Thursday, March 27, 2008

मी आणि माझं आभाळ

काल अजून एक इंटरव्ह्यू झाला. हल्ली आठवड्याला एकदोन होतायत त्यामुळे त्याबद्धल काही लिहिण्यासारखं नाहीच आहे. हल्ली इंटरव्ह्यू वाढलेत ह्याचं कारण म्हणजे, मी, मुंबईच हवी, ही माझी नोकरीची अट कमी केलेली आहे. गेलाबाजार पुणं तरी मिळावं एवढीच अपेक्षा आहे. तसं लांब जायला काही हरकत नाही, पण पुण्यावरून कसं? कधीही घरी पळता येईल. नाही म्हटलं तरी मराठी. चेन्नई, कलकत्त्यापेक्षा कधीही जवळचं वाटतंच.

गेले बरेच दिवस ह्या विषयावर आमच्या घरी चर्चासत्र घडत होती. म्हणजे मी एकटीने जाऊन नोकरीसाठी परगावी राहावं का? आई म्हणे अजिबात नको. हल्ली काय एकेक ऐकायला येतं? तिच्यावर हल्लीच्या नव्या हिंदी सिनेमांचा प्रचंड परिणाम झालाय. आपली मुलगी वाईट संगतीला तर नाही ना लागणार ही तिची भीती.

बाबांनी तरी माझी बाजू घ्यावी की नाही? तेही नाही. ते म्हणे, उद्या तुझं लग्न होणार आणि मग तू जाणार तोपर्यंत तरी तू इथे राहा. उद्या लग्न कुठल्या शहरात होईल माहित नाही. मग तेवढा सहवास मिळेलच असं नाही. मला एवढा राग आला ना त्यांचा. नेहमीसारखं बोलणंच बंद केलं मी. फक्त कामापुरतं. त्यांना बहुतेक वाईट वाटलं.

विन्या म्हणे सुंठीवाचून खोकला गेला. म्हणाला जायचंच असेल तर परदेशी जा. हे पुणंबिणं नको. पुणं तेथे सगळंच उणं. स्कूटर चालवता येणार नाही रस्त्यात म्हणाला. अतिरेकी बायकांसारखे बुरखे घालून स्कूटर चालवायला लागेल.

असं तिघांनी मिळून नकारघंटाच लावली.

आताशा मला वाटायला लागलंय की थोडं स्वतंत्र व्हायला हवं. म्हणजे घरात मला कसली बंदी आहे असं नव्हे. पण आपलं एक वेगळं आभाळ असावं असं प्रत्येकाला वाटतंच ना. स्वप्नांचे पंख लावावेत आणि द्यावं झोकून. सोडावं आपलं गाव, आपलं घरटं. उडावं उंचच उंच. अर्थात घरट्यावरचं प्रेम त्यामुळे कमी होणार नाहीच. पण नवे अनुभव, नव्या शक्यता, जबाबदाऱ्या, प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स. सगळं कोरं करकरीत नवं हवंय.

मग मी काय केलं? वाद घालणं बंद केलं आणि तडक आजीचं घर गाठलं. आजीचं घर म्हणजे मामाचं घर. आईची आई. बाबांची आई कधीच गेली. तिचं आभाळ अजून वेगळं. तर आजीकडे गेले. सगळ्यात मोठी नात म्हणून आजीची मी लाडकी आहे.

तिला सांगितलं. तिसऱ्या जनरेशन चे प्रॉब्लेम्स, दुसऱ्या जनरेशनला कळत नाहीत, पण पहिल्या जनरेशनला कळतात हे कसं काय? तिला माझं म्हणणं पटलं. लगेच फोन लावला तिने आईला आणि चांगली ओरडली. आईला लग्नाआधी नोकरी करायची होती. दादा नाही म्हणाले. तेव्हा, आता मी जशी भांडतेय, तशी ती आजीशी आणि दादांशी भांडली होती.

एकदा हाय कमांडनी आदेश काढला की मग आमच्याकडे काही चालत नाही. आजी हो म्हणाली आणि सगळा विरोध मावळला.

घरी गेले नंतर तर आई बाजूला घेऊन म्हणाली. हे बघ, आजी म्हणतेय म्हणून मी तुला परवानगी देतेय. पण उद्या भलतीकडे कुठे नोकरी मिळाली तर सांभाळून राहा. वाईट मित्रमंडळींपासून दूर राहा. लहान वयात काही कळत नाही काय चांगलं काय वाईट ते. दोनदा विचार कर काहीही करण्याआधी. मला खुदकन हसायला आलं. म्हटलं आई अजून मला कोणीही नोकरी दिली नाहीये. अत्तापासूनच एवढी चिंता. खरंच जायला लागलं तर काय होईल?

विन्या पुन्हा म्हणाला. ते पुणं सोडून काहीही बघ हं ताई. तू अतिरेकी आहेस, पण अतिरेकी दिसलीस तर जाम वाईट वाटेल मला.

बाबांना मनातून माझं पटलं होतंच. त्यांनी चक्क मला इंटरनेटवर सॉरी कार्ड पाठवलं. खाली लिहिलं होतं.

"उडणाऱ्या पिलाचे पंख बांधून ठेवल्याबद्दल पिलाच्या बाबाकडून सॉरी"

- संवादिनी

20 comments:

a Sane man said...

:)...shevaT kasla cute aahe postcha! :-)

श्रद्धा कोतवाल said...

संवादिनी,

तुझं पोस्ट वाचून नकळत मला २००२ मधल्या स्वत:ची आठवण झाली. जिथे नोकरी मिळाली त्या कंपनीची पुण्यात शाखा असूनही मी बंगलोर मागून घेतलं होतं. आणि त्या निर्णयाचं मला आजही बरं वाटतं.

घरी असलो की नाही म्हटलं तरी कुठलाही छोटासादेखील निर्णय घेताना त्यावर इतरांची मतं घ्यायची इच्छा होते. आणि काहीही कठीण प्रसंग आला तरी घरचे जवळच आहेत ही आश्वस्त करणारी जाणीव असते.
ज्या क्षणी जाणवतं, की कठीण प्रसंगात आपण ज्यांचा आधार घ्यायला पळतो, ज्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आपल्याला निकडीची वाटते, ते आपल्यापासून किमान हजार किलोमीटर दूर आहेत आणि आपल्याला कितीही वाटलं तरी ताबडतोब आपल्यापाशी हजर होऊ शकत नाहीत; आपण आपले निर्णय स्वत: घ्यायला शिकतो. त्यांचे परिणाम काय होतील, कशाकशाला तोंड द्यावं लागेल याचा अजमास घ्यायला शिकतो. थोडक्यात काय; जगात कुठेही टाकलं तरी नीट राहता येईल याचं प्रशिक्षण मिळतं.

ही अर्थात माझी वैयक्तिक मतं आहेत. काहींची वेगळी असू शकतील.

आठवलं म्हणून, सुरुवातीला पी जी मध्ये राहत होतो मी आणि माझी मैत्रीण. तिथे भयंकर इरिटेट व्हायला लागलं म्हणून अजून एका मैत्रिणीच्या जोडीने भाड्याचं घर बघायला सुरुवात केली. घर पसंत पडलं. तिघींच्या आवाक्यात होतं म्हणून सगळं पक्कं केलं. आणि ऐनवेळी तिसर्‍या मैत्रिणीने ’मला नाही बाई शिफ़्ट करायचं’ म्हणून दगा दिला. आम्ही आमच्या होस्टेलमध्ये ’निघणार’ हे सांगून बसलेलो.
घराचं डिपॉझिट, भाडं बघता दोन जणींच्या ते आवाक्याबाहेर जाताना स्पष्ट दिसत होतं. तिसरी पार्टनर मिळण्याची चिन्हं तेव्हा दिसत नव्हती. घरून पैसे मागवायचे नाहीत, इतकंच काय ही परिस्थिती घरी सांगायची नाही असंही पक्कं होतं. (कारण दोघींनाही माहीत होतं. लगेच घरून उपदेशाचे डोस आले असते. कुणी सांगितलं तुम्हा मुलींना हे असलं करायला? आधी कॅन्सल करा ते सगळं वगैरे!)
त्या सगळ्यातून आमचे आम्हीच पार पडलो नि नंतर कधीही कुठलाही प्रश्न प्रश्न वाटला नाही हे मात्र नक्की!

असो. बरंच पाल्हाळ लावलं स्वत:बद्दल. :-) पुरे करते.

बाहेरगावी किंवा दुसर्‍या देशात जायचा निर्णय घेतलास तर माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

आणि हो, तुझ्या बाबांनी तुला पाठवलेल्या कार्डातलं वाक्य केवळ अप्रतिम!

मोरपीस said...

अप्रतिम! मी फ़क्त एवढेच म्हणू शकेल.

Nandan said...

ekdam 'aakashi zep ghe re' vagaire typical lihit nahi :), pan post aavadala. Ha asa vegalepanacha vichar nemaka kadhi manat rujto hyachahi ekda shodh ghetala pahije asa vatun gela.

Satish said...

Punyavar ka evadha rag?

Monsieur K said...

when i was staying at home, my mom always used to say,
"ekdaa baaher padun baghaa. mhanje kalel, jag kasa asta. ithe gharaat sagla haataat milta tyaachi savay jhaali aahe."

gharaa baaher pahilyaanda padlo, tevha hostel madhe gelo - tyamule, jevaayche kaahi vaande jhaale naahit. aamchi hostel mess kharach khup chaangli hoti - 2 varshaat majha vajan pan chaanglach vaadhla :D

pudhe nokri nimitta, punha gharaa paasun laamb. tyamule shraddha mhante tase barech anubhav aale - chaangle aani vaaiit (actually vaaiit naahich) :D

tula aai-babanni lagech permission dili asti, tar kasa vaatla asta?
pratham virodh, pan mag aajicha vashilaa vaaprun milaali na permission :)

liked your dad's message - ekdam best!

all the best, for your job search, as well as in case you move out.
aani, pune itka hee vaaiit naahiye aamcha :)

Meghana Bhuskute said...

आता कसं! गेल्या पोस्टमधे तू तुझ्यासारखी वाटतंच नव्हतीस. आता जरा हायसं वाटतंय! शोध, शोध, लवकर बाहेर कुठेतरी नोकरी शोध.

Vidya Bhutkar said...

:) आमच्या दादांची आठवण झाली. मी १२ नंतर सांगलीला जाणार शिकायला म्हणून त्यांच्याशी भांडले, नंतर त्रिवेंद्रमला जाण्यासाठी. पण आता उगाच वाईट वाटतं, घरी असताना किंवा त्यांच्या जवळ असतानाही अशी भांडले म्हणून. असो. चक्क कार्ड पाठवलं तुझ्या बाबांनी :-) सही वाटलं आणि शेवटचं वाक्य तर अल्टीमेट.
All the best.
-Vidya.

Priya said...

आज पहिल्यांदा तुझा ब्लॉग पाहिला. वेळेअभावी फार वाचता आलं नाही, पण लेखनातला प्रांजळपणा खूप भावला. Hope to read more of your posts in the times to come! :)

Jaswandi said...

मेघनाने सुरु केलेल्या टॅगचा ’खो’ तुला दिलाय मी... :)
पटकन लिही.. तुझं उत्तर वाचायची खुप उत्सुकता आहे.

zhamaal said...

hi
fantastic ! I read all posts today and liked your style of writing.

Anamika Joshi said...

jaswandi,
TopaN-naavane lihiNaryanche faar vaandhe hotaat. ekhadya vishayavar kharya naavane lihun zala; ki TopaNanaavala kho miLato, ani tya navanehi lihava lagata. ;-)

Samved said...

tivra nishedh...Punyana kay buva ghoda marala tuza? it's a slow poisoning city :) so don't worry. give your best!!
I left home after 12th for my engg ani aata swathacha vegla ghar tayar zalay! so all exp counts...Go for it..follow some basic principles of life and you are done

Sneha said...

hmm gharachya baher padun navya abhalat udanyachii odh majhihii hoti magachya varshi... aani nakalat pane majhya abahlatun udun khup dur aale mii...eka navya abhalat... tithun majh abhal majhi manas... aspasht pan disat nahit aata....
aso sagalyanchya babtit asa hon shakkya nahi... tujha opravas vegala .. aani majha vegala hota...:)
aani ho ha pravas sukharup asato..apala guru asato...
best of luck....
tujhe baba pan goad lihit asatil na ga? :)

Raj said...

प्रांजळ अनुभवकथन आवडले. आईवडीलांच्या कधीकधी जाचक पण बरेचदा प्रोटेक्टिव्ह छायेतून बाहेर पडणे हा एक वेगळाच अनुभव असतो. या प्रवासासाठी आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

Monsieur K said...

'je je uttam' karta tulaa 'kho' dilaa aahe :)

Rohini said...

Hellooo..
Tuze sagle blogs vaachle, khup chaan vaatle :-)
added u in my fav lists..i am new to blogger..so dnt knw if we need a permission frm t other person to add in fav lists:-(
abt this blog..me 12th nantar nehmi baher rahile..aai chi iccha nastaana, jst because my dada wanted me to see t world..and trust me it changed me forever.
Laajalu, ghabrat shendefal me chakka chennai, blore sagla firle ekti recently:-)
Aayushyaache best lessons milale gharaabaher padun...
Go out...live life..u will be a changed person :-)

संवादिनी said...

@ सेन - हं. मलाही अगदी असंच वाटलं. कधीकधी बाबा एकदम असं क्यूट काहीतरी करतो की मग सगळा राग बीग दूर होतो.

@ श्रद्धा - अजिबात पाल्हाळ वाटलं नाही. तुझी गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुझी गोष्ट वाचून आता मलादेखील दहा हत्तींचं (की हत्तीणींचं?) बळ आलंय. बघुया कसं काय जमतं ते.

@ मोरपीस, प्रिया, झमाल, राज - थँक्स अ लॉट

@ नंदन - वेगळेपणाचा विचार? सांगता येणार नाही. कदाचित मॉंटेसरीच्या वर्गात आई बाबा आपला हात सोडून, आपल्याला फसवून बाईंच्या ताब्यात देऊन जातात तेव्हापासून असेल. पण तेव्हा काही शक्य नसतं आपलं आभाळ शोधणं. आता शक्य आहे, म्हणून कदाचित आता त्या विचाराने उचल खाल्ली असेल.

@ सतीश - अहो पुण्यावर माझा अजिबात राग नाही. मला उलट पुणं आवडतं. माझ्या भावाला येता जाता कशालाही शिव्या द्यायला आवडतात. मग त्यातून पुणं कसं सुटायचं?

@ केतन - मलाही असंच वाटतंय. कशाला वाईट अनूभव येतील. पण भीती असतेच ना रे मनातून. पाण्यात उडी मारेपर्यंत पाण्याची भीती. हं. थोड्या नाराजीनंतर आपल्याला हवं ते मिळाल्याचा आनंद काही वेगळाच. खरंच.

@ मेघना - मलाही तसंच वाटलं. उकळत्या दुधासारखं उतू जाऊन लिहिताना मलाही बरं वाटतं आणि सोपंही. पण जे घदलं ते इतकं वाईट होतं की तसं लिहिणं मलाच रुचलं नाही. एनिवे थँक्स.

@ विद्या - मला माझीच आहे असं वाटणारी गोष्ट किंवा प्रॉब्लेम आधी कित्येकींना आलाय नाही? होपफुली, मीही तुमच्यासारखी तावून सुलाखून बाहेर पडेन ह्यातून.

@ विदुषी - तुझी कमेंट वाचून वाईट वाटलं. पण तुला मी माहीत असणं महत्त्वाचं असलं तरी मला मी लिहिणं महत्त्वाचं आहे. आणि दोन्ही गोष्टी एकत्र होणं शक्य नाही. आणि हेही सांगते की मला हा टॅग पहिल्यांदाच मिळाला आहे, आणि एकदाच मिळणार आहे. त्यामुळे तू जो प्रॉब्लेम सांगितलास तो मला झालेला नाही.

@ संवेद - अरे बाबा, निषेध माझ्या भावाचा कर. माझा कशाला?

@ स्नेहा - हं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा. पण पुढच्यास ठेच मागचा शहाणा हेही तितकंच खरं नाहीका?

@ जास्वंदी - खो साठी धन्यवाद. आज पोस्ट टाकतेय. विचित्रच झालंय.

@ रोहिणी - तुझ्या फेवरिट ब्लॉग्समध्ये मी? वाह! थँक्स. एवढ्या सगळ्यांनी माझा धीर वाढवलाय की आता बरं वाटतंय.

Anonymous said...

hiya


just signed up and wanted to say hello while I read through the posts


hopefully this is just what im looking for looks like i have a lot to read.

Anonymous said...

Hello

I just wanted to say hi :)