Thursday, May 21, 2009

वाट पाहण्याचा खेळ

मेपलच्या झाडाची पानं पडायला लागलीत. हिवाळा आता काही फार दूर नाही. हवेतला गारवा वाढायला लागलाय. हल्ली संध्याकाळी, पडत्या उन्हाच्या किरणांच्या शाली पांघरून येईनाश्या झाल्यात. त्याऐवजी काळ्या रंगाच्या अंधाराचं जाजम पांघरूनच त्या पसरतायत.

गोधुल्या वेळी सूर्याने आपला पसारा आवरत घेतला की उगाचच रिकामं रिकामं वाटतं. नारायणाचं दुकान बंद झालं की उरतो हताश रिकामपणा. अंधार. अंधाराची मला भीती वाटते. अंधारापेक्षासुद्धा लांब लांब होत चाललेल्या सावल्या ज्या वेळी नाहीश्या होतात ती वेळ मला भीती घालते. म्हणूनच कदाचित तिला दिवेलागणीची वेळ म्हणत असावेत. संध्याकाळी मी घरी पोचते. दाराचा रिकाम्या घरात घुमणारा आवाज असह्य वाटतो. दिवसाउजेडी प्रकाशाने भरून गेलेला आमचा दिवाणखाना संध्याकाळी एकदम ओकाबोका वाटतो. जणू काही आम्ही तिघं राहतो तिथे. मी, तो आणि अख्ख्या घरात भिंतीएवढ्या खिडक्यांतून पसरून राहिलेला उजेड. उन्हाळ्यात मला घरी कधी एकटं वाटलं नाही कारण घर उजेडानं भरलेलं असायचं.

हल्ली वाटतं. रस्त्यावरच्या दिव्याचा चोरून खिडकीवाटे घरात शिरणारा प्रकाश पराभूत सैनिकाप्रमाणे वाटतो. त्याच्या पराभवाची छाया मग माझ्यावर पडायला लागते. तो अंधार मग माझ्यातला उत्साह शोषून घेतो. मलाही करून टाकतो निस्तेज आणि निरर्थक

मग मी काय करते? चटकन हात पाय धुते आणि देवाघराकडे जाते. अगदी निरांजनात वात लावण्याचादेखील धीर नसतो. तेव्हा असं वाटतं आधी कुणी वात लावून ठेवली असती तर? पण मग मलाच त्यातला फोलपणा जाणवतो. कारण सकाळी घाई गडबडीत पूजा करून तेवत्या निरांजनाला एकटं सोडून मीच नाही का निघून जात? घाईघाईने वात निरांजनात लावून घट्ट झालेलं तूप कसंबसं त्यात घालून काड्यापेटीने दिवा लावला की मग थोडा हायसं वाटतं.

त्या तिथे तेवत्या निरांजनासमोर देवासमोर हात जोडून एकटीनेच उभी असताना गळ्यात विलक्षण कढ दाटून येतो. कंटाळा करून आईचा ओरडा खाऊन म्हटलेलं शुभंकरोती आठवतं. शुभंकरोती नाही, आईच आठवते. लहानपणाचे दिवस आठवतात. तेव्हाही संध्याकाळी अशीच चलबिचल व्हायची मनाची. आधी आई यायची घरी मग बाबा यायचा. दिवे लागले की खूप मस्त वाटायचं. आता कुणीच येणार नसतं बराच वेळ.

देवघराच्या निरांजनासमोर प्रकाशात दिसणाऱ्या इटुकल्या पिटुकल्या देवांच्या मूर्ती पाहिल्या की स्थिर वाटतं. मग मी उगीचच अख्ख्या घरातले दिवे लावते. तरीही समाधान होत नाही, मग रेकॉर्ड प्लेयर लावते. तिथेही मारवाच लागतो. हृदय पिळवटून टाकणारे मारव्याचे सूर मला खूप आवडतात, पण त्याक्षणी असं वाटतं की नको हा मारवा. अजूनच उदास उदास करून टाकतोय मला.

मग उशीरापर्यंत मी काही बाही करत राहते, स्वैपाक, थोडी इकडली तिकडली कामं ह्यात जीव रमवत राहते. काम करता करता मन आठवणींचा खेळ खेळायला लागतं. नाजूक सोन्याच्या कड्यांनी बनवलेल्या नेकलेससारख्या एकात एक गुंफत एकमेकीचे हात धरून आठवणी फेर धरतात अगदी नवरात्रीतल्या भोंडल्यासारख्या.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई. मग एकेक पाहुणा एकेका आठवणीच्या गाडीत बसून येतो. आई येते, ओरडून जाते. बाबा येतो रडवून जातो. भाऊ येतो चिडवून जातो, मैत्रिणी येतात सुखावून जातात, नवरा येतो चिंबवून जातो. थोड्या वेळासाठी का होईना आपल्या माणसात असल्याचा आभास निर्माण होतो. कधी आजी आठवते. तिची अंगाई आठवते.

आमच्या गं दारावरनं, कुणाची गं गेली रंगीत गाडी, त्यात होती भावा बहिणींची जोडी, विनू शमा. आजीचा तो आवाज, डोळ्यात हमखास पाणी आणणारी अंगाईची चाल. सगळं सगळं आठवतं. अगदी आजीच्या कुशीत ही अंगाई ऐकल्यावर स्फुंदून स्फुंदून रडणारी मी सुद्धा आठवते.

आठवता आठवता कधी डोळा लागतो कळतंच नाही. मग रात्री थंडीने टोचून टोचून हैराण केलं की मग उठून पांघरुणात शिरायचं.

ओट्यावर केलेला स्वैपाक खाणाऱ्या तोंडाची वाट पाहत एकटा पडून राहतो. निरांजन कधीच विझलेलं असतं तेही पुन्हा कोण वात घालील, तूप घालील आणि मी प्रकाशमान होईन ह्याची वाट पाहत बसलेलं असतं. आतमध्ये विझलेली मी आणखी एका उजळ दिवसाची वाट पाहत पडून असते.

माझ्या पिटुकल्या जगात हल्ली असा वाट पाहण्याचा खेळ चालू असतो.

- संवादिनी