Thursday, March 26, 2009

नाती आणि आठवणी

खूप खूप दमलेय.

आताच ऑफिसमधून परत आले. कामाचा व्याप विलक्षण वाढलाय अचानक. दिवसभर मीटिंगच मीटिंग चालल्यात. पण त्यात एक विलक्षण आनंद आहे. आपण केलेलं काम कुणालातरी आवडतंय. आपलं काही महत्त्व आहे आपल्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी जरी अहं सुखावणाऱ्या असल्या तरी हव्या हव्याशा आहेत. गंमत आहे. काम खूप वाढल्याचा त्रास आहे, पण आपण महत्त्वाचे आहोत ह्याचं समाधान आहे. आपल्या चाकरांना ते महत्त्वाचे आहेत असं भासवून किती मालकांनी आपापले खिसे भरले असतील कुणास ठाऊक.

असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहोंचा व्हिसा लवकरच येईल. तसं आमच्या ऑफिसमधे त्यांनी कळवलंय. इतकी वाट कोणत्याही गोष्टीची पाहिली नव्हती, तितकी ह्या व्हिसाची पाहिली. तसा मला येऊन जास्त वेळ झाला नाहीये. लग्न व्हायच्या आधीही मी इथेच होते कित्येक दिवस, पण आता तो सतत जवळ असावा असं वाटतं. एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिरल्याने एवढा फरक पडावा?

काल एक गंमत झाली. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेले होते. कानाला गाणं चाललं होतं. काय झालं कुणास ठाऊक, एकदम कशात तरी पाय अडखळला आणि धम्मकन पडले. समोरून एक मुलगा धावत चालला होता. तो पटकन आला, उठायला मदत वगैरे केली. खरं मला काही लागलं नव्हतं, पण असं कुणासमोर धसमुसळेपण केल्यानं फारच एंबॅरॅसिंग झालं. मुलगा छान होता. उंचापुरा, देखणा. म्हटलं चला, एवढं पडले ते अगदीच फुकट नाही गेलं. बाई पुरे, लग्न झालंय आपलं. पण खरं सांगायचं तर लग्न झालं म्हणून आजूबाजूची देखणी मुलं काय कमी देखणी होतात का? पण नात्यांची लेबलं लागली की मग त्यांचे कायदे येतात. आणि त्या कायद्यांची पण मोठी गंमत आहे. तुमच्या मनात काही चुकीचं असो किंवा नसो. त्यातून काही चुकीचे संकेत गेले तरी तुम्ही अट्टल गुन्हेगार ठरता.

नवऱ्याशी बोलत होते. त्याला सांगितलं हे. त्याला म्हटलं, तू लग्न झालं म्हणून इतर पोरी बाळींकडे बघायचं सोडलंस का? तर म्हणाला खरं सांगायचं तर प्रयत्न केला, पण एखादी चांगली पोरगी दिसली की बघितलं जातंच. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त बघणारंच असशील तर. आणि तुलाही नको, मी कुणाला बघितलं तर. हो म्हणाला. तसा समजूतदार आहे.

विन्या दुबईला चाललाय. एक दिवस सटाक त्याचा फोन आला. म्हणाला ताई मी चाललो दुबईला. त्याला काही बोलून दाखवलं नाही, पण मनातून मला वाईटच वाटलं. एकतर सध्याच्या परिस्थितीत लोकं दुबईवरून पळ काढतायत असं बातम्यांत ऐकतेय आणि हा तिथे कशाला तडमडायला चाललाय असं वाटलं. पण आले विनोबांच्या मना तेथे कोणाचे चालेना, अशी त्याने स्वतः तयार केलेली म्हण आहे, त्यामुळे तो जाणार म्हणजे जाणार.

पण त्याहीपेक्षा आता आई बाबा अजून एकटे होणार ह्याचं जास्त वाईट वाटलं. मुलगी लग्न होऊन गेली की ती दुसऱ्याची झाली आणि मुलगा परदेशी निघून गेला तर? आपला असूनसुद्धा जवळ नाहीच ना. हा विचार मनात आला आणि लगेच वाटलं की मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर काय वेगळं करतेय? माझ्यामुळे त्यांचा मुलगा देश सोडून चाललाच आहे ना? असो, आई बाबांचं दुःख जास्त बोचतं मनाला. सासू सासऱ्यांचं तितकंसं नाही. प्रॉब्लेम एकंच पण नातं बदललं की त्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलतो बघा.

घरी फोन केला मग. बाबा नव्हता. आईशीच बोलले. अख्खा वेळ तिचं विनोबा आख्यान चाललं होतं. कौतुकंच करत होती त्याचं. पण आमच्या आईला ना, मनात असेल तरी सांगता येणार नाही की तो जातोय ते तिला नाही आवडत आहे. आणि हेही तितकंच खरं की कितीही प्रयत्न केला तरी तिला ते लपवता येणार नाही. आम्हा दोघांच्यात विन्या तिचा जास्त लाडका. आणि बाबाची मी. दिसायला तो डिट्टो आईसारखा आणि मी डिट्टो बाबासारखी. राहून राहून मला जुने दिवस आठवत राहिले. जुन्या मैफिली घरगुती आठवल्या.

दिवस निघून जातात पण आपल्या मनावर आठवणी कायमचे कोरून जातात. त्यांना आठवून आपल्याला खूप आनंद होतो, जेव्हा त्या घटना परत घडणं सहज शक्य असतं. पण एकदा का पुनरावृत्तीच्या शक्यता विरळ व्हायला लागल्या की मात्र त्याच आठवणी डोळ्यात रडू आणतात.

नात्यांचे संदर्भ आणि आठवणी ह्यांचंही काही नातं असेल का?

- संवादिनी

Thursday, March 19, 2009

शोध

स्वतःच्या घरी शिफ्ट झाले.

स्वतःच्या म्हणजे भाड्याच्या. पण तरीही हॉटेलात राहण्यापेक्षा चांगलंच आहे की. अर्थात साप सफाई वगैरे अंगावर पडणार पण ते ठिके. तिथे राहून राहून भयंकर कंटाळा आला होता. अपार्टमेंट चांगला असला तरीदेखील, घर ते घर आणि हॉटेल ते हॉटेल. आता काही महिने तरी इथून हालणार नाही. अर्थात नवरा आल्यावर जागा बघितल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं पण तोपर्यंत कंपनी मला हॉटेलमध्ये ठेवायला तयार नव्हती. शेवटी मला आधीच घर बघून शिफ्ट व्हावं लागलं.

अगदी दहा दिवसात घर मिळालंसुद्धा. गेल्या आठवड्यात दोन तीन जागा पाहिल्या होत्या. पण ही जागा अगदी मनासारखी होती. एकमजली घर आहे. खाली किचन आणि बैठकीची खोली आणि वरच्या मजल्यावर दोन बेडरूम्स आणि बाथरुम, टॉयलेट वगैरे. एका बेडरूमला छान बाल्कनी आहे. खाली व्हरांडा आहे. तिथे काही खुर्च्या आणि टेबल आहे. घरात काहीही फर्निचर नाही. अजून मी काही घेतलंही नाहीये. भारतातून येताना काही भांडी आणली होती तेवढीच आणि बाबाने मला पुण्याला जाताना घेऊन दिलेला लॅपटॉप सोडला तर काहीच नाही.

पण घर एकदम सही आहे. भरपूर उजेड. ऐसपैस जागा, हीटर, एसी, गरम पाण्याची सोय. आणखी काय पाहिजे? हा पाहिजे की. मी एकटी काय करणार इथे? अहो लवकर पोचले तर बरं होईल. मग मजा येईल. सोसायटीच्या आवारातंच झाडं गिडं आहेत. शिवाय स्विमिंग पूलही आहे. त्याला पोहता येत नाही. मी त्याला शिकवणारे. त्याला आधीच सांगून ठेवलंय.

ज्या दिवशी चावी घेतली त्या दिवशी एकटीला एकदम विचित्र वाटत होतं त्या रिकाम्या घरात. शेवटी लॅपटॉपवर गाणी लावली आणि ऐकत बसले. आवाजाने घर भरल्यावर जरा बरं वाटलं. होतं ते सगळं सामान नीट लावलं. बॅगा रिकाम्या केल्या. कपडे कपाटात व्यवस्थित लावून ठेवले. एकदम असं घरगुती झाल्यासारखं वाटलं. एक क्षण मनात आलं असंच राहावं. म्हणजे हाऊस वाइफ. घर नेटकं ठेवावं, आपलं गाणं गिणं करावं आणि बाहेरच्या लढाईची जबाबदारी नवऱ्यावर टाकावी. दुसऱ्याच क्षणाला तो विचार झटकून टाकला. ऑफिसमधून बॉसचा फोन आला. ताबडतोब बोलावलं. मी ऑन कॉल होते, पण ऑफिसमध्ये जायचा अजिबात मूड नव्हता पण जावंच लागलं. दोन क्षणापूर्वीच्या स्वप्नातल्या हाऊस वाइफ स्वप्नातच राहिल्या.

हे म्हणजे खरं माझं घर असल्यासारखं वाटतं. लग्न झाल्यावर गेले ते त्याच्या घरी. पण हे घर ना त्याचं ना माझं. आमच्या दोघांचं आहे. दोघांची नवी सुरुवात. म्हणून काही फर्निचरही घेणार नाहीये तो येईपर्यंत. आला की दोघं मिळून घेऊ. मी घेतलं तर त्याला आवडणार नाही असं नाही, पण घरटं दोघांनी बांधलं तर जास्त मजा येईल. अर्थात माझ्या दुकानांच्या वाऱ्या सुरू झालेल्या आहेत.

काही गोष्टी खूप आवडल्यात. पण जे आवडतंय ते सगळं खिशाच्या पालीकडलं आहे. जे स्वस्त आहे ते चांगलं नाहीये. बघूया सध्या तरी फक्त एक मॅट्रेस घेतली आहे. ती जमिनीवर घातली आहे. उशा, हंतरूण, पांघरूण मी घेऊन आले होते भारतातून. त्यामुळे सध्या एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच माझं जीवनमान आहे.

घरी फोन केला तेव्हा हे सगळं आईला सांगितलं. तिचं लगेच सुरू झालं. नीट विचार करून सगळं घे. एकदा घेतलं की बदलता येत नाही काही वर्ष. नवऱ्याला सगळं विचारून घे. उगाच महागाचं घेऊ नको. तुला सवय आहे खर्चीक गोष्टी घ्यायची वगैरे वगैरे. असं सुरू झालं की बाबा पॉलिसी अंगिकारायची. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तसंच केलं. सगळ्याला हो, बरं, हो बरं म्हणत संपवलं.

आईला कोण समजावणार? आमची काळजी करण्यात तिचं अख्खं आयुष्य गेलं, त्यामुळे तिचा अधिकारही आहे तो.

बाबाशी मात्र खूप गप्पा मारल्या. तो कुठल्याशा कार्यक्रमाला गेला होता त्याचा सगळा रिपोर्ट दिला. म्हणाला गाणं सोडू नकोस. एकवेळ जेवण विसरलीस तरी चालेल पण रियाज विसरू नको. मी काय सांगणार त्याला? दोन आठवड्यात तंबोरा लावला सुद्धा नाही म्हणून?

लग्न झाल्यापासून एक गोष्ट जाणवतेय. आई बाबा, विन्या यांच्या मनात मी अजून तीच आहे, पुण्याला जायच्या आधीची, घर सोडायच्या आधीची, धडपडी, सतत कशात ना कशात गुंतलेली. ऑफिसातून थेट सुटून नाटकाच्या तालमी करून आल्यावर कितीही दमली असली तरी थोडा का होईना रियाज करणारी. मनातली प्रत्येक गोष्ट घरी बोलून दाखवणारी. खळखळून हसणारी आणि भडभडा रडणारी. पण आता जाणवतंय, की मी किती बदललेय.

घराचा शोध आता संपला, आता स्वतःचा शोध पुन्हा घ्यायला हवा.

- संवादिनी

Thursday, March 12, 2009

न पाहिलेला ऑपेरा

बरेच दिवस मनात एक विचार घोळत होता. ऑपेरा बघायचा होता. आधी कंपनी नाही म्हणून आणि मग वेळ नाही म्हणून चालढकल केली. खरी गोम तर वेगळीच होती. अजूनही बिझनेस व्हीसा वर असल्याने कंपनीच्या अलावन्स वरच भागवावं लागत होतं. तो काही विशेष नव्हता. जरी घराचं भाडं कंपनी देत असली तरी बाकी सगळा खर्च आमचा आम्हालाच करायचा होता. त्यासाठी अलावन्स पुरेसा होता पण एकदम तीन दिवसाचा अलावन्स ऑपेरावर खर्च करावा इतकीही माझी परिस्थिती चांगली नव्हती. वर्क परमिट होईपर्यंत कळ काढणं आवश्यक होतं. मग इथेच पगार मिळाला असता आणि खर्चावरची बंधनं थोडीशी सैल झाली असती.

दरम्यानच्या काळात आमच्या टीममध्ये एक रोमानिअन मुलगी सामील झाली. जॉर्जिना तिचं नाव. तर ह्या जॉर्जला पण थिएटर ची प्रचंड आवड. बोलता बोलता मी तिला म्हटलं की मलाही एकदा ऑपेराला जायचंय. अगदी पिटातलं तिकिट काढलं तरी चालेल. ती म्हणाली चांगला ऑपेरा बघायचा असेल तर पिटातल्या तिकिटात पूर्ण स्टेज दिसत नाही. म्हणजे पुढची तिकिटं काढणं आलं, अर्थात पूर्ण पैसे भरावे लागणार.

आमच्या कंपनीचा वेळकाढूपणा इतका होता की शेवटी मी डेली अलावन्स मधली पंचवीस टक्के रक्कम ऑपेरासाठी बाजूला काढायला लागले. दोन आठवड्यात मला पाहिजे तेवढे पैसे जमणार होते म्हणून मी जॉर्जीला सांगून टाकलं की आपण ऑपेराला जाऊया. एका शनिवारची तारीखही ठरली. तिने ऑफिसमधल्या अजून सात-आठ गोऱ्यांना जमवलं. आपले लोक खर्च करण्याच्या बाबतीत मागे असल्याने देशी कुणीच नव्हतं. पुढच्या शनिवारचं तिकीट असल्याने सोमवारी ते काढायचं असं ठरलं आणि पैसेपण सोमवारी जॉर्जीकडे द्यायचे असं ठरलं.

पुढच्या विकेंडला ऑपेरा बघायला मिळणार ह्या आनंदातच शुक्रवारी घरी पोचले. नेहमीची विकेंड दंगामस्ती चालू होती. झोपणे, जेवण बनवणे आणि जेवणे ह्यात शनिवार कसा निघून गेला ते कळलंच नाही. रविवारी उशीरा उठून टीव्ही लावून बसले तर बातम्या लागलेल्या.

न भूतो न भविष्यती अशी आग शेजारच्या राज्यात लागलेली. जंगलंच्या जंगलं जळून खाक झाली. साडेसातशे घरं जळून गेलेली. सव्वाशेच्या आसपास माणूस मारला गेलेला. एकदम सुन्न झाले. रडणाऱ्या लोकांचे चेहरे पाहून मलाच रडू यायला लागलेलं. एवढा संपन्न देश. प्रगत प्रगत म्हणून मिरवणारा पण वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या वणव्याला काही रोखता आलं नाही. बऱ्याच लोकांना आग लागलेय हेच समजलं नाही आणि त्यांची घरं त्यांच्यासकट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्यांना पळता आलं ते पळाले, पण नेसत्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं. आईविना मुलं, मुलं शोधणारी आई, कुणाचं कोण अजून दिसलं नव्हतं, पत्ता लागत नव्हता. निसर्गाचा कोप दुसरं काय?

चटकन मला देश आठवला. देशावर आलेली संकटं. मुंबईचा सव्वीस जुलैचा पाऊस, त्सुनामी, लातूरचा भूकंप. अगदी सगळं सगळं डोळ्यासमोर आलं. लातूरच्या वेळी तर अगदी डबे घेऊन फिरले होते तेपण आठवलं. दुःख आणि अश्रू ह्यांना देशांच्या सीमारेषा समजतंच नाहीत आणि निसर्गालाही. कोण प्रगत, कोण अप्रगत असला विचार निसर्ग कधीच करत नाही, सगळ्यांना सारखाच न्याय.

त्या सुन्न वातावरणातच रविवार निघून गेला. सोमवारी सकाळी नेहमीसारखी ऑफिसात पोचले. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे एफ्. एम. चालू होता. बातम्या येत होत्या, मृतांचे आकडे, नुकसानीचे आकडे वाढत होते, मदतीसाठी फोन नंबर सांगितले जात होते, वेबसाइट सांगत होते. एकदम डोकं भणभणायला लागलं, तिथून पळून जावं असं वाटायला लागलं. आपण किती असहाय असतो ह्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

थोड्या वेळाने जॉर्जी आली. तिच्या बोलण्याचा विषयही हाच. जाता जाता म्हणाली अगं तू ऑपेरा चे पैसे ट्रान्स्फर केलेस का? मला बहुतेक ह्यावेळी नाही जमणार. पुढच्या महिन्यात एखाद्या छानशा ऑपेराला जाऊया. तुम्ही जा माझ्याशिवाय. जॉर्जी नाराज झाली. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.
पंधरा दिवस ऑपेरासाठी साठवलेले पैसे घेऊन मी रेडक्रॉसच्या काउंटरला गेले. मला नव्हता ऑपेरा बघायला मिळणार ह्या आठवड्यात पण कुणालातरी त्या पैशाचा माझ्यापेक्षा जास्त, खूप जास्त उपयोग होणार होता. म्हणून ते पैसे देऊन टाकले.

आजपासून परत साठवायला सुरवात केलीय.

- संवादिनी

Thursday, March 5, 2009

स्वप्नांच्या गावा

हल्ली भन्नाट स्वप्न पडायला लागलीत.

भन्नाट म्हणजे भन्नाटंच. मला वाटतं आपण जितका अधिक विचार करतो तितकी स्वप्न जास्त आणि मनोरंजक पडत असावीत. आता माझंच बघा. मला कधी म्हणजे कधी स्वप्न पडायची नाहीत. रात्री बिछान्यावर पडल्यावर डोळा लागला की सकाळी आईची कातावलेली दुसरी किंवा तिसरी हाक ऐकू येईपर्यंत काहीही कळत नसे. झोपणे ही आयुष्यातली एकमेव आनंददायक घटना असायची, कारण दिवस सगळा कामात जायचा. ऑफिस आणि काही अंगावर घेतलेल्या तर बऱ्याचशा अंगावर पडलेल्या अनंत ऍक्टिव्हीटीज. जीव इतका दमून जायचा की झोपायचा जो वेळ आहे तो स्वप्नातही फुकट घालवायची कल्पना मी कधी केली नव्हती.

पण सध्या सगळाच आनंदी आनंद गडे आहे. काम यथा तथाच आहे. गोऱ्यांच्या देशात जर मला सर्वाधिक काही आवडत असेल तर कामाच्या वेळा. आठ म्हणजे आठला हजर आणि पाच म्हणजे पाचाला फुटास्को. त्यातही डोक्यावर कामाचा डोंगर आहे असं नाही. सगळ्या प्रकारचा वेळकाढूपणा केल्यावरही काम संपवायला भरपूर वेळ असतो. चकाट्या पिटायला ऑफिसात कोणी नाही, अपार्टमेंटवर एकटीच. मग करायचं काय? टी. व्ही? मला फारसा आवडत नाही. मग काय करायचं? विचार करायचा. कशाचा? कशाचाही? अगदी रस्त्यावरून चाललेल्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय इथपासून सेम दिसणाऱ्या गाड्यांच्या किमतीत इतका फरक का पडतो इथपर्यंत काहीही.

मूळ लिहायचं होतं ते राहिलंच. तर स्वप्न पडतात. आणि त्याची आठवण का झाली तर कुणीतरी मला एक ऑनलाईन सर्व्हे पाठवला, स्वप्नांवरती. त्यात एक प्रश्न होता तुम्हाला कुणाची स्वप्न पडावीशी वाटतात? उत्तर, नवऱ्याची. तुम्हाला त्या व्यक्तीची स्वप्न पडतात का? उत्तर, अजिबात नाही. आपल्याला हवी ती स्वप्न का नाही पडू शकत आपल्याला? काही गोष्टी सत्यात शक्य नसतात स्वप्नात तरी व्हाव्यात की नाही?

आता माला वाटतं माझ्या नवऱ्याने माझ्या गाण्याचं कौतुक करावं. पण आमचे साहेब आलाप सुरू झाले की जांभया द्यायला लागतात. आता गेलाबाजार पडलं एखादं स्वप्न की ज्यात मी जोरजोरात गातेय आणि साहेब मनापासून दाद देतायत तर काय हरकत आहे? पण असलं काहीही स्वप्न न पडता मला काय स्वप्न पडावं?

मला ऑफिसला जायला उशीर झालाय मी धावत पळत माझ्या अपार्टमेंटमधून बाहेर पडते तर लिफ्ट बंद मग एवढे प्रचंड मजले उतरून खाली येते तर आपली मुंबईतली पिवळी काळी टॅक्सी उभी. (मुळात माझं ऑफिस पाच मिनिटावर चालत आणि तीन मिनिटांवर धावत असताना मी टॅक्सी का घेते हा वेगळा प्रश्न झाला) टॅक्सीवाला चक्क भाड्याला नाही म्हणतो. काहीच वाहन मिळत नसल्याने टेन्शन वाढ वाढ वाढतं. घामाघूम होते मी आणि ढँटडँ..... जाग येते.

ह्याला काही अर्थ आहे का? अजून एक आठवणारं स्वप्न म्हणजे मी बारमध्ये (मी आणि बारमधे? ) पंजाबी ड्रेस घालून एक पेय (कोणतं ते कळत नाही) पीत बसलेय. आणि काहीही करत नाहीये. पेय पितेय संपलं की रिफिल. बस.

पण सगळ्यात भन्नाट स्वप्न पडतायत ती भुतांची. ती मात्र पडली की मग झोप लागत नाही मग डोक्यावर पांघरूण घेऊन उशीखाली डोकं खुपसून रामरक्षा म्हणायला लागते झोप येईपर्यंत. इथले काही हॉरर कार्यक्रम बघितल्याचा परिणाम असेल. आणि एकटी असल्याने भीती अजून वाटते. मग उगाचच कोपऱ्यातलं रोपटं रात्रीच्या अंधारात कुणाच्यातरी नखं वाढलेल्या लांब हातासारखं दिसतं. किंवा वाऱ्याचा आवाज भुताच्या श्वासासारखा वाटतो. मग रामरक्षा आणि अजून रामरक्षा आणि अजून अजून रामरक्षा. रामाला लवकरच माझा कंटाळा येणारे.

कशी पडत असतील स्वप्न? मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणावं तर माझ्या मनी न वसणाऱ्यांचीच स्वप्न मला जास्त पडतात. ज्याला आपण घाबरतो त्याची स्वप्न पडावी तर थोडंफार खरं आहे.

हे सगळं लिहिताना एकदम आजीची आठवण झाली. आजी म्हणजे बाबाची आई. ती कधीच देवाघरी गेली. स्पष्ट आठवतंय ती एकदा सांगतानाचं, तिच्या स्वप्नाबद्दल. म्हणाली होती की एक खूप छान स्वप्न पडलं. डोंगर होते, दऱ्या होत्या, नद्या होत्या, डोंगरावरचे पांढरे शुभ्र ढग, त्यांच्या पाठचं निळं आकाश, हिरवे डोंगर, त्यातून वाहणारं नदीचं पाणी. मग म्हणाली मी जिथे उभी होते तिथे खूप फुलं होती. वेगवेगळ्या रंगांची आणि त्याला इतका छान वास येत होता. मग म्हणाली अजून तो वास मनात दरवळतोय.

इतकं छान स्वप्न? अगदी टुडी नाही थ्रीडी नाही फोरडी स्वप्न पडलं तिला. असं मला का पडू नये? फार कुठे बाहेर न पडलेल्या माझ्या आजीला स्वित्झरलंड ची स्वप्न पडावीत आणि तिथे प्रत्यक्ष जाऊन आलेल्या मला त्याच्या जवळपासचही काही दिसू नये, असं का व्हावं? की ही एक प्रकारची क्रिएटिव्हीटी आहे. तिची कंस्ट्रक्टिव्ह असेल, माझी कदाचित डिस्ट्रक्टिव्ह किंवा न्युट्रल असेल.

कुणी सांगावं?

- संवादिनी