Thursday, May 31, 2012

साठी आणि पिंजरा

बाबाची साठी झाली. साठ वर्ष जगणं हे काही त्याच्यासाठी कर्तृत्व नव्हे. आयुष्यात त्याचं एक तत्त्व आहे. ते मला खूप आवडतं. कुठे पोचलात हे जितकं महत्त्वाचं तितका प्रवास किती मस्त झाला हेही महत्त्वाचं. ह्या त्याच्या तत्त्वामुळे आम्ही कधी काळी मुंबईहून गोव्याला पोचायला पाच पाच दिवस घेतलेले आहेत. अर्थात ते दिवस सरले, ते रस्तेही सरले. आयुष्याच्या नागमोडी रस्त्यात वेगवेगळी वळणं येतंच गेली. बाबाची साठी हा असाच त्या रस्त्यावरचा एक थांबा.

वाढदिवस साजरा वगैरे करणं हे त्याला अजिबात मानवत नाही. म्हणून वर्षभर आधीपासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं. एकदमच अचानक मी आणि विन्या एकाच वेळी भारतात कसे आलो अशी शंका येऊ नये म्हणून ह्या सुट्टीचा प्लॅन चांगला वर्षभर आधीपासून केला होता. सगळ्या नातेवाइकांना, बाबाच्या खास मित्रांना आधीपासूनच वेळ आणि जागा सांगून ठेवलेली होती.
त्याला अजिबात कल्पना येऊ नये म्हणून खास माझ्या सासऱ्यांची मदत घेतली. त्यांनी चक्क विन्याला आमच्या फार्म हाऊसवर पनवेलला घेऊन जायचा (खोटा खोटाच) बेत आखला. विन्याला नेणार म्हणजे मलाही जाणं क्रमप्राप्तंच होतं. सगळी तयारी अशी चाललेली होती.

सकाळी उठल्या उठल्याच आम्ही सगळ्यांनी त्याला विश वगैरे केलं. आम्ही आणलेली गिफ्ट्स देऊन टाकली. मुद्दाम माझा नवरा आमच्या घरी आला, त्यानंही बाबाला विश केलं आणि मी आणि विन्या त्याच्यासोबत निघालो. संध्याकाळपर्यंत बरीच तयारी करायची होती. आम्ही तिघेही खरेदी करत फिरत होतो. सईला सासूबाईंकडे ठेवलं.

संध्याकाळी आई बाबाला म्हणाली चला चौपाटीवर फिरायला जाऊ. चौपाटी हा बाबाचा वीक पॉइंट आहे. आमच्या घरापासून चौपाटी म्हणजे अगदी पाच मिनिटाचा रस्ता. बाबा बरोबर अगणित वेळा मी चौपाटीवर गेलेय. चौपाटीची भेळ खात खात त्याचं तत्त्वज्ञान ऐकायचं ही गंमत वेगळीच. आई त्याचं काही ऐकून घेत नाही. आणि त्याला माझ्यापेक्षा दुसरा चांगला ऑडिअन्स नाही. वर भेळेचं ऍट्रॅक्शन असायचंच.
असो तर चौपाटीला जायला बाबा नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ते तिथे पोचले तसे एकेक करून बाबाचे मित्र, काही नातेवाईक आम्ही सगळे जमलो. त्याला खरंच धक्का बसला. केक कापला. मोठ्याने सगळ्यांनी हॅपी बर्थ डे म्हटलं आणि अगदी लहान मुलासारखे फुगेही हवेत सोडले. खूप मजा आली.

सगळी आवरासावर करून आम्ही चालत घरी येत होतो. विन्या आणि आई पुढे होते. मी आणि बाबा आणि माझ्या कडेवर सई असे आम्ही तिघं मागे होतो. कधी नव्हे तो बाबा भावुक झाल्यासारखा मला वाटला. तो बोलायचा थांवला की समजावं की काहीतरी गडबड आहे. मग मीच त्याला काही बाही विचारत बसले. म्हटलं काय रे बाबा इतकी आम्ही तुझी साठी दणक्यात साजरी केली, कसं काय वाटलं?

दोन सेकंद तो काही बोललाच नाही. मी त्याला विचारलं. काय झालं? गप्प का झालास? मग म्हणाला खरं खरं उत्तर देऊ तुझ्या प्रश्नाचं की खोटं? म्हटलं एकदम खरं खरं दे.

म्हणाला सुखोत्सवे असा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे.

एवढं बोलला आणि माझ्या हातातनं सईला त्यानं घेतलं. तिच्याशी घरी पोचेपर्यंत तो खेळत राहिला. मी मात्र यंत्रासारखी त्यांच्या मागून चालत होते.


- संवादिनी

Thursday, May 24, 2012

दुसरी आई आणि पहिली आई

नवरा बारा गावं फिरत असतो, खाण्यापिण्याची आबाळ, प्रवासाचा त्रास आणि बारा गावची वेगवेगळी हवा. त्यात थंडी वाढायला लागलेली. परत आला तोच अंगात ताप घेऊन. बरं शनिवार रविवार झाल्यावर त्याला परत बाहेरगावी जायचं होतं. पण अंगावर दुखणं काढायची सवय आणि प्रचंड आवड त्याला आहे, त्यामुळे दोन दिवस शांतपणे बिछान्यात पडून आराम करायचा सोडून हा बागेत काम करीत बसला. सोमवार उजाडला तसा मी आणि माझी मुलगी झोपेतून उठायचा आत निघून सुद्धा गेला.


नेहमीप्रमाणे मी थोड्या वेळानं उठले. माझ्या छकूला तिच्या डे केअरमध्ये सोडून मला कामावर जायचं असतं, त्यामुळे सकाळची धावपळ फार असते. पण उठले तेच अंगात कणकण घेऊन. दुखण्याची चिंता करायला वेळ कुणाकडे होता? पटापट आवरून सईला तिच्या ठिकाणी सोडलं आणि मी कामावर पळाले.

दुपारपर्यंत सर्दीचा चांगलाच त्रास व्हायला लागला. नवऱ्याचा फोन येऊन गेला. त्याचीही तब्येतीची कुरकूरच होती. दुपारी एक महत्त्वाची मीटिंग होती, तोपर्यंत आपल्याला बरं नाहीये ह्याची जाणीव फारशी नव्हती, पण ती मीटिंग पार पडली आणि मी माझ्या डेस्कवर परत आले आणि मग लक्षात आलं की अंग चांगलंच फणफणलं होतं. घरी जाणं आवश्यकंच होतं. पण आता घरी गेले तर सईला आणायला परत बाहेर पडावं लागलंच असतं. बर नवऱ्याचा ताप मला आला, माझा तिला आला तर?

जुजबी औषध घेतलं आणि तशीच काम करीत राहिले. अर्ध्या तासातच सईच्या डे केअरमधून फोन आला. सईलाही ताप चढलाय आणि नेमकी मी तिच्या बॅगेत पॅनॅडॉल ठेवायची विसरले होते. इथले नियम असे की मुलगी तापाने फणफणली तरी चालेल पण डे केअरचे लोकं स्वतः औषध देत नाहीत. जर तिच्या पालकांनी औषध सोबत दिलं असेल तेच औषध ते देऊ शकतात. तसंही तिला ताप आहे म्हटल्यावर मला ताबडतोब जाणं भाग होतं.

ऑफिसात उद्या येत नाही म्हणून सांगून मी बाहेर पडले. सईला चांगलाच ताप भरलेला होता. पोरगी अगदी मलूल होऊन गेली होती. एरवी तिला आणायला गेलं की तिच्या बोबड्या भाषेत आज काय काय केलं हे सांगायचा तिला कोण उत्साह. पण आज मात्र बिचारी खांद्यावर डोकं टाकून पडून राहिली. डे केअरमध्ये त्यांनी शेवटचा ताप बघितला तेव्हा चाळीस होता. त्यामुळे पहिलं तिला घरी जाऊन पॅनॅडॉल (म्हणजे भारतातलं मेटॅसीन वगैरे) द्यायलाच हवं होतं.

घरी जाऊन तिला औषध दिलं. मीही घेतलं. साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी तिचा ताप थोडा उतरायला हवा होता. तो उतरायच्या ऐवजी आणखीनंच चढला. संध्याकाळ झालेली होती आमचे डॉक्टर बंद. नवऱ्याला फोन केला. त्याने इंटरनेटवरून एका मेडिकल सेंटरचा पत्ता काढला. धावत धावत तिथे गेले तर तिथल्या डॉक्टरीण बाईंनी ताप जास्त असला तरी काळजी करण्याचं काही कारण नाही असं सांगून बोळवण केली. घरी येऊन पुन्हा ताप पाहिला तर बेचाळीस डिग्रीज होता.

आता मात्र माझा धीर सुटायला लागला. मी नवऱ्याला पुन्हा फोन केला. त्यालाही टेन्शन आलं. तो म्हणाला ताबडतोब गाडीत घाल आणि हॉस्पिटलला ने म्हणून. मलाही पटलं. हॉस्पिटलला गेले. तिथे सगळ्या टेस्ट झाल्या, एक्सरे काढला आणि पुन्हा काहीच झालं नाही असं डॉक्टरनं सांगितलं. पण दरम्यानच्या काळात त्यांनी दिलेल्या औषधाने सईचा ताप कमी झाला. पूर्ण उतरला नसला तरी कमी झाला ह्यातच मला बरं वाटलं.


मध्यरात्रीनंतर मी घरी परतले. सईला दूध पाजून झोपवलं आणि मी सोफ्यावर अंग टाकलं तेव्हा लक्षात आलं की माझं अंग प्रचंड दुखतंय, तापही चढलेला होता. मी माझं औषध घेतलं बराच वेळ एकटीच बसून राहिले. मनात नको नको ते विचार येत राहिले. का आपण आपला स्वतःचा आणि आपल्या मुलांचा असा छळ करतो. आपला देश, आपली माणसं सोडून असं भरकटलेलं आयुष्य जगतो उपटसुंभासारखे? मनातल्या मनात नवऱ्यालाही लाखोली वाहिली. तेवढ्यात मोबाईल वाजला.


आवाजाने सई उठणार म्हणून कपाळावर आठ्याच उमटल्या. नशिबाने ती उठली नाही. आईचा फोन होता. नवऱ्याने घरी फोन करून सगळं सांगितलं होतं. पहिलं वाक्य आई काय म्हणाली असेल तर बाळा कशी आहेस? ते ऐकलं आणि मला हमसाहमशी रडायलाच आलं. एकदम माझं लहानपण आठवलं, माझी आजारपणं आठवली. तेव्हा कदाचित माझ्याही आईला बरं वाटत नसेल पण तिनं तिचं दुखणं विसरून माझी सेवा केली असेल. आजही तिला माझीच काळजी लागलेली.

तिचं आईपण समजण्यासाठी मला स्वतःला आई व्हायला लागलं, तोपर्यंत मला समजलंच नव्हतं आई काय चीज असते ते,

- संवादिनी

Thursday, May 17, 2012

स्वप्न आणि सत्य

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नुकतीच माझी सी. ए. ची परीक्षा झालेली होती. करण्यासारखं काहीच नव्हतं. नाही म्हणायला आर्टिकलशिप चालू होती, पण त्यात काही लक्ष लागत नव्हतं. एका रविवारी मी आई आणि बाबा क्लबवर गेलो होतो. तिथे जाणं मला काही नवीन नव्हतं. मुंबईचे हुज हु तिथे असायचे. अर्थात बाबा म्हणायचा कि हे काही त्याचं कर्तुत्व नव्हे. त्याच्या बाबाचं. असो सांगायचा मुद्दा असा कि तिथे कधी मधी सेलिब्रिटी लोकांचं दर्शन व्हायचं. काही बाबाच्या ओळखीचेही होते.

त्या दिवशी आम्हाला सिनेमा क्षेत्रात प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती भेटली. अर्थात ते बाबाच्या ओळखीचे असल्याने थोड्या गप्पा झाल्या. माझा विषय निघाल्यावर मी नाटकात वगैरे कामं करते, गाणं म्हणते वगैरे आईने उगा सांगून टाकलं. काय त्यांच्या डोक्यात आलं कोण जाणे, ते म्हणाले एका नाटकाची ऑडिशन चाललेय. तुला इच्छा असेल तर ये. तसंही काही दुसरं हातात नव्हतं, मी जायचं ठरवलं. काही मुलं मुली आलेले होते. त्या गर्दीत खरं सांगायचं तर मी बुजून गेलेले होते, पण तरी मोठा धैर्याधाराचा आव आणून मी तिथे उभी होते. एक एक करत माझा नंबर आला. मला आत बोलावलं. काय रोल आहे ते सांगितलं. रोल साधासाच होता. काय दोन चार वाक्य दिली होती हातात ती मी म्हटली आणि मी घरी आले.

एकंदरीत ह्या सगळ्या प्रकारात मला काही विशेष रस वाटला नव्हता. त्यामुळे आमच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे हा वृत्तांत रात्री घरी सांगितल्यावर आणि ह्या सगळ्या प्रकारावर भरपूर हास्य विनोद करून मी झोपी गेले. दोन दिवस काहीही झालं नाही तेव्हा मीही नाद सोडून दिला. तिथे बऱ्याच मुली होत्या, त्यांचा अनुभवही कदाचित जास्त असेल, मला तसा चान्स नव्हता. वर रोलही आजुबाजुचाच होता. माझ्यापुरता विषय संपला.

अजून महिन्याभराने सी. ए. चा निकाल लागला. कॅम्पस राउंड सुरु होत्या. आणि अचानक मला त्या सिनेमावाल्या काकांचा फोन आला. काहीही न सांगता त्यांनी मला भेटायला बोलावलं. का बोलावलं असेल हा विचार करत करतंच मी गेले. काका भारी चिंतेत वाटले. ते म्हणाले कि नाटक आठवड्यावर येऊन ठेपलंय, मुहूर्ताचा शो ठरलाय आणि ऐन वेळी नाटकाच्या हिरोईननं माघार घेतलेली आहे. आणि मी ते काम करावं अशी गळ त्यांनी मला घातली. मुळात मला मेन रोलच्या ऑडीशानला बोलावाल्म्च नव्हतं त्यामुळे हे कसं काय झालं ह्याचा विचार करीत करीतच मी घरी आले.

आई बाबांना विचारलं. दोघांनाही मी हि संधी सोडू नये असं वाटलं. त्यानंतरचे पाच दिवस सही गेले. सगळे गाजलेले नट, पण सगळे मला सांभाळून घेत होते. तयारी मस्त चाललेली होती. माझा स्वतःचा confidence खूप वाढलेला होता. दिवसभर तालमी करून दमून भागून रात्री परत आले कि बिछान्यावर पडल्या पडल्या भविष्याची स्वप्न पडायला लागली. हे नाटक, नाटकाचे येणारे रिव्ह्यूज, माझं कौतुक, मग अजून एखादं नाटक, मग सिनेमा, मराठी, हिंदी. मोठं करिअर मोठी स्वप्न. दोन दिवसावर पहिला प्रयोग आलेला, सगळं सुरळीत चालू होतं.

सहाव्या दिवशी मी तालामिला पोचले आणि बघते तर काय, जिने पाच दिवस आधी नाटकातून अंग काढून घेतलेलं होतं ती बया हजर. मला पाहताच सिनेमावाले काका पुढे आले. मला आत मेकप रुममध्ये घेऊन गेले. चांगल्या शब्दात त्यांनी मला सांगितलं कि ती मुलगी परत आलेली आहे. तिनं महिनाभर तालमी केलेल्या आहेत. तू नवखी आहेस. तू अभिनय शिकलेली नाहीस. नाटकाच्या यशाच्या दृष्टीने तिनंच काम केलं तर जास्त बरं होईल. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. गेले पाच दिवस मी ह्या नाटकासाठी मर मर कष्ट केले आणि आज ह्यांनी मला खड्यासारखं बाजूला काढून टाकलं? मी फक्त हो म्हणाले. पुढच्या नाटकात मात्र ते मलाच घेणार असंहि म्हणाले. मी मान हलवली आणि बाहेर आले. काल माझ्यासोबर काम करणारे सगळे आज तिच्याबरोबर होते. त्यांच्यासाठी जणू माझं अस्तित्वच नव्हतं.

मी घरी आले. घरी कुणीच नव्हतं. हताश मनाने मी तशीच वेड्यासारखी बसून राहिले. बऱ्याच वेळानं बाबा आला. त्याला सगळं सांगितलं आणि मात्र अनावर झालं आणि रडू कोसळलं. त्यानं मला रडू दिलं. पहिला भार ओसरला तसा तो उठला. आतमध्ये गेला आणि काहीतरी घेऊन आला. ती एक कॅसेट होती. बीटल्सची होती, त्यावर जॉन लेननचा फोटो होता आणि खाली त्याचं वाक्य होतं.

Life is something that happens while you are busy making other plans.

त्यानं माझ्या हारातली कॅसेट घेतली आणि स्टीरीओवर लावली देखील. ह्याउप्पर त्याने मला काही समजावलं नाही. पण एकही वाक्य न बोलता खूप काही समजावलं.

अर्थात म्हणून मी स्वप्न बघणं सोडलं नाही. आणि मी कधीही न बघितलेली स्वप्न सत्यात उतरवायचं आयुष्यानं थांबवलं नाही.
 
 
 - संवादिनी


Thursday, May 10, 2012

प्रश्न आणि उत्तर

मध्ये एक खासंच गंमत झाली. लिहावी का लिहू नये असा विचार बऱ्याच वेळा आला. शेवटी मनाचा हिय्या करून लिहायचंच ठरवलं. काही गोष्टी खूप हळूवार असतात पण आपल्या संसाराच्या, कामाच्या रगाड्यामध्ये कुठेतरी हरवून गेलेल्या असतात. एखाद्या जिवलग पुस्तकावर धुळीची पुटं साचली की त्या जीवलगाचं अस्तीत्वच विसरायला होतं, तसंच काहीतरी. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे.

आमच्या शाळेच्या दहावीच्या वर्गाचं रियुनिअन झालं. खरंतर मी ह्या शाळेतली उपरी. नववीच्या वर्षात मी ह्या शाळेत आले आणि दहावीत बाहेर पडले. बऱ्याच वर्षांनी आम्ही सर्वजणं भेटलो. अगदी काही लोकांना तर मी शाळा सोडल्यावर पहिल्यांदा पाहिलं.

त्यातलाच एक तो. तिशीच्या आसपास, डोळ्यावरचा चस्मा तसाच. वजन बऱ्यापैकी वाढलेलं. एका मुलाचा बाप झाल्यावर जो संथपणा आपोआपच पुरुषाच्या देहबोलीत येतो तो आलेला. बरच काही बदललेलं. फक्त एक गोष्ट मात्र तशीच. त्याची स्माइल. पण एक मात्र नक्की आता तो माझ्यासाठी तितकासा महत्त्वाचा न राहिलेला आणि बहुदा मीही त्याच्यासाठी. पण ज्या हळूवार आठवणींच्या प्लॅशबॅकमध्ये तो मला घेऊन गेला आणि कदाचित मीही त्याला घेऊन गेले त्या महत्त्वाच्या.

मी नवीनच शाळेत यायला लागलेले होते. फार कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. जुन्या मुलींचे आपापले ग्रूप्स होते. त्यांच्या ग्रूप्समध्ये घुसायला मिळणं कठीण होतं. मलाही नवी शाळा फारशी आवडलेली नव्हती. दोन वर्ष कशीबशी काढायची आणि आपण आपलं बाहेर पडायचं हे मी स्वतःला सतत पढवत होते. मघाशी म्हणाले, तो आमच्याच सोसायटीत राहणारा. कधीमधी चुकून रस्त्यात भेट व्हायला लागली. कधी शाळेत एकत्र जायला लागलो.

पण हा मोठा मजेशीर होता. काही बोलायचाच नाही. मीच आपली त्याला काहीबाही विचारत राहायचे आणि अगदीच नाईलाज म्हणून हा उत्तरं द्यायचा. मित्रांबरोबर तो असताना मी समोरून आले की नजर टाळायचा. मला गंमतच वाटायची. मग मी मुद्दाम तो त्याच्या मित्रांसोबत असताना त्याला जाऊन उगाचंच अभ्यासाचं काहीतरी विचारायचे. एकदम वरमून जायचा तो. पण एकटा असेल तर मात्र अगदी एक क्षण का होईना वर बघून हसायचा.

गोरा गोमटा, काळा काड्यांचा चस्मा. विखुरलेले केस आणि तेच ते क्यूट स्माईल. ते वयच वेगळं असतं. प्रेम म्हणजे काय असू शकतं ह्याचा फक्त अंदाज यायला लागलेला असतो. प्रेमात पडावसं वाटत असतं पण का कोण जाणे प्रेमात पडणं भयंकर वाईट कृत्य आहे असंही वाटत असतं. मी प्रेमात पडले होते असं नक्कीच म्हणणार नाही. पण त्याचं माझ्यासोबत असणं. हसणं, शब्दाला शब्द एवढंच बोलणं हे कुठेतरी आवडायला लागलेलं. आणि त्यालाही.

वर्गात ह्या गोष्टीचं गॉसिपतर भयंकर चालायचं. मग थोडी चिडवा चिडवी, भांडणं हे सगळं आलंच. बरं तिच्या मनातलं त्याच्यापर्यंत आणि त्याच्या मनातलं तिच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तिच्या मैत्रिणींनी आणि त्याच्या मित्रांनी घेतलेली असते. अशी सगळी धमाल चालू असताना एक दिवस माझ्या मैत्रिणीनी मला निरोप दिला. गणिताच्या क्लासच्या आधी अर्धा तास त्यानं बोलावलंय.

मनात खूप धाकधूक होती. एकतर दहावीची परीक्षा डोक्यावर आलेली. अभ्यासाचं टेन्शन होतं. पण कुठेतरी हे सगळंही हवं हवसं वाटणारं होतं. तो बहुतेक आज मला विचारणार होता. विचारणार म्हणजे प्रपोज करणार होता. जावं की न जावं? शेवटी मनाचा हिय्या करून जायचं ठरवलं. आई बाबा कामावर गेलेले होते. आजीला खोटंच सांगितलं आज लवकर बोलावलंय आणि बाहेर पडले. माझ्या घरापासून साधारण पाचव्या मिनिटाला मी क्लासच्या इथे पोचायचं. पण त्या पाच मिनिटात किमान पाच हजार वेळा छाती धडधडली असेल. जे होत होतं ते हवसं होतं आणि नकोसंही.

तो तिथे आधीच आलेला होता. मी आले आणि त्याच्या बाजूला जाऊन बसले. तो जबरदस्त टेन्शनमध्ये होता. खरंतर तिथे अर्धा तास आधी जाणं हाच होकार होता आता फक्त त्याने मला विचारायचं मी हो म्हणायचं इतकंच शिल्लक होतं. ऍड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. पण प्रश्न विचारायला तो इतका घाबरला की त्याने प्रश्न विचारलाच नाही. मी न विचारता उत्तर द्यायचा प्रश्नच नव्हता. अर्धा तास संपून गेला आणि दहावीचं वर्षही.

कॉलेज वेगळं, विषय वेगळे. पुढे ते लोकं मुंबई सोडून गेले. कुठे गेले कधी गेले काही पत्ता लागला नाही. आज हा असा अनेक वर्षांनी भेटला. आम्ही खूप गप्पा मारल्या. हसलो, खिदळलो. आमच्या त्या इअवल्याश्या जगातून बाहेर पडल्यावर आम्ही किती काय काय केलं ह्याचे हिशेब मांडत बसलो. अगदी निरोपाचं बाय बाय करायची वेळ आली. तू मला तेव्हा का विचारलं नाहीस रे? असं अनेकदा त्याला विचारावंसं वाटलं पण नाही विचारू शकले. न विचारलेल्या प्रश्नाचं त्यानं उत्तर देण्याचा प्रश्नच नव्हता.

तेव्हा त्यानं एक विचारलं नाही आणि आता मी दुसरं. पण काही प्रश्न बहुदा असे अनुत्तरीतच ठेवण्यात गंमत असावी.



- संवादिनी



Saturday, May 5, 2012

आवर्तन

होते एक रान, त्याच्या दूर दूर वाटा
कंच माणिकाचे खण, त्याच्या नादावल्या छटा.

आले वादळ जोमाचे, फांदी फांदीवर घासे
एक ठिणगी सुसाटे, कसे नशिबाचे फासे

रान जळे रान पळे, त्याची सल कोणा कळे
इथे राख तिथे राख, मध्ये झरा भळभळे

त्या राखेतून एक, पक्षी उडे गगनात
पान उडे रान उडेउडे मन तरारत

वाटा दूर दूर जाती. छटा पुन्हा नादावीती 
पुन्हा भरारले रान, झाले आवर्तन पूर्ण

 - संवादिनी

Friday, December 2, 2011

देवयानी (34)

सरतेशेवटी ...

माझ्या मनातली जी सल होती, बोच होती, ती मी इथे उतरवण्याचा प्रयत्न केला. वाचताना कदाचित माझी दयाही आली असेल काही जणांना. पण हा एक आयुष्याचा दुखरा कोपरा आहे. सगळं आयुष्यच दुःखी आहे असं नव्हे. विशेषतः माझ्या कामाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत मी अतिशय समाधानी आहे. मी आणि माझे मित्र मैत्रिणी आमच्या बिझी शेड्यूल्स मधून वेळ काढून भेटत असतो, मजा करीत असतो. आयुष्य अगदीच टाकाऊ आहे असं नाही. आपण नेहमी आपली दुःखच उगाळत राहतो आणि सुखांसाठी देवाचे आभार मानायचे राहून जातात तसंच काहीसं हा ब्लॉग लिहिताना झालं माझं.

लिहिताना सुरुवात काही वेगळंच डोक्यात ठेवून केली होती. लिहिण्याचा ओघात एकेक घडी उलगडत गेली. काही गोष्टींकडे मागे वळून बघताना तटस्थपणे पाहता आलं. त्या क्षणी मला त्या व्यक्तीचा आलेला राग किती अवाजवी होता हे बऱ्याच वेळा जाणवलं. अनेकदा लिहायचा कंटाळा आला. वाचायचाही नक्की आला असेल, पण अनेकदा अगदी मध्यरात्रीपण मी काही पोस्टस लिहिले. तेव्हा लिहायचंच होतं असं झालं.

शमाने मला इथे लिहायची परवानगी दिली म्हणून तिचे खूप खूप थँक्स. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर एवढ्या लोकांनी मी लिहिलेलं वाचलं नसतं आणि दुसरं म्हणजे तिने ज्या पद्धतीने लिहिलं त्याच्याशी सुसंगत काहीशीच ही संकल्पना होती. आता तिनं पुन्हा एकदा लिहायला सुरवात करावी आय ऍम डाइंग टू रीड यू शमा.

आणि सर्व वाचकांचे, आणि मुद्दाम कमेंट लिहून कळवणाऱ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या प्रोत्साहनानेच मला इतकं लिहितं केलं. चैतीस पोस्ट एवढ्या पटापट नाहीतर मी उभ्या जन्मात लिहिले नसते.

माय लास्ट वर्डस ऑन धिस ब्लॉग?

आय विल मिस यू ऑल. :)

- देवयानी

Monday, November 28, 2011

देवयानी (33)

नोकरी बदलली. पण ती करणारी तर मीच होते ना? जे प्रॉब्लेम्स आधी होते ते ही नोकरी सुरू झाल्यावरही तसेच आहेत. अर्थात लग्न वगैरे करण्याचा विचारच मी आता सोडून दिलेला आहे. जेवढं काही माझ्या वाट्याला त्याबाबतीत यायचं होतं तेवढं भल्या बुऱ्या मार्गाने मला मिळालेलं आहे. मै और मेरी तनहाई, आम्हा दोघींचीच जोडी कायम राहणार बहुतेक असं मी गमतीनं बऱ्याचदा म्हणते. आणि तेच खरं होणार आहे. असं लिहिताना मनाला थोडंसं बोचतं. पण पुन्हा विषाची परीक्षा घेण्यापेक्षा ही कधीमधी मनाला लागणारी बोच परवडली.

आई आहे तोपर्यंत आई आणि तिच्यानंतर मी एकटी असं मी माझं आयुष्य काढणार आहे. नशिबाने चांगली नोकरी असल्याने वेळ बरा जातो. दिवसा जगाशी लढाई करून रात्री एकटीच मी माझ्या आरामखुर्चीत वाइनचे घोट घेत बसते तेव्हा जीव कसनुसा होतो. नाही असं नाही. पण त्यावर आता काही उपाय नाही. आई होण्याची तीव्र इच्छा मात्र मनात अजूनही आहे. पण हे सगळं आत्याला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं ह्या धाटणीचं आहे.

कुमारी मातांचा प्रश्न कधी मधी पुरवण्यांतून चघळला जातोच. कधी वाटतं आपणही असं काहीतरी करावं. डोनर स्पर्म घेऊन आपलं स्वतःचं मूल जन्माला घालावं आणि मग त्याला किंवा तिला वाढवावं. पण हल्ली ना, माझी कुणाशी भांडण्याची ताकत आणि इच्छा दोन्हीही खूप कमी झालेय. समाजाशी मी गेली अनेक वर्ष भांडतेय. अजून किती भांडू? मग वाटतं नकोच तसलं काही धाडसी. त्यापेक्षा आपण बरं आपली आरामखुर्ची बरी. आई स्वयंपाक करते मी पैसे कमावते आमच्या दोघींचं बरं चाललंय.

पण मध्ये एक सुंदर घटना घडली. एका कॉर्पोरेट फंक्शनला सिंधूताई सकपाळ ह्यांना पाहण्याचा, ऐकण्याचा योग आला. मला मोठी मजा वाटली. सगळी त्यांची मुलंच. आणि त्या सगळ्यांच्या आई. आई होण्यासाठी मूल जन्माला घालण्याची काय गरज आहे? हा एक वेगळाच विचार मनात आला. अर्थात स्वतःचं मूल होणं ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी तो उपाय नव्हे. पण माझ्यासारखी बाई जिला आई व्हायचंय पण होऊ शकत नाही तिनं हा पर्याय का स्वीकारू नये? त्या क्षणी वाटलं की सोडून द्यावं आपलं हे जग आणि जावं त्यांच्याबरोबर आणि एक आई म्हणून काढावं उरलेलं आयुष्य. किती उदात विचार आहे हा नाही का?

पण सर्वसामान्य माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे. आपण ते एक पाऊल उचलू शकत नाही. मला माहितेय की मी खरंच त्या आश्रमात गेले तर मला माझ्या आयुष्यात खूप आनंद मिळेल, पण मला खूप आनंदाबरोबर माझी आरामखुर्चीही हवी आहे. हातात उंची वाइनचा ग्लासही हवा आहे. एसी गाडीही हवी आहे आणि इतर सर्व सुखसोयीही हव्या आहेत. ते कसं काय जमायचं? नुसतं समाजकार्यच नाही, पण उद्या मी खरंच मूल दत्तक घ्यायचं ठरवलं तरी त्या मुलाला किंवा मुलीला पूर्ण न्याय मी देऊ शकणार आहे का हे मला ठरवावं लागेल. त्यासाठी लागणार वेळेची कमिटमेंट मला द्यावी लागेल.

पण ही एक संधी आहे, आयुष्याला एक दिशा देण्याची आणि ती मी सहजासहजी दवडणार नाही. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात दैवाने मला भरभरून दिलं, नाऊ इटस हाय टाइम आय गेट माय शेअर इन माय पर्सनल लाईफ. अजून काही अपेक्षा नाहीतच.

- देवयानी

Friday, November 18, 2011

देवयानी (32)

तो गेला तसा माझ्या डोळ्यातून एक अश्रू निसटलाच. गालावर ओघळला. तो शँपेनचे ग्लास भरून आला. मी रडतेय हे त्याला कळलं पण ते त्याला कळलं हे मला कळलं नाही. दिवसभर कामाच्या गडबडीत मी अप्सेट आहे हे त्याच्या लक्षात आलं नसावं किंवा माझ्यावरच प्रेझेंटेशनचं एवढं प्रेशर होतं की त्या ओझ्याखाली डोळ्यातनं एखादा अश्रूही मी बाहेर पडू दिला नव्हता. मला एकटीला माझ्या रूमच्या चार भिंतीत जे करायचं होतं ते आता नकळत प्रीतमच्या समोर झालं.

तो माझ्या शेजारी येऊन बसला तेही मला समजलं नाही. त्याने खांदे हालवून मला जागं केलं मी त्याच्याकडे पाहिलं नि माझा बांध फुटला. पुढची कित्येक मिनिटं मी नुसती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होते. पहिला भर ओसरल्यावर त्याने मला विचारलं की काय झालं. मी त्याला सकाळच्या मनीषच्या फोनबद्दल सांगितलं. त्याने लग्न करायला नकार दिला होता. का? तर मी अनुरागबरोबर शरीरसंबंध ठेवले होते म्हणून. अर्थात त्याचं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाही. आजही. चूक माझी होती. मी त्याला आधीच हे सगळं सांगायला हवं होतं. मी साखरपुडा झाल्यावर त्याला सांगितलं. त्याला ते पटणं न पटणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न होता. त्यामुळे त्याचं नाहीच चुकलं. माझंच चुकलं.

आधी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण करून मी जिथून सुरुवात केली तिथे पोचले. दैवाने मला इतका दगा इतक्या सातत्याने का द्यावा? मीच का? बाकी जग सुखी असताना माझ्या एकटीच्याच बाबतीत हे पुन्हा पुन्हा का व्हावं ह्या विचाराने डोकं बधिर झालं. मला पार्टनर हवा होता, मला सेटल व्हायचं होतं, मला मूल हवं होतं. आता काहीही मिळणार नव्हतं. पुन्हा एक लढाई, विजयाचा घास तोंडात पडतोय असं वाटत असताना पुन्हा जिव्हारी लागणारा पराभव, पुन्हा तेच जीव लावण्याच्या जागा शोधणं, जीव लावणं आणि मन मोडणं. मीच का?

ह्या वेळी मी दैवासमोर हरणार नव्हते. मला हवं ते सुख मला ओरबाडून घ्यायचं होतं. प्रीतमच्या खांद्यावरून मी माझी मान उचलली आणि ओठ त्याच्या ओठावर टेकले. मला हे सगळं सगळं विसरून जायचं होतं. मला हरायचं नव्हतं. एकदा तरी मला जिंकायचं होतं आणि मी जिंकले होते. अफूची गोळी घ्यावी तसं माझं दुःख मी रात्रभर का होईना विसरले. सकाळी उठले तेच डिप्रेशन मध्ये, काल मूर्खासारखं मी काय करून बसले होते? ऑफ ऑल द पीपल प्रीतम? मला राहून राहून मिषूचा आणि त्याच्या मुलीचा चेहरा आठवत होता. मी त्यांची केवढी मोठी गुन्हेगार होते. मला सुख मिळत नाही म्हणून मी दुसऱ्याचं ओरबाडून घेतलं होतं. इतकी नीच मी कशी झाले?

असो, त्या चुकीबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कधीच म्हणजे कधीच नाही. मराठीत एक म्हण आहे कळतं पण वळत नाही. तसं माझं झालं होतं. आणि ही चूक मी एकदा नाही तर अनेकदा निलाजरेपणे केली. मिषू माझी मैत्रीण आहे आणि माझी तिच्याप्रती काही जबाबदारी आहे हे मी मनाशी घोकत राहायचे. झालं गेलं गंगेला मिळालं पण पुन्हा ही चूक करता कामा नये असं दिवस रात्र स्वतःला समजावर राहायचे, पण प्रीतम जवळ आला की हे सगळे बंध गळून पडायचे मी फक्त त्या ऍनिमल इन्स्टिंक्टला शरण जायचे. अफूची गोळी. त्यातून मनाला आणि शरीराला मिळणारी एक प्रचंड हाय आणि तिचा अंमल उतरल्यावर येणारं डिप्रेशन ह्या चक्रातून मी दिवसेंदिवस फिरत होते.

ह्या सगळ्याचा माझ्या शरीरावर परिणाम व्हायला लागला. वजन खूप कमी झालं, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली. मेकअपचे थर वाढले. डॉक्टरी इलाजांनीही काही सुधारणा झाली नाही. शेवटी मला एका मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला लागलं. ती खूप छान आहे. तिने मला बोलतं केलं. हे सगळं जे माझ्या मनात कोंडून राहिलेलं होतं ते मोकळं झालं. अक्षरशः ठणकणारं गळू फुटलं की कसं बरं वाटतं तसं मला वाटलं. तिच्या मदतीने माझी गाडी हळू हळू पूर्वपदावर आली. प्रीतमशी संबंध पूर्णपणे तोडून टाकण्यापर्यत माझं मनोधैर्य वाढलं. अर्थात मी त्याच्याशी अजिबात न बोलणं शक्य नाही कारण त्याच्याशी नाही तरी मिषूशी मला आठवड्यातून किमान एकदातरी बोलावंच लागतं.

त्याच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून मी पुन्हा मार्केटिंगमधून डिलिव्हरी मध्ये आले. अगदी कुणाला आवडत नाही ती अर्ली मॉर्निंग शिफ्ट घेतली. चारच्या ठोकायला काम सुरू करायचं आणि दुपारी एक वाजता ऑफिस सोडायचं. पुन्हा आयुष्यात अशी चूक करण्यासाठी रात्रीच ठेवायच्या नाहीत असं मी ठरवलं. सगळ्या रात्री सकाळी लवकर उठण्याच्या चिंतेत जाळून टाकल्या. झोंबीसारखं आयुष्य जगले. जगापासून स्वतःला तोडून घेतलं आणि आपल्याच पाशात गुरफटत राहिले.

काळ हाच सर्वांवरचा एकमेव इलाज आहे. इथे ह्या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केल्यानंतर मी विंफो सोडली. दुसऱ्या एका कंपनीत महत्त्वाची पोस्ट मला मिळाली. प्रीतम दूर जाणार होता, आवडीचं काम करायला मिळणार होतं. आयुष्यातला एक चॅप्टर बंद होणार होता.

- देवयानी

देवयानी (31)

आधी ठरल्याप्रमाणे बरोबर मी आणि प्रीतम सिंगापूरला पोचलो. दुसऱ्याच दिवशी ऑफिसात जाऊन आमच्या टीममधल्या सिंगापूरच्या ऑफिसमधल्या तीन टीम मेंबर्सची मीटिंग घेतली. आणि प्रेझेंटेशनच्या वेळची स्ट्रॅटेजी ठरवली. प्रेसेंटेशनचे तीन भाग केले. सुरवातीचा भाग त्या तिघांपैकी एकावर सोपवला. मधला भाग माझा. जिथे सर्वात जास्त ऑडिअन्स झोन आऊट होण्याची शक्यता होती आणि तिसरा कमर्शिअल्स डिस्कस करणारा भार प्रीतम करणार होता.

कामाची वाटणी झाल्यावर आम्ही आपापल्या तयारीला लागलो. हे प्रेसेंटेशन देणं म्हणजे एखादा स्टेज शो करण्याच्या बरोबरीचं काम आहे. निदान माझ्या साठी तरी. मी माझं स्क्रिप्ट पूर्ण लिहून घेते, पाठ करते आणि तसंच्या तसं म्हणते. पाठ करून म्हणणं सोपं आहे, पण तुम्ही ते पाठ केलंय हे लोकांना कळू न देणं आणि ते एकदम उत्स्फूर्त असल्याचं भासवणं कठीण आहे. तसंच सगळं स्क्रिप्ट प्रमाणे होतं असं नाही. गाडी कधी कधी रुळावरून घसरते. ती पुन्हा रुळावर आणावी लागते. कोणताही भाग कंटाळवाणा होणार नाही हे पाहावं लागतं. ऍट द सेम टाइम बोलणं फार उथळ वाटणार नाही ह्याचीही काळजी घ्यायला लागते. समोर मोठमोठी लोकं बसलेली असतात, त्यांचे इगोज, त्या कंपनीचं इंटर्नल पॉलिटिक्स ह्या सगळ्याचा विचार करूनच एकेक शब्द बोलावा लागतो.

त्या दिवशी खूप उशीरापर्यंत मी हे सगळं करत राहिले. प्रीतम शेवटी मला बळजबरीनंच हॉटेलवर घेऊन गेला. दिवसभर मला एकदाही मनीषची आठवण आली नव्हती. रात्री बिछान्यावर पडल्यावर मात्र अचानक त्याचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व जाणवलं. त्याच्याबरोबर मला जे काही तास घालवायला मिळाले होते त्याची उजळणी करण्यातच समाधान मानायचं होतं. त्याची वेळ ते भारताची वेळ आणि भारताची वेळ ते सिंगापूरची वेळ अशी गणितं मांडत तो पोचला असेल का ह्याचा अंदाज बांधत बसले. पोचला तर नक्कीच होता पण त्याचा फोन आला नाही. तो फोन करणार होता, पण आला नाही. पोचला ना व्यवस्थित?

पुन्हा पुन्हा माझा भारतातला फोन काढून टेक्स्ट मेसेज आलाय का ते पाहिलं. आता मात्र मला काळजी वाटायला लागली. कॉम्प्युटर सुरू केला. त्याचे फ्लाईट डिटेल्स माझ्याकडे होते. फ्लाईट स्टेटस चेक केलं तर फ्लाईट बरोबर लँड झालं होतं. पण मग असं वाटलं की पोचल्या पोचल्या लगेच तो फोन कसा करणार होता? मग त्याची रात्र झाली आणि त्याच्याइथे आता उजाडलं तर माझी रात्र झालेली, त्यामुळे बहुतेक नसेल केला फोन. उद्या तसाही महत्त्वाचा दिवस होता. सकाळपासून मला अजिबात वेळ मिळणार नव्हता. फोन आला असता तरीही मला तो घेता येणार नव्हता, म्हणजे थोडक्यात अजून दोन दिवस बोलणं होणार नव्हतं. पण मेल तरी करायचा ना एक. विचारांच्या चक्रात गुरफटून कधी झोप लागली ते कळलंच नाही.

महत्त्वाची मीटिंग किंवा प्रेझेंटेशन असेल तेव्हा मला रात्रभर अर्धवट झोप येते सतत कामाचं काहीतरी डोळ्यासमोर दिसत राहत. त्या रात्रीही तसंच चाललं होतं. अचानक फोन वाजला. फोन वाजतोय हे कळायला थोडा वेळ गेला. डोळे किलकिले करून फोन उचलला मनीषचा होता. सकाळचे पाच वाजलेले होते. त्याही अर्धवट झोपेत बहुतेक माझ्या चेहऱ्यावर हासू फुललं असणार. आम्ही बोललो, तो जास्त बोलला, मी ऐकत होते. मी फोन ठेवला आणि बाहेरून गडगटाचा मोठा आवाज झाला. तो दिवसच असा होता. खिडकीचा पडदा सारून बाहेर पाहिलं तर पाऊस कोसळत होता.

मी अगदी यंत्रवत तयार झाले. वेळेवर प्रीतमचा फोन आला. मी बरीचशी डिसओरिएंटेड होते. पण जे बोलणं चाललं होतं त्यात एका दुसऱ्याच लेव्हलला मी इन्व्हॉल्व्हही होते. हे असं दोन वेगळ्या लेव्हल्सना दोन वेगळे विचार तेवढ्याच तीव्रतेने मनात येणं खूप धोकादायक होतं. पण मला गत्यंतर नव्हतं. अगदी यंत्रासारखी मी प्रीतमबरोबर तिथं गेले. आमची टीम मीटिंग झाली, सगळ्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली. माझं काम महत्त्वाचं होतं. हो किंवा नाही ह्यातलं अंतर माझ्या प्रेझेंटेशनने ठरणार होतं. ह्या वर्षीची टार्गेट्स, माझी, प्रीतमची आणि त्या तिघांचीही माझ्यावर अवलंबून होती. एक चूक आणि सगळं पाण्यात जाऊ शकलं असतं. मला एकदम भडभडून आलं. काय झालं माझं मलाच समजलं नाही, पण जे काही होत होतं ते मी तसंच आत खोल दाबून ठेवलं. अगदी नेहमीसारखी बोलत राहिले.

प्रेझेंटेशनची वेळ झाली. सुरवात झाली बॅटन माझ्याकडे आलं. मी पाठ केलेलं तसं बोलले. काय बोलले, कसं बोलले हे तेव्हा मला काही समजलं नाही. ट्रान्स हा शब्द योग्य आहे. सगळा वेळ मी ट्रान्स मध्ये होते. मध्ये कुणी काय प्रश्न विचारले? मी काय उत्तरं दिली मला काही काही आठवत नाही. माझ्यानंतर प्रीतमचं प्रेझेंटेशन झालं आणि प्रपोसलचे फायनलिस्ट जाहीर झाले. आमचं नाव त्यात होतं. आता खरी मजा सुरू होणार होती. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं. संध्याकाळी आम्ही पाचही जणं सेलेब्रेट करायला म्हणून पब मध्ये गेलो. तिथेही काय झालं मला काहीही कळलं नाही. जे समोर येत होतं ते मी खात होते, पीत होते, बोलतही होते. पण मन मात्र वेगळ्याच विश्वात होतं.

तासा दीड तासाने आमचे सिंगापुरमधले कलीग होते ते घरी जायला निघाले. आम्हाला हॉटेलवर ड्रॉप करून ते गेलेसुद्धा. त्या क्षणी मला कधी एकदा माझ्या रूममध्ये जाऊन एकटी होतेय, ह्या जगापासून वेगळी होतेय असं झालेलं होतं. माझी आणि प्रीतमची रूम बाजू बाजूलाच होती. मला माझ्या दरवाज्यापाशी सोडून तो पुढे जाणार इतक्यात तो मला म्हणाला की चल जरा अजून थोडा वेळ गप्पा मारू. लेटस हॅव्ह सम शँपेन. मला खरंतर नको असं जोरात ओरडून सांगावंसं वाटत होतं पण मी हो म्हणाले. त्याच्या मागोमाग त्याच्या रूममध्ये शिरले. सोफ्यावर बसले. प्रीतम बार फ्रीजकडे गेला

- देवयानी

Tuesday, November 15, 2011

देवयानी (30)

हे सगळं सोपं होतं. म्हणजे मी मला स्वतःला समजावणं की टाइम इज रनिंग आऊट. पण लग्न करण्यात एक मोठी अडचण होती. ती म्हणजे मला आवडेल आणि आयुष्य सोबत घालवावंस वाटेल असा नवरा मिळणं. कळत नकळत मी गेली काही वर्ष तो लाईफ पार्टनर शोधत होतेच. पण नाही मिळाला. आता कसा मिळणार होता? शेवटी मी मॅट्रिमोनिअल साईटवर नाव नोंदवलं. तेव्हा हा प्रकार तसा अनोळखी होता. हल्ली सर्रास मुलं मुली ह्या साईट्स वापरात. पण दुसरा काही उपाय नव्हता. म्हणून शेवटी प्रोफाइल तयार केली.

मला अगदी आपण नोकरीसाठी कसा बायो डेटा बनवतो त्याचीच आठवण झाली. हळू हळू काही मुलं ऍप्रोच व्हायला लागली. पण हे सगळं विचित्र होतं. म्हणजे मुलाला आपण स्वतःचा नंबर द्यावा तर मुलगी आगाऊ आहे असं मूलगावाले म्हणणार. जर आईचा दिला तर आईचे जातिधर्माचे क्रायटेरिआ आड येणार. अर्थात ते शेवटी आड येणार होतेच. माझी माझ्या नवऱ्याकडून असलेली अपेक्षा आणि माझ्या आईच्या माझ्या नवऱ्याकडून असलेल्या अपेक्षा ह्यांचा लघुतम सामाईक विभाजक शून्य होता (एकही नाही) त्यामुळे असा मुलगा कधी मला मिळेल आणि माझं लग्न जमेल अशी पुसटशीही आशा मला नव्हती.

पण कधी कधी अशक्य वाटणाऱ्या घटना पटकन घडून जातात. अमेरिकेत बरीच वर्ष शिकलेला, स्थिर स्थावर झालेला, आणि आता लग्नासाठी मुली शोधणारा, वयाने माझ्या वाढलेल्या वयापेक्षाही वाढलेला, दिसायला सुंदर, वाटायला सुशील, सुसंस्कारित आणि पंधरा दिवसासाठीच भारतात येणारा, आई वडिलांनी शॉर्टलिस्ट केलेल्या वीस मुलींना दिवसाला पाच ह्या रेटनी चार दिवसात बघणारा, त्यातला पाच मुलींची पाचव्या दिवशी सेकंड राउंड घेणारा आणि त्यातल्या दोन मुलींची सहाव्या दिवशी थर्ड राउंड घेऊन आठवड्याच्या आत मुलगी पसंत करणारा आणि पुढच्या आठवड्याच्या आत साखरपुडा करून अमेरिकेला पुन्हा जायची घाई असलेला मनीष मला भेटला.

त्याच्या वीसाच्या पाच, पाचाच्या तीन आणि तिनातली एक इतका माझा प्रवास झाला आणि पुढच्या तीन दिवसात साखरपुडाही झाला. आयुष्याचा इतका मोठा निर्णय मी मनीषबरोबर जवळ जवळ दोन तास वीस मिनिटं घालवून घेतला. अर्थात त्यात चुकण्यासारखं काहीही नव्हतं. मनीष जेन्युइनली साधा होता. प्रचंड शिकलेला होता. बराच पगार मिळवणाऱ्या बायकोला अजिबात गर्व होऊ न देण्याइतका दणदणीत पगार त्याला होता. तसंही मी अमेरिकेला गेल्यावर काम करू शकणार नव्हतेच त्यामुळे पगाराचा प्रश्न नव्हताच. पण एकंदरीत नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. वर आमची जात, पोटजात सारखी होती, गोत्र वेगवेगळी होती, पत्रिका जुळत होती. ग्रहताऱ्यांना आमची युती एकदम मान्य होती. आईला मान्य होती. आणि नाही म्हणण्यासारखं मला त्यात काही वाटलं नाही.

साखरपुडा झाला. चार दिवसांनी मनीष अमेरिकेला परत जायचा होता. मलाही पुढच्या आठवड्या ऑफिसच्या कामासाठी सिंगापुराला जायचं होतं. शक्य होईल तेवढा वेळ आम्ही एकत्र घालवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तो पुण्याचा आणि मी मुंबईची त्यामुळे अजून प्रॉब्लेम्स. मला एकच गोष्ट मनातून खात होती. त्याला अनुराग बद्धल मी काहीही सांगितलं नव्हतं. अनुराग जरी माझ्या आयुष्यातून मुळासकट मी उखडून टाकला होता तरी त्याच्याबरोबर घालवलेल्या दिवसांची भुतं मला सहजासहजी सोडणार नव्हती.अनुरागबरोबर जे झालं ते मनीषला न सांगता लपवून ठेवणं मला चुकीचं वाटत होतं.

मनीष अमेरिकेला गेला त्या दिवशी आम्ही मुंबईत तो अमेरिकेला जाण्याआधी शेवटचं भेटलो. ताज महाल पॅलेसमध्ये सी लाउंज म्हणून एक सुंदर रेस्टॉरंट आहे. तिकडे मी त्याला घेऊन गेले होते. चाचपडत, अडखळत शेवटी मी त्याला अनुरागबरोबर जे झालं ते सगळं सांगितलं. अख्खा वेळ मी त्याची रिऍक्शन बघत होते. तो अजिबात चिडला, रागावला नाही. शांतपणे त्याने ऐकून घेतलं. ठीक आहे, एवढं फक्त म्हणाला. मनावरचा ताण एकदम उतरला. पुढचा वेळ माझ्यासाठी छान गेला. मी त्याला एअरपोर्टवर सोडायलाही गेले. त्याचे पुढचे दोन दिवस प्रवासात जाणार होते. मी ही दोन दिवसांनी सिंगापुराला जाणार होते, त्यामुळे त्यानेच मला शक्य होईल तेव्हा माझ्या मोबाईलवर फोन करायचं ठरलं.

तो गेला. पुढचे दोन दिवसही फुलपाखरासारखे उडून गेले. सिंगापुराला आमचं एक अतिशय महत्त्वाचं प्रपोसल होतं. तिथले तीन लोक ह्या प्रपोसलवर काम करीत होते. मी आणि प्रीतम इथून जाणार होतो. आमच्या टार्गेट्स च्या दृष्टीने जीवन मरणाची लढाई होती. त्यात माझाही मूड एकदम मस्त काम करण्याचा होता. कधी नव्हे ते मला काहीतरी टँजिबल फ्युचर दिसत होतं. खूप छान होते ते दिवस.

- देवयानी