Wednesday, July 27, 2011

देवयानी (18)

अनुराग प्रकरणानंतर मला आलेलं डिप्रेशन आणि त्यानंतर मराठे काकांची ओळख, त्यांच्याकडे काम करणं, कंपनी मोठी करणं ह्याबाबत मी आधीच लिहिलेलं आहे. भारतातल्या एका नामांकित आयटी कंपनीकडून (आपण तिला विन्फो म्हणूया) आम्हाला टेक ओव्हरची ऑफर आली. आम्हाला असं मी उगाचच लिहितेय. मी जवळ जवळ स्वतःला कंपनीचा अविभाज्य भाग समजायला लागलेले होते. पण प्रत्यक्षात मात्र मी कंपनीची साधी नोकरच होते.

अशी भावना आपल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण करणं हे खरं महत्त्वाचं. मोठ्या कंपन्या मोठ्या का होतात आणि काही छोट्या कंपन्या मोठ्या कधीच का होत नाहीत ह्यामागचं कारण हेच असावं. काकांकडून मी हे सगळं शिकले. पगार फार दिला नाही त्यांनी मला, पण हा ठेवा खूप मोठा आहे. आता आठवलं म्हणून लिहिते. काका कधी काळी दिनू रणदिव्यांच्या लेक्चर्सना वगैरे जायचे, तेव्हाची त्यांची आठवण.

आपल्या एंप्लॉइज मध्ये ओनरशिप कशी निर्माण करावी ह्याचं उदाहरण. रणदिवे म्हणाले की माझा पिऊन जेव्हा माझ्याकडे रजा मागतो, तेव्हा ती रजा द्यायलाही मी खळखळ करतो. रजा देतो पण दोन-चार दिवस कमी करूनच देतो. खरंतर तो पिऊन चार दिवस कामावर आला नाही तर कंपनीचं नुकसान होणार नसतं, पण केवळ मी त्याला म्हटलं की बाबा इतके दिवस नको घेऊ रजा, तुझ्यावाचून अडतं इथे, की त्याला कंपनीत आपलं काही महत्त्व आहे हे जाणवतं. हे तो, घरी जाऊन त्याच्या बायका पोरांना सांगतो. ह्या बोस्ट करण्यात त्याला प्रचंड सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्यांतूनच तो त्याचं काम ओन करायला लागतो.

मला स्वतःला बॉसने माझ्यावाचून अडतं असं म्हटलं तर खूप बरं वाटतं. बाकी काही झालं नाही तरी निदान तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाला थोडं बरं तरी वाटेल असं केल्याने? अशा अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले आणि म्हणूनच कंपनी विकायचा निर्णय झाला तेव्हा मी काकांना म्हटलं की मी पुढे त्याच्याबरोबरच काम करेन. जे काय देतील तो पगार मला चालेल.

पण जशी जशी बोलणी पुढे जायला लागली, तशा एकेक गोष्टी उकलत गेल्या आणि सरतेशेवटी काकांनी चक्क मला सांगितलं की मला विन्फोमध्ये जावंच लागेल. आमच्या छोट्याश्या कंपनीतली एक की एंप्लॉयी म्हणून मी विन्फोमध्ये काम करावं असा विन्फोचा आग्रह होता. अर्थात, काका विन्फोमध्ये न जाता बाहेर पडणार होते, त्यामुळे उरलेल्या लोकांपैकी जी लोकं क्लायंट रिलेशनशिप्स सांभाळतात ती विन्फोला हवी होती. त्या काही लोकांत मीही होते. मी काकांशी त्या दिवशी भांड भांड भांडले. अगदी मनापासून भांडले. पण त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही.

पुढे वर्षभराने मात्र त्यांनी मला सांगितलं की त्यावेळी विंन्फोसारख्या मोठ्या कंपनीत जाणं माझ्या एकंदरीत करिअरच्या दृष्टीनं चांगलं होतं. स्टार्ट अप्स मध्ये काम करणं वाईट नाही पण आधी मोठ्या कंपनीत काम करणं आवश्यक आहे. मला महत्त्वाची पोस्ट मिळणार होती. अजून चांगला अनुभव मिळणार होता. म्हणून काकांनी मला चक्क विन्फोमध्ये माझ्या मनाविरुद्ध ढकलली. अजूनही काका त्यांचे विन्फोमधले जे मित्र आहेत त्यांना म्हणतात. आमच्या मुलीला सांभाळा, मुलगी गुणी आहे पण माहेरी लाडा कोडात वाढलेय. तिला सासुरवास देऊ नका.

असे आमचे काका. इतकं देऊन ठेवलंय त्यांनी की ह्या आयुष्यात तरी ते फेडू शकत नाही. एका अर्थानं अजूनही ते माझे फ़्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड आहेतच पण त्यांच्याबरोबर काम केलं तो काळ माझ्या आयुष्यातला खूप चांगला काळ होता.

असो, अखेरीस तो दिवस आला आणि मी विन्फोच्या दरवाज्यात थोडी धाकधूक, थोडा अभिमान, थोडा उत्साह आणि बराचसा दडपण घेऊन पहिल्या दिवसाच्या पहिल्या प्रवेशासाठी उभी राहिले.

- देवयानी

Wednesday, July 20, 2011

देवयानी (17)

ती रात्र अनुराग माझ्या कडेच राहिला. सभ्य घरातल्या मुलीने खूप अभिमानाने सांगायची गोष्ट नाही ही, पण त्या रात्री आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. पण खरं सांगू? तर त्यात असभ्य असं काही होतं असं तेव्हा आणि आजही मला वाटत नाही. शरिराची गरज ही न भागवता दडपून टाकणे म्हणजे सभ्यता का? मी त्याच्या आणि त्याने आमच्या जवळ येण्याने कुणाचं काही वाईट केलं का? मग आम्ही केलं ते असभ्य कसं?

गेली बरीच वर्ष मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधते आहे. प्रेम आणि शारिरिक आकर्षण ह्या एका मागोमाग जाणाऱ्या गोष्टी नाहीत का? नक्कीच आहेत. पण तुम्ही चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडलात तर? मग त्या वेळी तुम्ही ज्या व्यक्तीवर खरं खुरं मनापासून प्रेम करत होता त्या व्यक्तीबरोबर भौतिक सुखाची परमावधी गाठण्याचा केलेला प्रयत्न भ्रष्ट किंवा असभ्य कसा काय असू शकतो? मला पूर्ण कल्पना आहे की ह्या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत, पण तरीही मला पडलेल्या ह्या बेसिक प्रश्नाचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही. फिरून फिरुन मुद्दा विवाहबाह्य किंवा विवाहपूर्व ह्या शब्दावर येतो. आणि लग्न ह्या संस्थेला दिलेलं अवाजवी महत्त्व मला आजही मान्य नाही.

असो तो वेगळाच मुद्दा झाला. पण आम्ही जे काही केलं ते माझ्या बाजूने तरी पूर्ण समर्पण होतं. प्रेमात पडल्यावर आपलं अस्तित्व विसरून जाणं हेच महत्त्वाचं. आणि मी तेच करत होते. संस्कृतीरक्षकांची बजबजपुरी झालेल्या आपल्या देशात मात्र माझं वागणं बेताल, असभ्य आणि अणखी बरंच काही होतं. ही गोष्ट माझ्या आई वडिलांना माझ्या नातेवाईकांना कळली तर गहजब होणार होता. अनुराग सकाळी गेला पण तो गेल्यानंतर मला इतकं अपराधी वाटायला लागलं. त्यात घरी मी एकटी. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. सभ्य घरातल्या मुलींनी ज्या पायऱ्या कधीच उतरायच्या नसतात त्या मी एक एक करीत सगळ्या उतरले होते.

दुसऱ्या रात्रीच मला सणसणून ताप चढला. पुढचा बरोबर महिना मी हंथरुणाला खिळून होते. बरेच दिवस साध्या तापाची औषधं, मग चाचण्या. शेवटी मलेरिया झाल्याचं निष्पन्न झालं. कसं कळलं मलेरियाच्या जंतूंना की मी तेव्हा व्हल्नरेबल होते म्हणून? निसर्गाचं हे मला कौतूक वाटतं. survivor senses survival. पण ह्या मलेरियात माझी परीक्षा बुडाली. वर्षभर काही अभ्यास केलेला नव्हता त्यामुळे स्कॉलर मुलं आजारी पडूनसुद्धा पास वगैरे होतात ते होणं मला शक्य नव्हतं. मी परीक्षेला जाणंच टाळलं. अंगावर पांघरूण घेऊन झोपून काढले परीक्षेचे दिवस.

अनुरागशीही भेट झालेली नव्हती. ती व्हावी असं मला वाटतही नव्हतं. स्वतःचीच स्वतःला (काहीही कारण नसताना) लाज वाटत होती. घरी सतत आई असल्याने तो येऊ शकत नव्हता. त्याने यायचा प्रयत्नही खूप केला असेल असं मला वाटत नाही. माझ्या घरी फोनही नव्हता, त्यामुळे त्याचा फोन येण्याचा प्रश्नच नव्हता. ह्या सगळ्या प्रकरणातून बाहेर यायला मला दोन तीन महिने लागले.

पुन्हा मी अनुरागला भेटले तो दिवस मला चांगला आठवतो. त्याने झाल्या प्रकाराबद्दल माझी माफी मागितली. मी त्याला सांगितलं की ते विसरून आपण पुढे जाऊ. माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे, आपण आपल्या आई वडिलांना सांगून टाकू त्याबद्दल म्हणजे लपवा छपवीचा प्रश्न येणार नाही. त्यावर चक्क त्याने माझी नजर टाळली. अनुराग भेटल्यापासून एकदाही अशी त्याने माझी नजर टाळलेली नव्हती. तो म्हणाला देवी, मला तू खूप आवडतेस, पण आपलं लग्न नाही होऊ शकत. माझे आई वडील ते कधीही होऊ देणार नाहीत, कारण माझं लग्न हाही त्यांच्यासाठी एक बिझनेस असेल, योग्य माणसाशी करण्याचा.

मी त्याला म्हटलं की असेना का त्यांचा विरोघ. माझ्या आई वडिलांचाही असेल. पण तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर प्रेम असेल तर आपल्याला काय अशक्य आहे. मला अजिंक्य वाटणारा अनुराग साधा लिंबू टिंबू खेळाडू म्हणून स्पर्धेत उतरायलाही तयार नव्हता. त्याला लढायचंच नव्हतं. कदाचित त्याला हवं ते त्याला मिळालं होतं. कदाचित आकर्षण तितकंसं उरलेलं नव्हतं. कदाचित मला त्याला फक्त वापरून फेकून द्यायचं होतं? ह्या प्रश्नांची उत्तरं मी त्याला विचारली नाहीत आणि त्यानं मला सांगितली नाहीत. त्यानंतर मी त्याच्या आजूबाजूला असले तरी खूप दूर गेलेले होते.

पण तो मला एक जखम देऊन गेला. जशी कचानं देवयानीला दिली होती ना तशीच. खपली न धरणारी, सतत खुपणारी एक जखम. विषानं विष मरतं असं म्हणतात. मीही तसंच काहीसं केलं. हाती नसलेल्या पैशाची उधळपट्टी. बडे बापके बेटे असलेल्या मुलांची मैत्री, पार्टीज, दारू, सगळं सगळं केलं. अनुरागबरोबर शरीरानं जवळ येणं मला अजिबात किळसवाणं वाटत नाही पण त्याने मला नाकारल्यावर मी जे केलं ते नक्कीच किळसवाणं आणि हीन पातळीला जाणारं होतं. उधळणारे मित्र मिळाल्यावर पैशाची कमतरता पडणार नव्हतीच.

अनुरागबरोबरच्या अनुभवातून मी एक गोष्ट नक्कीच शिकले. पुरुषाला इंटरेस्टेड ठेवायचं असेल तर डू नॉट गेट टू क्लोज टू हिम. नुसता दरवाजा किलकिला ठेवायचा, सताड उघडायचा नाही. ह्या एका वाक्यावर मी तीन वर्ष मजेत (? ) काढली.

त्यापुढे काय झालं ते आधी सविस्तर लिहिलं आहेच. प्रोफेशनल लाइफ बद्दल लिहिता लिहिता इतक्या पर्सनल गोष्टींवर येऊन पोचले. आता पुन्हा जिथे माझी गोष्ट सोडली होती तिथून पुढे लिहायला लागेन. गेले बरेच दिवस लिहिता आलं नाही आणि जेव्हा लिहिणं शक्य होतं तेव्हा हे सगळं लिहावं की लिहू नये ह्याचा विचार करण्यात वेळ गेला. त्यामुळे क्षमस्व.

- देवयानी