फक्त त्यांना तसं वाटतंय हे सुचवतात. कुणाची चूक आहे. कशी सुधारायची वगैरे निर्णय ते माझ्यावर सोपवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी केलेल्या चुका ते आम्हाला सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. स्वतःच्या चुका मान्य करणं किती कठीण आहे.
ह्या रविवारी मी दुपारी नाटकाच्या तालमीवरून आले. चहा पीत निवांत लोकरंग वाचत बसले होते. चार साडेचार झाले असतील. तर हे आले. उगाचच नाटक कुठपर्यंत आलंय वगैरे चौकश्या केल्या. मग म्हणाले चल पाणी पुरी खायला जाऊ. मी कशाला नाही म्हणतेय. आईला विचारलं, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणाली. विनयला क्रिकेट खेळायला जायचं होतं, त्यामुळे तो आला नाही.
सहा वाजता मी आणि बाबा गेलो बाहेर. पाणी पुरी खाल्ली, नेहमीप्रमाणे एक प्लेट झाल्यावर दुसरी अर्धी अर्धी खाल्ली. मग म्हणाले चल कॉफी पिऊ. म्हटलं चला. नेहमी मी म्हणते कॉफी कॉफी. आज हे म्हणतायत तर जाऊया. सीसीडी मध्ये गेलो. तिथे माझी मैत्रीण भेटली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि मी आमच्या तातांसोबत. जरा ऑकवर्ड झालं. का? माहीत नाही? कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल.
मी माझी नेहमीची ट्रॉपिकल आईस्बर्ग घेतली. थंडीचं कारण देत बाबांनी मलाच कोणती तरी गरम गरम कॉफी ऑर्डर करायला सांगितली. एकात एक विषय गुंफत त्यांनी तो माझ्या करिअर आणि लग्नावर आणून सोडला. मला कळलंच नाही. मी त्यांना सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधी करायचंय? म्हटलं माहीत नाही. मग हसत हसत म्हणाले, ठीक आहे.
उगाचच मला त्यांना त्या मिशीवाल्याबद्दल सांगावंसं वाटलं. मग विचार केला आता नको. अजून नीट ओळखही नाही त्याची. जाऊदे. मग मीच त्यांना त्यांच्या कॉलेजातल्या मैत्रिणींबद्दल विचारलं. तसं अनेकदा ऐकलंय पण बाबा सांगायला लागले की ऐकायला मजा येते. तेपण बिंधास्त एखाद्या मित्राला सांगावं तसं त्यांचं तरुणपण मला, विन्याला सांगतात.
एकंदरीत काय तर संध्याकाळ मजेत गेली. पण एक वॉर्निंग देऊनच. कारण जेव्हा बाबा कॉफी प्यायला घेऊन जातात आणि एखादा विषय काढतात. समजावं की आता खरंच काहीतरी ऍक्शन घेणं जरूरीचं आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांना काय म्हणायचंय हे बरोबर त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंच. त्यांच्या हसण्यातून. तिढा वाढत चाललाय. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही? सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.
आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेले तर एक मोठा धक्का. पुढच्या आठवड्यात मँगलोरला जायचंय कामाला. अजून मी ऑफिसच्या कामाला, शिवडी, वाशी आणि नरिमन पॉइंट सोडून कुठेही गेले नाहीये आता एकदम मँगलोर. तिथे म्हणे नवं ऑफिस सुरू झालंय तिथे ट्रेनिंग द्यायचंय. खरंतर आमच्या बुटकोबाला (साहेबाला) सांगितलं होतं जायला. पण तो साहेब असल्याने त्यांनी पार्सल मला पास केलं.
कोंकण रेल्वे ने जायचं हेच त्यातल्या त्यात बरं आहे. आम्ही चार जण आहोत आणि काही लोकं विमानानं येणार आहेत. आम्ही पडले तळा गाळातले कामगार म्हणून आम्ही रेल्वेने. पण कोंकणात जायचं तर विमानापेक्षा रेल्वेचीच मजा.
एकंदरीत वादळ गिरगावात आलं तरी मी मँगलोर ला असेन, त्यामुळे आनंदातच आहे.
पुढच्या आठवड्यात गुरुवारी मी तिकडे असेन. कदाचित ब्लॉग लिहिता येणार नाही. पण इंटरनेट मिळालं तर काहीतरी पोस्ट करीनच.
आणि हो. हॅपी व्हलेंटाईन्स डे!!
मला शिवसेना आवडते पण आज शिवसेना मुर्दाबाद! व्हॅलेंटाइन झिंदाबाद!
ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!
- संवादिनी
Friday, February 8, 2008
मी आणि माझी (न मिळालेली) नवी नोकरी
बायो डेटा वेबसाईट्वर टाकून दोन दिवस नाही झाले तर फोन यायला सुरुवात झाली. तसा नोकरी शोधण्याचा अनुभव मला शून्य. कारण CA झाल्या झाल्या ही नोकरी चालत आली. मीही जास्त विचार न करता जॉइन केलं. आठवडे, महिने, वर्ष झाली. तोच डेस्क, तेच चेहरे, तशीच कामं. अर्थात कुठे कंटाळवाणं झालं नाही. आधीचा बॉस जाम पिडू होता, पण हा बुटकोबा आल्यापासून मस्त चाललं होतं. नोकरी बदलायची इच्छाही कधी मनात आली नव्हती आणि सगळं सूख बोचलं म्हणून आता नोकरी बदलायची.
परवाच एक फोन आला इंटरव्ह्यू साठी. हाय हॅलो वगैरे झालं.
ती - आता बोलू शकतो का आपण?
मी - हो चालेल ना. (मला कधीही बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कामच नाहीये जास्त)
ती - जरा तुझ्या अनुभवाबद्दल सांगशील?
मी - बेडकीला जेवढं फुगता येईल त्या प्रमाणात माझा अनुभव अगदी फुलवून (की फुगवून) सांगितला
ती - वाह! फारंच छान!
मी - थॅंक यू (बऱ्याच थापा पचलेल्या दिसतायत)
ती - आता आमचे डोमेन एक्स्पर्ट तुम्हाला प्रश्न विचारतील.
मी - हो चालेल ना (मग ही का मला प्रश्न विचारत होती इतका वेळ? मरा, आता सगळ्या थापा बाहेर पडणार)
तो - एक अधिक एक किती? (प्रश्न प्रतिकात्मक. खरे नव्हेत)
मी - दोन.
तो - बरोब्बर. छान. (इतका सोपा प्रश्न तर मला यायला हवाच ना?)
तो - बरं पाच गुणिले दोन?
मी - अम्म...... बहुतेक दहा
तो - खूपच छान. (नोकरी मिळालीच बहुतेक)
तो - एकविस भागिले सात?
मी - खरंतर मी अशा प्रकारची कामं केली नाहीयेत म्हणून निटसं सांगता येत नाही.
तो - तीन. (स्टडी मटेरिअल नीट वाचायला हवं. मलाही तीनच वाटत होतं. जाऊदे. माणूस चांगला दिसतोय. बोलतोय तरी गोड गोड. देईल नोकरी)
मी - मलाही तसंच वाटलं, पण कॉंफिडन्स नव्हता
तो - बरं. आता सांग. तेरा गुणिले एकोणीस भागिले सतरा.
मी - .....
तो - अशा प्रकारची कामं करणारी लोकं आम्हाला हवीत.
मी - ..... (आता काय करू? नाही येत सांगितलं तर नोकरी जाणार, पण उत्तर तर येतंच नाहीये)
तो - तेरा गुणिले एकोणिस भागिले सतरा?
मी - ....... मला असं वाटतं..... म्हणजे..... असा अंदाज...... म्हणजे..... साधारण बारा ते पंधरा च्या मध्ये असेल बहुतेक....... असं मला वाटतं......
तो - ......
मी - हॅलो
तो - हे बघ, तुला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने नगण्य आहे, बरोबर उत्तर काय आहे ते सांग. किंवा येत नाही म्हणून सांग. (आयला, चिडलाच हा?)
मी - मी अशा प्रकारचं काम केलेलं नाही, म्हणून मला वाटतं असं म्हंटलं (मी पण चिडलेच थोडीशी)
तो - .......
ती - बरं. टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. आता मला सांग तुझा पगार किती?
मी - दहा रुपये.
ती - दहा रुपये? (आवाजात आश्चर्य लपत नाही)
मी - हो
ती - अपेक्षा किती आहे?
मी - तेरा रुपये
ती - बरं (अगदी तुच्छतेने. म्हणजे येत तर काही नाही पण पगार भरपूर पाहिजे अशा आविर्भावात)
ती - आम्ही कळवू तुला सगळे इंटरव्ह्यू झाल्यावर.
मी - बरं
ती - खडाक
मी - खडाक - हुश्श्य..... सुटले.
असा इंटरव्ह्यू झाल्यावर जे व्हायचं तेच झालं. साभार नकाराचा फोन आला. अर्थात त्यांचं काही चुकलं नाही म्हणा. त्यांना जे काम येणारी व्यक्ती हवी होती ती मी नव्हतेच. पण वाईट वाटतंच ना?
संध्याकाळी घरी पोचले तर बाबा एकटेच होते. मजल्यावरही कुणी दिसलं नाही. हात पाय धुवून बाबांसमोर येऊन बसले. त्यांना कळलंच की काहीतरी बिनसलंय माझं. मग त्यांनी उगिचच शेअर मार्केट च्या गप्प सुरू केल्या. टी.व्ही. लावू का म्हणाले. मी काहीच बोलले नाही. मग माझ्या बाजूला येऊन बसले आणि खांद्यावर हात ठेवला. मग मला राहवलं नाही. अगदी लहान मुलीसारखी मी मनापासून रडले. त्यांच्याच शर्टाला डोळे पुसले. मग त्यांना झाला प्रकार सांगितला.
सगळं शांतपणे ऐकून झाल्यावर मला म्हणाले मोठं नुकसान झालं. मी म्हटलं, एवढं काही नाही. मी ही नोकरी घेतली असती असं नाही. पण नकाराचं वाईट वाटलं.
"मी कुठं म्हटलं तुझं नुकसान झालं म्हणून?" ते म्हणाले.
"मग?"
"बाळा, नुकसान त्यांचं झालं, तुला 'नाही' म्हणून. मला एक सांग, तू मूर्ख म्हणून CA ला मेरिटमध्ये आलीस? मूर्ख म्हणून तुला सध्याच्या कंपनीने नोकरी दिली?"
"..."
"आपला आत्मविश्वास घालवून बसायचं नाही. प्रत्येक व्यक्ती तिच्या जागी चांगलीच असते. गरज आहे ती त्या व्यक्तितला चांगलेपणा ओळखायची. तारे जमीन पर पाहिलास ना?"
मग मी तशीच त्यांच्यासोबत बसून राहिले. ते बोलत गेले, त्यांच्या नोकरीच्या कथा. त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका. खरं सांगते आजपर्यंत अनेकदा ऐकलंय. पण ते पुन्हा सांगायला लागले तरी ऐकत राहावसं वाटतं. पण त्याबद्दल पुढच्या वेळी लिहीन, आता खूप उशीर झालाय.
परवाच एक फोन आला इंटरव्ह्यू साठी. हाय हॅलो वगैरे झालं.
ती - आता बोलू शकतो का आपण?
मी - हो चालेल ना. (मला कधीही बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कामच नाहीये जास्त)
ती - जरा तुझ्या अनुभवाबद्दल सांगशील?
मी - बेडकीला जेवढं फुगता येईल त्या प्रमाणात माझा अनुभव अगदी फुलवून (की फुगवून) सांगितला
ती - वाह! फारंच छान!
मी - थॅंक यू (बऱ्याच थापा पचलेल्या दिसतायत)
ती - आता आमचे डोमेन एक्स्पर्ट तुम्हाला प्रश्न विचारतील.
मी - हो चालेल ना (मग ही का मला प्रश्न विचारत होती इतका वेळ? मरा, आता सगळ्या थापा बाहेर पडणार)
तो - एक अधिक एक किती? (प्रश्न प्रतिकात्मक. खरे नव्हेत)
मी - दोन.
तो - बरोब्बर. छान. (इतका सोपा प्रश्न तर मला यायला हवाच ना?)
तो - बरं पाच गुणिले दोन?
मी - अम्म...... बहुतेक दहा
तो - खूपच छान. (नोकरी मिळालीच बहुतेक)
तो - एकविस भागिले सात?
मी - खरंतर मी अशा प्रकारची कामं केली नाहीयेत म्हणून निटसं सांगता येत नाही.
तो - तीन. (स्टडी मटेरिअल नीट वाचायला हवं. मलाही तीनच वाटत होतं. जाऊदे. माणूस चांगला दिसतोय. बोलतोय तरी गोड गोड. देईल नोकरी)
मी - मलाही तसंच वाटलं, पण कॉंफिडन्स नव्हता
तो - बरं. आता सांग. तेरा गुणिले एकोणीस भागिले सतरा.
मी - .....
तो - अशा प्रकारची कामं करणारी लोकं आम्हाला हवीत.
मी - ..... (आता काय करू? नाही येत सांगितलं तर नोकरी जाणार, पण उत्तर तर येतंच नाहीये)
तो - तेरा गुणिले एकोणिस भागिले सतरा?
मी - ....... मला असं वाटतं..... म्हणजे..... असा अंदाज...... म्हणजे..... साधारण बारा ते पंधरा च्या मध्ये असेल बहुतेक....... असं मला वाटतं......
तो - ......
मी - हॅलो
तो - हे बघ, तुला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने नगण्य आहे, बरोबर उत्तर काय आहे ते सांग. किंवा येत नाही म्हणून सांग. (आयला, चिडलाच हा?)
मी - मी अशा प्रकारचं काम केलेलं नाही, म्हणून मला वाटतं असं म्हंटलं (मी पण चिडलेच थोडीशी)
तो - .......
ती - बरं. टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. आता मला सांग तुझा पगार किती?
मी - दहा रुपये.
ती - दहा रुपये? (आवाजात आश्चर्य लपत नाही)
मी - हो
ती - अपेक्षा किती आहे?
मी - तेरा रुपये
ती - बरं (अगदी तुच्छतेने. म्हणजे येत तर काही नाही पण पगार भरपूर पाहिजे अशा आविर्भावात)
ती - आम्ही कळवू तुला सगळे इंटरव्ह्यू झाल्यावर.
मी - बरं
ती - खडाक
मी - खडाक - हुश्श्य..... सुटले.
असा इंटरव्ह्यू झाल्यावर जे व्हायचं तेच झालं. साभार नकाराचा फोन आला. अर्थात त्यांचं काही चुकलं नाही म्हणा. त्यांना जे काम येणारी व्यक्ती हवी होती ती मी नव्हतेच. पण वाईट वाटतंच ना?
संध्याकाळी घरी पोचले तर बाबा एकटेच होते. मजल्यावरही कुणी दिसलं नाही. हात पाय धुवून बाबांसमोर येऊन बसले. त्यांना कळलंच की काहीतरी बिनसलंय माझं. मग त्यांनी उगिचच शेअर मार्केट च्या गप्प सुरू केल्या. टी.व्ही. लावू का म्हणाले. मी काहीच बोलले नाही. मग माझ्या बाजूला येऊन बसले आणि खांद्यावर हात ठेवला. मग मला राहवलं नाही. अगदी लहान मुलीसारखी मी मनापासून रडले. त्यांच्याच शर्टाला डोळे पुसले. मग त्यांना झाला प्रकार सांगितला.
सगळं शांतपणे ऐकून झाल्यावर मला म्हणाले मोठं नुकसान झालं. मी म्हटलं, एवढं काही नाही. मी ही नोकरी घेतली असती असं नाही. पण नकाराचं वाईट वाटलं.
"मी कुठं म्हटलं तुझं नुकसान झालं म्हणून?" ते म्हणाले.
"मग?"
"बाळा, नुकसान त्यांचं झालं, तुला 'नाही' म्हणून. मला एक सांग, तू मूर्ख म्हणून CA ला मेरिटमध्ये आलीस? मूर्ख म्हणून तुला सध्याच्या कंपनीने नोकरी दिली?"
"..."
"आपला आत्मविश्वास घालवून बसायचं नाही. प्रत्येक व्यक्ती तिच्या जागी चांगलीच असते. गरज आहे ती त्या व्यक्तितला चांगलेपणा ओळखायची. तारे जमीन पर पाहिलास ना?"
मग मी तशीच त्यांच्यासोबत बसून राहिले. ते बोलत गेले, त्यांच्या नोकरीच्या कथा. त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका. खरं सांगते आजपर्यंत अनेकदा ऐकलंय. पण ते पुन्हा सांगायला लागले तरी ऐकत राहावसं वाटतं. पण त्याबद्दल पुढच्या वेळी लिहीन, आता खूप उशीर झालाय.
Thursday, January 31, 2008
मी आणि भविष्याचं भूत
गेल्या आठवड्यात उगाचंच उदास उदास वाटत होतं. कशामुळे? काही कळलं नाही. कदाचित नव्या वर्षात तो एकदाही दिसला नाही म्हणून असेल. पण त्याच्यामुळे मी उदास व्हायचं काहीच कारण नाही. मग काय झालं?
कदाचित काहीच झालं नाही म्हणून असेल. जेपींनीही मला विचारलं, काही बिनसलंय का म्हणून, जग्गूंनीही विचारलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विन्यानी सुद्धा विचारलं. बाकी दोघांचं ठीक आहे पण बाळराजे त्यांच्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन चक्क माझी चौकशी करतात म्हणजे खासच.
हा बाळराजे शब्द माझा नाही बरं का. नुकतीच मिलिंद बोकिलांची "शाळा" वाचली. अगदी गेल्या रविवारी वाचायला घतली आणि सोमवारी रात्री दोन वाजता संपली. त्यातल्या त्या मुलला त्याची बहीण बाळराजे म्हणते, मला तो शब्द आवडला. उचलला. मुळात ते पुस्तकंच आवडलं. कधी कधी वाटलं शिरोडकर म्हणजे मीच, अगदी शेवटी हुरहूर लावणारी गोष्ट आहे. खरंतर कुणीतरी हीच गोष्ट शिरोडकरची म्हणून लिहायला हवी. मी नक्की वाचेन.
सध्या एकंदरित पुस्तकांचा दुष्काळ आहे. आईला सध्या मासिकं वाचायचं वेड लागलंय म्हणून पुस्तकं बंद. आमच्या लायब्ररीत सगळी इंग्लिश पुस्तकं आहेत. परवाच हिटलरच आत्मचरित्र आणलं. ओ की ठो कळत नाहीये. म्हणजे एक लाईन तीन तीन वेळा वाचल्यावर कळतंय त्याला काय म्हणायचंय ते. खरंतर फिलॉसॉफीचं पुस्तक वाटतंय ते. एवढा मोठा (आणि छोटाही) माणूस, ओरॅटर पण लेखन एकदम सपक वाटलं. की ही भाषांतरकाराची किमया? थोडं थोडं त्याचं म्हणणं पटलंसुद्धा. आपण नाही का युपी बिहार मधून आलेल्यांच्या नावाने शंख करत?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा बायो डेटा अपडेट करून टाकला. बघुया कॉल येतात का ते? जेपींना सांगितलं, तर ते म्हणाले कशी तुम्ही आजची मुलं, दोन वर्षात नोकऱ्या बदलता? त्यांनी फक्त एकाच ठिकाणी नोकरी केली आणि शेवटी कंपनीने नारळ दिला. असुदे, प्रत्येकाच्या निष्ठा असतात. त्यांची तिथे. आईला पण तिच्या कंपनीत वीस वर्ष होऊन गेली असतील. गमतीत आम्ही म्हणतो सुद्धा, बरेच चेअरमन आले आणि गेले पण त्यांची सेक्रेटरी एकच आहे वीस वर्ष. विन्या फक्त म्हणाला, ताई बदल बदल, नोकरी बदल, लोक बघ कुठे कुठे अमेरिका, युरोपला जातायत. तुलाही नक्की चान्स मिळेल.
खरंच मिळेल? म्हणजे एकटीने राहायचं, स्वतः सगळं मॅनेज करायचं. मदतीला आई नाही, सल्ला द्यायला बाबा नाहीत, खोड्या काढायला विनय नाही. माझा डेस्क नाही, मैत्रिणी नाहीत आणि....तोही नाही. ग्लॅमरस आहे पण तितकंच घाबरवणारं.
हं, कदाचित ह्याच्यामुळेच मला उदास उदास वाटतंय
कदाचित काहीच झालं नाही म्हणून असेल. जेपींनीही मला विचारलं, काही बिनसलंय का म्हणून, जग्गूंनीही विचारलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विन्यानी सुद्धा विचारलं. बाकी दोघांचं ठीक आहे पण बाळराजे त्यांच्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन चक्क माझी चौकशी करतात म्हणजे खासच.
हा बाळराजे शब्द माझा नाही बरं का. नुकतीच मिलिंद बोकिलांची "शाळा" वाचली. अगदी गेल्या रविवारी वाचायला घतली आणि सोमवारी रात्री दोन वाजता संपली. त्यातल्या त्या मुलला त्याची बहीण बाळराजे म्हणते, मला तो शब्द आवडला. उचलला. मुळात ते पुस्तकंच आवडलं. कधी कधी वाटलं शिरोडकर म्हणजे मीच, अगदी शेवटी हुरहूर लावणारी गोष्ट आहे. खरंतर कुणीतरी हीच गोष्ट शिरोडकरची म्हणून लिहायला हवी. मी नक्की वाचेन.
सध्या एकंदरित पुस्तकांचा दुष्काळ आहे. आईला सध्या मासिकं वाचायचं वेड लागलंय म्हणून पुस्तकं बंद. आमच्या लायब्ररीत सगळी इंग्लिश पुस्तकं आहेत. परवाच हिटलरच आत्मचरित्र आणलं. ओ की ठो कळत नाहीये. म्हणजे एक लाईन तीन तीन वेळा वाचल्यावर कळतंय त्याला काय म्हणायचंय ते. खरंतर फिलॉसॉफीचं पुस्तक वाटतंय ते. एवढा मोठा (आणि छोटाही) माणूस, ओरॅटर पण लेखन एकदम सपक वाटलं. की ही भाषांतरकाराची किमया? थोडं थोडं त्याचं म्हणणं पटलंसुद्धा. आपण नाही का युपी बिहार मधून आलेल्यांच्या नावाने शंख करत?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा बायो डेटा अपडेट करून टाकला. बघुया कॉल येतात का ते? जेपींना सांगितलं, तर ते म्हणाले कशी तुम्ही आजची मुलं, दोन वर्षात नोकऱ्या बदलता? त्यांनी फक्त एकाच ठिकाणी नोकरी केली आणि शेवटी कंपनीने नारळ दिला. असुदे, प्रत्येकाच्या निष्ठा असतात. त्यांची तिथे. आईला पण तिच्या कंपनीत वीस वर्ष होऊन गेली असतील. गमतीत आम्ही म्हणतो सुद्धा, बरेच चेअरमन आले आणि गेले पण त्यांची सेक्रेटरी एकच आहे वीस वर्ष. विन्या फक्त म्हणाला, ताई बदल बदल, नोकरी बदल, लोक बघ कुठे कुठे अमेरिका, युरोपला जातायत. तुलाही नक्की चान्स मिळेल.
खरंच मिळेल? म्हणजे एकटीने राहायचं, स्वतः सगळं मॅनेज करायचं. मदतीला आई नाही, सल्ला द्यायला बाबा नाहीत, खोड्या काढायला विनय नाही. माझा डेस्क नाही, मैत्रिणी नाहीत आणि....तोही नाही. ग्लॅमरस आहे पण तितकंच घाबरवणारं.
हं, कदाचित ह्याच्यामुळेच मला उदास उदास वाटतंय
Thursday, January 24, 2008
मी आणि तो
लिहिण्याचा बॅकलॉग भयंकर वाढत चाललाय. आता नवं वर्ष उलटून किती दिवस गेले पण अजून माझं लिखाण तिथेच रेंगाळतंय. गेल्या आठवड्यातंच खरंतर लिहिणार होते, पण जरा जास्तंच झालं असतं म्हणून आता लिहिते.
ह्या वेळी एकतीस तारखेला आमच्या ऑफिसची पार्टी होती. जुहूलाच होती. अर्थात विनयभंग वगैरे झाले तेव्हा आम्ही सगळे, सगळ्यांचं माहीत नाही पण मी तरी घरी शांत झोपले होते. आम्ही नववर्ष संध्याकाळीच साजरं केलं. तर ह्या पार्टी निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटची लोकं एकत्र आली.
नवी गर्दी मिळाली की चेहेरे शोधण्याचं काम फक्त मुलंच करतात असं नाही. माझ्यासारख्या काही मुलीही त्यात सहभागी असतातंच की. अर्थात माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या डिपार्टमेंटला काम करते तिथे पस्तिशीच्या खालचं कुणी फिरकंतच नाही. CA असल्याचा साइड इफेक्ट आहे हा. त्यामुळे दुसऱ्या डिपार्टमेंटातून नजर फिरवणं आलंच.
काही बरे चेहेरे दिसले, पण एक विशेष. चेहेरा म्हणण्यापेक्षा एक विशेष माणूस भेटला. दिसायला तर चांगला होताच, पण बोलायलाही छान वाटला.
मला नेहेमीप्रमाणे गाणं म्हणण्याचा आग्रह झालाच आणि आपल्याला काय स्टेज आणि श्रोते मिळाले की कॅसेट सुरू. मग एका साहेबाने एका डुएटची फर्माइश केली. आता साहेब लोकांना कोण समजावणार की डुएट दोघं गातात म्हणून. मी म्हंटलं सर हे डुएट आहे, तर त्यांनी चक्क "त्या"ला आग्रह केला गाणं म्हणण्याचा. म्हणजे हा गातो पण? डुएट छान झालं, माझा आवाज कापत होता इतकंच, पण त्याला काही पर्याय नव्हता.
नंतर सगळा वेळ नजर त्यालाच शोधत राहिली. खरंतर मुद्दाम नाही, पण तो काय करत असेल, त्याचे मित्र कोणते? (त्यात एखादा ओळखीचा आहे का?), तो कसा बोलतो, कसा हसतो, सबकॉन्शसली मी माझ्या एक्स्पेक्टेशन्स मॅच करत गेले. काही मॅच झाल्या, काही नाही, शेवटी तडजोड ही करावी लागणारच कधी ना कधी, असं म्हणून तो उद्योगही सोडला. आनंद ह्याचाच आहे, की मी मोकाट इथे सगळं लिहू शकतेय. एरवी कुणाला सांगितलं असतं?
म्हंटल्या गाण्यासरशी ओळख झालीच. नाव कळलं, मराठी असल्याचंही कळलं. बरं वाटलं. कोब्रा नाही हेही कळलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, गाणं म्हणतो म्हणजे जेपींनाही (बाबांना) नाही, त्यांना मराठी पुरे आहे. विन्याचा तर प्रश्नच नाही. राहता राहिली आई. ती फार जातीनिष्ठ आहे, तेव्हा तिला मॅनेज करणं कठीण.
ह्याला काय म्हणतात? सुतावरून स्वर्ग गाठणे.
पण मला तो आवडला. एकंच प्रॉब्लेम आहे. मिशी! मला बिलकूल आवडणार नाही नवऱ्याने मिशी बिशी ठेवलेली. पण ते सगळं नंतर.
क्रश तरी नक्कीच आहे. प्रेमाचं काही माहीत नाही. बघुया पुढे काय घडतं ते.
ह्या वेळी एकतीस तारखेला आमच्या ऑफिसची पार्टी होती. जुहूलाच होती. अर्थात विनयभंग वगैरे झाले तेव्हा आम्ही सगळे, सगळ्यांचं माहीत नाही पण मी तरी घरी शांत झोपले होते. आम्ही नववर्ष संध्याकाळीच साजरं केलं. तर ह्या पार्टी निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटची लोकं एकत्र आली.
नवी गर्दी मिळाली की चेहेरे शोधण्याचं काम फक्त मुलंच करतात असं नाही. माझ्यासारख्या काही मुलीही त्यात सहभागी असतातंच की. अर्थात माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या डिपार्टमेंटला काम करते तिथे पस्तिशीच्या खालचं कुणी फिरकंतच नाही. CA असल्याचा साइड इफेक्ट आहे हा. त्यामुळे दुसऱ्या डिपार्टमेंटातून नजर फिरवणं आलंच.
काही बरे चेहेरे दिसले, पण एक विशेष. चेहेरा म्हणण्यापेक्षा एक विशेष माणूस भेटला. दिसायला तर चांगला होताच, पण बोलायलाही छान वाटला.
मला नेहेमीप्रमाणे गाणं म्हणण्याचा आग्रह झालाच आणि आपल्याला काय स्टेज आणि श्रोते मिळाले की कॅसेट सुरू. मग एका साहेबाने एका डुएटची फर्माइश केली. आता साहेब लोकांना कोण समजावणार की डुएट दोघं गातात म्हणून. मी म्हंटलं सर हे डुएट आहे, तर त्यांनी चक्क "त्या"ला आग्रह केला गाणं म्हणण्याचा. म्हणजे हा गातो पण? डुएट छान झालं, माझा आवाज कापत होता इतकंच, पण त्याला काही पर्याय नव्हता.
नंतर सगळा वेळ नजर त्यालाच शोधत राहिली. खरंतर मुद्दाम नाही, पण तो काय करत असेल, त्याचे मित्र कोणते? (त्यात एखादा ओळखीचा आहे का?), तो कसा बोलतो, कसा हसतो, सबकॉन्शसली मी माझ्या एक्स्पेक्टेशन्स मॅच करत गेले. काही मॅच झाल्या, काही नाही, शेवटी तडजोड ही करावी लागणारच कधी ना कधी, असं म्हणून तो उद्योगही सोडला. आनंद ह्याचाच आहे, की मी मोकाट इथे सगळं लिहू शकतेय. एरवी कुणाला सांगितलं असतं?
म्हंटल्या गाण्यासरशी ओळख झालीच. नाव कळलं, मराठी असल्याचंही कळलं. बरं वाटलं. कोब्रा नाही हेही कळलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, गाणं म्हणतो म्हणजे जेपींनाही (बाबांना) नाही, त्यांना मराठी पुरे आहे. विन्याचा तर प्रश्नच नाही. राहता राहिली आई. ती फार जातीनिष्ठ आहे, तेव्हा तिला मॅनेज करणं कठीण.
ह्याला काय म्हणतात? सुतावरून स्वर्ग गाठणे.
पण मला तो आवडला. एकंच प्रॉब्लेम आहे. मिशी! मला बिलकूल आवडणार नाही नवऱ्याने मिशी बिशी ठेवलेली. पण ते सगळं नंतर.
क्रश तरी नक्कीच आहे. प्रेमाचं काही माहीत नाही. बघुया पुढे काय घडतं ते.
Subscribe to:
Posts (Atom)