असो, सांगायचा मुद्दा हा, की आमचं पार्सल पुण्यनगरीत येऊन पोहोचलं, सगळंच धक्कादायक आहे. अजूनही मी सावरतेय.
पहिल्या दिवशी सकाळी सकाळी इंद्रायणीने इथे पोहोचले. ऑफिसतर्फे पहिल्या दोन ट्रिपा स्पॉन्सर्ड आहेत, त्यामुळे एसी चेअरकारनी आले. पण खिडक्या उघडता येणाऱ्या डब्यांची मजा इथे नाहीच. निसर्गाचा रंग कसा लख्ख दिसायला हवा. जसा आहे तसा. मध्ये ती टींटेड काच आली, की सगळं सपक दिसायला लागतं. त्याच रंगात असल्यासारखं.
आधीच मला नव्या नोकरीचं टेन्शन, त्यात एवढ्या लवकर उठायची नसलेली सवय, त्यामुळे झोपेतच शिवाजीनगरला उतरले. सामान काही जास्त बरोबर नेलंच नव्हतं कारण आई बाबा गाडीने विकेंडला पोहोचणार होते, माझ्या सामानासकट. पहिला धक्का. पुण्यातला रिक्षावाला माझ्याशी हिंदीत बोलला. आणि तो मराठी होता हे त्याच्या उच्चारांवरून स्पष्ट कळत होतं. म्हणजे मी मराठी दिसत नाही की काय? काळे डोळे सोडले तर बाकी सगळंच एकदम चित्पावनी. त्यामुळे पुण्यातले लोकं आपल्याला पुणेकरंच समजतील असा एक फाजिल समज झाला होता, तो त्या पुणेरी रिक्षावल्याने माझ्याशी हिंदीत बोलून चुकीचा सिद्ध करून दाखवला.
असो, हा धक्का फारसा धक्कादायक नव्हता. खरा धक्का तर पुढेच बसला. ऑफिसात शिरून एच आर डिपार्टमेंटमध्ये शिरले. एक अतिशय नकोसा वाटावा असा माणूस बसलेला. बोलण्यात उर्मटपणा, उपकार करतोय असा वागत होता. त्याला जाऊन माझं नाव वगैरे सांगितलं, मेडिकल करायची वगैरे तेही सांगितलं. त्यानंतर तो मला जे काही म्हणाला ते ऐकून झीट येऊन पडायचीच वेळ आली. तो म्हणाला की त्याला कोणी कळवलंच नाहीये की मला रिक्रूट केलंय म्हणून.
मनात म्हटलं, अरे माणसा, मी माझी सोन्यासारखी नोकरी सोडून, सकाळी सकाळी उठून, तडफडत तडफडत, इथे येऊन पोचले आणि तू मला म्हणतोस की तुला कोणी सांगितलंच नाहीये की मी येणारे म्हणून? मी म्हणजे ऑलमोस्ट रडणारंच होते, पण कसंबसं रोखलं. शेवटी नावात घोटाळा झाल्याचं कळलं. साठ्ये चं चक्क शेट्टी? पण शेवटी मीच ती, हे ऐकून मला हायसं वाटलं.
बाकी सगळा दिवस मेडिकल, जॉइनिंग फॉरमॅलिटीज मध्ये गेला. संध्याकाळी अस्मादिक ह्या आमच्या गेस्ट हाउस वर पोहोचले. जुन्या कंपनीने वाईट सवयी लावलेल्या. तिथे म्हणजे राजेशाही कारभार, हवंतर राणीशाही म्हणा, पण इथे? एवढी मोठी ही कंपनी पण गेस्ट हाउस कसलं? एखाद्या कॉलेजचं हॉस्टेलही ह्यापेक्षा खूप चांगलं असेल. पुन्हा एकदा रडायलाच यायला लागलं. मी एवढी रडी आहे हे मला इथे आल्यावरच कळतंय.
जरा फ्रेश होऊन बाहेर पडले, घरी फोन केला. विन्याने उचलला. एकदम खूश झाला. त्याच्याशी थोडा वेळ बोलले, मग बाबाशी बोलले, आईशी बोलताना मात्र तिला सांगितलं म्हटलं शुक्रवारी नाही, उद्या परवाच या. इथे राहणं मला शक्य नाहीये इतकं टुकार गेस्ट हाउस आहे. हो नाही करता करता गुरुवार ठरला. गुरुवार म्हणजे उद्या ते इथे येतील. मग माझ्या काकाचा रिकामा फ्लॅट आहे, कचरा डेपोला, तिथे मी एकटी राहणार आहे, तिथे सगळं सेटिंग करतील आणि मग आम्ही शुक्रवारी सगळेच मुंबईला जाऊ. काय पण एरीआ आहे? कचरा डेपो?
बाबाने मला हा लॅपटॉप घेऊन दिला. मस्त आहे. आणि बॅकग्राउंड म्हणून आमचा चौघांचा फोटो लावून ठेवलाय, सिडनी ला घेतलेला. मी सीए झाल्यावर आम्ही ट्रीपला गेलो होतो तेव्हाचा. पाठी ऑपेरा हाऊस आहे. पण मी बघतच नाही तो. उगाचच आठवण येते आणि पुन्हा रडायला येतं. मला खरंच वाटलं नव्हतं, की एवढी सतत आठवण येईल, रडू येईल. अर्थात आता जरा बरं वाटतंय कारण उद्या सगळेच इथे येतील.
नेहमी कळपात राहणाऱ्या प्राण्याला एकदम एकटं राहायला सांगितलं तर कसं होईल? तसं माझं झालंय. ऑफिसात कुणी ओळखत नाही, एकदम जाऊन कुणाशी मैत्री करण्याचा माझा स्वभाव नाही. मित्रमंडळात खूप बडबडी असले तरी अनोळखी लोकांच्यात माझी एकदम भिजलेली मांजर होते. उगाचच हसायला टॅक्स पडत असल्यासारखा माझा चेहरा मग लंबाचौडा होतो. त्यामुळे पटकन ओळखी होत नाहीत, लोकांना मी कदाचित थोडी आखडूही वाटत असेन. सेल्फ रिअलायझेशन का काय ते म्हणतात ते हेच असेल? आपल्या डबक्यात शेर असलेला बेडूक, डबक्याबाहेर पडला की त्याला आपलं बेडूकपण जाणवतं. डबक्यात त्याला वाघ म्हणणारेच सगळे असतात आणि डबक्याबाहेर कुणी बेडूकही म्हणायला तयार नसतं.
तसा झालाय माझा डबक्याबाहेरचा बेडूक.
असं काही झालं की मला महाभारतामधला "मै समय हुं" वाला हरीश भिमाणीचा आवाज आठवतो. समय हेच सगळ्यावरचं एकमेव सोल्यूशन, परवापेक्षा काल, आणि कालच्यापेक्षा आज खूपच बरा वाटतोय. उद्या कदाचित इथलेही लोकं ह्या बेडकाला शेर शेर म्हणायला लागतील कुणी सांगावं?
- संवादिनी