Thursday, July 17, 2008

गारठलेल्या सकाळी आणि धमाल

सकाळी सहाचा गजर वाजतो. मी तो ऐकते आणि तसाच बंद करून टाकते. शेवटची फिरायला कधी गेले होते ह्याची मनाशी नोंद होते. परवाच गेले होते, मग आज नको, झोपूया, असं म्हणून पांघरूण डोक्यावर घेते. रात्रभर घुरघुरणाऱ्या एसीने रूमचा डीप फ्रीजर करून टाकलेला असतो, पण तरीही मला उठून तो एसी बंद करावासा वाटत नाही. स्नूझ झालेला गजर पुन्हा एकदा वाजतो, सव्वा सहा. काल किती वाजता घरी आले मी? रात्री बारा. मग आज थोडं उशिरा पोचलं तरी चालेल. पुन्हा थंडी, पुन्हा पांघरूण, पुन्हा गजर, पुन्हा स्नूझ आणि पुन्हा थंडी. माझ्या सगळ्या सकाळी सध्या अशा गारठून गेलेल्या आहेत.

डोक्यावरचं काम प्रचंड वाढतंय. दिवस सुरू झाला की कधी मावळतो आणि संध्याकाळी त्याच्या घरी पळालेला सूर्य, विश्रांती घेऊन पुन्हा कधी उगवतो, हेच कळत नाही. सकाळचा ब्रेकफास्ट करायला मिळाला तर ठीक, नाहीतर ऑफिसमध्ये पोचायचं, पहिला चहा होतो न होतो, मेल चेक केले न केले, इतक्यात कुणीतरी येऊन टपकतो.

काल तू असं सोल्युशन दिलं होतंस, तसं प्रोग्रॅम करणं अशक्य आहे. दुसरं डिझाइन दे. अरे, शक्य नव्हतं तर काल का तसं नाही सांगितलं? इतकं डोकं आपटून मी ती स्पेक बनवली ती आता कचऱ्याच्या टोपलीत? हा विचार मनातल्या मनात करून, अगदी हसऱ्या चेहऱ्याने, असं का? बरं. बघूया काय जमतंय असं म्हणून मी त्याला वाटेला लावते.

त्याची पाठ दिसते न दिसते तर दुसरं कुणी येतं. म्हणे मॅडमनी बोलावलाय. मॅडम म्हणजे आमच्या टीमची लीड. अडलंय माझं खेटर? मॅडमला हवं असेल तर येईल झक मारत, असं मनातल्या मनात म्हणते आणि निरोप्याला, आलेच असा उलट निरोप पाठवते. शेवटी झक मारत मीच जाते मॅडमना भेटायला. तिच्या आज्ञेचं पालन मला करायला लागलं ह्याचा आसुरी आनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसतो. तो आनंद, तिला मला पाहून झाला आहे, असं स्वतःला खोटंच समजावत मीही खोटं हसते.

बहुदा मॅडमचं घोडं (की गाढव? ) कुठल्यातरी खड्ड्यात पडून अडकलेलं असतं. मग मॅडम अडकलेलं घोडं खड्ड्याबाहेर काढायच्या कामाला मला जुंपून, अजून एखादा घोडा कसा खड्ड्यात टाकता येईल ह्याचा विचार करायला निघून जातात. आम्ही इमानदारीत एकदा घोड्याची शेपूट पकड तर एकदा लगाम, असं करत यथाशक्ती यथामती त्याला बाहेर काढायचं काम करू लागतो.

ते आवरेपर्यंत जेवणाची वेळ होते. पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. मग दुपारच्या जेवणाचा घाट. जेवणात पनीर नसेल तर ह्या लोकांना अपचन होतं की काय कोण जाणे? प्रत्येक गोष्टीत पनीर. सगळ्यात घाणेरडं मी खाल्लेलं इथलं पनीरचं काँबिनेशन म्हणजे पनीर बैंगन. पण अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने, वदनी कवळ घेता, जी काही चव लागेल ती गोड मानून, समोर असेल ते गिळते आणि अन्नदाता सुखी भव म्हणत पुन्हा घाण्याला जुंपून घेते.

दुपारची मज्जा तर काय वर्णावी? रात्रीची कमी झालेली झोप डोळ्यात उतरायला लागते आणि वाचतेय काय, टंकतेय काय आणि बोलतेय काय? ह्याचा काही ताळमेळच राहत नाही. डुलक्यांचे हल्ले परतवून डोळे उघडे ठेवण्यात यश मिळालं तरी बरं वाटतं. असा सरता न सरणारी दुपारची वेळ जाऊन चहाची वेळ होते आणि मनाला पुन्हा एक उभारी मिळते.

चहा आणि ग्लूकोजची बिस्किटं. अहाहा. वाफाळलेल्या चहाच्या घोटांनी आणि माझ्या लाडक्या ग्लूकोजच्या बिस्किटांनी विस्कटलेल्या दुपारची घडी इस्त्री केल्यासारखी बसते आणि संध्याकाळची चाहूल लागायला लागताच, डोक्यावर साचलेल्या कामाच्या डोंगराची आठवण होऊन मी पुन्हा माझ्या वर्क स्टेशनकडे वळते.

सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या अंगाखांद्यावर खेळलेली मी, ह्या कामाच्या डोंगराला मात्र नाकं मुरडते. पण तरीही कामाला लागते. आज करायचं म्हणून ठरवलेल्या कामाला हात लावायला सकाळपासून वेळच झालेला नसतो. त्यात लीडरबाईंचं घोडं आणि पुन्हा करायची स्पेक ह्याचं टेन्शन डोक्यावर असतंच. केसांचा गुंता सोडवायचं काम, रोजच्या रोज केस आणि हेअरकलर मात्र बदलत जातात. एक गुंता सुटतोय तर दुसरा दत्त म्हणून हजर.

संध्याकाळ होते. लोकं घरी परतायला लागतात. ऑफिस उदासवाणं वाटायला लागतं. बाहेर पडायला लागलेला अंधार, सगळी संध्याकाळ काळ्या रंगात रंगवून काढायला लागतो. आता चहाची सोबतही नसते. ग्लूकोजची बिस्किटं तेवढी माझ्या पर्स मध्ये गुपचूप पडलेली असतात. शेवटी आज सकाळी सुरुवात करायच्या कामाला हात लावायला वेळ मिळतो. डोकं चालेल की नाही ह्याची खात्री नसल्याने मी घुलाम अली कानाला लावते.

दिनभर तो मै दुनियाके धंदोमें खोया रहा,
जब दीवारोसे धूप ढली, तुम याद आये, तुम याद आये.

खुर्चीत मी मागे जराशी रेलते, समोरचा स्क्रीन धूसर होतो. उगाचच आईची आठवण येते. संध्याकाळच्या वेळी, घरी गेल्यावरचा चहा, बाबाच्या गमती जमती, एकेकांना टपल्या मारणं. विन्या असेल तर त्याच्याशी मुद्दाम उकरून काढलेलं भांडण, सगळं सगळं डोळ्यासमोर येत जातं. टीम मेंबर्सच्या गराड्यात एकदम एकटं वाटायला लागतं. पुण्याची आठवणही येतेच, आनंद आठवतो, आनंदी आठवते, कुठे अडकून पडलो असं होतं.

तितक्यात मागून कुणीतरी येऊन खांद्यावर चापटी मारतं. मॅडम सो गयी क्या? हमारी डिजाईन तो आपने बनायीही नही? एक दीर्घ श्वास घेऊन मी पुन्हा कामाला लागते. घुलाम आली आपल्याच तंद्रीत गात असतो, त्याचा आवाज फक्त एक आभास बनून कानात घुमत राहतो.

पुन्हा एकदा जेवणाची वेळ होते. बाहेरून आणलेलं काही बाही आम्ही सगळेच बकाबका खातो. कामाला लागतो, घरी जाण्याआधी मला निदान ते डिझाइन पूर्ण करायचं असतं. मध्यरात्रीपर्यंत ते काम संपतं. ईमेल टाकून मी ऑफिसमधून निघते. बाहेर ड्रायव्हर पेंगत बसलेला असतो. त्याला जागं करून घरच्या रस्त्याला लागते. मोजून तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. मी तशीच माझ्या रूममध्ये जाते, कपडे बदलते आणि बिछान्यावर पडते.

आजचं न झालेलं काम, अजूनही खड्ड्यात अडकून बसलेलं घोडं, ऑफिसमधलं राजकारण, सगळं माझ्या मनात घर करून राहतं. डोळ्यावर झापड तर येत असते, पण झोप काही येत नाही. घुलाम अलीसुद्धा काही करू शकत नाही. मग मी खिडकी उघडते आणि बाहेर बघत बसते. कधीमधी दिसणारा चंद्र हिरव्या पानांवर सांडलेला काय झकास दिसतो. जवळ जवळ रात्रीचा एक वाजत आलेला असतो, तरीही मी फोन घेते आणि बाबाला फोन लावते.

तो झोपला असणार मला माहीत असतं, पण तरीही, तो फोन उचलतो, मी बराच वेळ त्याच्याशी बोलत राहते. आज ऑफिसमध्ये काय काय झालं, ते सगळं सगळं सांगते, तोही बिचारा ऐकून घेतो. मग तो घरी काय काय झालं ते सांगतो. शेवटी तो विचारतो कशी आहेस? मला माहीत असतं त्याला काय उत्तर हवंय. मी सांगते मजेत आहे.

कोणत्याही कठीण क्षणाचीही एक मजा असते. ती मजा अनुभवायला शीक, म्हणजे आपले सगळे दिवस मजेत जातात. कधीतरी, कुठेतरी त्याला मी विचारलेलं असतं, की तुला कधीही कसा आहेस विचारलं की तू मजेत असं कसं सांगतोस? तेव्हा त्याने सांगितलेलं कारण आठवतं.

मी फोन ठेवते, पण सगळा शीण कुठच्या कुठे पळालेला असतो. पुन्हा बिछान्यावर पडते. स्वतःलाच विचारते. हाऊ वॉज युअर डे? आतून उत्तर येतं "धमाल". त्या विचारातच कधी झोप लागते समजतंच नाही.

आणि पुन्हा एक गारठलेली सकाळ उजाडते.


- संवादिनी

Thursday, July 10, 2008

पडदे, पुस्तकं आणि चुकलेला अंदाज

दिल्लीत मनाजोगतं फिरणं ह्या विकेंडला झालं. आमच्या बॉसने कंपल्सरी शनिवारी ऑफिसला न जाण्याचा हुकूम दिला. भाग्य लागतं की नाही असा बॉस मिळायला? म्हणाला तुम्ही करताय ते खूप आहे. पण चांगलं काम करायला, मनही फ्रेश हवं. जर तुम्ही कंटाळून गेला असाल तर दहा मिनिटांचं काम करायला तासभर लावाल. आम्हाला काय? पडत्या फळाची आज्ञा.

खूप शॉपिंग केलं, खूप खाल्लं आणि खूप भटकलो. चांदनी चौक, लाजपतराय मार्केट धुंडाळून काढलं. खूप खरेदी केली. माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. बाबासाठी एक खास झब्बा घेतला. त्याला ग्लॉसी काही आवडत नाही. मग खादीचाच पण जरा उच्चीचा वाटावा असा झब्बा. मुंबईला खादी ग्रामोद्योगमध्ये वगैरे मिळतात तसे. स्वस्त मिळाला असं वाटलं. अर्थात, हे मी आईला सांगितलं की ती म्हणणारच की जास्त दिले म्हणून. मला ना कधी कधी तिच्याबरोबर शॉपिंगला जायची लाज वाटते. दुकानदार पाचशे म्हणाला की ही शंभर पासून सुरू करते. पण खरं सांगायचं तर तिला ती नॅक आहे. मला पाचशेचे तीनशे करतानापण धाकधूक वाटते.

तर बाबासाठी झब्बा, विन्यासाठी त्याने खास पत्ता दिलेल्या दुकानातून आणि मुंबईहून फोन करून ऑर्डर करून घेतलेली इंग्लिश विलो बॅट, आईसाठी साडी आणि उरलेली सगळी खरेदी माझ्यासाठी. उन्हाळ्याचा मुहूर्त साधून बरेच स्वेटर्स घेतले. स्वस्तात मिळाले. चुडीदार, कुर्तीज मस्त मिळाल्या. मी काही स्वस्तातलं आणलं की बाबा म्हणतो की आधी कापड धू आणि मग तुला झालंच तर चांगलं मिळालंय म्हण.

दिल्ली हाटला तर मी अक्षरशः वेडावून गेले. रंगाची तर नुसती उधळण. राजस्थानी रंग, गुजराती रंग, काश्मिरी रंग, मराठी रंग. सगळं थोडं महाग वाटलं, पण अशा सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळणं कठीण आहे, आणि बघून शेवटी घ्याव्याश्या वाटतातच. त्यामुळे बऱ्याचशा नको असलेल्या आणि काही हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या. त्यातले राजस्थानी पडदे तर खासंच आहेत. ते लावायला खिडक्याच नाहीयेत अजून, पण तरीही घेतले. गिरगावात तर काही लावता येणार नाहीत. पुढे झालंच स्वतःचं घर तर वापरता येतील. नाहीतर कुणाला गिफ्ट म्हणून देता येतील.

तिथले फूड स्टॉल्स तर भन्नाट आहेत. म्हणजे चव ठीक ठाक. पण व्हरायटी काय आहे? मी चक्क बिहारी कचोऱ्या वगैरे खाल्ल्या. बाकी चरणं सुरूच होतं. चाट, गोल गप्पे, समोसे. सगळं झकास.

एका मस्त वेगळ्या ठिकाणी पण गेले. आमच्या टीम मधल्या क्लायंट साइडच्या एकाच्या वडिलांचं जुन्या अँटिक पुस्तकांचं दुकान आहे. बाकी कुणाला पुस्तकांत वगैरे रस नव्हता. मग मीच त्याला म्हटलं की मला घेऊन चल. साहेबांची फटफटी आहे. मग हेल्मेट घालून मी त्याच्या मागे (केस\चेहरा जाम खराब होतात हेल्मेट घातलं नाही तर. घातलं तर घामाने होतात, पण चालतं). कसलं दुकान होतं ते. कसले जुने जुने ग्रंथ. सगळ्या भाषांतले. मराठीही होते. काही जुनी हस्तलिखितं होती. प्रिंटींग होत नसे तेव्हाची. मोडी भाषेतली होती. काहीही कळलं नाही.

पण चटकन मनात आलं, कुणी कोणे एके काळी लिहिलेली ती पत्र, त्यानंतरची कित्येक वर्ष, निसर्गाला तोंड देत टिकून राहतात काय आणि आजच्या जेट युगातली मी, ती बघते काय? ह्यालाच विधीलिखित म्हणत असावेत. किती पावसाळे पाहिले असतील त्या पत्रांनी? माझ्या आजोबांचे आजोबासुद्धा जन्माला आले नसतील तेव्हा.

इतरही अनेक पुस्तकं होती तिथे. वेगळंच विश्व वाटलं ते. वर्तमानातून एकदम भूतकाळात जाऊन येता येईल असं टाइम मशीन. मग तो कलीग त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचं बनिया कुटुंब. वडिलांची जरब, भिजल्या मांजरासारखी दिसणारी आई, त्याची लग्नाच्या पहिल्या काही महिन्यातंच प्रेग्नंट झालेली बायको. डोक्यावर पदर. माझ्यापेक्षा लहान असेल ही, पण तिचं विश्व किती वेगळं? पोटातलं मूल, मुलाचा बाप, ह्यांच्या पलीकडे ती विचार करत असेल का? असेलही करत तरी ते व्यक्त करायची तिला परवानगी असेल का? ऑफिसमध्ये एकदम नॉर्मल वाटणारा तो कलीग, घरात एकदम वेगळाच वाटला. कसलातरी मुखवटा घातलेला किंवा काढलेला. नक्की कळलं नाही.

ह्यालाच लग्न म्हणायचं का? सहजीवन म्हणायचं का? कुणाच्यातरी दावणीला स्वतःला बांधून घ्यायचं का? एक ना अनेक, कित्येक प्रश्न मनात येत गेले. त्याच्याकडून बाहेर पडले, त्याने पुन्हा आमच्या अपार्टमेंट पर्यंत सोडलं. त्याला मी विचारलं बायको काय करते? तर म्हणाला अजून शिकतेय. म्हटलं काय? तर म्हणाला यूपीएससी देतेय ती.

घरात पदर डोक्यावर घेऊन राहत असली तरी तिचं विश्व त्या पदराएवढं मर्यादित नाही. मलाच माझं हसू आलं, आपण किती पटकन मतं बनवतो, काही माहिती नसतानाही. पण बरं वाटलं. दिल्ली हाटातल्या राजस्थानी पडद्यांवरचे रंग एकदम उजळून निघाले असं वाटलं. कधी कधी आपले अंदाज चुकतात. पण अंदाज चुकल्याचा खूप आनंद झाला.

- संवादिनी

Thursday, July 3, 2008

स्वातंत्र्य आणि एक कन्फेशन

जेव्हा मी खूप लहान होते तेव्हाची गोष्ट. पहिली दुसरीत असेन तेव्हा. बोलण्यामध्ये एकदम पुढे होते तेव्हा मी. साहजिकच, गाणी म्हणणं, भाषणं करणं, ह्यासाठी नेहमी निवड व्हायची. असाच एकदा गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यासाठी प्रत्येकाने घरून तयारी करून या असं शाळेत सांगितलं. आपल्या मुलीने अशा कार्यक्रमात चमकावं ही आईची जबरदस्त इच्छा. झालं, ती एक छान गोष्टीचं पुस्तक घेऊन आली. लहानपणी मला हातात पुस्तक मिळालं की ते क्रेयॉन्सने रंगवून काढायचं हा माझा छंद होता. त्यामुळे हे पुस्तक मला मिळालं असतं, तर त्याचा कधीच मी रंग दे बसंती करून टाकला असता. म्हणून आईने ते माझ्यापासून लपवून ठेवलं.

मीही हुशार मला ते कुठे ठेवलंय ते दिसलं. स्टूलवर उभं राहून कपाटाला चावी लावून वगैरे ते मी मिळवलं. घरी आजी होती फक्त. तिला बिचारीला काय कल्पना मी काय करतेय ह्याची? ते पुस्तक मी रंगवलं मात्र नाही. नुसतंच पाहिलं. मिळत नव्हतं तोपर्यंत हवंहवंसं वाटणारं पुस्तक, एकदा पहिल्यावर तितकंसं आकर्षक राहिलं नाही. मी ते तसंच कुठेतरी टाकून दिलं आणि खेळायला गेले.

संध्याकाळी भाषणाची तयारी करून घेण्यासाठी आईने कपाट उघडलं तर पुस्तक नाही. माझ्या ते लक्षात आलं, पण मी पुस्तक कुठे टाकलंय हे मलाही आठवेना. आईला नक्कीच कळलं की पुस्तक मी घेतलंय, पण आता ते हरवलं हे जर तिला कळलं तर मात्र माझी धडगत नव्हती. तिने मला विचारलं की तू पुस्तक घेतलंस का? मी हो म्हटलं. तिने का घेतलंस विचारलं, आता काय सांगा? मी ठोकलं, बाईंनी बघायला मागितलं शाळेत म्हणून नेलं. मग ती म्हणाली कुठंय ते? पुन्हा नवी थाप. म्हटलं शाळेत ते फाटलं. मग फाटलं तर फाटकं पुस्तक कुठाय? अजून एक थाप, मी तिथेच टाकून दिलं. हे सगळं आईचा ओरडा वाचवण्यासाठी.

ते पुस्तक मीही विसरले आणि आईही. भाषण चांगलं झालं, बक्षीस मिळालं आणि अचानक एके दिवशी साफ सफाई करताना बाबाला ते पुस्तक सापडलं. अजून देवापुढे उभी राहून रडत रडत पुन्हा मी कधी कधी खोटं बोलणार नाही, असं म्हणणारी मी मला आठवतेय. ही आठवण कायमची कोरली गेली मनावर आईचा मार, मग हे कन्फेशन.

आई भयंकर चिडली होती. बाबा मला नंतर म्हणाला होता. काळजी करू नको, मीपण खोटं बोलल्याबद्दल आजोबांचा मार खाल्लाय. सगळेच चुकतात कधी ना कधी. पण सगळेच चूक मान्य करीत नाहीत. जे करतात, ते पुढे जातात, जे नाही करत, ते चुकाच करत राहतात. तेव्हापासून कन्फेशन ही माझी गरज झालेय.

हे सगळं लिहायचं कारण म्हणजे असंच एक कन्फेशन. शनिवारी रात्री क्लाएंटने पबमध्ये पार्टी ऍरेंज केली होती. मी फक्त वाइन पिते. तेसुद्धा घरच्यांच्या सोबत. एकटी, मित्र-मैत्रिणींसोबत, ऑफिसमध्ये कधीच मी प्यायले नव्हते. पण त्या दिवशी काय वाटलं कोण जाणे? घरी जायचं नव्हतं, आईचा धाक नव्हता, बाबाची नजर नव्हती. म्हटलं आपण घरी एखादा ग्लास आईबाबांबरोबर घेतो, इथेही एखादा घ्यायला काय हरकत आहे. गप्पा गप्पांमध्ये आग्रह झाला, दुसरा ग्लास झाला.

त्यानंतर सगळे डान्स करायला लागले, मीही गेले. पण डान्स केल्यावर काय झालं मला कळलंच नाही. माझा पूर्ण कंट्रोलच गेला. म्हणजे अक्षरशः झेलपाटायला लागले मी. नाटकाचे डायलॉग्ज काय म्हटले, पूर्णपणे गॉन केस. अनुनी घरी आणलं सांभाळून. दुसऱ्या दिवशी सगळे जणं चेष्टा करीत होते माझी. तशी म्हटलं तर गंमत होती, पण आतून मी पूर्ण हादरून गेले होते.

आपण कोण आहोत? आपण काय करायला इथे आलो आहोत? आणि आपण काय करतो आहोत? ह्या प्रश्नांनी दिवसभर माझा पिच्छा पुरवला. घरी फोन केला तेव्हा बाबाने विचारलं पार्टी कशी झाली. मी सांगितलं चांगली झाली, बाकी काही बोलले नाही. आईनेही विचारलं तिलाही काही सांगितलं नाही. इकडचं, तिकडचं बोलत राहिले. फोन ठेवला आणि मला एकदम रडायलाच आलं. मी तसं करायला नको होतं. मला स्वातंत्र्य हवं होतं, ते मला मिळालं, पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग मी केला. खूप वाईट वाटलं, एकटीच कुढत बसले होते बराच वेळ.

शेवटी हिय्या करून घरी फोन केला. आईने उचलला. ती काही बोलायच्या आतच मी जे घडलं ते तसंच्या तसं तिला सांगितलं. ती एक शब्द बोलली नाही आणि बाबाला फोन दिला. बाबाने शांतपणे ऐकून घेतलं, मग असं करू नको तसं करू नको, असं काहीबाही सांगत राहिला. अगदी आईसारखं. त्याला खूप काळजी वाटली असणार. आणि ते इतके दूर काही भलतं सलतं झालं तर. एकदम हळवा झाला असणार तो. शेवटी आईने फोन घेतला. म्हणाली झालं ते झालं. चूक झालं की योग्य झालं ते तुला कळलेलंच आहे. तेवढं लक्षात ठेवून राहा. तुला आता अमुक करू नको तमुक करू नको हे सांगायचं तुझं आणि आमचं दोघांचंही वय नाहीये, त्यामुळे बहकून जाऊ नको. मोकळ्या हवेतही माणसं गुदमरून गेल्याची अनेक उदाहरणं आहेत.

एवढंच बोलली आणि फोन ठेवला. मला खूप वाईट वाटलं, पण एकीकडे बरंही वाटलं. मला नेहमी स्पून फीडिंग करणारी माझी आई मला म्हणाली, की मी माझे निर्णय घ्यायला सक्षम आहे. नेहमी बाबा जसा बोलतो तशी आज आई बोलली. एकदम मला पटेल असं. चूक न दाखवता चूक दाखवणारं आणि मला मोकळीक आणि जबाबदारी दोन्ही देणारं. खूप काही बोलावंसं वाटत होतं. पण कुणाशी? माझ्या टीम मेंबरना मी केलं त्यात काही वावगं वाटलंच नाही. मग एकटीच रडत बसले.

रडत रडतंच माझ्या जवळच्या गणपती बाप्पाला सांगितलं, मी पुन्हा कधी, आईला त्रास होईल, बाबाला त्रास होईल, विन्याला मान खाली घालावी लागेल, असं बेजबाबदार वागणार नाही, म्हणून. अगदी थेट लहान असतानासारखं.

स्वातंत्र्य हे दुधारी तलवारीसारखं असतं हेच खरं.

- संवादिनी

Thursday, June 26, 2008

मिशन इंपॉसिबल आणि हम पांच

दिल्लीला येऊन एक आठवडा होऊन गेला. एका आठवड्याने परत जायला मिळेल असं येताना वाटलं होतं तो फुगा फुटला. प्रोजेक्ट आताच सुरू झालाय आणि अजून किमान एक महिना माझं काम असेल. कदाचित त्याहून अधिक. आनंदाची गोष्ट हीच की क्लायंट चांगला आहे. त्यांनी चक्क दोन छानसे तीन बेडरूमचे फ्लॅट आमच्यासाठी भाड्याने घेतलेत.

आम्ही पाच जणं आहोत आणि मोठा साहेब सहावा. मोठा म्हणजे खूपच मोठा साहेब आहे तो. पण चांगला आहे. टकलू आहे पण तरीही हँडसम. बरीच वर्ष अमेरिकेला राहून परतलाय म्हणून इंग्रजी जरा इस्टाइलमध्ये बोलतो इतकंच. आमच्या कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावर आहे. ह्या हिमालयासमोर आम्ही सगळे अगदी मलबार हिलच्या टेकडीसारखे आहोत.

पण आमच्या सगळ्यात त्यातल्या त्यात उंच टेकडी म्हणजे अनु. तिचं पूर्ण नाव अनुसया का काहीतरी आहे. त्यापुढे अनु बरं वाटतं. तिला ह्या कंपनीत तीन वर्ष काढून झालीत. ती आणि मी दोघीही फंक्शनल. फंक्शनल कंसल्टंट चा शिकलेला नवा शॉर्ट फॉर्म फंकी. तर आम्ही दोघी फंकी. अजून नीटसा अंदाज आलेला नाही नक्की कशी आहे त्याचा. पण बोलायला, वागायला बरी वाटते. ती आमच्या टीमची पुढारी. लीडर. आता पुढारी आले म्हणजे राजकारण येणार की काय? कल्पना नाही. सो फार सो गुड.

आम्ही दोघी फंकी आणि अजून तिघं टेकी. तिघेही मुलं. दुःखाने विशद करायची गोष्ट अशी की एकही इंटरेस्टिंग नाही. एक मल्याळी ख्रिश्चन. त्याचं लग्न नुकतंच झालंय. बायको केरळात आहे. नेहमी तिचीच स्वप्न बघत असतो. तिच्याबद्दलच बोलत असतो. चांगला वाटतो पण खूप डिप्लोमॅटिक आहे. ओठावर एक आणि मनात एक असा वाटतो. अजून तरी माझा अंदाज बरोबर आहे असं मला काहीही आढळलेलं नाही. म्हणून सध्या मी त्याला संशयाचा फायदा देणार आहे. ह्याचं नाव टॉम.

दुसरा मराठी आहे. नागपुरकडचा असावा. पण मराठी आहे, म्हणून जवळचा वाटतो. त्याच्याशी चांगली मैत्री झालेय. नाव नीतिन. लग्न झालंय. बायको पुण्याला. एक लहान मुलगापण आहे त्याला. हा त्यातल्या त्यात अनुभवी टेकी. म्हणून तो टेकींचा पुढारी.

शेवटचा उडीया आहे. कृष्णा उर्फ क्रिश. भुवनेश्वरचा. सिंगल अँड लुकिंग. ह्याच्यापासून सावधान! असं मला माझ्या मनाने पहिल्या दिवशीच सांगितलंय, म्हणून मी जरा लांब लांबच आहे त्याच्यापासून. पण पुन्हा आतापर्यंत तरी त्याने माझ्या संशयाला पुष्टी देण्यासारखं काहीही केलेलं नाही. म्हणून मीही त्याला संशयाचा फायदा देत आहे. मला नाही म्हणा उगाचच नको ते वाटून घेण्याची जुनी खोड आहेच.

आणि आमच्या घराच्या काळजीवहनासाठी आहे दुबे. त्याचं नाव दुबे नाहीच आहे. पण त्याला पाहिल्यावर मॉन्सून वेंडिंगमधला दुबे आठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून त्याचा दुसरा नामकरण सोहोळा केलाय, तो हा दुबे. पोरगेलसाच आहे. पण मनापासून कामं करतो. हा भेटल्यावर भय्या लोकांबद्दलची माझ्या मनातली आढी थोडी कमी झालेय.

तर अशी ही आमची टीम. नवा डाव सुरू. नवा राजा, नव्हे राणी. आणि नव्या राणीची मी जुनीच सबऑर्डिनेट.

क्लायंटचेही काही लोकं आहेत. काही चांगले काही वाईट. पण त्यातली एक बंगाली मुलगी मला खूप आवडलेय. तिचं नाव कला. म्हणजे तिला म्हणतात कला. काय मस्त नाव आहे नं? कला. आर्ट. आणि नावाप्रमाणेच कलाकार मुलगी आहे. रविंद्रसंगीत म्हणून दाखवणार आहे ती मला. टिपीकल बंगाली मुलींसारखी नाजूक आणि दिसायला खूप सुंदर. धारदार बुद्धी आणि जीव ओवाळून टाकावा असे डोळे. अगदी थेट कोकणा सेनसारखे. तशी ज्युनिअर आहे पण हुशार आहे.

काम तर जोरात सुरू झालेलंच आहे. मला पहिल्यांदा कसं वाटलं माहितेय? कुणी तुम्हाला अंधाऱ्या खोलीत सोडलं आणि सांगितलं, की ह्या खोलीत कुठच्या एका कोपऱ्यात एक दरवाजा आहे आणि तो उघडणारा रिमोट खोलीत कुठेही असू शकेल. कुणालाच माहीत नाही. दोन महिन्यात दरवाजा उघडून दाखवा. तसंच वाटलं. दरवाजा उघडायचा हे माहीत आहे, दोन महिने आहेत हेही माहीत आहे. पण कसा? ते स्वतः शोधून काढायचं. कठीण आहे पण तितकंच चॅलेंजिंग.

सुरवातीला कठीण गेलं पण आता त्या खोलीच्या लांबीरुंदीचा अंदाज यायला लागलाय. आणि तिथे आपण एकटेच नाही अजून दहा बारा जणं आहेत हा दिलासापण मिळतोय. सकाळी उठणे, दुबेने दिलेला नाश्ता करणे, ऑफिसात जाणे, काम काम काम, मग कुठूनतरी मागवलेलं जेवणे, पुन्हा काम काम काम, संध्याकाळी घरी एखादा फोन वगैरे कामाच्या मधे, मग रात्रीचं जेवण मागवणे ऑफिसातच, आणि बाराच्या सुमाराला घरी जाऊन बिछान्यावर टेकणे.

हेक्टिक आहे, टायरिंग आहे, पण सॅटिस्फायिंग आहे. सगळेच आम्ही नवे आहोत. जोश आहे. स्वतःला सिद्ध करायची जिद्द आहे. अर्थात नुसती जिद्द असून काम भागत नाही. जिद्दीला क्षमतेची जोड असणंही आवश्यक आहे. आम्हाला कळतंय की काही बाबतीत आमच्या क्षमता कमी आहेत. काही बाबतीत आमचं संख्याबळ कमी आहे. पण त्याही स्थितीत पुढं जाण्याचे प्रयत्न चालले आहेत.

आमच्या बॉसचं तर पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आहे. त्याला पाहिल्यावरच जाणवलं, खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर आमच्या कंपनीसाठी एक नवी इंडस्ट्री मार्केट म्हणून उघडू शकेल. त्यामुळे स्टेक्स आर हाय. असं बॉस नेहेमी म्हणत असतो. आम्ही मात्र त्याच्या नकळत ह्या प्रोजेक्टला "मिशन इंपॉसिबल" असं नाव दिलेलं आहे.

उद्या थोडा श्रमपरिहार म्हणून क्लायंटतर्फे पबमध्ये पार्टी आहे. त्याचीच वाट बघतेय मी आतुरतेने.

कधी कधी ना मला एकदम गंमत वाटते ह्या सगळ्या प्रकाराची. प्रोजेक्ट चॅलेंजिंग आहे, सॅटिस्फायिंग आहे हे कबूल. पण कशासाठी? आम्ही एवढं पोटतिडकीने काम करतो? आम्हाला जास्त पैसे मिळतात का ते करण्याचे? नाही? मग कशासाठी हा जिवाचा आटापिटा. ना आम्ही कंपनीचे मालक, ना आमचा बॉस. फायदा मालकांचा होणार, मग आम्ही आमच्या घरचंच कार्य असल्यासारखं का खपतोय?

- संवादिनी

Thursday, June 19, 2008

दिल्ली आणि नेलपॉलिश

विमानतळावर उतरले आणि माझ्यावर अचानक बरीच लोकं चाल करून आली आणि आपण मुंबईत नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं. सगळे दिल्ली चे ठग मला (आणि इतरांनादेखील) ठगवण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले. अर्थात मीपण मुंबईत तयार झालेली असल्याने त्यांना भीक न घालता प्रीपेड टॅक्सीच केली.

गेला आठवडाभर दिल्ली अभी दूर नही चाललेलं. एकदाची येऊन पोचलेच. अर्थात दिल्ली काही मला नवी नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी मी दिल्लीला आलेली आहे. कधी आईबरोबर, तिच्या कामासाठी. बाबा खास सव्हीस जानेवारीची परेड पाहायला घेऊन आला होता तेव्हाची. इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या ऑडिटोरिअमध्ये कडकडून टाळ्या वाजवणारी.

पण आजची दिल्ली खूप वेगळीच वाटली. एकटी अशी मी दिल्लीला कधी आलेच नाहीये म्हणून असेल. पोचले दिल्लीत पण मनातून मुंबई जाईना. मुंबई तर मुंबई, अगदी पुणंपण आठवत राहिलं. पुण्याला येऊन फार दिवस नाही झालेत पण आता परत जायला मिळेलच असं नाही. इथे आठवड्यासाठी म्हणून पाठवलंय. पण जातानाच सायबाने सांगितलंय की कदाचित महिनाही लागू शकेल. वर अजून काही प्रोजेक्टसंबंधी बोलणी चालू आहेतच. दरम्यानच्या काळात तिथे नंबर लागला तर थेट तिथेच जावं लागेल.

बरं पुण्याला सगळी गंमत जंमत होती. इथे तसं काही नाहीये. भरपूर काम माझी वाट पाहतंय. दर आठवड्याला घरी जाता येणार नाही. आनंदी नाही आणि आनंदही. उगाचच हाताकडे बघत राहिले. नवं नेलपॉलिश लावायचं राहूनंच गेलं.

बराच वेळ विचार करत होते की ही गोष्ट लिहावी का? पण शेवटी हिय्या करून लिहितेय. मला बॉसने सांगितलं की सोमवारी पोचायचं दिल्लीला. आनंद झाला तसं वाईटही वाटलं. शुक्रवारी परत घरी जायचं होतं, म्हणून गुरुवारी सेलेब्रेशन करायचं ठरलं. आनंदकडे. आनंदी होती. ऑफिसातली अजून दोघं तिघं होती. आनंदीचा भाऊही होता. मजा आली. माझ्या जाण्याच्या नावाखाली धांगडधिंगा, बाकी काही नाही. खूप उशीरापर्यंत बसले होते सगळे. घरी जायला निघालो. आनंद म्हणाला मी सोडतो तुला, एकटी जाऊ नको म्हणून. पण माझं घर एक एकदम जवळ आहे तिथून. म्हटलं मी एकटीच जाते. सगळे खाली पोचलो. आनंदीला अच्छा करून मी कायनेटिक सुरू करायला गेले तर ती हटून बसली. कशीबशी मेन स्टँडला लावून किक मारायला सुरवात केली आणि लक्षात आलं की टायर पंक्चर आहे. झालं. आता काय करणे?साहेबांना फोन केला. साहेब उचलेनात. म्हणून पुन्हा वर गेले.

आनंदने दरवाजा उघडला. नेहमीसारखी माझी व्यवस्थित खेचून झाल्यावर साहेब तयार होऊन निघाले माझ्यासोबत. मला म्हणाला गाडी इथेच ठेव. मी पंक्चर काढून तुझ्या बिल्डिंगच्या खाली लावून ठेवीन, तू यायच्या आधी. म्हटलं ठीक. घरी पोचल्यावर म्हटलं ठीके आता भेटू उद्या. तर म्हणाला चल एक कॉफी मारू. वर आलो कॉफी केली. तो उगाचच काहीतरी बोलत राहिला. मला झोप येत होती पण त्याचं मन मोडवत नव्हतं म्हणून बसलेले. शेवटी एकदाचा तो निघाला. दरवाज्याशी पोचल्यावर म्हणाला विसरणार नाहीस ना मला? म्हटलं काय रे जास्त झालेय का तुला? तुला कशी विसरेन. काहीच बोलला नाही. मी वाट पाहत राहिले तो कधी निघतो त्याची.

मला काही कळायच्या आत एकदम गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेतला. मला जे नको होतं तेच घडणार होतं. आता हा मला प्रपोज करणार. मग मी ह्याला नाही म्हणणार, मग ते नेहमीचं रडगाणं. मग समजावणं. न दुखावता दुखावणं. हे सगळं लख्ख दिसायला लागलं. माझी नाराजीही चेहऱ्यावर स्पष्ट दिसली असेल कोण जाणे. दिल्लीचं डिक्लेअर झाल्यापासून मला असं होईल असं वाटत होतं. आणि शेवटी ते घडलंच.

दोन क्षण त्याने कसलातरी विचार केला. मग हाताकडे बघत म्हणाला कसलं फडतूस नेलपॉलिश लावलंय. दिल्लीला जाताना तरी चेंज कर.

हसावं की रडावं? माझ्या मनातलं कसं बरोबर ओळखलं त्याने. काही लोकं इतकी निरागस असतात ना, की त्यांचा चेहराच आपल्याला सगळी गोष्ट सांगतो. त्याचा चेहराही सगळी गोष्ट सांगत होता. मी न बोलता त्याला घरात घेतलं. त्याने न विचारताच ह्या घडीला प्रेम, लग्न वगैरे मला करायचं नाही. तू चांगला मुलगा आहेस, आपण मित्र आहोत पण धिस इज समथिंग डिफरंट, असे घिसे पिटे डायलॉग्स बोलत गेले. तो ऐकत गेला. शेवटी मी थांबले. माझं बोलायचं तेवढं बोलून झालं. तो उठला. दारापर्यंत गेला. जाताना वळला मात्र. म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदल मात्र. जड पावलाने त्याला पायऱ्या उतरताना बघून मलाच रडायला आलं.

दुसऱ्या दिवशी दबकत दबकतंच त्याच्यासमोर गेले, तर तो पूर्वीसारखाच अगदी काही झालं नाही असा माझ्याशी बोलला. दिवसभर मला खूप वाईट वाटलं. तो माझ्याशी बोलला नसता. चिडला असता, ओरडला असता तरी जितकं वाईट वाटलं नसतं, तितकं त्याच्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मला वाटलं. मुंबईला एकत्रच आलो. सगळा प्रवास मी गप्प आणि तो नेहमीप्रमाणे. शेवटी निरोप घेताना मीच त्याला सॉरी म्हटलं. नेहमीचं त्याचं खळखळून हसला. म्हणाला तू कशाला सॉरी. मीच सॉरी. तुझ्यासाठी. चांगला चान्स हातचा घालवला राव तुम्ही. असं म्हणून पुन्हा जोरात हसला आणि जायला निघालासुद्धा. मी तशीच बघत राहिले त्याच्याकडे. दोन पावलं चालून परत आला.

म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदलून जा. उगाच आठवण येईल माझी. निघून गेला.

खडूने गिरगिटलेली पाटी हाताने कितीही पुसली तरी स्वच्छ होत नाही ना तसं झालं माझं पहिले दोन दिवस. हळूहळू मन रुळावर आलं. आता नेलपॉलिशही बदलायला हवं!

- संवादिनी

Thursday, June 12, 2008

.

गेल्या शुक्रवारी सकाळी उत्साहाने ब्लॉग उघडला. मला एक निकटचा वाटलेला अनुभव ब्लॉगवर टाकलेला. वाटलं वाचणाऱ्यांना तो आवडेल. ब्लॉग आवडला अशा काही कमेंट्स येतील. हावरटपणे सकाळी ब्लॉग उघडून पाहिला. कमेंट्स वाचल्या. आणि खूप वाईट वाटलं. अगदी मनापासून.

आपण सगळेच का लिहितो? का वाचतो? आपल्याला आपल्या लिहिण्यातून आणि वाचनातून काही आनंद मिळतो म्हणून. माझ्या ब्लॉगवर मला वाटेल तसं, मला सुचेल तसं लिहिता यावं, माझ्या कुवतीप्रमाणे म्हणून हा ब्लॉग सुरू केला. माझ्या लिखाणाची उडी सरड्याप्रमाणे कुंपणापर्यंतच आहे हेही माहीत होतं. मग तरीही का लिहायला सुरवात केली? कारण आपली जी गोष्ट आहे ती कोणत्याही आडपडद्याशिवाय सांगावी. कठीण वाटलं हे करणं, म्हणून स्वतः पडद्याआड राहायचं ठरवलं.

सुरवातीला प्रतिसाद चांगला मिळाला. माझा हुरूपही वाढला. दर आठवड्याला लिहीत गेले. सुरवातीला दर आठवड्याला दाद देणारी मंडळी हळूहळू बाजूला झाली आणि ते अपेक्षितही होतं. कारण आहे काय हो माझ्या ब्लॉगमध्ये मी सोडून? ना कलात्मक भाषा, ना सृजनशील विषय. बऱ्याच वेळा मी लिहिलेलं मला स्वतःलाही आवडलं नाही, तर इतरांनी त्याला दाद द्यावी ही अपेक्षाच चूक आहे. त्यामुळे कुण्या एका मुलीने केलेली स्वयंकेंद्रित बडबड कितीशी आकर्षक असणार? आणि कोण ती वाचणार? ज्यांना ती आवडली नाही त्यांनी अगदी आवडली नाही असं जरी लिहिलं असतं ना, तरीसुद्धा वाईट वाटलं नसतं. कारण तसा हट्ट कधीच नव्हता.

पण गेले काही आठवडे जे चाललंय ते मला स्वतःला फार अस्वस्थ करणारं आहे. केवळ मी पडद्याआड राहणं पसंत करते, म्हणून मी कुणीतरी खोटारडी आहे, लोकांना फसवायला मी इथे असं करते, अशा प्रकारच्या काही तिरक्या कमेंट्स आणि इ-मेल्स मला यायला लागले. पहिल्यांदी मी हे हसण्यावारी नेलं. पण प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतंच चाललंय आणि ह्या कालच्या कमेंट्स म्हणजे त्यावरचा कळस झाला.

तुम्हाला वाटत असेल ना, मी हे जे लिहितेय ते खरं घडलेलंच नाहीये, सगळं काल्पनिक आहे. तर तसं समजा. लिहिलेलं वाचून पाच मिनिटं करमणूक तरी होते ना, तेवढी करून घ्या आणि सोडून द्या. मी कोण? मला पडद्याआड राहायला का आवडतं? आणि तसं मला आवडतं म्हणजे मी खोटारडी, असे विचार आणि आरोप कृपया करू नका. ह्याचा खूप त्रास होतो. मनापासून सांगतेय. तुम्हाला अतिशय क्षुल्लक वाटूही शकेल पण मला होतो.

जसं कुणी म्हणालं की एखादा सीए निकम्मा असेल तरच त्याची अवस्था माझ्यासारखी किंवा ह्या ब्लॉगमधल्या हिरॉइनसारखी होईल. म्हणजे मी माझ्या मनातली काही सल सांगितली, त्याची किंमत शून्य? वर मीच खोटारडी. मी सीए नाहीच आणि मला सीए लोकांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल काहीच माहीत नसल्याने मी मारलेली थाप पचली नाही अशा आशयाची कमेंट माझ्याच ब्लॉगवर?

बरं कमेंट्स मॉडरेशन वर ठेवणं माझ्या स्वतःच्या तत्त्वात बसत नाही. मला आवडेल ते पब्लिश करायचं आणि मला न आवडेल ते दाबून टाकायचं ही ठोकशाही झाली. आणि आपण सर्वच जबाबदार व्यक्ती आहोत. लोकं जबाबदारीनं नोंदी करतील अशी अपेक्षा ठेवणं काही चूक नाही. काही लोकांनी सुचवलं की कमेंट्स मॉडरेशनवर टाकाव्यात. पण त्रास कमेंट लोकांना दिसल्यावर नाही होत. त्रास ती कमेंट मी जेव्हा पहिल्यांदा वाचते तेव्हा होतो. ती इतर वाचतात की नाही हा मुद्दाच गौण आहे.

ज्यांना संवादिनी पटली त्यांचे आभार, ज्यांना ती नाही पटली त्यांचेही आभार. वाचणाऱ्यांचे आभार, न वाचणाऱ्यांचेही आभार. न चुकता कमेंट्स टाकणाऱ्यांचे आभार, तुम्हा सगळ्या ब्लॉगर्सचे आभार, कारण खूप चांगलं चांगलं वाचायला मिळालं. अगदी रोजच्या आयुष्यातले व्हावेत असे तुम्ही सगळे जण झालात. माझ्यासाठी भांडलातसुद्धा. भरून पावले. असाच लोभ इतरांवर ठेवा. फक्त उद्या कुणी माझ्यासारखं पडद्यामागे राहून लिहायचं ठरवलं तर त्यांना खोटारडे ठरवून, त्यांच्यावर संशय घेऊन, तुमच्यापासून दूर ठेवू नका, तोडू नका. एवढीच विनंती.


धन्यवाद!

- संवादिनी

Thursday, June 5, 2008

ते तिघं आणि आम्ही तिघं

मिळतं ते नको असणं आणि नसलेलं हवं असणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. मीही अमानूष कॅटेगरीतली नसल्याने, माझाही अनुभव काहीसा असाच आहे. काल नाकापर्यंत कामात बुडालेली असल्याने, एखादा दिवस बिनकामाचा आला तर किती मजा होईल असा वाटायचं, इथे आल्यापासून काही फुटकळ कामं सोडली तर तसं काहीही काम केलेलंच नाही. पहिल्यांदा मजा आली. आता त्याचाही कंटाळा यायला लागलाय. केवळ पगार मिळतो म्हणून त्या जागेत जायचं. जमेल तसा वेळ काढायचा.

सतत अनिश्चिततेची टांगती तलवार डोक्यावर. कुठे पाठवतील याची. पुणं म्हणजे, मी पुण्यातच राहीन हा जो माझा गैरसमज होता तो पूर्णपणे मावळलाय. म्हणे पुण्यात काही प्रोजेक्टस नाहीत. जास्तीत जास्त काम बेंगलोर, हैद्राबाद आणि चेन्नईला आहे. तिथेच बहुतेक जावं लागेल. रोज एक नवी बातमी. एकदा साहेब म्हणाले, अमेरिकेला जाशील का सहा महिने? पण आल्यावर सहा महिने चेन्नईला राहावं लागेल? ठीक म्हटलं. तिथे बायो डेटा पाठवला. क्लायंटने रिजेक्ट केला. मग युरोपातला एक प्रोजेक्ट होता. तिथलं काही कळलं नाही अजून. मग म्हणाले आठवडाभर दिल्लीला जाशील का? म्हटलं जाते. तिथूनही होकार आलेला नाही. एक आखातातला पण प्रोजेक्ट आहे, तिथेही नंबर लावून ठेवलाय माझा. रोज ती धाकधूक घेऊन ऑफिसात जायचं आणि नो न्यूज इज द बेस्ट न्यूज म्हणत घरी जायचं. खूप चिडचिड व्हायला लागलेय हल्ली.

आणि ह्या सगळ्याचा त्रास माझ्यापेक्षा आनंदला जास्त होतोय, कारण मी एवढं डोकं खाते त्याचं दिवसभर की विचारू नका. त्या दिवशी असंच झालं. भयंकर वैतागले होते. त्याला म्हंटलं, माझ्याबरोबर चल जरा. तर नाही म्हणाला. त्याचंही बरोबर आहे त्याला कामं असतात. तो बाकावर नाही. माला जरा रागच आला. तावातावाने आनंदीला फोन केला. तिचं ऑफिस जवळच आहे. साधारण पाच वाजत आलेले ती नक्की भेटेल असं वाटलं तिला फोन केला, ती उचलेना. खूप चिडचीड झाली.

मी थोडावेळ आनंदची वाट पाहिली, तो मिटींगमधून बाहेर पडण्याची काही चिन्ह नव्हती. वैतागून एकटीच खाली उतरले. म्हटलं सरळ सिनेमाला जाऊन बसू. म्हणून निघाले खरी. पण एकटीनेच कसं जाणार? बाजूला कोण असेल? नसत्या शंका यायला लागल्या. स्कूटरवर बसले खरी, पण जायचं कुठे हा मोठा प्रश्नच होता. म्हटलं बालगंधर्व ला जाऊन बघावं. तिथे गेले, तर तिथंही काही खास नव्हतं. चालत चालत संभाजी पार्कात गेले.

तिथे नेहमीची संध्याकाळ चालली होती. कुणी फिरायला आलेले, कुणी प्रेम करायला आलेले, आणि कुणी माझ्यासारखेच काहीच करायला नाही म्हणून आलेले. बसून राहिले एकटीच. लोकांना बघत. त्यांच्या मनात काय चाललं असेल त्याचा अंदाज घेत.

बघता बघता एका ग्रूपने माझं लक्ष वेधून घेतलं. तिथे चौथरा आहे ना तिथे बसले होते. चौघं होते. तीन मुलगे, एक मुलगी. त्यांच्याकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे ते एकमेकांशी खाणाखूणांनी बोलत होते. माझं कुतुहल थोडंसं चाळवलं. मी त्यांच्या मागेच, त्यांच्याकडे पाठ करून बसले. ते एक अक्षरही बोलत नव्हते. खाणाखूणा आणि मध्येच एखादी ग्रंट. हळूहळू ते मुकबधीर आहेत हे मला समजलं. आणि ते काय बोलत असतील ह्याच्याविषयी माझ्या मनात प्रचंड कुतुहल निर्माण झालं.

गम्मत बघा. त्या बिचाऱ्यांना, ज्यांना बोलता आणि ऐकता येतं, ती लोकं काय बोलत असतील, ह्याचं कुतुहल नेहेमीच वाटत असेल. आणि आज त्यांच्या बाजूला बसून माझीही परिस्थिती तशीच झाली. पण माझी पाठ त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या खाणाखुणा मला दिसत नव्हत्या. मी मध्येच मान वळवून बघायचा प्रयत्न करीत होते. आणि त्यांच्यातल्या त्या मुलीशी पटकन माझी नजरानजर झाली. ती हसली. मीही हसले. मला एकदम ऑकवर्ड वाटलं. का कुणास ठाऊक पण मी वळले आणि चक्क त्यांच्याबाजूला जाऊन उभी राहिले. ती तिघंही माझ्याशी खाणाखुणांनी बोलायचा प्रयत्न करीत होती आणि मीही. नकळत मी त्यांच्यात कशी रमले मलाच कळलं नाही. ऐकू येत असूनसुद्धा आजूबाजूचं काहीही ऐकू येईनासं झालं. फक्त त्यांचे फेशिअल एक्स्प्रेशन्स. हातवारे एवढंच.

थोड्या वेळानं त्यांची जायची वेळ झाली. बहुदा ते तिथे भेटतात बऱ्याच्दा असं त्यांना सांगायचं होतं. निटसं कळलं नाही. मीही त्यांना पुन्हा विचारलं नाही. पण एक वेगळंच जग होतं त्यांचं. बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण हसता येतं, खिदळता येतं. खाणाखुणा करता येतात. लिप मुव्हमेंटस वरून समोरचा काय बोलतोय ह्याचा अंदाज घेता येतो.

एकदम मला बाबाची खूप आठवण झाली. तो काय म्हणाला असता हे पाहून? सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

जिला देवाच्या कृपेने, चांगलं गाणं म्हणता येतं ती मी, माझ्या क्षुल्लक समस्या घेऊन किती चिडचिडी होऊन तिथे गेले? आणि डोंगराएवढ्या समस्येचं ओझं डोक्यावर घेऊन जगणारे ते तिघं. त्यांना गाणं कधीच म्हणता येणार नाही असा शाप देवानं दिलेला, पण गाणं म्हटल्यासारखं आयुष्य जगत होती. हसत होती, एकमेकांची चेष्टाही करीत होती, अगदी माझ्यासारखं किंवा इतर कुणाहीसारखं आयुष्य जगायचा प्रयत्न करीत होती.

मी तिथेच बसून राहिले बराच वेळ. एकटीच. मोबाईल वाजायला लागला. आनंदचा होता. तो खूप सॉरी म्हणाला. मीही आढ्यतखोरपणा दाखवला नाही. आनंदीचाही फोन आला. ती म्हणाली, तीही पार्काजवळच आहे. ती आली. आनंदही आला. नेहमीच्या थट्टा म्हस्करीला ऊत आला. आमच्या तिघांच्या.

मी हसत होते, बोलत होते, पण मनात मात्र घर करून राहिले ते तिघं, अगदी घरी पोचेपर्यंत.

- संवादिनी

Thursday, May 29, 2008

आनंदीआनंद आणि मी

मैत्री कशी, कुठे, कुणाशी व्हावी काय सांगता येतंय? पुण्यामध्ये आले तेव्हा मित्र कॅटेगरीमध्ये असणारी एकही व्यक्ती नव्हती. आल्यापासून शोधत होते मैत्र. पण ती काय चण्याची डाळ आहे की गेले किराणा दुकानात आणि घेतली एक किलो? तसंच माझं झालं. शोधत राहिलं की मिळत नाही आणि ध्यानीमनी नसताना अलगद पदरी पडतं.

आगाऊपणे मला बंगाली का? म्हणून विचारणारा तो. तो नको, फारच रुक्ष वाटेल सतत तो म्हटलं तर. एखादं छानसं नावच देऊन टाकूया त्याला इथल्यापुरतं. काय बरं? हं, आनंद म्हणूया. तर मला हा आनंद भेटला. मुंबईचा, मराठी आणि मराठीत बोलायची अजिबात लाज न वाटणारा. मग झालीच की मैत्री. ह्याला म्हणायचं काखेत कळसा आणि गावाला वळसा. बरं माझ्या समोरच बसतो तो. म्हणजे मध्ये क्यूबिकलची भिंत आणि पलीकडे तो. पण कळलाच नाही मला तो. भिंती, कमी असलेली अंतरं किती वाढवून टाकतात ना?

कंपनी असली आणि ती चांगली असली तर किती बरं वाटतं ना? नाहीतर एकटीने जा चहाला, सहसा एकटी नाहीच पण इतरांच्याबरोबर गेलं तरी मला एकटंच वाटायचं. आपल्याला नाही ब्वा रस, नव्या टेक्नॉलॉजीच्या गप्पा ठोकण्यात. त्यापेक्षा मस्त एखाद्या पुस्तकावर बोलावं. झालंच तर गाणं आहे, कविता आहेत. त्यामुळे माझं आणि आनंदचं जमतं. तो अजिबात कामाबद्दल बोलत नाही. स्वतः कलाकार आहे असं नाही, पण आवड आहे. विचारत राहतो, हे कसं करता, ते कसं करता, पडदा कसा पडतो, विंग कशाला असतात. फुटकळ प्रश्न, पण मला माझ्या कंफर्ट झोनमध्ये असल्यासारखं वाटतं.

आणि बरं मुंबईचा आहे, पण पुणं सगळं पाठ आहे. मग काय सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हादडणे आणि भटकणे हा कार्यक्रम चाललाय. परवाच आम्ही वैशाली मध्ये गेलो. मस्त आहे हं. म्हणजे मुंबईच्या दही बटाटा पुरीची चव नाही त्या एसपीडीपीला पण हेही नसे थोडके. अजून दोनतीन ठिकाणी जाऊन आले. युनिव्हर्सिटी खूप छान आहे. ओशो पार्कपण आवडला. घरी टीव्ही नाही. मग करायचं काय? भटका. आता कायनेटिकही आहे. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालतो.

हे झालं ऑफिसमधलं. गेल्या आठवड्यापासून एक नवा उद्योग सुरू केलाय. माझ्या बाबांचे एक मित्र आहेत इथे. सहज बोलत बोलता ते असं म्हणाले की ते सकाळी बॅडमिंटन खेळतात. मी लगेच त्यांना विचारलं मी येऊ का म्हणून? ते म्हणाले जरूर. तिथे जायला सुरवात केलेय. ह्या वेळी मुंबईहून येताना माझी जुनी रॅकेट विथ नवं गटिंग घेऊन आलेय. गेले दोन दिवसतरी रेग्युलर आहे. आता पाहूया किती दिवस चालतं हे फॅड.

माझ्या बाबांचे मित्र म्हणजे माझ्या वयाचं कोणी त्यांच्या बरोबर खेळत नसणारंच. पण पहिल्याच दिवशी त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी ओळख झाली. तीही रोज खेळते पण ह्या लोकांबरोबर नाही. त्यांचा ग्रुप वेगळा. असली गट्टी जमलेय ना तिच्याशी की सांगायची सोय नाही. म्हणजे आम्ही भेटून दोनच दिवस झालेत असं वाटतंच नाही. काल तिच्या घरी गेले होते. अगदी माझ्या घरीच गेल्यासारखं वाटलं. काका काकू, तिचा भाऊ आणि ती. एकदम घरचीच आठवण झाली. पण आताशा आठवणी येऊन मन उतू जात नाही. आठवण येते तशीच जाते.

तर असे हे माझे दोन नवे मित्र. आनंद, आणि तिला आनंदी म्हणूया. कारण माझ्या लिखाणात नक्कीच ह्या दोघांचा पुन्हा पुन्हा उल्लेख होणारे. नशीब माणसाला कुणा कुणाची भेट घालून देतं बघा. मी कुठे होते? हे दोघं कुठे होते? आम्ही भेटलो कसे? आणि आम्ही एकमेकांचे मित्र झालो कसे? आता त्यांच्या मित्रांशी ओळख होईल, ते माझे मित्र होतील आणि मैत्र वाढत जाईल. कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं कोण जाणे.

ऑफिसमध्ये काम नाही, सहज एकदा जीटॉक उघडून बसले होते, तर एका ब्लॉगरने हॅलो केलं, त्याच्याशी थोडा वेळ बोलले तर अजून एका ब्लॉगमैत्रिणीने हॅलो केलं, जितका वेळ ऑनलाईन राहिले तितका वेळ एकेक लोकं भेटत गेले. खूप छान वाटलं. आपण ज्या लोकांचं लेखन वाचतो, त्या लोकांशी बोलताना त्यांचे वेगळे पैलू सापडतात असं वाटलं. वेळ इतका छान जातो. आपण एकटे आहोत ही भावनाच विसरायला होते. हे आणखी एक मैत्र.

मुंबईला ह्या वेळी मुद्दाम सकाळी आमच्या नाना नानी ग्रुपला आणि माझ्या समुद्राला भेटायला गेले. जग्गू नाही भेटले. खरं मला त्यांना खूप सांगायचं होतं, कसं काय झालं पुण्याला आणि मी कसं मॅनेज केलं ते. खूप खूश झाले असते. त्यांना फोन केला. गुडघे दुखतायत म्हणाले. पुढच्या आठवड्यात भेटून येईन. आईलाही जरा बरं नव्हतं. सर्दी खोकला आणि तपासारखं वाटत होतं. पण आता बरंय म्हणाली फोनवर.

एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागलेय आताशा की माझी एक्सक्लूसिव्ह विश्व तयार व्हायला लागलीत. मुंबईचं विश्व वेगळं, पुण्याचं वेगळं, पुण्याला ऑफिसचं वेगळं, ऑफिसआधीचं वेगळं, ऑफिस नंतरचं वेगळं, आणि घरी गेल्यावर माझ्या एकटीचं एक अजूनच वेगळं विश्व. पूर्वी ह्या सगळ्यात एक सुसूत्रता होती. पण आता म्हणजे मीच माझ्या वेगवेगळ्या विश्वात वेगवेगळी वागायला लागलेय असं वाटतं. अगदी नाटकातल्यासारखं. प्रसंगाला अनुरूप. कप्पे आहेत हवाबंद. ह्या भागाचा त्या भागाशी संबंध नाही आणि त्याचा ह्याच्याशी.

का?

- संवादिनी

Thursday, May 22, 2008

काल आणि आज

नव्याच्या नवलाईने जुन्याच्या नसण्याचं दुःख हळूहळू बोथट होत जातं. नाही? नव्या ऑफिसात आले तेव्हा पहिले दोन दिवस जुनं ऑफिसच आठवत राहिलं. जुहूचा तो समुद्रकिनारा, वाऱ्यावर डोलणारी नारळाची झाडं. जुहू तारा रोडवरची माझी डबल डेकर बस. आमची टीम, बुटकोबा, सगळं सगळं आठवत राहिलं. हळूहळू इथे रुळायला लागले. पहिल्यांदा नकोशी वाटणारी ती मशीनची फुकट कॉफी आता आवडीची झालेय. नुसतीच कॉफीच नाही, तर एरवी ब्लॅक टी ला नाकं मुरडणारी मी हौसेनं आता ब्लॅक टी विथ लेमन घ्यायला लागलेय.

माझ्या काकाचा एक मित्र आहे. त्याची जुनी कायनेटिक त्याने मला दिलेय वापरायला. त्यामुळे खूप मस्त वाटतंय. म्हणजे त्या पुण्याच्या बसेस आणि रिक्षा नकोच. त्यापेक्षा आपलं वाहन असलेलं बरं. तसं रूटीन पण सेट झालंय. सकाळी सकाळी उठून ऑफिसात धडकणे. जर मेल वेल चेक करून ब्रेकफास्ट. काम अक्षरशः काहीही नाही. मी बाकावर आहे सध्या. म्हणजे बेंचवर. त्यामुळे टिवल्या भावल्या करणे, दुपारी जेवणे आणि संध्याकाळी घरी जाणे. स्वैपाक करायचा कंटाळाच आहे. पण एकटीला जाऊन रात्रीचं बाहेर जेवायला बरं नाही वाटत म्हणून फोन वरून ऑर्डर देणे आणि घरी येऊन ते खाणे, की झाली झोपायची वेळ.

तरी हा लॅपटॉप सोबतीला आहे म्हणून नाहीतर मी वेडीच झाले असते. कारण इथे टी. व्ही देखील नाहीये. पण कालच ऑफिसमध्ये काही पुस्तकं विकायला ठेवली होती. मराठीही होती. बरं वाटलं. एकदोन चाळून पाहिली. छावा घेतलं. खूपच छान आहे. आणि मला एकदा पुस्तक आवडलं की त्याचा फडशा पडायला वेळ लागत नाही. बहुतेक मुंबईला जायच्या आत संपेल.

पण हे सॉफ्टवेअर कंपनीचं विश्व भन्नाट आहे. जो तो स्वतःला विकतोय, विकायचा प्रयत्न करतोय. बॉसला काम, की आम्हाला कामाला लावणं. आमचं काम, आम्हीच अमुक एक कामाला कसे योग्य आहोत हे सिद्ध करणं आणि इतरांवर कुरघोडी करून ते काम स्वतःसाठी मिळवणं. कारण शेवटी तुम्ही किती पैसे कंपनीला मिळवून देता ह्यावर कंपनी तुम्हाला किती बोनस देईल हे अवलंबून आहे. मला एकदम विचित्र वाटलं पहिल्यांदा. आता सवय होतेय. म्हणजे नाही जरी आवडलं तरी करून घ्यायला लागतेय.

काही लोकांच्या ओळखी झाल्या. माझ्यासारख्याच बाकांवर बसलेल्यांना काही उद्योग नाहीये. मग आम्ही काहीजणं टवाळक्या करत बसलेलो असतो. मराठी टक्का खूप कमी आहे. पण माझं मराठी मराठी नाहीच आहे. आपल्याला कोणतीही भाषा बोलणारी चांगली कंपनी चालते. पण मैत्री म्हणावी अशी नाही. ट्रेनमध्ये लांबच्या प्रवासाला निघालेले लोकं कसे टाइम पास करण्यापुरतं बोलतात. तसंच काहीसं.

कारण सर्वांनाच माहितेय की ही सोबत काही दिवसांचीच आहे. पुढे नवा प्रोजेक्ट नवं राज्य, नवा राजा आणि नवी प्रजा. मग मैत्री करायचे कष्ट आतापासून कशाला घ्या? बरं मीच कशी ग्रेट आणि मीच कसा फंडू, हे सांगायची अहमहमिका लागते. मी आपलं ऐकते. शेवटी सगळेच बोलले तर ऐकायचं कोणी? त्यामुळेच असेल, पण लोकं स्वतःहून माझ्याशी बोलायला येतात. आपल्या स्वतःचं स्वतःबद्दलचं बोलणं, दुसऱ्या कुणीतरी शांतपणे ऐकून घेणं ही खरोखरच माणसाची गरज आहे का हो?

आमचे साहेब तसे बरे आहेत. चक्क मराठी आहेत. मला अहो जाहो करतात. मी त्यांना नको सांगितलं तरी ऐकत नाहीत. माझ्यासाठी स्थळ शोधतायत. अंहं, ते स्थळ नव्हे, त्यांच्या परिभाषेत, स्थळ म्हणजे प्रोजेक्ट आणि त्यांचं काम वधूवर सूचक मंडळासारखं.

आज बुधवार आला. उद्याचा एक गुरुवार गेला की मग आलाच शुक्रवार. इंद्रायणी - घर - शनिवार - रविवार - इंद्रायणी - पुणं आणि मग पाच दिवस आणि चार रात्रींसाठी एक वेगळंच विश्व. मागणी आणि पुरवठ्याच्या तालावर नाचणारं. एक मार्केट इकॉनॉमी. डिमांड आणि सप्लाय. मोर द डिमांड मोर द प्राइस, मोर द सप्लाय, लेस द प्राइस. आणि मग चालणारी चढाओढ, माझी डिमांड जास्त कशी आणि माझ्या स्किल्स चा सप्लाय कमी कसा? आणि म्हणून माझी किंमत जास्त कशी?

मीही नकळत कधी ह्यात ओढली जाते. मग अधेमधे कुठेतरी लक्षात येतं. आपण तसे नाहीच मुळी. कशाला तसं वागायचा प्रयत्न करायचा? हाथी चले अपनी चाल प्रमाणे आपण चालत राहायचं. आमचे एक सर नेहमी सांगायचे. पैशाच्या अपेक्षेनं काही करू नका. जे काही कराल ते सर्वोत्तम करा. पैसा तुमच्याकडे चालत येईल. जितकं तुम्ही त्याच्या मागे लागाल तितकं दूर पळेल. बघूया सरांचं तत्त्वज्ञान काळाच्या कसोटीवर उतरतं का ते?

पण ह्या सगळ्यातसुद्धा जवळचे वाटावे असे लोकही आहेत. मी जिथे राहते तिथल्या शेजारच्या काकू. म्हणाल्या कधीही कंटाळा आला तर आमच्याकडे येत जा. टी. व्ही. बघायला. जेवायला. खूप बरं वाटलं. ऑफिसातही एक इंटरेस्टिंग मुलगा भेटला. मी मराठी पेपर वाचत बसले होते, तर मागून आला आणि म्हणाला तू बंगाली आहेस का म्हणून? मला जरा विचित्रंच वाटलं, अगदी मराठी वाचता येत नसलं तरी देवनागरी आहे स्क्रीनवर एवढं तरी समजतंच ना? मी नाही म्हटलं. तसा म्हणाला, मला वाटलंच, तू मराठी असणार म्हणून. बंगाल्यांना अजून मराठी वाचता कुठे येतं? साहेब स्वतः मराठी. ओळख करून घेण्याची ही अनोखी पद्धत पाहिल्यावर माझी खात्री होती की ये भिडू मुंबईकाही है. आणि तसंच झालं. पण त्याच्याविषयी पुढच्या वेळी. उद्या काम नसलं तरी ऑफिसला तर जायचंच आहे म्हणून आता झोप.

Thursday, May 15, 2008

वाघ आणि बेडूक

आपलं भोवताल बदललं की आपण बदलतो की नाही? बहुतेक बदलतो. गेल्या पोस्टपर्यंत मी माझ्या घरात माझ्या टेबलवर आईने बनवून दिलेला गरम गरम चहा भुरकत भुरकत लिहीत होते. आज मी इथे एकटीच आहे. कधीतरी गरम होती, असा जरासुद्धा संशय येऊ न देणारी इडली आहे, आंबट ढाण सांबार आणि तिखट जाळ चटणी. अर्थात त्या दोघांच्या वाटेलाही मी जात नाहीये हा मुद्दा वेगळा, पण ह्यामुळे माझं लिखाणसुद्धा थंडगार होऊन जाणार असं वाटतंय.

असो, सांगायचा मुद्दा हा, की आमचं पार्सल पुण्यनगरीत येऊन पोहोचलं, सगळंच धक्कादायक आहे. अजूनही मी सावरतेय.

पहिल्या दिवशी सकाळी सकाळी इंद्रायणीने इथे पोहोचले. ऑफिसतर्फे पहिल्या दोन ट्रिपा स्पॉन्सर्ड आहेत, त्यामुळे एसी चेअरकारनी आले. पण खिडक्या उघडता येणाऱ्या डब्यांची मजा इथे नाहीच. निसर्गाचा रंग कसा लख्ख दिसायला हवा. जसा आहे तसा. मध्ये ती टींटेड काच आली, की सगळं सपक दिसायला लागतं. त्याच रंगात असल्यासारखं.

आधीच मला नव्या नोकरीचं टेन्शन, त्यात एवढ्या लवकर उठायची नसलेली सवय, त्यामुळे झोपेतच शिवाजीनगरला उतरले. सामान काही जास्त बरोबर नेलंच नव्हतं कारण आई बाबा गाडीने विकेंडला पोहोचणार होते, माझ्या सामानासकट. पहिला धक्का. पुण्यातला रिक्षावाला माझ्याशी हिंदीत बोलला. आणि तो मराठी होता हे त्याच्या उच्चारांवरून स्पष्ट कळत होतं. म्हणजे मी मराठी दिसत नाही की काय? काळे डोळे सोडले तर बाकी सगळंच एकदम चित्पावनी. त्यामुळे पुण्यातले लोकं आपल्याला पुणेकरंच समजतील असा एक फाजिल समज झाला होता, तो त्या पुणेरी रिक्षावल्याने माझ्याशी हिंदीत बोलून चुकीचा सिद्ध करून दाखवला.

असो, हा धक्का फारसा धक्कादायक नव्हता. खरा धक्का तर पुढेच बसला. ऑफिसात शिरून एच आर डिपार्टमेंटमध्ये शिरले. एक अतिशय नकोसा वाटावा असा माणूस बसलेला. बोलण्यात उर्मटपणा, उपकार करतोय असा वागत होता. त्याला जाऊन माझं नाव वगैरे सांगितलं, मेडिकल करायची वगैरे तेही सांगितलं. त्यानंतर तो मला जे काही म्हणाला ते ऐकून झीट येऊन पडायचीच वेळ आली. तो म्हणाला की त्याला कोणी कळवलंच नाहीये की मला रिक्रूट केलंय म्हणून.

मनात म्हटलं, अरे माणसा, मी माझी सोन्यासारखी नोकरी सोडून, सकाळी सकाळी उठून, तडफडत तडफडत, इथे येऊन पोचले आणि तू मला म्हणतोस की तुला कोणी सांगितलंच नाहीये की मी येणारे म्हणून? मी म्हणजे ऑलमोस्ट रडणारंच होते, पण कसंबसं रोखलं. शेवटी नावात घोटाळा झाल्याचं कळलं. साठ्ये चं चक्क शेट्टी? पण शेवटी मीच ती, हे ऐकून मला हायसं वाटलं.

बाकी सगळा दिवस मेडिकल, जॉइनिंग फॉरमॅलिटीज मध्ये गेला. संध्याकाळी अस्मादिक ह्या आमच्या गेस्ट हाउस वर पोहोचले. जुन्या कंपनीने वाईट सवयी लावलेल्या. तिथे म्हणजे राजेशाही कारभार, हवंतर राणीशाही म्हणा, पण इथे? एवढी मोठी ही कंपनी पण गेस्ट हाउस कसलं? एखाद्या कॉलेजचं हॉस्टेलही ह्यापेक्षा खूप चांगलं असेल. पुन्हा एकदा रडायलाच यायला लागलं. मी एवढी रडी आहे हे मला इथे आल्यावरच कळतंय.

जरा फ्रेश होऊन बाहेर पडले, घरी फोन केला. विन्याने उचलला. एकदम खूश झाला. त्याच्याशी थोडा वेळ बोलले, मग बाबाशी बोलले, आईशी बोलताना मात्र तिला सांगितलं म्हटलं शुक्रवारी नाही, उद्या परवाच या. इथे राहणं मला शक्य नाहीये इतकं टुकार गेस्ट हाउस आहे. हो नाही करता करता गुरुवार ठरला. गुरुवार म्हणजे उद्या ते इथे येतील. मग माझ्या काकाचा रिकामा फ्लॅट आहे, कचरा डेपोला, तिथे मी एकटी राहणार आहे, तिथे सगळं सेटिंग करतील आणि मग आम्ही शुक्रवारी सगळेच मुंबईला जाऊ. काय पण एरीआ आहे? कचरा डेपो?

बाबाने मला हा लॅपटॉप घेऊन दिला. मस्त आहे. आणि बॅकग्राउंड म्हणून आमचा चौघांचा फोटो लावून ठेवलाय, सिडनी ला घेतलेला. मी सीए झाल्यावर आम्ही ट्रीपला गेलो होतो तेव्हाचा. पाठी ऑपेरा हाऊस आहे. पण मी बघतच नाही तो. उगाचच आठवण येते आणि पुन्हा रडायला येतं. मला खरंच वाटलं नव्हतं, की एवढी सतत आठवण येईल, रडू येईल. अर्थात आता जरा बरं वाटतंय कारण उद्या सगळेच इथे येतील.

नेहमी कळपात राहणाऱ्या प्राण्याला एकदम एकटं राहायला सांगितलं तर कसं होईल? तसं माझं झालंय. ऑफिसात कुणी ओळखत नाही, एकदम जाऊन कुणाशी मैत्री करण्याचा माझा स्वभाव नाही. मित्रमंडळात खूप बडबडी असले तरी अनोळखी लोकांच्यात माझी एकदम भिजलेली मांजर होते. उगाचच हसायला टॅक्स पडत असल्यासारखा माझा चेहरा मग लंबाचौडा होतो. त्यामुळे पटकन ओळखी होत नाहीत, लोकांना मी कदाचित थोडी आखडूही वाटत असेन. सेल्फ रिअलायझेशन का काय ते म्हणतात ते हेच असेल? आपल्या डबक्यात शेर असलेला बेडूक, डबक्याबाहेर पडला की त्याला आपलं बेडूकपण जाणवतं. डबक्यात त्याला वाघ म्हणणारेच सगळे असतात आणि डबक्याबाहेर कुणी बेडूकही म्हणायला तयार नसतं.

तसा झालाय माझा डबक्याबाहेरचा बेडूक.

असं काही झालं की मला महाभारतामधला "मै समय हुं" वाला हरीश भिमाणीचा आवाज आठवतो. समय हेच सगळ्यावरचं एकमेव सोल्यूशन, परवापेक्षा काल, आणि कालच्यापेक्षा आज खूपच बरा वाटतोय. उद्या कदाचित इथलेही लोकं ह्या बेडकाला शेर शेर म्हणायला लागतील कुणी सांगावं?

- संवादिनी