Thursday, September 24, 2009

फँटसी

पित्रुपंधरवडा संपून एकदाचे घट बसले की आमच्या चाळीत उत्साहाचं वारे वाहायला लागायचे. सुरवात व्हायची ती भोंडल्याने आणि मग हळदीकुंकू, दसरा करीत करीत दिवाळीपर्यंतचा वेळ कसा जायचा समजायचंच नाही. भोंडला म्हटला की सर्वात आधी आठवण होते ती परीक्षेची. सहामाई परीक्षेला लागूनच साधारण घट बसायचे. बसायचे म्हणजे अजूनही बसत असतील. पहिल्या दिवशी चाळीतल्या टवाळक्या करत फिरणाऱ्या एक दोन पोरांना पकडून अंगणात दिवे लावून घ्यायचे. ते काम मोठ्या बायकांचं. आम्ही मुली खिडकीच्या गजाआडून तयारी कुठपर्यंत आलेय ते फक्त बघायचं.

नेन्यांच्या घरात बायकांची उभ्यानेच बैठक जमायची. कारण भोंडल्यासाठी पाट त्यांचाच लागायचा ना. त्यांचाच का लागायचा हे मला अजूनही माहीत नाही. पण अजूनही त्यांचाच पाट भोंडल्याला असतो. नेन्यांच्या घरी बापटांकडचे तांदूळ पोचायचे. हत्ती काढायचं काम आमच्या आईचं. चित्र वगैरे काढणारी चाळीत एकंच बाई मग तिला खास हत्तीचं चित्र काढण्यासाठी बोलावलं जायचं. आईही वर्षानुवर्ष त्याच मापाचा तसाच दिसणारा हत्ती काढत राहायची. मग बापटांचे तांदूळ, नेन्यांच्या पाटावर, साठ्यांनी काढलेल्या हत्तीच्या पोटात बसायचे आणि कुणाच्यातरी करंगळीचा छाप हत्तीचा डोळा बनायचा.

असा हा तांदुळाचा हत्ती अंगणाच्या मध्ये ठेवला गेला की मग आम्हा मुलींना खाली जायची परवानगी असायची. अभ्यासातून सुटका झाल्याने सर्वांनाच खूप छान वाटायचं. घटस्थापनेच्या दिवशी अगदी घरात घालायच्या फ्रॉकपासून सुरुवात व्हायची आणि चढत्या भाजणीने दसऱ्यापर्यंत तास दीड तास दवडून साडी किंवा तत्सम काहीतरी मिरवायच्या ड्रेसपर्यंत प्रवास व्हायचा. घट बसायच्या दिवशी पाच बायका आणि पाच पोरी आणि एखादा लहान मुलगा ह्यांनी सुरू झालेला भोंडला दसऱ्याच्या दिवशी चांगला वीसेक बायका पंधराएक पोरी इथपर्यंत फुगायचा. चार पाच गाणी वाढत वाढत दहा पंधरा विसापर्यंत पोचायची. चाळीतल्या हौशी गायिका सगळ्या आपले गळे साफ करून घ्यायच्या. ऐलमा पैलमा पासून सुरवात व्हायची. मग कोणे एके दिवशी काऊ यायचा. सुंद्रीचं लगीन जुळायचं आणि करत करत आडात शिंपले कधी पडायचे ते समजायचं नाही.

छोट्या छोट्या आम्ही पोरी, चाळीत नव्या लग्न होऊन आलेल्या मुली आणि त्यांच्या सास्वा असलेल्या बायका सगळ्या मिळून एकंदरीतच सासर ह्या प्रकाराची टिंगल टवाळी करणारी गाणी म्हणायचो. म्हणजे दात्यांची सून आणि दातेकाकू दोघीही म्हणायच्या

उजव्या हाताला विंचू चावला बाई, विंचू चावला
आणा माझ्या सासर चा वैद्य
अंगात अंगरखा फाटका तुटका,
डोक्याला पागोटे चिंध्या मिंध्या
कपाळाला टिळा शेणाचा

दिसतो कसा बाई XX वाणी.

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे जरतारी
कपाळाला टिळा चंदनाचा

दिसतो कसा बाई राजावाणी...

इतकी गंमत वाटायची. मी आईला विचारायचे पण दाते काकूंना राग नसेल का येत? मग आई सांगायची अगं ही नुसती गंमत आहे. पण ती नुसती गंमत नाहीये. एकच बाई सुनेच्या रोलमध्ये वेगळी वागते आणि सासूच्या रोलमध्ये वेगळी वागते. भोंडला हे तिला ह्याची जाणीव करून देण्याचं माध्यम असावं.

मग दुसरी गाणी सुरू व्हायची.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
सासू पाहुणी आलेय गं बाई आलेय गं बाई

सासूने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
सासूने आणलेय साडी गं बाई, साडी गं बाई

साडी मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिप्रं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

मग एक एक करत सासरा यायचा, नणंद यायची दीर यायचा. काही ना काही आणायचे, पण भोंडल्यातल्या रिंगणातली प्रत्येक बाई तोऱ्याने त्यांना परत पाठवायची. अगदी पळवून लावण्यासाठी झिप्रं कुत्रंसुद्धा सोडायची. आणि त्यांची उडालेली भंबेरी पाहून मनातल्या मनात हसायची. कुठेतरी आत खोलवर आपण घरातली मुलगी नसून सून आहोत त्यामुळे आपल्याला कमीपणा मिळतो ही सल मग तिथे बाहेर पडायची. साडी मी घेत नाही, सांगा मी येत नाही, ह्या शब्दांना तर खास धार चढायची. ही त्यांची एक फँटसी.

आणि मग आम्ही पोरी च्या कडव्याची वाट बघायचो ते यायचं.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
नवरा पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई

नवऱ्याने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
नवऱ्याने आणलंय मंगळसूत्र गं बाई, मंगळसूत्र गं बाई

मंगळसूत्र मी घेते
सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई उघडा गं बाई
झिप्रं कुत्रं बांधा गं बाई बांधा गं बाई

लग्न न झालेल्या मुलींच्या मनात मग सासुरीच्या वाटे येणाऱ्या नवऱ्याची चित्र उमटायची. आमच्या सारख्या शाळकरी मुलींना तर कुणीतरी राजकुमार वगैरे येणार गोष्टीतल्याप्रमाणे असंच वाटायचं. ही आमची एक फँटसी.

शनिवारी घट बसले. हे सगळं सगळं आठवलं. घटकाभर जुन्या दिवसांमध्ये मन गुंगून गेलं. तसे फार दिवस झाले नाहीत म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी मी होतेच की भोंडल्याला. तेव्हा मीही ही फँटसी बघितलीच असेल नाही का? ते दिवस सरले ती स्वप्नही सरली. त्या मैत्रिणीही सरल्या. श्रद्धा अमरिकेला गेली, रमा पुण्याला गेली. प्रीती अजून कुठेतरी, मी अजून कुठेतरी. आम्ही सगळ्या साळकाया म्हाळकाया, भोंडल्याचं रिंगण फिरता फिरताच मोठ्या झालो आणि एकेक करून निघूनही गेलो.

वाटलं सगळ्यांना पुन्हा एकत्र करावं नेन्यांचा पाट घ्यावा, बापटांचे तांदूळ घ्यावेत, आईला हत्ती काढायला सांगावा आणि माझ्या करंगळीने त्याचा डोळा काढावा आणि पुन्हा एकदा ऐलमा पैलमा खेळ मांडावा.

हं. ही माझी एक फँटसी.

-------------

स्नेहा, खो दिल्याबद्दल थँक्स. माझा खो सखीला

Thursday, September 17, 2009

एका पावसाचे पडणे

पाऊस कधीचा पडतो
पाचूंची हिरवी पाने
मातीच्या हीनपणाला
गंधांची ओली दाने

पाऊस कधीचा पडतो
जणू पागोळ्यांच्या माळा
रुणु निळ्या घनाच्या पोटी
झुणु निषादसुंदर गळा

पाऊस कधीचा पडतो
कोरडे मात्र अंगण
स्वप्नांचे बहर बगीचे
मनी मोरांचे रिंगण

पाऊस कधीचा पडतो
मन उदास काहुर होते
मदमत्त वातस्पर्शाने
तनी उसनी हुरहुर होते

पाऊस कधीचा पडतो
पाऊस पाडुनि जातो
पापण्या ठेऊनि ठाक
तो डोळे भिजवुन जातो

Thursday, September 10, 2009

माझे गाणे

माझे गाणे असले गाणे
माझे गाणे तसले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
तरारलेले एक तराणे

माझे गाणे असले गाणे...

पाऊस बिंडा नादावूनी
पागोळ्यांचा धरतो ताल
मल्हाराच्या गोड गळ्यावर
अभ्राभ्रांची सुरेल शाल

कडकड कडकड कडाडणारी
वीजबाईची तान वेगळी
सरसर सरसर रसरसलेली
पऊसरींची मीण आगळी

गरगर गरगर गोल घुमोनी
मारुतराज समेवर येई
ह्या सगळ्या कल्लोळामागे
माझे गाणे हरवून जाई

माझे गाणे असले गाणे?.....

माझे गाणे कसले गाणे
माझे गाणे असले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
कोमेजून गेलेले कण्हणे

Thursday, September 3, 2009

हरवलेली माणसं

रोज साधारण दुपारी दोनच्या सुमाराला आमचा पोस्टमन येतो. इथला पोस्टमन आणि आपला देशी पोस्टमन ह्यात जमीन असमानाचं अंतर आहे. आपला डोक्याला टोपी घालतो, तर ह्याच्या डोक्याला असतं हेल्मेट. आपला सायकल चालवतो तर ह्याला मिळते लुनासारखी बाइक. मग हा पाठीला दप्तर लावून फुटपाथवरून लुना चालवत चालवत प्रत्येक घराच्या समोर थांबतो. सगळ्या पत्रांचा रबरबँड लावून एक गठ्ठा केलेला असतो आणि तो गठ्ठा घराच्या लेटर बॉक्समध्ये टाकून स्वारी पुढच्या घराकडे वळते.

हल्ली पत्र हा प्रकार फक्त घेणेकऱ्यांनी देणेकऱ्यांना पाठवायचाच उरलेला आहे. आमचा लेटरबॉक्स टेलिफोन, इलेक्ट्रिसिटीची बिलं किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट असले फारसे आवडीचे नसलेले प्रकार सोडले तर बाकी इथल्या तिथल्या मॉल्सचे कॅटलॉग्ज, टेक अवे च्या जाहिराती वगैरे वगैरे कचऱ्याच्या टोपलीत (नव्हे रिसायकल बीनमध्ये ) टाकायच्या लायकीच्या गोष्टींनी भरलेला असतो.

पण तरीही पोस्टमन येऊन गेला की ताबडतोब बाहेर जाऊन आपली पत्र घेऊन यायला मला आवडतं. असंच परवा पोस्टमन साहेब येऊन गेल्यावर मी पटकन अंगणात उतरून पत्र आणायला गेले. रोजचा कचरा होताच. पण एक पत्र वेगळंच वाटलं. माझ्याच नावाचं होतं. वेगळंच म्हणजे चक्क हाताने त्यावर माझं नाव आणि पत्ता लिहिला होता. उलटं करून पाहिलं तर कुणाचा पत्ता नव्हता. हं. नाही म्हटलं तरी थोडी उत्सुकता वाढलीच. मनात माहीत होतं की हे काही कामाचं पत्र नाही.

घरात शिरले आणि पत्र उघडलं. चक्क हाताने लिहिलेलं पत्र होतं. भरभर वाचून काढलं. चक्क जग्गूंचं पत्र होतं. किती मोठ्ठं असावं? दोन मोठे फुलस्केप भरून. मला एकदम कसंसंच वाटलं. भारत सुटल्यापासून मी त्यांना पत्र फोन वगैरे काही करण्याचा वीचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. कधी मधी बाबाकडून कळायचं त्यांच्याबद्दल. हल्ली पाय दुखतात म्हणून पॉइंटापर्यंत जात नाहीत, वगैरे माहीत होतं. पण ह्या उप्पर काही विचारण्याचा मी प्रयत्न केला नाही आणि बाबाने त्याहून अधिक काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता.

ह्यांनी चक्क बाबाकडून माझा पत्ता घेऊन मला पत्र पाठवलं. अगदी सगळं सगळं लिहिलं. आमच्या नाना नानी ग्रुपबद्दल लिहिलं. एका आजोबांना तिसरी नात झाली म्हणून त्यांच्या मुलाला शिव्या देऊन झाल्या. म्हणे मुलासाठी कशाला देशाची लोकसंख्या वाढवता? एका आजींच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्या आता फिरायला येत नाहीत. स्वतःबद्दलही खूप लिहिलं. गाण्याचे कार्यक्रम वगैरे जोरदार चाललेत म्हणे. गणपतीचे कार्यक्रम कुठे कुठे काय काय आहेत आणि ते कोणते कोणते पाहायला जाणारेत.

एकदम मस्त वाटलं. आपल्याकडे असलेली एखादी छानशी वस्तू आहे हेच आपण विसरून जातो आणि कधीतरी साफसफाई करताना एकदम ती वस्तू डोळ्यासमोर येते आणि नकळत चेहऱ्यावर हसू फुलतं तसं झालं.

जुने दिवस आठवले. रोज सकाळी न चुकता जायचे मी फिरायला. समुद्राचं वेड होतंच पण आमच्या नाना नानी ग्रुपचं त्याहून होतं. सगळ्या ओल्डीजमध्ये मी एकटी विशीतली होते. सगळ्यांची लाडकी नात. आणि जग्गूंची आणि माझी तर विशेष मैत्री. कारण आम्ही घरी चालत एकत्र जायचो. आणि तो माणूसही असा इंटरेस्टिंग की खूप मजा यायची. त्यांच्या गमती जमती विनोद वगैरे सांगायची पद्धतही खूप छान होती.

पण वेळ बदलते तसं आपलं जग बदलतं. जुने लोकं दूर होतात, नवे लोकं जवळ येतात. रहाटगाडगं चालू असतं. पण कधीतरी असं जुनं काहीतरी आठवतं. वाईट वाटतं. म्हणजे जुने दिवस गेले ह्याचं नाही वाईट वाटत. कारण तेव्हा जी मजा करायची होती ती भरपूर केली. वाईट अशाचं वाटतं की कधी काळी आपल्या आयुष्यात रोजच्या असलेल्या व्यक्तींना आपण पार विसरतो ह्याचं. जग्गू वन्स वॉज लाइक अ बेस्ट फ़्रेंड.

असो, तर अशी त्यांच्या पत्राची मजा. मग मीही त्यांना पत्र लिहायला घेतलं, पण अर्ध्यावरच लक्षात आलं की मला त्यांचा पूर्ण पत्ता कुठे माहितेय, त्यांनी पत्रातही लिहिला नव्हता. जुनी एक सुटकेस आहे माझी, त्यात माझं जुनं सामान भरलंय. ती उपडी करून त्यातून माझी जुनी डायरी शोधायचा प्रयत्न केला. नाही सापडली. जुन्या फोनमध्येही पाहिलं. त्यातही नव्हता. मग सरळ बाबाला फोन केला, त्याला विचारलं त्याच्याकडे आहे का? त्याच्याकडे जग्गूंचा फोन असण्याचं कारणंही नव्हतं. तो म्हणाला मी त्यांना विचारून देतो म्हणून. पण मला ते नको होतं. मला आताच्या आता त्यांच्याशी बोलायचं होतं.

खूप शोधाशोध केली. नाही सापडला. मग स्वतःवरच चिडून खिडकीत जाऊन बसले. हरवलेली माणसं शोधत.