Monday, November 5, 2007

खाज, सूख आणि बोच

दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष. किती दिवस मी हेच काम करत राहणार आहे? हा प्रश्न मनात अनेकवेळा येतो.

का? खरंतर वाईट असं काहीच नाहीये. म्हणजे कंपनी चांगली, पगार चांगला, बरेचसे लोकही चांगले, समुद्रकिनारी ऑफिस, चार्टर्ड अकौंटन्टला जितपत क्रिएटिव्ह जॉब मिळू शकेल तितपत जॉब. मग आणखी काय पाहिजे?

कॉलेजमधे असताना नाटकात कामं करायचे. दिवस रात्र केलेल्या तालमी. अजून आठवतं आय. एन. टी. च्या नाटकासाठी सिलेक्शन ला गेले होते. डिरेक्टरने माझी ऑडिशन न घेताच मला निवडली होती. आनंद आणि भीती. मलाच का सिलेक्ट केली एकही वाक्य न म्हणता? काही वेडंवाकडं तर नसेल ना डोक्यात त्याच्या? घाबरत घाबरतंच पहिल्या तालमीला गेले. पहिला उतारा वाचला आणि तो असा उचकला माझ्यावर? ज्या ज्या म्हणून शिव्या देता येत असतील त्या त्या दिल्या. अरे मुलगी म्हणून तरी जीभ आवरेल की नाही तुझी? ढसाढसा रडले होते मी. निघून आले तिथून. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले, पण पुन्हा कधीच रडले नाही. डिरेक्टर लोकं असतातंच सर्किट, त्यांना काही मनावर घ्यायचं नसतं.

वाटायचं आपण तर बाबा क्रिएटिव्ह फिल्ड मधे जाणार. आय.एन.टी., मग यवसायिक नाटक, मग मराठी सिरियल्स, मग हिंदी, जमलंच तर चित्रपट. शेखचिल्लीच्या गगन भराऱ्या दुसरं काय? कॉमर्स ला जाऊन क्रिएटिव्ह फिल्ड?

जहाँ पनांनी (म्हणजे बाबांनी) ऑर्डर काढली. सी.ए. इज अ मस्ट. मीही काय विरोध वगैरे केला नाही. कारण नाटक चालू राहणारंच होतं. अजूनही आहे. पण व्यवसाय म्हणून नाही. खाज म्हणून. खाज आल्यावर खाजवल्याने जेवढं समाधान मिळतं तेवढं अजूनही मिळतंच नाटकातून. पण मग ती ओढाताण. ऑफिसमधून सुटा ते तालमीला जा, मग उशिरा घरी. आई कावणार, JP कावणार नाहीत पण जरा लवकर येत जा सांगणार.

आणि दिवसा ऑफिसमधे बसून ह्या सगळ्याचा मी विचार करणार. जसा अत्ता करतेय. कामं राहणार आणि माझा बॉस मला शिव्या देणार. अता तो मला फायर करताना इतका विनोदी दिसतो. एक तर तो आहे पाच फूट. किडकिडीत. मला त्याच्या फायरिंग चं टेन्शन यायच्या एवजी हसायला येतं. मग तो मला विचारतो, हसायला काय झालं? मग मी सांगणार, प्लीज तू मला फायर करू नको, तुला ते जमत नाही. मग तो म्हणणार, उद्यापासून दोरीच्या उड्या मारतो, आणि चहाला घेऊन जाणार. म्हणजे तात्पर्य काय? तर काम काही होणार नाही.

असेच दिवस, अशीच वर्ष. लग्न झाल्यावर कदाचित शहर बदलेल. पण स्क्रीप्ट हेच राहणार ना? डेबिट व्हॉट कम्स इन ऍन्ड क्रेडिट व्हॉट गोज आऊट. क्रिएटिव्हीटीच्या दृष्टीने सगळंच तोट्यात.

मला असे गहन (मझ्या दृष्टीने) प्रश्न पडले की मी बाबांना विचारते. त्यांना कधी पडले होते का प्रश्न. ते म्हणाले सूख सुखासुखी मिळालं की टोचतं.

त्यांचं खरंही असेल. देवाच्या दयेने फार लवकर मला स्थिरता आली. नोकरीची पैशाची. मग सूख बोचायला लागतं का? की आयुष्यात काही थ्रील राहत नाही म्हणून ते बोचतं? माहीत नाही.

आहे काही उपाय?

4 comments:

A woman from India said...

To make you feel better, the struggle between being practical and following your heart is not so uncommon.
माझ्यापुरतं मी ठरवलं आहे:
खाज को खाज ही रहने दो, रोजी ना बनाओ. व्यवसाय मग तो कुठलाही असो, व्यावहारिकता,स्पर्धा,महत्वाकांक्षा इ.सर्व आलंच.
त्यातुन सुटका नं होता उलट आहे ती passion कमी होण्याचा धोका.
अर्थात हे माझं वैयक्तिक मत.

Abhijit Bathe said...

सध्या तरी (जोरदार) लिहित रहाणे हाच उपाय (तुझ्याबद्दल) मला तरी दिसतोय. सही लिहितेयस! कीप इट अप!!

संवादिनी said...

Sangeeta,

I agree with you and thats how I console myself.

Abhijit,

For sure I am going to continue. Feels better when its all written.

charuta said...

can i say "ditto"? my feelings exactly...m still going through the grind...with no solution whatsoever...i call it "The dream...The grind" (have an unedited post in my pc with this topic sharing your feelings)