Thursday, July 30, 2009

तीन पायाची शर्यत

शनिवारी सकाळी सकाळी एकटीच गाडी घेऊन बाहेर पडले. शनिवार आणि रविवार म्हणजे आमच्या घरी दिवस रात्र झोपण्याचे वार. पण दिवस रात्र झोपणं मला झेपण्यातलं नाहीच आहे. मग काय करा? सकाळी सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता. पतिराजांच्या मानाने ही पहाटच) उठले काढली गाडी आणि निघाले. दोन पर्याय होते. एक म्हणजे जवळच्याच मोठ्या शहरात जायचं किंवा समुद्राच्या कडेकडेनं जाणाऱ्या रस्त्याने लांब भटकायचं.

गाडीत बसले. गॅरेज उघडलं. बाहेर पडणार इतक्यात वाटलं नवऱ्याला विचारावं येतो का ते. नाही म्हणणार हे पुरतं माहीत होतं पण तरीही तिथूनच गाडीत बसल्या बसल्या फोन केला. बराच वेळ वाजून व्हॉईस मेसेजवर गेला. त्याला तिथेच व्हॉईस मेसेज ठेवला की मी जात आहे. दुपारपर्यंत येईन. शेवटी करता करता समुद्राचा रस्ता पकडला. तसा दिवस उगवला असला तरी लोकं उगवायची होती त्यामुळे रस्ते रिकामेच होते. भरभर गाडी चालवत समुद्राजवळच्या रस्त्याला लागले. जिथे जिथे म्हणून थांबता येणं शक्य होतं तिथे तिथे थांबले. नवऱ्याचा नवा कोरा एसएलार कॅमेरा घेतला होताच अशक्य फोटो काढले.

थंडी होतीच. हुक्की आली म्हणून खिडकीच्या काचा उघडल्या. भन्नाट वारा सुटलेला अंगाला झोंबायला लागला. किशोरीताईंचा तोडी लावला होता. एकेक मधामध्ये सत्तर सत्तर वर्ष घोळलेला स्वर. तो कोमल ग. एकदम माझ्या गाण्याच्या बाईंची आठवण झाली. एका स्पर्धेत तोडी म्हणायचा होता. त्याची तयारी करून घेत होत्या त्या. मी लहानंच होते. सूर कळण्याचं वय नव्हतं. पण मी योग्य तेच गावं हा त्यांचा हट्ट. तोडीमध्ये कोमल ग, अतिकोमल लागला पाहिजे. कितीदा रटवून घेतलं होतं. अख्ख्या गाण्यापेक्षा अतिकोमल ग चा रियाज जास्त करून घेतला होता. स्पर्धा झाली. बक्षीस मिळालं. पण बाई रागावल्या. म्हणाल्या एवढं शिकवून आलं कसं नाही तुला? बक्षीस मिळाल्याच्या कौतुकापेक्षा सूर हवा तसा बरोबर लागल्याचं कौतुक त्यांना जास्त. अशा आमच्या बाई. गचकन कुणीतरी हॉर्न मारला आणि बाई आठवणीत हरवून गेल्या परत.

एका ठिकाणी उतरले उंचावरची जागा. समोर अथांग समुद्र पसरलेला. वारा सुटलेला, त्याची सुरावट कानात. किती वेळ झाला कोण जाणे समाधीच लागली. समुद्राचा आणि माझा एक विलक्षण ऋणानुबंध आहे. तो कसाही असला तरी मला आवडतो. अगदी ओहोटीचा हिरमुसलेला दिसणारा असला तरी आणि उधाणलेला भरतीचा असला तरी. अख्खं विश्व पोटात गुडुप करून ठेवण्याची ताकद आहे त्याची. त्याच्याकडे बघताना भारावून जायला होतं.

नवऱ्याच्या फोनने भानावर आले. नुकताच उठला होता. मला म्हणाला मला का नाही उठवलं. म्हटलं मित्रा, मी फोन केला होता. तू उचलला का नाहीस. म्हणाला, काय बाई एका घरात राहून एकमेकांना फोन करतो आपण. मी म्हटलं मग काय बुवा, एका माणसाला झोपण्यापुढे काही सुचत नाही. आणि दोघंही जोरजोरात हसलो. इतकं की बाजूला गाडी लावून उभी असलेलं एक अख्खं कुटुंब माझ्याकडे बघायला लागलं. मग मी गाडीत जाऊन बसले आणि चक्क नवऱ्याबरोबर तासभर गप्पा मारल्या. मी त्याला जेवायला येते म्हणून निरोप ठेवला होता आणि इथे गाडीत अर्ध्या रस्त्यातच जेवायची वेळ झाली.

मग काय फिरले परत. घरी पोचते तर शिरता शिरताच मस्त जेवणाचा वास आला. नवरोबा मुडात होते तर आज. एकदम त्याची लाडकी चिकन करी आणि कोकोनट राईस वाटच बघत होते. मग काय? दोघांनी मिळून फडशा पाडला.

माझं मलाच हसायला आलं. आमच्या वाडीत उत्सवाच्या वेळी दर वर्षी तीन पायांची शर्यत असायची. ती आठवली. मी आणि रमा नेहमी भाग घ्यायचो. रमा म्हणजे माझी बेस्ट फ़्रेंड. अजूनही आहे. माझ्याशिवाय तिचं आणि तिच्याशिवाय माझं अजिबात पान हलायचं नाही. पण तीन पायाच्या शर्यतीत एकदा पाय बांधले की आमची धमालच व्हायची. कधी तिचा पाय पुढे कधी माझा पाय मागे. असं करत करत पंधरा वेळा पडायला व्हायचं. मग ती माझ्यावर चिडणार किंवा मी तिच्यावर चिडणार. कशी बशी आम्ही लाइन ओलांडायचो. ते एकदा मात्र झालं की वेड लागल्यासारखं हसायचो. आम्ही कसे पडलो, लोक आम्हाला कसे हसले, मग आम्हीच एकमेकीवर कसे चिडलो आणि ओरडलो, कधी तिने मला कसं खेचलं कधी मी तिला कसं ढकललं ह्याचीच मजा. तेव्हा वाटायचं एवढ्या आम्ही जीवा भावाच्या मैत्रिणी मग आमचे पाय एका लयीत का पडू नयेत?

आताशा थोडं कळायला लागलंय की हे लग्न प्रकरण म्हणजे पण तीन पायाची शर्यत आहे. एकट्याने चालायचा प्रयत्न केला तरी चालता येत नाही आणि दोघांनी एकत्र चालता चालता एकमेकांच्या चालण्याशी जुळवून घेतानाच दमछाक होते. पडणं होतं, रडणं होतं. पण सगळ्यात शेवटी आपण एकत्र काहीतरी अचीव्ह केला हा आनंदही असतो.

अशी आहे आमची तीन पायाची शर्यत. पडणे, रडणे आणि खळखळून हसणे ह्या चक्रातून जाणारी.

Thursday, July 23, 2009

धुमसतं बर्फ

उद्या बर्फात जायचं. शुक्रवारी ओरडतंच नवरा घरात शिरला.
त्याच्या एका कलीगबरोबर त्याने प्रोग्रॅम ठरवून पण टाकलेला. त्याच्यापेक्षा खरंतर मलाच ह्या सर्व गोष्टींचा उत्साह जास्त आहे. प्रचंड उत्साहात करण्याची एकंच गोष्ट त्याला माहीत आहे. ती म्हणजे झोपणे. शनिवारी-रविवारी चांगलं बारा वाजेपर्यंत ताणून देऊन अर्धा विकेंड लक्षात न राहिलेली स्वप्न बघण्यात घालवायचा हा त्याचा शिरस्ता. तर विकेंडला लवकर उठून पूर्ण दिवस सत्कारणी लावायचा हा माझा. त्यामुळे आम्ही एकत्र फिरायला वगैरे जाण्याचा योग मणिकांचन किंवा दुग्धशर्करा वगैरे जे प्रकरण आहे त्यात मोडणाराच. त्यामुळे अजून बरं वाटलं.

ठिकाण तर ठरलेलं होतं. त्यापुढे माझा आणि त्याचा अजून एक वादाचा विषय. त्याला पोचायची घाई फार. मला अजिबात नाही. किती वेळात पोचलात ह्यापेक्षा कसे पोचलात. प्रवासात मजा केली का? किती ठिकाणी उतरलात? कोणत्या नव्या जागा पाहिल्यात? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची मजा मला खूप वाटते. म्हणजे ते रक्तातच आहे. गोव्याला जाताना आम्ही तीन तीन दिवस लावलेत मुंबईहून. बाबाचं म्हणणं, रोज एक वेगळी पिकनिक करायची. वाटेल तिथे थांबावं. हवा तितका वेळ मज्जा करावी आणि वाटेल तेव्हा पुढे जावं. त्यामुळे मला अगदी सगळीकडे उतरून वेळ घालवावासा वाटतो. अरे थांब ना जरा म्हटलं, की म्हणणार. बर्फात चाललोय ना? मग हे झरे नि झाडं नि पक्षी काय बघत बसतेस. हा. काय करा? जोरजोरात पळत सुटा, गाडी दोन आकडे वरच चालवा स्पीड लिमिटच्या. करत करत शेवटी पोचलो.

पुढे एका ठिकाणी गाडी थांबवून गाडीच्या चाकांना चेन लावावी लागली म्हणजे गाडी बर्फावर घसरत नाही. ती लावायला म्हणून नवरा बाहेर उतरला. मला पण उतरायची हुक्की आली. उतरले पण बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लगेच आत येऊन बसले. लगेच नवरा म्हणाला, आता जिथे जिथे थांबायचं असेल तिथे सांग नक्की थांबवणार. फक्त उतरायचं आणि बाहेर जाऊन यायचं. झालं आता सगळा वेळ त्याला हे पुरणार होतं.

वर पोचलो. स्कीइंग करायचंच होतं. मग त्याचे कपडे आणि स्कीज घेतले होतेच. पण ते स्कीज पायावर चढवायची वेळ आली तेव्हा खरा प्रॉब्लेम झाला. स्कीज लावले की उभंच राहावं लागतं. पडलात तर स्कीज सोडवून उभं राहून परत घालावे लागतात. असं करता करताच बराच वेळ गेला. त्याच्या मित्रानं आम्हाला शिकवलं. पण माझी प्रगती न पडता एका ठिकाणी उभं राहण्याइतपतच झाली. नवऱ्याला बाकी जमलं. त्याने आधीही केलेलं होतं. थोड्या वेळाने मी स्कीज उतरवले आणि सरळ खांद्यावर घेऊन फिरायला लागले. दुसऱ्या दिवशी खांदा खूप दुखत होता.

नवरा आणि त्याच्या मित्राचं स्कीइंग जोरात चालू असल्याने मी एकटीच राहिले.

मग कॉफीचा एक कार्डबोर्ड कप घेऊन निवांत एका ठिकाणी बसले. समोर सगळं पांढरं जग होतं. माझ्या समोरूनच एक छोटी मस्तपैकी स्कीइंग करत गेली. माझ्या कंबरेपर्यंतपण नसेल तिची उंची. रंगीबेरंगी कपड्यातली माणसं, सगळ्यांच्या गोंड्याच्या कानटोप्या. कुठेच नजरेत भरणारी एखाद्या देशी माणसाने किंवा बाईने घातलेली मंकी कॅप. बर्फावरून मस्त घसरणारी, एकमेकांवर बर्फ फेकणारी मुलं. त्यांना ओरडणाऱ्या आया, आणि मुलांना सामील होऊन ओरडणाऱ्या आयांचा अंगावर बर्फ उडवणारे बाबा. कुठे बर्फावर घसरत आइसक्रीम खाणारी जोडपी.

काही कारण नसताना उगाचच मला भरून आलं. कशामुळे? खूप विचार केला पण तरीही समजलं नाही. कदाचित अशा एखाद्या गर्दीने भरलेल्या क्षणी खूप एकटं वाटून जातं, एकटं नसतानाही. तसंच झालं असावं माझं. पुन्हा फिरून आपण काय करतोय, आपल्याला काय करायचं होतं? बर्फाने भरलेले डोंगर स्कीज लाऊन धडाधड उतरावं, तसं माझं मन ओळखीचीच वळणं घेत घेत तळाला कधी जाऊन पोचलं कळलंच नाही. तळाला पोचल्यावर, पुन्हा कधीतरी घसरत खाली येण्यासाठी, मोठ्ठा डोंगर चढावा लागणार ह्याची जाणीवही झाली.

तेवढ्यात नवरा आणि त्याचा मित्र दमून भागून आले. त्याला लहान मुलासारखं लांबून हात हलवत माझं लक्ष वेधून घेताना पाहिलं आणि खुदकन हसायलाच आलं. खांद्यावर स्कीज टाकून पुन्हा एकदा मी निघाले. डोंगर चढायला.

बर्फावरची भुरभूर सुरू झाली. धुमसत्या बर्फावर आकाशातून पडणाऱ्या बर्फाने चादर घातली. धुमसतं बर्फ क्षणभर हसलं. पुन्हा आतल्या आत धुमसण्यासाठी.

Thursday, July 16, 2009

माणसांची सवय आणि सवयीची माणसं

हल्ली घरून काम करतेय. म्हणजे ऑफिसात अजिबात जायचंच नाही. अगदी अख्खा दिवस, अख्खा आठवडा घरून काम. पहिल्यानं वाटलं, मज्जाच मज्जा. घरी मी एकटीच त्यामुळे काहीही करा, वॉच ठेवायला बॉस नाही, कलिग्ज नाहीत, कुणीच नाही. मनाला वाटेल तेव्हा काम करायचं, नाही वाटणार तेव्हा सोडून द्यायचं. झोप काढावीशी वाटली, झोपायचं अगदी काही न करावंसं वाटलं तर तसं करायचं. पण ह्या सगळ्याच्या शेवटी काम तर वेळच्या वेळी झालंच पाहिजे ना.

आता एक आठवडा होत आला. आताशा कंटाळाच यायला लागलाय. म्हणजे, जिथे राहायचं तिथेच काम करायचं आणि काम संपल्यावर पुन्हा जिथे काम केलं तिथेच राहायचं. सकाळची ट्रेन गाठायची धावपळ नाही, की डबा भरायची दगदग नाही. नवरा आपला बिचारा त्याची वेळ झाली की उठतो, फ्रीजमध्ये काल भरून ठेवलेला डबा उचलतो आणि चालता होतो. तो गेलाय हे कळेपर्यंत तो बहुतेक ऑफिसात पोचलेला असतो. मग कंटाळत उठून कामाला सुरवात करायची. अगदीच एकटं एकटं वाटलं तर आरशात जाऊन बघायचं, नाहीतर काहीतरी काम काढून नवऱ्याला फोन करायचा किंवा जॉर्जीला करायचा किंवा आणखी कुणालातरी. कुणालातरी गूगलवर सतवायचं, असले उद्योग चालू असतात.

पण दुपार सरायला लागते, तसं मग कामाचं टेन्शन वाढतं, कारण अमुक एक काम आज संपवायचं असतं. तमुक एक प्रेसेंटेशन संपवायचं असतं कारण बॉसची मीटिंग असते. विकली मीटिंगमध्ये उगाचच उत्साहाने एखाद्या कलीगला मदत करायचं आता नकोसं वाटणार ओझं घेतलेलं असतं ते आठवायला लागतं. कल करेसो आज कर आज करेसो अब चं एकदम उलटं माझं चाललंय. अब करेसो आज कर, आज करेसो परसो.

आणि वर घुम्यासारखं घरात एकटं राहणं. तसं एकटं राहण्याच्या मला प्रॉब्लेम नाही. इन फॅक्ट, एकटं राहायला मला आवडतं कधीकधी. म्हणजे मी गमतीत म्हणायचे, की मी हरवून एखाद्या व्हर्जीन आयलंडवर वगैरे पोचले तर आरामात एकटी राहू शकीन (तिथे पाली आणि झुरळं नसतील तरच. मला त्यांची अनावर भीती वाटते). पण खूप कठीण आहे. जस्ट टू चेंज युअर एन्व्हायरमेंट, वन नीडस टू गो टू ऑफिस.

माणसं किती आवश्यक आहेत एकंदरीतच आयुष्यात. ऑफिसात इतकी माणसं असतात, त्यांच्याशी आपण बोलतो, नाही बोलतो, हसतो, कधी कधी नाही सुद्धा हसत, पण त्यांचं नुसतं असणं किती आनंददायक असू शकतं ते मला आता कळतंय. मग ह्यावर उतारा म्हणून भर दुपारी फिरायला (आणि मनात असेल तेव्हा पळायला) जायचं काढलंय. लंच टाइम वॉक. भर दुपारी व्यायाम हा प्रकार भारतात एकदम भारीच वाटेल. पण इथे सकाळी आणि संध्याकाळी एवढी मरणाची थंडी असते की मी बाहेर गेले तर माझा गोठून पुतळा होईल. एकदम हाउस ऑफ वॅक्स सारखा फक्त मेणाशिवाय बनवलेला.

हळू हळू शेजार पाजाराची माणसंही ओळखीची व्हायला लागलीत. आमचा हा गाव म्हणजे तसा म्हाताऱ्यांचाच गाव आहे. एका बाजूला एक म्हातारे आजोबा आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक म्हातारे आजी आजोबा आहेत. आजी आजोबांचं काहीनं काही चाललेलं असतं. अजून फारशी ओळख नाहीये. पुढे मागे वाढली की त्यांना चहाला बोलवायचा विचार आहे. एकटे आजोबा आहेत त्यांचं बहुतेक त्यांच्या बागेवर प्रचंड प्रेम आहे. घराच्या खिडकीतून त्यांचं अंगण दिसतं. सतत काही ना काही बागेत चाललेलं असतं. जाता येता कधी दिसले तर हात करतात आणि जोरात ओरडतात "गूड डे".

मी फिरायला जाते तेव्हा मला अजून एक आजी दिसतात. बरोबर त्याच वेळी त्या त्यांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडतात. नाक्यावरच्या प्लॉटवर घराचं काम चाललं आहे, तिथले ट्रेडस्मन दिसतात. बघून बघून हाय हॅलो सुरू झालं आहे. आमचं लॉन कापायला एक अजून एक आजोबा आहेत. ते बरीच घरं करतात आमच्या स्ट्रीटची, ते दिसतात. कधी घरी पैसे घ्यायला ते येतात. तेव्हा थोड्या गप्पा होतात.

आपल्याला माणसांची सवय होते आणि सवयची माणसं दिसली नाहीत की चुकल्यासारखं होतं. होतं काही दिवस पण मग नवी माणसं सवयीची व्हायला लागतात आणि मग ते चुकचुकणं कमी होतं. तसंच काहीसं माझं चाललंय.

एकटी एकटी म्हणून आता मीही माझा गोतावळा जमवायला सुरवात केलीच आहे की.

Monday, July 6, 2009

होडी

बऱ्याच दिवसांनी आज निवांतपणा मिळाला. दिवसभराच्या लढाईत इतकं हरवून जायला होतं की आपला म्हणून काही वेळ असू शकतो हेही लक्षात राहत नाही. हल्ली हल्ली तर तो असावा अशी अपेक्षासुद्धा नाहीशी होत चालली आहे. पण आज तसं नाहीये. बऱ्याच दिवसांनी एकटीनंच घरी बसून आळोखे पिळोखे देत दिवस घालवायची संधी चालून आली. आणि दोन्ही हातांनी मी ती संधी आपलीशी केली.

सकाळी उशीरानेच उठले. उठल्यावर काहीच करायचं नसल्याने एकदम बावचळल्यासारखं झालं. मग चहा करायचं ठरवलं. फ्रीज उघडून बघते तर आतमध्ये दुधाच्या डब्या ठेवलेल्या. प्रत्येक डबीत फार फार तर तीन चमचे दूध. अशा फारा डब्या रिकाम्या करून चहाचा घाट घातला. कुठल्याश्या मंद इंग्लिश चहाच्या डिप डिप पिशव्या सापडल्या. त्या तशाच टाकाव्या का फोडून चहाची पावडर पातेल्यात टाकावी ह्याचा विचार करता करता आधण उकळलं सुद्धा. गाळणं मिळालं नाही, मग तशाच पिशव्या पातेल्यात टाकल्या. चहाची चव आणि चहाचा रंग हे दोन्ही चहा पिण्याच्या एक्स्पिरियन्सचा अविभाज्य भाग आहेत. आणि रंग चांगला आला नाही तर चव चांगली लागत नाही, असं हे जुळ्याचं दुखणं. अर्ध्या पातेल्याचा ढग झाला तरी हवा तो रंग येईना. मग जसा झाला, ज्या रंगाचा झाला तो चहा मगात घेऊन खिडकीपाशी आले.

पावसाची रिपरिप चालूच होती. खिडकीच्या काचेपाशी येऊन चहाचा एक घोट घेतला आणि एका उःश्वासासरशी मनातलं धुकं काचेवर दाटलं. मग उगाचच काचेवर धुक्याचं पेंटिंग करत राहिले बराच वेळ. काच भरली की मग बोटांच्या ब्रशनी त्याच्यावर नक्षी काढायचा खेळ. मग उगाचच थंड काचेला गाल चिकटवून खिडकीबाहेर बघत राहणं. वेळ कसा गेला कळलं नाही.

पावसाचा जोरही थोडा वाढला. खिडकी उघडली आणि थंड हवेचा झोतच अंगावर आला. देशातला पाऊस असा कधीच नव्हता. हा पाऊस दूर लोटणारा वाटला. देशातला पाऊस जवळ घेणारा. मनसोक्त भिजता येण्यासारखा. हा पाऊस गरम गरम चहाचा कप घेऊन हीटरच्या शेजारी खुर्ची टाकून स्वेटर बिटर घालून बंद काचेतून बघायचा पाऊस. एखाद्या रम्य चित्रासारखा, पण तरीही आपल्याला त्या चित्रात सामावून न घेणारा. एकलकोंडा.

हॉटेलच्या नावासकट ठेवलेलं एक नोटपॅड दिसलं. हॉटेलात नोटपॅड का ठेवत असावेत हे मला समजत नाही. कुणीही कधी त्यावर काही लिहिलेलं ऐकीवात नाही. लहान होते, आणि कधी अशा हॉटेलात राहायची वेळ आली तर मात्र न चुकता ती नोटपॅड्स उचलून घरी घेऊन यायचे मी. छान छान कागद त्यावर मस्तपैकी हॉटेलचं नाव छापलेलं. आणि त्याचा एक एक कागद आवाज न करता फाडता यायचा. मग त्याची बसची तिकिटं व्हायची. बसची का? विमानाची पण व्हायची. आमच्या विमानात पण कंडक्टर असायचा आणि तो सगळ्यांना विमानात चढल्यावर तिकिटं द्यायचा. मला कंडक्टर व्हायला खूप आवडायचं, अगदी ड्रायव्हरपेक्षाही.

मनात काय विचार आला कोण जाणे, म्हटलं कागदाची होडी करू. जरा आठवून आठवून बनवायला लागले. पण मला नुसती शिडाची होडी बनवता येईना. नांगरहोडी मात्र बरोबर जमत होती. कुणी होडी बनवायला शिकवली आठवत नाही. बहुतेक बाबानेच. पण साधी शिडाची होडी बनवणं सोपं असतं आणि नांगरहोडी बनवणं कठीण असतं एवढं आठवत होतं. पण तरीही साधी शिडाची होडी काही जमली नाही. कठीण आणखी कठीण आणखी आणखी कठीण अशा पायऱ्या चढत जाताना कुठेतरी आयुष्यातलं साधं सोपं कुठेतरी हरवून जातं ना? तशीच माझी साधी शिडाची होडीही हरवून गेली.

शेवटी नांगराच्या होडीचं नांगत कात्रीने कापून टाकलं आणि झाली तय्यार माझी साधी शिडाची होडी. मग हळूच दारासमोरच्या पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोचले आणि आजूबाजूचं कुणी मला बघत तर नाही ना असं बघून ती होडी सोडून दिली खालच्या पाण्यात. पाहत राहिले अगदी नजरेआड होईपर्यंत. जिथपर्यंत दिसली तिथपर्यंत दिसली, पुढे तिचं काय झालं? कशात जाऊन ती शेवटी बुडली असेल, किंवा किती लांब गेली असेल, किंवा एखाद्या लहान मुलाला ती दिसली असेल आणि त्याने ती उचलून घेतली असेल, की कुणाच्या पायाखाली येऊन ती मोडली असेल, ह्याचाच विचार बराच वेळ करत राहिले.

थंडी असह्य झाली तेव्हाच भानावर आले. शहर बदललं पण प्रवास थांबणार का? नाही. माझी नांगर कापून टाकलेली शिडाची होडी अशीच वाहवत जाणार, पाणी नेईल तिथे.

पण त्या वाहून जाण्यातही एक मजा आहेच की?

Thursday, May 21, 2009

वाट पाहण्याचा खेळ

मेपलच्या झाडाची पानं पडायला लागलीत. हिवाळा आता काही फार दूर नाही. हवेतला गारवा वाढायला लागलाय. हल्ली संध्याकाळी, पडत्या उन्हाच्या किरणांच्या शाली पांघरून येईनाश्या झाल्यात. त्याऐवजी काळ्या रंगाच्या अंधाराचं जाजम पांघरूनच त्या पसरतायत.

गोधुल्या वेळी सूर्याने आपला पसारा आवरत घेतला की उगाचच रिकामं रिकामं वाटतं. नारायणाचं दुकान बंद झालं की उरतो हताश रिकामपणा. अंधार. अंधाराची मला भीती वाटते. अंधारापेक्षासुद्धा लांब लांब होत चाललेल्या सावल्या ज्या वेळी नाहीश्या होतात ती वेळ मला भीती घालते. म्हणूनच कदाचित तिला दिवेलागणीची वेळ म्हणत असावेत. संध्याकाळी मी घरी पोचते. दाराचा रिकाम्या घरात घुमणारा आवाज असह्य वाटतो. दिवसाउजेडी प्रकाशाने भरून गेलेला आमचा दिवाणखाना संध्याकाळी एकदम ओकाबोका वाटतो. जणू काही आम्ही तिघं राहतो तिथे. मी, तो आणि अख्ख्या घरात भिंतीएवढ्या खिडक्यांतून पसरून राहिलेला उजेड. उन्हाळ्यात मला घरी कधी एकटं वाटलं नाही कारण घर उजेडानं भरलेलं असायचं.

हल्ली वाटतं. रस्त्यावरच्या दिव्याचा चोरून खिडकीवाटे घरात शिरणारा प्रकाश पराभूत सैनिकाप्रमाणे वाटतो. त्याच्या पराभवाची छाया मग माझ्यावर पडायला लागते. तो अंधार मग माझ्यातला उत्साह शोषून घेतो. मलाही करून टाकतो निस्तेज आणि निरर्थक

मग मी काय करते? चटकन हात पाय धुते आणि देवाघराकडे जाते. अगदी निरांजनात वात लावण्याचादेखील धीर नसतो. तेव्हा असं वाटतं आधी कुणी वात लावून ठेवली असती तर? पण मग मलाच त्यातला फोलपणा जाणवतो. कारण सकाळी घाई गडबडीत पूजा करून तेवत्या निरांजनाला एकटं सोडून मीच नाही का निघून जात? घाईघाईने वात निरांजनात लावून घट्ट झालेलं तूप कसंबसं त्यात घालून काड्यापेटीने दिवा लावला की मग थोडा हायसं वाटतं.

त्या तिथे तेवत्या निरांजनासमोर देवासमोर हात जोडून एकटीनेच उभी असताना गळ्यात विलक्षण कढ दाटून येतो. कंटाळा करून आईचा ओरडा खाऊन म्हटलेलं शुभंकरोती आठवतं. शुभंकरोती नाही, आईच आठवते. लहानपणाचे दिवस आठवतात. तेव्हाही संध्याकाळी अशीच चलबिचल व्हायची मनाची. आधी आई यायची घरी मग बाबा यायचा. दिवे लागले की खूप मस्त वाटायचं. आता कुणीच येणार नसतं बराच वेळ.

देवघराच्या निरांजनासमोर प्रकाशात दिसणाऱ्या इटुकल्या पिटुकल्या देवांच्या मूर्ती पाहिल्या की स्थिर वाटतं. मग मी उगीचच अख्ख्या घरातले दिवे लावते. तरीही समाधान होत नाही, मग रेकॉर्ड प्लेयर लावते. तिथेही मारवाच लागतो. हृदय पिळवटून टाकणारे मारव्याचे सूर मला खूप आवडतात, पण त्याक्षणी असं वाटतं की नको हा मारवा. अजूनच उदास उदास करून टाकतोय मला.

मग उशीरापर्यंत मी काही बाही करत राहते, स्वैपाक, थोडी इकडली तिकडली कामं ह्यात जीव रमवत राहते. काम करता करता मन आठवणींचा खेळ खेळायला लागतं. नाजूक सोन्याच्या कड्यांनी बनवलेल्या नेकलेससारख्या एकात एक गुंफत एकमेकीचे हात धरून आठवणी फेर धरतात अगदी नवरात्रीतल्या भोंडल्यासारख्या.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई. मग एकेक पाहुणा एकेका आठवणीच्या गाडीत बसून येतो. आई येते, ओरडून जाते. बाबा येतो रडवून जातो. भाऊ येतो चिडवून जातो, मैत्रिणी येतात सुखावून जातात, नवरा येतो चिंबवून जातो. थोड्या वेळासाठी का होईना आपल्या माणसात असल्याचा आभास निर्माण होतो. कधी आजी आठवते. तिची अंगाई आठवते.

आमच्या गं दारावरनं, कुणाची गं गेली रंगीत गाडी, त्यात होती भावा बहिणींची जोडी, विनू शमा. आजीचा तो आवाज, डोळ्यात हमखास पाणी आणणारी अंगाईची चाल. सगळं सगळं आठवतं. अगदी आजीच्या कुशीत ही अंगाई ऐकल्यावर स्फुंदून स्फुंदून रडणारी मी सुद्धा आठवते.

आठवता आठवता कधी डोळा लागतो कळतंच नाही. मग रात्री थंडीने टोचून टोचून हैराण केलं की मग उठून पांघरुणात शिरायचं.

ओट्यावर केलेला स्वैपाक खाणाऱ्या तोंडाची वाट पाहत एकटा पडून राहतो. निरांजन कधीच विझलेलं असतं तेही पुन्हा कोण वात घालील, तूप घालील आणि मी प्रकाशमान होईन ह्याची वाट पाहत बसलेलं असतं. आतमध्ये विझलेली मी आणखी एका उजळ दिवसाची वाट पाहत पडून असते.

माझ्या पिटुकल्या जगात हल्ली असा वाट पाहण्याचा खेळ चालू असतो.

- संवादिनी

Thursday, April 2, 2009

जॉर्जी

काल संध्याकाळी ऑफिस सुटता सुटता जॉर्जी भेटली. तिला पाहिलं ना की मला फुलपाखराची आठवण येते. एकतर अतिशय सुंदर निळे डोळे आहेत तिचे. सोनेरी केस आणि अगदी उमललेल्या फुलासारखं टवटवीत हसणं. नाकी डोळी एकदम नीटस आणि मनाने खूप चांगली. अवखळ, मस्तीखोर पण कामातही हुशार. अशा ह्या उत्साहाच्या कारंज्याला दुष्काळानं गाठलं असं म्हणावा असा तिचा चेहरा झालेला.

बाईंचं काहीतरी बिनसलं होतं. तशा आम्ही काही फार जवळच्या नव्हे. मी इथे येऊन जेवढे दिवस झाले तेवढीच आमची ओळख. एकत्र काम करतो म्हणून झालेली. पण मग थिएटरची तिची आवड आणि माझी नाटकाची आवड असेल किंवा उगाचच निष्कारण बोलत बसण्याची सवय असेल आमची थोडीशी घसट वाढली, पण तरीही तीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मला आणि माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल तिला काहीच माहीती नव्हती. तरीसुद्धा न राहवून मी तिला विचारलंच काय झालं म्हणून.

खोटंखोटं हसून ती काही नाही कामाचा ताण आहे वगैरे बोलली. लिफ्टमधून आम्ही एकत्रच उतरलो. उतरल्यावर आमचे रस्ते वेगळे आहेत म्हणून मी तिला बाय म्हणून वळले आणि चालायला लागले. तितक्यात तिने पाठून हाक मारली. म्हणाली काय करणारेस घरी जाऊन? काही खास? म्हटलं अजिबात नाही. मला काहीही करण्यासारखं नाहीये घरी. म्हणाली चल लेटस हॅव्ह अ ड्रिंक. म्हटलं बाई, मला एखदं ड्रिंकसुद्धा झेपत नाही. मी नुसती कंपनी द्यायला येते. म्हणाली चालेल.

जवळच्याच एका कॅफेमध्ये आम्ही दोघी शिरलो. रस्त्याच्या जवळचं, काचेला खेटून असलेलं एक मस्त टेबल पकडलं. आग्रह करून करून शेवटी मला तिने एक कॉकटेल घ्यायला लावलंच. कुठल्या कुठच्या आम्ही दोघी. पण मैत्रीणीच्या अधिकाराने तिने मला आग्रह केला आणि मलाही मोडवला नाही. बराच वेळ तिथे बसलो होतो. जॉर्जी पीत होती, सिगरेट ओढत होती आणि बोलत होती.

धरणाचे दरवाजे उघडावेत आणि बदाबदा पाणी कोसळावं तसं बोलली. तिचा देश, तिचं शहर, तिची आई. घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारा बाप. दारू पिणारा, दारूच्या नशेत बायका पोरांना बडवून काढणारा. म्हटलं काय वेगळं आहे गं तुमच्या आणि आमच्या देशात? जिथे पुरुष आहे, दारूचा अतिरेक आहे, तिथे बाईचं मार खाणं आलंच. मग देश कुठलाका असेना? एकेक पाव खाऊन दिवस काढलेत तिने लहानपणी, पावाबरोबर मांसाचा तुकडा मिळाला म्हणजे एकदम मेजवानी असं काहीसं जगणं. साम्यवादाचा पगडा, मग त्यातून झालेली सुटका, मोकळा श्वास. शिकण्यासाठी लंडनला येणं, तिथून इथे येणं. किती मोठा प्रवास तिचा. मी अवाक होऊन ऐकत होते जॉर्जी बोलत होती.

वाक्या वाक्याला बापाबद्दलचा, स्वतःच्या देशाबद्दलचा राग. नको नको त्या शिव्या देणं. पण तिला थांबवण्याची ताकत माझ्यात नव्हती. आणि तिचं काय चूक होतं? मुलांच्या पावाचे पैसे दारूत उडवणाऱ्या बापाला शिव्या नाही द्यायच्या तर काय? मला माझा बाबा आठवला. एकदा मी बाबाला खूप हट्ट केला होता. मला एकदम महागातले वॉटर कलर्स हवे होते. तेव्हा आमची परिस्थिती उगाचंच पैसे फुकट घालवण्याइतकी चांगली नव्हती. पण मला नाही म्हणाला नाही तो. खरंतर साधे रंग घेऊन देता आले असते. पण दोन गोष्टींपुढे त्याला काहीही मोठं नव्हतं, एक म्हणजे कलेची जोपासना आणि दुसरं म्हणजे त्याची लाडकी मुलगी. ज्या गोष्टी सहजच मिळत जातात त्याचं कौतूक वाटत नाही हेच खरं.

बराच वेळ आम्ही बोलत होतो. संध्याकाळ सरून रात्र झाली, गाडी विषयांचे रूळ बदलत होती पण एकच समान धागा तो म्हणजे तिचा बाप. तिने मला विचारलं बाबाबद्दल. मी काय सांगणार? तिला अजून वाईट वाटेल असं मला काहीच बोलायचं नव्हतं म्हणून मी टाळंटाळ करत होते. पण तिने काढून घेतलंच माझ्याकडून.

बाबाबद्दल बोलायला लागले की मला थांबताच येत नाही, इतका त्याचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे. ती सगळं कौतूकाने ऐकून घेत होती. कुठेही असुया किंवा दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे नाही ह्याचं वाईट वाटणं दिसलं नाही. मग मीही सगळ्या आठवणी सांगितल्या तिला. बाबाच्या गमती, त्याचं पेटी वाजवणं, नाटकं. मग आई, विन्या. म्हणाली भेटलं पाहिजे सगळ्यांना. म्हटलं चल भारतात. म्हणाली नक्की.

बराच उशीर व्हायला लागला होता. उद्या ऑफिसही होतं. तिला आणि मलाही आणि जॉर्जीची अवस्था काही फार चांगली नव्हती. अजून पीत बसली तर मलाच तिला घरी पोचवायला लागलं असतं. म्हणून मीच जरा आवराआवरीची भाषा करायला लागले. तिच्याही ते लक्षात आलं, आम्ही बाहेर पडलो. मला ट्रेनने जाणं शक्य होतं पण जॉर्जीला ते जमेलसं मला वाटेना. मीच तिला टॅक्सीने जायचं सुचवलं. मी खरं सोडलं असतं तिला पण आमची घरं एकदम विरुद्ध दिशेला आहेत, म्हणून वाटूनही तसं म्हटलं नाही.

तिला टॅक्सी मिळाली आणि मला हुश्श वाटलं. तशी ती ठीकच होती. मला बहुतेक उगाचंच भीती वाटत होती. टॅक्सी निघाली आणि मी उलट्या दिशेने चालायला लागले. स्टेशन काही लांब नव्हतं. मी रस्ता क्रॉस करते न करते तोच माझ्या बाजूला एक टॅक्सी थांबली आणि चक्क जॉर्जी आतून उतरली.

शांतपणे चालत ती माझ्यापर्यंत आली. मला म्हणाली, तू ऑफिसमध्ये मला विचारलंस ना की काही प्रॉब्लेम आहे का म्हणून? आणि मी काही नाही म्हणाले. ते खोटं होतं. आज सकाळी मला माझ्या आईचा फोन आला होता, काल रात्री माझा बाप मेला. काय बोलावं हेच मला कळेना. ती एकटक माझ्याकडे बघत होती. तिच्या उजव्या डोळ्यातून एकच अश्रू गालावर ओघळला तशीच ती वळली आणि टॅक्सीत बसून गेलीसुद्धा.

उगाचंच ग्रेस आठवले आणि "ती गेली तेव्हा रिमझिम सुद्धा" घरी जाऊन पहाटेपर्यंत ऐकत बसले. कसा का असेना बाप होता. तो सुधारेल, आपल्याला वडलांचं प्रेम देईल, ही भाबडी आशा होती बहुतेक. ती काल तिच्यासाठी संपली. तो ओघळलेला एक अश्रू बहुतेक त्या दुःखाचाच होता.

एक माणूस गेला. पण नातं संपलं का? की सुंभाच्या न जळलेल्या पिळासारखं हे नातं कायमचं जॉर्जीला त्रास देत राहणार?

- संवादिनी

Thursday, March 26, 2009

नाती आणि आठवणी

खूप खूप दमलेय.

आताच ऑफिसमधून परत आले. कामाचा व्याप विलक्षण वाढलाय अचानक. दिवसभर मीटिंगच मीटिंग चालल्यात. पण त्यात एक विलक्षण आनंद आहे. आपण केलेलं काम कुणालातरी आवडतंय. आपलं काही महत्त्व आहे आपल्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी जरी अहं सुखावणाऱ्या असल्या तरी हव्या हव्याशा आहेत. गंमत आहे. काम खूप वाढल्याचा त्रास आहे, पण आपण महत्त्वाचे आहोत ह्याचं समाधान आहे. आपल्या चाकरांना ते महत्त्वाचे आहेत असं भासवून किती मालकांनी आपापले खिसे भरले असतील कुणास ठाऊक.

असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहोंचा व्हिसा लवकरच येईल. तसं आमच्या ऑफिसमधे त्यांनी कळवलंय. इतकी वाट कोणत्याही गोष्टीची पाहिली नव्हती, तितकी ह्या व्हिसाची पाहिली. तसा मला येऊन जास्त वेळ झाला नाहीये. लग्न व्हायच्या आधीही मी इथेच होते कित्येक दिवस, पण आता तो सतत जवळ असावा असं वाटतं. एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिरल्याने एवढा फरक पडावा?

काल एक गंमत झाली. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेले होते. कानाला गाणं चाललं होतं. काय झालं कुणास ठाऊक, एकदम कशात तरी पाय अडखळला आणि धम्मकन पडले. समोरून एक मुलगा धावत चालला होता. तो पटकन आला, उठायला मदत वगैरे केली. खरं मला काही लागलं नव्हतं, पण असं कुणासमोर धसमुसळेपण केल्यानं फारच एंबॅरॅसिंग झालं. मुलगा छान होता. उंचापुरा, देखणा. म्हटलं चला, एवढं पडले ते अगदीच फुकट नाही गेलं. बाई पुरे, लग्न झालंय आपलं. पण खरं सांगायचं तर लग्न झालं म्हणून आजूबाजूची देखणी मुलं काय कमी देखणी होतात का? पण नात्यांची लेबलं लागली की मग त्यांचे कायदे येतात. आणि त्या कायद्यांची पण मोठी गंमत आहे. तुमच्या मनात काही चुकीचं असो किंवा नसो. त्यातून काही चुकीचे संकेत गेले तरी तुम्ही अट्टल गुन्हेगार ठरता.

नवऱ्याशी बोलत होते. त्याला सांगितलं हे. त्याला म्हटलं, तू लग्न झालं म्हणून इतर पोरी बाळींकडे बघायचं सोडलंस का? तर म्हणाला खरं सांगायचं तर प्रयत्न केला, पण एखादी चांगली पोरगी दिसली की बघितलं जातंच. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त बघणारंच असशील तर. आणि तुलाही नको, मी कुणाला बघितलं तर. हो म्हणाला. तसा समजूतदार आहे.

विन्या दुबईला चाललाय. एक दिवस सटाक त्याचा फोन आला. म्हणाला ताई मी चाललो दुबईला. त्याला काही बोलून दाखवलं नाही, पण मनातून मला वाईटच वाटलं. एकतर सध्याच्या परिस्थितीत लोकं दुबईवरून पळ काढतायत असं बातम्यांत ऐकतेय आणि हा तिथे कशाला तडमडायला चाललाय असं वाटलं. पण आले विनोबांच्या मना तेथे कोणाचे चालेना, अशी त्याने स्वतः तयार केलेली म्हण आहे, त्यामुळे तो जाणार म्हणजे जाणार.

पण त्याहीपेक्षा आता आई बाबा अजून एकटे होणार ह्याचं जास्त वाईट वाटलं. मुलगी लग्न होऊन गेली की ती दुसऱ्याची झाली आणि मुलगा परदेशी निघून गेला तर? आपला असूनसुद्धा जवळ नाहीच ना. हा विचार मनात आला आणि लगेच वाटलं की मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर काय वेगळं करतेय? माझ्यामुळे त्यांचा मुलगा देश सोडून चाललाच आहे ना? असो, आई बाबांचं दुःख जास्त बोचतं मनाला. सासू सासऱ्यांचं तितकंसं नाही. प्रॉब्लेम एकंच पण नातं बदललं की त्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलतो बघा.

घरी फोन केला मग. बाबा नव्हता. आईशीच बोलले. अख्खा वेळ तिचं विनोबा आख्यान चाललं होतं. कौतुकंच करत होती त्याचं. पण आमच्या आईला ना, मनात असेल तरी सांगता येणार नाही की तो जातोय ते तिला नाही आवडत आहे. आणि हेही तितकंच खरं की कितीही प्रयत्न केला तरी तिला ते लपवता येणार नाही. आम्हा दोघांच्यात विन्या तिचा जास्त लाडका. आणि बाबाची मी. दिसायला तो डिट्टो आईसारखा आणि मी डिट्टो बाबासारखी. राहून राहून मला जुने दिवस आठवत राहिले. जुन्या मैफिली घरगुती आठवल्या.

दिवस निघून जातात पण आपल्या मनावर आठवणी कायमचे कोरून जातात. त्यांना आठवून आपल्याला खूप आनंद होतो, जेव्हा त्या घटना परत घडणं सहज शक्य असतं. पण एकदा का पुनरावृत्तीच्या शक्यता विरळ व्हायला लागल्या की मात्र त्याच आठवणी डोळ्यात रडू आणतात.

नात्यांचे संदर्भ आणि आठवणी ह्यांचंही काही नातं असेल का?

- संवादिनी

Thursday, March 19, 2009

शोध

स्वतःच्या घरी शिफ्ट झाले.

स्वतःच्या म्हणजे भाड्याच्या. पण तरीही हॉटेलात राहण्यापेक्षा चांगलंच आहे की. अर्थात साप सफाई वगैरे अंगावर पडणार पण ते ठिके. तिथे राहून राहून भयंकर कंटाळा आला होता. अपार्टमेंट चांगला असला तरीदेखील, घर ते घर आणि हॉटेल ते हॉटेल. आता काही महिने तरी इथून हालणार नाही. अर्थात नवरा आल्यावर जागा बघितल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं पण तोपर्यंत कंपनी मला हॉटेलमध्ये ठेवायला तयार नव्हती. शेवटी मला आधीच घर बघून शिफ्ट व्हावं लागलं.

अगदी दहा दिवसात घर मिळालंसुद्धा. गेल्या आठवड्यात दोन तीन जागा पाहिल्या होत्या. पण ही जागा अगदी मनासारखी होती. एकमजली घर आहे. खाली किचन आणि बैठकीची खोली आणि वरच्या मजल्यावर दोन बेडरूम्स आणि बाथरुम, टॉयलेट वगैरे. एका बेडरूमला छान बाल्कनी आहे. खाली व्हरांडा आहे. तिथे काही खुर्च्या आणि टेबल आहे. घरात काहीही फर्निचर नाही. अजून मी काही घेतलंही नाहीये. भारतातून येताना काही भांडी आणली होती तेवढीच आणि बाबाने मला पुण्याला जाताना घेऊन दिलेला लॅपटॉप सोडला तर काहीच नाही.

पण घर एकदम सही आहे. भरपूर उजेड. ऐसपैस जागा, हीटर, एसी, गरम पाण्याची सोय. आणखी काय पाहिजे? हा पाहिजे की. मी एकटी काय करणार इथे? अहो लवकर पोचले तर बरं होईल. मग मजा येईल. सोसायटीच्या आवारातंच झाडं गिडं आहेत. शिवाय स्विमिंग पूलही आहे. त्याला पोहता येत नाही. मी त्याला शिकवणारे. त्याला आधीच सांगून ठेवलंय.

ज्या दिवशी चावी घेतली त्या दिवशी एकटीला एकदम विचित्र वाटत होतं त्या रिकाम्या घरात. शेवटी लॅपटॉपवर गाणी लावली आणि ऐकत बसले. आवाजाने घर भरल्यावर जरा बरं वाटलं. होतं ते सगळं सामान नीट लावलं. बॅगा रिकाम्या केल्या. कपडे कपाटात व्यवस्थित लावून ठेवले. एकदम असं घरगुती झाल्यासारखं वाटलं. एक क्षण मनात आलं असंच राहावं. म्हणजे हाऊस वाइफ. घर नेटकं ठेवावं, आपलं गाणं गिणं करावं आणि बाहेरच्या लढाईची जबाबदारी नवऱ्यावर टाकावी. दुसऱ्याच क्षणाला तो विचार झटकून टाकला. ऑफिसमधून बॉसचा फोन आला. ताबडतोब बोलावलं. मी ऑन कॉल होते, पण ऑफिसमध्ये जायचा अजिबात मूड नव्हता पण जावंच लागलं. दोन क्षणापूर्वीच्या स्वप्नातल्या हाऊस वाइफ स्वप्नातच राहिल्या.

हे म्हणजे खरं माझं घर असल्यासारखं वाटतं. लग्न झाल्यावर गेले ते त्याच्या घरी. पण हे घर ना त्याचं ना माझं. आमच्या दोघांचं आहे. दोघांची नवी सुरुवात. म्हणून काही फर्निचरही घेणार नाहीये तो येईपर्यंत. आला की दोघं मिळून घेऊ. मी घेतलं तर त्याला आवडणार नाही असं नाही, पण घरटं दोघांनी बांधलं तर जास्त मजा येईल. अर्थात माझ्या दुकानांच्या वाऱ्या सुरू झालेल्या आहेत.

काही गोष्टी खूप आवडल्यात. पण जे आवडतंय ते सगळं खिशाच्या पालीकडलं आहे. जे स्वस्त आहे ते चांगलं नाहीये. बघूया सध्या तरी फक्त एक मॅट्रेस घेतली आहे. ती जमिनीवर घातली आहे. उशा, हंतरूण, पांघरूण मी घेऊन आले होते भारतातून. त्यामुळे सध्या एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच माझं जीवनमान आहे.

घरी फोन केला तेव्हा हे सगळं आईला सांगितलं. तिचं लगेच सुरू झालं. नीट विचार करून सगळं घे. एकदा घेतलं की बदलता येत नाही काही वर्ष. नवऱ्याला सगळं विचारून घे. उगाच महागाचं घेऊ नको. तुला सवय आहे खर्चीक गोष्टी घ्यायची वगैरे वगैरे. असं सुरू झालं की बाबा पॉलिसी अंगिकारायची. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तसंच केलं. सगळ्याला हो, बरं, हो बरं म्हणत संपवलं.

आईला कोण समजावणार? आमची काळजी करण्यात तिचं अख्खं आयुष्य गेलं, त्यामुळे तिचा अधिकारही आहे तो.

बाबाशी मात्र खूप गप्पा मारल्या. तो कुठल्याशा कार्यक्रमाला गेला होता त्याचा सगळा रिपोर्ट दिला. म्हणाला गाणं सोडू नकोस. एकवेळ जेवण विसरलीस तरी चालेल पण रियाज विसरू नको. मी काय सांगणार त्याला? दोन आठवड्यात तंबोरा लावला सुद्धा नाही म्हणून?

लग्न झाल्यापासून एक गोष्ट जाणवतेय. आई बाबा, विन्या यांच्या मनात मी अजून तीच आहे, पुण्याला जायच्या आधीची, घर सोडायच्या आधीची, धडपडी, सतत कशात ना कशात गुंतलेली. ऑफिसातून थेट सुटून नाटकाच्या तालमी करून आल्यावर कितीही दमली असली तरी थोडा का होईना रियाज करणारी. मनातली प्रत्येक गोष्ट घरी बोलून दाखवणारी. खळखळून हसणारी आणि भडभडा रडणारी. पण आता जाणवतंय, की मी किती बदललेय.

घराचा शोध आता संपला, आता स्वतःचा शोध पुन्हा घ्यायला हवा.

- संवादिनी

Thursday, March 12, 2009

न पाहिलेला ऑपेरा

बरेच दिवस मनात एक विचार घोळत होता. ऑपेरा बघायचा होता. आधी कंपनी नाही म्हणून आणि मग वेळ नाही म्हणून चालढकल केली. खरी गोम तर वेगळीच होती. अजूनही बिझनेस व्हीसा वर असल्याने कंपनीच्या अलावन्स वरच भागवावं लागत होतं. तो काही विशेष नव्हता. जरी घराचं भाडं कंपनी देत असली तरी बाकी सगळा खर्च आमचा आम्हालाच करायचा होता. त्यासाठी अलावन्स पुरेसा होता पण एकदम तीन दिवसाचा अलावन्स ऑपेरावर खर्च करावा इतकीही माझी परिस्थिती चांगली नव्हती. वर्क परमिट होईपर्यंत कळ काढणं आवश्यक होतं. मग इथेच पगार मिळाला असता आणि खर्चावरची बंधनं थोडीशी सैल झाली असती.

दरम्यानच्या काळात आमच्या टीममध्ये एक रोमानिअन मुलगी सामील झाली. जॉर्जिना तिचं नाव. तर ह्या जॉर्जला पण थिएटर ची प्रचंड आवड. बोलता बोलता मी तिला म्हटलं की मलाही एकदा ऑपेराला जायचंय. अगदी पिटातलं तिकिट काढलं तरी चालेल. ती म्हणाली चांगला ऑपेरा बघायचा असेल तर पिटातल्या तिकिटात पूर्ण स्टेज दिसत नाही. म्हणजे पुढची तिकिटं काढणं आलं, अर्थात पूर्ण पैसे भरावे लागणार.

आमच्या कंपनीचा वेळकाढूपणा इतका होता की शेवटी मी डेली अलावन्स मधली पंचवीस टक्के रक्कम ऑपेरासाठी बाजूला काढायला लागले. दोन आठवड्यात मला पाहिजे तेवढे पैसे जमणार होते म्हणून मी जॉर्जीला सांगून टाकलं की आपण ऑपेराला जाऊया. एका शनिवारची तारीखही ठरली. तिने ऑफिसमधल्या अजून सात-आठ गोऱ्यांना जमवलं. आपले लोक खर्च करण्याच्या बाबतीत मागे असल्याने देशी कुणीच नव्हतं. पुढच्या शनिवारचं तिकीट असल्याने सोमवारी ते काढायचं असं ठरलं आणि पैसेपण सोमवारी जॉर्जीकडे द्यायचे असं ठरलं.

पुढच्या विकेंडला ऑपेरा बघायला मिळणार ह्या आनंदातच शुक्रवारी घरी पोचले. नेहमीची विकेंड दंगामस्ती चालू होती. झोपणे, जेवण बनवणे आणि जेवणे ह्यात शनिवार कसा निघून गेला ते कळलंच नाही. रविवारी उशीरा उठून टीव्ही लावून बसले तर बातम्या लागलेल्या.

न भूतो न भविष्यती अशी आग शेजारच्या राज्यात लागलेली. जंगलंच्या जंगलं जळून खाक झाली. साडेसातशे घरं जळून गेलेली. सव्वाशेच्या आसपास माणूस मारला गेलेला. एकदम सुन्न झाले. रडणाऱ्या लोकांचे चेहरे पाहून मलाच रडू यायला लागलेलं. एवढा संपन्न देश. प्रगत प्रगत म्हणून मिरवणारा पण वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या वणव्याला काही रोखता आलं नाही. बऱ्याच लोकांना आग लागलेय हेच समजलं नाही आणि त्यांची घरं त्यांच्यासकट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्यांना पळता आलं ते पळाले, पण नेसत्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं. आईविना मुलं, मुलं शोधणारी आई, कुणाचं कोण अजून दिसलं नव्हतं, पत्ता लागत नव्हता. निसर्गाचा कोप दुसरं काय?

चटकन मला देश आठवला. देशावर आलेली संकटं. मुंबईचा सव्वीस जुलैचा पाऊस, त्सुनामी, लातूरचा भूकंप. अगदी सगळं सगळं डोळ्यासमोर आलं. लातूरच्या वेळी तर अगदी डबे घेऊन फिरले होते तेपण आठवलं. दुःख आणि अश्रू ह्यांना देशांच्या सीमारेषा समजतंच नाहीत आणि निसर्गालाही. कोण प्रगत, कोण अप्रगत असला विचार निसर्ग कधीच करत नाही, सगळ्यांना सारखाच न्याय.

त्या सुन्न वातावरणातच रविवार निघून गेला. सोमवारी सकाळी नेहमीसारखी ऑफिसात पोचले. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे एफ्. एम. चालू होता. बातम्या येत होत्या, मृतांचे आकडे, नुकसानीचे आकडे वाढत होते, मदतीसाठी फोन नंबर सांगितले जात होते, वेबसाइट सांगत होते. एकदम डोकं भणभणायला लागलं, तिथून पळून जावं असं वाटायला लागलं. आपण किती असहाय असतो ह्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

थोड्या वेळाने जॉर्जी आली. तिच्या बोलण्याचा विषयही हाच. जाता जाता म्हणाली अगं तू ऑपेरा चे पैसे ट्रान्स्फर केलेस का? मला बहुतेक ह्यावेळी नाही जमणार. पुढच्या महिन्यात एखाद्या छानशा ऑपेराला जाऊया. तुम्ही जा माझ्याशिवाय. जॉर्जी नाराज झाली. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.
पंधरा दिवस ऑपेरासाठी साठवलेले पैसे घेऊन मी रेडक्रॉसच्या काउंटरला गेले. मला नव्हता ऑपेरा बघायला मिळणार ह्या आठवड्यात पण कुणालातरी त्या पैशाचा माझ्यापेक्षा जास्त, खूप जास्त उपयोग होणार होता. म्हणून ते पैसे देऊन टाकले.

आजपासून परत साठवायला सुरवात केलीय.

- संवादिनी

Thursday, March 5, 2009

स्वप्नांच्या गावा

हल्ली भन्नाट स्वप्न पडायला लागलीत.

भन्नाट म्हणजे भन्नाटंच. मला वाटतं आपण जितका अधिक विचार करतो तितकी स्वप्न जास्त आणि मनोरंजक पडत असावीत. आता माझंच बघा. मला कधी म्हणजे कधी स्वप्न पडायची नाहीत. रात्री बिछान्यावर पडल्यावर डोळा लागला की सकाळी आईची कातावलेली दुसरी किंवा तिसरी हाक ऐकू येईपर्यंत काहीही कळत नसे. झोपणे ही आयुष्यातली एकमेव आनंददायक घटना असायची, कारण दिवस सगळा कामात जायचा. ऑफिस आणि काही अंगावर घेतलेल्या तर बऱ्याचशा अंगावर पडलेल्या अनंत ऍक्टिव्हीटीज. जीव इतका दमून जायचा की झोपायचा जो वेळ आहे तो स्वप्नातही फुकट घालवायची कल्पना मी कधी केली नव्हती.

पण सध्या सगळाच आनंदी आनंद गडे आहे. काम यथा तथाच आहे. गोऱ्यांच्या देशात जर मला सर्वाधिक काही आवडत असेल तर कामाच्या वेळा. आठ म्हणजे आठला हजर आणि पाच म्हणजे पाचाला फुटास्को. त्यातही डोक्यावर कामाचा डोंगर आहे असं नाही. सगळ्या प्रकारचा वेळकाढूपणा केल्यावरही काम संपवायला भरपूर वेळ असतो. चकाट्या पिटायला ऑफिसात कोणी नाही, अपार्टमेंटवर एकटीच. मग करायचं काय? टी. व्ही? मला फारसा आवडत नाही. मग काय करायचं? विचार करायचा. कशाचा? कशाचाही? अगदी रस्त्यावरून चाललेल्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय इथपासून सेम दिसणाऱ्या गाड्यांच्या किमतीत इतका फरक का पडतो इथपर्यंत काहीही.

मूळ लिहायचं होतं ते राहिलंच. तर स्वप्न पडतात. आणि त्याची आठवण का झाली तर कुणीतरी मला एक ऑनलाईन सर्व्हे पाठवला, स्वप्नांवरती. त्यात एक प्रश्न होता तुम्हाला कुणाची स्वप्न पडावीशी वाटतात? उत्तर, नवऱ्याची. तुम्हाला त्या व्यक्तीची स्वप्न पडतात का? उत्तर, अजिबात नाही. आपल्याला हवी ती स्वप्न का नाही पडू शकत आपल्याला? काही गोष्टी सत्यात शक्य नसतात स्वप्नात तरी व्हाव्यात की नाही?

आता माला वाटतं माझ्या नवऱ्याने माझ्या गाण्याचं कौतुक करावं. पण आमचे साहेब आलाप सुरू झाले की जांभया द्यायला लागतात. आता गेलाबाजार पडलं एखादं स्वप्न की ज्यात मी जोरजोरात गातेय आणि साहेब मनापासून दाद देतायत तर काय हरकत आहे? पण असलं काहीही स्वप्न न पडता मला काय स्वप्न पडावं?

मला ऑफिसला जायला उशीर झालाय मी धावत पळत माझ्या अपार्टमेंटमधून बाहेर पडते तर लिफ्ट बंद मग एवढे प्रचंड मजले उतरून खाली येते तर आपली मुंबईतली पिवळी काळी टॅक्सी उभी. (मुळात माझं ऑफिस पाच मिनिटावर चालत आणि तीन मिनिटांवर धावत असताना मी टॅक्सी का घेते हा वेगळा प्रश्न झाला) टॅक्सीवाला चक्क भाड्याला नाही म्हणतो. काहीच वाहन मिळत नसल्याने टेन्शन वाढ वाढ वाढतं. घामाघूम होते मी आणि ढँटडँ..... जाग येते.

ह्याला काही अर्थ आहे का? अजून एक आठवणारं स्वप्न म्हणजे मी बारमध्ये (मी आणि बारमधे? ) पंजाबी ड्रेस घालून एक पेय (कोणतं ते कळत नाही) पीत बसलेय. आणि काहीही करत नाहीये. पेय पितेय संपलं की रिफिल. बस.

पण सगळ्यात भन्नाट स्वप्न पडतायत ती भुतांची. ती मात्र पडली की मग झोप लागत नाही मग डोक्यावर पांघरूण घेऊन उशीखाली डोकं खुपसून रामरक्षा म्हणायला लागते झोप येईपर्यंत. इथले काही हॉरर कार्यक्रम बघितल्याचा परिणाम असेल. आणि एकटी असल्याने भीती अजून वाटते. मग उगाचच कोपऱ्यातलं रोपटं रात्रीच्या अंधारात कुणाच्यातरी नखं वाढलेल्या लांब हातासारखं दिसतं. किंवा वाऱ्याचा आवाज भुताच्या श्वासासारखा वाटतो. मग रामरक्षा आणि अजून रामरक्षा आणि अजून अजून रामरक्षा. रामाला लवकरच माझा कंटाळा येणारे.

कशी पडत असतील स्वप्न? मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणावं तर माझ्या मनी न वसणाऱ्यांचीच स्वप्न मला जास्त पडतात. ज्याला आपण घाबरतो त्याची स्वप्न पडावी तर थोडंफार खरं आहे.

हे सगळं लिहिताना एकदम आजीची आठवण झाली. आजी म्हणजे बाबाची आई. ती कधीच देवाघरी गेली. स्पष्ट आठवतंय ती एकदा सांगतानाचं, तिच्या स्वप्नाबद्दल. म्हणाली होती की एक खूप छान स्वप्न पडलं. डोंगर होते, दऱ्या होत्या, नद्या होत्या, डोंगरावरचे पांढरे शुभ्र ढग, त्यांच्या पाठचं निळं आकाश, हिरवे डोंगर, त्यातून वाहणारं नदीचं पाणी. मग म्हणाली मी जिथे उभी होते तिथे खूप फुलं होती. वेगवेगळ्या रंगांची आणि त्याला इतका छान वास येत होता. मग म्हणाली अजून तो वास मनात दरवळतोय.

इतकं छान स्वप्न? अगदी टुडी नाही थ्रीडी नाही फोरडी स्वप्न पडलं तिला. असं मला का पडू नये? फार कुठे बाहेर न पडलेल्या माझ्या आजीला स्वित्झरलंड ची स्वप्न पडावीत आणि तिथे प्रत्यक्ष जाऊन आलेल्या मला त्याच्या जवळपासचही काही दिसू नये, असं का व्हावं? की ही एक प्रकारची क्रिएटिव्हीटी आहे. तिची कंस्ट्रक्टिव्ह असेल, माझी कदाचित डिस्ट्रक्टिव्ह किंवा न्युट्रल असेल.

कुणी सांगावं?

- संवादिनी