Thursday, August 27, 2009

आणखी एक गणपती

हा आठवडा गणपतीचा. गेल्या वर्षी आखातात होते गणपतीच्या वेळी. ह्या वर्षी इथे आहे. मी घरी नसतानाची ही दुसरी गणेश चतुर्थी. दोन वर्षापूर्वी आम्ही चौघेही घरी होतो. चौघे म्हणजे मी, माझा भाऊ आणि आई बाबा. गेल्या वर्षी एक मेंबर कमी. मी आणि ह्या वर्षी अजून एक मेंबर कमी, माझा भाऊ. आता आई आणि बाबा आणि आमचा सर्वांचा लाडका गणपती.

बाबाला सांगून ठेवलं होतं गणपती घरी आला की मला पहिला फोटो काढून पाठवायचा. आमचा गणपती कधीही बदलत नाही. म्हणजे मला कळायला लागल्यापासूनची जी मूर्ती आहे ती दर वर्षी तशीच असते, पण तरीही ह्या वर्षीची मूर्ती बघण्याची खूप उत्सुकता होती. मखरही पाहायचं होतं. माझा भाऊ नाही म्हणजे मखराची मजा नाहीच. त्याला मी कितीही शिव्या दिल्या तरी ह्या बाबतीत त्याचं फक्त कौतुकच होतं. ह्या वर्षी आईने केलं होतं मखर. कमळाची प्रतिकृती बनवली होती तिनं.

यंदा गणपती रविवारी आले. बरं वाटलं. सकाळी उठून बाप्पाची पूजा केली. म्हणजे आमच्या देवातल्या बाप्पाचीच. मग मोदक बनवायचा घाट घातलेला. घरी असताना आई बनवायची, आजीही बनवायची. दोन्हीकडे जाऊन मोदक खायचं काम आमचं. कधी मला स्वतःला मोदक बनवायची वेळ येईल ही रिऍलिटी तेव्हा उमजलीच नव्हती. ती परवा उमजली. आदल्या दिवशी आजीला फोन करून रेसिपी लिहून घेतली होती. आजीची रेसिपी म्हणजे गंमतच आहे. नारळ खोवून घे त्यात गूळ घाल. किती गूळ घालू? अगं घाल अंदाजाने. मीठ? अंदाजाने. तेल? अंदाजाने. पीठ? अंदाजाने. मग म्हणाली आईला फोन कर. आईने जरा सांगितलं व्यवस्थित. थोड्या वेळाने आजीचा पुन्हा फोन आला. म्हणाली नैवेद्याच्या मोदकाचं पुरण आधी चाखून बघायचं नसतं पण तू पहिल्यानेच करतेयस ना? मग पुरणाचा नैवेद्य दाखव आणि घे चव. हुश्श!

मोदक बरे झाले. मुख्य म्हणजे गोड असूनही नवऱ्याला आवडले. मला तर काय आवडतातच. मोदकाची शेंडी फोडून भरपूर तूप ओतून खाल्लेला मोदक म्हणजे जीव्हासुखाची परमावधीच. जेवणानंतर सोफ्यावर पडल्या पडल्या कधी डोळा लागला कळलंच नाही.

संध्याकाळच्या सावल्या पसरल्या आणि जाग आली. रविवारची संध्याकाळ म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा प्रकार. येणाऱ्या आठवड्याचं काम डोळ्यासमोर. इस्त्रीचा ढीग. घरातली उरलेली कामं डोळ्यासमोर दिसायला लागली. पण काही करावंसं वाटेना. घरचंच सगळं आठवत राहिलं. संध्याकाळी कोण कोण येईल? घरी बनवलेले खव्याचे मोदक कसे झाले असतील? या वर्षी गाणं होणार नाही म्हणून बाबा नाराज असेल का? खाली उत्सवात यंदा काय काय कार्यक्रम असतील? आरती म्हणताना अण्णांचा सूर जास्त टिकेल की माझ्या वयाच्या मुलांचा? यंदा मांडव घातला की घालून घेतला? हळदी कुंकू कधी आहे? मखर बनवायला माझा भाऊ नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याची आठवण काढली असेल का? माझ्या कोण कोण मैत्रिणी माहेरपणाला आल्या असतील? मी असते भारतात तर मी जाऊ शकले असते ना? उत्तरांतून प्रश्न आणि प्रश्नांतून उत्तरं असं चालू होतं.

आपल्या मनाला एक विलक्षण शाप आहे. जे आपल्याकडे नाही त्याचा विचार करत बसण्याचा आणि एक विलक्षण वरदान आहे. आपण जिथे नाही तिथे मनानेच जाऊन येण्याचं.

मी घरी गणपतीला नसण्याचा विचार करत बसले खरी. पण करता करता स्वतःच घरी एक फेरी मारून आले मनाने. आईने केलेले खव्याचे मोदक चाखले, आजीचे अंदाजपंचे बनवलेले उकडीचे मोदक अगदी शेंडी फोडून आत ओतलेल्या तुपासकट चाखून आले. उत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. दर चतुर्थीला करते तसा अण्णांना जाऊन नमस्कार करून आले. अगदी आमच्या बाईंचं गाणं पण ऐकून आले. अगदी उत्तरपूजेजे मंत्र म्हणताना झालेला बाबाचा कातर स्वरही ऐकला. आणि पुढच्या वर्षी लवकर ये, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर माफ कर आणि तुझं दर्शन घेणाऱ्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत असं निःस्वार्थी गाऱ्हाणं बाबाने देवाला घातलं की डबडबायचे तसे डोळे डबडबलेही.

गणपती जोरात साजरे झाले हेच खरं!

Thursday, August 20, 2009

मैत्रीण

सकाळी सकाळी स्टेशनला जायला निघाले. डोळ्यात पूर्ण न झालेली झोप होती. नव्या जबाबदारीचं थोडं टेन्शन.

माझा बॉस एकदम चक्रम आहे. कोणतीही व्यक्ती कोणतंही काम सहज करू शकते असा त्याचा गैरसमज आहे. म्या पामर ऍनालिस्टला त्याने सेल्स च्या कामाला जुंपलंय. काम तसं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नव्या क्लायंटला भेटणं, त्यांना आम्ही कसे चांगले आहोत च्या गोळ्या देणं वगैरे वगैरे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे साधारण तासाभराच्या मीटिंगसाठी मला तीन तास आधी निघावं लागतं. अर्धा तास एक दोन एक दोन करीत स्टेशनला पोचलं की मग तास सव्वा तास रेल्वेमध्ये झोपा काढायच्या. मग साधारण अर्धा तास ट्रॅममध्ये डुगडुगून काढला की आलं क्लायंटचं ऑफिस. ह्या सगळ्या व्यवस्थेतली माझे पाय सोडून जी इतर वाहनं आहेत ती कधीही त्यांच्या मर्जीनुसार बंद, धीमी होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी अजून अर्धा तास. बरं गाडीत झोप वगैरे झाली असल्याने माझा चांगलाच अवतार होतो. तो अवतार ठीक ठाक करायला अजून पंधरा मिनिटं.

एवढं सगळं करून क्लायंटची मीटिंग मेली तासाभरात संपते. आणि पुन्हा दोन तासाची वणवण करीत मी घरी येते.

काही दिवस हे प्रकरण चाललंय. रोज नाही जायला लागत पण बऱ्याच वेळा लागतं. रोज गाडीत एक छोटी मुलगी आणि तिची आई दिसतात. गाडी तशी भरलेली असते, पण समहाऊ आम्ही दोन तीन वेळा समोरासमोर आलो. हसण्याइतपत ओळख झाली. मुलगी जाम गोड आहे. गोरी गोरी पान. गालांचे लाल लाल टोमॅटो. निळे डोळे. निळे म्हणजे अगदी निळे. नेत्रदानाच्या ऍडमध्ये ऐश्वर्या रायचे दिसायचे तसले. आणि सोनेरी केसांना लाल निळी रिबीन बांधून केलेल्या दोन शेपट्या. दप्तरासारखी बॅग आईच्या हातात.

एकदा झटकन माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्स मध्ये दोन किटकॅटचा एक मिनी पॅक आहे. मग तिच्या आईला विचारून तिला दिली. मग एकदम बाईंची कळी खुलली. इतके दिवस नुसती हसायची. आता भरपूर बोलते. फक्त न चुकता मला किटकॅटचा मिनी पॅक न्यायला लागतो. तिची आई मला ओरडते चॉकलेट दिलं की. पण माझी ही छोटी मैत्रीण एकदम चुणचुणीत आहे. तीच आईला सांगते, की ह्या पॅकमध्ये दोन किटकॅट त्यातली अर्धी मी "शॅमा", (म्हणजे म)ला देणार, अर्धी तुला देणार, एक उरली की त्यातली अर्धी मी खाणार आणि अर्धी जेसन ला देणार. मग काय हरकत आहे? जेसन म्हणजे तिचा भाऊ.

मग उठून माझ्या शेजारी येऊन बसेल, आणि सांगत राहील "शॅमा, टीचर गेव्ह मी धिस" करून एखादी ट्रॉफी दाखवेल छोटीशी. आपल्याकडे उत्तेजनार्थ बक्षीस देतात ना तसं काहीतरी. शॅमा लुक ऍट धिस, शॅमा डू धिस, गिव्ह दॅट, अशा ऑर्डरी सुटत राहतात. तिची आई तिला ओरडते मध्ये मध्ये. पण मला बरं वाटतं. तेवढाच वेळ जातो.

परवा माझ्या पर्सशी खेळत होती आणि माझं पाकीट काढलं पैशाचं. आत नाणी होती खूप. नोटा नव्हत्या. म्हणाली शॅमा यू आर सो रिच. यू हॅव्ह सो मच मनी. एव्हन माय बँक डसंट हॅव सो मच. असं चाललेलं असतं.

परवा अशीच एक मोठी सहा तासाची वारी करून घरी आले. रोज संध्याकाळी माझ्या दिवसात काय काय झालं ह्याचे डिटेल्स नवऱ्याला कंटाळा येईपर्यंत ऐकवायला मला खूप आवडतात. बऱ्याच वेळा तो लॅपटॉप उघडून बसलेला असतो किंवा टीव्हीसमोर असतो, तेव्हा. असं? वाह! ओके, येस, अशी उत्तरं टाकून तो माझं बोलणं ऐकतोय असं दाखवत असतो. पण परवा साहेब मुडात होते कसल्या कोण जाणे पण एकदम ऐकून घेतलं, मला ट्रॅव्हेलिंगचा त्रास होतो, दमायला होतं म्हणून चहा वगैरे केला. आणि मग म्हणाला उद्यापासून नो प्रॉब्लेम. तू आपली गाडी घेऊन जा. मला लांबच्या साईटवर जायचंय म्हणून पुढचे तीन महिने कंपनीची गाडी आहे.

सही! म्हणजे आता सगळी कटकटंच मिटली. उद्यापासून मला गाडीने जाता येईल, वेळ वाचेल, कमी दमायला होईल, लवकर घरी येता येईल, पण..

पण माझी छोटी मैत्रीण आता भेटणार नाही. पर्समध्ये मिनी किटकॅट कुणासाठी ठेवू? शॅमा, शॅमा करून मला कोण हाक मारेल? मी नाही दिसले आठवडाभर तर ती नाराज होईल का? शॅमा कुठे म्हणून आईला विचारेल का? एक ना एक हजारो प्रश्न ...

रोजच्या आयुष्यात आपल्याला हजारो लाखो लोकं दिसतात. त्यातल्या एखाद दुसऱ्याशीच आपला असा सूर जुळतो. आनंद देतो, पण शेवटी विरूनच जातो.

तसं नको व्हायला. छोटीला भेटायला तरी पुन्हा कधीतरी ट्रेनने गेलंच पाहिजे.

Thursday, August 13, 2009

आपली गर्दी

गेल्या आठवड्यात एका खास कार्यक्रमाला गेले होते. खास अशासाठी की इथे येऊन बरेच महिने झाले, पण मराठी बोलण्याची संधी फारशी मिळत नव्हती. कोणतंही कारण नसताना आमचं सगळं मित्रमंडळ अमराठी झालं होतं. पण परवाच्या कार्यक्रमात म्हणजे अगदी धन्य झाले. इतके सगळे मराठी लोकं एकत्र बघून एकदम अभिमान वगैरे वाटायला लागला. कशाचा ते माहीत नाही, पण खूप छान वाटलं.

खरंतर कार्यक्रमाची जागा आमच्या घरापासून बऱ्यापैकी दूर होती. येऊन जाऊन साडेतीन चार तासाचा प्रवास होता. मला कार्यक्रमाबद्दल माहिती होती, पण माझ्या नवऱ्याला मराठी कार्यक्रमात वगैरे फार रस नाहीये. मग त्याला बिचाऱ्याला एवढं ड्रायव्हिंग करून माझ्याबरोबर यायला लागलं असतं. म्हणून काही बोललेच नव्हते. अगदी आदल्या दिवशी चुकून (थोडंसं मुद्दाम) बोलून गेले, तर उत्साहाने नवरोबा तयार.

तिथे पोचलो तर इतकी लोकं होती. सगळी मराठी बोलत होती. मध्येच कुणीतरी इंग्रजी झाडणारंही होतं. बरीच मुलं मुली होती. ती मात्र सरळ इंग्लिशमध्ये बोलत होती. अगदी अनोळखी माणसंही हसत होती. बोलत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी पुस्तकांची खाण भेटली मला तिथे. आता हवी तितकी पुस्तकं वाचता येतील ह्या जाणीवेनेच एकदम छान वाटलं. बाकी काहीही मागितलं तरी बाबा लगेच हो म्हणायचा नाही. कंडिशन घालायचा. पिकनिकला जायचंय? मग अमुक रागाच्या ताना बसव, मगच जा. उगीचच नवा ड्रेस घ्यायचाय? मग अभ्यासातलंच काहीतरी कर आधी, वगैरे वगैरे. पण पुस्तक मागितलं तर मात्र दुसऱ्या दिवशी हजर. मी नुसतं पुस्तकाचं नाव घ्यायचा अवकाश. घरी माझ्या पुस्तकांनी भरलेलं एक कपाट आहे. अगदी चांदोबा, ठकठक पासून ज्ञानेश्वरीपर्यंत सगळं आहे. अर्थात ज्ञानेश्वरी मी कधी वाचली नाही. तसा तो पुस्तकांनी भरलेला टब पाहिला आणि एकदम भरून आलं.

कार्यक्रम सुरू झाला. थीम छान होती. तरुणांचा कार्यक्रम. सगळ्या लहान लहान मुलांनी कार्यक्रम बसवलेले. नाच होते, गाणी होती, नाटक सुद्धा होतं. मला तर एकदम आमच्या चाळीतल्या गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आठवण झाली. तोच बाज होता. देश फक्त वेगळा होता इतकंच. एका नाचामध्ये एका मुलीने थेट मला माझीच लहानपणाची आठवण करून दिली. नाचता नाचता मध्येच तिला तिचे आई बाबा दिसले असणार. पठ्ठी नाच सोडून त्यांनाच हात दाखवत बसली. आमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये एका नाचात मला परी केलं होतं. बाबा ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन येणार होता. नाच सुरू झाला तरी तो येईना. मग माझा चेहरा एकदम पडलेला. आईशेजारी तो दिसला तेव्हा मात्र एकदम कळी खुलली आणि मी चक्क नाच विसरून त्यालाच हात दाखवत बसले.

कशी गंमत असते ना? आई वडलांशिवाय पानही न हालणारे आपण कधी मोठे होतो, कधी त्यांचा घट्ट पकडलेला हात अलगद सोडून पुढे पसार होतो, ना त्यांना कळतं ना आपल्याला. मग कधीतरी अशा एखाद्या बेसावध क्षणी, कुणीतरी दुसऱ्याने त्याच्या आई बाबांचा घट्ट पकडलेला हात पाहिला ना, की आपल्या हातात त्यांचा हात नसल्याची जाणीव होते.

बाकीचे कार्यक्रमही छानच होते. मुळात सगळी मुलं असल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच एनर्जी होती. त्यानेच खूप बरं वाटलं. तरुणांच्या कार्यक्रमात आपण नुसते प्रेक्षकांत बसून आहोत ह्याचं वाईटही वाटलं. पण खरंच सगळी मुलं विशीच्या आसपासची होती. मीही हळूहळू तरुण वयोगटातून रिटायर होत आहे असं उगाचच वाटलं. नवऱ्याला सांगितलं तर नुसतं हसला. म्हणाला तू हो म्हातारी आय ऍम यंग ऍट हार्ट. ह्याला काय उत्तर देणार? म्हटलं गप, मराठी कार्यक्रमात मराठी बोल उगाच इंग्लिश झाडू नको.

कार्यक्रम संपल्यावर जेवण पण होतं. ते ठीकंच होतं, पण सगळे लोकं आपापसात बोलत होते. कुणी कलाकारांचं जाऊन कौतुक करत होते. कौतुक म्हणजे कलाकाराचं इंधनच. पटकन मला वाटलं किती महिने झाले आपण परफॉर्म केलं नाही? पण एकंदरीतच लोकांच्या उत्साहात मी परफॉर्म करत नसल्याचं दुःख मागे पडलं. गर्दी खूप होती, पण आम्ही कुणालाच ओळखत नव्हतो. हॉलच्या एका कोपऱ्यात दोघंच उभे होतो. कुणी ओळखीचं दिसण्याची शक्यता नव्हतीच, पण तरीही ओळखीचे चेहरे शोधत राहिलो. नवरा म्हणाला निघूया का, म्हटलं थांब पाच मिनिटं.

ओळखीची नसली तरी ती गर्दी आपली वाटत होती. देशामध्ये गर्दीला नाकं मुरडणारी आम्ही, देशाबाहेर पडलो की मात्र तीच हरवलेली गर्दी शोधत राहतो.

असलेलं नको असणं आणि नको असलेलं हवं असणं, कुणाला चुकलंय?

Thursday, August 6, 2009

रेघोट्या

शेजारच्या घरातल्या आजी परवा दुपारी फिरायला गेले होते तेव्हा रस्त्यात भेटल्या. त्यांचं नाव करीन. मी त्यांना म्हटलं एका सुंदर बॉलीवूड ऍक्ट्रेसचं नाव करीना आहे. तर म्हणतात कशा, सुंदर आहे ना खूप? म्हटलं हो. मग म्हणाल्या तू मला करीन ऐवजी करीना म्हण. म्हटलं बरं. ह्या आजी त्यांच्या नवऱ्याबरोबर राहतात. आमच्या अगदी बाजूच्या घरात. नवऱ्याचं नाव डेव्ह. मला त्यांच्याशी नीट ओळख करायचीच होती. मग लगेचच त्यांना चहाला बोलावलं.

त्याचीही एक गंमत झाली. इथे "टी" ला बोलावलं तर त्याचा अर्थ संध्याकाळचं जेवण असा घेतला जातो. त्यामुळे ओळख नसताना कुणी एकमेकाकडे "टी" ला जात नाही. हा आधी शिकलेला धडा मी विसरले आणि त्यांना टी ला बोलावलं. आजी बाई जराश्या संकोचल्या म्हणाल्या "टी" नको, आम्ही फक्त थोडा वेळ येऊन जातो. मग माझं आपलं भारतीय आदरातिथ्य उफाळून आलं. म्हटलं चहा नको तर कॉफी करेन. मग आजीबाईंच्या सगळा घोळ लक्षात आला आणि माझ्याही. शेवटी फक्त चहाच प्यायला बोलावलंय हे कंफर्म करून करीना आजीबाई गेल्या.

शनिवारी संध्याकाळी पाचाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. करीनाआजी आणि डेव्ह आजोबा वेळेवर हजर. आजींनी जुन्या धाटणीचा एक ड्रेस घातला होता. गळ्यामध्ये मोत्याची सुरेख माळ. आजी चपला न काढताच आत घुसल्या. मला घरात कुणी चपला घालून आलेलं अजिबात चालत नाही. पण त्यांना सांगणार कसं. तितक्यात आजोबांनीच आजींना पाठी खेचलं. आणि चपला कुठे काढायच्या हे मला विचारलं. बहुतेक आमच्या पायात चपला किंवा बूट नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं असणार.

मग थोड्या इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही कुठून आलो काय करतो वगैरे आजोबांनी विचारून घेतलं. सगळ्या विषयांत त्यांना भारी रस. अगदी भारतात सासऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये काय चालतं इथपर्यंत सगळं विचारलं. ते स्वतः खाणकामगार होते. आता रिटायर झालेत. पण त्यांची एकंदरीत शरीरयष्टी बघून ह्यांनी अनेक वर्ष अंगमेहनतीचं काम केलं असणार हे कळत होतं. आजी लोकल काउन्सिल मध्ये कामाला होत्या. त्यांनीही रिटायरमेंट घेतली होती. इथे एक गंमत आहे. माणसं अमुक एक वय झालं की रिटायर होत नाहीत. त्यांना वाटेल तेव्हा होतात आणि त्यांना वाटेल तितकी वर्ष ती काम करू शकतात.

आजोबांना चाय लाटे भयंकर आवडतो असं आजींनी बोलता बोलता सांगितलं होतं. त्यामुळे मी आजोबांना इंडिअन चाय लाटे बनवलाय असं सांगितलं. इंडियन चाय लाटे म्हणजे अर्ध्या दुधाचा कडकडीत उकडवून केलेला ताजमहाल चहा! बेकरीतून नवऱ्याने पेस्ट्रीज आणल्या होत्या आणि चितळ्यांच्या बाकरवड्या आमच्या घरी खोक्यांनी पडलेल्या असतात त्या काढल्या. घरी केलेला चिवडा काढला. झाली तयारी. आजोबांना बाकरवड्या खूप आवडल्या. आजींना कवळी असल्यामुळे त्या नीट खाता येणार नाहीत हे आजोबांनीच आम्हाला सांगितलं आणि आजी चिडल्या. मला एकदम पुलंच्या पेस्तनकाका आणि पेस्तनकाकूंचीच आठवण झाली. चहा मात्र दोघांना खूप आवडला. आजोबांनी तर पुन्हा मागून घेतला.

मग बराच वेळ ते दोघं खूप बोलत राहिले. आम्हालाही खूप बरं वाटलं. परदेशात आलेले आम्ही दोघं. त्यात ह्या गावांत भारतीयांचं दर्शन कमीच. आधीच्या शहरी तसं नव्हतं. ओळखी झाल्या होत्या. मित्रमंडळ जमलं होतं. इथे आल्यापासून प्रथमच कुणी घरी आलं, खूप बरं वाटलं. कुठे कुठे फिरून जमवलेल्या भिंतीवर लावलेल्या एकेका शोपीसचं जेव्हा आजोबांनी भरभरून कौतुक केलं तेव्हा मलाच अगदी पिसासारखं हलकं वाटलं. घरी पाहुणे येणं ही घरातल्या बाईची एक गरज आहे असं मला वाटलं. तिने छान ठेवलेल्या घराचं कुणी केलेलं कौतुक ऐकणं हे फक्त लोकांना घरी बोलावल्यावरच शक्य आहे.

बऱ्याच गप्पा झाल्या. आजोबा आजींना एक मुलगी आहे, तिलाही दोन मुलं आहेत. नातवंड मोठी हुशार आहेत. खेळात आणि अभ्यासातही पुढे आहेत. त्यांनी काढलेली ड्रॉइंग्ज बघायला लगेच आजींनी मला आमंत्रण दिलं. त्यांची मुलगी इथे नसते ती दुसऱ्या शहरात आहे. तिचा नवरा चायनीज आहे आणि त्याने बनवलेलं चायनीज आजोबा आजी दोघांनाही अजिबात आवडत नाही, इथपर्यंत गोष्टी झाल्या. वेळ कसा गेला कळलं नाही.

शेवटी आजी आजोबा जायला निघाले. आम्ही दोघंही त्यांना सोडायला दरवाज्यापर्यंत गेलो. आपले संस्कार कुठेतरी खोलवर मनात रुजलेले असतात आणि काही गोष्टी प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारख्या आपण करतो. दुसऱ्या देशी, दुसऱ्या संस्कृतीत कुठेतरी त्यांना आवर घालून ठेवावा लागतो. मला खूप वाटलं, त्यांना वाकून नमस्कार करावा. पण नाही करता आला. त्याऐवजी आजींनी जवळ घेऊन गालाला गाल लावला. अतिशय मायेने त्यांनी पाठीवरून हात फिरवला. एकदम थेट आजीच आठवली. अगदी मनात येईल तेव्हा मी आजीकडे जायचे. जे खावंसं वाटेल ते सांगायचे आणि तीही करून घालायची. आजी भारतात हरवली आणि आम्ही इकडे हरवलो. शेजारच्या आजी आजोबांची मुलगी दुसऱ्या शहरात हरवली आणि ते इथे.

आईचं रेघोट्यांचं पेंटिंग आठवलं. आमच्या हॉलमध्ये समोरच लावलेलं आहे अगदी. तिचा विचार हा की माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं.

असं बनतंय आमचं इथलं रेघोट्यांचं पेंटिंग.

Thursday, July 30, 2009

तीन पायाची शर्यत

शनिवारी सकाळी सकाळी एकटीच गाडी घेऊन बाहेर पडले. शनिवार आणि रविवार म्हणजे आमच्या घरी दिवस रात्र झोपण्याचे वार. पण दिवस रात्र झोपणं मला झेपण्यातलं नाहीच आहे. मग काय करा? सकाळी सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता. पतिराजांच्या मानाने ही पहाटच) उठले काढली गाडी आणि निघाले. दोन पर्याय होते. एक म्हणजे जवळच्याच मोठ्या शहरात जायचं किंवा समुद्राच्या कडेकडेनं जाणाऱ्या रस्त्याने लांब भटकायचं.

गाडीत बसले. गॅरेज उघडलं. बाहेर पडणार इतक्यात वाटलं नवऱ्याला विचारावं येतो का ते. नाही म्हणणार हे पुरतं माहीत होतं पण तरीही तिथूनच गाडीत बसल्या बसल्या फोन केला. बराच वेळ वाजून व्हॉईस मेसेजवर गेला. त्याला तिथेच व्हॉईस मेसेज ठेवला की मी जात आहे. दुपारपर्यंत येईन. शेवटी करता करता समुद्राचा रस्ता पकडला. तसा दिवस उगवला असला तरी लोकं उगवायची होती त्यामुळे रस्ते रिकामेच होते. भरभर गाडी चालवत समुद्राजवळच्या रस्त्याला लागले. जिथे जिथे म्हणून थांबता येणं शक्य होतं तिथे तिथे थांबले. नवऱ्याचा नवा कोरा एसएलार कॅमेरा घेतला होताच अशक्य फोटो काढले.

थंडी होतीच. हुक्की आली म्हणून खिडकीच्या काचा उघडल्या. भन्नाट वारा सुटलेला अंगाला झोंबायला लागला. किशोरीताईंचा तोडी लावला होता. एकेक मधामध्ये सत्तर सत्तर वर्ष घोळलेला स्वर. तो कोमल ग. एकदम माझ्या गाण्याच्या बाईंची आठवण झाली. एका स्पर्धेत तोडी म्हणायचा होता. त्याची तयारी करून घेत होत्या त्या. मी लहानंच होते. सूर कळण्याचं वय नव्हतं. पण मी योग्य तेच गावं हा त्यांचा हट्ट. तोडीमध्ये कोमल ग, अतिकोमल लागला पाहिजे. कितीदा रटवून घेतलं होतं. अख्ख्या गाण्यापेक्षा अतिकोमल ग चा रियाज जास्त करून घेतला होता. स्पर्धा झाली. बक्षीस मिळालं. पण बाई रागावल्या. म्हणाल्या एवढं शिकवून आलं कसं नाही तुला? बक्षीस मिळाल्याच्या कौतुकापेक्षा सूर हवा तसा बरोबर लागल्याचं कौतुक त्यांना जास्त. अशा आमच्या बाई. गचकन कुणीतरी हॉर्न मारला आणि बाई आठवणीत हरवून गेल्या परत.

एका ठिकाणी उतरले उंचावरची जागा. समोर अथांग समुद्र पसरलेला. वारा सुटलेला, त्याची सुरावट कानात. किती वेळ झाला कोण जाणे समाधीच लागली. समुद्राचा आणि माझा एक विलक्षण ऋणानुबंध आहे. तो कसाही असला तरी मला आवडतो. अगदी ओहोटीचा हिरमुसलेला दिसणारा असला तरी आणि उधाणलेला भरतीचा असला तरी. अख्खं विश्व पोटात गुडुप करून ठेवण्याची ताकद आहे त्याची. त्याच्याकडे बघताना भारावून जायला होतं.

नवऱ्याच्या फोनने भानावर आले. नुकताच उठला होता. मला म्हणाला मला का नाही उठवलं. म्हटलं मित्रा, मी फोन केला होता. तू उचलला का नाहीस. म्हणाला, काय बाई एका घरात राहून एकमेकांना फोन करतो आपण. मी म्हटलं मग काय बुवा, एका माणसाला झोपण्यापुढे काही सुचत नाही. आणि दोघंही जोरजोरात हसलो. इतकं की बाजूला गाडी लावून उभी असलेलं एक अख्खं कुटुंब माझ्याकडे बघायला लागलं. मग मी गाडीत जाऊन बसले आणि चक्क नवऱ्याबरोबर तासभर गप्पा मारल्या. मी त्याला जेवायला येते म्हणून निरोप ठेवला होता आणि इथे गाडीत अर्ध्या रस्त्यातच जेवायची वेळ झाली.

मग काय फिरले परत. घरी पोचते तर शिरता शिरताच मस्त जेवणाचा वास आला. नवरोबा मुडात होते तर आज. एकदम त्याची लाडकी चिकन करी आणि कोकोनट राईस वाटच बघत होते. मग काय? दोघांनी मिळून फडशा पाडला.

माझं मलाच हसायला आलं. आमच्या वाडीत उत्सवाच्या वेळी दर वर्षी तीन पायांची शर्यत असायची. ती आठवली. मी आणि रमा नेहमी भाग घ्यायचो. रमा म्हणजे माझी बेस्ट फ़्रेंड. अजूनही आहे. माझ्याशिवाय तिचं आणि तिच्याशिवाय माझं अजिबात पान हलायचं नाही. पण तीन पायाच्या शर्यतीत एकदा पाय बांधले की आमची धमालच व्हायची. कधी तिचा पाय पुढे कधी माझा पाय मागे. असं करत करत पंधरा वेळा पडायला व्हायचं. मग ती माझ्यावर चिडणार किंवा मी तिच्यावर चिडणार. कशी बशी आम्ही लाइन ओलांडायचो. ते एकदा मात्र झालं की वेड लागल्यासारखं हसायचो. आम्ही कसे पडलो, लोक आम्हाला कसे हसले, मग आम्हीच एकमेकीवर कसे चिडलो आणि ओरडलो, कधी तिने मला कसं खेचलं कधी मी तिला कसं ढकललं ह्याचीच मजा. तेव्हा वाटायचं एवढ्या आम्ही जीवा भावाच्या मैत्रिणी मग आमचे पाय एका लयीत का पडू नयेत?

आताशा थोडं कळायला लागलंय की हे लग्न प्रकरण म्हणजे पण तीन पायाची शर्यत आहे. एकट्याने चालायचा प्रयत्न केला तरी चालता येत नाही आणि दोघांनी एकत्र चालता चालता एकमेकांच्या चालण्याशी जुळवून घेतानाच दमछाक होते. पडणं होतं, रडणं होतं. पण सगळ्यात शेवटी आपण एकत्र काहीतरी अचीव्ह केला हा आनंदही असतो.

अशी आहे आमची तीन पायाची शर्यत. पडणे, रडणे आणि खळखळून हसणे ह्या चक्रातून जाणारी.

Thursday, July 23, 2009

धुमसतं बर्फ

उद्या बर्फात जायचं. शुक्रवारी ओरडतंच नवरा घरात शिरला.
त्याच्या एका कलीगबरोबर त्याने प्रोग्रॅम ठरवून पण टाकलेला. त्याच्यापेक्षा खरंतर मलाच ह्या सर्व गोष्टींचा उत्साह जास्त आहे. प्रचंड उत्साहात करण्याची एकंच गोष्ट त्याला माहीत आहे. ती म्हणजे झोपणे. शनिवारी-रविवारी चांगलं बारा वाजेपर्यंत ताणून देऊन अर्धा विकेंड लक्षात न राहिलेली स्वप्न बघण्यात घालवायचा हा त्याचा शिरस्ता. तर विकेंडला लवकर उठून पूर्ण दिवस सत्कारणी लावायचा हा माझा. त्यामुळे आम्ही एकत्र फिरायला वगैरे जाण्याचा योग मणिकांचन किंवा दुग्धशर्करा वगैरे जे प्रकरण आहे त्यात मोडणाराच. त्यामुळे अजून बरं वाटलं.

ठिकाण तर ठरलेलं होतं. त्यापुढे माझा आणि त्याचा अजून एक वादाचा विषय. त्याला पोचायची घाई फार. मला अजिबात नाही. किती वेळात पोचलात ह्यापेक्षा कसे पोचलात. प्रवासात मजा केली का? किती ठिकाणी उतरलात? कोणत्या नव्या जागा पाहिल्यात? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची मजा मला खूप वाटते. म्हणजे ते रक्तातच आहे. गोव्याला जाताना आम्ही तीन तीन दिवस लावलेत मुंबईहून. बाबाचं म्हणणं, रोज एक वेगळी पिकनिक करायची. वाटेल तिथे थांबावं. हवा तितका वेळ मज्जा करावी आणि वाटेल तेव्हा पुढे जावं. त्यामुळे मला अगदी सगळीकडे उतरून वेळ घालवावासा वाटतो. अरे थांब ना जरा म्हटलं, की म्हणणार. बर्फात चाललोय ना? मग हे झरे नि झाडं नि पक्षी काय बघत बसतेस. हा. काय करा? जोरजोरात पळत सुटा, गाडी दोन आकडे वरच चालवा स्पीड लिमिटच्या. करत करत शेवटी पोचलो.

पुढे एका ठिकाणी गाडी थांबवून गाडीच्या चाकांना चेन लावावी लागली म्हणजे गाडी बर्फावर घसरत नाही. ती लावायला म्हणून नवरा बाहेर उतरला. मला पण उतरायची हुक्की आली. उतरले पण बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लगेच आत येऊन बसले. लगेच नवरा म्हणाला, आता जिथे जिथे थांबायचं असेल तिथे सांग नक्की थांबवणार. फक्त उतरायचं आणि बाहेर जाऊन यायचं. झालं आता सगळा वेळ त्याला हे पुरणार होतं.

वर पोचलो. स्कीइंग करायचंच होतं. मग त्याचे कपडे आणि स्कीज घेतले होतेच. पण ते स्कीज पायावर चढवायची वेळ आली तेव्हा खरा प्रॉब्लेम झाला. स्कीज लावले की उभंच राहावं लागतं. पडलात तर स्कीज सोडवून उभं राहून परत घालावे लागतात. असं करता करताच बराच वेळ गेला. त्याच्या मित्रानं आम्हाला शिकवलं. पण माझी प्रगती न पडता एका ठिकाणी उभं राहण्याइतपतच झाली. नवऱ्याला बाकी जमलं. त्याने आधीही केलेलं होतं. थोड्या वेळाने मी स्कीज उतरवले आणि सरळ खांद्यावर घेऊन फिरायला लागले. दुसऱ्या दिवशी खांदा खूप दुखत होता.

नवरा आणि त्याच्या मित्राचं स्कीइंग जोरात चालू असल्याने मी एकटीच राहिले.

मग कॉफीचा एक कार्डबोर्ड कप घेऊन निवांत एका ठिकाणी बसले. समोर सगळं पांढरं जग होतं. माझ्या समोरूनच एक छोटी मस्तपैकी स्कीइंग करत गेली. माझ्या कंबरेपर्यंतपण नसेल तिची उंची. रंगीबेरंगी कपड्यातली माणसं, सगळ्यांच्या गोंड्याच्या कानटोप्या. कुठेच नजरेत भरणारी एखाद्या देशी माणसाने किंवा बाईने घातलेली मंकी कॅप. बर्फावरून मस्त घसरणारी, एकमेकांवर बर्फ फेकणारी मुलं. त्यांना ओरडणाऱ्या आया, आणि मुलांना सामील होऊन ओरडणाऱ्या आयांचा अंगावर बर्फ उडवणारे बाबा. कुठे बर्फावर घसरत आइसक्रीम खाणारी जोडपी.

काही कारण नसताना उगाचच मला भरून आलं. कशामुळे? खूप विचार केला पण तरीही समजलं नाही. कदाचित अशा एखाद्या गर्दीने भरलेल्या क्षणी खूप एकटं वाटून जातं, एकटं नसतानाही. तसंच झालं असावं माझं. पुन्हा फिरून आपण काय करतोय, आपल्याला काय करायचं होतं? बर्फाने भरलेले डोंगर स्कीज लाऊन धडाधड उतरावं, तसं माझं मन ओळखीचीच वळणं घेत घेत तळाला कधी जाऊन पोचलं कळलंच नाही. तळाला पोचल्यावर, पुन्हा कधीतरी घसरत खाली येण्यासाठी, मोठ्ठा डोंगर चढावा लागणार ह्याची जाणीवही झाली.

तेवढ्यात नवरा आणि त्याचा मित्र दमून भागून आले. त्याला लहान मुलासारखं लांबून हात हलवत माझं लक्ष वेधून घेताना पाहिलं आणि खुदकन हसायलाच आलं. खांद्यावर स्कीज टाकून पुन्हा एकदा मी निघाले. डोंगर चढायला.

बर्फावरची भुरभूर सुरू झाली. धुमसत्या बर्फावर आकाशातून पडणाऱ्या बर्फाने चादर घातली. धुमसतं बर्फ क्षणभर हसलं. पुन्हा आतल्या आत धुमसण्यासाठी.

Thursday, July 16, 2009

माणसांची सवय आणि सवयीची माणसं

हल्ली घरून काम करतेय. म्हणजे ऑफिसात अजिबात जायचंच नाही. अगदी अख्खा दिवस, अख्खा आठवडा घरून काम. पहिल्यानं वाटलं, मज्जाच मज्जा. घरी मी एकटीच त्यामुळे काहीही करा, वॉच ठेवायला बॉस नाही, कलिग्ज नाहीत, कुणीच नाही. मनाला वाटेल तेव्हा काम करायचं, नाही वाटणार तेव्हा सोडून द्यायचं. झोप काढावीशी वाटली, झोपायचं अगदी काही न करावंसं वाटलं तर तसं करायचं. पण ह्या सगळ्याच्या शेवटी काम तर वेळच्या वेळी झालंच पाहिजे ना.

आता एक आठवडा होत आला. आताशा कंटाळाच यायला लागलाय. म्हणजे, जिथे राहायचं तिथेच काम करायचं आणि काम संपल्यावर पुन्हा जिथे काम केलं तिथेच राहायचं. सकाळची ट्रेन गाठायची धावपळ नाही, की डबा भरायची दगदग नाही. नवरा आपला बिचारा त्याची वेळ झाली की उठतो, फ्रीजमध्ये काल भरून ठेवलेला डबा उचलतो आणि चालता होतो. तो गेलाय हे कळेपर्यंत तो बहुतेक ऑफिसात पोचलेला असतो. मग कंटाळत उठून कामाला सुरवात करायची. अगदीच एकटं एकटं वाटलं तर आरशात जाऊन बघायचं, नाहीतर काहीतरी काम काढून नवऱ्याला फोन करायचा किंवा जॉर्जीला करायचा किंवा आणखी कुणालातरी. कुणालातरी गूगलवर सतवायचं, असले उद्योग चालू असतात.

पण दुपार सरायला लागते, तसं मग कामाचं टेन्शन वाढतं, कारण अमुक एक काम आज संपवायचं असतं. तमुक एक प्रेसेंटेशन संपवायचं असतं कारण बॉसची मीटिंग असते. विकली मीटिंगमध्ये उगाचच उत्साहाने एखाद्या कलीगला मदत करायचं आता नकोसं वाटणार ओझं घेतलेलं असतं ते आठवायला लागतं. कल करेसो आज कर आज करेसो अब चं एकदम उलटं माझं चाललंय. अब करेसो आज कर, आज करेसो परसो.

आणि वर घुम्यासारखं घरात एकटं राहणं. तसं एकटं राहण्याच्या मला प्रॉब्लेम नाही. इन फॅक्ट, एकटं राहायला मला आवडतं कधीकधी. म्हणजे मी गमतीत म्हणायचे, की मी हरवून एखाद्या व्हर्जीन आयलंडवर वगैरे पोचले तर आरामात एकटी राहू शकीन (तिथे पाली आणि झुरळं नसतील तरच. मला त्यांची अनावर भीती वाटते). पण खूप कठीण आहे. जस्ट टू चेंज युअर एन्व्हायरमेंट, वन नीडस टू गो टू ऑफिस.

माणसं किती आवश्यक आहेत एकंदरीतच आयुष्यात. ऑफिसात इतकी माणसं असतात, त्यांच्याशी आपण बोलतो, नाही बोलतो, हसतो, कधी कधी नाही सुद्धा हसत, पण त्यांचं नुसतं असणं किती आनंददायक असू शकतं ते मला आता कळतंय. मग ह्यावर उतारा म्हणून भर दुपारी फिरायला (आणि मनात असेल तेव्हा पळायला) जायचं काढलंय. लंच टाइम वॉक. भर दुपारी व्यायाम हा प्रकार भारतात एकदम भारीच वाटेल. पण इथे सकाळी आणि संध्याकाळी एवढी मरणाची थंडी असते की मी बाहेर गेले तर माझा गोठून पुतळा होईल. एकदम हाउस ऑफ वॅक्स सारखा फक्त मेणाशिवाय बनवलेला.

हळू हळू शेजार पाजाराची माणसंही ओळखीची व्हायला लागलीत. आमचा हा गाव म्हणजे तसा म्हाताऱ्यांचाच गाव आहे. एका बाजूला एक म्हातारे आजोबा आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक म्हातारे आजी आजोबा आहेत. आजी आजोबांचं काहीनं काही चाललेलं असतं. अजून फारशी ओळख नाहीये. पुढे मागे वाढली की त्यांना चहाला बोलवायचा विचार आहे. एकटे आजोबा आहेत त्यांचं बहुतेक त्यांच्या बागेवर प्रचंड प्रेम आहे. घराच्या खिडकीतून त्यांचं अंगण दिसतं. सतत काही ना काही बागेत चाललेलं असतं. जाता येता कधी दिसले तर हात करतात आणि जोरात ओरडतात "गूड डे".

मी फिरायला जाते तेव्हा मला अजून एक आजी दिसतात. बरोबर त्याच वेळी त्या त्यांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडतात. नाक्यावरच्या प्लॉटवर घराचं काम चाललं आहे, तिथले ट्रेडस्मन दिसतात. बघून बघून हाय हॅलो सुरू झालं आहे. आमचं लॉन कापायला एक अजून एक आजोबा आहेत. ते बरीच घरं करतात आमच्या स्ट्रीटची, ते दिसतात. कधी घरी पैसे घ्यायला ते येतात. तेव्हा थोड्या गप्पा होतात.

आपल्याला माणसांची सवय होते आणि सवयची माणसं दिसली नाहीत की चुकल्यासारखं होतं. होतं काही दिवस पण मग नवी माणसं सवयीची व्हायला लागतात आणि मग ते चुकचुकणं कमी होतं. तसंच काहीसं माझं चाललंय.

एकटी एकटी म्हणून आता मीही माझा गोतावळा जमवायला सुरवात केलीच आहे की.

Monday, July 6, 2009

होडी

बऱ्याच दिवसांनी आज निवांतपणा मिळाला. दिवसभराच्या लढाईत इतकं हरवून जायला होतं की आपला म्हणून काही वेळ असू शकतो हेही लक्षात राहत नाही. हल्ली हल्ली तर तो असावा अशी अपेक्षासुद्धा नाहीशी होत चालली आहे. पण आज तसं नाहीये. बऱ्याच दिवसांनी एकटीनंच घरी बसून आळोखे पिळोखे देत दिवस घालवायची संधी चालून आली. आणि दोन्ही हातांनी मी ती संधी आपलीशी केली.

सकाळी उशीरानेच उठले. उठल्यावर काहीच करायचं नसल्याने एकदम बावचळल्यासारखं झालं. मग चहा करायचं ठरवलं. फ्रीज उघडून बघते तर आतमध्ये दुधाच्या डब्या ठेवलेल्या. प्रत्येक डबीत फार फार तर तीन चमचे दूध. अशा फारा डब्या रिकाम्या करून चहाचा घाट घातला. कुठल्याश्या मंद इंग्लिश चहाच्या डिप डिप पिशव्या सापडल्या. त्या तशाच टाकाव्या का फोडून चहाची पावडर पातेल्यात टाकावी ह्याचा विचार करता करता आधण उकळलं सुद्धा. गाळणं मिळालं नाही, मग तशाच पिशव्या पातेल्यात टाकल्या. चहाची चव आणि चहाचा रंग हे दोन्ही चहा पिण्याच्या एक्स्पिरियन्सचा अविभाज्य भाग आहेत. आणि रंग चांगला आला नाही तर चव चांगली लागत नाही, असं हे जुळ्याचं दुखणं. अर्ध्या पातेल्याचा ढग झाला तरी हवा तो रंग येईना. मग जसा झाला, ज्या रंगाचा झाला तो चहा मगात घेऊन खिडकीपाशी आले.

पावसाची रिपरिप चालूच होती. खिडकीच्या काचेपाशी येऊन चहाचा एक घोट घेतला आणि एका उःश्वासासरशी मनातलं धुकं काचेवर दाटलं. मग उगाचच काचेवर धुक्याचं पेंटिंग करत राहिले बराच वेळ. काच भरली की मग बोटांच्या ब्रशनी त्याच्यावर नक्षी काढायचा खेळ. मग उगाचच थंड काचेला गाल चिकटवून खिडकीबाहेर बघत राहणं. वेळ कसा गेला कळलं नाही.

पावसाचा जोरही थोडा वाढला. खिडकी उघडली आणि थंड हवेचा झोतच अंगावर आला. देशातला पाऊस असा कधीच नव्हता. हा पाऊस दूर लोटणारा वाटला. देशातला पाऊस जवळ घेणारा. मनसोक्त भिजता येण्यासारखा. हा पाऊस गरम गरम चहाचा कप घेऊन हीटरच्या शेजारी खुर्ची टाकून स्वेटर बिटर घालून बंद काचेतून बघायचा पाऊस. एखाद्या रम्य चित्रासारखा, पण तरीही आपल्याला त्या चित्रात सामावून न घेणारा. एकलकोंडा.

हॉटेलच्या नावासकट ठेवलेलं एक नोटपॅड दिसलं. हॉटेलात नोटपॅड का ठेवत असावेत हे मला समजत नाही. कुणीही कधी त्यावर काही लिहिलेलं ऐकीवात नाही. लहान होते, आणि कधी अशा हॉटेलात राहायची वेळ आली तर मात्र न चुकता ती नोटपॅड्स उचलून घरी घेऊन यायचे मी. छान छान कागद त्यावर मस्तपैकी हॉटेलचं नाव छापलेलं. आणि त्याचा एक एक कागद आवाज न करता फाडता यायचा. मग त्याची बसची तिकिटं व्हायची. बसची का? विमानाची पण व्हायची. आमच्या विमानात पण कंडक्टर असायचा आणि तो सगळ्यांना विमानात चढल्यावर तिकिटं द्यायचा. मला कंडक्टर व्हायला खूप आवडायचं, अगदी ड्रायव्हरपेक्षाही.

मनात काय विचार आला कोण जाणे, म्हटलं कागदाची होडी करू. जरा आठवून आठवून बनवायला लागले. पण मला नुसती शिडाची होडी बनवता येईना. नांगरहोडी मात्र बरोबर जमत होती. कुणी होडी बनवायला शिकवली आठवत नाही. बहुतेक बाबानेच. पण साधी शिडाची होडी बनवणं सोपं असतं आणि नांगरहोडी बनवणं कठीण असतं एवढं आठवत होतं. पण तरीही साधी शिडाची होडी काही जमली नाही. कठीण आणखी कठीण आणखी आणखी कठीण अशा पायऱ्या चढत जाताना कुठेतरी आयुष्यातलं साधं सोपं कुठेतरी हरवून जातं ना? तशीच माझी साधी शिडाची होडीही हरवून गेली.

शेवटी नांगराच्या होडीचं नांगत कात्रीने कापून टाकलं आणि झाली तय्यार माझी साधी शिडाची होडी. मग हळूच दारासमोरच्या पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोचले आणि आजूबाजूचं कुणी मला बघत तर नाही ना असं बघून ती होडी सोडून दिली खालच्या पाण्यात. पाहत राहिले अगदी नजरेआड होईपर्यंत. जिथपर्यंत दिसली तिथपर्यंत दिसली, पुढे तिचं काय झालं? कशात जाऊन ती शेवटी बुडली असेल, किंवा किती लांब गेली असेल, किंवा एखाद्या लहान मुलाला ती दिसली असेल आणि त्याने ती उचलून घेतली असेल, की कुणाच्या पायाखाली येऊन ती मोडली असेल, ह्याचाच विचार बराच वेळ करत राहिले.

थंडी असह्य झाली तेव्हाच भानावर आले. शहर बदललं पण प्रवास थांबणार का? नाही. माझी नांगर कापून टाकलेली शिडाची होडी अशीच वाहवत जाणार, पाणी नेईल तिथे.

पण त्या वाहून जाण्यातही एक मजा आहेच की?

Thursday, May 21, 2009

वाट पाहण्याचा खेळ

मेपलच्या झाडाची पानं पडायला लागलीत. हिवाळा आता काही फार दूर नाही. हवेतला गारवा वाढायला लागलाय. हल्ली संध्याकाळी, पडत्या उन्हाच्या किरणांच्या शाली पांघरून येईनाश्या झाल्यात. त्याऐवजी काळ्या रंगाच्या अंधाराचं जाजम पांघरूनच त्या पसरतायत.

गोधुल्या वेळी सूर्याने आपला पसारा आवरत घेतला की उगाचच रिकामं रिकामं वाटतं. नारायणाचं दुकान बंद झालं की उरतो हताश रिकामपणा. अंधार. अंधाराची मला भीती वाटते. अंधारापेक्षासुद्धा लांब लांब होत चाललेल्या सावल्या ज्या वेळी नाहीश्या होतात ती वेळ मला भीती घालते. म्हणूनच कदाचित तिला दिवेलागणीची वेळ म्हणत असावेत. संध्याकाळी मी घरी पोचते. दाराचा रिकाम्या घरात घुमणारा आवाज असह्य वाटतो. दिवसाउजेडी प्रकाशाने भरून गेलेला आमचा दिवाणखाना संध्याकाळी एकदम ओकाबोका वाटतो. जणू काही आम्ही तिघं राहतो तिथे. मी, तो आणि अख्ख्या घरात भिंतीएवढ्या खिडक्यांतून पसरून राहिलेला उजेड. उन्हाळ्यात मला घरी कधी एकटं वाटलं नाही कारण घर उजेडानं भरलेलं असायचं.

हल्ली वाटतं. रस्त्यावरच्या दिव्याचा चोरून खिडकीवाटे घरात शिरणारा प्रकाश पराभूत सैनिकाप्रमाणे वाटतो. त्याच्या पराभवाची छाया मग माझ्यावर पडायला लागते. तो अंधार मग माझ्यातला उत्साह शोषून घेतो. मलाही करून टाकतो निस्तेज आणि निरर्थक

मग मी काय करते? चटकन हात पाय धुते आणि देवाघराकडे जाते. अगदी निरांजनात वात लावण्याचादेखील धीर नसतो. तेव्हा असं वाटतं आधी कुणी वात लावून ठेवली असती तर? पण मग मलाच त्यातला फोलपणा जाणवतो. कारण सकाळी घाई गडबडीत पूजा करून तेवत्या निरांजनाला एकटं सोडून मीच नाही का निघून जात? घाईघाईने वात निरांजनात लावून घट्ट झालेलं तूप कसंबसं त्यात घालून काड्यापेटीने दिवा लावला की मग थोडा हायसं वाटतं.

त्या तिथे तेवत्या निरांजनासमोर देवासमोर हात जोडून एकटीनेच उभी असताना गळ्यात विलक्षण कढ दाटून येतो. कंटाळा करून आईचा ओरडा खाऊन म्हटलेलं शुभंकरोती आठवतं. शुभंकरोती नाही, आईच आठवते. लहानपणाचे दिवस आठवतात. तेव्हाही संध्याकाळी अशीच चलबिचल व्हायची मनाची. आधी आई यायची घरी मग बाबा यायचा. दिवे लागले की खूप मस्त वाटायचं. आता कुणीच येणार नसतं बराच वेळ.

देवघराच्या निरांजनासमोर प्रकाशात दिसणाऱ्या इटुकल्या पिटुकल्या देवांच्या मूर्ती पाहिल्या की स्थिर वाटतं. मग मी उगीचच अख्ख्या घरातले दिवे लावते. तरीही समाधान होत नाही, मग रेकॉर्ड प्लेयर लावते. तिथेही मारवाच लागतो. हृदय पिळवटून टाकणारे मारव्याचे सूर मला खूप आवडतात, पण त्याक्षणी असं वाटतं की नको हा मारवा. अजूनच उदास उदास करून टाकतोय मला.

मग उशीरापर्यंत मी काही बाही करत राहते, स्वैपाक, थोडी इकडली तिकडली कामं ह्यात जीव रमवत राहते. काम करता करता मन आठवणींचा खेळ खेळायला लागतं. नाजूक सोन्याच्या कड्यांनी बनवलेल्या नेकलेससारख्या एकात एक गुंफत एकमेकीचे हात धरून आठवणी फेर धरतात अगदी नवरात्रीतल्या भोंडल्यासारख्या.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई. मग एकेक पाहुणा एकेका आठवणीच्या गाडीत बसून येतो. आई येते, ओरडून जाते. बाबा येतो रडवून जातो. भाऊ येतो चिडवून जातो, मैत्रिणी येतात सुखावून जातात, नवरा येतो चिंबवून जातो. थोड्या वेळासाठी का होईना आपल्या माणसात असल्याचा आभास निर्माण होतो. कधी आजी आठवते. तिची अंगाई आठवते.

आमच्या गं दारावरनं, कुणाची गं गेली रंगीत गाडी, त्यात होती भावा बहिणींची जोडी, विनू शमा. आजीचा तो आवाज, डोळ्यात हमखास पाणी आणणारी अंगाईची चाल. सगळं सगळं आठवतं. अगदी आजीच्या कुशीत ही अंगाई ऐकल्यावर स्फुंदून स्फुंदून रडणारी मी सुद्धा आठवते.

आठवता आठवता कधी डोळा लागतो कळतंच नाही. मग रात्री थंडीने टोचून टोचून हैराण केलं की मग उठून पांघरुणात शिरायचं.

ओट्यावर केलेला स्वैपाक खाणाऱ्या तोंडाची वाट पाहत एकटा पडून राहतो. निरांजन कधीच विझलेलं असतं तेही पुन्हा कोण वात घालील, तूप घालील आणि मी प्रकाशमान होईन ह्याची वाट पाहत बसलेलं असतं. आतमध्ये विझलेली मी आणखी एका उजळ दिवसाची वाट पाहत पडून असते.

माझ्या पिटुकल्या जगात हल्ली असा वाट पाहण्याचा खेळ चालू असतो.

- संवादिनी

Thursday, April 2, 2009

जॉर्जी

काल संध्याकाळी ऑफिस सुटता सुटता जॉर्जी भेटली. तिला पाहिलं ना की मला फुलपाखराची आठवण येते. एकतर अतिशय सुंदर निळे डोळे आहेत तिचे. सोनेरी केस आणि अगदी उमललेल्या फुलासारखं टवटवीत हसणं. नाकी डोळी एकदम नीटस आणि मनाने खूप चांगली. अवखळ, मस्तीखोर पण कामातही हुशार. अशा ह्या उत्साहाच्या कारंज्याला दुष्काळानं गाठलं असं म्हणावा असा तिचा चेहरा झालेला.

बाईंचं काहीतरी बिनसलं होतं. तशा आम्ही काही फार जवळच्या नव्हे. मी इथे येऊन जेवढे दिवस झाले तेवढीच आमची ओळख. एकत्र काम करतो म्हणून झालेली. पण मग थिएटरची तिची आवड आणि माझी नाटकाची आवड असेल किंवा उगाचच निष्कारण बोलत बसण्याची सवय असेल आमची थोडीशी घसट वाढली, पण तरीही तीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मला आणि माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल तिला काहीच माहीती नव्हती. तरीसुद्धा न राहवून मी तिला विचारलंच काय झालं म्हणून.

खोटंखोटं हसून ती काही नाही कामाचा ताण आहे वगैरे बोलली. लिफ्टमधून आम्ही एकत्रच उतरलो. उतरल्यावर आमचे रस्ते वेगळे आहेत म्हणून मी तिला बाय म्हणून वळले आणि चालायला लागले. तितक्यात तिने पाठून हाक मारली. म्हणाली काय करणारेस घरी जाऊन? काही खास? म्हटलं अजिबात नाही. मला काहीही करण्यासारखं नाहीये घरी. म्हणाली चल लेटस हॅव्ह अ ड्रिंक. म्हटलं बाई, मला एखदं ड्रिंकसुद्धा झेपत नाही. मी नुसती कंपनी द्यायला येते. म्हणाली चालेल.

जवळच्याच एका कॅफेमध्ये आम्ही दोघी शिरलो. रस्त्याच्या जवळचं, काचेला खेटून असलेलं एक मस्त टेबल पकडलं. आग्रह करून करून शेवटी मला तिने एक कॉकटेल घ्यायला लावलंच. कुठल्या कुठच्या आम्ही दोघी. पण मैत्रीणीच्या अधिकाराने तिने मला आग्रह केला आणि मलाही मोडवला नाही. बराच वेळ तिथे बसलो होतो. जॉर्जी पीत होती, सिगरेट ओढत होती आणि बोलत होती.

धरणाचे दरवाजे उघडावेत आणि बदाबदा पाणी कोसळावं तसं बोलली. तिचा देश, तिचं शहर, तिची आई. घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारा बाप. दारू पिणारा, दारूच्या नशेत बायका पोरांना बडवून काढणारा. म्हटलं काय वेगळं आहे गं तुमच्या आणि आमच्या देशात? जिथे पुरुष आहे, दारूचा अतिरेक आहे, तिथे बाईचं मार खाणं आलंच. मग देश कुठलाका असेना? एकेक पाव खाऊन दिवस काढलेत तिने लहानपणी, पावाबरोबर मांसाचा तुकडा मिळाला म्हणजे एकदम मेजवानी असं काहीसं जगणं. साम्यवादाचा पगडा, मग त्यातून झालेली सुटका, मोकळा श्वास. शिकण्यासाठी लंडनला येणं, तिथून इथे येणं. किती मोठा प्रवास तिचा. मी अवाक होऊन ऐकत होते जॉर्जी बोलत होती.

वाक्या वाक्याला बापाबद्दलचा, स्वतःच्या देशाबद्दलचा राग. नको नको त्या शिव्या देणं. पण तिला थांबवण्याची ताकत माझ्यात नव्हती. आणि तिचं काय चूक होतं? मुलांच्या पावाचे पैसे दारूत उडवणाऱ्या बापाला शिव्या नाही द्यायच्या तर काय? मला माझा बाबा आठवला. एकदा मी बाबाला खूप हट्ट केला होता. मला एकदम महागातले वॉटर कलर्स हवे होते. तेव्हा आमची परिस्थिती उगाचंच पैसे फुकट घालवण्याइतकी चांगली नव्हती. पण मला नाही म्हणाला नाही तो. खरंतर साधे रंग घेऊन देता आले असते. पण दोन गोष्टींपुढे त्याला काहीही मोठं नव्हतं, एक म्हणजे कलेची जोपासना आणि दुसरं म्हणजे त्याची लाडकी मुलगी. ज्या गोष्टी सहजच मिळत जातात त्याचं कौतूक वाटत नाही हेच खरं.

बराच वेळ आम्ही बोलत होतो. संध्याकाळ सरून रात्र झाली, गाडी विषयांचे रूळ बदलत होती पण एकच समान धागा तो म्हणजे तिचा बाप. तिने मला विचारलं बाबाबद्दल. मी काय सांगणार? तिला अजून वाईट वाटेल असं मला काहीच बोलायचं नव्हतं म्हणून मी टाळंटाळ करत होते. पण तिने काढून घेतलंच माझ्याकडून.

बाबाबद्दल बोलायला लागले की मला थांबताच येत नाही, इतका त्याचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे. ती सगळं कौतूकाने ऐकून घेत होती. कुठेही असुया किंवा दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे नाही ह्याचं वाईट वाटणं दिसलं नाही. मग मीही सगळ्या आठवणी सांगितल्या तिला. बाबाच्या गमती, त्याचं पेटी वाजवणं, नाटकं. मग आई, विन्या. म्हणाली भेटलं पाहिजे सगळ्यांना. म्हटलं चल भारतात. म्हणाली नक्की.

बराच उशीर व्हायला लागला होता. उद्या ऑफिसही होतं. तिला आणि मलाही आणि जॉर्जीची अवस्था काही फार चांगली नव्हती. अजून पीत बसली तर मलाच तिला घरी पोचवायला लागलं असतं. म्हणून मीच जरा आवराआवरीची भाषा करायला लागले. तिच्याही ते लक्षात आलं, आम्ही बाहेर पडलो. मला ट्रेनने जाणं शक्य होतं पण जॉर्जीला ते जमेलसं मला वाटेना. मीच तिला टॅक्सीने जायचं सुचवलं. मी खरं सोडलं असतं तिला पण आमची घरं एकदम विरुद्ध दिशेला आहेत, म्हणून वाटूनही तसं म्हटलं नाही.

तिला टॅक्सी मिळाली आणि मला हुश्श वाटलं. तशी ती ठीकच होती. मला बहुतेक उगाचंच भीती वाटत होती. टॅक्सी निघाली आणि मी उलट्या दिशेने चालायला लागले. स्टेशन काही लांब नव्हतं. मी रस्ता क्रॉस करते न करते तोच माझ्या बाजूला एक टॅक्सी थांबली आणि चक्क जॉर्जी आतून उतरली.

शांतपणे चालत ती माझ्यापर्यंत आली. मला म्हणाली, तू ऑफिसमध्ये मला विचारलंस ना की काही प्रॉब्लेम आहे का म्हणून? आणि मी काही नाही म्हणाले. ते खोटं होतं. आज सकाळी मला माझ्या आईचा फोन आला होता, काल रात्री माझा बाप मेला. काय बोलावं हेच मला कळेना. ती एकटक माझ्याकडे बघत होती. तिच्या उजव्या डोळ्यातून एकच अश्रू गालावर ओघळला तशीच ती वळली आणि टॅक्सीत बसून गेलीसुद्धा.

उगाचंच ग्रेस आठवले आणि "ती गेली तेव्हा रिमझिम सुद्धा" घरी जाऊन पहाटेपर्यंत ऐकत बसले. कसा का असेना बाप होता. तो सुधारेल, आपल्याला वडलांचं प्रेम देईल, ही भाबडी आशा होती बहुतेक. ती काल तिच्यासाठी संपली. तो ओघळलेला एक अश्रू बहुतेक त्या दुःखाचाच होता.

एक माणूस गेला. पण नातं संपलं का? की सुंभाच्या न जळलेल्या पिळासारखं हे नातं कायमचं जॉर्जीला त्रास देत राहणार?

- संवादिनी