Thursday, May 31, 2012

साठी आणि पिंजरा

बाबाची साठी झाली. साठ वर्ष जगणं हे काही त्याच्यासाठी कर्तृत्व नव्हे. आयुष्यात त्याचं एक तत्त्व आहे. ते मला खूप आवडतं. कुठे पोचलात हे जितकं महत्त्वाचं तितका प्रवास किती मस्त झाला हेही महत्त्वाचं. ह्या त्याच्या तत्त्वामुळे आम्ही कधी काळी मुंबईहून गोव्याला पोचायला पाच पाच दिवस घेतलेले आहेत. अर्थात ते दिवस सरले, ते रस्तेही सरले. आयुष्याच्या नागमोडी रस्त्यात वेगवेगळी वळणं येतंच गेली. बाबाची साठी हा असाच त्या रस्त्यावरचा एक थांबा.

वाढदिवस साजरा वगैरे करणं हे त्याला अजिबात मानवत नाही. म्हणून वर्षभर आधीपासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं. एकदमच अचानक मी आणि विन्या एकाच वेळी भारतात कसे आलो अशी शंका येऊ नये म्हणून ह्या सुट्टीचा प्लॅन चांगला वर्षभर आधीपासून केला होता. सगळ्या नातेवाइकांना, बाबाच्या खास मित्रांना आधीपासूनच वेळ आणि जागा सांगून ठेवलेली होती.
त्याला अजिबात कल्पना येऊ नये म्हणून खास माझ्या सासऱ्यांची मदत घेतली. त्यांनी चक्क विन्याला आमच्या फार्म हाऊसवर पनवेलला घेऊन जायचा (खोटा खोटाच) बेत आखला. विन्याला नेणार म्हणजे मलाही जाणं क्रमप्राप्तंच होतं. सगळी तयारी अशी चाललेली होती.

सकाळी उठल्या उठल्याच आम्ही सगळ्यांनी त्याला विश वगैरे केलं. आम्ही आणलेली गिफ्ट्स देऊन टाकली. मुद्दाम माझा नवरा आमच्या घरी आला, त्यानंही बाबाला विश केलं आणि मी आणि विन्या त्याच्यासोबत निघालो. संध्याकाळपर्यंत बरीच तयारी करायची होती. आम्ही तिघेही खरेदी करत फिरत होतो. सईला सासूबाईंकडे ठेवलं.

संध्याकाळी आई बाबाला म्हणाली चला चौपाटीवर फिरायला जाऊ. चौपाटी हा बाबाचा वीक पॉइंट आहे. आमच्या घरापासून चौपाटी म्हणजे अगदी पाच मिनिटाचा रस्ता. बाबा बरोबर अगणित वेळा मी चौपाटीवर गेलेय. चौपाटीची भेळ खात खात त्याचं तत्त्वज्ञान ऐकायचं ही गंमत वेगळीच. आई त्याचं काही ऐकून घेत नाही. आणि त्याला माझ्यापेक्षा दुसरा चांगला ऑडिअन्स नाही. वर भेळेचं ऍट्रॅक्शन असायचंच.
असो तर चौपाटीला जायला बाबा नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ते तिथे पोचले तसे एकेक करून बाबाचे मित्र, काही नातेवाईक आम्ही सगळे जमलो. त्याला खरंच धक्का बसला. केक कापला. मोठ्याने सगळ्यांनी हॅपी बर्थ डे म्हटलं आणि अगदी लहान मुलासारखे फुगेही हवेत सोडले. खूप मजा आली.

सगळी आवरासावर करून आम्ही चालत घरी येत होतो. विन्या आणि आई पुढे होते. मी आणि बाबा आणि माझ्या कडेवर सई असे आम्ही तिघं मागे होतो. कधी नव्हे तो बाबा भावुक झाल्यासारखा मला वाटला. तो बोलायचा थांवला की समजावं की काहीतरी गडबड आहे. मग मीच त्याला काही बाही विचारत बसले. म्हटलं काय रे बाबा इतकी आम्ही तुझी साठी दणक्यात साजरी केली, कसं काय वाटलं?

दोन सेकंद तो काही बोललाच नाही. मी त्याला विचारलं. काय झालं? गप्प का झालास? मग म्हणाला खरं खरं उत्तर देऊ तुझ्या प्रश्नाचं की खोटं? म्हटलं एकदम खरं खरं दे.

म्हणाला सुखोत्सवे असा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे.

एवढं बोलला आणि माझ्या हातातनं सईला त्यानं घेतलं. तिच्याशी घरी पोचेपर्यंत तो खेळत राहिला. मी मात्र यंत्रासारखी त्यांच्या मागून चालत होते.


- संवादिनी

5 comments:

Anonymous said...

नि:शब्द... तुझा बाबा म्हणजे एक 'मिष्टर' आहेत.

Anonymous said...

पण तू तुम्ही नक्की काय काय केलेत ते तर लिहीलेच नाही. फक्त चौपाटीवर जाउन केक कापला? त्या साठी इतकं प्लॅनिंग?
त्याने लिखाणाला अधिक वजन आलं असतं असं मला वाटतं!
आरती

Dr Prashant Mahale said...

samwadini tu boltes na ki ekat rahawe watee.. lihit raha..

अनिकेत वैद्य said...

waiting for next post for 2 thursdays

Anonymous said...

Khup Chaan lihila aahes. Vaachun khoop bara vaatla!