Thursday, February 26, 2009

एकलकोंड्याची गोष्ट

पहिला आठवडा सगळं बस्तान बसवण्यात गेला. शनिवारी रात्री पोचले. अर्थातच कंपनीने सगळी व्यवस्था केली होती. आणि दुसऱ्या वेळी येत असल्याने पहिल्या वेळी झालं तसं "धुंडो धुंडो रे" झालं नाही.

यंदा टॅक्सीवाला एकदम मस्त भेटला होता. इथिओपियन होता आणि रस्ताभर गप्पा मारत होता. आपणही किती रेसिस्ट असतो ना? काळा माणूस दिसला की उगागंच भीती वाटते. मला विचारत होता तू काय करतेस, तर सांगितलं त्याला. तसा म्हणाला पगार बरा मिळतो का? तर म्हटलं मला अलावन्स मिळतो. म्हणे किती? म्हटलं अमुक अमुक. तर म्हणे ते सोड टॅक्सी चालव ह्यात खूप पैसे आहेत. कपाळाला हात लावला. इथे आधीच लोकं कमी, त्यात मी टॅक्सी चालवायला लागले तर अजून काही देवाघरी धाडायचे.

तर रात्री हॉटेलवर पोचले. बाहेर जाऊन काही खायची इच्छा नव्हती. असं होईल हे माहीत असल्याने चक्क मॅगी घेऊन आले होते. शनिवार रात्र आणि रविवारची जेवणं मॅगीवरच झाली. सगळा दिवस झोपून काढला. फक्त ब्रेड आणि दूध आणायला गेले तेवढंच. माझी रूम विसाव्या मजल्यावर आहे. व्ह्यू मागच्यापेक्षा खूप छान आहे. पण एकटीला त्यात मजा वाटत नाही हेच खरं. तसे ऑफिसमधल्या काही लोकांना फोन केले. पण ते सगळे आपापल्या घरी असल्याने आणि माझं हॉटेल अगदी शहरात असल्याने भेट झाली नाही.

सोमवारी ऑफिसला गेले. कामाचा मूड नव्हताच. कॉफी आणखी कॉफी आणि आणखी आणखी कॉफी. एकटेपणा आणि व्यसन ह्यांची संगत अशीच होत असावी. एकटी नाहीये मी तसं. लोकं आहेत. पण आपल्या घरून आल्यावर कितीही लोकं असतील तरी एकटेपणा जाणवतोच.

रोज संध्याकाळी जॉगिंगचं सुरू केलंय. तेवढा टाइम पास होतो आणि व्यायामही. धावताना जो एक ऱ्हिदम मिळतो ना तो एकदम वेडावणारा आहे. इनटोक्सिकेटिंग हा शब्द जास्त योग्य वाटतो. सुरवातीला शरीराने नाही म्हणायचं, स्नायूंनी दुखायचं, श्वासाने भंजाळायचं, पण एकदा तो ऱ्हिदम मिळाला की मग सगळे शिस्तीत एका सुरात आणि एका तालात जणू गायला लागतात. दे बिकम वन टीम. माहीत नाही, पण मला ती स्टेज खूप आवडते. कानाला आयपॉड असेल तरी श्वास लख्ख ऐकू येतो. गाण्याचा ऱ्हिदम, श्वासांचा, पायांचा आणि विचारांचा सगळं एका पातळीवर येतं आणि विलक्षण आनंद मिळतो. अजून काही दिवस चालूदे हे मग बघूया माझं मत बदलतं का ते?

आणि एक सही काम झालं. इंटरनेटवर डिजीटल तानपुरा आणि तबला मिळाला, आता काँप्युटर लावून मस्त गाता येतं. जेट लॅग म्हणा किंवा आठवणी म्हणा रात्री झोपच येत नाही. ज्या दिवशी तानपुरा मिळाला, त्या रात्री अशीच झोप येत नव्हती. सगळ्या खिडक्या गच्च ओढून घेतल्या. एसी फुल चालू केला (थंडी नव्हती पण गाण्याचा त्रास दुसऱ्यांना होऊ न देण्याचा एक मार्ग म्हणजे दुसरा कसलातरी आवाज चालू करणे). मारवा घेतला. एकतर मध्यरात्रीची वेळ, त्याला साजेसा मारव्यासारखा धीरगंभीर राग. कोमल रे असा लागला की बस. चांगला एक तास मारवा गायले. ऐकायला कुणी नव्हतं पण स्वतःसाठी गाण्याची मजा वेगळीच.

सध्या भीमसेनांचं चरित्र वाचतेय. वाचताना असं जाणवतं की आपण किती अतिसामान्य आहोत. लहान वयात घर सोडून फक्त गाण्यासाठी पळून जाणं. गदगपासून जालंधरपर्यंत जाणं. स्वतःच्या हिमतीवर गाणं शिकणं. मग सवाई गंधर्वांच शिष्यत्व त्यात सोसलेले हाल केवळ गाण्यावरील प्रेमापोटी. असं आयुष्यात माणसाला काही ध्येय पाहिजे की ज्यापाठी त्यानं पागल व्हावं. वाचताना भान हरपून जातं. पंडितजी माझे खूप आवडते गायक आहेत, पण हे सगळं वाचल्यावर खरंतर माझे देवंच झालेत ते. नुसतं त्यांचं स्मरण केलं तरी माझं गाणं चांगलं होईल असं वाटतं.

असो, तर ह्या झाल्या माझ्या एकटेपणाच्या एकलकोंड्या गोष्टी. कशात ना कशात मन रमवत राहायचं दिवस घालवायचा. संध्याकाळ झाली आणि सूर्य नारायण मावळतीला परतायला लागले, झाडांच्या सावल्या लांबुडक्या व्हायला लागल्या की एक विलक्षण विषण्णता पसरते. आई बाबाची, नवऱ्याची खूप खूप आठवण येते. कधी रडायलाही येतं. पण कधी धावता धावता स्वतःला दमवून, कधी सुरांच्या भुलभुलय्यामध्ये स्वतःला हरवून तर कधी पुस्तकांच्या छापील पानांत दडलेली प्रश्नांची उत्तरं शोधत दिवस घालवते आहे.

ह्या सर्वात एक नशा आहे. तो बोथट करतो आठवणी आणि देतो हुरूप नव्या दिवसाची वाट बघण्याचा.

- संवादिनी

Thursday, February 19, 2009

शॉर्टकट

लग्न म्हणजे एक रोलर कोस्टर राइड आहे. बरंचसं सुख आणि त्याला दुःखाची किनार. म्हणजे नवऱ्याचा विरह संपल्याचा आनंद आणि घरापासून दूर गेल्याचं दुःख. पार्टनर मिळाल्याचा आनंद पण स्वातंत्र्य गेल्याचं दुःख. शेअर करता येतंय हा आनंद पण अवलंबी झाल्याचं दुःख. कधी भेटला नाही असा उधाणलेला समुद्र आणि त्याने अस्ताव्यस्त केलेला किनारा. समुद्राच्या उधाणाचा आनंद, किनारा अस्ताव्यस्त झाल्याचं दुःख. कधी कधी मला वाटतं हे सगळ्यांचंच होतं की हा माझाच प्रॉब्लेम आहे? सुख नाही असं नाही, पण दुःख नाही असंही नाही अशी काहीशी विचित्र परिस्थिती.

जाऊदे. नवा भिडू, नवं राज्य. माझा मुंबईचा मुक्काम संपत आला. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कामावर रुजू होईन. परका देश परके लोक आणि एकटी मी. इथेसुद्धा फिफ्टी फिफ्टी आहे. आपल्या लोकांपासून दूर जायचं हे दुःख पण सासरी राहण्याचं जे अवघडलेपण आहे, त्यातून सुटका होण्याचा आनंद. कदाचित मी खूप सेल्फ सेंटर्ड वगैरे वाटत असीन. पण स्वतःचं विश्व निर्माण करताना होणारे कष्ट अपार आनंद देऊन जातात. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात सामावून जाण्यातले कष्ट खूप त्रासदायक आहेत.

हे सगळं सांगावं तरी कुणाला? आईला सांगितलं तर आई म्हणणार मुलीच्या जातीला हे सगळं करावंच लागतं. नवऱ्याला ह्याची डेप्थ समजणार का? त्याच्या दृष्टीने त्याचं विश्व चांगलंच आहे. आणि चांगलं आहेच. वाईट काहीच नाहीये, पण ते माझ्या विश्वापेक्षा खूप वेगळं आहे म्हणूनही त्रास होऊ शकतो ते त्याला कसं पटवायचं? हा अनुभव आल्याशिवाय कळावं तरी कसं किती अवघड आहे हे सगळं? म्हणून त्याला काही बोलत नाही. बाबाला सांगावं खूप वाटतं पण त्याच्या डोक्याला त्रास नको म्हणून नाही सांगत. जीवाभावाच्या मैत्रिणीही आता जवळ राहिल्या नाहीत की उचलला फोन आणि बोललं तासभर. एकंदरीत सुखमय शोक किंवा शोकमय सुख असं काहीसं आयुष्य झालंय.

पण लवकरंच ते बदलेल. तिथून निघतानाचा विमानतळावरचा उत्साह इथून निघताना नक्कीच नसेल. का कुणास ठाऊक, भारत सोडताना मी नेहमी भावुक होते. विमान उडाल्यावर मुंबईचे दिवे, झोपड्या ढगाआड जाईपर्यंत बघत राहते. पुन्हा कधी दिसाल? असं त्यांना विचारत राहते. ह्या वेळी नवऱ्याचा विरहही सोबतीला असेल. गंमत आहे. सोबत नसली म्हणजे होतो तो विरह आणि अशा विरहाचीही सोबत. निदान दोन अडीच महिनेतरी सोबतीला राहीलच तो.

पुन्हा तिकडे गेल्यावरचं काम, एकटेपण, कंटाळा, सगळं सगळं डोळ्यासमोर दिसतंय. मी जेव्हा शाळेत होते अगदी लहान असताना तेव्हा वाटायचं आज जोरात पाऊस पडूदे आणि शाळा बुडूदे. तसंच काहीसं वाटतं, काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि रद्दच व्हावं जाणं. मग समोर दिसतो एक डोंगर, माझ्यासारख्या कित्येकींनी चढलेला. स्वतःला दुसऱ्या एका साच्यात कोंबायचा.

मग एक मन पळपुटं होतं. म्हणतं जाऊदे तो डोंगर, पळायची संधी मिळतेय, पळ काढ. मग एकदम खूप खूप उदास वाटतं. मनापासून प्रमाने वागवणारे सासू सासरे, मी त्यांच्यात स्वतःला सामावून घ्यावं अशी रास्त अपेक्षा बाळगणारा नवरा. ह्यांचा आपण कुठेतरी अपेक्षाभंग करतोय असं वाटत राहतं. एक न्यूनगंडही येतो. आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खरंच त्रास होण्याची गरज नाही, पण आपल्यालाच तो होतो, म्हणजे आपणंच कुठेतरी चुकतो आहोत. असा.

जाऊदे, सध्या तरी जे जमत नाही त्याला सामोरं जाण्याऐवजी त्याला पाठ दाखवण्याचा शॉर्टकट मी घेतलाय. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघता येईल. सध्या शोवटच्या काही दिवसातली मुंवई आणि नवरा मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करतेय.

- संवादिनी

Thursday, February 12, 2009

नो प्रॉब्लेम

नवऱ्याचं ऑफिस पुन्हा सुरू झालं. मला अजून पंधरा दिवस सुट्टी आहे. पण सुट्टीची अशी मजा येत नाहीये. उगाचच आपण सुट्टी घेऊन घरी बसलो असं फिलिंग येतंय. पण सुट्टी नाही तर मी मुंबईत राहू शकणार नाही. म्हणजे थोडा वेळ का होईना जो नवऱ्याबरोबर घालवता येतोय तेही जमणार नाही. सासरेही ऑफिसला जायला लागले. त्यांचं खरंतर सतत काम चालूच होतं घरूनही पण आता ऑफिसला जायला लागलेत. सासूबाई घरीच असतात आणि सूनबाईही.

खूप छान आहेत त्या म्हणजे सासू ह्या संस्थेच्या पारंपरिक इमेजला पूर्ण विरुद्ध आहेत. मला स्वैपाकात गती नाही हे त्यांना माहिती आहे. पण मला जास्त सला वगैरे देत नाहीत. त्या करतानाच मला एकेक सांगत जातात की असं केलं तर असं होतं तसं केलं तर तसं होतं. तुझं चूक माझं बरोबर असा ऍटिट्युड नाहीये. बऱ्याच गोष्टी आमच्यापेक्षा जरा वेगळ्या करतात त्या. पण मी त्यांना तसं भासवून देत नाही.

एकदा
पिक्चरला पण घेऊन गेल्या, त्यांच्या मैत्रिणींबरोबर. मला एवढं ऑकवर्ड झालं होतं. पण काय सांगा? कधी कधी असं वाटतं सुट्टी वाया चाललेय. आई बाबांची भेट होत नाही आणि नको त्या (सासूबाई नव्हे, त्यांच्या मैत्रिणी) लोकांबरोबर वेळ घालवावा लागतोय.

अर्थात आठवड्यात दोन वेळा घरी जाऊन आलेच. माहेरी जाण्याची मजा काय आहे ते आता कळतंय. सासरी भिजल्या मांजरीसारखी असणारी मी घरी पोचले की मस्त अघळ पघळ पसरते. दुपारी गेले तर आई नसतेच, पण बाबा असतो. मग काय? आपल्या राजकन्येसाठी राजा चहाही बनवायचे कष्ट घेतो. अगं हे घे, ते घे, कचोरी आणलेय मुद्दाम तुला आवडते म्हणून, गायवाडीतली नानकटाई आणलेय, आयडिअलचे वेफर्स आणलेत आणि काय नि काय. पोहे बनवू का? नाहीतर शिरा बनवतो, की परशुराम वाडीचा वडापाव आणू? असे असंख्य प्रश्न. मी त्याला म्हणते अरे जाऊदे रे, माझ्याशी गप्पा मार. मीच चहा बनवते आणि आपण मस्त ग्लूकोज ची बिस्किटं खाऊ.

लग्नाआधी आभाळ खाली आलं तरी चालेल किचन मध्ये जाणार नाही म्हणणारा बाबा चक्क मला चहा बनवू का म्हणून विचारतो ना, तेव्हा कसंसंच होतं. एकदम बिचारा वाटतो तो मला. आणि डोळ्यात पाणी येतं. मग एकमेकांपासून डोळे लपवायचा खेळ खेळायचा. तोपर्यंत आई येते. मग पुन्हा हे करू की ते करू सुरू होतं तिचं.

लग्नाआधी काढलेला आमच्या चौघांचा एक मस्त फोटो त्याने फ्रेम करून आणलाय. तो एक बदल झालाय. बाकी घर तसंच आहे. शेजारी पाजारीही तसेच आहेत. रहाटगाडगं चालतं आहे. गाडग्यातलं एक भांडं पडलं म्हणून इतरांचं काम थांबत नाही. त्रास फक्त त्या भांड्याला होतो आपण त्या चक्रात नाही म्हणून.

एकदा मी आणि आई होतो तेव्हा आई सांगत होती, बाबाला बिलकूल करमत नाही. मग जुनं कुठलंतरी रेकॉर्डिंग काढून बसेल, नाहीतर फोटो बघत बसेल. खरंतर तिलाही करमत नसणार, पण ती कबूल करणार नाही.

संध्याकाळी दोघंच एकटे घरी असताना काय वाटत असेल त्यांना? मुलगा इथे आहे पण तोही बाहेर जायचं म्हणतोय, मुलीचं लग्न झालेलं, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं. तानपुरा नसलेला माझा कोपरा, रिकामं झालेलं माझं कपाट, आईने हौसेने माझ्यासाठी आणलेल्या काही बाही वस्तू. सगळं सगळं आठवतं आणि खूप खूप रडायला येतं. पण आदर्श सूनबाईच्या कर्तव्यात सतत हसतमुख राहणे हेही येतंच. मग कढ आवरायला लागतात, आवंढे गिळायला लागतात.

मग
तो बांध कधीतरी बाथरुमच्या भिंतीआड फुटतो किंवा रात्रीच्या अंधारात नवऱ्याच्या शर्टाची बाही भिजवून जातो. त्याला वाटतं काही प्रॉब्लेम आहे का?

पण त्याला कसं समजावणार की काहीही प्रॉब्लेम नसूनही प्रॉब्लेम्स असतातच..

- संवादिनी

Thursday, February 5, 2009

मचाण, कलकत्ता आणि बदललेलं जग

परवा कोलकात्याहून परत आलो. गेले दहा-बारा दिवस कसे गेले कळलंच नाही.

निबिड जंगल, निरभ्र आकाश, चांदणी रात्र, दूरवर लावलेल्या ट्यूबमधून यावा असा चंद्रप्रकाश, बांबूचा मचाण, अशक्य शांतता, वाऱ्याबरोबर होणारा बांबूची कचकच. पाण्याचा एक आवाज मात्र कायम. मध्येच पायाखाली वाजणारी पानं? कुणाचे बरं असतील ते पाय ह्याचा अंदाज बांधत मचाणावर बसलेली सहा जणं. आम्ही दोघं, एक आजी आजोबा आणि दोघं टिपीकल सोल्जर स्टाइल ड्रेसिंग, वर हाफ जॅकेट, रात्री उगाचच घातलेल्या टोप्या अशा अवतारातले सो कॉल्ड नेचर लव्हर्स.

त्यातल्या
आजींशी माझी खासंच गट्टी जमली होती. म्हणजे आजी फक्त वयानेच आजी होत्या. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. खरंतर अहोंना असलं रात्री बेरात्री मचाणावर वगैरे बसायला बिलकुल मानवत नाही. पण आजींनी भरीस पाडलं. बघायला काय मिळालं? काहीच नाही. तशा दुर्बिणी वगैरे नेल्या होत्या. पण मला आवाजाची दिशा समजून मी दुर्बीण फोकस करेपर्यंत जे काही होतं ते पळून गेलेलं असायचं. मग नेचर लव्हर्स मला नक्की काय होतं ते सांगायचे.

पण अशा ठिकाणी प्राणी बिणी बघायला कोण जातं. मचाणाखाली सळसळलेल्या पानांनी शांततेच्या अंगावर शहारा आणावा. मनात एकदम धस्स व्हावं, मी अहोंचा दंड पकडावा आणि एकदम आश्वस्त वाटावं, ह्यातला जो रोमान्स आहे तो आपल्या नागरी संवेदनांना उलगडावा तरी कसा? त्यासाठी अशा मचाणांवर बसूनच संवेदना धारदार करायला हव्यात.

हे माझं लॉजिक नाहीये. आजींचं आहे. हे सांगून त्यांनी माझ्या अहोंना रात्र मचाणावर काढायला पटवलं. मी काय? असल्या गोष्टीत प्रचंड उत्साही आहे. पण त्याला पटवणं कठीण. पण बिचारा माझ्यासाठी तयार झाला. त्याच्यापेक्षा नेचर लव्हर्सच माझ्याशी जास्त बोलत होते. आणि बिचाऱ्याला चरफडण्याव्यतिरिक्त काहीही करता येत नव्हतं. असो, तरी आला हेच खूप झालं. जंगलातल्या ट्रीपचा हा हायलाइट.

तिथून कलकत्त्याला पोचलो. माणसांच्या जंगलात आल्यावर अहोंना बरं वाटलं. त्याचे बरेच मित्र भेटले. शिकायला तो कलकत्त्याला होता. एक वेगळाच तो दिसला मला तिथे. म्हणजे माझ्याशी अगदी मृदूपणे बोलणारा, एकदम संयत, मितभाषी मुलगा मित्रांच्या घोळक्यात शिरल्यावर प्रचंड बदलला. त्याच्या मित्रांनीपण त्याच्या जुन्या कुलंगड्या बाहेर काढल्या. मजा आली. एवढा मोकळा ढाकळा त्याला पहिल्यांदाच पहिला. म्हटलं तू तर अगदी माझ्यासारखा आहेस. माझ्याशीपण अशीच मस्ती कर. हो म्हणाला, पण मुंबईला आल्यावर ये रे माझ्या मागल्या.

तिथून रोज घरी फोन करीत होते. शेवटच्या दिवशी आई म्हणाली आता मुंवईला पोचल्यावर रोज फोन करू नको. उगाच सासू-सासऱ्यांच्या डोळ्यात येईल. मला तिचा रागच आला. अरे, फोन नको करू म्हणजे काय? माझी स्वतःची आई मला हे सांगते ह्याचं दुःख जास्त. मग तिचंही म्हणणं थोडंसं पटलं. मग एक मध्यममार्ग काढला. कुणी घरी नसताना किंवा मी बाहेर असताना कॅजुअली फोन करायचा. आणि आठवड्यातून एक दोन वेळा ऑफिशिअली करायचा.

बाकी नवं घर मस्त आहे. सासू सासरे सुद्धा. फिरायला जाईपर्यंत माझा चेहरा पडलेला होता. घरची खूप म्हणजे खूप आठवण यायची. अगदी रडायला यायचं. पण आता ठीके. सवय झाली थोडीफार. माणसं कळायला लागली थोडीफार. पण त्याबद्दल पुढच्यावेळी.

"आणि माझं जगंच बदलून गेलं" हा वाक्प्रचार आपण कित्येक वेळा ऐकतो. सध्या मी ते अक्षरशः अनुभवतेय. कालपर्यंत मी माझ्या बाबालाच बाबा म्हणायचे. आता मी त्याच्याही बाबांना बाबा म्हणते, आईला आई म्हणते. पण म्हणून एका दिवसात ते मला माझ्या आई बाबांसारखे वाटतील का? नाहीच वाटत. मग तशी अपेक्षा मुलीकडून करावीच का?

माझे सासरे ह्यावर फार मार्मिक बोलले. म्हणाले, आपण म्हणतो आता सून घरी आली, ती आम्हाला मुलीसारखीच आहे. "सारखी" आहे, पण मुलगी नाहीच असंच आपण बोलून दाखवतो ना? माझ्या बाबाला सांगत होते. मग म्हणाले, म्हणून आम्ही म्हणतो, ही आमची मुलगीच आहे. तिने फक्त आम्हाला तुमच्याइतकं जवळचं स्थान द्यावं. ते म्हणतात ते मला शंभर टक्के पटलं. पण मी त्यांना माझ्या बाबाची जागा देऊ शकते का? नक्कीच नाही. मग त्यांनी मला त्यांच्या मुलीची जागा द्यावी अशी अपेक्षा मी कशी करू शकेन?

काही अंतर कधीच कापली जात नसावीत. कुणाची चूक म्हणून नाही पण परिस्थितीची असहायता म्हणून.
- संवादिनी