Thursday, August 27, 2009

आणखी एक गणपती

हा आठवडा गणपतीचा. गेल्या वर्षी आखातात होते गणपतीच्या वेळी. ह्या वर्षी इथे आहे. मी घरी नसतानाची ही दुसरी गणेश चतुर्थी. दोन वर्षापूर्वी आम्ही चौघेही घरी होतो. चौघे म्हणजे मी, माझा भाऊ आणि आई बाबा. गेल्या वर्षी एक मेंबर कमी. मी आणि ह्या वर्षी अजून एक मेंबर कमी, माझा भाऊ. आता आई आणि बाबा आणि आमचा सर्वांचा लाडका गणपती.

बाबाला सांगून ठेवलं होतं गणपती घरी आला की मला पहिला फोटो काढून पाठवायचा. आमचा गणपती कधीही बदलत नाही. म्हणजे मला कळायला लागल्यापासूनची जी मूर्ती आहे ती दर वर्षी तशीच असते, पण तरीही ह्या वर्षीची मूर्ती बघण्याची खूप उत्सुकता होती. मखरही पाहायचं होतं. माझा भाऊ नाही म्हणजे मखराची मजा नाहीच. त्याला मी कितीही शिव्या दिल्या तरी ह्या बाबतीत त्याचं फक्त कौतुकच होतं. ह्या वर्षी आईने केलं होतं मखर. कमळाची प्रतिकृती बनवली होती तिनं.

यंदा गणपती रविवारी आले. बरं वाटलं. सकाळी उठून बाप्पाची पूजा केली. म्हणजे आमच्या देवातल्या बाप्पाचीच. मग मोदक बनवायचा घाट घातलेला. घरी असताना आई बनवायची, आजीही बनवायची. दोन्हीकडे जाऊन मोदक खायचं काम आमचं. कधी मला स्वतःला मोदक बनवायची वेळ येईल ही रिऍलिटी तेव्हा उमजलीच नव्हती. ती परवा उमजली. आदल्या दिवशी आजीला फोन करून रेसिपी लिहून घेतली होती. आजीची रेसिपी म्हणजे गंमतच आहे. नारळ खोवून घे त्यात गूळ घाल. किती गूळ घालू? अगं घाल अंदाजाने. मीठ? अंदाजाने. तेल? अंदाजाने. पीठ? अंदाजाने. मग म्हणाली आईला फोन कर. आईने जरा सांगितलं व्यवस्थित. थोड्या वेळाने आजीचा पुन्हा फोन आला. म्हणाली नैवेद्याच्या मोदकाचं पुरण आधी चाखून बघायचं नसतं पण तू पहिल्यानेच करतेयस ना? मग पुरणाचा नैवेद्य दाखव आणि घे चव. हुश्श!

मोदक बरे झाले. मुख्य म्हणजे गोड असूनही नवऱ्याला आवडले. मला तर काय आवडतातच. मोदकाची शेंडी फोडून भरपूर तूप ओतून खाल्लेला मोदक म्हणजे जीव्हासुखाची परमावधीच. जेवणानंतर सोफ्यावर पडल्या पडल्या कधी डोळा लागला कळलंच नाही.

संध्याकाळच्या सावल्या पसरल्या आणि जाग आली. रविवारची संध्याकाळ म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा प्रकार. येणाऱ्या आठवड्याचं काम डोळ्यासमोर. इस्त्रीचा ढीग. घरातली उरलेली कामं डोळ्यासमोर दिसायला लागली. पण काही करावंसं वाटेना. घरचंच सगळं आठवत राहिलं. संध्याकाळी कोण कोण येईल? घरी बनवलेले खव्याचे मोदक कसे झाले असतील? या वर्षी गाणं होणार नाही म्हणून बाबा नाराज असेल का? खाली उत्सवात यंदा काय काय कार्यक्रम असतील? आरती म्हणताना अण्णांचा सूर जास्त टिकेल की माझ्या वयाच्या मुलांचा? यंदा मांडव घातला की घालून घेतला? हळदी कुंकू कधी आहे? मखर बनवायला माझा भाऊ नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याची आठवण काढली असेल का? माझ्या कोण कोण मैत्रिणी माहेरपणाला आल्या असतील? मी असते भारतात तर मी जाऊ शकले असते ना? उत्तरांतून प्रश्न आणि प्रश्नांतून उत्तरं असं चालू होतं.

आपल्या मनाला एक विलक्षण शाप आहे. जे आपल्याकडे नाही त्याचा विचार करत बसण्याचा आणि एक विलक्षण वरदान आहे. आपण जिथे नाही तिथे मनानेच जाऊन येण्याचं.

मी घरी गणपतीला नसण्याचा विचार करत बसले खरी. पण करता करता स्वतःच घरी एक फेरी मारून आले मनाने. आईने केलेले खव्याचे मोदक चाखले, आजीचे अंदाजपंचे बनवलेले उकडीचे मोदक अगदी शेंडी फोडून आत ओतलेल्या तुपासकट चाखून आले. उत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. दर चतुर्थीला करते तसा अण्णांना जाऊन नमस्कार करून आले. अगदी आमच्या बाईंचं गाणं पण ऐकून आले. अगदी उत्तरपूजेजे मंत्र म्हणताना झालेला बाबाचा कातर स्वरही ऐकला. आणि पुढच्या वर्षी लवकर ये, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर माफ कर आणि तुझं दर्शन घेणाऱ्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत असं निःस्वार्थी गाऱ्हाणं बाबाने देवाला घातलं की डबडबायचे तसे डोळे डबडबलेही.

गणपती जोरात साजरे झाले हेच खरं!

Thursday, August 20, 2009

मैत्रीण

सकाळी सकाळी स्टेशनला जायला निघाले. डोळ्यात पूर्ण न झालेली झोप होती. नव्या जबाबदारीचं थोडं टेन्शन.

माझा बॉस एकदम चक्रम आहे. कोणतीही व्यक्ती कोणतंही काम सहज करू शकते असा त्याचा गैरसमज आहे. म्या पामर ऍनालिस्टला त्याने सेल्स च्या कामाला जुंपलंय. काम तसं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नव्या क्लायंटला भेटणं, त्यांना आम्ही कसे चांगले आहोत च्या गोळ्या देणं वगैरे वगैरे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे साधारण तासाभराच्या मीटिंगसाठी मला तीन तास आधी निघावं लागतं. अर्धा तास एक दोन एक दोन करीत स्टेशनला पोचलं की मग तास सव्वा तास रेल्वेमध्ये झोपा काढायच्या. मग साधारण अर्धा तास ट्रॅममध्ये डुगडुगून काढला की आलं क्लायंटचं ऑफिस. ह्या सगळ्या व्यवस्थेतली माझे पाय सोडून जी इतर वाहनं आहेत ती कधीही त्यांच्या मर्जीनुसार बंद, धीमी होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी अजून अर्धा तास. बरं गाडीत झोप वगैरे झाली असल्याने माझा चांगलाच अवतार होतो. तो अवतार ठीक ठाक करायला अजून पंधरा मिनिटं.

एवढं सगळं करून क्लायंटची मीटिंग मेली तासाभरात संपते. आणि पुन्हा दोन तासाची वणवण करीत मी घरी येते.

काही दिवस हे प्रकरण चाललंय. रोज नाही जायला लागत पण बऱ्याच वेळा लागतं. रोज गाडीत एक छोटी मुलगी आणि तिची आई दिसतात. गाडी तशी भरलेली असते, पण समहाऊ आम्ही दोन तीन वेळा समोरासमोर आलो. हसण्याइतपत ओळख झाली. मुलगी जाम गोड आहे. गोरी गोरी पान. गालांचे लाल लाल टोमॅटो. निळे डोळे. निळे म्हणजे अगदी निळे. नेत्रदानाच्या ऍडमध्ये ऐश्वर्या रायचे दिसायचे तसले. आणि सोनेरी केसांना लाल निळी रिबीन बांधून केलेल्या दोन शेपट्या. दप्तरासारखी बॅग आईच्या हातात.

एकदा झटकन माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्स मध्ये दोन किटकॅटचा एक मिनी पॅक आहे. मग तिच्या आईला विचारून तिला दिली. मग एकदम बाईंची कळी खुलली. इतके दिवस नुसती हसायची. आता भरपूर बोलते. फक्त न चुकता मला किटकॅटचा मिनी पॅक न्यायला लागतो. तिची आई मला ओरडते चॉकलेट दिलं की. पण माझी ही छोटी मैत्रीण एकदम चुणचुणीत आहे. तीच आईला सांगते, की ह्या पॅकमध्ये दोन किटकॅट त्यातली अर्धी मी "शॅमा", (म्हणजे म)ला देणार, अर्धी तुला देणार, एक उरली की त्यातली अर्धी मी खाणार आणि अर्धी जेसन ला देणार. मग काय हरकत आहे? जेसन म्हणजे तिचा भाऊ.

मग उठून माझ्या शेजारी येऊन बसेल, आणि सांगत राहील "शॅमा, टीचर गेव्ह मी धिस" करून एखादी ट्रॉफी दाखवेल छोटीशी. आपल्याकडे उत्तेजनार्थ बक्षीस देतात ना तसं काहीतरी. शॅमा लुक ऍट धिस, शॅमा डू धिस, गिव्ह दॅट, अशा ऑर्डरी सुटत राहतात. तिची आई तिला ओरडते मध्ये मध्ये. पण मला बरं वाटतं. तेवढाच वेळ जातो.

परवा माझ्या पर्सशी खेळत होती आणि माझं पाकीट काढलं पैशाचं. आत नाणी होती खूप. नोटा नव्हत्या. म्हणाली शॅमा यू आर सो रिच. यू हॅव्ह सो मच मनी. एव्हन माय बँक डसंट हॅव सो मच. असं चाललेलं असतं.

परवा अशीच एक मोठी सहा तासाची वारी करून घरी आले. रोज संध्याकाळी माझ्या दिवसात काय काय झालं ह्याचे डिटेल्स नवऱ्याला कंटाळा येईपर्यंत ऐकवायला मला खूप आवडतात. बऱ्याच वेळा तो लॅपटॉप उघडून बसलेला असतो किंवा टीव्हीसमोर असतो, तेव्हा. असं? वाह! ओके, येस, अशी उत्तरं टाकून तो माझं बोलणं ऐकतोय असं दाखवत असतो. पण परवा साहेब मुडात होते कसल्या कोण जाणे पण एकदम ऐकून घेतलं, मला ट्रॅव्हेलिंगचा त्रास होतो, दमायला होतं म्हणून चहा वगैरे केला. आणि मग म्हणाला उद्यापासून नो प्रॉब्लेम. तू आपली गाडी घेऊन जा. मला लांबच्या साईटवर जायचंय म्हणून पुढचे तीन महिने कंपनीची गाडी आहे.

सही! म्हणजे आता सगळी कटकटंच मिटली. उद्यापासून मला गाडीने जाता येईल, वेळ वाचेल, कमी दमायला होईल, लवकर घरी येता येईल, पण..

पण माझी छोटी मैत्रीण आता भेटणार नाही. पर्समध्ये मिनी किटकॅट कुणासाठी ठेवू? शॅमा, शॅमा करून मला कोण हाक मारेल? मी नाही दिसले आठवडाभर तर ती नाराज होईल का? शॅमा कुठे म्हणून आईला विचारेल का? एक ना एक हजारो प्रश्न ...

रोजच्या आयुष्यात आपल्याला हजारो लाखो लोकं दिसतात. त्यातल्या एखाद दुसऱ्याशीच आपला असा सूर जुळतो. आनंद देतो, पण शेवटी विरूनच जातो.

तसं नको व्हायला. छोटीला भेटायला तरी पुन्हा कधीतरी ट्रेनने गेलंच पाहिजे.

Thursday, August 13, 2009

आपली गर्दी

गेल्या आठवड्यात एका खास कार्यक्रमाला गेले होते. खास अशासाठी की इथे येऊन बरेच महिने झाले, पण मराठी बोलण्याची संधी फारशी मिळत नव्हती. कोणतंही कारण नसताना आमचं सगळं मित्रमंडळ अमराठी झालं होतं. पण परवाच्या कार्यक्रमात म्हणजे अगदी धन्य झाले. इतके सगळे मराठी लोकं एकत्र बघून एकदम अभिमान वगैरे वाटायला लागला. कशाचा ते माहीत नाही, पण खूप छान वाटलं.

खरंतर कार्यक्रमाची जागा आमच्या घरापासून बऱ्यापैकी दूर होती. येऊन जाऊन साडेतीन चार तासाचा प्रवास होता. मला कार्यक्रमाबद्दल माहिती होती, पण माझ्या नवऱ्याला मराठी कार्यक्रमात वगैरे फार रस नाहीये. मग त्याला बिचाऱ्याला एवढं ड्रायव्हिंग करून माझ्याबरोबर यायला लागलं असतं. म्हणून काही बोललेच नव्हते. अगदी आदल्या दिवशी चुकून (थोडंसं मुद्दाम) बोलून गेले, तर उत्साहाने नवरोबा तयार.

तिथे पोचलो तर इतकी लोकं होती. सगळी मराठी बोलत होती. मध्येच कुणीतरी इंग्रजी झाडणारंही होतं. बरीच मुलं मुली होती. ती मात्र सरळ इंग्लिशमध्ये बोलत होती. अगदी अनोळखी माणसंही हसत होती. बोलत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी पुस्तकांची खाण भेटली मला तिथे. आता हवी तितकी पुस्तकं वाचता येतील ह्या जाणीवेनेच एकदम छान वाटलं. बाकी काहीही मागितलं तरी बाबा लगेच हो म्हणायचा नाही. कंडिशन घालायचा. पिकनिकला जायचंय? मग अमुक रागाच्या ताना बसव, मगच जा. उगीचच नवा ड्रेस घ्यायचाय? मग अभ्यासातलंच काहीतरी कर आधी, वगैरे वगैरे. पण पुस्तक मागितलं तर मात्र दुसऱ्या दिवशी हजर. मी नुसतं पुस्तकाचं नाव घ्यायचा अवकाश. घरी माझ्या पुस्तकांनी भरलेलं एक कपाट आहे. अगदी चांदोबा, ठकठक पासून ज्ञानेश्वरीपर्यंत सगळं आहे. अर्थात ज्ञानेश्वरी मी कधी वाचली नाही. तसा तो पुस्तकांनी भरलेला टब पाहिला आणि एकदम भरून आलं.

कार्यक्रम सुरू झाला. थीम छान होती. तरुणांचा कार्यक्रम. सगळ्या लहान लहान मुलांनी कार्यक्रम बसवलेले. नाच होते, गाणी होती, नाटक सुद्धा होतं. मला तर एकदम आमच्या चाळीतल्या गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आठवण झाली. तोच बाज होता. देश फक्त वेगळा होता इतकंच. एका नाचामध्ये एका मुलीने थेट मला माझीच लहानपणाची आठवण करून दिली. नाचता नाचता मध्येच तिला तिचे आई बाबा दिसले असणार. पठ्ठी नाच सोडून त्यांनाच हात दाखवत बसली. आमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये एका नाचात मला परी केलं होतं. बाबा ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन येणार होता. नाच सुरू झाला तरी तो येईना. मग माझा चेहरा एकदम पडलेला. आईशेजारी तो दिसला तेव्हा मात्र एकदम कळी खुलली आणि मी चक्क नाच विसरून त्यालाच हात दाखवत बसले.

कशी गंमत असते ना? आई वडलांशिवाय पानही न हालणारे आपण कधी मोठे होतो, कधी त्यांचा घट्ट पकडलेला हात अलगद सोडून पुढे पसार होतो, ना त्यांना कळतं ना आपल्याला. मग कधीतरी अशा एखाद्या बेसावध क्षणी, कुणीतरी दुसऱ्याने त्याच्या आई बाबांचा घट्ट पकडलेला हात पाहिला ना, की आपल्या हातात त्यांचा हात नसल्याची जाणीव होते.

बाकीचे कार्यक्रमही छानच होते. मुळात सगळी मुलं असल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच एनर्जी होती. त्यानेच खूप बरं वाटलं. तरुणांच्या कार्यक्रमात आपण नुसते प्रेक्षकांत बसून आहोत ह्याचं वाईटही वाटलं. पण खरंच सगळी मुलं विशीच्या आसपासची होती. मीही हळूहळू तरुण वयोगटातून रिटायर होत आहे असं उगाचच वाटलं. नवऱ्याला सांगितलं तर नुसतं हसला. म्हणाला तू हो म्हातारी आय ऍम यंग ऍट हार्ट. ह्याला काय उत्तर देणार? म्हटलं गप, मराठी कार्यक्रमात मराठी बोल उगाच इंग्लिश झाडू नको.

कार्यक्रम संपल्यावर जेवण पण होतं. ते ठीकंच होतं, पण सगळे लोकं आपापसात बोलत होते. कुणी कलाकारांचं जाऊन कौतुक करत होते. कौतुक म्हणजे कलाकाराचं इंधनच. पटकन मला वाटलं किती महिने झाले आपण परफॉर्म केलं नाही? पण एकंदरीतच लोकांच्या उत्साहात मी परफॉर्म करत नसल्याचं दुःख मागे पडलं. गर्दी खूप होती, पण आम्ही कुणालाच ओळखत नव्हतो. हॉलच्या एका कोपऱ्यात दोघंच उभे होतो. कुणी ओळखीचं दिसण्याची शक्यता नव्हतीच, पण तरीही ओळखीचे चेहरे शोधत राहिलो. नवरा म्हणाला निघूया का, म्हटलं थांब पाच मिनिटं.

ओळखीची नसली तरी ती गर्दी आपली वाटत होती. देशामध्ये गर्दीला नाकं मुरडणारी आम्ही, देशाबाहेर पडलो की मात्र तीच हरवलेली गर्दी शोधत राहतो.

असलेलं नको असणं आणि नको असलेलं हवं असणं, कुणाला चुकलंय?

Thursday, August 6, 2009

रेघोट्या

शेजारच्या घरातल्या आजी परवा दुपारी फिरायला गेले होते तेव्हा रस्त्यात भेटल्या. त्यांचं नाव करीन. मी त्यांना म्हटलं एका सुंदर बॉलीवूड ऍक्ट्रेसचं नाव करीना आहे. तर म्हणतात कशा, सुंदर आहे ना खूप? म्हटलं हो. मग म्हणाल्या तू मला करीन ऐवजी करीना म्हण. म्हटलं बरं. ह्या आजी त्यांच्या नवऱ्याबरोबर राहतात. आमच्या अगदी बाजूच्या घरात. नवऱ्याचं नाव डेव्ह. मला त्यांच्याशी नीट ओळख करायचीच होती. मग लगेचच त्यांना चहाला बोलावलं.

त्याचीही एक गंमत झाली. इथे "टी" ला बोलावलं तर त्याचा अर्थ संध्याकाळचं जेवण असा घेतला जातो. त्यामुळे ओळख नसताना कुणी एकमेकाकडे "टी" ला जात नाही. हा आधी शिकलेला धडा मी विसरले आणि त्यांना टी ला बोलावलं. आजी बाई जराश्या संकोचल्या म्हणाल्या "टी" नको, आम्ही फक्त थोडा वेळ येऊन जातो. मग माझं आपलं भारतीय आदरातिथ्य उफाळून आलं. म्हटलं चहा नको तर कॉफी करेन. मग आजीबाईंच्या सगळा घोळ लक्षात आला आणि माझ्याही. शेवटी फक्त चहाच प्यायला बोलावलंय हे कंफर्म करून करीना आजीबाई गेल्या.

शनिवारी संध्याकाळी पाचाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. करीनाआजी आणि डेव्ह आजोबा वेळेवर हजर. आजींनी जुन्या धाटणीचा एक ड्रेस घातला होता. गळ्यामध्ये मोत्याची सुरेख माळ. आजी चपला न काढताच आत घुसल्या. मला घरात कुणी चपला घालून आलेलं अजिबात चालत नाही. पण त्यांना सांगणार कसं. तितक्यात आजोबांनीच आजींना पाठी खेचलं. आणि चपला कुठे काढायच्या हे मला विचारलं. बहुतेक आमच्या पायात चपला किंवा बूट नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं असणार.

मग थोड्या इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही कुठून आलो काय करतो वगैरे आजोबांनी विचारून घेतलं. सगळ्या विषयांत त्यांना भारी रस. अगदी भारतात सासऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये काय चालतं इथपर्यंत सगळं विचारलं. ते स्वतः खाणकामगार होते. आता रिटायर झालेत. पण त्यांची एकंदरीत शरीरयष्टी बघून ह्यांनी अनेक वर्ष अंगमेहनतीचं काम केलं असणार हे कळत होतं. आजी लोकल काउन्सिल मध्ये कामाला होत्या. त्यांनीही रिटायरमेंट घेतली होती. इथे एक गंमत आहे. माणसं अमुक एक वय झालं की रिटायर होत नाहीत. त्यांना वाटेल तेव्हा होतात आणि त्यांना वाटेल तितकी वर्ष ती काम करू शकतात.

आजोबांना चाय लाटे भयंकर आवडतो असं आजींनी बोलता बोलता सांगितलं होतं. त्यामुळे मी आजोबांना इंडिअन चाय लाटे बनवलाय असं सांगितलं. इंडियन चाय लाटे म्हणजे अर्ध्या दुधाचा कडकडीत उकडवून केलेला ताजमहाल चहा! बेकरीतून नवऱ्याने पेस्ट्रीज आणल्या होत्या आणि चितळ्यांच्या बाकरवड्या आमच्या घरी खोक्यांनी पडलेल्या असतात त्या काढल्या. घरी केलेला चिवडा काढला. झाली तयारी. आजोबांना बाकरवड्या खूप आवडल्या. आजींना कवळी असल्यामुळे त्या नीट खाता येणार नाहीत हे आजोबांनीच आम्हाला सांगितलं आणि आजी चिडल्या. मला एकदम पुलंच्या पेस्तनकाका आणि पेस्तनकाकूंचीच आठवण झाली. चहा मात्र दोघांना खूप आवडला. आजोबांनी तर पुन्हा मागून घेतला.

मग बराच वेळ ते दोघं खूप बोलत राहिले. आम्हालाही खूप बरं वाटलं. परदेशात आलेले आम्ही दोघं. त्यात ह्या गावांत भारतीयांचं दर्शन कमीच. आधीच्या शहरी तसं नव्हतं. ओळखी झाल्या होत्या. मित्रमंडळ जमलं होतं. इथे आल्यापासून प्रथमच कुणी घरी आलं, खूप बरं वाटलं. कुठे कुठे फिरून जमवलेल्या भिंतीवर लावलेल्या एकेका शोपीसचं जेव्हा आजोबांनी भरभरून कौतुक केलं तेव्हा मलाच अगदी पिसासारखं हलकं वाटलं. घरी पाहुणे येणं ही घरातल्या बाईची एक गरज आहे असं मला वाटलं. तिने छान ठेवलेल्या घराचं कुणी केलेलं कौतुक ऐकणं हे फक्त लोकांना घरी बोलावल्यावरच शक्य आहे.

बऱ्याच गप्पा झाल्या. आजोबा आजींना एक मुलगी आहे, तिलाही दोन मुलं आहेत. नातवंड मोठी हुशार आहेत. खेळात आणि अभ्यासातही पुढे आहेत. त्यांनी काढलेली ड्रॉइंग्ज बघायला लगेच आजींनी मला आमंत्रण दिलं. त्यांची मुलगी इथे नसते ती दुसऱ्या शहरात आहे. तिचा नवरा चायनीज आहे आणि त्याने बनवलेलं चायनीज आजोबा आजी दोघांनाही अजिबात आवडत नाही, इथपर्यंत गोष्टी झाल्या. वेळ कसा गेला कळलं नाही.

शेवटी आजी आजोबा जायला निघाले. आम्ही दोघंही त्यांना सोडायला दरवाज्यापर्यंत गेलो. आपले संस्कार कुठेतरी खोलवर मनात रुजलेले असतात आणि काही गोष्टी प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारख्या आपण करतो. दुसऱ्या देशी, दुसऱ्या संस्कृतीत कुठेतरी त्यांना आवर घालून ठेवावा लागतो. मला खूप वाटलं, त्यांना वाकून नमस्कार करावा. पण नाही करता आला. त्याऐवजी आजींनी जवळ घेऊन गालाला गाल लावला. अतिशय मायेने त्यांनी पाठीवरून हात फिरवला. एकदम थेट आजीच आठवली. अगदी मनात येईल तेव्हा मी आजीकडे जायचे. जे खावंसं वाटेल ते सांगायचे आणि तीही करून घालायची. आजी भारतात हरवली आणि आम्ही इकडे हरवलो. शेजारच्या आजी आजोबांची मुलगी दुसऱ्या शहरात हरवली आणि ते इथे.

आईचं रेघोट्यांचं पेंटिंग आठवलं. आमच्या हॉलमध्ये समोरच लावलेलं आहे अगदी. तिचा विचार हा की माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं.

असं बनतंय आमचं इथलं रेघोट्यांचं पेंटिंग.