Thursday, June 23, 2011

(पुन्हा) हाय

हाय,

गेले दोन आठवडे बरंच ट्रॅव्हल होतं. काल रात्रीच परत आले. पुढचे दहा बारा दिवसही पुन्हा फिरावं लागेल असं दिसतंय. त्यामुळे लिखाणाला थोडा उशीर होतोय. अत्यंत सॉरी. त्याबरोबरंच मी ज्याविषयी लिहीत होते त्याविषयीच पुढे लिहावं की त्रासदायक विषय टाळून पुढे जावं ह्याचाही विचार करीत होते. कदाचित ते सगळं अतिरंजित वाटण्याचीही शक्यता आहे. अर्थात अजून विचार करतेच आहे.

पण लवकरंच लिहीन. तुमचे मेल्स संवादिनी ने मला फॉरवर्ड केले. इतकं कोणी वाचत असेल असं खरंच वाटलं नव्हतं. खूप बरं वाटलं.

सी यू

- देवयानी

Friday, June 10, 2011

देवयानी (16)

मग काय मला वाटलं, मी त्याला म्हटलं, कटिंग घेणारेस? तो नाही म्हणणार नाही हे मला माहीत होतं. तो हो म्हणाला. मग पुढचा अर्धा तास आम्ही गाडी पार्क करण्यात घालवला. आमच्या घराच्या जवळ गाडी लावायला मिळणं हे कर्मकठीण होतं. उतरलो तसा तो म्हणाला कुठल्या टपरीवर? मी चालत राहिले तसा तोही चालत राहिला. मी आमच्या बिल्डिंगमध्ये शिरायला लागले. अनुराग माझ्या बाबांना भयंकर घाबरायचा. त्यामुळे तो आत शिरायलाच तयार होईना. आई बाबा कोकणात गेलेत हे त्याला सांगितलं तेव्हा कुठे तो यायला तयार झाला.

वरती गेलो मी चहा केला. मग बराच वेळ गप्पा मारत बसलो. तास दीड तास असेल, पण अनुरागबरोबर पंधरा मिनिटं घालवली तरी मी अख्खा दिवस त्याच्याबरोबरच होते असं मला वाटे. तास दीड तास तर खूपंच झाला. शेवटी तो जायला निघाला. बराच उशीर झाला होता. त्याचा वाढदिवस असूनसुद्धा त्याच्यापेक्षा मीच जास्त साजरा केला तो. बाहेर पडताना मी त्याला विचारलं की कोण कोण येणारे पार्टीला म्हणून. तो म्हणाला नाहीये आज पार्टी. आय ऍम अलोन ऍट होम.

अनुरागला असा भावनाविवश होताना मी पाहिलंच नव्हतं. आय ऍम अलोन ऍट होम. त्याचं हे वाक्य आणि त्याचा तो चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. एकटं असणं म्हणजे काय कठीण काम असतं, हे तेव्हा मला माहीत नव्हतं. पुढे अनेकदा एकटं राहण्याचे, एकटेपणामुले डिप्रेशन येण्याचेही प्रसंग आले. तेव्हा त्याचं काय होत असेल ते आता कळतं मला.

म्हणजे? ह्याला काय रिऍक्ट व्हायचं ते मला कळलं नाही. तो पुन्हा आत आला. पहिल्यापासून सगळं सांगितलं मला. जे मला त्याच्या इतक्या बरोबर असूनही त्यानं कळू दिलं नव्हतं. आई वडिलांमधलं तुटत गेलेलं नातं. दोघांचं सतत बाहेर फिरत राहणं. सकाळी आईचा फोन आला, वडिल तेही विसरले. मोठाल्या घरात नोकरांच्या सोबतीनं वाढला तो. पुढे बोर्डिंग स्कूल, तिथलं एकतेपण वेगळं. बराच वेळ बोलत होता. मी फक्त ऐकत होते. शेवटी बोलून बोलून थकला बहुतेक. थांबला. पुढे काय बोलावं हे मला कळेना. इतकं सगळं दुःख आतमध्ये दाबून हा बाहेरून इतका हसतमूख कसा?

शेवटी तोच उठला म्हणाला जायला हवं. मला वाटतं साडेआठ नऊ झाले असावेत. मीच त्याला विचारलं आता कुठे जाणारेस, तर म्हणाला घरीच. मी म्हटलं थांबतोस का? मी काहीतरी जेवायला बनवते. दोघं जेऊ मग जा. नाहीतरी घरी जाऊन काहीतरी ऑर्डरच करणार ना? तो ठीक म्हणाला.

तेव्हा आणि आताही मी काही ग्रेट कुक नाहीये. शेवटी भुर्जी पाव करायचं ठरलं. नशीबाने घरात अंडी होती आणि बाबांनी सकाळी आणलेला पावही होता. मग मात्र तो पुन्हा नॉर्मल झाला. खूप वेळ गप्पा झाल्या वेळेचा हिशेबच राहिला नाही. अचानक तो म्हणाला, देवी एक सिगरेट ओढली तर चालेल का? सिगरेट? आणि आमच्या घरी? शक्यच नव्हतं. रात्रीचे दहा साडेदहा वाजून गेलेले असतील. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी हळूच बाहेर जाऊन पाहिलं. शेजारच्या काकूंचा दरवाजा बंद झालेला होता. त्यामुळे त्यांच्या नकळत वर गच्चीवर जाणं शक्य होतं. बऱ्याचदा बिल्डींगमधली पोरं गच्चीवर रात्री जमत असत, म्हणून अनुरागला घरीच सोडून मी वर जाऊन पाहून आले. ऑल क्लिअर होतं.

मग अनुरागला गच्चीवर घेऊन गेले. बहुतेक अमावस्या किंवा असपासचा दिवस होता, आकाश निरभ्र होतं आणि चांदण्यांचा सडा शब्दशः पडलेला होता. तरी रिस्क नको म्हणून आम्ही दोघं टाकीच्या मागच्या बाजूला जाऊन उभं राहिलो. अनुरागनं सिगरेट पेटवली. तेव्हा त्या क्षणी मला फार असं मुक्त वगैरे वाटलं. सिगरेटचा वास नाका तोंडात पुर्वीही गेलेला होता, रस्त्यावर, बस स्टॉपवर तो अगदी नकोसा वाटत असे पण आज इथे मात्र तो हवा हवासा वाटला. तो ओढत असलेली सिगरेट मी त्याच्या हातातून घेतली आणि तोंडाला लावून सरळ एक झुरका घेतला. जोरात ठसका लागला, डोळ्यातून पाणी आलं. कुणाला ऐकू जाईल अशी भीतीही वाटली. दुसरा झुरका मात्र तितकासा त्रासदायक नव्हता. मग तिसरा, चौथा, किती झाले कुणास ठाऊक. बराच वेळ आम्ही बोलत बसलो. अनुरागकडे एक चपटी धातूची बाटली होती. ती काढून त्याने त्यातली दारू प्यायला सुरवात केली. मीही प्रयत्न केला पण मला ना त्याची जव आवडली ना त्यामुले घशाला होणारी जळजळ.

खूप म्हणजे खूप मला येत होती. किती वेळ तसा गेला माहीत नाही आम्ही परत घरी आलो. घरी आलो. त्याने आपलं जॅकेट उचललं आणि तो जायला निघाला. तो झेलपाटतंच होता. मला भीती वाटली, मी त्याला म्हटलं की थोडा वेळ थांब जरा दारूचा अंमल उतरू दे मग जा. तो बसला आणि खिशातून त्याने आणखी काहीतरी काढलं. हाताची मूठ उपडी केली आणि त्याच्यावर ती पावडर टाकली आणि एका श्वासासरशी नाकपुडीतून ती आत खेचली. थोडी अजून पावडर काढली आणि मलाही दिली.

त्याने खेचली तशी मीही ती नाकपुडीतून आत खेचली. एका दिवसात, सिगरेट दारू आणि अतिशय उच्चीचं कोक, असा माझा प्रवास झाला.

- देवयानी

Friday, June 3, 2011

देवयानी (15)

कितीही म्हटलं तरी मी उच्च मध्यमवर्गीयही नव्हते. फार फार तर मध्यम मध्यमवर्गीय म्हणता येईल, आणि अचानक अशा ठिकाणी मोठाल्या पार्टीला जायचं, त्या वेळी तरी माझ्यासाठी हे फारंच कठीण काम होतं. माणूस कसा बदलत जातो पाहा. किंवा त्याहीपेक्षा गोष्टी सवयीच्या व्हायला लागतात आणि मग त्या तसल्या मोठाल्या हॉटेलात जाण्याची भीड चेपते. सुरवातीला आपण वेटरशीही अदबीनं बोलत असतो, पुढे नाही म्हटलं तरी थोडे उर्मट होतोच. मला इथे येणं परवडतं असा थोडासा माज माणसात येतो, माझ्याततरी आला.

असो, तर मला भयंकर टेन्शन आलेलं होतं. मी अनुरागच्या मित्रांना ओळखत असले तरी त्यांच्यामध्ये बसून तास दोन तास घालवायची आवड आणि धैर्यही माझ्यात बिलकूल नव्हतं. मग तिथे जाऊन करायचं काय? परत असल्या हायसो पार्टीमध्ये घालण्यासारखे कपडेही माझ्याकडे नव्हते. रात्रभर विचार करून मी सकाळी सकाळी अनुरागला फोन केला. आमच्या घरी तेव्हा फोनही नव्हता. एकतर शेजारी जाऊन फोन करायला लागत असे नाहीतर बूथवर जाऊन. शेजारच्या काकू आणि बूथवरचा आंधळा माणूस दोघेही कान देवून ऐकत राहात. पण काकूंनी ऐकून, देवी मुलांना फोन करते हे बिल्डिंगभर होण्यापेक्षा बूथवरच्या आंधळ्यानं ऐकलं तर मला चालत असे. तसाही तो आंधळा असल्याने मी कोण हे त्याच्या लक्षात येत नसावं असा विश्वास किंवा अंधविश्वास मला होता.

तर मी अनुरागला सकाळी सकाळीच फोन केला. त्याला म्हटलं की बाबा मला येणं जमणार नाही. मला बरं वाटत नाहीये. रात्रभर झोप नाही लागली आणि बरंच काही. त्याने फक्त ऐकून घेतलं. मी फोन ठेवला आणि घरी आले. कॉलेजला जायचाही मूड नव्हता. आई बाबांची घरात लगबग चाललेली होती, त्यांना कोकणात माझ्या एका मामे बहिणीच्या लग्नाला जायचं होतं. मी अभ्यासाचं कारण सांगून त्यांच्याबरोबर जायचं टाळलं होतं. आता घरी एकटीलाच दिवस काढायला लागणार होता.

आई बाबा गेले आणि मी एकटीच घरी बसले होते. साधारण सकाळची अकरा साडेअकराची वेळ असेल आणि दारावर थाप पडली. आता खरं कुणी येण्यासारखं नव्हतं, दार उघडून पाहते तर समोर अनुराग. मला एकदम धक्काच बसला. हा आता इथे कसा? त्यात माझा भयंकर म्हणजे भयंकर अवतार होता. आंघोळही झालेली नव्हती. केस अस्ताव्यस्त होते. मला एकदम कसंतरीच वाटलं.

तो म्हणाला कशी आहेस आता? मी म्हटलं बरी आहे. मला काय झालंय? आणि जीभ चावली. मी त्याला, मला बरं नाहिये ही फोनवर ठोकलेली थाप मी विसरलेच होते, पण सकाळी फोनवर त्याला वाढदिवसाचं विश करायलाही मी विसरले होते. त्याची मला अनुरागने आठवण करून दिली. आता तर मला अगदीच शरमल्यागत झालं. पण अनुरागला त्याचं काही विषेश वाईट वाटलं नव्हतंच. त्याने मला फक्त सांगितलं की आपण बाहेर जातोय आणि त्याच्यासाठी मी आत जाऊन तयार होऊन येणारे. कुठे? कशासाठी? हे प्रश्न तेव्हा अनुरागसाठी माझ्या डिक्शनरीत नव्हते.

आम्ही बाहेर पडलो. संध्याकाळपर्यंत फिरत राहिलो. जेवण, शॉपिंग सगळं केलं. त्याने मला घरी परत सोडलं. गाडीतून मी उतरण्याआधी मला तो म्हणाला की भेटू पार्टीला. मी त्याला माझे प्रॉब्लेम्स सांगितले. मला कसं जमणार नाही तिथे येणं, ते मोठमोठे लोकं, मॅनर्स मला फार ऑकवर्ड होईल वगैरे वगैरे. माझं सगळं त्यानं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाला बरं, पार्टी कॅन्सल. गाडीच्या काचा बंद होत्या म्हणून मी काय म्हणून किंचाळले ते बाहेर ऐकू गेलं नाही. नाहीतर रस्त्यावरची लोकं काय झालं म्हणून गाडीकडे आली असती.

माझा एकंदर आवेश पाहून अनुराग फक्त हासत होता. मी चक्रावून त्याच्याकडे पाहातंच राहिले. शेवटी तोच बोलायला लागला, म्हणाला तूला मी ओळखत नाही का देवी? तुला तिथे तशा पार्टीजमध्ये नाही यायला आवडणार हे मला माहिती नाहिये का? मग मी कशाला तुला इन्व्हाइट करीन तिथे? मी फक्त तुझी गंमत केली. आणि अगदी धीर करून आलीही असतीस तरी आपण दोघंच गेलो असतो की तिथे जेवायला. फिरत्या रेस्टॉरंटमध्ये मजा आली असती तुझ्यासोबत. तू सकाळी म्हणालीस की मला बरं नाहिये तेव्हाच मी ओळखलं तुझं काय बिनसलंय ते. आणि जोरजोरात हसला.

छान. म्हणजे मी काल अख्खी रात्र जागून काढली ती उगाच. एक सेकंद मला त्याचा खूप राग आला, पण दुसऱ्याच क्षणी असं एकदम छान वाटलं. असे मूड स्विंग्ज कसे होतात, हे शब्दात पकडणं कठीण आहे, त्यासाठी बाईच असावं लागतं. हे सगळं, माझ्याबद्दलचं त्याला कसं कळलं? मी पार्टीला येणार नाही वगैरे? आणि म्हणून हा माणूस अख्खा दिवस, त्याचा स्वतःचा दिवस माझ्यासोबत घालवतो? त्याचे घरचे, त्याची मित्रमंडळी ह्यांना सोडून सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा माझ्यासाठी खर्च करतो. अशा मुलीसाठी की जी टेंशनमध्ये त्याला फोनवर विश करायलाही विसरली. हे असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा मनाला आणि शरीराला काय वाटतं ते अचूक शब्दात पकडणार तरी कसं?

त्याला मी फक्त थँक यू म्हणू शकले. आता मला गाडीतून उतरून घरी जायचं होतं, पण मी तशीच तंद्री लागल्यासारखी तिथे बसून राहिले.

- देवयानी