Thursday, March 26, 2009

नाती आणि आठवणी

खूप खूप दमलेय.

आताच ऑफिसमधून परत आले. कामाचा व्याप विलक्षण वाढलाय अचानक. दिवसभर मीटिंगच मीटिंग चालल्यात. पण त्यात एक विलक्षण आनंद आहे. आपण केलेलं काम कुणालातरी आवडतंय. आपलं काही महत्त्व आहे आपल्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी जरी अहं सुखावणाऱ्या असल्या तरी हव्या हव्याशा आहेत. गंमत आहे. काम खूप वाढल्याचा त्रास आहे, पण आपण महत्त्वाचे आहोत ह्याचं समाधान आहे. आपल्या चाकरांना ते महत्त्वाचे आहेत असं भासवून किती मालकांनी आपापले खिसे भरले असतील कुणास ठाऊक.

असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहोंचा व्हिसा लवकरच येईल. तसं आमच्या ऑफिसमधे त्यांनी कळवलंय. इतकी वाट कोणत्याही गोष्टीची पाहिली नव्हती, तितकी ह्या व्हिसाची पाहिली. तसा मला येऊन जास्त वेळ झाला नाहीये. लग्न व्हायच्या आधीही मी इथेच होते कित्येक दिवस, पण आता तो सतत जवळ असावा असं वाटतं. एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिरल्याने एवढा फरक पडावा?

काल एक गंमत झाली. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेले होते. कानाला गाणं चाललं होतं. काय झालं कुणास ठाऊक, एकदम कशात तरी पाय अडखळला आणि धम्मकन पडले. समोरून एक मुलगा धावत चालला होता. तो पटकन आला, उठायला मदत वगैरे केली. खरं मला काही लागलं नव्हतं, पण असं कुणासमोर धसमुसळेपण केल्यानं फारच एंबॅरॅसिंग झालं. मुलगा छान होता. उंचापुरा, देखणा. म्हटलं चला, एवढं पडले ते अगदीच फुकट नाही गेलं. बाई पुरे, लग्न झालंय आपलं. पण खरं सांगायचं तर लग्न झालं म्हणून आजूबाजूची देखणी मुलं काय कमी देखणी होतात का? पण नात्यांची लेबलं लागली की मग त्यांचे कायदे येतात. आणि त्या कायद्यांची पण मोठी गंमत आहे. तुमच्या मनात काही चुकीचं असो किंवा नसो. त्यातून काही चुकीचे संकेत गेले तरी तुम्ही अट्टल गुन्हेगार ठरता.

नवऱ्याशी बोलत होते. त्याला सांगितलं हे. त्याला म्हटलं, तू लग्न झालं म्हणून इतर पोरी बाळींकडे बघायचं सोडलंस का? तर म्हणाला खरं सांगायचं तर प्रयत्न केला, पण एखादी चांगली पोरगी दिसली की बघितलं जातंच. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त बघणारंच असशील तर. आणि तुलाही नको, मी कुणाला बघितलं तर. हो म्हणाला. तसा समजूतदार आहे.

विन्या दुबईला चाललाय. एक दिवस सटाक त्याचा फोन आला. म्हणाला ताई मी चाललो दुबईला. त्याला काही बोलून दाखवलं नाही, पण मनातून मला वाईटच वाटलं. एकतर सध्याच्या परिस्थितीत लोकं दुबईवरून पळ काढतायत असं बातम्यांत ऐकतेय आणि हा तिथे कशाला तडमडायला चाललाय असं वाटलं. पण आले विनोबांच्या मना तेथे कोणाचे चालेना, अशी त्याने स्वतः तयार केलेली म्हण आहे, त्यामुळे तो जाणार म्हणजे जाणार.

पण त्याहीपेक्षा आता आई बाबा अजून एकटे होणार ह्याचं जास्त वाईट वाटलं. मुलगी लग्न होऊन गेली की ती दुसऱ्याची झाली आणि मुलगा परदेशी निघून गेला तर? आपला असूनसुद्धा जवळ नाहीच ना. हा विचार मनात आला आणि लगेच वाटलं की मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर काय वेगळं करतेय? माझ्यामुळे त्यांचा मुलगा देश सोडून चाललाच आहे ना? असो, आई बाबांचं दुःख जास्त बोचतं मनाला. सासू सासऱ्यांचं तितकंसं नाही. प्रॉब्लेम एकंच पण नातं बदललं की त्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलतो बघा.

घरी फोन केला मग. बाबा नव्हता. आईशीच बोलले. अख्खा वेळ तिचं विनोबा आख्यान चाललं होतं. कौतुकंच करत होती त्याचं. पण आमच्या आईला ना, मनात असेल तरी सांगता येणार नाही की तो जातोय ते तिला नाही आवडत आहे. आणि हेही तितकंच खरं की कितीही प्रयत्न केला तरी तिला ते लपवता येणार नाही. आम्हा दोघांच्यात विन्या तिचा जास्त लाडका. आणि बाबाची मी. दिसायला तो डिट्टो आईसारखा आणि मी डिट्टो बाबासारखी. राहून राहून मला जुने दिवस आठवत राहिले. जुन्या मैफिली घरगुती आठवल्या.

दिवस निघून जातात पण आपल्या मनावर आठवणी कायमचे कोरून जातात. त्यांना आठवून आपल्याला खूप आनंद होतो, जेव्हा त्या घटना परत घडणं सहज शक्य असतं. पण एकदा का पुनरावृत्तीच्या शक्यता विरळ व्हायला लागल्या की मात्र त्याच आठवणी डोळ्यात रडू आणतात.

नात्यांचे संदर्भ आणि आठवणी ह्यांचंही काही नातं असेल का?

- संवादिनी

Thursday, March 19, 2009

शोध

स्वतःच्या घरी शिफ्ट झाले.

स्वतःच्या म्हणजे भाड्याच्या. पण तरीही हॉटेलात राहण्यापेक्षा चांगलंच आहे की. अर्थात साप सफाई वगैरे अंगावर पडणार पण ते ठिके. तिथे राहून राहून भयंकर कंटाळा आला होता. अपार्टमेंट चांगला असला तरीदेखील, घर ते घर आणि हॉटेल ते हॉटेल. आता काही महिने तरी इथून हालणार नाही. अर्थात नवरा आल्यावर जागा बघितल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं पण तोपर्यंत कंपनी मला हॉटेलमध्ये ठेवायला तयार नव्हती. शेवटी मला आधीच घर बघून शिफ्ट व्हावं लागलं.

अगदी दहा दिवसात घर मिळालंसुद्धा. गेल्या आठवड्यात दोन तीन जागा पाहिल्या होत्या. पण ही जागा अगदी मनासारखी होती. एकमजली घर आहे. खाली किचन आणि बैठकीची खोली आणि वरच्या मजल्यावर दोन बेडरूम्स आणि बाथरुम, टॉयलेट वगैरे. एका बेडरूमला छान बाल्कनी आहे. खाली व्हरांडा आहे. तिथे काही खुर्च्या आणि टेबल आहे. घरात काहीही फर्निचर नाही. अजून मी काही घेतलंही नाहीये. भारतातून येताना काही भांडी आणली होती तेवढीच आणि बाबाने मला पुण्याला जाताना घेऊन दिलेला लॅपटॉप सोडला तर काहीच नाही.

पण घर एकदम सही आहे. भरपूर उजेड. ऐसपैस जागा, हीटर, एसी, गरम पाण्याची सोय. आणखी काय पाहिजे? हा पाहिजे की. मी एकटी काय करणार इथे? अहो लवकर पोचले तर बरं होईल. मग मजा येईल. सोसायटीच्या आवारातंच झाडं गिडं आहेत. शिवाय स्विमिंग पूलही आहे. त्याला पोहता येत नाही. मी त्याला शिकवणारे. त्याला आधीच सांगून ठेवलंय.

ज्या दिवशी चावी घेतली त्या दिवशी एकटीला एकदम विचित्र वाटत होतं त्या रिकाम्या घरात. शेवटी लॅपटॉपवर गाणी लावली आणि ऐकत बसले. आवाजाने घर भरल्यावर जरा बरं वाटलं. होतं ते सगळं सामान नीट लावलं. बॅगा रिकाम्या केल्या. कपडे कपाटात व्यवस्थित लावून ठेवले. एकदम असं घरगुती झाल्यासारखं वाटलं. एक क्षण मनात आलं असंच राहावं. म्हणजे हाऊस वाइफ. घर नेटकं ठेवावं, आपलं गाणं गिणं करावं आणि बाहेरच्या लढाईची जबाबदारी नवऱ्यावर टाकावी. दुसऱ्याच क्षणाला तो विचार झटकून टाकला. ऑफिसमधून बॉसचा फोन आला. ताबडतोब बोलावलं. मी ऑन कॉल होते, पण ऑफिसमध्ये जायचा अजिबात मूड नव्हता पण जावंच लागलं. दोन क्षणापूर्वीच्या स्वप्नातल्या हाऊस वाइफ स्वप्नातच राहिल्या.

हे म्हणजे खरं माझं घर असल्यासारखं वाटतं. लग्न झाल्यावर गेले ते त्याच्या घरी. पण हे घर ना त्याचं ना माझं. आमच्या दोघांचं आहे. दोघांची नवी सुरुवात. म्हणून काही फर्निचरही घेणार नाहीये तो येईपर्यंत. आला की दोघं मिळून घेऊ. मी घेतलं तर त्याला आवडणार नाही असं नाही, पण घरटं दोघांनी बांधलं तर जास्त मजा येईल. अर्थात माझ्या दुकानांच्या वाऱ्या सुरू झालेल्या आहेत.

काही गोष्टी खूप आवडल्यात. पण जे आवडतंय ते सगळं खिशाच्या पालीकडलं आहे. जे स्वस्त आहे ते चांगलं नाहीये. बघूया सध्या तरी फक्त एक मॅट्रेस घेतली आहे. ती जमिनीवर घातली आहे. उशा, हंतरूण, पांघरूण मी घेऊन आले होते भारतातून. त्यामुळे सध्या एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच माझं जीवनमान आहे.

घरी फोन केला तेव्हा हे सगळं आईला सांगितलं. तिचं लगेच सुरू झालं. नीट विचार करून सगळं घे. एकदा घेतलं की बदलता येत नाही काही वर्ष. नवऱ्याला सगळं विचारून घे. उगाच महागाचं घेऊ नको. तुला सवय आहे खर्चीक गोष्टी घ्यायची वगैरे वगैरे. असं सुरू झालं की बाबा पॉलिसी अंगिकारायची. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तसंच केलं. सगळ्याला हो, बरं, हो बरं म्हणत संपवलं.

आईला कोण समजावणार? आमची काळजी करण्यात तिचं अख्खं आयुष्य गेलं, त्यामुळे तिचा अधिकारही आहे तो.

बाबाशी मात्र खूप गप्पा मारल्या. तो कुठल्याशा कार्यक्रमाला गेला होता त्याचा सगळा रिपोर्ट दिला. म्हणाला गाणं सोडू नकोस. एकवेळ जेवण विसरलीस तरी चालेल पण रियाज विसरू नको. मी काय सांगणार त्याला? दोन आठवड्यात तंबोरा लावला सुद्धा नाही म्हणून?

लग्न झाल्यापासून एक गोष्ट जाणवतेय. आई बाबा, विन्या यांच्या मनात मी अजून तीच आहे, पुण्याला जायच्या आधीची, घर सोडायच्या आधीची, धडपडी, सतत कशात ना कशात गुंतलेली. ऑफिसातून थेट सुटून नाटकाच्या तालमी करून आल्यावर कितीही दमली असली तरी थोडा का होईना रियाज करणारी. मनातली प्रत्येक गोष्ट घरी बोलून दाखवणारी. खळखळून हसणारी आणि भडभडा रडणारी. पण आता जाणवतंय, की मी किती बदललेय.

घराचा शोध आता संपला, आता स्वतःचा शोध पुन्हा घ्यायला हवा.

- संवादिनी

Thursday, March 12, 2009

न पाहिलेला ऑपेरा

बरेच दिवस मनात एक विचार घोळत होता. ऑपेरा बघायचा होता. आधी कंपनी नाही म्हणून आणि मग वेळ नाही म्हणून चालढकल केली. खरी गोम तर वेगळीच होती. अजूनही बिझनेस व्हीसा वर असल्याने कंपनीच्या अलावन्स वरच भागवावं लागत होतं. तो काही विशेष नव्हता. जरी घराचं भाडं कंपनी देत असली तरी बाकी सगळा खर्च आमचा आम्हालाच करायचा होता. त्यासाठी अलावन्स पुरेसा होता पण एकदम तीन दिवसाचा अलावन्स ऑपेरावर खर्च करावा इतकीही माझी परिस्थिती चांगली नव्हती. वर्क परमिट होईपर्यंत कळ काढणं आवश्यक होतं. मग इथेच पगार मिळाला असता आणि खर्चावरची बंधनं थोडीशी सैल झाली असती.

दरम्यानच्या काळात आमच्या टीममध्ये एक रोमानिअन मुलगी सामील झाली. जॉर्जिना तिचं नाव. तर ह्या जॉर्जला पण थिएटर ची प्रचंड आवड. बोलता बोलता मी तिला म्हटलं की मलाही एकदा ऑपेराला जायचंय. अगदी पिटातलं तिकिट काढलं तरी चालेल. ती म्हणाली चांगला ऑपेरा बघायचा असेल तर पिटातल्या तिकिटात पूर्ण स्टेज दिसत नाही. म्हणजे पुढची तिकिटं काढणं आलं, अर्थात पूर्ण पैसे भरावे लागणार.

आमच्या कंपनीचा वेळकाढूपणा इतका होता की शेवटी मी डेली अलावन्स मधली पंचवीस टक्के रक्कम ऑपेरासाठी बाजूला काढायला लागले. दोन आठवड्यात मला पाहिजे तेवढे पैसे जमणार होते म्हणून मी जॉर्जीला सांगून टाकलं की आपण ऑपेराला जाऊया. एका शनिवारची तारीखही ठरली. तिने ऑफिसमधल्या अजून सात-आठ गोऱ्यांना जमवलं. आपले लोक खर्च करण्याच्या बाबतीत मागे असल्याने देशी कुणीच नव्हतं. पुढच्या शनिवारचं तिकीट असल्याने सोमवारी ते काढायचं असं ठरलं आणि पैसेपण सोमवारी जॉर्जीकडे द्यायचे असं ठरलं.

पुढच्या विकेंडला ऑपेरा बघायला मिळणार ह्या आनंदातच शुक्रवारी घरी पोचले. नेहमीची विकेंड दंगामस्ती चालू होती. झोपणे, जेवण बनवणे आणि जेवणे ह्यात शनिवार कसा निघून गेला ते कळलंच नाही. रविवारी उशीरा उठून टीव्ही लावून बसले तर बातम्या लागलेल्या.

न भूतो न भविष्यती अशी आग शेजारच्या राज्यात लागलेली. जंगलंच्या जंगलं जळून खाक झाली. साडेसातशे घरं जळून गेलेली. सव्वाशेच्या आसपास माणूस मारला गेलेला. एकदम सुन्न झाले. रडणाऱ्या लोकांचे चेहरे पाहून मलाच रडू यायला लागलेलं. एवढा संपन्न देश. प्रगत प्रगत म्हणून मिरवणारा पण वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या वणव्याला काही रोखता आलं नाही. बऱ्याच लोकांना आग लागलेय हेच समजलं नाही आणि त्यांची घरं त्यांच्यासकट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्यांना पळता आलं ते पळाले, पण नेसत्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं. आईविना मुलं, मुलं शोधणारी आई, कुणाचं कोण अजून दिसलं नव्हतं, पत्ता लागत नव्हता. निसर्गाचा कोप दुसरं काय?

चटकन मला देश आठवला. देशावर आलेली संकटं. मुंबईचा सव्वीस जुलैचा पाऊस, त्सुनामी, लातूरचा भूकंप. अगदी सगळं सगळं डोळ्यासमोर आलं. लातूरच्या वेळी तर अगदी डबे घेऊन फिरले होते तेपण आठवलं. दुःख आणि अश्रू ह्यांना देशांच्या सीमारेषा समजतंच नाहीत आणि निसर्गालाही. कोण प्रगत, कोण अप्रगत असला विचार निसर्ग कधीच करत नाही, सगळ्यांना सारखाच न्याय.

त्या सुन्न वातावरणातच रविवार निघून गेला. सोमवारी सकाळी नेहमीसारखी ऑफिसात पोचले. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे एफ्. एम. चालू होता. बातम्या येत होत्या, मृतांचे आकडे, नुकसानीचे आकडे वाढत होते, मदतीसाठी फोन नंबर सांगितले जात होते, वेबसाइट सांगत होते. एकदम डोकं भणभणायला लागलं, तिथून पळून जावं असं वाटायला लागलं. आपण किती असहाय असतो ह्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

थोड्या वेळाने जॉर्जी आली. तिच्या बोलण्याचा विषयही हाच. जाता जाता म्हणाली अगं तू ऑपेरा चे पैसे ट्रान्स्फर केलेस का? मला बहुतेक ह्यावेळी नाही जमणार. पुढच्या महिन्यात एखाद्या छानशा ऑपेराला जाऊया. तुम्ही जा माझ्याशिवाय. जॉर्जी नाराज झाली. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.
पंधरा दिवस ऑपेरासाठी साठवलेले पैसे घेऊन मी रेडक्रॉसच्या काउंटरला गेले. मला नव्हता ऑपेरा बघायला मिळणार ह्या आठवड्यात पण कुणालातरी त्या पैशाचा माझ्यापेक्षा जास्त, खूप जास्त उपयोग होणार होता. म्हणून ते पैसे देऊन टाकले.

आजपासून परत साठवायला सुरवात केलीय.

- संवादिनी

Thursday, March 5, 2009

स्वप्नांच्या गावा

हल्ली भन्नाट स्वप्न पडायला लागलीत.

भन्नाट म्हणजे भन्नाटंच. मला वाटतं आपण जितका अधिक विचार करतो तितकी स्वप्न जास्त आणि मनोरंजक पडत असावीत. आता माझंच बघा. मला कधी म्हणजे कधी स्वप्न पडायची नाहीत. रात्री बिछान्यावर पडल्यावर डोळा लागला की सकाळी आईची कातावलेली दुसरी किंवा तिसरी हाक ऐकू येईपर्यंत काहीही कळत नसे. झोपणे ही आयुष्यातली एकमेव आनंददायक घटना असायची, कारण दिवस सगळा कामात जायचा. ऑफिस आणि काही अंगावर घेतलेल्या तर बऱ्याचशा अंगावर पडलेल्या अनंत ऍक्टिव्हीटीज. जीव इतका दमून जायचा की झोपायचा जो वेळ आहे तो स्वप्नातही फुकट घालवायची कल्पना मी कधी केली नव्हती.

पण सध्या सगळाच आनंदी आनंद गडे आहे. काम यथा तथाच आहे. गोऱ्यांच्या देशात जर मला सर्वाधिक काही आवडत असेल तर कामाच्या वेळा. आठ म्हणजे आठला हजर आणि पाच म्हणजे पाचाला फुटास्को. त्यातही डोक्यावर कामाचा डोंगर आहे असं नाही. सगळ्या प्रकारचा वेळकाढूपणा केल्यावरही काम संपवायला भरपूर वेळ असतो. चकाट्या पिटायला ऑफिसात कोणी नाही, अपार्टमेंटवर एकटीच. मग करायचं काय? टी. व्ही? मला फारसा आवडत नाही. मग काय करायचं? विचार करायचा. कशाचा? कशाचाही? अगदी रस्त्यावरून चाललेल्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय इथपासून सेम दिसणाऱ्या गाड्यांच्या किमतीत इतका फरक का पडतो इथपर्यंत काहीही.

मूळ लिहायचं होतं ते राहिलंच. तर स्वप्न पडतात. आणि त्याची आठवण का झाली तर कुणीतरी मला एक ऑनलाईन सर्व्हे पाठवला, स्वप्नांवरती. त्यात एक प्रश्न होता तुम्हाला कुणाची स्वप्न पडावीशी वाटतात? उत्तर, नवऱ्याची. तुम्हाला त्या व्यक्तीची स्वप्न पडतात का? उत्तर, अजिबात नाही. आपल्याला हवी ती स्वप्न का नाही पडू शकत आपल्याला? काही गोष्टी सत्यात शक्य नसतात स्वप्नात तरी व्हाव्यात की नाही?

आता माला वाटतं माझ्या नवऱ्याने माझ्या गाण्याचं कौतुक करावं. पण आमचे साहेब आलाप सुरू झाले की जांभया द्यायला लागतात. आता गेलाबाजार पडलं एखादं स्वप्न की ज्यात मी जोरजोरात गातेय आणि साहेब मनापासून दाद देतायत तर काय हरकत आहे? पण असलं काहीही स्वप्न न पडता मला काय स्वप्न पडावं?

मला ऑफिसला जायला उशीर झालाय मी धावत पळत माझ्या अपार्टमेंटमधून बाहेर पडते तर लिफ्ट बंद मग एवढे प्रचंड मजले उतरून खाली येते तर आपली मुंबईतली पिवळी काळी टॅक्सी उभी. (मुळात माझं ऑफिस पाच मिनिटावर चालत आणि तीन मिनिटांवर धावत असताना मी टॅक्सी का घेते हा वेगळा प्रश्न झाला) टॅक्सीवाला चक्क भाड्याला नाही म्हणतो. काहीच वाहन मिळत नसल्याने टेन्शन वाढ वाढ वाढतं. घामाघूम होते मी आणि ढँटडँ..... जाग येते.

ह्याला काही अर्थ आहे का? अजून एक आठवणारं स्वप्न म्हणजे मी बारमध्ये (मी आणि बारमधे? ) पंजाबी ड्रेस घालून एक पेय (कोणतं ते कळत नाही) पीत बसलेय. आणि काहीही करत नाहीये. पेय पितेय संपलं की रिफिल. बस.

पण सगळ्यात भन्नाट स्वप्न पडतायत ती भुतांची. ती मात्र पडली की मग झोप लागत नाही मग डोक्यावर पांघरूण घेऊन उशीखाली डोकं खुपसून रामरक्षा म्हणायला लागते झोप येईपर्यंत. इथले काही हॉरर कार्यक्रम बघितल्याचा परिणाम असेल. आणि एकटी असल्याने भीती अजून वाटते. मग उगाचच कोपऱ्यातलं रोपटं रात्रीच्या अंधारात कुणाच्यातरी नखं वाढलेल्या लांब हातासारखं दिसतं. किंवा वाऱ्याचा आवाज भुताच्या श्वासासारखा वाटतो. मग रामरक्षा आणि अजून रामरक्षा आणि अजून अजून रामरक्षा. रामाला लवकरच माझा कंटाळा येणारे.

कशी पडत असतील स्वप्न? मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणावं तर माझ्या मनी न वसणाऱ्यांचीच स्वप्न मला जास्त पडतात. ज्याला आपण घाबरतो त्याची स्वप्न पडावी तर थोडंफार खरं आहे.

हे सगळं लिहिताना एकदम आजीची आठवण झाली. आजी म्हणजे बाबाची आई. ती कधीच देवाघरी गेली. स्पष्ट आठवतंय ती एकदा सांगतानाचं, तिच्या स्वप्नाबद्दल. म्हणाली होती की एक खूप छान स्वप्न पडलं. डोंगर होते, दऱ्या होत्या, नद्या होत्या, डोंगरावरचे पांढरे शुभ्र ढग, त्यांच्या पाठचं निळं आकाश, हिरवे डोंगर, त्यातून वाहणारं नदीचं पाणी. मग म्हणाली मी जिथे उभी होते तिथे खूप फुलं होती. वेगवेगळ्या रंगांची आणि त्याला इतका छान वास येत होता. मग म्हणाली अजून तो वास मनात दरवळतोय.

इतकं छान स्वप्न? अगदी टुडी नाही थ्रीडी नाही फोरडी स्वप्न पडलं तिला. असं मला का पडू नये? फार कुठे बाहेर न पडलेल्या माझ्या आजीला स्वित्झरलंड ची स्वप्न पडावीत आणि तिथे प्रत्यक्ष जाऊन आलेल्या मला त्याच्या जवळपासचही काही दिसू नये, असं का व्हावं? की ही एक प्रकारची क्रिएटिव्हीटी आहे. तिची कंस्ट्रक्टिव्ह असेल, माझी कदाचित डिस्ट्रक्टिव्ह किंवा न्युट्रल असेल.

कुणी सांगावं?

- संवादिनी

Thursday, February 26, 2009

एकलकोंड्याची गोष्ट

पहिला आठवडा सगळं बस्तान बसवण्यात गेला. शनिवारी रात्री पोचले. अर्थातच कंपनीने सगळी व्यवस्था केली होती. आणि दुसऱ्या वेळी येत असल्याने पहिल्या वेळी झालं तसं "धुंडो धुंडो रे" झालं नाही.

यंदा टॅक्सीवाला एकदम मस्त भेटला होता. इथिओपियन होता आणि रस्ताभर गप्पा मारत होता. आपणही किती रेसिस्ट असतो ना? काळा माणूस दिसला की उगागंच भीती वाटते. मला विचारत होता तू काय करतेस, तर सांगितलं त्याला. तसा म्हणाला पगार बरा मिळतो का? तर म्हटलं मला अलावन्स मिळतो. म्हणे किती? म्हटलं अमुक अमुक. तर म्हणे ते सोड टॅक्सी चालव ह्यात खूप पैसे आहेत. कपाळाला हात लावला. इथे आधीच लोकं कमी, त्यात मी टॅक्सी चालवायला लागले तर अजून काही देवाघरी धाडायचे.

तर रात्री हॉटेलवर पोचले. बाहेर जाऊन काही खायची इच्छा नव्हती. असं होईल हे माहीत असल्याने चक्क मॅगी घेऊन आले होते. शनिवार रात्र आणि रविवारची जेवणं मॅगीवरच झाली. सगळा दिवस झोपून काढला. फक्त ब्रेड आणि दूध आणायला गेले तेवढंच. माझी रूम विसाव्या मजल्यावर आहे. व्ह्यू मागच्यापेक्षा खूप छान आहे. पण एकटीला त्यात मजा वाटत नाही हेच खरं. तसे ऑफिसमधल्या काही लोकांना फोन केले. पण ते सगळे आपापल्या घरी असल्याने आणि माझं हॉटेल अगदी शहरात असल्याने भेट झाली नाही.

सोमवारी ऑफिसला गेले. कामाचा मूड नव्हताच. कॉफी आणखी कॉफी आणि आणखी आणखी कॉफी. एकटेपणा आणि व्यसन ह्यांची संगत अशीच होत असावी. एकटी नाहीये मी तसं. लोकं आहेत. पण आपल्या घरून आल्यावर कितीही लोकं असतील तरी एकटेपणा जाणवतोच.

रोज संध्याकाळी जॉगिंगचं सुरू केलंय. तेवढा टाइम पास होतो आणि व्यायामही. धावताना जो एक ऱ्हिदम मिळतो ना तो एकदम वेडावणारा आहे. इनटोक्सिकेटिंग हा शब्द जास्त योग्य वाटतो. सुरवातीला शरीराने नाही म्हणायचं, स्नायूंनी दुखायचं, श्वासाने भंजाळायचं, पण एकदा तो ऱ्हिदम मिळाला की मग सगळे शिस्तीत एका सुरात आणि एका तालात जणू गायला लागतात. दे बिकम वन टीम. माहीत नाही, पण मला ती स्टेज खूप आवडते. कानाला आयपॉड असेल तरी श्वास लख्ख ऐकू येतो. गाण्याचा ऱ्हिदम, श्वासांचा, पायांचा आणि विचारांचा सगळं एका पातळीवर येतं आणि विलक्षण आनंद मिळतो. अजून काही दिवस चालूदे हे मग बघूया माझं मत बदलतं का ते?

आणि एक सही काम झालं. इंटरनेटवर डिजीटल तानपुरा आणि तबला मिळाला, आता काँप्युटर लावून मस्त गाता येतं. जेट लॅग म्हणा किंवा आठवणी म्हणा रात्री झोपच येत नाही. ज्या दिवशी तानपुरा मिळाला, त्या रात्री अशीच झोप येत नव्हती. सगळ्या खिडक्या गच्च ओढून घेतल्या. एसी फुल चालू केला (थंडी नव्हती पण गाण्याचा त्रास दुसऱ्यांना होऊ न देण्याचा एक मार्ग म्हणजे दुसरा कसलातरी आवाज चालू करणे). मारवा घेतला. एकतर मध्यरात्रीची वेळ, त्याला साजेसा मारव्यासारखा धीरगंभीर राग. कोमल रे असा लागला की बस. चांगला एक तास मारवा गायले. ऐकायला कुणी नव्हतं पण स्वतःसाठी गाण्याची मजा वेगळीच.

सध्या भीमसेनांचं चरित्र वाचतेय. वाचताना असं जाणवतं की आपण किती अतिसामान्य आहोत. लहान वयात घर सोडून फक्त गाण्यासाठी पळून जाणं. गदगपासून जालंधरपर्यंत जाणं. स्वतःच्या हिमतीवर गाणं शिकणं. मग सवाई गंधर्वांच शिष्यत्व त्यात सोसलेले हाल केवळ गाण्यावरील प्रेमापोटी. असं आयुष्यात माणसाला काही ध्येय पाहिजे की ज्यापाठी त्यानं पागल व्हावं. वाचताना भान हरपून जातं. पंडितजी माझे खूप आवडते गायक आहेत, पण हे सगळं वाचल्यावर खरंतर माझे देवंच झालेत ते. नुसतं त्यांचं स्मरण केलं तरी माझं गाणं चांगलं होईल असं वाटतं.

असो, तर ह्या झाल्या माझ्या एकटेपणाच्या एकलकोंड्या गोष्टी. कशात ना कशात मन रमवत राहायचं दिवस घालवायचा. संध्याकाळ झाली आणि सूर्य नारायण मावळतीला परतायला लागले, झाडांच्या सावल्या लांबुडक्या व्हायला लागल्या की एक विलक्षण विषण्णता पसरते. आई बाबाची, नवऱ्याची खूप खूप आठवण येते. कधी रडायलाही येतं. पण कधी धावता धावता स्वतःला दमवून, कधी सुरांच्या भुलभुलय्यामध्ये स्वतःला हरवून तर कधी पुस्तकांच्या छापील पानांत दडलेली प्रश्नांची उत्तरं शोधत दिवस घालवते आहे.

ह्या सर्वात एक नशा आहे. तो बोथट करतो आठवणी आणि देतो हुरूप नव्या दिवसाची वाट बघण्याचा.

- संवादिनी

Thursday, February 19, 2009

शॉर्टकट

लग्न म्हणजे एक रोलर कोस्टर राइड आहे. बरंचसं सुख आणि त्याला दुःखाची किनार. म्हणजे नवऱ्याचा विरह संपल्याचा आनंद आणि घरापासून दूर गेल्याचं दुःख. पार्टनर मिळाल्याचा आनंद पण स्वातंत्र्य गेल्याचं दुःख. शेअर करता येतंय हा आनंद पण अवलंबी झाल्याचं दुःख. कधी भेटला नाही असा उधाणलेला समुद्र आणि त्याने अस्ताव्यस्त केलेला किनारा. समुद्राच्या उधाणाचा आनंद, किनारा अस्ताव्यस्त झाल्याचं दुःख. कधी कधी मला वाटतं हे सगळ्यांचंच होतं की हा माझाच प्रॉब्लेम आहे? सुख नाही असं नाही, पण दुःख नाही असंही नाही अशी काहीशी विचित्र परिस्थिती.

जाऊदे. नवा भिडू, नवं राज्य. माझा मुंबईचा मुक्काम संपत आला. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कामावर रुजू होईन. परका देश परके लोक आणि एकटी मी. इथेसुद्धा फिफ्टी फिफ्टी आहे. आपल्या लोकांपासून दूर जायचं हे दुःख पण सासरी राहण्याचं जे अवघडलेपण आहे, त्यातून सुटका होण्याचा आनंद. कदाचित मी खूप सेल्फ सेंटर्ड वगैरे वाटत असीन. पण स्वतःचं विश्व निर्माण करताना होणारे कष्ट अपार आनंद देऊन जातात. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात सामावून जाण्यातले कष्ट खूप त्रासदायक आहेत.

हे सगळं सांगावं तरी कुणाला? आईला सांगितलं तर आई म्हणणार मुलीच्या जातीला हे सगळं करावंच लागतं. नवऱ्याला ह्याची डेप्थ समजणार का? त्याच्या दृष्टीने त्याचं विश्व चांगलंच आहे. आणि चांगलं आहेच. वाईट काहीच नाहीये, पण ते माझ्या विश्वापेक्षा खूप वेगळं आहे म्हणूनही त्रास होऊ शकतो ते त्याला कसं पटवायचं? हा अनुभव आल्याशिवाय कळावं तरी कसं किती अवघड आहे हे सगळं? म्हणून त्याला काही बोलत नाही. बाबाला सांगावं खूप वाटतं पण त्याच्या डोक्याला त्रास नको म्हणून नाही सांगत. जीवाभावाच्या मैत्रिणीही आता जवळ राहिल्या नाहीत की उचलला फोन आणि बोललं तासभर. एकंदरीत सुखमय शोक किंवा शोकमय सुख असं काहीसं आयुष्य झालंय.

पण लवकरंच ते बदलेल. तिथून निघतानाचा विमानतळावरचा उत्साह इथून निघताना नक्कीच नसेल. का कुणास ठाऊक, भारत सोडताना मी नेहमी भावुक होते. विमान उडाल्यावर मुंबईचे दिवे, झोपड्या ढगाआड जाईपर्यंत बघत राहते. पुन्हा कधी दिसाल? असं त्यांना विचारत राहते. ह्या वेळी नवऱ्याचा विरहही सोबतीला असेल. गंमत आहे. सोबत नसली म्हणजे होतो तो विरह आणि अशा विरहाचीही सोबत. निदान दोन अडीच महिनेतरी सोबतीला राहीलच तो.

पुन्हा तिकडे गेल्यावरचं काम, एकटेपण, कंटाळा, सगळं सगळं डोळ्यासमोर दिसतंय. मी जेव्हा शाळेत होते अगदी लहान असताना तेव्हा वाटायचं आज जोरात पाऊस पडूदे आणि शाळा बुडूदे. तसंच काहीसं वाटतं, काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि रद्दच व्हावं जाणं. मग समोर दिसतो एक डोंगर, माझ्यासारख्या कित्येकींनी चढलेला. स्वतःला दुसऱ्या एका साच्यात कोंबायचा.

मग एक मन पळपुटं होतं. म्हणतं जाऊदे तो डोंगर, पळायची संधी मिळतेय, पळ काढ. मग एकदम खूप खूप उदास वाटतं. मनापासून प्रमाने वागवणारे सासू सासरे, मी त्यांच्यात स्वतःला सामावून घ्यावं अशी रास्त अपेक्षा बाळगणारा नवरा. ह्यांचा आपण कुठेतरी अपेक्षाभंग करतोय असं वाटत राहतं. एक न्यूनगंडही येतो. आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खरंच त्रास होण्याची गरज नाही, पण आपल्यालाच तो होतो, म्हणजे आपणंच कुठेतरी चुकतो आहोत. असा.

जाऊदे, सध्या तरी जे जमत नाही त्याला सामोरं जाण्याऐवजी त्याला पाठ दाखवण्याचा शॉर्टकट मी घेतलाय. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघता येईल. सध्या शोवटच्या काही दिवसातली मुंवई आणि नवरा मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करतेय.

- संवादिनी

Thursday, February 12, 2009

नो प्रॉब्लेम

नवऱ्याचं ऑफिस पुन्हा सुरू झालं. मला अजून पंधरा दिवस सुट्टी आहे. पण सुट्टीची अशी मजा येत नाहीये. उगाचच आपण सुट्टी घेऊन घरी बसलो असं फिलिंग येतंय. पण सुट्टी नाही तर मी मुंबईत राहू शकणार नाही. म्हणजे थोडा वेळ का होईना जो नवऱ्याबरोबर घालवता येतोय तेही जमणार नाही. सासरेही ऑफिसला जायला लागले. त्यांचं खरंतर सतत काम चालूच होतं घरूनही पण आता ऑफिसला जायला लागलेत. सासूबाई घरीच असतात आणि सूनबाईही.

खूप छान आहेत त्या म्हणजे सासू ह्या संस्थेच्या पारंपरिक इमेजला पूर्ण विरुद्ध आहेत. मला स्वैपाकात गती नाही हे त्यांना माहिती आहे. पण मला जास्त सला वगैरे देत नाहीत. त्या करतानाच मला एकेक सांगत जातात की असं केलं तर असं होतं तसं केलं तर तसं होतं. तुझं चूक माझं बरोबर असा ऍटिट्युड नाहीये. बऱ्याच गोष्टी आमच्यापेक्षा जरा वेगळ्या करतात त्या. पण मी त्यांना तसं भासवून देत नाही.

एकदा
पिक्चरला पण घेऊन गेल्या, त्यांच्या मैत्रिणींबरोबर. मला एवढं ऑकवर्ड झालं होतं. पण काय सांगा? कधी कधी असं वाटतं सुट्टी वाया चाललेय. आई बाबांची भेट होत नाही आणि नको त्या (सासूबाई नव्हे, त्यांच्या मैत्रिणी) लोकांबरोबर वेळ घालवावा लागतोय.

अर्थात आठवड्यात दोन वेळा घरी जाऊन आलेच. माहेरी जाण्याची मजा काय आहे ते आता कळतंय. सासरी भिजल्या मांजरीसारखी असणारी मी घरी पोचले की मस्त अघळ पघळ पसरते. दुपारी गेले तर आई नसतेच, पण बाबा असतो. मग काय? आपल्या राजकन्येसाठी राजा चहाही बनवायचे कष्ट घेतो. अगं हे घे, ते घे, कचोरी आणलेय मुद्दाम तुला आवडते म्हणून, गायवाडीतली नानकटाई आणलेय, आयडिअलचे वेफर्स आणलेत आणि काय नि काय. पोहे बनवू का? नाहीतर शिरा बनवतो, की परशुराम वाडीचा वडापाव आणू? असे असंख्य प्रश्न. मी त्याला म्हणते अरे जाऊदे रे, माझ्याशी गप्पा मार. मीच चहा बनवते आणि आपण मस्त ग्लूकोज ची बिस्किटं खाऊ.

लग्नाआधी आभाळ खाली आलं तरी चालेल किचन मध्ये जाणार नाही म्हणणारा बाबा चक्क मला चहा बनवू का म्हणून विचारतो ना, तेव्हा कसंसंच होतं. एकदम बिचारा वाटतो तो मला. आणि डोळ्यात पाणी येतं. मग एकमेकांपासून डोळे लपवायचा खेळ खेळायचा. तोपर्यंत आई येते. मग पुन्हा हे करू की ते करू सुरू होतं तिचं.

लग्नाआधी काढलेला आमच्या चौघांचा एक मस्त फोटो त्याने फ्रेम करून आणलाय. तो एक बदल झालाय. बाकी घर तसंच आहे. शेजारी पाजारीही तसेच आहेत. रहाटगाडगं चालतं आहे. गाडग्यातलं एक भांडं पडलं म्हणून इतरांचं काम थांबत नाही. त्रास फक्त त्या भांड्याला होतो आपण त्या चक्रात नाही म्हणून.

एकदा मी आणि आई होतो तेव्हा आई सांगत होती, बाबाला बिलकूल करमत नाही. मग जुनं कुठलंतरी रेकॉर्डिंग काढून बसेल, नाहीतर फोटो बघत बसेल. खरंतर तिलाही करमत नसणार, पण ती कबूल करणार नाही.

संध्याकाळी दोघंच एकटे घरी असताना काय वाटत असेल त्यांना? मुलगा इथे आहे पण तोही बाहेर जायचं म्हणतोय, मुलीचं लग्न झालेलं, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं. तानपुरा नसलेला माझा कोपरा, रिकामं झालेलं माझं कपाट, आईने हौसेने माझ्यासाठी आणलेल्या काही बाही वस्तू. सगळं सगळं आठवतं आणि खूप खूप रडायला येतं. पण आदर्श सूनबाईच्या कर्तव्यात सतत हसतमुख राहणे हेही येतंच. मग कढ आवरायला लागतात, आवंढे गिळायला लागतात.

मग
तो बांध कधीतरी बाथरुमच्या भिंतीआड फुटतो किंवा रात्रीच्या अंधारात नवऱ्याच्या शर्टाची बाही भिजवून जातो. त्याला वाटतं काही प्रॉब्लेम आहे का?

पण त्याला कसं समजावणार की काहीही प्रॉब्लेम नसूनही प्रॉब्लेम्स असतातच..

- संवादिनी

Thursday, February 5, 2009

मचाण, कलकत्ता आणि बदललेलं जग

परवा कोलकात्याहून परत आलो. गेले दहा-बारा दिवस कसे गेले कळलंच नाही.

निबिड जंगल, निरभ्र आकाश, चांदणी रात्र, दूरवर लावलेल्या ट्यूबमधून यावा असा चंद्रप्रकाश, बांबूचा मचाण, अशक्य शांतता, वाऱ्याबरोबर होणारा बांबूची कचकच. पाण्याचा एक आवाज मात्र कायम. मध्येच पायाखाली वाजणारी पानं? कुणाचे बरं असतील ते पाय ह्याचा अंदाज बांधत मचाणावर बसलेली सहा जणं. आम्ही दोघं, एक आजी आजोबा आणि दोघं टिपीकल सोल्जर स्टाइल ड्रेसिंग, वर हाफ जॅकेट, रात्री उगाचच घातलेल्या टोप्या अशा अवतारातले सो कॉल्ड नेचर लव्हर्स.

त्यातल्या
आजींशी माझी खासंच गट्टी जमली होती. म्हणजे आजी फक्त वयानेच आजी होत्या. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. खरंतर अहोंना असलं रात्री बेरात्री मचाणावर वगैरे बसायला बिलकुल मानवत नाही. पण आजींनी भरीस पाडलं. बघायला काय मिळालं? काहीच नाही. तशा दुर्बिणी वगैरे नेल्या होत्या. पण मला आवाजाची दिशा समजून मी दुर्बीण फोकस करेपर्यंत जे काही होतं ते पळून गेलेलं असायचं. मग नेचर लव्हर्स मला नक्की काय होतं ते सांगायचे.

पण अशा ठिकाणी प्राणी बिणी बघायला कोण जातं. मचाणाखाली सळसळलेल्या पानांनी शांततेच्या अंगावर शहारा आणावा. मनात एकदम धस्स व्हावं, मी अहोंचा दंड पकडावा आणि एकदम आश्वस्त वाटावं, ह्यातला जो रोमान्स आहे तो आपल्या नागरी संवेदनांना उलगडावा तरी कसा? त्यासाठी अशा मचाणांवर बसूनच संवेदना धारदार करायला हव्यात.

हे माझं लॉजिक नाहीये. आजींचं आहे. हे सांगून त्यांनी माझ्या अहोंना रात्र मचाणावर काढायला पटवलं. मी काय? असल्या गोष्टीत प्रचंड उत्साही आहे. पण त्याला पटवणं कठीण. पण बिचारा माझ्यासाठी तयार झाला. त्याच्यापेक्षा नेचर लव्हर्सच माझ्याशी जास्त बोलत होते. आणि बिचाऱ्याला चरफडण्याव्यतिरिक्त काहीही करता येत नव्हतं. असो, तरी आला हेच खूप झालं. जंगलातल्या ट्रीपचा हा हायलाइट.

तिथून कलकत्त्याला पोचलो. माणसांच्या जंगलात आल्यावर अहोंना बरं वाटलं. त्याचे बरेच मित्र भेटले. शिकायला तो कलकत्त्याला होता. एक वेगळाच तो दिसला मला तिथे. म्हणजे माझ्याशी अगदी मृदूपणे बोलणारा, एकदम संयत, मितभाषी मुलगा मित्रांच्या घोळक्यात शिरल्यावर प्रचंड बदलला. त्याच्या मित्रांनीपण त्याच्या जुन्या कुलंगड्या बाहेर काढल्या. मजा आली. एवढा मोकळा ढाकळा त्याला पहिल्यांदाच पहिला. म्हटलं तू तर अगदी माझ्यासारखा आहेस. माझ्याशीपण अशीच मस्ती कर. हो म्हणाला, पण मुंबईला आल्यावर ये रे माझ्या मागल्या.

तिथून रोज घरी फोन करीत होते. शेवटच्या दिवशी आई म्हणाली आता मुंवईला पोचल्यावर रोज फोन करू नको. उगाच सासू-सासऱ्यांच्या डोळ्यात येईल. मला तिचा रागच आला. अरे, फोन नको करू म्हणजे काय? माझी स्वतःची आई मला हे सांगते ह्याचं दुःख जास्त. मग तिचंही म्हणणं थोडंसं पटलं. मग एक मध्यममार्ग काढला. कुणी घरी नसताना किंवा मी बाहेर असताना कॅजुअली फोन करायचा. आणि आठवड्यातून एक दोन वेळा ऑफिशिअली करायचा.

बाकी नवं घर मस्त आहे. सासू सासरे सुद्धा. फिरायला जाईपर्यंत माझा चेहरा पडलेला होता. घरची खूप म्हणजे खूप आठवण यायची. अगदी रडायला यायचं. पण आता ठीके. सवय झाली थोडीफार. माणसं कळायला लागली थोडीफार. पण त्याबद्दल पुढच्यावेळी.

"आणि माझं जगंच बदलून गेलं" हा वाक्प्रचार आपण कित्येक वेळा ऐकतो. सध्या मी ते अक्षरशः अनुभवतेय. कालपर्यंत मी माझ्या बाबालाच बाबा म्हणायचे. आता मी त्याच्याही बाबांना बाबा म्हणते, आईला आई म्हणते. पण म्हणून एका दिवसात ते मला माझ्या आई बाबांसारखे वाटतील का? नाहीच वाटत. मग तशी अपेक्षा मुलीकडून करावीच का?

माझे सासरे ह्यावर फार मार्मिक बोलले. म्हणाले, आपण म्हणतो आता सून घरी आली, ती आम्हाला मुलीसारखीच आहे. "सारखी" आहे, पण मुलगी नाहीच असंच आपण बोलून दाखवतो ना? माझ्या बाबाला सांगत होते. मग म्हणाले, म्हणून आम्ही म्हणतो, ही आमची मुलगीच आहे. तिने फक्त आम्हाला तुमच्याइतकं जवळचं स्थान द्यावं. ते म्हणतात ते मला शंभर टक्के पटलं. पण मी त्यांना माझ्या बाबाची जागा देऊ शकते का? नक्कीच नाही. मग त्यांनी मला त्यांच्या मुलीची जागा द्यावी अशी अपेक्षा मी कशी करू शकेन?

काही अंतर कधीच कापली जात नसावीत. कुणाची चूक म्हणून नाही पण परिस्थितीची असहायता म्हणून.
- संवादिनी

Thursday, January 29, 2009

अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर

गंगेत घोडं न्हालं एकदाचं. करायचं करायचं म्हणून ठरत नसलेलं आणि मग अचानक ठरलेलं आणि येतंय, जवळ येतंय म्हणून येऊ घातलेलं लग्न एकदाचं पार पडलं.

कसं वाटलं लग्नाला? माझ्याच. अगदी ईदच्या कुर्बानीच्या सजवलेल्या बोकडासारखं वाटलं नसलं तरी गेलाबाजार पोळ्याच्या सजवलेल्या बैलासारखं वाटलंच. आपल्या स्वतःच्या लग्नात आपल्या स्वतःलाच इतकं बोअर व्हावं ह्यासारखं दुर्दैवं ते कोणतं. नटून सजून दृष्टिकर्कश्श फ्लड लाइट्सच्या समोर उभं राहा. एसी चालू असूनसुद्धा भयंकर उकडत होतं. नको तो मेक अप आणि नको ती हेअरस्टाईल असं झालं होतं. त्यात मेकअप करणाऱ्या बाईने आपलं कौशल्य जरा जास्तच पणाला लावलं. इतकं की माझ्या नवऱ्यालादेखील मी अनोळखी वाटावे.

मग ते लग्नाचे सोपस्कार. सिंहासनावर बसणं किंवा न बसणं. ती सिंहासनवजा खुर्ची तिथे ठेवली कशाला होती कुणास ठाऊक? कारण पहिली दहा मिनिटं सोडली तर आम्हा दोघांनाही तिच्यावर बसायला मिळालं नाही. भेटायला आलेल्यांची ही भली मोठी लाइन. त्यातले कोण आपले कोण समोरचे काही कळत नव्हतं.

लहानपणी भेटलेल्या कुठल्यातरी लांबच्या आत्या किंवा मावशीने त्यानंतर एकदम लग्नात उपटून "ओळखलंस का? " म्हणून विचारणं, मी त्याला ओशाळत "हो" असं जोरदार ठोकून देणं, मनात अशा करत की ती आत्या किंवा मावशी मला "सांग बरं कोण?" म्हणून विचारणार नाही. एकमेकांच्या नातेवाईकांच्या ओळख करून देणाऱ्यालाही फार काळ लक्षात न राहणाऱ्या ओळखी आणि एकंदरीतच लग्न ह्या प्रकारात आलेल्या पाहुण्यांना नसलेला रस.

तीन साडेतीन वाजल्यानंतर झालेलं किंवा नकोसं झालेलं जेवण. बळेबळेच एकमेकांना भरवणं वगैरे. पण तेव्हाच मला समजलं की ही लग्नात नवरा नवरीने एकमेकांना भरवायची पद्धत का रूढ झाली असावी. बाय द टाइम, उत्सवमूर्ती असलेल्या दांपत्याचं जेवण होतं, त्याची जेवणावरची वासनाच मेलेली असते. निदान आपल्या नवपरिणित जोडीदारच्या हातून तरी ते घास दोन घास खाऊन पुढच्या कार्यक्रमासाठी थोडी शक्ती मिळवतील म्हणून असेल कदाचित.

मग ते नाव घेणं. आता मी त्याचं नाव दर मिनिटाला पंचवीस वेळा घेते. अजून उखाण्यात काय वेगळं घ्यायचं. पण ते घेतलं. त्याने माझं नाव घेतलं ते ऐकून हसून हसून मुरकुंडी वळली. मराठी भाषेचं सामान्य ज्ञान आधीच कमी, त्यात आकडे सांभाळण्यात आयुष्य गेलेलं त्याचा उखाणाही तसाच असायचा. मी खरं त्याला आधीच एक मस्त उखाणा सांगितला होता, पण साहेबांना स्वतःची क्रिएटिव्हीटी दाखवायची हौस आली.

असो. हे सगळं होता होता घरी जायची वेळ आली आणि लक्षात आलं अरे, आज तर आपलं घर बदललं. कालपर्यंत अल्लडपणे माहेरी वावरणाऱ्या आपण आज एकदम अचानक मोठ्या झालो. सूनबाई झालो. एका नव्या विश्वात प्रवेश. त्याच्या घरी मी पहिल्यांदाच जात होते असं नाही. पण आतापर्यंत त्याच्या घरी म्हणून जात होते. आता माझ्या घरी म्हणून जायचं होतं. माझ्या घरी वगैरे फक्त म्हणायला कारण आत कुठेतरी खोलवर मला माहितेय माझं घर म्हणजे माझ्या आई बाबांचंच घर. आणि त्याचं घर म्हणजे त्याच्या आई बाबांचं घर. पुढे कधी आमचं एखादं घर झालं तरच कदाचित हा कन्सेप्ट बदलेल.

नेहमी होते ती रडारडी भरपूर झाली. इतरांना रडतात म्हणून हसणारी मीदेखील धाय मोकलून रडले. पण नंतर त्यावेळी झालेला माझ्या नवऱ्याचा चेहरा आठवून खुदकन हसू देखील आलं. म्हणजे, बिचाऱ्याला फार गिल्टी फीलिंग वगैरे आलं होतं. सगळे रडतायत आणि ह्या सगळ्या रडारडीला आपण कारणीभूत आहोत असा काहीसा भाव. फारच बिचारा चेहरा करून उभा होता तो.

त्याच्या घरी पोचले. त्याच्या बिल्डिंगमधल्या लोकांनी एकदम जोरदार स्वागत केलं. पायघड्या काय, फुलं काय. मजा आली. खरंच आपण कुणीतरी स्पेशल आहोत असं वाटलं. लग्नाच्या ह्या दिवसात जर मी काही एन्जॉय केलं असेल तर हे स्वागत. घरी पोचल्यावर पुन्हा एकदा सर्व नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या ओळखीच सेशन झालं. नव्या सूनबाईच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही झाला. मनात नव्हतं पण सगळ्यांनी भरीला पाडलं.

एव्हाना दिवस सरला होताच. रात्रीचे रंग पसरायला लागले आणि एक वेगळीच जाणीव झाली. कालपर्यंत मी एकटी होते पण आजपासून तो बरोबर होता. रोमँटिक कल्पना वगैरे डोक्यात नव्हत्या असं नाही, पण आजपासून जो माझा हक्काचा स्वतःचा एकटीचा वेळ होता, झोपण्याचा तोपण शेअर करायला लागणार ह्या कल्पनेचं दडपण वगैरे आलं.

भरजरी साडीमध्ये नटून थटून, फुलांनी सजवलेल्या पलंगावर, भरजरी पोषाख घालून बसलेल्या नवऱ्यासाठी बदामाचं दूध वगैरे घेऊन जाणाऱ्या, लाजऱ्या बुजऱ्या, मान खाली घातलेल्या बॉलीवूड चित्रपटांमधल्या नवपरिणितेच्या कल्पनेला जमिनीवर दाणकन आपटत जेव्हा मी माझा घरचा अगदी रोजच्या वापरातला गाऊन घालून जांभया देत आणि नवऱ्याची वाट पाहत गॅलेरीत उभी होते, तेव्हा कळलं. की परिकधा आता संपली.

"अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर" हे साकारणं हे खरं चॅलेंज आहे.

- संवादिनी

Thursday, January 22, 2009

मी एक पँडोरा?

पँडोरा. एक अतिशय सुंदर स्त्री. जगाला वेडं करण्याची सर्व अस्त्र तिला मिळालेली. पण तिची निर्मितीच मुळी झाली होती जगाला वठणीवर आणण्यासाठी, मानवजातीला शिक्षा म्हणून. एका स्त्रीकडे असायला हवेत ते सगळे गुण तिच्याकडे होते आणि एका स्त्रीकडे असायला हवा तो एक अवगुणही. प्रत्येक गोष्टीबद्दलची उत्सुकता.

तिला पुरुषांना घायाळ करण्याची सर्व अस्त्र तर मिळालेली, पण त्याबरोबरच मिळाला एक हंडा. तिला बजावण्यात आलेलं की काहीही झालं तरी ह्या हंड्याचं झाकण उघडायचं नाही. पण तिची उत्सुकता शिगेला पोचली. तिचा संयम सुटला आणि तिने तो हंडा उघडला. आणि चमत्कार झाला. मनुष्यजातीला जेरीला आणणारी रोगराई, त्रास आणि वाईट गोष्टी, ज्या मानवाला तोपर्यंत माहीतही नव्हत्या, त्या हंड्यातून बाहेर पडल्या. तिला तिची चूक समजण्याआधीच व्हायचं ते नुकसान झालं होतं. तिने झटकन हंड्यावर झाकण ठेवलं आणि शेवटची एक गोष्ट मात्र हातची जाऊ दिली नाही. ती म्हणजे "आशा".

काल सहज विकिपीडिआ चाळत असताना पँडोराज बॉक्स वर पोचले. पँडोराज बॉक्स मधल्या पँडोराची ही गोष्ट.

एका वरदानाबरोबर मिळालेला एक शाप. अनिश्चिततेचा आणि सरतेशेवटी कुठल्याही संकटातून वर काढणारी, यायाला मदत करणारी आशा. निर्गुण, निराकार, निरंकार, अगदी परमेश्वरासारखी असावी अशी आशा. आज त्याच्यासमोर सीसीडी मध्ये बसलेले असताना, त्याच्या बोलण्याकडे बिलकूल लक्ष नव्हतं. मनात सतत पँडोराच घोळत राहिली. माझे हरवलेले डोळे कुठेतरी काही शोधत राहिले त्याच्या डोळ्यात. आयुष्याला दिवाणं बनवणारी सगळी सुखं समोर हात जोडून उभी आहेत पण त्याबरोबर पेलावं लागणारे अनिश्चिततेचं शिवधनुष्य.

कदाचित मी फारच निगेटिव्ह वगैरे विचार करणारी असेनही, पण आपल्या समाजात नक्कीच मुलीला लग्नानंतर ह्या अनिश्चिततेला सामोरं जायला लागतं. तो भेटून फार काळ नाही झाला. आणि प्रत्यक्ष भेटण्याच्या वेळा तर दोन हातांच्या बोटावर मोजता येण्यासारख्या. तेवढ्यात काय कळणार खरं काय खोटं काय? माझं जजमेंट अगदीच वाईट नाहीये. त्याच्याबाबतीत ते चुकणार नाहीही. पण त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या जगाचं काय?

पण शेवटी काहीही झालं तरी त्यातून सावरण्याची आशा ही माझीच आहे. माझी स्वतःची.

- संवादिनी