Thursday, July 30, 2009

तीन पायाची शर्यत

शनिवारी सकाळी सकाळी एकटीच गाडी घेऊन बाहेर पडले. शनिवार आणि रविवार म्हणजे आमच्या घरी दिवस रात्र झोपण्याचे वार. पण दिवस रात्र झोपणं मला झेपण्यातलं नाहीच आहे. मग काय करा? सकाळी सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता. पतिराजांच्या मानाने ही पहाटच) उठले काढली गाडी आणि निघाले. दोन पर्याय होते. एक म्हणजे जवळच्याच मोठ्या शहरात जायचं किंवा समुद्राच्या कडेकडेनं जाणाऱ्या रस्त्याने लांब भटकायचं.

गाडीत बसले. गॅरेज उघडलं. बाहेर पडणार इतक्यात वाटलं नवऱ्याला विचारावं येतो का ते. नाही म्हणणार हे पुरतं माहीत होतं पण तरीही तिथूनच गाडीत बसल्या बसल्या फोन केला. बराच वेळ वाजून व्हॉईस मेसेजवर गेला. त्याला तिथेच व्हॉईस मेसेज ठेवला की मी जात आहे. दुपारपर्यंत येईन. शेवटी करता करता समुद्राचा रस्ता पकडला. तसा दिवस उगवला असला तरी लोकं उगवायची होती त्यामुळे रस्ते रिकामेच होते. भरभर गाडी चालवत समुद्राजवळच्या रस्त्याला लागले. जिथे जिथे म्हणून थांबता येणं शक्य होतं तिथे तिथे थांबले. नवऱ्याचा नवा कोरा एसएलार कॅमेरा घेतला होताच अशक्य फोटो काढले.

थंडी होतीच. हुक्की आली म्हणून खिडकीच्या काचा उघडल्या. भन्नाट वारा सुटलेला अंगाला झोंबायला लागला. किशोरीताईंचा तोडी लावला होता. एकेक मधामध्ये सत्तर सत्तर वर्ष घोळलेला स्वर. तो कोमल ग. एकदम माझ्या गाण्याच्या बाईंची आठवण झाली. एका स्पर्धेत तोडी म्हणायचा होता. त्याची तयारी करून घेत होत्या त्या. मी लहानंच होते. सूर कळण्याचं वय नव्हतं. पण मी योग्य तेच गावं हा त्यांचा हट्ट. तोडीमध्ये कोमल ग, अतिकोमल लागला पाहिजे. कितीदा रटवून घेतलं होतं. अख्ख्या गाण्यापेक्षा अतिकोमल ग चा रियाज जास्त करून घेतला होता. स्पर्धा झाली. बक्षीस मिळालं. पण बाई रागावल्या. म्हणाल्या एवढं शिकवून आलं कसं नाही तुला? बक्षीस मिळाल्याच्या कौतुकापेक्षा सूर हवा तसा बरोबर लागल्याचं कौतुक त्यांना जास्त. अशा आमच्या बाई. गचकन कुणीतरी हॉर्न मारला आणि बाई आठवणीत हरवून गेल्या परत.

एका ठिकाणी उतरले उंचावरची जागा. समोर अथांग समुद्र पसरलेला. वारा सुटलेला, त्याची सुरावट कानात. किती वेळ झाला कोण जाणे समाधीच लागली. समुद्राचा आणि माझा एक विलक्षण ऋणानुबंध आहे. तो कसाही असला तरी मला आवडतो. अगदी ओहोटीचा हिरमुसलेला दिसणारा असला तरी आणि उधाणलेला भरतीचा असला तरी. अख्खं विश्व पोटात गुडुप करून ठेवण्याची ताकद आहे त्याची. त्याच्याकडे बघताना भारावून जायला होतं.

नवऱ्याच्या फोनने भानावर आले. नुकताच उठला होता. मला म्हणाला मला का नाही उठवलं. म्हटलं मित्रा, मी फोन केला होता. तू उचलला का नाहीस. म्हणाला, काय बाई एका घरात राहून एकमेकांना फोन करतो आपण. मी म्हटलं मग काय बुवा, एका माणसाला झोपण्यापुढे काही सुचत नाही. आणि दोघंही जोरजोरात हसलो. इतकं की बाजूला गाडी लावून उभी असलेलं एक अख्खं कुटुंब माझ्याकडे बघायला लागलं. मग मी गाडीत जाऊन बसले आणि चक्क नवऱ्याबरोबर तासभर गप्पा मारल्या. मी त्याला जेवायला येते म्हणून निरोप ठेवला होता आणि इथे गाडीत अर्ध्या रस्त्यातच जेवायची वेळ झाली.

मग काय फिरले परत. घरी पोचते तर शिरता शिरताच मस्त जेवणाचा वास आला. नवरोबा मुडात होते तर आज. एकदम त्याची लाडकी चिकन करी आणि कोकोनट राईस वाटच बघत होते. मग काय? दोघांनी मिळून फडशा पाडला.

माझं मलाच हसायला आलं. आमच्या वाडीत उत्सवाच्या वेळी दर वर्षी तीन पायांची शर्यत असायची. ती आठवली. मी आणि रमा नेहमी भाग घ्यायचो. रमा म्हणजे माझी बेस्ट फ़्रेंड. अजूनही आहे. माझ्याशिवाय तिचं आणि तिच्याशिवाय माझं अजिबात पान हलायचं नाही. पण तीन पायाच्या शर्यतीत एकदा पाय बांधले की आमची धमालच व्हायची. कधी तिचा पाय पुढे कधी माझा पाय मागे. असं करत करत पंधरा वेळा पडायला व्हायचं. मग ती माझ्यावर चिडणार किंवा मी तिच्यावर चिडणार. कशी बशी आम्ही लाइन ओलांडायचो. ते एकदा मात्र झालं की वेड लागल्यासारखं हसायचो. आम्ही कसे पडलो, लोक आम्हाला कसे हसले, मग आम्हीच एकमेकीवर कसे चिडलो आणि ओरडलो, कधी तिने मला कसं खेचलं कधी मी तिला कसं ढकललं ह्याचीच मजा. तेव्हा वाटायचं एवढ्या आम्ही जीवा भावाच्या मैत्रिणी मग आमचे पाय एका लयीत का पडू नयेत?

आताशा थोडं कळायला लागलंय की हे लग्न प्रकरण म्हणजे पण तीन पायाची शर्यत आहे. एकट्याने चालायचा प्रयत्न केला तरी चालता येत नाही आणि दोघांनी एकत्र चालता चालता एकमेकांच्या चालण्याशी जुळवून घेतानाच दमछाक होते. पडणं होतं, रडणं होतं. पण सगळ्यात शेवटी आपण एकत्र काहीतरी अचीव्ह केला हा आनंदही असतो.

अशी आहे आमची तीन पायाची शर्यत. पडणे, रडणे आणि खळखळून हसणे ह्या चक्रातून जाणारी.

Thursday, July 23, 2009

धुमसतं बर्फ

उद्या बर्फात जायचं. शुक्रवारी ओरडतंच नवरा घरात शिरला.
त्याच्या एका कलीगबरोबर त्याने प्रोग्रॅम ठरवून पण टाकलेला. त्याच्यापेक्षा खरंतर मलाच ह्या सर्व गोष्टींचा उत्साह जास्त आहे. प्रचंड उत्साहात करण्याची एकंच गोष्ट त्याला माहीत आहे. ती म्हणजे झोपणे. शनिवारी-रविवारी चांगलं बारा वाजेपर्यंत ताणून देऊन अर्धा विकेंड लक्षात न राहिलेली स्वप्न बघण्यात घालवायचा हा त्याचा शिरस्ता. तर विकेंडला लवकर उठून पूर्ण दिवस सत्कारणी लावायचा हा माझा. त्यामुळे आम्ही एकत्र फिरायला वगैरे जाण्याचा योग मणिकांचन किंवा दुग्धशर्करा वगैरे जे प्रकरण आहे त्यात मोडणाराच. त्यामुळे अजून बरं वाटलं.

ठिकाण तर ठरलेलं होतं. त्यापुढे माझा आणि त्याचा अजून एक वादाचा विषय. त्याला पोचायची घाई फार. मला अजिबात नाही. किती वेळात पोचलात ह्यापेक्षा कसे पोचलात. प्रवासात मजा केली का? किती ठिकाणी उतरलात? कोणत्या नव्या जागा पाहिल्यात? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची मजा मला खूप वाटते. म्हणजे ते रक्तातच आहे. गोव्याला जाताना आम्ही तीन तीन दिवस लावलेत मुंबईहून. बाबाचं म्हणणं, रोज एक वेगळी पिकनिक करायची. वाटेल तिथे थांबावं. हवा तितका वेळ मज्जा करावी आणि वाटेल तेव्हा पुढे जावं. त्यामुळे मला अगदी सगळीकडे उतरून वेळ घालवावासा वाटतो. अरे थांब ना जरा म्हटलं, की म्हणणार. बर्फात चाललोय ना? मग हे झरे नि झाडं नि पक्षी काय बघत बसतेस. हा. काय करा? जोरजोरात पळत सुटा, गाडी दोन आकडे वरच चालवा स्पीड लिमिटच्या. करत करत शेवटी पोचलो.

पुढे एका ठिकाणी गाडी थांबवून गाडीच्या चाकांना चेन लावावी लागली म्हणजे गाडी बर्फावर घसरत नाही. ती लावायला म्हणून नवरा बाहेर उतरला. मला पण उतरायची हुक्की आली. उतरले पण बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लगेच आत येऊन बसले. लगेच नवरा म्हणाला, आता जिथे जिथे थांबायचं असेल तिथे सांग नक्की थांबवणार. फक्त उतरायचं आणि बाहेर जाऊन यायचं. झालं आता सगळा वेळ त्याला हे पुरणार होतं.

वर पोचलो. स्कीइंग करायचंच होतं. मग त्याचे कपडे आणि स्कीज घेतले होतेच. पण ते स्कीज पायावर चढवायची वेळ आली तेव्हा खरा प्रॉब्लेम झाला. स्कीज लावले की उभंच राहावं लागतं. पडलात तर स्कीज सोडवून उभं राहून परत घालावे लागतात. असं करता करताच बराच वेळ गेला. त्याच्या मित्रानं आम्हाला शिकवलं. पण माझी प्रगती न पडता एका ठिकाणी उभं राहण्याइतपतच झाली. नवऱ्याला बाकी जमलं. त्याने आधीही केलेलं होतं. थोड्या वेळाने मी स्कीज उतरवले आणि सरळ खांद्यावर घेऊन फिरायला लागले. दुसऱ्या दिवशी खांदा खूप दुखत होता.

नवरा आणि त्याच्या मित्राचं स्कीइंग जोरात चालू असल्याने मी एकटीच राहिले.

मग कॉफीचा एक कार्डबोर्ड कप घेऊन निवांत एका ठिकाणी बसले. समोर सगळं पांढरं जग होतं. माझ्या समोरूनच एक छोटी मस्तपैकी स्कीइंग करत गेली. माझ्या कंबरेपर्यंतपण नसेल तिची उंची. रंगीबेरंगी कपड्यातली माणसं, सगळ्यांच्या गोंड्याच्या कानटोप्या. कुठेच नजरेत भरणारी एखाद्या देशी माणसाने किंवा बाईने घातलेली मंकी कॅप. बर्फावरून मस्त घसरणारी, एकमेकांवर बर्फ फेकणारी मुलं. त्यांना ओरडणाऱ्या आया, आणि मुलांना सामील होऊन ओरडणाऱ्या आयांचा अंगावर बर्फ उडवणारे बाबा. कुठे बर्फावर घसरत आइसक्रीम खाणारी जोडपी.

काही कारण नसताना उगाचच मला भरून आलं. कशामुळे? खूप विचार केला पण तरीही समजलं नाही. कदाचित अशा एखाद्या गर्दीने भरलेल्या क्षणी खूप एकटं वाटून जातं, एकटं नसतानाही. तसंच झालं असावं माझं. पुन्हा फिरून आपण काय करतोय, आपल्याला काय करायचं होतं? बर्फाने भरलेले डोंगर स्कीज लाऊन धडाधड उतरावं, तसं माझं मन ओळखीचीच वळणं घेत घेत तळाला कधी जाऊन पोचलं कळलंच नाही. तळाला पोचल्यावर, पुन्हा कधीतरी घसरत खाली येण्यासाठी, मोठ्ठा डोंगर चढावा लागणार ह्याची जाणीवही झाली.

तेवढ्यात नवरा आणि त्याचा मित्र दमून भागून आले. त्याला लहान मुलासारखं लांबून हात हलवत माझं लक्ष वेधून घेताना पाहिलं आणि खुदकन हसायलाच आलं. खांद्यावर स्कीज टाकून पुन्हा एकदा मी निघाले. डोंगर चढायला.

बर्फावरची भुरभूर सुरू झाली. धुमसत्या बर्फावर आकाशातून पडणाऱ्या बर्फाने चादर घातली. धुमसतं बर्फ क्षणभर हसलं. पुन्हा आतल्या आत धुमसण्यासाठी.

Thursday, July 16, 2009

माणसांची सवय आणि सवयीची माणसं

हल्ली घरून काम करतेय. म्हणजे ऑफिसात अजिबात जायचंच नाही. अगदी अख्खा दिवस, अख्खा आठवडा घरून काम. पहिल्यानं वाटलं, मज्जाच मज्जा. घरी मी एकटीच त्यामुळे काहीही करा, वॉच ठेवायला बॉस नाही, कलिग्ज नाहीत, कुणीच नाही. मनाला वाटेल तेव्हा काम करायचं, नाही वाटणार तेव्हा सोडून द्यायचं. झोप काढावीशी वाटली, झोपायचं अगदी काही न करावंसं वाटलं तर तसं करायचं. पण ह्या सगळ्याच्या शेवटी काम तर वेळच्या वेळी झालंच पाहिजे ना.

आता एक आठवडा होत आला. आताशा कंटाळाच यायला लागलाय. म्हणजे, जिथे राहायचं तिथेच काम करायचं आणि काम संपल्यावर पुन्हा जिथे काम केलं तिथेच राहायचं. सकाळची ट्रेन गाठायची धावपळ नाही, की डबा भरायची दगदग नाही. नवरा आपला बिचारा त्याची वेळ झाली की उठतो, फ्रीजमध्ये काल भरून ठेवलेला डबा उचलतो आणि चालता होतो. तो गेलाय हे कळेपर्यंत तो बहुतेक ऑफिसात पोचलेला असतो. मग कंटाळत उठून कामाला सुरवात करायची. अगदीच एकटं एकटं वाटलं तर आरशात जाऊन बघायचं, नाहीतर काहीतरी काम काढून नवऱ्याला फोन करायचा किंवा जॉर्जीला करायचा किंवा आणखी कुणालातरी. कुणालातरी गूगलवर सतवायचं, असले उद्योग चालू असतात.

पण दुपार सरायला लागते, तसं मग कामाचं टेन्शन वाढतं, कारण अमुक एक काम आज संपवायचं असतं. तमुक एक प्रेसेंटेशन संपवायचं असतं कारण बॉसची मीटिंग असते. विकली मीटिंगमध्ये उगाचच उत्साहाने एखाद्या कलीगला मदत करायचं आता नकोसं वाटणार ओझं घेतलेलं असतं ते आठवायला लागतं. कल करेसो आज कर आज करेसो अब चं एकदम उलटं माझं चाललंय. अब करेसो आज कर, आज करेसो परसो.

आणि वर घुम्यासारखं घरात एकटं राहणं. तसं एकटं राहण्याच्या मला प्रॉब्लेम नाही. इन फॅक्ट, एकटं राहायला मला आवडतं कधीकधी. म्हणजे मी गमतीत म्हणायचे, की मी हरवून एखाद्या व्हर्जीन आयलंडवर वगैरे पोचले तर आरामात एकटी राहू शकीन (तिथे पाली आणि झुरळं नसतील तरच. मला त्यांची अनावर भीती वाटते). पण खूप कठीण आहे. जस्ट टू चेंज युअर एन्व्हायरमेंट, वन नीडस टू गो टू ऑफिस.

माणसं किती आवश्यक आहेत एकंदरीतच आयुष्यात. ऑफिसात इतकी माणसं असतात, त्यांच्याशी आपण बोलतो, नाही बोलतो, हसतो, कधी कधी नाही सुद्धा हसत, पण त्यांचं नुसतं असणं किती आनंददायक असू शकतं ते मला आता कळतंय. मग ह्यावर उतारा म्हणून भर दुपारी फिरायला (आणि मनात असेल तेव्हा पळायला) जायचं काढलंय. लंच टाइम वॉक. भर दुपारी व्यायाम हा प्रकार भारतात एकदम भारीच वाटेल. पण इथे सकाळी आणि संध्याकाळी एवढी मरणाची थंडी असते की मी बाहेर गेले तर माझा गोठून पुतळा होईल. एकदम हाउस ऑफ वॅक्स सारखा फक्त मेणाशिवाय बनवलेला.

हळू हळू शेजार पाजाराची माणसंही ओळखीची व्हायला लागलीत. आमचा हा गाव म्हणजे तसा म्हाताऱ्यांचाच गाव आहे. एका बाजूला एक म्हातारे आजोबा आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक म्हातारे आजी आजोबा आहेत. आजी आजोबांचं काहीनं काही चाललेलं असतं. अजून फारशी ओळख नाहीये. पुढे मागे वाढली की त्यांना चहाला बोलवायचा विचार आहे. एकटे आजोबा आहेत त्यांचं बहुतेक त्यांच्या बागेवर प्रचंड प्रेम आहे. घराच्या खिडकीतून त्यांचं अंगण दिसतं. सतत काही ना काही बागेत चाललेलं असतं. जाता येता कधी दिसले तर हात करतात आणि जोरात ओरडतात "गूड डे".

मी फिरायला जाते तेव्हा मला अजून एक आजी दिसतात. बरोबर त्याच वेळी त्या त्यांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडतात. नाक्यावरच्या प्लॉटवर घराचं काम चाललं आहे, तिथले ट्रेडस्मन दिसतात. बघून बघून हाय हॅलो सुरू झालं आहे. आमचं लॉन कापायला एक अजून एक आजोबा आहेत. ते बरीच घरं करतात आमच्या स्ट्रीटची, ते दिसतात. कधी घरी पैसे घ्यायला ते येतात. तेव्हा थोड्या गप्पा होतात.

आपल्याला माणसांची सवय होते आणि सवयची माणसं दिसली नाहीत की चुकल्यासारखं होतं. होतं काही दिवस पण मग नवी माणसं सवयीची व्हायला लागतात आणि मग ते चुकचुकणं कमी होतं. तसंच काहीसं माझं चाललंय.

एकटी एकटी म्हणून आता मीही माझा गोतावळा जमवायला सुरवात केलीच आहे की.

Monday, July 6, 2009

होडी

बऱ्याच दिवसांनी आज निवांतपणा मिळाला. दिवसभराच्या लढाईत इतकं हरवून जायला होतं की आपला म्हणून काही वेळ असू शकतो हेही लक्षात राहत नाही. हल्ली हल्ली तर तो असावा अशी अपेक्षासुद्धा नाहीशी होत चालली आहे. पण आज तसं नाहीये. बऱ्याच दिवसांनी एकटीनंच घरी बसून आळोखे पिळोखे देत दिवस घालवायची संधी चालून आली. आणि दोन्ही हातांनी मी ती संधी आपलीशी केली.

सकाळी उशीरानेच उठले. उठल्यावर काहीच करायचं नसल्याने एकदम बावचळल्यासारखं झालं. मग चहा करायचं ठरवलं. फ्रीज उघडून बघते तर आतमध्ये दुधाच्या डब्या ठेवलेल्या. प्रत्येक डबीत फार फार तर तीन चमचे दूध. अशा फारा डब्या रिकाम्या करून चहाचा घाट घातला. कुठल्याश्या मंद इंग्लिश चहाच्या डिप डिप पिशव्या सापडल्या. त्या तशाच टाकाव्या का फोडून चहाची पावडर पातेल्यात टाकावी ह्याचा विचार करता करता आधण उकळलं सुद्धा. गाळणं मिळालं नाही, मग तशाच पिशव्या पातेल्यात टाकल्या. चहाची चव आणि चहाचा रंग हे दोन्ही चहा पिण्याच्या एक्स्पिरियन्सचा अविभाज्य भाग आहेत. आणि रंग चांगला आला नाही तर चव चांगली लागत नाही, असं हे जुळ्याचं दुखणं. अर्ध्या पातेल्याचा ढग झाला तरी हवा तो रंग येईना. मग जसा झाला, ज्या रंगाचा झाला तो चहा मगात घेऊन खिडकीपाशी आले.

पावसाची रिपरिप चालूच होती. खिडकीच्या काचेपाशी येऊन चहाचा एक घोट घेतला आणि एका उःश्वासासरशी मनातलं धुकं काचेवर दाटलं. मग उगाचच काचेवर धुक्याचं पेंटिंग करत राहिले बराच वेळ. काच भरली की मग बोटांच्या ब्रशनी त्याच्यावर नक्षी काढायचा खेळ. मग उगाचच थंड काचेला गाल चिकटवून खिडकीबाहेर बघत राहणं. वेळ कसा गेला कळलं नाही.

पावसाचा जोरही थोडा वाढला. खिडकी उघडली आणि थंड हवेचा झोतच अंगावर आला. देशातला पाऊस असा कधीच नव्हता. हा पाऊस दूर लोटणारा वाटला. देशातला पाऊस जवळ घेणारा. मनसोक्त भिजता येण्यासारखा. हा पाऊस गरम गरम चहाचा कप घेऊन हीटरच्या शेजारी खुर्ची टाकून स्वेटर बिटर घालून बंद काचेतून बघायचा पाऊस. एखाद्या रम्य चित्रासारखा, पण तरीही आपल्याला त्या चित्रात सामावून न घेणारा. एकलकोंडा.

हॉटेलच्या नावासकट ठेवलेलं एक नोटपॅड दिसलं. हॉटेलात नोटपॅड का ठेवत असावेत हे मला समजत नाही. कुणीही कधी त्यावर काही लिहिलेलं ऐकीवात नाही. लहान होते, आणि कधी अशा हॉटेलात राहायची वेळ आली तर मात्र न चुकता ती नोटपॅड्स उचलून घरी घेऊन यायचे मी. छान छान कागद त्यावर मस्तपैकी हॉटेलचं नाव छापलेलं. आणि त्याचा एक एक कागद आवाज न करता फाडता यायचा. मग त्याची बसची तिकिटं व्हायची. बसची का? विमानाची पण व्हायची. आमच्या विमानात पण कंडक्टर असायचा आणि तो सगळ्यांना विमानात चढल्यावर तिकिटं द्यायचा. मला कंडक्टर व्हायला खूप आवडायचं, अगदी ड्रायव्हरपेक्षाही.

मनात काय विचार आला कोण जाणे, म्हटलं कागदाची होडी करू. जरा आठवून आठवून बनवायला लागले. पण मला नुसती शिडाची होडी बनवता येईना. नांगरहोडी मात्र बरोबर जमत होती. कुणी होडी बनवायला शिकवली आठवत नाही. बहुतेक बाबानेच. पण साधी शिडाची होडी बनवणं सोपं असतं आणि नांगरहोडी बनवणं कठीण असतं एवढं आठवत होतं. पण तरीही साधी शिडाची होडी काही जमली नाही. कठीण आणखी कठीण आणखी आणखी कठीण अशा पायऱ्या चढत जाताना कुठेतरी आयुष्यातलं साधं सोपं कुठेतरी हरवून जातं ना? तशीच माझी साधी शिडाची होडीही हरवून गेली.

शेवटी नांगराच्या होडीचं नांगत कात्रीने कापून टाकलं आणि झाली तय्यार माझी साधी शिडाची होडी. मग हळूच दारासमोरच्या पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोचले आणि आजूबाजूचं कुणी मला बघत तर नाही ना असं बघून ती होडी सोडून दिली खालच्या पाण्यात. पाहत राहिले अगदी नजरेआड होईपर्यंत. जिथपर्यंत दिसली तिथपर्यंत दिसली, पुढे तिचं काय झालं? कशात जाऊन ती शेवटी बुडली असेल, किंवा किती लांब गेली असेल, किंवा एखाद्या लहान मुलाला ती दिसली असेल आणि त्याने ती उचलून घेतली असेल, की कुणाच्या पायाखाली येऊन ती मोडली असेल, ह्याचाच विचार बराच वेळ करत राहिले.

थंडी असह्य झाली तेव्हाच भानावर आले. शहर बदललं पण प्रवास थांबणार का? नाही. माझी नांगर कापून टाकलेली शिडाची होडी अशीच वाहवत जाणार, पाणी नेईल तिथे.

पण त्या वाहून जाण्यातही एक मजा आहेच की?