Tuesday, November 15, 2011

देवयानी (29)

कामाचा धडाका लागला होता. खूप ट्रॅव्हलिंग चाललं होतं. बट आय वॉज एंजॉयिंग. एकतर माझ्याबरोबर नेहमी प्रीतम असायचा. टु बी फेअर, त्याच्यासोबत मी असायचे. कारण त्याचं तिथे असणं जास्त महत्त्वाचं होतं. तो बॉस होता आणि मी त्याच्या हाताखाली काम करीत होते. पण असं फॉर्मल रिलेशन आमच्यात कधी निर्माण झालंच नाही. कारण एकत्र काम करण्याआधी आम्ही चांगले मित्र होतो. अर्थातच आम्ही जास्त वेळ एकमेकांसोबत घालवत असू. आता ऑफिसमध्ये ह्याची चर्चा सुरू झाली. प्रीतम आणि देवयानीचं काहीतरी लफडं चाललंय.

अशा गोष्टींची मला सवय होती आणि अजूनही आहे. मुळात बाई प्रगती करतेय हेच बऱ्याच जणांना खुपतं. बाईकडून हरलेलं नाही चालत अजूनही पुरुषाला. मग कंपनीमधलं इंटर्नल पॉलिटिक्स चालू होतं. चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात, ऐकल्या जातात आणि त्यावर विश्वासही ठेवला जातो. हे फक्त बायकांच्या बाबतीत होतं असं नाही. हे सर्वांच्याच बाबतीत होतं, पण मुलींच्या, विशेषतः अविवाहित, वय उलटून चाललेल्या आणि यशस्वी मुलींच्या बाबतीत हे सर्व करण्यासाठी एक सोपा विषय उपलब्ध आहे. तो म्हणजे लफडं. थोडं थोडं माझ्या कानावर आलेलं होतं. पण मी कधीच अशा गोष्टी सीरियसली घेतल्या नाहीत.

प्रीतमला काय वाटेल हे मात्र राहून राहून माझ्या मनात यायचं. उगाच माझ्यामुळे मिषू आणि त्याच्यात वाद व्हायला नकोत. शिवाय मिषूही माझी मैत्रीणच होती. पण ह्या गोष्टी बोलायच्या तरी कशा? पण उगाचच मन खात राही. शेवटी एकदा मी हिय्या करून मिषूला जाऊन भेटले. तिला सांगितलं की असं काही कंपनीमध्ये चाललंय. तुझ्या कानावर काही आलं तर प्लीज विश्वास ठेवू नकोस. असं काही नाहीये. मी तिला हे सांगितल्यावर ती खो खो हसायला लागली. कारण तिला प्रीतमने सगळंच अगोदर सांगितलेलं होतं.

मनावरचं दडपण दूर झालं पण तरीदेखील आमच्या वागण्या बोलण्यातला मोकळे ढाकळेपणा बऱ्यापैकी कमी झाला. एकतर कुणालाही काहीही बोलायची संधी द्यायची नव्हती आणि दुसरं म्हणजे राईचा पर्वत करणारी जमात आमच्या कंपनीत मुबलक होती अजूनही आहे. त्यामुळे काय अफवा पसरतील ह्याची काही गॅरेंटी नव्हती.

घरी आईची भुणभूण चालूच होती. लग्न कर लग्न कर. मलाही मनातून आतून वाटत होतं की आता बस ही धावपळ, दगदग. चांगला जोडीदार निवडावा, लग्न करावं आणि सेटल व्हावं. एक स्त्री म्हणून आयुष्यात पुरुष असणं जरूरीचं वाटत होतंच, पण अलीकडे, म्हणजे जशी माझ्या मैत्रिणींची मुलं मोठी व्हायला लागली, तशी आपल्यालाही एक मूल असावं ही इच्छा प्रबळ व्हायला लागली. त्यासाठीचा एकमेव राजमार्ग म्हणजे लग्न करणे. शिवाय आई होण्यासाठी वयाची मर्यादाही माझ्या डोक्यात पिंगा घालीत होतीच. अर्थात चाळीशीपर्यंत मुलं झालेल्या बायका माझ्या ओळखीच्या होत्या. पण वयाबरोबर बाळ होण्याची कमी होत जाणारी शक्यता आणि कॉंप्लिकेशन्स होण्याची वाढत जाणारी शक्यता ह्यामुळे तिशी जेमतेम पार करत असतानासुद्धा आपल्याकडचा वेळ कमी होत चालल्याची जाणीव मनाला व्हायला लागलेली होती.

- देवयानी

No comments: