Thursday, October 8, 2009

अपूर्ण

सध्या इथे छान हवा आहे. ना धड उन्हाळा, ना धड थंडी. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा. पानगळ होऊन फांद्यांचे सांगाडे उरलेल्या झाडांना पुन्हा नवी पालवी फुटायला लागली आहे. पुन्हा एक नवा उभार, पुन्हा एक नवा उत्साह आणि मग पुन्हा एक पानगळ. निसर्गाचं चक्र पूर्ण फिरलेलं इथे पहिल्यानेच पाहतेय. उन्हाला अजून नकोसा उष्मा चिकटला नाहीये आणि वाऱ्याला आलेली बोचरी धार बोथट होत चालली आहे. कधी मध्येच सदासर्वदा अंगात अडकवलेला स्वेटर बाजूला फेकून जरा मोकळ्या ढाकळ्या कपड्यात बाहेर जायचा उत्साह वाटायला लागलाय.

झापड लावून कॅलेंडरवरचे दिवस ढकलणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही निसर्गातला हा बदल इतका जाणवावा तर पशू पक्ष्यांची काय कथा? हल्ली सकाळी उठले की खिडकीबाहेर ऊन खात पडलेल्या बागेचं दर्शन होतं. आमच्या घराच्या बाहेरच रस्त्यावर एक मोठं झाड आहे. आणि झाडावर ह्या ना त्या पक्ष्यांचा अड्डा नेहमीच बसलेला.

इथले कावळ्यासारखे दिसणारे पण काळे पांढरे मॅग्पाय पक्षी फार. कधी पोपटासारखे रंगीबेरंगी पक्षी. कधी गवतातले किडे खात लॉनवर इथून तिथे फिरणाऱ्या टिटव्या, तर कधी कबुतराच्या कुळातले वाटणारे काही पक्षी झाडावर हमखास ठेवलेले. बऱ्याच दिवसांनी सगळी नातवंड एकत्र घरी आली की आमचे आजो (म्हणजे आजोबा) व्हायचे तसं वाटतं ह्या झाडाकडे बघून. अगदी अंजारून गोंजारून सगळ्यांना आपल्या फांद्यांवर खेळवतं ते झाड. बाहेर जाताना किंवा बाहेरून येताना उगाचच हात त्या झाडाला लागतात. आपलं काही मिळाल्याचा आनंद होतो.

तर हल्ली सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग येते. मग दात घासायच्याही आधी आमच्या ह्या अजोबाचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आज कोण कोण आलंय ते पाहिलं की मग दिवसाची सुरुवात काय मस्त होते. गेले काही दिवस मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत कुठे तरी हरवून गेल्यासारखं वाटलं. म्हणजे कधी कधी गाणं चालू असताना तबला उतरल्यावर कसा बेसुरा वाटतो, तसंच.

घरून काम करण्याचा एक फायदा म्हणजे हवं तिथे बसून काम करता येतं. मी हल्ली मुद्दामच झाडाच्या समोरच्या खिडकीत जाऊन बसते. दुनयाभरच्या आकडेमोडीने आणि मेलामेलीने डोकं विटलं की पटकन समोर आजोबा नातवंडांचा निर्व्याज खेळ पाहता येतो. परवा अशीच बसले होते तर एक गोष्ट लक्षात आली. झाडावर फक्त मॅग्पाइज होते. बाकी सगळे पक्षी एकतर लॉनवर नाहीतर शेजारच्या झाडावर होते. पहिल्याने वाटलं हवाबदलासाठी दुसरीकडे बसले असतील. मग लक्षात आलं मामला थोडा गंभीर होता.

झाडाच्या बेचक्यांत घरट्यासारखं काही दिसलं. दुर्बीण काढून बघितलं तर होयकी, मॅग्पाइजनी चक्क घरटं बांधलं होतं. इतर सर्व पक्ष्यांना आजोबांवरून त्यांनीच उडवलं होतं. त्यांच्याच दादागिरीमुळे किलबिलाटातलं संगीत वगैरे हरवून बसलं होतं. आता काय नवीनच चाळा लागला. घरटं बघत राहणं आणि काही विशेष घडतंय का ते पाहणं.

एक दोन दिवस असेच गेले. मी बाहेरून घरी येत होते आणि नेहमीसारखा माझा हात झाडाकडे वळला अन काय झालं काही कळलं नाही एकदम कावळ्यासारखा रागीट ओरडण्याचा आवाज आला आणि एक मॅग्पाय चक्क वरून माझ्याकडे येत असलेला पाहिला. मला वाटलं हा माझ्या डोक्यावर आपटणार, पण तेवढं न करता फक्त डोक्याला वारा घालून तो निघून गेला. त्याचा तो अवतार बघून मी प्रचंड घाबरले आणि अंगणात पळाले. डेव्ह आजोबांनी माझी ही गंमत पाहिली. ते म्हणाले की पक्ष्यांनी घरटं बांधलंय आता ते ओव्हरप्रोटेक्टिव्ह होतात, माणसांसारखेच.

झालं, तेव्हापासून जरा लांबूनच. मॅग्पायभाऊ आणि मॅग्पायीण्वहिनींना धोकादायक वाटणार नाही अशा अंतरावरून येणं जाणं आणि दुर्बिणीतून घरटं बघणं चालू होतं. साधारण आठवडा झाला असेल. थोड्याच दिवसात बाळ मॅग्पाय जन्माला येणार होतं. माझ्या नवऱ्याला ह्यात भारी उत्साह. तो अगदी रोज न चुकता मला अपडेट विचारायचा.

शनिवार सकाळ झाली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. जन्मात पहिल्यानेच पडायला मिळतंय असा तो पंधरा मिनिटं पडला. हंतरुणात पडल्या पडल्या पावसाचा आवाज छान वाटत होता. थोड्या वेळाने पाऊस सरला आणि लख्ख ऊन पडलं. मी उठले आणि नेहमीसारखं खिडकीतून घरटं पाहिलं. घरटं तसंच होतं पण मॅग्पायभाऊ आणि वहिनी बहुतेक विकली शॉपिंग करायला गेले होते. दुपारी परत पाहिलं तर चक्क झाडावर इतर नेहमीचे पक्षी बसलेले. काय झालं कळेना. संध्याकाळी बाहेर पडलो तर झाडाखाली अंड्याची टरफलं दिसली. नुसती टरफलं.

मी म्हटलं झाडावरून पडली अंडी. पिलं व्हायच्याआधीच गेली. नवरा म्हणाला नाही पिलं झाली असतील नाहीतर नुसती टरफलं नसती पडली. विचारणार कुणाला? झाडाला विचारलं असतं त्याला उत्तर देणं शक्य असतं तर.

हल्ली सकाळ किलबिलाटानंच होते. मीही खिडकी उघडून बघते छान ऊन पडलेलं असतं. निरनिराळे पक्षी बागडत असतात. त्यात एखादा मॅग्पाय बघितला की उगाचच ती टरफलं आठवतात.

ना नात्याची ना गोत्याची, पण ही अपूर्ण गोष्ट मात्र कधीच पूर्ण होणार नाही.

Thursday, October 1, 2009

सीमोल्लंघन

परवा दसरा झाला. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ह्याचं महत्त्व. हा साडेतीन मुहूर्त हा काय प्रकार आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे वगैरे मला अजूनही माहीत नाही. पण दसऱ्याला बरीच लग्न दर वर्षी लागत असतात हा मुख्य मुद्दा. लग्नानंतरचा पहिला दसरा. लग्नानंतरचे पहिल्या वर्षीचे जे काही सण आहेत ते सगळे आमचे इथेच व्हायचेत. म्हणजे थोडक्यात जी काही पहिल्या सणाची मजा असते ती हुकलेय.

माझ्या घरी म्हणजे माहेरीपण दसऱ्याचं काही वेगळं महत्त्व नव्हतंच. घरच्या घरी साधी पूजा, दुपारी पणशीकरांचे श्रीखंड, मग मस्त झोप आणि संध्याकाळचा घरीच करायचा टाइम पास. ह्यात गप्पा, गाणी ते नुसतंच बसून राहणं सगळं सगळं आलेलं. जग कसं बदलतं. मी आणि माझा भाऊ आणि आई बाबा असं आमचं चौरस घर. प्रत्येकाचा कोपरा वेगळा, पण दुसऱ्यांच्या कोपऱ्यांकडे बघत उभा असलेला. प्रत्येकाचं महत्त्व तेच नेमकं, नव्वद अंशाचं आणि त्यावर घराचा तोल बरोबर सांभाळलेला. चौरसाचा त्रिकोण आणि त्रिकोणाची सरळ रेषा कधी झाली हे कुणालाच समजलं नाही. असेच काहीसे डिप्रेसिंग विचार येत राहिले.

तसं काम होतंच, त्यामुळे दिवस कसा गेला कळलं नाही. पण नेमकं नवऱ्याला कामानिमित्त बाहेरगावी जायला लागलेलं. एवढ्या मोठ्या घरात एकटी मी. बरं इथल्या घरांची गंमत आहे. लाकडी असल्याने मधून मधून करकरल्याचे आवाज येतात. आणि ते आवाज मोजत मोजतंच माझी रात्र जाते. झोपायचं राहूनंच जातं. कधी एखादा पोसम छपरावर येऊन आपलं नृत्यकौशल्य दाखवतो तर कधी घोंघावणारा वारा माझी झोप उडवतो. खूपच बोर झालं. मग सरळ फोन उचलला आणि आजीला फोन लावला.

भारतातही खूप असं कंटाळवाणं वाटलं की मी सरळ आजीकडे जायचे. आजी म्हणजे आईची आई. तिच्या घरी दुपारच्या सुमाराला जायचं आणि तिला चहा करायला सांगून मस्त चहा पिता पिता गप्पा ठोकायच्या असं कित्येक वेळा केलंय. अगदी परीक्षेच्या दिवसात तर खासंच. कारण दुपारी इतकी झोप यायची की स्कूटी काढून थेट आजीकडे.

फोन केला बराच वेळ गप्पा मारल्या. तिला म्हटलं असं सणाच्या वेळी खूप कंटाळा येतो वगैरे वगैरे. तर म्हणे कशी, तुझ्या आजोबांची नात शोभतेस. ते आणि आजी त्यांच्या कोंकणातल्या गावातून इकडे आले. आजोबांना सतत आठवण यायची गावाची, घराची, थोडीशी शेती होती त्याची. आंब्यांची, फणसांची, नारळी, फोफळीच्या झाडांची. आंब्यांना तर त्यांनी नावं दिली होती एकेक. नावानेच बोलायचे आंब्यांबद्दल. इतका जिव्हाळा होता आणि एकदम सगळं सोडून मुंबईला आले. म्हणाली तुमचं तरी दुसरं काय आहे. कोंकणातून त्या काळी मुंबईला येणं म्हणजे आजच्या काळी परदेशी जाण्यासारखंच होतं. त्यांनी तेव्हा सीमोल्लंघन केलं, तुम्ही आता केलं.

हो म्हणाले. पण एक विचित्र विचार घुमत राहिला डोक्यात. माणसं सीमोल्लंघन का करतात? दसरा आहे म्हणून? नसलेलं काही मिळविण्यासाठी? काही सिद्ध करण्यासाठी? पूर्वीच्या काळी राजे रजवाड्यांनी हेच केलं. आम्हीही आता हेच करतोय. पण का? कशासाठी? असे प्रश्न त्यांनी आणि आम्ही विचारलेत का? कधी वाटतं आपण उगीच हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो. कधी वाटतं, प्रवाही असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नक्की काय बरोबर? काय चूक? आमच्या कक्षांच्या सीमा ओलांडून साजरा केलेला दसरा अधिक चांगला की घरच्यांसोबत पणशीकरांचं श्रीखंड खाऊन साजरा केलेला अधिक चांगला? असले बेसिक पण उत्तर न देता येणारे प्रश्न पडतात. तेव्हाही तसंच झालं.

बराच वेळ अशी वैचारिक लंगडी घातल्यावर एकदाची झोप लागली. पण झोप लागते न लागते तोच मोबाईल खणखणला. त्रासानेच उचलला, पण बरं झालं उचलला, भावाचा होता. मग झोप विसरून खूप वेळ गप्पा मारल्या. त्याला म्हटलं काय रे दसरा कसा साजरा केलास? म्हणाला ताई, चिल. दसराच साजरा करायचा असता तर भारतातच राहिलो नसतो का? म्हणाला व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण. म्हटलं हुश्शार आहेस तू.

पण मला पटलं त्याचं थोडंसं. हे हॅविंग केक आणि इटिंग इट टू सारखं झालं. विच इज ऍन ऍबस्युल्युट इंपॉसिबिलिटी.

सीमा न ओलांडता सीमोल्लंघन करता येत नाही हेच खरं.

मग एकदम शांत झोप लागली.

Thursday, September 24, 2009

फँटसी

पित्रुपंधरवडा संपून एकदाचे घट बसले की आमच्या चाळीत उत्साहाचं वारे वाहायला लागायचे. सुरवात व्हायची ती भोंडल्याने आणि मग हळदीकुंकू, दसरा करीत करीत दिवाळीपर्यंतचा वेळ कसा जायचा समजायचंच नाही. भोंडला म्हटला की सर्वात आधी आठवण होते ती परीक्षेची. सहामाई परीक्षेला लागूनच साधारण घट बसायचे. बसायचे म्हणजे अजूनही बसत असतील. पहिल्या दिवशी चाळीतल्या टवाळक्या करत फिरणाऱ्या एक दोन पोरांना पकडून अंगणात दिवे लावून घ्यायचे. ते काम मोठ्या बायकांचं. आम्ही मुली खिडकीच्या गजाआडून तयारी कुठपर्यंत आलेय ते फक्त बघायचं.

नेन्यांच्या घरात बायकांची उभ्यानेच बैठक जमायची. कारण भोंडल्यासाठी पाट त्यांचाच लागायचा ना. त्यांचाच का लागायचा हे मला अजूनही माहीत नाही. पण अजूनही त्यांचाच पाट भोंडल्याला असतो. नेन्यांच्या घरी बापटांकडचे तांदूळ पोचायचे. हत्ती काढायचं काम आमच्या आईचं. चित्र वगैरे काढणारी चाळीत एकंच बाई मग तिला खास हत्तीचं चित्र काढण्यासाठी बोलावलं जायचं. आईही वर्षानुवर्ष त्याच मापाचा तसाच दिसणारा हत्ती काढत राहायची. मग बापटांचे तांदूळ, नेन्यांच्या पाटावर, साठ्यांनी काढलेल्या हत्तीच्या पोटात बसायचे आणि कुणाच्यातरी करंगळीचा छाप हत्तीचा डोळा बनायचा.

असा हा तांदुळाचा हत्ती अंगणाच्या मध्ये ठेवला गेला की मग आम्हा मुलींना खाली जायची परवानगी असायची. अभ्यासातून सुटका झाल्याने सर्वांनाच खूप छान वाटायचं. घटस्थापनेच्या दिवशी अगदी घरात घालायच्या फ्रॉकपासून सुरुवात व्हायची आणि चढत्या भाजणीने दसऱ्यापर्यंत तास दीड तास दवडून साडी किंवा तत्सम काहीतरी मिरवायच्या ड्रेसपर्यंत प्रवास व्हायचा. घट बसायच्या दिवशी पाच बायका आणि पाच पोरी आणि एखादा लहान मुलगा ह्यांनी सुरू झालेला भोंडला दसऱ्याच्या दिवशी चांगला वीसेक बायका पंधराएक पोरी इथपर्यंत फुगायचा. चार पाच गाणी वाढत वाढत दहा पंधरा विसापर्यंत पोचायची. चाळीतल्या हौशी गायिका सगळ्या आपले गळे साफ करून घ्यायच्या. ऐलमा पैलमा पासून सुरवात व्हायची. मग कोणे एके दिवशी काऊ यायचा. सुंद्रीचं लगीन जुळायचं आणि करत करत आडात शिंपले कधी पडायचे ते समजायचं नाही.

छोट्या छोट्या आम्ही पोरी, चाळीत नव्या लग्न होऊन आलेल्या मुली आणि त्यांच्या सास्वा असलेल्या बायका सगळ्या मिळून एकंदरीतच सासर ह्या प्रकाराची टिंगल टवाळी करणारी गाणी म्हणायचो. म्हणजे दात्यांची सून आणि दातेकाकू दोघीही म्हणायच्या

उजव्या हाताला विंचू चावला बाई, विंचू चावला
आणा माझ्या सासर चा वैद्य
अंगात अंगरखा फाटका तुटका,
डोक्याला पागोटे चिंध्या मिंध्या
कपाळाला टिळा शेणाचा

दिसतो कसा बाई XX वाणी.

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे जरतारी
कपाळाला टिळा चंदनाचा

दिसतो कसा बाई राजावाणी...

इतकी गंमत वाटायची. मी आईला विचारायचे पण दाते काकूंना राग नसेल का येत? मग आई सांगायची अगं ही नुसती गंमत आहे. पण ती नुसती गंमत नाहीये. एकच बाई सुनेच्या रोलमध्ये वेगळी वागते आणि सासूच्या रोलमध्ये वेगळी वागते. भोंडला हे तिला ह्याची जाणीव करून देण्याचं माध्यम असावं.

मग दुसरी गाणी सुरू व्हायची.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
सासू पाहुणी आलेय गं बाई आलेय गं बाई

सासूने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
सासूने आणलेय साडी गं बाई, साडी गं बाई

साडी मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिप्रं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

मग एक एक करत सासरा यायचा, नणंद यायची दीर यायचा. काही ना काही आणायचे, पण भोंडल्यातल्या रिंगणातली प्रत्येक बाई तोऱ्याने त्यांना परत पाठवायची. अगदी पळवून लावण्यासाठी झिप्रं कुत्रंसुद्धा सोडायची. आणि त्यांची उडालेली भंबेरी पाहून मनातल्या मनात हसायची. कुठेतरी आत खोलवर आपण घरातली मुलगी नसून सून आहोत त्यामुळे आपल्याला कमीपणा मिळतो ही सल मग तिथे बाहेर पडायची. साडी मी घेत नाही, सांगा मी येत नाही, ह्या शब्दांना तर खास धार चढायची. ही त्यांची एक फँटसी.

आणि मग आम्ही पोरी च्या कडव्याची वाट बघायचो ते यायचं.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
नवरा पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई

नवऱ्याने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
नवऱ्याने आणलंय मंगळसूत्र गं बाई, मंगळसूत्र गं बाई

मंगळसूत्र मी घेते
सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई उघडा गं बाई
झिप्रं कुत्रं बांधा गं बाई बांधा गं बाई

लग्न न झालेल्या मुलींच्या मनात मग सासुरीच्या वाटे येणाऱ्या नवऱ्याची चित्र उमटायची. आमच्या सारख्या शाळकरी मुलींना तर कुणीतरी राजकुमार वगैरे येणार गोष्टीतल्याप्रमाणे असंच वाटायचं. ही आमची एक फँटसी.

शनिवारी घट बसले. हे सगळं सगळं आठवलं. घटकाभर जुन्या दिवसांमध्ये मन गुंगून गेलं. तसे फार दिवस झाले नाहीत म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी मी होतेच की भोंडल्याला. तेव्हा मीही ही फँटसी बघितलीच असेल नाही का? ते दिवस सरले ती स्वप्नही सरली. त्या मैत्रिणीही सरल्या. श्रद्धा अमरिकेला गेली, रमा पुण्याला गेली. प्रीती अजून कुठेतरी, मी अजून कुठेतरी. आम्ही सगळ्या साळकाया म्हाळकाया, भोंडल्याचं रिंगण फिरता फिरताच मोठ्या झालो आणि एकेक करून निघूनही गेलो.

वाटलं सगळ्यांना पुन्हा एकत्र करावं नेन्यांचा पाट घ्यावा, बापटांचे तांदूळ घ्यावेत, आईला हत्ती काढायला सांगावा आणि माझ्या करंगळीने त्याचा डोळा काढावा आणि पुन्हा एकदा ऐलमा पैलमा खेळ मांडावा.

हं. ही माझी एक फँटसी.

-------------

स्नेहा, खो दिल्याबद्दल थँक्स. माझा खो सखीला

Thursday, September 17, 2009

एका पावसाचे पडणे

पाऊस कधीचा पडतो
पाचूंची हिरवी पाने
मातीच्या हीनपणाला
गंधांची ओली दाने

पाऊस कधीचा पडतो
जणू पागोळ्यांच्या माळा
रुणु निळ्या घनाच्या पोटी
झुणु निषादसुंदर गळा

पाऊस कधीचा पडतो
कोरडे मात्र अंगण
स्वप्नांचे बहर बगीचे
मनी मोरांचे रिंगण

पाऊस कधीचा पडतो
मन उदास काहुर होते
मदमत्त वातस्पर्शाने
तनी उसनी हुरहुर होते

पाऊस कधीचा पडतो
पाऊस पाडुनि जातो
पापण्या ठेऊनि ठाक
तो डोळे भिजवुन जातो

Thursday, September 10, 2009

माझे गाणे

माझे गाणे असले गाणे
माझे गाणे तसले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
तरारलेले एक तराणे

माझे गाणे असले गाणे...

पाऊस बिंडा नादावूनी
पागोळ्यांचा धरतो ताल
मल्हाराच्या गोड गळ्यावर
अभ्राभ्रांची सुरेल शाल

कडकड कडकड कडाडणारी
वीजबाईची तान वेगळी
सरसर सरसर रसरसलेली
पऊसरींची मीण आगळी

गरगर गरगर गोल घुमोनी
मारुतराज समेवर येई
ह्या सगळ्या कल्लोळामागे
माझे गाणे हरवून जाई

माझे गाणे असले गाणे?.....

माझे गाणे कसले गाणे
माझे गाणे असले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
कोमेजून गेलेले कण्हणे

Thursday, September 3, 2009

हरवलेली माणसं

रोज साधारण दुपारी दोनच्या सुमाराला आमचा पोस्टमन येतो. इथला पोस्टमन आणि आपला देशी पोस्टमन ह्यात जमीन असमानाचं अंतर आहे. आपला डोक्याला टोपी घालतो, तर ह्याच्या डोक्याला असतं हेल्मेट. आपला सायकल चालवतो तर ह्याला मिळते लुनासारखी बाइक. मग हा पाठीला दप्तर लावून फुटपाथवरून लुना चालवत चालवत प्रत्येक घराच्या समोर थांबतो. सगळ्या पत्रांचा रबरबँड लावून एक गठ्ठा केलेला असतो आणि तो गठ्ठा घराच्या लेटर बॉक्समध्ये टाकून स्वारी पुढच्या घराकडे वळते.

हल्ली पत्र हा प्रकार फक्त घेणेकऱ्यांनी देणेकऱ्यांना पाठवायचाच उरलेला आहे. आमचा लेटरबॉक्स टेलिफोन, इलेक्ट्रिसिटीची बिलं किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट असले फारसे आवडीचे नसलेले प्रकार सोडले तर बाकी इथल्या तिथल्या मॉल्सचे कॅटलॉग्ज, टेक अवे च्या जाहिराती वगैरे वगैरे कचऱ्याच्या टोपलीत (नव्हे रिसायकल बीनमध्ये ) टाकायच्या लायकीच्या गोष्टींनी भरलेला असतो.

पण तरीही पोस्टमन येऊन गेला की ताबडतोब बाहेर जाऊन आपली पत्र घेऊन यायला मला आवडतं. असंच परवा पोस्टमन साहेब येऊन गेल्यावर मी पटकन अंगणात उतरून पत्र आणायला गेले. रोजचा कचरा होताच. पण एक पत्र वेगळंच वाटलं. माझ्याच नावाचं होतं. वेगळंच म्हणजे चक्क हाताने त्यावर माझं नाव आणि पत्ता लिहिला होता. उलटं करून पाहिलं तर कुणाचा पत्ता नव्हता. हं. नाही म्हटलं तरी थोडी उत्सुकता वाढलीच. मनात माहीत होतं की हे काही कामाचं पत्र नाही.

घरात शिरले आणि पत्र उघडलं. चक्क हाताने लिहिलेलं पत्र होतं. भरभर वाचून काढलं. चक्क जग्गूंचं पत्र होतं. किती मोठ्ठं असावं? दोन मोठे फुलस्केप भरून. मला एकदम कसंसंच वाटलं. भारत सुटल्यापासून मी त्यांना पत्र फोन वगैरे काही करण्याचा वीचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. कधी मधी बाबाकडून कळायचं त्यांच्याबद्दल. हल्ली पाय दुखतात म्हणून पॉइंटापर्यंत जात नाहीत, वगैरे माहीत होतं. पण ह्या उप्पर काही विचारण्याचा मी प्रयत्न केला नाही आणि बाबाने त्याहून अधिक काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता.

ह्यांनी चक्क बाबाकडून माझा पत्ता घेऊन मला पत्र पाठवलं. अगदी सगळं सगळं लिहिलं. आमच्या नाना नानी ग्रुपबद्दल लिहिलं. एका आजोबांना तिसरी नात झाली म्हणून त्यांच्या मुलाला शिव्या देऊन झाल्या. म्हणे मुलासाठी कशाला देशाची लोकसंख्या वाढवता? एका आजींच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्या आता फिरायला येत नाहीत. स्वतःबद्दलही खूप लिहिलं. गाण्याचे कार्यक्रम वगैरे जोरदार चाललेत म्हणे. गणपतीचे कार्यक्रम कुठे कुठे काय काय आहेत आणि ते कोणते कोणते पाहायला जाणारेत.

एकदम मस्त वाटलं. आपल्याकडे असलेली एखादी छानशी वस्तू आहे हेच आपण विसरून जातो आणि कधीतरी साफसफाई करताना एकदम ती वस्तू डोळ्यासमोर येते आणि नकळत चेहऱ्यावर हसू फुलतं तसं झालं.

जुने दिवस आठवले. रोज सकाळी न चुकता जायचे मी फिरायला. समुद्राचं वेड होतंच पण आमच्या नाना नानी ग्रुपचं त्याहून होतं. सगळ्या ओल्डीजमध्ये मी एकटी विशीतली होते. सगळ्यांची लाडकी नात. आणि जग्गूंची आणि माझी तर विशेष मैत्री. कारण आम्ही घरी चालत एकत्र जायचो. आणि तो माणूसही असा इंटरेस्टिंग की खूप मजा यायची. त्यांच्या गमती जमती विनोद वगैरे सांगायची पद्धतही खूप छान होती.

पण वेळ बदलते तसं आपलं जग बदलतं. जुने लोकं दूर होतात, नवे लोकं जवळ येतात. रहाटगाडगं चालू असतं. पण कधीतरी असं जुनं काहीतरी आठवतं. वाईट वाटतं. म्हणजे जुने दिवस गेले ह्याचं नाही वाईट वाटत. कारण तेव्हा जी मजा करायची होती ती भरपूर केली. वाईट अशाचं वाटतं की कधी काळी आपल्या आयुष्यात रोजच्या असलेल्या व्यक्तींना आपण पार विसरतो ह्याचं. जग्गू वन्स वॉज लाइक अ बेस्ट फ़्रेंड.

असो, तर अशी त्यांच्या पत्राची मजा. मग मीही त्यांना पत्र लिहायला घेतलं, पण अर्ध्यावरच लक्षात आलं की मला त्यांचा पूर्ण पत्ता कुठे माहितेय, त्यांनी पत्रातही लिहिला नव्हता. जुनी एक सुटकेस आहे माझी, त्यात माझं जुनं सामान भरलंय. ती उपडी करून त्यातून माझी जुनी डायरी शोधायचा प्रयत्न केला. नाही सापडली. जुन्या फोनमध्येही पाहिलं. त्यातही नव्हता. मग सरळ बाबाला फोन केला, त्याला विचारलं त्याच्याकडे आहे का? त्याच्याकडे जग्गूंचा फोन असण्याचं कारणंही नव्हतं. तो म्हणाला मी त्यांना विचारून देतो म्हणून. पण मला ते नको होतं. मला आताच्या आता त्यांच्याशी बोलायचं होतं.

खूप शोधाशोध केली. नाही सापडला. मग स्वतःवरच चिडून खिडकीत जाऊन बसले. हरवलेली माणसं शोधत.

Thursday, August 27, 2009

आणखी एक गणपती

हा आठवडा गणपतीचा. गेल्या वर्षी आखातात होते गणपतीच्या वेळी. ह्या वर्षी इथे आहे. मी घरी नसतानाची ही दुसरी गणेश चतुर्थी. दोन वर्षापूर्वी आम्ही चौघेही घरी होतो. चौघे म्हणजे मी, माझा भाऊ आणि आई बाबा. गेल्या वर्षी एक मेंबर कमी. मी आणि ह्या वर्षी अजून एक मेंबर कमी, माझा भाऊ. आता आई आणि बाबा आणि आमचा सर्वांचा लाडका गणपती.

बाबाला सांगून ठेवलं होतं गणपती घरी आला की मला पहिला फोटो काढून पाठवायचा. आमचा गणपती कधीही बदलत नाही. म्हणजे मला कळायला लागल्यापासूनची जी मूर्ती आहे ती दर वर्षी तशीच असते, पण तरीही ह्या वर्षीची मूर्ती बघण्याची खूप उत्सुकता होती. मखरही पाहायचं होतं. माझा भाऊ नाही म्हणजे मखराची मजा नाहीच. त्याला मी कितीही शिव्या दिल्या तरी ह्या बाबतीत त्याचं फक्त कौतुकच होतं. ह्या वर्षी आईने केलं होतं मखर. कमळाची प्रतिकृती बनवली होती तिनं.

यंदा गणपती रविवारी आले. बरं वाटलं. सकाळी उठून बाप्पाची पूजा केली. म्हणजे आमच्या देवातल्या बाप्पाचीच. मग मोदक बनवायचा घाट घातलेला. घरी असताना आई बनवायची, आजीही बनवायची. दोन्हीकडे जाऊन मोदक खायचं काम आमचं. कधी मला स्वतःला मोदक बनवायची वेळ येईल ही रिऍलिटी तेव्हा उमजलीच नव्हती. ती परवा उमजली. आदल्या दिवशी आजीला फोन करून रेसिपी लिहून घेतली होती. आजीची रेसिपी म्हणजे गंमतच आहे. नारळ खोवून घे त्यात गूळ घाल. किती गूळ घालू? अगं घाल अंदाजाने. मीठ? अंदाजाने. तेल? अंदाजाने. पीठ? अंदाजाने. मग म्हणाली आईला फोन कर. आईने जरा सांगितलं व्यवस्थित. थोड्या वेळाने आजीचा पुन्हा फोन आला. म्हणाली नैवेद्याच्या मोदकाचं पुरण आधी चाखून बघायचं नसतं पण तू पहिल्यानेच करतेयस ना? मग पुरणाचा नैवेद्य दाखव आणि घे चव. हुश्श!

मोदक बरे झाले. मुख्य म्हणजे गोड असूनही नवऱ्याला आवडले. मला तर काय आवडतातच. मोदकाची शेंडी फोडून भरपूर तूप ओतून खाल्लेला मोदक म्हणजे जीव्हासुखाची परमावधीच. जेवणानंतर सोफ्यावर पडल्या पडल्या कधी डोळा लागला कळलंच नाही.

संध्याकाळच्या सावल्या पसरल्या आणि जाग आली. रविवारची संध्याकाळ म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा प्रकार. येणाऱ्या आठवड्याचं काम डोळ्यासमोर. इस्त्रीचा ढीग. घरातली उरलेली कामं डोळ्यासमोर दिसायला लागली. पण काही करावंसं वाटेना. घरचंच सगळं आठवत राहिलं. संध्याकाळी कोण कोण येईल? घरी बनवलेले खव्याचे मोदक कसे झाले असतील? या वर्षी गाणं होणार नाही म्हणून बाबा नाराज असेल का? खाली उत्सवात यंदा काय काय कार्यक्रम असतील? आरती म्हणताना अण्णांचा सूर जास्त टिकेल की माझ्या वयाच्या मुलांचा? यंदा मांडव घातला की घालून घेतला? हळदी कुंकू कधी आहे? मखर बनवायला माझा भाऊ नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याची आठवण काढली असेल का? माझ्या कोण कोण मैत्रिणी माहेरपणाला आल्या असतील? मी असते भारतात तर मी जाऊ शकले असते ना? उत्तरांतून प्रश्न आणि प्रश्नांतून उत्तरं असं चालू होतं.

आपल्या मनाला एक विलक्षण शाप आहे. जे आपल्याकडे नाही त्याचा विचार करत बसण्याचा आणि एक विलक्षण वरदान आहे. आपण जिथे नाही तिथे मनानेच जाऊन येण्याचं.

मी घरी गणपतीला नसण्याचा विचार करत बसले खरी. पण करता करता स्वतःच घरी एक फेरी मारून आले मनाने. आईने केलेले खव्याचे मोदक चाखले, आजीचे अंदाजपंचे बनवलेले उकडीचे मोदक अगदी शेंडी फोडून आत ओतलेल्या तुपासकट चाखून आले. उत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. दर चतुर्थीला करते तसा अण्णांना जाऊन नमस्कार करून आले. अगदी आमच्या बाईंचं गाणं पण ऐकून आले. अगदी उत्तरपूजेजे मंत्र म्हणताना झालेला बाबाचा कातर स्वरही ऐकला. आणि पुढच्या वर्षी लवकर ये, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर माफ कर आणि तुझं दर्शन घेणाऱ्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत असं निःस्वार्थी गाऱ्हाणं बाबाने देवाला घातलं की डबडबायचे तसे डोळे डबडबलेही.

गणपती जोरात साजरे झाले हेच खरं!

Thursday, August 20, 2009

मैत्रीण

सकाळी सकाळी स्टेशनला जायला निघाले. डोळ्यात पूर्ण न झालेली झोप होती. नव्या जबाबदारीचं थोडं टेन्शन.

माझा बॉस एकदम चक्रम आहे. कोणतीही व्यक्ती कोणतंही काम सहज करू शकते असा त्याचा गैरसमज आहे. म्या पामर ऍनालिस्टला त्याने सेल्स च्या कामाला जुंपलंय. काम तसं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नव्या क्लायंटला भेटणं, त्यांना आम्ही कसे चांगले आहोत च्या गोळ्या देणं वगैरे वगैरे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे साधारण तासाभराच्या मीटिंगसाठी मला तीन तास आधी निघावं लागतं. अर्धा तास एक दोन एक दोन करीत स्टेशनला पोचलं की मग तास सव्वा तास रेल्वेमध्ये झोपा काढायच्या. मग साधारण अर्धा तास ट्रॅममध्ये डुगडुगून काढला की आलं क्लायंटचं ऑफिस. ह्या सगळ्या व्यवस्थेतली माझे पाय सोडून जी इतर वाहनं आहेत ती कधीही त्यांच्या मर्जीनुसार बंद, धीमी होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी अजून अर्धा तास. बरं गाडीत झोप वगैरे झाली असल्याने माझा चांगलाच अवतार होतो. तो अवतार ठीक ठाक करायला अजून पंधरा मिनिटं.

एवढं सगळं करून क्लायंटची मीटिंग मेली तासाभरात संपते. आणि पुन्हा दोन तासाची वणवण करीत मी घरी येते.

काही दिवस हे प्रकरण चाललंय. रोज नाही जायला लागत पण बऱ्याच वेळा लागतं. रोज गाडीत एक छोटी मुलगी आणि तिची आई दिसतात. गाडी तशी भरलेली असते, पण समहाऊ आम्ही दोन तीन वेळा समोरासमोर आलो. हसण्याइतपत ओळख झाली. मुलगी जाम गोड आहे. गोरी गोरी पान. गालांचे लाल लाल टोमॅटो. निळे डोळे. निळे म्हणजे अगदी निळे. नेत्रदानाच्या ऍडमध्ये ऐश्वर्या रायचे दिसायचे तसले. आणि सोनेरी केसांना लाल निळी रिबीन बांधून केलेल्या दोन शेपट्या. दप्तरासारखी बॅग आईच्या हातात.

एकदा झटकन माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्स मध्ये दोन किटकॅटचा एक मिनी पॅक आहे. मग तिच्या आईला विचारून तिला दिली. मग एकदम बाईंची कळी खुलली. इतके दिवस नुसती हसायची. आता भरपूर बोलते. फक्त न चुकता मला किटकॅटचा मिनी पॅक न्यायला लागतो. तिची आई मला ओरडते चॉकलेट दिलं की. पण माझी ही छोटी मैत्रीण एकदम चुणचुणीत आहे. तीच आईला सांगते, की ह्या पॅकमध्ये दोन किटकॅट त्यातली अर्धी मी "शॅमा", (म्हणजे म)ला देणार, अर्धी तुला देणार, एक उरली की त्यातली अर्धी मी खाणार आणि अर्धी जेसन ला देणार. मग काय हरकत आहे? जेसन म्हणजे तिचा भाऊ.

मग उठून माझ्या शेजारी येऊन बसेल, आणि सांगत राहील "शॅमा, टीचर गेव्ह मी धिस" करून एखादी ट्रॉफी दाखवेल छोटीशी. आपल्याकडे उत्तेजनार्थ बक्षीस देतात ना तसं काहीतरी. शॅमा लुक ऍट धिस, शॅमा डू धिस, गिव्ह दॅट, अशा ऑर्डरी सुटत राहतात. तिची आई तिला ओरडते मध्ये मध्ये. पण मला बरं वाटतं. तेवढाच वेळ जातो.

परवा माझ्या पर्सशी खेळत होती आणि माझं पाकीट काढलं पैशाचं. आत नाणी होती खूप. नोटा नव्हत्या. म्हणाली शॅमा यू आर सो रिच. यू हॅव्ह सो मच मनी. एव्हन माय बँक डसंट हॅव सो मच. असं चाललेलं असतं.

परवा अशीच एक मोठी सहा तासाची वारी करून घरी आले. रोज संध्याकाळी माझ्या दिवसात काय काय झालं ह्याचे डिटेल्स नवऱ्याला कंटाळा येईपर्यंत ऐकवायला मला खूप आवडतात. बऱ्याच वेळा तो लॅपटॉप उघडून बसलेला असतो किंवा टीव्हीसमोर असतो, तेव्हा. असं? वाह! ओके, येस, अशी उत्तरं टाकून तो माझं बोलणं ऐकतोय असं दाखवत असतो. पण परवा साहेब मुडात होते कसल्या कोण जाणे पण एकदम ऐकून घेतलं, मला ट्रॅव्हेलिंगचा त्रास होतो, दमायला होतं म्हणून चहा वगैरे केला. आणि मग म्हणाला उद्यापासून नो प्रॉब्लेम. तू आपली गाडी घेऊन जा. मला लांबच्या साईटवर जायचंय म्हणून पुढचे तीन महिने कंपनीची गाडी आहे.

सही! म्हणजे आता सगळी कटकटंच मिटली. उद्यापासून मला गाडीने जाता येईल, वेळ वाचेल, कमी दमायला होईल, लवकर घरी येता येईल, पण..

पण माझी छोटी मैत्रीण आता भेटणार नाही. पर्समध्ये मिनी किटकॅट कुणासाठी ठेवू? शॅमा, शॅमा करून मला कोण हाक मारेल? मी नाही दिसले आठवडाभर तर ती नाराज होईल का? शॅमा कुठे म्हणून आईला विचारेल का? एक ना एक हजारो प्रश्न ...

रोजच्या आयुष्यात आपल्याला हजारो लाखो लोकं दिसतात. त्यातल्या एखाद दुसऱ्याशीच आपला असा सूर जुळतो. आनंद देतो, पण शेवटी विरूनच जातो.

तसं नको व्हायला. छोटीला भेटायला तरी पुन्हा कधीतरी ट्रेनने गेलंच पाहिजे.

Thursday, August 13, 2009

आपली गर्दी

गेल्या आठवड्यात एका खास कार्यक्रमाला गेले होते. खास अशासाठी की इथे येऊन बरेच महिने झाले, पण मराठी बोलण्याची संधी फारशी मिळत नव्हती. कोणतंही कारण नसताना आमचं सगळं मित्रमंडळ अमराठी झालं होतं. पण परवाच्या कार्यक्रमात म्हणजे अगदी धन्य झाले. इतके सगळे मराठी लोकं एकत्र बघून एकदम अभिमान वगैरे वाटायला लागला. कशाचा ते माहीत नाही, पण खूप छान वाटलं.

खरंतर कार्यक्रमाची जागा आमच्या घरापासून बऱ्यापैकी दूर होती. येऊन जाऊन साडेतीन चार तासाचा प्रवास होता. मला कार्यक्रमाबद्दल माहिती होती, पण माझ्या नवऱ्याला मराठी कार्यक्रमात वगैरे फार रस नाहीये. मग त्याला बिचाऱ्याला एवढं ड्रायव्हिंग करून माझ्याबरोबर यायला लागलं असतं. म्हणून काही बोललेच नव्हते. अगदी आदल्या दिवशी चुकून (थोडंसं मुद्दाम) बोलून गेले, तर उत्साहाने नवरोबा तयार.

तिथे पोचलो तर इतकी लोकं होती. सगळी मराठी बोलत होती. मध्येच कुणीतरी इंग्रजी झाडणारंही होतं. बरीच मुलं मुली होती. ती मात्र सरळ इंग्लिशमध्ये बोलत होती. अगदी अनोळखी माणसंही हसत होती. बोलत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी पुस्तकांची खाण भेटली मला तिथे. आता हवी तितकी पुस्तकं वाचता येतील ह्या जाणीवेनेच एकदम छान वाटलं. बाकी काहीही मागितलं तरी बाबा लगेच हो म्हणायचा नाही. कंडिशन घालायचा. पिकनिकला जायचंय? मग अमुक रागाच्या ताना बसव, मगच जा. उगीचच नवा ड्रेस घ्यायचाय? मग अभ्यासातलंच काहीतरी कर आधी, वगैरे वगैरे. पण पुस्तक मागितलं तर मात्र दुसऱ्या दिवशी हजर. मी नुसतं पुस्तकाचं नाव घ्यायचा अवकाश. घरी माझ्या पुस्तकांनी भरलेलं एक कपाट आहे. अगदी चांदोबा, ठकठक पासून ज्ञानेश्वरीपर्यंत सगळं आहे. अर्थात ज्ञानेश्वरी मी कधी वाचली नाही. तसा तो पुस्तकांनी भरलेला टब पाहिला आणि एकदम भरून आलं.

कार्यक्रम सुरू झाला. थीम छान होती. तरुणांचा कार्यक्रम. सगळ्या लहान लहान मुलांनी कार्यक्रम बसवलेले. नाच होते, गाणी होती, नाटक सुद्धा होतं. मला तर एकदम आमच्या चाळीतल्या गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आठवण झाली. तोच बाज होता. देश फक्त वेगळा होता इतकंच. एका नाचामध्ये एका मुलीने थेट मला माझीच लहानपणाची आठवण करून दिली. नाचता नाचता मध्येच तिला तिचे आई बाबा दिसले असणार. पठ्ठी नाच सोडून त्यांनाच हात दाखवत बसली. आमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये एका नाचात मला परी केलं होतं. बाबा ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन येणार होता. नाच सुरू झाला तरी तो येईना. मग माझा चेहरा एकदम पडलेला. आईशेजारी तो दिसला तेव्हा मात्र एकदम कळी खुलली आणि मी चक्क नाच विसरून त्यालाच हात दाखवत बसले.

कशी गंमत असते ना? आई वडलांशिवाय पानही न हालणारे आपण कधी मोठे होतो, कधी त्यांचा घट्ट पकडलेला हात अलगद सोडून पुढे पसार होतो, ना त्यांना कळतं ना आपल्याला. मग कधीतरी अशा एखाद्या बेसावध क्षणी, कुणीतरी दुसऱ्याने त्याच्या आई बाबांचा घट्ट पकडलेला हात पाहिला ना, की आपल्या हातात त्यांचा हात नसल्याची जाणीव होते.

बाकीचे कार्यक्रमही छानच होते. मुळात सगळी मुलं असल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच एनर्जी होती. त्यानेच खूप बरं वाटलं. तरुणांच्या कार्यक्रमात आपण नुसते प्रेक्षकांत बसून आहोत ह्याचं वाईटही वाटलं. पण खरंच सगळी मुलं विशीच्या आसपासची होती. मीही हळूहळू तरुण वयोगटातून रिटायर होत आहे असं उगाचच वाटलं. नवऱ्याला सांगितलं तर नुसतं हसला. म्हणाला तू हो म्हातारी आय ऍम यंग ऍट हार्ट. ह्याला काय उत्तर देणार? म्हटलं गप, मराठी कार्यक्रमात मराठी बोल उगाच इंग्लिश झाडू नको.

कार्यक्रम संपल्यावर जेवण पण होतं. ते ठीकंच होतं, पण सगळे लोकं आपापसात बोलत होते. कुणी कलाकारांचं जाऊन कौतुक करत होते. कौतुक म्हणजे कलाकाराचं इंधनच. पटकन मला वाटलं किती महिने झाले आपण परफॉर्म केलं नाही? पण एकंदरीतच लोकांच्या उत्साहात मी परफॉर्म करत नसल्याचं दुःख मागे पडलं. गर्दी खूप होती, पण आम्ही कुणालाच ओळखत नव्हतो. हॉलच्या एका कोपऱ्यात दोघंच उभे होतो. कुणी ओळखीचं दिसण्याची शक्यता नव्हतीच, पण तरीही ओळखीचे चेहरे शोधत राहिलो. नवरा म्हणाला निघूया का, म्हटलं थांब पाच मिनिटं.

ओळखीची नसली तरी ती गर्दी आपली वाटत होती. देशामध्ये गर्दीला नाकं मुरडणारी आम्ही, देशाबाहेर पडलो की मात्र तीच हरवलेली गर्दी शोधत राहतो.

असलेलं नको असणं आणि नको असलेलं हवं असणं, कुणाला चुकलंय?

Thursday, August 6, 2009

रेघोट्या

शेजारच्या घरातल्या आजी परवा दुपारी फिरायला गेले होते तेव्हा रस्त्यात भेटल्या. त्यांचं नाव करीन. मी त्यांना म्हटलं एका सुंदर बॉलीवूड ऍक्ट्रेसचं नाव करीना आहे. तर म्हणतात कशा, सुंदर आहे ना खूप? म्हटलं हो. मग म्हणाल्या तू मला करीन ऐवजी करीना म्हण. म्हटलं बरं. ह्या आजी त्यांच्या नवऱ्याबरोबर राहतात. आमच्या अगदी बाजूच्या घरात. नवऱ्याचं नाव डेव्ह. मला त्यांच्याशी नीट ओळख करायचीच होती. मग लगेचच त्यांना चहाला बोलावलं.

त्याचीही एक गंमत झाली. इथे "टी" ला बोलावलं तर त्याचा अर्थ संध्याकाळचं जेवण असा घेतला जातो. त्यामुळे ओळख नसताना कुणी एकमेकाकडे "टी" ला जात नाही. हा आधी शिकलेला धडा मी विसरले आणि त्यांना टी ला बोलावलं. आजी बाई जराश्या संकोचल्या म्हणाल्या "टी" नको, आम्ही फक्त थोडा वेळ येऊन जातो. मग माझं आपलं भारतीय आदरातिथ्य उफाळून आलं. म्हटलं चहा नको तर कॉफी करेन. मग आजीबाईंच्या सगळा घोळ लक्षात आला आणि माझ्याही. शेवटी फक्त चहाच प्यायला बोलावलंय हे कंफर्म करून करीना आजीबाई गेल्या.

शनिवारी संध्याकाळी पाचाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. करीनाआजी आणि डेव्ह आजोबा वेळेवर हजर. आजींनी जुन्या धाटणीचा एक ड्रेस घातला होता. गळ्यामध्ये मोत्याची सुरेख माळ. आजी चपला न काढताच आत घुसल्या. मला घरात कुणी चपला घालून आलेलं अजिबात चालत नाही. पण त्यांना सांगणार कसं. तितक्यात आजोबांनीच आजींना पाठी खेचलं. आणि चपला कुठे काढायच्या हे मला विचारलं. बहुतेक आमच्या पायात चपला किंवा बूट नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं असणार.

मग थोड्या इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही कुठून आलो काय करतो वगैरे आजोबांनी विचारून घेतलं. सगळ्या विषयांत त्यांना भारी रस. अगदी भारतात सासऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये काय चालतं इथपर्यंत सगळं विचारलं. ते स्वतः खाणकामगार होते. आता रिटायर झालेत. पण त्यांची एकंदरीत शरीरयष्टी बघून ह्यांनी अनेक वर्ष अंगमेहनतीचं काम केलं असणार हे कळत होतं. आजी लोकल काउन्सिल मध्ये कामाला होत्या. त्यांनीही रिटायरमेंट घेतली होती. इथे एक गंमत आहे. माणसं अमुक एक वय झालं की रिटायर होत नाहीत. त्यांना वाटेल तेव्हा होतात आणि त्यांना वाटेल तितकी वर्ष ती काम करू शकतात.

आजोबांना चाय लाटे भयंकर आवडतो असं आजींनी बोलता बोलता सांगितलं होतं. त्यामुळे मी आजोबांना इंडिअन चाय लाटे बनवलाय असं सांगितलं. इंडियन चाय लाटे म्हणजे अर्ध्या दुधाचा कडकडीत उकडवून केलेला ताजमहाल चहा! बेकरीतून नवऱ्याने पेस्ट्रीज आणल्या होत्या आणि चितळ्यांच्या बाकरवड्या आमच्या घरी खोक्यांनी पडलेल्या असतात त्या काढल्या. घरी केलेला चिवडा काढला. झाली तयारी. आजोबांना बाकरवड्या खूप आवडल्या. आजींना कवळी असल्यामुळे त्या नीट खाता येणार नाहीत हे आजोबांनीच आम्हाला सांगितलं आणि आजी चिडल्या. मला एकदम पुलंच्या पेस्तनकाका आणि पेस्तनकाकूंचीच आठवण झाली. चहा मात्र दोघांना खूप आवडला. आजोबांनी तर पुन्हा मागून घेतला.

मग बराच वेळ ते दोघं खूप बोलत राहिले. आम्हालाही खूप बरं वाटलं. परदेशात आलेले आम्ही दोघं. त्यात ह्या गावांत भारतीयांचं दर्शन कमीच. आधीच्या शहरी तसं नव्हतं. ओळखी झाल्या होत्या. मित्रमंडळ जमलं होतं. इथे आल्यापासून प्रथमच कुणी घरी आलं, खूप बरं वाटलं. कुठे कुठे फिरून जमवलेल्या भिंतीवर लावलेल्या एकेका शोपीसचं जेव्हा आजोबांनी भरभरून कौतुक केलं तेव्हा मलाच अगदी पिसासारखं हलकं वाटलं. घरी पाहुणे येणं ही घरातल्या बाईची एक गरज आहे असं मला वाटलं. तिने छान ठेवलेल्या घराचं कुणी केलेलं कौतुक ऐकणं हे फक्त लोकांना घरी बोलावल्यावरच शक्य आहे.

बऱ्याच गप्पा झाल्या. आजोबा आजींना एक मुलगी आहे, तिलाही दोन मुलं आहेत. नातवंड मोठी हुशार आहेत. खेळात आणि अभ्यासातही पुढे आहेत. त्यांनी काढलेली ड्रॉइंग्ज बघायला लगेच आजींनी मला आमंत्रण दिलं. त्यांची मुलगी इथे नसते ती दुसऱ्या शहरात आहे. तिचा नवरा चायनीज आहे आणि त्याने बनवलेलं चायनीज आजोबा आजी दोघांनाही अजिबात आवडत नाही, इथपर्यंत गोष्टी झाल्या. वेळ कसा गेला कळलं नाही.

शेवटी आजी आजोबा जायला निघाले. आम्ही दोघंही त्यांना सोडायला दरवाज्यापर्यंत गेलो. आपले संस्कार कुठेतरी खोलवर मनात रुजलेले असतात आणि काही गोष्टी प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारख्या आपण करतो. दुसऱ्या देशी, दुसऱ्या संस्कृतीत कुठेतरी त्यांना आवर घालून ठेवावा लागतो. मला खूप वाटलं, त्यांना वाकून नमस्कार करावा. पण नाही करता आला. त्याऐवजी आजींनी जवळ घेऊन गालाला गाल लावला. अतिशय मायेने त्यांनी पाठीवरून हात फिरवला. एकदम थेट आजीच आठवली. अगदी मनात येईल तेव्हा मी आजीकडे जायचे. जे खावंसं वाटेल ते सांगायचे आणि तीही करून घालायची. आजी भारतात हरवली आणि आम्ही इकडे हरवलो. शेजारच्या आजी आजोबांची मुलगी दुसऱ्या शहरात हरवली आणि ते इथे.

आईचं रेघोट्यांचं पेंटिंग आठवलं. आमच्या हॉलमध्ये समोरच लावलेलं आहे अगदी. तिचा विचार हा की माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं.

असं बनतंय आमचं इथलं रेघोट्यांचं पेंटिंग.