Monday, December 13, 2010

सई

घड्याळाच्या काट्याची टिकटिक. कधीपासून चाललेली. सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले. त्याची टिकटिक असंबद्ध चाललेली. घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत, गेलेल्या एकेक सेकंदाचा हिशेब मांडत बसलेल्या.

तिचं आणि माझं नातंच असं होतं. नातं होतं हे खरंच. त्याला नाव होतं हेही खरंच. पण तरीही ते कधी उलगडलं नव्हतं. कदाचित मला ते उलगडल्याचा आभास निर्माण झाला होता. तलवारीसारखं हे नातं. एका बाजूला मूठ, दुसऱ्या बाजूला धारधार पातं. आयुष्यभर ह्या नात्याची मूठ पकडून मी बसलेले. पातं धरायला लागलं की मुठीत असताना वाटलेली संरक्षक तलवार संहारक वाटायला लागते. तसंच आमचं नातंही. मला कळलेलं पण न कळलेलंही.

आम्ही दोघी अगदी जीवश्च, कंठश्च मैत्रिणी. कशी झाली मैत्री? कुठे झाली? केव्हा झाली? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत असंही मला कधी वाटलं नाही. तिला वाटलं असेल, नसेल, कल्पना नाही. पण मैत्रिणींनी एकमेकींना द्यायचे सगळे ताप, मनस्ताप आम्ही एकमेकींना दिलेले. कधी तिचा रागही आलेला. तिलाही माझा नक्कीच आला असेल. माझा आनंद तिचा होता, माझी दुःख तिची होती, माझं घर, माझी माणसं सगळी सगळी तिचीही होती. तिचं घर, तिची माणसं सगळी सगळी माझी होती. तिचा विचार माझा होता. माझी असणं तिचं होतं आणि तिचं असणं माझं होतं.

तिला आवडेल ते न आवडूनही मी खायचं आणि मला आवडेल ते न आवडूनही तिनं खायचं. मला गाणं आवडतं, म्हणून ते तिलाही आवडावं हा माझा हट्ट. मग तासंतास चांगलं चुंगलं गाणं तिला ऐकावंच लागायचं. तिला आवडायचं की नाही कोण जाणे. पण ऐकायची बिचारी.

कुणी सांगे, ती फार स्वप्नाळू आहे. असेलही. तिचं जग आपल्या जगापेक्षा खूप वेगळं होतं. तिथं ती तिच्या मर्जीची मालकीण होती. वाटेल तसं जागावं, वाटेल तेव्हा झोपावं, वाटेल ती स्वप्न बघावीत. तिच्यामुळे कदाचित मीही स्वप्नाळू झाले. माझी स्वप्न तिची झाली, तिची स्वप्न माझी झाली.

सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले, दिवस गेले, महिने गेले. तिची आणि माझी मैत्री अधिकच घट्ट होत गेली. पण तरीही घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत. मध्यरात्रीच्या चंद्रानं आम्हाला बेभान केलं की उधाणाच्या भरतीच्या लाटा किनाऱ्यावर फुटाव्यात तशा वेदनेच्या लाटा शरीरावर झेलताना आम्हा दोघींचा आणि काळाचा संपर्क तुटला कोण जाणे. किती वेळ तसाच गेला कळलंच नाही. चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात आम्ही फिरत राहिलो. वेड लागायची पाळी आलेली, पण तरीही तेव्हा पुसटसा अभिमन्यू आठवला. चक्रव्यूहातून बाहेर न पडणारा. एक क्षण डोळ्यात पाणी आलं. पण दुसऱ्याच क्षणी मनानं आणि शरीरानंही, तिच्या आणि माझ्याही, अभिमन्यू व्हायचं नाकारलं. चक्रव्यूह फुटलं.

सुटका झाली तशी ती बेंबीच्या देठापासून ओरडायला लागली. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. कुणीतरी तिचा इवलासा देह माझ्या छातीवर आणून ठेवला.

घड्याळाची टिकटिक पुन्हा जाणवली. आता कसलाही हिशेब मांडायचा नव्हता.

Tuesday, September 14, 2010

कालच्या आईची आजची आई

ह्यावेळी गणपतीची वेगळीच मज्जा झाली. बाबा तिथे आणि आई इथे माझ्यासोबत. बाबानी उकडीच्या मोदकापासून सगळं काही स्वतः बनवलं. त्याची प्रॅक्टिस म्हणून बरेच वेळा उकडीचे मोदक बनवले. बऱ्याच वेळा फसले पण करून करून जमले एकदाचे. बाबाला म्हटलं फोटो काढून ठेव आणि किचनमध्ये लाव. लोकं कसे आपण मारलेल्या प्राण्यांच्या तोंडाची ट्रॉफी करून दिवाणखान्यात लावतात तसं.

मोदक करणे म्हणजे काय प्रकरण आहे हे मी गेली दोन वर्ष अनुभवतेय. कधी खोबरं जास्त तर कधी गूळ कमी. त्यात इथे मोदकांचं स्पेशल पीठ मिळत नाही त्यामुळे कव्हरपण हवं तसं होत नाही, अशी अनेक कारणं मी मोदक चांगले न होण्यासाठी देत आलेली आहे. पण ह्या वर्षी त्याच फ्रोजन कोकोनट आणि तांदळाच्या पिठाचे आईने मोदक केले. आईच्या हातची चव वेगळीच. काहीही साहित्य असूदे, मोदक चांगलेच होणार.

मला खूप वाईट वाटत होतं आईला इथे बोलावून घेताना. गणपती आणि बाबा घरी एकटा, हे काही बरोबर नव्हतं पण गणपतीपर्यंत आईचं इथे येणं पुढं ढकलणंही शक्य नव्हतं. पण गुरवारी रात्री श्रीमंत विनोबा घरी हजर. रविवारी सुटी टाकली त्याने. शुक्रवार शनिवार तशीही सुटी असतेच त्याला. बाबाला एकदम सरप्राइज दिलं त्यानं. तो बिलकुल मॅच्युअर्ड नाही असं माझं आपलं पक्कं मत. पण कधीतरी अशा गरजेच्या वेळी एकदम शहाण्या बाळासारखा कुठूनतरी उपटतो, म्हणून त्याचं कौतुकही वाटतं. त्याच्या उभ्या आयुष्यात, मी त्याच्या केलेल्या, एका हातावर मोजता येण्याइतक्या, कौतुकांपैकी हे एक.

दुपारी मी आणि आई इथल्या वुलवर्थमध्ये जाणार होतो. वुलवर्थ म्हणजे इथलं आमचं लाडकं वाण्याचं दुकान उर्फ सुपरमार्केट. पण दुपारी मला थोडं बरं वाटत नव्हतं. आई म्हणाली की बरं नसेल वाटत तर अजिबात यायचं नाही. मी जाते म्हणून. आधी मी नाहीच म्हणत होते मी. कारण तशी एकटी ती इथे फिरली नाहीये. इंग्रजीचा तिचा बिलकुल प्रॉब्लेम नाहीये पण हे लोकं काय बोलतात ते भारतातल्या अट्टल इंग्रजाच्याही डोक्यावरून जाऊ शकतं. वर तिला एकटीला तिथे जाणं जमेल का, बरोबर वस्तू कुठून उचलायच्या हे समजेल का? मग बरोबर बाहेर येऊन पिशव्या हातावर वागवत एवढं चालत ती येईल का? ह्या प्रश्नांनी हैराण झाले. तरी तिनं हट्टच मांडला. मग तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या. पुन्हा पुन्हा दिल्या. शेवटी एकदाची ती एकटी गेली आणि ती येईपर्यंत माझ्या जीवाला घोर.

ती गेली आणि मला माझीच मी आठवले. कॉलेजची परीक्षा असेल किंवा सीएची असेल, पण घरातून बाहेर पडेपर्यंत आईच्या सूचना चालू असायच्या. पेनं घेतलीस ना? पट्टी घेतलीस ना? शांतपणे पेपर लिही. स्कूटर हळू चालव. सिग्नल्सकडे लक्ष दे. पहिले सगळा पेपर वाच, मग उत्तरं लिही. मग मी आईला म्हणायचे, आई मला कळतंय, उगाच टेन्शन देऊ नकोस. मग बिचारी गप्प बसायची आणि मग मी घरी येईपर्यंत तिची उलाघाल चालू असायची. पेपर चांगला गेला असं मी तिला सांगेपर्यंत तिचं कशात लक्ष लागायचं नाही.

गंमतच वाटली. काळ बदलला, स्थळ बदललं की माणसांचे रोल्सही बदलतात. ती मला जसं सगळं पुन्हा पुन्हा सांगायची तसंच मी तिला सांगत राहिले. मी येईपर्यंत तिला जशी काळजी वाटायची तशीच ती येईपर्यंत मला वाटत राहिली. काल मुंबईत मी मुलीच्या रोलमध्ये होते आज इथे मी तिची आई असल्यासारखी वागले.

Tuesday, July 13, 2010

पारिजात

अंगणी पारिजात फुलला

बहर तयाचा, काय माझीया, प्रीतीला आला

अंगणी पारिजात फुलला

Thursday, May 13, 2010

मोहर

बोडक्या डोंगराच्या भरल्या कपाळावर
उभा होता एक खट्याळ आंबा

पानाची हिरवाई होती, मातीची माया होती
समोर आमराई होती, ढगांची छाया होती

आंबा आपला मस्तीत होता एकटाच गाणं म्हणत
उंचीच्या धुंदीतलं आंधळं जिणं जगत

लहानगा आंबा झाला आता मोठा
डोळे उघडले तसा पैसा झाला खोटा

आमराई कधी बहरली त्याला कळलीच नाही
चैत्र सरून गेला तरी मोहर उमललाच नाही

Thursday, October 8, 2009

अपूर्ण

सध्या इथे छान हवा आहे. ना धड उन्हाळा, ना धड थंडी. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा. पानगळ होऊन फांद्यांचे सांगाडे उरलेल्या झाडांना पुन्हा नवी पालवी फुटायला लागली आहे. पुन्हा एक नवा उभार, पुन्हा एक नवा उत्साह आणि मग पुन्हा एक पानगळ. निसर्गाचं चक्र पूर्ण फिरलेलं इथे पहिल्यानेच पाहतेय. उन्हाला अजून नकोसा उष्मा चिकटला नाहीये आणि वाऱ्याला आलेली बोचरी धार बोथट होत चालली आहे. कधी मध्येच सदासर्वदा अंगात अडकवलेला स्वेटर बाजूला फेकून जरा मोकळ्या ढाकळ्या कपड्यात बाहेर जायचा उत्साह वाटायला लागलाय.

झापड लावून कॅलेंडरवरचे दिवस ढकलणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही निसर्गातला हा बदल इतका जाणवावा तर पशू पक्ष्यांची काय कथा? हल्ली सकाळी उठले की खिडकीबाहेर ऊन खात पडलेल्या बागेचं दर्शन होतं. आमच्या घराच्या बाहेरच रस्त्यावर एक मोठं झाड आहे. आणि झाडावर ह्या ना त्या पक्ष्यांचा अड्डा नेहमीच बसलेला.

इथले कावळ्यासारखे दिसणारे पण काळे पांढरे मॅग्पाय पक्षी फार. कधी पोपटासारखे रंगीबेरंगी पक्षी. कधी गवतातले किडे खात लॉनवर इथून तिथे फिरणाऱ्या टिटव्या, तर कधी कबुतराच्या कुळातले वाटणारे काही पक्षी झाडावर हमखास ठेवलेले. बऱ्याच दिवसांनी सगळी नातवंड एकत्र घरी आली की आमचे आजो (म्हणजे आजोबा) व्हायचे तसं वाटतं ह्या झाडाकडे बघून. अगदी अंजारून गोंजारून सगळ्यांना आपल्या फांद्यांवर खेळवतं ते झाड. बाहेर जाताना किंवा बाहेरून येताना उगाचच हात त्या झाडाला लागतात. आपलं काही मिळाल्याचा आनंद होतो.

तर हल्ली सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग येते. मग दात घासायच्याही आधी आमच्या ह्या अजोबाचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आज कोण कोण आलंय ते पाहिलं की मग दिवसाची सुरुवात काय मस्त होते. गेले काही दिवस मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत कुठे तरी हरवून गेल्यासारखं वाटलं. म्हणजे कधी कधी गाणं चालू असताना तबला उतरल्यावर कसा बेसुरा वाटतो, तसंच.

घरून काम करण्याचा एक फायदा म्हणजे हवं तिथे बसून काम करता येतं. मी हल्ली मुद्दामच झाडाच्या समोरच्या खिडकीत जाऊन बसते. दुनयाभरच्या आकडेमोडीने आणि मेलामेलीने डोकं विटलं की पटकन समोर आजोबा नातवंडांचा निर्व्याज खेळ पाहता येतो. परवा अशीच बसले होते तर एक गोष्ट लक्षात आली. झाडावर फक्त मॅग्पाइज होते. बाकी सगळे पक्षी एकतर लॉनवर नाहीतर शेजारच्या झाडावर होते. पहिल्याने वाटलं हवाबदलासाठी दुसरीकडे बसले असतील. मग लक्षात आलं मामला थोडा गंभीर होता.

झाडाच्या बेचक्यांत घरट्यासारखं काही दिसलं. दुर्बीण काढून बघितलं तर होयकी, मॅग्पाइजनी चक्क घरटं बांधलं होतं. इतर सर्व पक्ष्यांना आजोबांवरून त्यांनीच उडवलं होतं. त्यांच्याच दादागिरीमुळे किलबिलाटातलं संगीत वगैरे हरवून बसलं होतं. आता काय नवीनच चाळा लागला. घरटं बघत राहणं आणि काही विशेष घडतंय का ते पाहणं.

एक दोन दिवस असेच गेले. मी बाहेरून घरी येत होते आणि नेहमीसारखा माझा हात झाडाकडे वळला अन काय झालं काही कळलं नाही एकदम कावळ्यासारखा रागीट ओरडण्याचा आवाज आला आणि एक मॅग्पाय चक्क वरून माझ्याकडे येत असलेला पाहिला. मला वाटलं हा माझ्या डोक्यावर आपटणार, पण तेवढं न करता फक्त डोक्याला वारा घालून तो निघून गेला. त्याचा तो अवतार बघून मी प्रचंड घाबरले आणि अंगणात पळाले. डेव्ह आजोबांनी माझी ही गंमत पाहिली. ते म्हणाले की पक्ष्यांनी घरटं बांधलंय आता ते ओव्हरप्रोटेक्टिव्ह होतात, माणसांसारखेच.

झालं, तेव्हापासून जरा लांबूनच. मॅग्पायभाऊ आणि मॅग्पायीण्वहिनींना धोकादायक वाटणार नाही अशा अंतरावरून येणं जाणं आणि दुर्बिणीतून घरटं बघणं चालू होतं. साधारण आठवडा झाला असेल. थोड्याच दिवसात बाळ मॅग्पाय जन्माला येणार होतं. माझ्या नवऱ्याला ह्यात भारी उत्साह. तो अगदी रोज न चुकता मला अपडेट विचारायचा.

शनिवार सकाळ झाली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. जन्मात पहिल्यानेच पडायला मिळतंय असा तो पंधरा मिनिटं पडला. हंतरुणात पडल्या पडल्या पावसाचा आवाज छान वाटत होता. थोड्या वेळाने पाऊस सरला आणि लख्ख ऊन पडलं. मी उठले आणि नेहमीसारखं खिडकीतून घरटं पाहिलं. घरटं तसंच होतं पण मॅग्पायभाऊ आणि वहिनी बहुतेक विकली शॉपिंग करायला गेले होते. दुपारी परत पाहिलं तर चक्क झाडावर इतर नेहमीचे पक्षी बसलेले. काय झालं कळेना. संध्याकाळी बाहेर पडलो तर झाडाखाली अंड्याची टरफलं दिसली. नुसती टरफलं.

मी म्हटलं झाडावरून पडली अंडी. पिलं व्हायच्याआधीच गेली. नवरा म्हणाला नाही पिलं झाली असतील नाहीतर नुसती टरफलं नसती पडली. विचारणार कुणाला? झाडाला विचारलं असतं त्याला उत्तर देणं शक्य असतं तर.

हल्ली सकाळ किलबिलाटानंच होते. मीही खिडकी उघडून बघते छान ऊन पडलेलं असतं. निरनिराळे पक्षी बागडत असतात. त्यात एखादा मॅग्पाय बघितला की उगाचच ती टरफलं आठवतात.

ना नात्याची ना गोत्याची, पण ही अपूर्ण गोष्ट मात्र कधीच पूर्ण होणार नाही.

Thursday, October 1, 2009

सीमोल्लंघन

परवा दसरा झाला. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ह्याचं महत्त्व. हा साडेतीन मुहूर्त हा काय प्रकार आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे वगैरे मला अजूनही माहीत नाही. पण दसऱ्याला बरीच लग्न दर वर्षी लागत असतात हा मुख्य मुद्दा. लग्नानंतरचा पहिला दसरा. लग्नानंतरचे पहिल्या वर्षीचे जे काही सण आहेत ते सगळे आमचे इथेच व्हायचेत. म्हणजे थोडक्यात जी काही पहिल्या सणाची मजा असते ती हुकलेय.

माझ्या घरी म्हणजे माहेरीपण दसऱ्याचं काही वेगळं महत्त्व नव्हतंच. घरच्या घरी साधी पूजा, दुपारी पणशीकरांचे श्रीखंड, मग मस्त झोप आणि संध्याकाळचा घरीच करायचा टाइम पास. ह्यात गप्पा, गाणी ते नुसतंच बसून राहणं सगळं सगळं आलेलं. जग कसं बदलतं. मी आणि माझा भाऊ आणि आई बाबा असं आमचं चौरस घर. प्रत्येकाचा कोपरा वेगळा, पण दुसऱ्यांच्या कोपऱ्यांकडे बघत उभा असलेला. प्रत्येकाचं महत्त्व तेच नेमकं, नव्वद अंशाचं आणि त्यावर घराचा तोल बरोबर सांभाळलेला. चौरसाचा त्रिकोण आणि त्रिकोणाची सरळ रेषा कधी झाली हे कुणालाच समजलं नाही. असेच काहीसे डिप्रेसिंग विचार येत राहिले.

तसं काम होतंच, त्यामुळे दिवस कसा गेला कळलं नाही. पण नेमकं नवऱ्याला कामानिमित्त बाहेरगावी जायला लागलेलं. एवढ्या मोठ्या घरात एकटी मी. बरं इथल्या घरांची गंमत आहे. लाकडी असल्याने मधून मधून करकरल्याचे आवाज येतात. आणि ते आवाज मोजत मोजतंच माझी रात्र जाते. झोपायचं राहूनंच जातं. कधी एखादा पोसम छपरावर येऊन आपलं नृत्यकौशल्य दाखवतो तर कधी घोंघावणारा वारा माझी झोप उडवतो. खूपच बोर झालं. मग सरळ फोन उचलला आणि आजीला फोन लावला.

भारतातही खूप असं कंटाळवाणं वाटलं की मी सरळ आजीकडे जायचे. आजी म्हणजे आईची आई. तिच्या घरी दुपारच्या सुमाराला जायचं आणि तिला चहा करायला सांगून मस्त चहा पिता पिता गप्पा ठोकायच्या असं कित्येक वेळा केलंय. अगदी परीक्षेच्या दिवसात तर खासंच. कारण दुपारी इतकी झोप यायची की स्कूटी काढून थेट आजीकडे.

फोन केला बराच वेळ गप्पा मारल्या. तिला म्हटलं असं सणाच्या वेळी खूप कंटाळा येतो वगैरे वगैरे. तर म्हणे कशी, तुझ्या आजोबांची नात शोभतेस. ते आणि आजी त्यांच्या कोंकणातल्या गावातून इकडे आले. आजोबांना सतत आठवण यायची गावाची, घराची, थोडीशी शेती होती त्याची. आंब्यांची, फणसांची, नारळी, फोफळीच्या झाडांची. आंब्यांना तर त्यांनी नावं दिली होती एकेक. नावानेच बोलायचे आंब्यांबद्दल. इतका जिव्हाळा होता आणि एकदम सगळं सोडून मुंबईला आले. म्हणाली तुमचं तरी दुसरं काय आहे. कोंकणातून त्या काळी मुंबईला येणं म्हणजे आजच्या काळी परदेशी जाण्यासारखंच होतं. त्यांनी तेव्हा सीमोल्लंघन केलं, तुम्ही आता केलं.

हो म्हणाले. पण एक विचित्र विचार घुमत राहिला डोक्यात. माणसं सीमोल्लंघन का करतात? दसरा आहे म्हणून? नसलेलं काही मिळविण्यासाठी? काही सिद्ध करण्यासाठी? पूर्वीच्या काळी राजे रजवाड्यांनी हेच केलं. आम्हीही आता हेच करतोय. पण का? कशासाठी? असे प्रश्न त्यांनी आणि आम्ही विचारलेत का? कधी वाटतं आपण उगीच हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो. कधी वाटतं, प्रवाही असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नक्की काय बरोबर? काय चूक? आमच्या कक्षांच्या सीमा ओलांडून साजरा केलेला दसरा अधिक चांगला की घरच्यांसोबत पणशीकरांचं श्रीखंड खाऊन साजरा केलेला अधिक चांगला? असले बेसिक पण उत्तर न देता येणारे प्रश्न पडतात. तेव्हाही तसंच झालं.

बराच वेळ अशी वैचारिक लंगडी घातल्यावर एकदाची झोप लागली. पण झोप लागते न लागते तोच मोबाईल खणखणला. त्रासानेच उचलला, पण बरं झालं उचलला, भावाचा होता. मग झोप विसरून खूप वेळ गप्पा मारल्या. त्याला म्हटलं काय रे दसरा कसा साजरा केलास? म्हणाला ताई, चिल. दसराच साजरा करायचा असता तर भारतातच राहिलो नसतो का? म्हणाला व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण. म्हटलं हुश्शार आहेस तू.

पण मला पटलं त्याचं थोडंसं. हे हॅविंग केक आणि इटिंग इट टू सारखं झालं. विच इज ऍन ऍबस्युल्युट इंपॉसिबिलिटी.

सीमा न ओलांडता सीमोल्लंघन करता येत नाही हेच खरं.

मग एकदम शांत झोप लागली.

Thursday, September 24, 2009

फँटसी

पित्रुपंधरवडा संपून एकदाचे घट बसले की आमच्या चाळीत उत्साहाचं वारे वाहायला लागायचे. सुरवात व्हायची ती भोंडल्याने आणि मग हळदीकुंकू, दसरा करीत करीत दिवाळीपर्यंतचा वेळ कसा जायचा समजायचंच नाही. भोंडला म्हटला की सर्वात आधी आठवण होते ती परीक्षेची. सहामाई परीक्षेला लागूनच साधारण घट बसायचे. बसायचे म्हणजे अजूनही बसत असतील. पहिल्या दिवशी चाळीतल्या टवाळक्या करत फिरणाऱ्या एक दोन पोरांना पकडून अंगणात दिवे लावून घ्यायचे. ते काम मोठ्या बायकांचं. आम्ही मुली खिडकीच्या गजाआडून तयारी कुठपर्यंत आलेय ते फक्त बघायचं.

नेन्यांच्या घरात बायकांची उभ्यानेच बैठक जमायची. कारण भोंडल्यासाठी पाट त्यांचाच लागायचा ना. त्यांचाच का लागायचा हे मला अजूनही माहीत नाही. पण अजूनही त्यांचाच पाट भोंडल्याला असतो. नेन्यांच्या घरी बापटांकडचे तांदूळ पोचायचे. हत्ती काढायचं काम आमच्या आईचं. चित्र वगैरे काढणारी चाळीत एकंच बाई मग तिला खास हत्तीचं चित्र काढण्यासाठी बोलावलं जायचं. आईही वर्षानुवर्ष त्याच मापाचा तसाच दिसणारा हत्ती काढत राहायची. मग बापटांचे तांदूळ, नेन्यांच्या पाटावर, साठ्यांनी काढलेल्या हत्तीच्या पोटात बसायचे आणि कुणाच्यातरी करंगळीचा छाप हत्तीचा डोळा बनायचा.

असा हा तांदुळाचा हत्ती अंगणाच्या मध्ये ठेवला गेला की मग आम्हा मुलींना खाली जायची परवानगी असायची. अभ्यासातून सुटका झाल्याने सर्वांनाच खूप छान वाटायचं. घटस्थापनेच्या दिवशी अगदी घरात घालायच्या फ्रॉकपासून सुरुवात व्हायची आणि चढत्या भाजणीने दसऱ्यापर्यंत तास दीड तास दवडून साडी किंवा तत्सम काहीतरी मिरवायच्या ड्रेसपर्यंत प्रवास व्हायचा. घट बसायच्या दिवशी पाच बायका आणि पाच पोरी आणि एखादा लहान मुलगा ह्यांनी सुरू झालेला भोंडला दसऱ्याच्या दिवशी चांगला वीसेक बायका पंधराएक पोरी इथपर्यंत फुगायचा. चार पाच गाणी वाढत वाढत दहा पंधरा विसापर्यंत पोचायची. चाळीतल्या हौशी गायिका सगळ्या आपले गळे साफ करून घ्यायच्या. ऐलमा पैलमा पासून सुरवात व्हायची. मग कोणे एके दिवशी काऊ यायचा. सुंद्रीचं लगीन जुळायचं आणि करत करत आडात शिंपले कधी पडायचे ते समजायचं नाही.

छोट्या छोट्या आम्ही पोरी, चाळीत नव्या लग्न होऊन आलेल्या मुली आणि त्यांच्या सास्वा असलेल्या बायका सगळ्या मिळून एकंदरीतच सासर ह्या प्रकाराची टिंगल टवाळी करणारी गाणी म्हणायचो. म्हणजे दात्यांची सून आणि दातेकाकू दोघीही म्हणायच्या

उजव्या हाताला विंचू चावला बाई, विंचू चावला
आणा माझ्या सासर चा वैद्य
अंगात अंगरखा फाटका तुटका,
डोक्याला पागोटे चिंध्या मिंध्या
कपाळाला टिळा शेणाचा

दिसतो कसा बाई XX वाणी.

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे जरतारी
कपाळाला टिळा चंदनाचा

दिसतो कसा बाई राजावाणी...

इतकी गंमत वाटायची. मी आईला विचारायचे पण दाते काकूंना राग नसेल का येत? मग आई सांगायची अगं ही नुसती गंमत आहे. पण ती नुसती गंमत नाहीये. एकच बाई सुनेच्या रोलमध्ये वेगळी वागते आणि सासूच्या रोलमध्ये वेगळी वागते. भोंडला हे तिला ह्याची जाणीव करून देण्याचं माध्यम असावं.

मग दुसरी गाणी सुरू व्हायची.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
सासू पाहुणी आलेय गं बाई आलेय गं बाई

सासूने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
सासूने आणलेय साडी गं बाई, साडी गं बाई

साडी मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिप्रं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

मग एक एक करत सासरा यायचा, नणंद यायची दीर यायचा. काही ना काही आणायचे, पण भोंडल्यातल्या रिंगणातली प्रत्येक बाई तोऱ्याने त्यांना परत पाठवायची. अगदी पळवून लावण्यासाठी झिप्रं कुत्रंसुद्धा सोडायची. आणि त्यांची उडालेली भंबेरी पाहून मनातल्या मनात हसायची. कुठेतरी आत खोलवर आपण घरातली मुलगी नसून सून आहोत त्यामुळे आपल्याला कमीपणा मिळतो ही सल मग तिथे बाहेर पडायची. साडी मी घेत नाही, सांगा मी येत नाही, ह्या शब्दांना तर खास धार चढायची. ही त्यांची एक फँटसी.

आणि मग आम्ही पोरी च्या कडव्याची वाट बघायचो ते यायचं.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
नवरा पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई

नवऱ्याने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
नवऱ्याने आणलंय मंगळसूत्र गं बाई, मंगळसूत्र गं बाई

मंगळसूत्र मी घेते
सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई उघडा गं बाई
झिप्रं कुत्रं बांधा गं बाई बांधा गं बाई

लग्न न झालेल्या मुलींच्या मनात मग सासुरीच्या वाटे येणाऱ्या नवऱ्याची चित्र उमटायची. आमच्या सारख्या शाळकरी मुलींना तर कुणीतरी राजकुमार वगैरे येणार गोष्टीतल्याप्रमाणे असंच वाटायचं. ही आमची एक फँटसी.

शनिवारी घट बसले. हे सगळं सगळं आठवलं. घटकाभर जुन्या दिवसांमध्ये मन गुंगून गेलं. तसे फार दिवस झाले नाहीत म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी मी होतेच की भोंडल्याला. तेव्हा मीही ही फँटसी बघितलीच असेल नाही का? ते दिवस सरले ती स्वप्नही सरली. त्या मैत्रिणीही सरल्या. श्रद्धा अमरिकेला गेली, रमा पुण्याला गेली. प्रीती अजून कुठेतरी, मी अजून कुठेतरी. आम्ही सगळ्या साळकाया म्हाळकाया, भोंडल्याचं रिंगण फिरता फिरताच मोठ्या झालो आणि एकेक करून निघूनही गेलो.

वाटलं सगळ्यांना पुन्हा एकत्र करावं नेन्यांचा पाट घ्यावा, बापटांचे तांदूळ घ्यावेत, आईला हत्ती काढायला सांगावा आणि माझ्या करंगळीने त्याचा डोळा काढावा आणि पुन्हा एकदा ऐलमा पैलमा खेळ मांडावा.

हं. ही माझी एक फँटसी.

-------------

स्नेहा, खो दिल्याबद्दल थँक्स. माझा खो सखीला

Thursday, September 17, 2009

एका पावसाचे पडणे

पाऊस कधीचा पडतो
पाचूंची हिरवी पाने
मातीच्या हीनपणाला
गंधांची ओली दाने

पाऊस कधीचा पडतो
जणू पागोळ्यांच्या माळा
रुणु निळ्या घनाच्या पोटी
झुणु निषादसुंदर गळा

पाऊस कधीचा पडतो
कोरडे मात्र अंगण
स्वप्नांचे बहर बगीचे
मनी मोरांचे रिंगण

पाऊस कधीचा पडतो
मन उदास काहुर होते
मदमत्त वातस्पर्शाने
तनी उसनी हुरहुर होते

पाऊस कधीचा पडतो
पाऊस पाडुनि जातो
पापण्या ठेऊनि ठाक
तो डोळे भिजवुन जातो

Thursday, September 10, 2009

माझे गाणे

माझे गाणे असले गाणे
माझे गाणे तसले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
तरारलेले एक तराणे

माझे गाणे असले गाणे...

पाऊस बिंडा नादावूनी
पागोळ्यांचा धरतो ताल
मल्हाराच्या गोड गळ्यावर
अभ्राभ्रांची सुरेल शाल

कडकड कडकड कडाडणारी
वीजबाईची तान वेगळी
सरसर सरसर रसरसलेली
पऊसरींची मीण आगळी

गरगर गरगर गोल घुमोनी
मारुतराज समेवर येई
ह्या सगळ्या कल्लोळामागे
माझे गाणे हरवून जाई

माझे गाणे असले गाणे?.....

माझे गाणे कसले गाणे
माझे गाणे असले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
कोमेजून गेलेले कण्हणे

Thursday, September 3, 2009

हरवलेली माणसं

रोज साधारण दुपारी दोनच्या सुमाराला आमचा पोस्टमन येतो. इथला पोस्टमन आणि आपला देशी पोस्टमन ह्यात जमीन असमानाचं अंतर आहे. आपला डोक्याला टोपी घालतो, तर ह्याच्या डोक्याला असतं हेल्मेट. आपला सायकल चालवतो तर ह्याला मिळते लुनासारखी बाइक. मग हा पाठीला दप्तर लावून फुटपाथवरून लुना चालवत चालवत प्रत्येक घराच्या समोर थांबतो. सगळ्या पत्रांचा रबरबँड लावून एक गठ्ठा केलेला असतो आणि तो गठ्ठा घराच्या लेटर बॉक्समध्ये टाकून स्वारी पुढच्या घराकडे वळते.

हल्ली पत्र हा प्रकार फक्त घेणेकऱ्यांनी देणेकऱ्यांना पाठवायचाच उरलेला आहे. आमचा लेटरबॉक्स टेलिफोन, इलेक्ट्रिसिटीची बिलं किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट असले फारसे आवडीचे नसलेले प्रकार सोडले तर बाकी इथल्या तिथल्या मॉल्सचे कॅटलॉग्ज, टेक अवे च्या जाहिराती वगैरे वगैरे कचऱ्याच्या टोपलीत (नव्हे रिसायकल बीनमध्ये ) टाकायच्या लायकीच्या गोष्टींनी भरलेला असतो.

पण तरीही पोस्टमन येऊन गेला की ताबडतोब बाहेर जाऊन आपली पत्र घेऊन यायला मला आवडतं. असंच परवा पोस्टमन साहेब येऊन गेल्यावर मी पटकन अंगणात उतरून पत्र आणायला गेले. रोजचा कचरा होताच. पण एक पत्र वेगळंच वाटलं. माझ्याच नावाचं होतं. वेगळंच म्हणजे चक्क हाताने त्यावर माझं नाव आणि पत्ता लिहिला होता. उलटं करून पाहिलं तर कुणाचा पत्ता नव्हता. हं. नाही म्हटलं तरी थोडी उत्सुकता वाढलीच. मनात माहीत होतं की हे काही कामाचं पत्र नाही.

घरात शिरले आणि पत्र उघडलं. चक्क हाताने लिहिलेलं पत्र होतं. भरभर वाचून काढलं. चक्क जग्गूंचं पत्र होतं. किती मोठ्ठं असावं? दोन मोठे फुलस्केप भरून. मला एकदम कसंसंच वाटलं. भारत सुटल्यापासून मी त्यांना पत्र फोन वगैरे काही करण्याचा वीचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. कधी मधी बाबाकडून कळायचं त्यांच्याबद्दल. हल्ली पाय दुखतात म्हणून पॉइंटापर्यंत जात नाहीत, वगैरे माहीत होतं. पण ह्या उप्पर काही विचारण्याचा मी प्रयत्न केला नाही आणि बाबाने त्याहून अधिक काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता.

ह्यांनी चक्क बाबाकडून माझा पत्ता घेऊन मला पत्र पाठवलं. अगदी सगळं सगळं लिहिलं. आमच्या नाना नानी ग्रुपबद्दल लिहिलं. एका आजोबांना तिसरी नात झाली म्हणून त्यांच्या मुलाला शिव्या देऊन झाल्या. म्हणे मुलासाठी कशाला देशाची लोकसंख्या वाढवता? एका आजींच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्या आता फिरायला येत नाहीत. स्वतःबद्दलही खूप लिहिलं. गाण्याचे कार्यक्रम वगैरे जोरदार चाललेत म्हणे. गणपतीचे कार्यक्रम कुठे कुठे काय काय आहेत आणि ते कोणते कोणते पाहायला जाणारेत.

एकदम मस्त वाटलं. आपल्याकडे असलेली एखादी छानशी वस्तू आहे हेच आपण विसरून जातो आणि कधीतरी साफसफाई करताना एकदम ती वस्तू डोळ्यासमोर येते आणि नकळत चेहऱ्यावर हसू फुलतं तसं झालं.

जुने दिवस आठवले. रोज सकाळी न चुकता जायचे मी फिरायला. समुद्राचं वेड होतंच पण आमच्या नाना नानी ग्रुपचं त्याहून होतं. सगळ्या ओल्डीजमध्ये मी एकटी विशीतली होते. सगळ्यांची लाडकी नात. आणि जग्गूंची आणि माझी तर विशेष मैत्री. कारण आम्ही घरी चालत एकत्र जायचो. आणि तो माणूसही असा इंटरेस्टिंग की खूप मजा यायची. त्यांच्या गमती जमती विनोद वगैरे सांगायची पद्धतही खूप छान होती.

पण वेळ बदलते तसं आपलं जग बदलतं. जुने लोकं दूर होतात, नवे लोकं जवळ येतात. रहाटगाडगं चालू असतं. पण कधीतरी असं जुनं काहीतरी आठवतं. वाईट वाटतं. म्हणजे जुने दिवस गेले ह्याचं नाही वाईट वाटत. कारण तेव्हा जी मजा करायची होती ती भरपूर केली. वाईट अशाचं वाटतं की कधी काळी आपल्या आयुष्यात रोजच्या असलेल्या व्यक्तींना आपण पार विसरतो ह्याचं. जग्गू वन्स वॉज लाइक अ बेस्ट फ़्रेंड.

असो, तर अशी त्यांच्या पत्राची मजा. मग मीही त्यांना पत्र लिहायला घेतलं, पण अर्ध्यावरच लक्षात आलं की मला त्यांचा पूर्ण पत्ता कुठे माहितेय, त्यांनी पत्रातही लिहिला नव्हता. जुनी एक सुटकेस आहे माझी, त्यात माझं जुनं सामान भरलंय. ती उपडी करून त्यातून माझी जुनी डायरी शोधायचा प्रयत्न केला. नाही सापडली. जुन्या फोनमध्येही पाहिलं. त्यातही नव्हता. मग सरळ बाबाला फोन केला, त्याला विचारलं त्याच्याकडे आहे का? त्याच्याकडे जग्गूंचा फोन असण्याचं कारणंही नव्हतं. तो म्हणाला मी त्यांना विचारून देतो म्हणून. पण मला ते नको होतं. मला आताच्या आता त्यांच्याशी बोलायचं होतं.

खूप शोधाशोध केली. नाही सापडला. मग स्वतःवरच चिडून खिडकीत जाऊन बसले. हरवलेली माणसं शोधत.