Thursday, May 15, 2008

वाघ आणि बेडूक

आपलं भोवताल बदललं की आपण बदलतो की नाही? बहुतेक बदलतो. गेल्या पोस्टपर्यंत मी माझ्या घरात माझ्या टेबलवर आईने बनवून दिलेला गरम गरम चहा भुरकत भुरकत लिहीत होते. आज मी इथे एकटीच आहे. कधीतरी गरम होती, असा जरासुद्धा संशय येऊ न देणारी इडली आहे, आंबट ढाण सांबार आणि तिखट जाळ चटणी. अर्थात त्या दोघांच्या वाटेलाही मी जात नाहीये हा मुद्दा वेगळा, पण ह्यामुळे माझं लिखाणसुद्धा थंडगार होऊन जाणार असं वाटतंय.

असो, सांगायचा मुद्दा हा, की आमचं पार्सल पुण्यनगरीत येऊन पोहोचलं, सगळंच धक्कादायक आहे. अजूनही मी सावरतेय.

पहिल्या दिवशी सकाळी सकाळी इंद्रायणीने इथे पोहोचले. ऑफिसतर्फे पहिल्या दोन ट्रिपा स्पॉन्सर्ड आहेत, त्यामुळे एसी चेअरकारनी आले. पण खिडक्या उघडता येणाऱ्या डब्यांची मजा इथे नाहीच. निसर्गाचा रंग कसा लख्ख दिसायला हवा. जसा आहे तसा. मध्ये ती टींटेड काच आली, की सगळं सपक दिसायला लागतं. त्याच रंगात असल्यासारखं.

आधीच मला नव्या नोकरीचं टेन्शन, त्यात एवढ्या लवकर उठायची नसलेली सवय, त्यामुळे झोपेतच शिवाजीनगरला उतरले. सामान काही जास्त बरोबर नेलंच नव्हतं कारण आई बाबा गाडीने विकेंडला पोहोचणार होते, माझ्या सामानासकट. पहिला धक्का. पुण्यातला रिक्षावाला माझ्याशी हिंदीत बोलला. आणि तो मराठी होता हे त्याच्या उच्चारांवरून स्पष्ट कळत होतं. म्हणजे मी मराठी दिसत नाही की काय? काळे डोळे सोडले तर बाकी सगळंच एकदम चित्पावनी. त्यामुळे पुण्यातले लोकं आपल्याला पुणेकरंच समजतील असा एक फाजिल समज झाला होता, तो त्या पुणेरी रिक्षावल्याने माझ्याशी हिंदीत बोलून चुकीचा सिद्ध करून दाखवला.

असो, हा धक्का फारसा धक्कादायक नव्हता. खरा धक्का तर पुढेच बसला. ऑफिसात शिरून एच आर डिपार्टमेंटमध्ये शिरले. एक अतिशय नकोसा वाटावा असा माणूस बसलेला. बोलण्यात उर्मटपणा, उपकार करतोय असा वागत होता. त्याला जाऊन माझं नाव वगैरे सांगितलं, मेडिकल करायची वगैरे तेही सांगितलं. त्यानंतर तो मला जे काही म्हणाला ते ऐकून झीट येऊन पडायचीच वेळ आली. तो म्हणाला की त्याला कोणी कळवलंच नाहीये की मला रिक्रूट केलंय म्हणून.

मनात म्हटलं, अरे माणसा, मी माझी सोन्यासारखी नोकरी सोडून, सकाळी सकाळी उठून, तडफडत तडफडत, इथे येऊन पोचले आणि तू मला म्हणतोस की तुला कोणी सांगितलंच नाहीये की मी येणारे म्हणून? मी म्हणजे ऑलमोस्ट रडणारंच होते, पण कसंबसं रोखलं. शेवटी नावात घोटाळा झाल्याचं कळलं. साठ्ये चं चक्क शेट्टी? पण शेवटी मीच ती, हे ऐकून मला हायसं वाटलं.

बाकी सगळा दिवस मेडिकल, जॉइनिंग फॉरमॅलिटीज मध्ये गेला. संध्याकाळी अस्मादिक ह्या आमच्या गेस्ट हाउस वर पोहोचले. जुन्या कंपनीने वाईट सवयी लावलेल्या. तिथे म्हणजे राजेशाही कारभार, हवंतर राणीशाही म्हणा, पण इथे? एवढी मोठी ही कंपनी पण गेस्ट हाउस कसलं? एखाद्या कॉलेजचं हॉस्टेलही ह्यापेक्षा खूप चांगलं असेल. पुन्हा एकदा रडायलाच यायला लागलं. मी एवढी रडी आहे हे मला इथे आल्यावरच कळतंय.

जरा फ्रेश होऊन बाहेर पडले, घरी फोन केला. विन्याने उचलला. एकदम खूश झाला. त्याच्याशी थोडा वेळ बोलले, मग बाबाशी बोलले, आईशी बोलताना मात्र तिला सांगितलं म्हटलं शुक्रवारी नाही, उद्या परवाच या. इथे राहणं मला शक्य नाहीये इतकं टुकार गेस्ट हाउस आहे. हो नाही करता करता गुरुवार ठरला. गुरुवार म्हणजे उद्या ते इथे येतील. मग माझ्या काकाचा रिकामा फ्लॅट आहे, कचरा डेपोला, तिथे मी एकटी राहणार आहे, तिथे सगळं सेटिंग करतील आणि मग आम्ही शुक्रवारी सगळेच मुंबईला जाऊ. काय पण एरीआ आहे? कचरा डेपो?

बाबाने मला हा लॅपटॉप घेऊन दिला. मस्त आहे. आणि बॅकग्राउंड म्हणून आमचा चौघांचा फोटो लावून ठेवलाय, सिडनी ला घेतलेला. मी सीए झाल्यावर आम्ही ट्रीपला गेलो होतो तेव्हाचा. पाठी ऑपेरा हाऊस आहे. पण मी बघतच नाही तो. उगाचच आठवण येते आणि पुन्हा रडायला येतं. मला खरंच वाटलं नव्हतं, की एवढी सतत आठवण येईल, रडू येईल. अर्थात आता जरा बरं वाटतंय कारण उद्या सगळेच इथे येतील.

नेहमी कळपात राहणाऱ्या प्राण्याला एकदम एकटं राहायला सांगितलं तर कसं होईल? तसं माझं झालंय. ऑफिसात कुणी ओळखत नाही, एकदम जाऊन कुणाशी मैत्री करण्याचा माझा स्वभाव नाही. मित्रमंडळात खूप बडबडी असले तरी अनोळखी लोकांच्यात माझी एकदम भिजलेली मांजर होते. उगाचच हसायला टॅक्स पडत असल्यासारखा माझा चेहरा मग लंबाचौडा होतो. त्यामुळे पटकन ओळखी होत नाहीत, लोकांना मी कदाचित थोडी आखडूही वाटत असेन. सेल्फ रिअलायझेशन का काय ते म्हणतात ते हेच असेल? आपल्या डबक्यात शेर असलेला बेडूक, डबक्याबाहेर पडला की त्याला आपलं बेडूकपण जाणवतं. डबक्यात त्याला वाघ म्हणणारेच सगळे असतात आणि डबक्याबाहेर कुणी बेडूकही म्हणायला तयार नसतं.

तसा झालाय माझा डबक्याबाहेरचा बेडूक.

असं काही झालं की मला महाभारतामधला "मै समय हुं" वाला हरीश भिमाणीचा आवाज आठवतो. समय हेच सगळ्यावरचं एकमेव सोल्यूशन, परवापेक्षा काल, आणि कालच्यापेक्षा आज खूपच बरा वाटतोय. उद्या कदाचित इथलेही लोकं ह्या बेडकाला शेर शेर म्हणायला लागतील कुणी सांगावं?

- संवादिनी

Thursday, April 24, 2008

आजी आणि अर्धविराम

परवाच आजीकडे गेले होते. आजी म्हणजे माझी एकदम मैत्रीणच आहे. चक्क ऑफिसला दांडी मारली आणि तिकडे गेले. तसंही ऑफिसमध्ये काम कमी झालंय. रजा फुकट जायची ती घेऊन टाकली. खूप गप्पा मारल्या. ती म्हणाली दमतेस किती? सतत इकडे तिकडे धावत असतेस? म्हटलं आजी, त्यातच मजा असते. घरी बसून काय करायचं? नुसतं बसून वेळ फुकट जातो काहीतरी करत राहिलं की वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान मिळतं.

तशी ती मला तिच्या आईची गोष्ट सांगायला लागली. तिची आई म्हणजे माझी पणजी. मी तिला फार पाहिलं नाही, पण तिची मला भीतीच जास्त वाटली होती. कारण मी होते तीन-चार वर्षांची आणि ती नव्वदीतली. आलवण नेसायची ती. बहुतेक आलवणंच म्हणतात त्याला. म्हणजे कोंकणातल्या विधवा बायका पूर्वी घालायच्या ना, तो साडीचा प्रकार. डोकं सतत झाकलेलं. त्या साडीचा तो विचित्र रंग. ती आली की रडायलाच लागायचे मी. तिची गोष्ट.

अगदी शंभर वर्षाची झाली तरी एकटी राहायची कोंकणातल्या तिच्या घरात. एवढं मोठं ते घर. लाकडी होतं. माडीवर चालायला लागलं की करकर वाजायची ती लाकडं. घरासमोरच एक दोणी होती. दोणी म्हणजे एकदम छोटासा हौद. मी तीन-चार वर्षाची असतानापण पुरती बुडायचे नाही इतका छोटा. आणि त्या दोणीवर नेहमी एक भला थोरला बेडूक यायचा. त्याची मात्र भीती वाटायची नाही. बेडूक आला की मी तिकडे धावायची आणि आई मागेमागे. अर्थात मला त्या बेडकाबद्दल कितीही प्रेम असलं तरी मला बघून तो पळूनच जायचा.

घरामागेच एक टेकडी होती. मामा तिथे मला फिरायला घेऊन जायचा. माझा मामा एवढा उंच. त्याच्यापुढे तर मी एकदमच छोटी दिसायचे. लाल तपकिरी माती असावी बहुतेक तिथे. नीटसं आठवत नाही, पण खूप मस्त जागा होती ती. कधी बंदरावर घेऊन जायचा. तिथला मासळीचा वास बिलकुल आवडायचा नाही मला. किती छोट्या छोट्या गोष्टी आणि इतक्या वर्षांपूर्वीच्या कुठे रेकॉर्ड होऊन जातात डोक्यात कुणास ठाऊक? पणजी आजीची गोष्ट सांगता सांगता कुठे येऊन पोचले.?

तर अशी आमची ही पणजी आजी. तिला स्वस्थ बसवत नसे. सतत काहीनं काहीतरी करत राहायचं. विश्रांती माहीतच नाही. आणि पूर्वी कामंपण जास्त असतील, जात्यावर पीठ दळण्यापासून ते जमीन सारवणे, लिंपणे सगळं सगळं एकटीच करायची, अगदी शेवटपर्यंत. कुणी तिला सांगितलं की आजी थोडा आराम कर, तर ऐकायची नाही. शेवटी शेवटी तिला अल्झायमर झाला होता. जुनं आठवायचं, नवं आठवायचं नाही. आजीला पण ओळखायची नाही बऱ्याच वेळा. तेव्हा सतत म्हणत राहायची ती. जरा पाच मिनिटं आडवी होते. मुलांचं करता करता, घरातल्यांचं करता करता, बाहेरच्यांचं सांभाळता सांभाळता, शांत बसायचं राहूनच गेलं तिचं. ते असं शेवटच्या दिवसात बाहेर आलं. म्हणायची मला कुणी पाच मिनिटं स्वस्थ बसू देत नाही.


मला एवढं वाईट वाटलं हे ऐकून. कधी कधी काही लोकं आपल्या दृष्टीने अस्तित्वातच नसतात. मला एकदम वॉटर पिक्चरमधली ती आजीबाई आठवून गेली. तिला लाडू खायचा असतो पण तिला शेवटपर्यंत तो मिळत नाही. त्यासाठीच ती जगत असते आणि लाडूचा एक घास गिळल्यावर सुखाने मरते. तसं काहीसं, खूप आत आत धक्का देणारं.


आजी म्हणाली, ऐक माझं. आता थोडे दिवस सगळं बंद कर, विश्रांती घे. शरीर दमतंच. आपण समजावत राहतो स्वतःला की मी दमत नाही. माझी शक्ती अफाट आहे म्हणून. ताबडवत राहतो आपल्याच शरीराला. तसं करू नकोस. म्हणाली एक अर्धविराम घे. मॅट्रिकसुद्धा न झालेली माझी आजी. कसे चपखल शब्द वापरते. अर्धविराम. कुणी शिकवलं असेल तिला?


म्हणूनच, सगळ्या आवांतर ऍक्टिव्हीटीज काही दिवस बंद करायचं ठरवलंय. ह्या महिन्याच्या नाटकात मी म्युसिक करणार होते. त्यांनाही नाही सांगून टाकल. हा ब्लॉगही अवांतरच नाही का? मग इथेही एक पॉज घ्यायचं ठरवलंय. किती शक्य होतं ते माहीत नाही. पण प्रयत्न करून बघेन. इथे लिहिण्याचं व्यसनच लागलंय मला. पण तरीही. त्यामुळे पुढची भेट कदाचित मी पुण्याला गेल्यावरच होईल. कदाचित नाहीही. कारण तिथे काँप्युटर नाहीच आहे. ऑफिसमध्ये आहे, पण तिथे मराठी लिहिता येईल असं नाही. नव्या ऑफिसमध्ये सुरवातीला का होईना काम करण्याचं सोंग घ्यावं लागेल. त्यामुळे तसंही जमेलसं वाटत नाही. त्यामुळे माझा हा अर्धविराम.

पुन्हा भेटूच;

कधीतरी.

Thursday, April 17, 2008

सेंड ऑफ, समुद्र आणि पूर्व"पुण्या"ई

सध्या धमाल चालली आहे. मी पुण्याला जाणार हे लोकांनी फारच मनावर घेतलेलं आहे. ऑफिसमध्ये ठीक आहे पण माझ्या इथल्या मैत्रिणी, आमचे शेजारी, एवढंच काय? मामा, काका, आत्या, ह्या सगळ्यांनी असं ठरवूनच टाकलंय की आता मी पुण्याला गेले म्हणजे गेलेच. परत यायचे काही चान्सेस नाहीत. त्यामुळे सेंड ऑफ्स चाललेत सध्या. आणि त्याबरोबर मिळणारी आवडती गोष्ट म्हणजे गिफ्ट्स. अर्थात बऱ्याच जणांनी तारखा बुक करून ठेवल्यात त्याच्यामुळे अजून काही विशेष हाती लागलं नाहीये. पण येत्या काही आठवड्यात नको असलेली बरीचशी आणि हवी असलेली थोडीशी अशी गिफ्ट्स मिळणार आहेत.

हल्ली माझं सकाळी फिरणं पुरतं बंद झालेलं आहे, त्यामुळे आमच्या आजी आजोबा ग्रुपची भेट होत नाही. पण मुद्दाम त्यांना सांगायला म्हणून सोमवारी पॉइंटाला गेले. सगळ्यांना खूप आनंद झाला. जग्गूंना तर खूपच. त्यांनी तर एकदम मस्त प्लॅन ठरवलाय. चौपाटीला मफतलाल बाथ आहे ना, तिथे मला ब्रेकफास्ट ट्रीट आहे.

तिथला जिलबी फाफडा म्हणजे फर्स्ट क्लास. मी शाळेत होते ना? तेव्हा बाबा मला आणि विन्याला घेऊन सायकलिंगला यायचा. आणि घरी जाता जाता मफतलाल मध्ये थांबून जिलबी आणि फाफडा. आणि त्याच्यावर कडी म्हणजे नीरा. असलं काँबिनेशन फक्त बाबाच जाणे आणि आम्ही त्याचेच चेले, मग काय?

घरी येता येता उशीर झाला. उगाचच जरा समुद्रावर रेंगाळले. खरंतर समुद्राकडे बघत मी अख्खा दिवस घालवू शकेन. समुद्र आहेच तसा. सखा, सोबती, फ़्रेंड अँड फिलॉसॉफर. माझे कित्येक प्रॉब्लेम्स समुद्राने सोडवलेत. सीए चा अभ्यास करता करता कोणत्याही वेळी, अगदी टळटळीत दुपारी सुद्धा मी आलेय इथे. किती वेळा मुरूडला त्याच्या बाहूपाशात रमलेय, त्याचं ते अंजारणं, गोंजारणं, कधीकधी चिडून एखादा फटका मारणं, त्याचं ते संध्याकाळचं नयनरम्य रूप. खवळलेला तो, धीरगंभीर तो, मुलायम तो, रंगेल तो, रगेल तो. आयुष्याचा सोबती कसा हवा? समुद्रासारखा.

तो खारा वारा अंगावर घेत बसून राहायचं. एकदम फ्रेश वाटतं. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतात. पुण्याला हा माझा सखा नसेल.

गाण्याच्या बाईंना फोन केला. तसंही मी त्यांच्याकडे जाणं जवळजवळ बंदच केलं होतं पण फोन, कधीमधी भेट चालूच असते. त्या एकदम खूश झाल्या. त्या म्हणाल्या बरं आहे, तुझं नाटक सुटेल आता. तानपुरा घेऊन जा तिथे. तिथल्या एका प्रसिद्ध गुरुंना त्या माझ्यासाठी सांगणार आहेत. त्यांच्याकडे गाणं शिकायचं म्हणजे ड्रीम कम ट्रू आहे खरंतर. माझ्यापेक्षा बाबाला जास्त आनंद होईल कारण तो तर त्यांचा नंबर वन फॅन आहे. बघूया कसं जमतं ते.

आणि हल्ली माझे कुकिंग क्लासेस सुरू झालेले आहेत. रोज संध्याकाळी आईबाईंच्या शाळेत आमची हजेरी असते. हळूहळू पोळ्या गोल व्हायला लागल्यात. मीठ, तिखटाची समज यायला लागली आहे. मी आईला म्हटलं, आई, समज विनय गेला असता पुण्याला, शिकवलं असतंसं काय त्याला? तर म्हणाली, तो म्हणाला असता तर शिकवलं असतं. पण तो वेगळा आणि तू वेगळी.

म्हटलं काय वेगळं आहे? मला अजिबात पटत नाही हे. सगळे सारखेच ना. उद्या विन्याचं लग्न झाल्यावर तो काय घरात तंगड्या वर करून बसून राहणार? त्याला नको यायला हे सगळं. मलाही यायला पाहिजे हे मान्य, पण कायदा सगळ्यांना सारखा नको का? हे मला तिचं पटत नाही आणि तिला माझं. आईला खरंतर एक बाई म्हणून माझं म्हणणं पटलं पाहिजे. पण आमच्याकडे उलट आहे. बाबाला पटतं. खरंतर तो मी म्हटलेलं काहीही पटवून घेतो, हेही खरंच. कितीही पटलं नाही तरी.

म्हणाली, उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तर शिकायला लागेलच ना? हं. गाडी आली परत रुळावर. पण माझी पूर्वपुण्याई (की पूर्व"पुण्या"ई?) थोर म्हणून काही दिवस तरी गाडी यार्डातच राहील.

एकंदरीत काय तर सध्या ऑफिसमध्ये काम कमी होत चालल्यामुळे मजा, घरी कौतुक होतंय म्हणून मजा. सगळी मजा. पण कुठेतरी काहीतरी आतमध्ये जळतंय, सगळ्यांच्याच. माझ्याही. नव्या जगाची भीती, जुनं सोडायची हुरहूर. कदाचित लग्न होताना पण असंच वाटत असेल. नक्की. पण सध्या लगीन नव्या नोकरीच, मग जमलं तर माझं...

- संवादिनी

Thursday, April 10, 2008

नोकरी आणि भिजलेली रात्र

मिळाली. शेवटी मिळालीच.

गेल्या आठवड्यात लिहिलं नाही, पण नव्या नोकरीची बोलणी जवळ जवळ जमत आलेली होती. ह्या आठवड्यात ऑफर लेटर आलं. खूप छान वाटतंय. म्हणजे दहादा नाही ऐकल्यावर, दोन तीन वेळा नाही म्हटल्यावर, हो ऐकून, हो म्हणायचा आनंद काही वेगळाच असतो ना? तसा काहीसा आनंद झालाय मला.

कालच ऑफिसमध्ये सांगितलं. आमचा बुटकोबा तर एकदम सेंटीच झाला. म्हणाला, अभी मेरेसाथ कॉफी पिने कौन जायेगा? तशी काय मी त्याच्याबरोबर रोज नाही जायचे पण कधी कधी खूप वैताग आला सगळ्याचा की मला घेऊन जायचा कॉफी प्यायला. सगळ्या जगाला शिव्या घालायचा आणि मग शांत व्हायचा. त्याला माहीत होतं की मी इथली गोष्ट कधीही तिथे करणार नाही. आपल्याला काय, फुकट ते पौष्टिक. कॉफी आणि ऑफिसच्या पॉलिटिक्सचं ज्ञान फुकट कोण नाही म्हणेल?

त्याला सांगितलं, मग डिपार्टमेंट हेड कडे जाऊन रीतसर राजीनामा वगैरे दिला. आपण कुणीतरी मोठ्ठे झालोत असं वाटलं. त्यांनी विचारलं का चाललीस. काय उत्तर द्यायचं? का चालले? सूख खुपलं? अहं, असं काही मी बोलले नाही. मी सांगितलं, पगार चांगला आहे. आपली कंपनी पण छान आहे, पण तेवढा पगार नसता मिळाला म्हणून सोडतेय. खोटंच सांगितलं. पगार चांगला आहे, पण पगारासाठी नाही मी नोकरी सोडली. माझं आभाळ शोधण्यासाठी सोडली.

मग सगळ्या ऑफिसमध्ये बातमी पसरली. एकेक फोन यायला लागले. त्याचाही आला. मिशीवाल्याचा. ऑल द बेस्ट म्हणाला. काहीबाही बोलत गेला. पण त्याचं बोलणं काही डोक्यात गेलंच नाही. फक्त तो बोलत असल्याचा फील.

नेहमीची टेप लावायची. कुठली कंपनी, काय रोल, कुठलं शहर? मग पुणं म्हणून सांगितलं की मग तू एकटी राहणार? आमच्यासाठीपण बघा ना काहीतरी नव्या कंपनीत, इथपर्यंतच्या गप्पा. दिवस मोठा मजेत गेला.

घरी जायला निघाले, तेव्हा मात्र हुरहूर लागली. बरोबर पाच आठवडे राहिले. पाच आठवड्यांनंतर मी ह्या इथे येणार नाही. कुठेतरी दुसरीकडे जाईन. पण जग बदलणार नाही. तसंच राहील. लोकं ऑफिसात येतील, आपली कामं करतील आणि घरी जातील. मी मात्र इथे नसेन. माझा डेस्कही असेल, कॉमही असेल आणि तिथे दुसरंच कुणीतरी? छे, ही कल्पनाच असह्य आहे.

घरी पोचले. कालपासून घरी तशी शांतताच आहे. मी पुण्याला जाणार महिन्यांनी म्हणून. बाबाला मी म्हटलं, काय शोकसप्ताह वगैरे साजरा करताय का? नुसताच हसला. तो असा हसला ना की मला खूप वाईट वाटतं. खूप बिचारा वाटतो तो. बाबा. मुलगी जायला तर नकोय पण अडवायचं पण नाहीये अशी काहीशी हतबलता. काहीच बोलला नाही. मग मीच मुघल ए आझम ची सीडी लावली. ऐकत राहिला डोळे मिटून.

कधी नव्हे ते आत जाऊन आईला मदत केली थोडी. बाबापेक्षा आई ठीक वाटली. म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलंय की मी जाणारे म्हणून. मग पोळ्या लाटल्या. अर्ध्या आईने पुन्हा लाटल्या. पण आमटी मात्र मीच बनवली. आता माझा स्वैपाक मलाच करायला लागेल ना ह्यापुढे?

आणि आज चक्क मी बनवलेल्या आमटीचं विन्यानी तोंडभरून कौतुक केलं. जेवणं झाली. नेहमीच्या गप्पा काही रंगल्या नाहीत. बाबा तर गप्प गप्पच होता. विन्या फुटकळ बोलत होता पण त्यालाही म्हणावा तसा उत्साह नव्हता. आई तर काय कामातच असते नेहमी ती तशी होतीच.

झोपायच्या आधी देवाला नमस्कार करायला गेले. म्हटलं बरोबर निर्णय घेतलाय ना? मला कोण उत्तर देणार? पाठी विन्या उभा होता. म्हणाला ताई तू आता अतिरेकी होणार पुण्याला जाऊन. आता मी कुणाशी भांडणार? कुणाच्या कुरापती काढणार? आय विल मिस यू यार.

आय विल मिस यू टू.

बिछान्यावर पडले तर झोप लागेना. खूप रडायला आलं. खूप खूप. सगळं आठवलं, माझा रिसल्ट, सेलेब्रेशन. बाबा तर अक्षरशः नाचला होता. आईच्या कंपनीत नोकरी, वेगळी वेगळी ऑफिसेस, आमचा बुटकोबा, मोठे सर, नवखी मी, रुळलेली मी, निराश मी, उत्साही मी, माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेय ही नोकरी. आणि तीच कापून दूर करायची?

पूर्ण रात्र भिजून निघाली.

- संवादिनी

Wednesday, April 2, 2008

मी आणि पिंपळपान

मी का लिहिते?

.....................................................................................

ऐलतीराच्या कुशीला, माझ्या काळजाचा ठाव
उगवतीच्या दिशेला, माझा जीवलग गाव

तिथे सोनेरी सकाळ, चढे चंदेरी दुपार
मन फिरे रानोमाळ, नाही काळजी चकार

बाबा मोठा तालेवार, त्याचा चिरेबंदी वाडा
माय मायेची फुंकर, दारी प्राजक्ताचा सडा

दृष्ट पडावी कुणाची, असा सखा भाऊराया
चौकोनी गुणांची, माझ्या वाड्याची हो माया

वाड्याच्या अंगणाला, आहे पिंपळाचं धन
आल्या गेल्या दिवसाला, एक पिंपळाचं पान

चोपडीत हो सारीलं, एक पिंपळाचं पान
एक पिंपळाचं पान, माझं तन मन धन

.....................................................................................

कदाचित माझं लिहिणं म्हणजे पिंपळपानं जपण्याची गरज असेल. हातात असलेलं निसटून चाललंय ही हतबलता असेल. मुठीत वाळू कधीच राहत नाही मला माहितेय. प्रयत्न वाळू पकडण्याचा नाहीये. प्रयत्न कधीतरी वाळू हातात होती ह्याची आठवण ठेवण्याचा आहे.

मी मनात येईल ते इथे लिहिते, कारण खऱ्या आयुष्यात खरं आणि स्पष्ट बोलण्याची ताकद माझ्यात नाही. मग भागवून घेते एक हौस, खरंखुरं बोलण्याची, प्रांजळ बिंजळ लिहिण्याची.

ही गरज शब्दात पकडणं कठीण आहे. कलाकाराला अव्यक्त राहण्यासारखी शिक्षा नाही. अव्यक्त व्यक्त करण्याची गरज म्हणून मी लिहिते. पण गंमत अशी की अव्यक्त ते व्यक्त करण्याच्या भानगडीत मी स्वतः अधिकाधिक अव्यक्त होत जातेय. कोंबडी आधी की अंडं? मी की माझ्या आयुष्यातलं अव्यक्त? माझ्यासाठी मी गौण आहे. माझ्या आयुष्यातलं अव्यक्त महत्त्वाचं आहे, म्हणून लिहिते, स्वतःला संवादिनीच्या सुरात लपवून.

उद्या खरंच भविष्य आलं वर्तमानात, तर उघडेन मी माझी चोपडी आणि पाहीन माझ्या गावातल्या पिंपळाचं विटलेलं, जराजर्जर पिंपळपान. हिरवेपणा हरवला असेल कदाचित पण तिथल्या सोनेरी सकाळी, चंदेरी दुपारी, चिरेबंदी वाडा आणि प्राजक्ताचा सडा तरी नक्कीच दिसतील त्या पानाच्या वृद्ध शिरांमध्ये.

कुठेतरी एखादी हास्याची लकेर, कुठे डोळ्यात ओघळलेला एखादा अश्रू, कुठे एखादा जमलेला मालकंस, एखादा विश्वासघातकी ब्रूटस, कधी एवढं एवढंसं झालेलं मन, हे सगळे हायलाईटस आहेत माझ्या आयुष्याचे. ते रेकॉर्ड करून ठेवावे आणि कधी निवांत रिप्ले करून बघता यावेत, म्हणून लिहिते. मी कशी आहे ह्याची आठवण व्यवहारी जगात कुठे गेलीच हरवून, तर ती इथे सापडेल, म्हणून मी लिहिते.

पण नकळतंच ह्या लिहिण्याला नवी किनार प्राप्त झालेय. कुणीतरी ते वाचण्याची. लिहिण्याला सुरुवात केली तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की कुणी हे वाचेल. कुठल्यातरी गजबजलेल्या हिडीस शहरातल्या एका कोपऱ्यातल्या खुराड्यात घडणारी गोष्ट, कुणाला वाचावीशी वाटते, बरं वाटतं. एका कोणत्याही सामान्य कुटुंबासारखं असावं असं आमचं कुटुंव. त्यातल्या आईला, विन्याला, बाबाला आणि मलादेखील थोडं ग्लॅमर प्राप्त होतं ह्या ब्लॉगवर म्हणून लिहिते.

अगदी जसं घडतं तसं. माझ्या गावातल्या पिंपळाच्या पानासारखं.

माझा खो यशोधराला

आणि मला खो दिल्याबद्धल थँक यू गं, जास्वंदी!

- संवादिनी

Thursday, March 27, 2008

मी आणि माझं आभाळ

काल अजून एक इंटरव्ह्यू झाला. हल्ली आठवड्याला एकदोन होतायत त्यामुळे त्याबद्धल काही लिहिण्यासारखं नाहीच आहे. हल्ली इंटरव्ह्यू वाढलेत ह्याचं कारण म्हणजे, मी, मुंबईच हवी, ही माझी नोकरीची अट कमी केलेली आहे. गेलाबाजार पुणं तरी मिळावं एवढीच अपेक्षा आहे. तसं लांब जायला काही हरकत नाही, पण पुण्यावरून कसं? कधीही घरी पळता येईल. नाही म्हटलं तरी मराठी. चेन्नई, कलकत्त्यापेक्षा कधीही जवळचं वाटतंच.

गेले बरेच दिवस ह्या विषयावर आमच्या घरी चर्चासत्र घडत होती. म्हणजे मी एकटीने जाऊन नोकरीसाठी परगावी राहावं का? आई म्हणे अजिबात नको. हल्ली काय एकेक ऐकायला येतं? तिच्यावर हल्लीच्या नव्या हिंदी सिनेमांचा प्रचंड परिणाम झालाय. आपली मुलगी वाईट संगतीला तर नाही ना लागणार ही तिची भीती.

बाबांनी तरी माझी बाजू घ्यावी की नाही? तेही नाही. ते म्हणे, उद्या तुझं लग्न होणार आणि मग तू जाणार तोपर्यंत तरी तू इथे राहा. उद्या लग्न कुठल्या शहरात होईल माहित नाही. मग तेवढा सहवास मिळेलच असं नाही. मला एवढा राग आला ना त्यांचा. नेहमीसारखं बोलणंच बंद केलं मी. फक्त कामापुरतं. त्यांना बहुतेक वाईट वाटलं.

विन्या म्हणे सुंठीवाचून खोकला गेला. म्हणाला जायचंच असेल तर परदेशी जा. हे पुणंबिणं नको. पुणं तेथे सगळंच उणं. स्कूटर चालवता येणार नाही रस्त्यात म्हणाला. अतिरेकी बायकांसारखे बुरखे घालून स्कूटर चालवायला लागेल.

असं तिघांनी मिळून नकारघंटाच लावली.

आताशा मला वाटायला लागलंय की थोडं स्वतंत्र व्हायला हवं. म्हणजे घरात मला कसली बंदी आहे असं नव्हे. पण आपलं एक वेगळं आभाळ असावं असं प्रत्येकाला वाटतंच ना. स्वप्नांचे पंख लावावेत आणि द्यावं झोकून. सोडावं आपलं गाव, आपलं घरटं. उडावं उंचच उंच. अर्थात घरट्यावरचं प्रेम त्यामुळे कमी होणार नाहीच. पण नवे अनुभव, नव्या शक्यता, जबाबदाऱ्या, प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स. सगळं कोरं करकरीत नवं हवंय.

मग मी काय केलं? वाद घालणं बंद केलं आणि तडक आजीचं घर गाठलं. आजीचं घर म्हणजे मामाचं घर. आईची आई. बाबांची आई कधीच गेली. तिचं आभाळ अजून वेगळं. तर आजीकडे गेले. सगळ्यात मोठी नात म्हणून आजीची मी लाडकी आहे.

तिला सांगितलं. तिसऱ्या जनरेशन चे प्रॉब्लेम्स, दुसऱ्या जनरेशनला कळत नाहीत, पण पहिल्या जनरेशनला कळतात हे कसं काय? तिला माझं म्हणणं पटलं. लगेच फोन लावला तिने आईला आणि चांगली ओरडली. आईला लग्नाआधी नोकरी करायची होती. दादा नाही म्हणाले. तेव्हा, आता मी जशी भांडतेय, तशी ती आजीशी आणि दादांशी भांडली होती.

एकदा हाय कमांडनी आदेश काढला की मग आमच्याकडे काही चालत नाही. आजी हो म्हणाली आणि सगळा विरोध मावळला.

घरी गेले नंतर तर आई बाजूला घेऊन म्हणाली. हे बघ, आजी म्हणतेय म्हणून मी तुला परवानगी देतेय. पण उद्या भलतीकडे कुठे नोकरी मिळाली तर सांभाळून राहा. वाईट मित्रमंडळींपासून दूर राहा. लहान वयात काही कळत नाही काय चांगलं काय वाईट ते. दोनदा विचार कर काहीही करण्याआधी. मला खुदकन हसायला आलं. म्हटलं आई अजून मला कोणीही नोकरी दिली नाहीये. अत्तापासूनच एवढी चिंता. खरंच जायला लागलं तर काय होईल?

विन्या पुन्हा म्हणाला. ते पुणं सोडून काहीही बघ हं ताई. तू अतिरेकी आहेस, पण अतिरेकी दिसलीस तर जाम वाईट वाटेल मला.

बाबांना मनातून माझं पटलं होतंच. त्यांनी चक्क मला इंटरनेटवर सॉरी कार्ड पाठवलं. खाली लिहिलं होतं.

"उडणाऱ्या पिलाचे पंख बांधून ठेवल्याबद्दल पिलाच्या बाबाकडून सॉरी"

- संवादिनी

Thursday, March 20, 2008

मी, ती आणि फुलपाखरू

लाटा. भरती आणि ओहोटीच्या. म्हणजेच का आयुष्य?

एक दिवस येतो. उनाड फुलपाखरासारखा. वाटतं आपणही फुलपाखरू व्हावं. ह्या फुलावरून त्या फुलावर जावं. शोषून घ्यावा सगळा मध. फुलपाखराचं आयुष्य ते किती? दोन दिवस? मग ह्या दोन दिवसात पर्वा कुणाची करायची आणि का? आपण आपल्या मस्तीत जगावं आणि आपण आपल्या मस्तीत मरावं.

आपण मरावं? खरंच आपण मरू का? सगळं जग मर्त्य आहे हे माहित आहे. पण मीसुद्धा? हो खरंच मीसुद्धा. मग मी घाबरावं का मरणाला? सगळेच मरणार. कुणाच्या मरणाला घाबरायचं मी? माझ्या? का?

आप मरे जग बुडे.

आपण मेलो तर संपलंच ना सगळं. मग भीती कुणाच्या मरणाची. इतर फुलपाखरांच्या?

दुपरचे दोन वाजलेत. मी ऑफिसला गेलेच नाहीये. प्रचंड उकडतंय. शरीराला आणि मनालाही. वरचा पंखासुद्धा हैराण वाटतोय ह्या उकाड्यानं. बाबा घरी नाही. आईसुद्धा नाही. बाबा गेलाय तयारी करायला. आई त्यांच्याकडे. विनय त्याच्या कामाला गेलाय.

ते एक वेगळं फुलपाखरू. जग बुडलं तरी काही फरक पडायचा नाही त्याला.

आणि मी इथं बसलेय काहीही न करता. माझ्याच तंद्रीत. आठवणींची जळमटं झाडत बसलेय. आठवणींना जळमटं म्हणायचं का? किती जवळच्या असतात काही आठवणी. पण जळमटंच. ज्या आठवणी रडू आणतात, त्या जळमटांसारख्याच झाडून टाकायला हव्यात. मी त्वेषाने झाडू फिरवतेय, पण जळमटं काही तुटेनात. उलट मीच त्या जळमटांत गुरफटंत चाललेय. असह्य होतं सगळं

आणि मग, ती असहायता बाहेर पडते, एक थेंब बनून, डोळ्यातून. एक मग दुसरा मग तिसरा.

आई मला बोलवायला येते. माझी असहायता कुणाला दिसू नये म्हणून मी त्या तिघांना पुसून टाकते. बाहेर जाते.

अंगणामध्ये गर्दी असते. त्यात बाबाही असतो. विनूही असतो. तो दिसल्यावर मला उगाचंच बरं वाटतं. तपशील पुसट होत जातात. डोळ्यांच्या काचांवर धुकं जमतं. आई बाजूलाच असते. जरा आधार वाटतो. खरा मला बाबा हवा असतो कारण मला रडायचं असतं मनसोक्त. पण तो खाली अंगणात असतो. काहीबाही काम करीत.

राम बोलो भाई राम.

संगीतात आकंठ बुडून जाणारी मी, ह्या खर्जातल्या सुरांनी विषण्ण होते.

तिला घेऊन जात असतात. तीच. माझी कुणीही नसलेली ती. शांत झोपलेली असते. सगळ्या विवंचनेतून सुटलेली. एखाद्या फुलपाखरासारखी.

रांगणाऱ्या मला पटकन कडेवर उचलून घेणारी ती, दुपारी दंगा करून तिची झोपमोड केली म्हणून मला ओरडणारी ती, तिच्या मुलाला भाऊबिजेला राखी बांधते म्हणून माझं कौतूक करणारी ती, माझ्यासाठी न चुकता वांग्याची भाजी आणून देणारी ती, दोन दात बाहेर काढून प्रेमळपणे हसणारी ती, कुणाच्या लग्नात मुलाकडची असूनही मुलीची पाठवणी होताना रडणारी ती, प्रेमळ ती, घाबरट ती, शरणागत ती.

शेवटच्या आजारात हॉस्पिटलमध्ये असाहाय झालेली ती आणि तिची असहायता माझ्या डोळ्यात उतरवणारे ते तीन पुसलेले थेंब.

मी बघत राहते. पांढरं कोरं करकरीत कापड. इतकं करकरीत की बांबूत घुसवताना करकरणारं. करकचून बांधलेली सुतळ. अबीर, बुक्का, फुलांच्या माळा. डोक्याला लावलेलं ठसठशीत कुंकू. आणि ती जायला निघते.

पुन्हा ते कर्णकर्कश संगीत. तिचा मुलगा पुढे. बाबा चटकन पुढे होतो एक बाजू पकडतो. एवढा पहाडासारखा कणखर माझा बाबा, पण त्याच्याही एका डोळ्यात पाणी चमकतं. त्याच्या मोठ्या बहिणीसारखी ती.

ती निघून जाते. आई बायकांच्या घोळक्यात सामील. मी तिथेच. एकटी.

फुलपाखरू पण एकटं.

दोन घटका सगळीकडे सामसूम असते.

बाहेरून गोड खिदळण्याचा आवाज येतो. मी बाहेर जाते. तिची नात जोरजोरात खिदळत असते. दोन वर्षाची ती. तिला काय समज?

तेही एक फुलपाखरू. मीही. बाबाही, आईही आणि विनयही. सगळेच. बांबू बांधणारे, पांढरं कापड करकरवणारे, अबीर बुक्का सांडणारे आणि ते कर्णकर्कश्श संगीत म्हणणारे.

आणि सगळे एकटे.

- संवादिनी

Thursday, March 13, 2008

मी, वाढदिवस आणि आई

आईचा वाढदिवस झाला. मला माझा स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला अजिबात आवडत नाही. पण इतरांचा मात्र मनापासून आवडतो. आपण असं सेंटर ऑफ अटेन्शन झालेलं मला नाही आवडतं. आणि माझा वाढदिवस हे एक प्रकारचं खाजगी प्रकरण आहे असंच मला वाटतं. अर्थात मी जे फंडे माझ्या वाढदिवसाला लावते ते दुसऱ्यांच्या वाढदिवसाला लावत नाही. म्हणूनच घरातल्या बाकी तिघांचेही वाढदिवस जोरात साजरे व्हावेत असं मला मनापासून वाटतं.

तसा आईच्या वाढदिवसालासुद्धा. तिला गिफ्ट काय द्यायचं, इथपासून साजरा कसा करायचा इथपर्यंत, सगळ्या तयाऱ्या गेले काही दिवस चालू होत्या अर्थात तिला थांगपत्ता न लागू देता. सुटीच्या वारी वाढदिवस असल्याने बरंच होतं.

सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरू झालं म्हणजे सकाळी लवकर उठून विन्याने चहा करायचा आणि मग आईला उठवायचं. चहा त्याने केला, पण तो करताना मला दहा वेळा उठवून पंधरा प्रश्न विचारले. आणि वाढदिवसाचं सार्वजनिक कार्य असल्याने नेहमीप्रमाणे मला त्याच्यावर उचकता आलं नाही. अर्थात मी काही चहा एक्स्पर्ट नव्हे. पण त्याच्यापेक्षा मी दहा पंधरा कप जास्तच बनवले असतील म्हणून माझा सल्ला. आयता चहा झकासंच होतो तसा विनयचाही झाला. मग बाबांनी त्यांच्या जेपी स्टाइलमध्ये जाहीर केलं की आज आईला स्वैपाकघरात बंदी.

सुटीच्या दिवशी सकाळी पेपरसाठी आमच्या घरात शब्दशः मारामारी होते पण आज नाही. मी स्वतःहून जाऊन तिला हवा तो पेपर घेऊ दिला. तिने मराठी पेपर घेतला. डी.एन.ए. च्या झकपक आफ्टर अवर्स पुरवण्या विन्याकडे सरकवून मला उरलेला पेपर मिळाला. इंग्रजी पेपर वाचायला मला आवडत नाही. पण आज कुणाला काही सांगायची सोय होती का?

बाबांनी पोह्यांचा घाट घातला होता. मी त्यांना आडून आडून फ्रेंच टोस्ट किंवा ऑम्लेट किंवा तत्सम सोपे पदार्थ करायचा सल्ला दिला होता पण तो त्यांनी धुडकावला. रुचिरात बघून कांदे पोहे कुणी केलेले तुम्ही ऐकलेत. बाबांनी केले. आणि ते सपशेल फसले. अर्धे जळून पातेल्यालाच चिकटले. आणि आईला आज स्वैपाकघरात बंदी. मग सगळी निस्तरपट्टी माझ्या वाट्याला लागली. बाबा जाऊन चक्क स्कूटरवरून जाऊन इडली घेऊन आले.

दुपारची महत्त्वाची जबाबदारी माझी होती. ती म्हणजे स्वैपाकाची. माझ्यासारखी बल्लवाचारीण असल्यावर काय बनवायचं हा मोठा प्रश्न. कारण जे बनेल ते खाता आलं पाहिजे, बनवायला एकदम सोपं हवं आणि नंतरची निस्तरपट्टी कमीत कमी हवी. ह्या सगळ्या अटी पाळत पाळत शेवटी पावभाजी ठरली. तरी हा दुपारी जेवायला खायचा पदार्थ नाही, असा मोडता विन्याने घातलाच. माझी स्वस्तात सुटका झालेली त्याला कधीच पाहवत नाही. पण शेवटी, प्रॉपर जेवायचे पदार्थ फेल जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बाबांनी मला पाठिंबा दिला. पावभाजी झकास झाली. थोडी तिखट झाली. त्यामुळे पाण्याबरोबर खावी लागली. मला खूप आवडली. आईला माहीत नाही आवडली का. पण ती म्हणाली तरी, नाक पुसत पुसत.

संध्याकाळी मी आई बाबांसाठी पिक्चरची तिकिटं काढली. ती दोघं तिथं गेली. विन्या क्रिकेट खेळायला (बाबांच्या शब्दात उकिरडा फुंकायला) गेला. मग घरात काय आम्ही दोघंच मी, और मेरी तनहाई. मग काय? जश्या अक्सर करतो, तश्या आम्ही बाते करीत बसलो.

एक दिवस आई किचनमध्ये नाही तर किती गोंधळ उडाला. गोष्टी चुकत नाहीत तोपर्यंत त्या बरोबर चालल्यात हे कळतंच नाही. किती कष्ट आहेत किचन सांभाळण्यात? अशा दिवशीच ते कळतं. वळेल तेव्हा खरं.

वाटलं जेवढं ती माझ्यासाठी करते तेवढं मी तिच्यासाठी करते का? तिचं ऐकते का? तिच्या बोलण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष का करते? मग फोटो काढून बसले जुने. एक आई बाबांचा तरुणपणाचा फोटो आहे. मी अगदी पाच सहा वर्षांची असेन तेव्हा. खूप आवडतो मला. आईच्या डोळ्यात जिद्द दिसते एक. संसार उभा करायची. पिचून गेली असेल का ही जिद्द आमचं करता करता?

मग जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत गेल्या. मला शाळेत घेऊन जाणारी आई. इतर मुलांच्या आया मधल्या सुट्टीत येतात, पण माझी आई नाही म्हणून तिच्याकडे रडणारी मी. माझ्यासाठी कुणाशीतरी भांडणारी आणि भांडण्याचा मुळात पिंडच नसल्याने डोळ्यात आलेलं पाणी लपवणारी आई, अभ्यास घेणारी आई, ओरडणारी आई, माझ्याशी भांडणारी आई. असे काही विचार आले की एकदम रडायला येतं. लाटांवर लाटा येत राहतात अगदी भरती ओसरेपर्यंत.

अगदी तारे झमीन पर मधल्या इशान सारखं...

मै कभी बतलाता नही, पर अंधेरेसे डरता हूं मै मा.
युं तो मै, दिखलाता नही, पर तेरी परवाह करता हूं मै मा.

तुझे सब है पता है ना मा. मेरी मां....

मग रात्री आई बाबा आल्यावर, मी आईला, खास कुणालाही न सांगता आणलेली भेट दिली. एक कॅन्व्हासची वही आणि स्केचींगची पेन्सिल. तिची चित्रकला खूप छान आहे. पण कुठे हरवून बसली कोण जाणे? ती देणगी दादांची. दादा म्हणजे आईचे बाबा. अप्रतिम चित्र काढायचे. तिला सांगितलं की चित्र काढ. मनात असेल ते काढ. खूप आनंद झाला तिला. मनापासून.

एकंदरीत वाढदिवस जोरात साजरा झाला.


- संवादिनी

Thursday, March 6, 2008

आजी, गाणं आणि दुःख

मला एकदम निराश बिराश वाटायला लागलं की दोनच गोष्टी मदतीला येतात. नाटक चालू असेल तर नाटक नाहीतर तानपुरा. अर्थात दुःखाची नवलाईही पाच दिवसाचीच असते. पहिले दोन दिवस आपल्याला वाटत होतं ते न घडण्याचं दुःख आणि उरलेले तीन बॅक टू नॉर्मल येण्यासाठी लागतात म्हणून.

रविवारी संध्याकाळी असंच डिप्रेसिंग वाटत होतं. हो नाही करता करता तानपुरा काढलाच. यमनाचे आलाप सुरू केले. "म" बरोबर लागतोय असं वाटलं. विनयला म्हटलं बस जरा तबला घेऊन. "ओरी आली पियाबिना" सुरू केलं. एवढं बरं वाटलं ना? सगळं सगळं विसरवून टाकायची जादू आहे संगीतात नाही? तो एक "नि", तो एक "म" बस्स. बाकी काही दिसतंच नाही डोळ्यापुढे.

तेवढ्यात बाबा आले, ते बसले, आई आली, तीही बसली. आमच्या मजल्यावरचे भावे काका आहेत त्यांनाही बाबांनी बोलावलं. ते उत्तम पेटी (खरंतर संवादिनी म्हणायला हवं) वाजवतात. बैठक जमली. अजूनही दोघं तिघं आली ऐकायला. मी काही फार गायले नाही. पण बाबांनी त्यांची हुकमी नाट्यगीतं म्हटली, देवाघरचे ज्ञात कुणाला, रम्य ही स्वर्गाहून लंका. मग मला खास भावेकाकांसाठी "का धरला परदेस" गायला लागलं. त्यांचं अतिशय आवडतं गाणं.

किती दिवस झाले अशी मैफल जमली नव्हती. ह्या मैफलीला ना उत्तम गायक ना श्रोते. आम्हीच गायक, आम्हीच वादक, आम्हीच सबकुछ. पण तरीही आनंद अगणित. वर्णनच करता येणार नाही. अर्थात बऱ्याच दिवसांनी झाली म्हणून मजा आली. दर रविवारी झाली असती तर कदाचित इतकी मजा आलीही नसती.

पण असं काही उत्स्फूर्तपणे घडलं की फार छान वाटतं. एकदम "जिप्सी". खावं, प्यावं, गाणी म्हणावीत, गप्पा माराव्यात, पुढच्या गावी जावं, पुन्हा तेच करावं. तो अभ्यास, ती नोकरी, लग्न, असल्या कटकटी कुणी निर्माण केल्या कुणास ठाऊक?

अर्थात आमच्या ह्या बैठकीची निस्तरपट्टी आईला करायला लागली. नाही म्हटलं तरी चहा पाणी करावंच लागतं.

असो तर सांगायचा मुद्दा हा, की रात्रीपर्यंत माझं डिप्रेशन कुठल्या कुठे पळालं. पुन्हा नवं वाटायला लागलं. आता नवं वाटायला लागलं म्हणजे काय? लिहिणं कठीण आहे.

उगाचंच आजीची आठवण आली. तिच्या भावंडांपैकी सगळे ह्या ना त्या प्रकारे शास्त्रीय संगीताशी जोडलेले. पण तिला काही जमलं नाही, एवढं वाईट वाटायचं तिला त्याचं. जाऊदे. आजी गेली तिच्याबरोबर तिला न जमलेलं गाणंही गेलं.

लाईफ जस्ट मूव्हस ऑन.

तिच्या गाण्यासाठी थांबलं नाही आणि माझ्या दुःखासाठीही.


- संवादिनी

Thursday, February 28, 2008

मँगलोर, तो आणि पंचावन्न पाढे

काल परत आले. आम्ही सगळेच आलो. मागच्या पोस्ट मध्ये लिहिलं नाही पण तोही मँगलोरला आला होता. त्याच्या डिपार्टमेंटच्या कामासाठी.

खूप मजा आली आणि नाहीही. तो खरंच खूप चांगला आहे. खूप गप्पा मारल्या त्याच्याशी मी. भटकलो खूप. त्याचं आजोळ आहे मँगलोर! आणि जुनं घरपण आहे त्याच्या आजोबांचं. तिथे तो घेऊन गेला. बीचवर घेऊन गेला. म्हणजे मला एकटीलाच नाही, सगळ्यांनाच. पण त्याच्याशी खूप छान मैत्री झाली. रविवारी म्हणाला फिश खायला जाऊ. बाकी सगळे कट्टर व्हेजी लोकं. मग दोघंच गेलो.

ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. जी व्यक्ती तुम्हाला आवडते तिच्यासोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?

पहिली धडधड, त्यात वेंधळेपणा करणं, हेही मी साग्रसंगीत केलं, नेहेमीप्रमाणे. मग हळूहळू तो बोलत गेला आणि मीही. माझं घर, आई, बाबा, विनय, माझी चाळ, माझी शाळा, मैत्रिणी, पुस्तकं, नाटक, गाणं, सगळं सगळं.

तोही बोलत गेला. त्याच्याबद्दल. त्याच्या बायकोबद्दल!

हो. त्याचं लग्न झालंय. गेल्याच वर्षी. आधी चौकशी..

जाऊदे. काय लिहू आणि काय नाही? मला तो आवडतो. त्याचं बोलणं, वगणं, हसणं, गाणं, खिदळणं. सगळं सगळं मनापासून आवडतं. पण त्याने काहीही फरक आता पडणार नाही. पुढचे सगळे रस्तेच खुंटलेत.
फार वाईट अवस्था झाली माझी तिथे. अचानक लक्षच उडालं सगळ्यातलं. तो काय बोलतोय मी काय बोलतेय? काय खातेय? खातेय ते चांगलं आहे की वाईट? काही काही कळत नव्हतं. हॉटेलवर परत आले तर रडायचीसुद्धा खोटी. माझी रूम पार्टनर होतीच. मग काय? खोटं खोटं हसत सांगावं लागलं फिश खूप आवडलं म्हणून.

रात्रभर झोप नाही. सतत डोक्यात तेच चालू होतं. तो मिळणार नाही म्हणून दुःख की मी सपशेल गंडले म्हणून दुःख? ते शेवटपर्यंत कळलं नाही. खरंतर मी त्याला पुरेशी ओळखत नव्हतेच प्रेम बीम करायला, मग मी का गुरफटत गेले?

पण मग विचार केला. जर मला माहीत असतं की त्याचं लग्न झालंय आधीच, तरीही आवडलाच असता ना तो मला? म्हणजे एक चांगला मित्र झालाच असता ना? नाही झालाच तो चांगला मित्र माझा. सगळंच मोठं विचित्र आहे. मी स्वतःलाच समजवू शकत नाहीये की मी त्याच्याशी मैत्री करू शकतेच ना? देअर कॅन बी लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे लग्न. लाईफ पार्टनर वगैरे अशक्य आहे. ते तर मी कधीच डोक्यातून काढलं आहे. पण ते नाही म्हणून अजिबात बोलायचंच नाही असं थोडीच आहे? आणि त्याला बिचाऱ्याला तर यातलं काही माहीत सुद्धा नाही.

प्रेमभंग नाही म्हणता येणार पण जवळपासचं काहीतरी अनुभवायला मिळालं. खूप त्रास झाला. पण मलाच बरं वाटलं. मी स्थितप्रज्ञपणे विचार करू शकले म्हणून.

घरी गेल्यावर आई म्हणाली. तिच्या मैत्रिणीने एक स्थळ सुचवलंय म्हणून. फोटो पसंत आहे त्यांना भेटायचंय. खरंतर डोक्यात तिडीक जायला हवी होती, पण चक्क बरं वाटलं. आपण कुणालातरी आवडलो ही भावना अशा वेळी हात देते. आईने फोटो दाखवला. मुलगा चांगला वाटला. पण तो परदेशी आहे. आई वडील येणारेत त्याचे, जर मला फोटो आवडला तर. मी सांगितलं आईला, नीट बघते आणि सांगते.

सध्यातरी मी सरळ रेषेत विचार करू शकेन कशाबद्धलही असं वाटत नाहीये. कुणी चांगली शंभर ठिपके शंभर ओळींची नक्षीदार रांगोळी काढायला घेतली आणि ती पूर्ण व्हायच्या आतच वाऱ्यावर उधळली गेली, तर काढणाऱ्याला कसं वाटेल? तसंच काहीसं मला वाटलं. रांगोळी पुन्हा काढता येईल, दहादा काढता येईल, पण ती अशीच जमेल ह्याची काय खात्री?

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.


- संवादिनी