Thursday, August 14, 2008

दुःखारंभ आणि दुःखांत

प्रवाही विचारांसारखं नदीचं पाणी वाहत होतं. पण तो प्रवाह माझ्या विचारांसारखा नव्हता. तो प्रवाह एखाद्या प्रगल्भ व्यक्तीच्या संपृक्त विचारांसारखा गर्भार होता. माझे विचार खळखळणाऱ्या पाण्यासारखे आहेत. कदाचित उथळही असतील.

पाण्याच्या बाजूला एक संगमरवरी इमारत उभी होती. भली मोठी, प्रचंड, पण छाती दडपून टाकणारी नाही. देहभान विसरायला लावणारी. कुणी बनवलं असेल हे अद्वितीय वास्तुशिल्प? एखाद्या चुंबकाकडे लोहकणानं आकर्षित व्हावं, तशी मी त्या इमारतीकडे खेचली गेले. त्या इमारतीच्या रुंद, चंद्रधवल, भिंतीला हात लागला तेव्हाच मी समाधानले. अगदी चुंबकाला चिकटलेल्या लोहकणाप्रमाणे.

कुणाचातरी स्पर्श मला जाणवला. खरंतर स्पर्श करणारं कुणी नव्हतं पण काहीतरी फार मोठं, मनाला स्पर्शून जात होतं. कुणाचेतरी बलदंड पीळदार स्नायू, लोहाराच्या भात्यासारखी वरखाली होणारी छाती, घणाचे घाव, घामाचा दर्प. नाही, दर्प नाही, गंध. प्रचंड, अत्युत्तम, सृजनशील काम करताना येणाऱ्या घामाला दर्प तरी कसा येईल? सुगंधच तो. निर्मितीचा.

कुणीतरी म्हटलेली प्रेमकाव्य. पण त्याला लावलेल्या दूरावरून ऐकू येणाऱ्या तराण्यासारख्या हृदयद्रावक चाली. मृत्यूचं दुःख, प्रेमाचं दुःख की दुःखावरचं प्रेम? तुटलेले हात, कळवळणारे आवाज, अमर्याद दुःख, असीम दुःख.

अत्युत्तम नवनिर्मितीला दुःखाचा शाप असावाच लागतो का?

आजूबाजूचं जग आपल्याच आनंदात होतं. मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. जगाला आश्चर्यचकित करणारं ते शिल्प. त्याच्या सान्निध्यात आल्यावर लोकांना आनंद झाला नाही तरच नवल. कुणी त्याची नजाकत डोळ्यात तर कुणी कायमची साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतं. कुणी प्रेमात पडलेले जीव, आपल्या प्रेमाला त्या शिल्पाची उपमा देण्यात मशगुल होते. मला आश्चर्य वाटत होतं ह्या गोष्टीचं की प्रेमाच्या ह्या भरजरी शालूला लावलेलं दुःखाचं ठिगळ लोकांना दिसत कसं नव्हतं?

चंद्रकिरणांसारखे असणारे चार मीनार माझ्याकडे पाहत होते. कदाचित कीव येत असेल त्यांना माझी. कारण मला तिथे आनंद कुठे दिसतंच नव्हता. विरहाचं दुःख. प्रियेच्या मृत्यूचं दुःख, आणि दुःखातून झालेली नवनिर्मिती. अप्रतिम सौंदर्याची आठवण म्हणून निर्माण केलेलं आणखी एक सौंदर्य. त्या सौंदर्यातून निर्माण झालेला अहंकार आणि त्या सौंदर्याची पुनरुक्ती कुठेही होऊ नये म्हणून अहंकारातून जन्मलेलं हजारो तुटल्या हातांचं दुःख. भळभळणाऱ्या जखमा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडवणारं दुःख.

दुःखारंभ आणि दुःखांत.

ते चंद्रधवल शिल्प अचानक मला पांढुरकं वाटायला लागलं. अगदी साधारण. नपुंसक.

त्या दुःखाकडे पाठ फिरवून मी चालत राहिले. चालत चालत बरीच दूर आले. एका दुसऱ्या इमारतीपाशी पोचले. ह्या इमारतीच्या चिरा न चिरा लाल दगडातून तासलेला होता. मघा जाणवलेल्या पांढऱ्या रक्ताचा, लाल रंग वेगळा आणि हा लाल रंग वेगळा. उद्दाम, उन्मत्त, शासक लाल रंग.

आता मी लोहकण झाले नाही. आपल्याच तंद्रीत मी इमारतीत चालत गेले. इथेही इतर लोक होतेच. काय बघत होते कोण जाणे. मला मात्र उत्सुकता होती, पांढरं दुःख निर्माण करणाऱ्याचं दुःख बघायची.
वाट काढत काढत मी एका खोलीत पोचले. इथेच त्याचा अंत झाला होता म्हणे. पांढरं दुःख निर्माण करणाऱ्याचा. पण तिथलं दुःख वेगळंच होतं.

माणसाचं सर्वात सृजनशील काम कोणतं? दुसऱ्या माणसाला जन्माला घालणं. त्या जन्माला आलेल्या माणसावर जन्मदात्या माणसाचा केवढा जीव? आपला अंश, आपल्या मांसाचा गोळा म्हणून जन्माला आलेल्या माणसाला वाढवायचं. हे जन्मदात्याचं खरं शिल्प. त्या पांढुरक्या इमारतीहूनही सुंदर अशी ही कलाकृती. तीच जन्मदात्याचा जिवावर उठली तर? तसंच झालं त्याचं. त्याने जन्माला घातलेल्या मांसाच्या गोळ्यानेच डांबून ठेवलं त्याला.

खिडकीतून मी बाहेर पाहिलं. लांबवर नदीच्या काठी ते पांढरं शिल्प उभं होतं. चार मीनार, मधला गोल घुमट सगळं काही स्पष्ट दिसत होतं.

तुटलेले कळवळणारे हात, थोडेसे शांत झाल्यासारखे वाटले. हाच नियतीचा न्याय असावा. अप्रतिम वास्तू बनवणारे हात ज्या हातांनी तोडले, त्या हातांत बेड्या अडकवण्याचं काम, त्याच्या स्वतःच्या निर्मितीने, त्याच्या मुलाने करावं, हाच तो न्याय.

दुःखांत ते दुःखांत.

मनातलं मळभ सरलं. आसमंतात कवित्व तेवढं भरून राहिलं.

- संवादिनी

9 comments:

Unknown said...

hmm.. chan mandlas manatla..!

Anand Sarolkar said...

Kay lihu kahi samjatch nahi ahe.

I feel this is your best post till now.

Jaswandi said...

mastch lihilays!
taaj mahalachya donhi bheti hya to tejomahalay kasa ahe he baghnyatch gelya.. hya angle ne kadhi vicharch navhata kela..

Silence said...

Great!

यशोधरा said...

surekh!

Anonymous said...

Thanks Sanvadini,
For ur nice & encouraging words.
तुझे लिखाण तर फारच अप्रतिम आहे.
तुझ्या ब्लॉग वरचे बहुतेक सगळे पोस्ट वाचले अणि मी तर हरवून गेलो. तु काय किंवा टूलिप काय तुम्ही फारच सुंदर लिहित आहात.
Hats off to the writing spirit and expressions .........!!!

Samved said...

दुःखं कुठं नसतं? पण म्हणून तेच शोधायचं का? त्याच्या कण्याभोवती ताठपणे उभं असणारं सौंदर्य, त्याचं काय? राजानं केलं ते चुक की बरोबर याचा उहापोह मी करत नाही, पण कलेचं सौंदर्य कलाकारामुळे (किंवा त्या मागच्या भुतकाळानेही) बाधीत होऊ नये असं माझं मत आहे.

Nandan said...

Apratim!

Reshma Apte said...

apratimmmmmmmmmmmmmm

awesome best ,,, dukh:t aani vicharaarambh ( vachanaryaachyaa dokyaat )...