Wednesday, November 2, 2011

देवयानी (26)

लखनऊ, कलकत्ता, दिल्ली आणि मुंबई एवढा मोठा प्रवास करून मी मुंबईला उतरले. रात्रभर झोप झाली नव्हती डोकं चांगलंच ठणकत होतं. टॅक्सी करून कशीबशी घरी पोचले. घरात शिरले तर समोरंच जमिनीवर बाबांचा मृतदेह ठेवला होता. नाका कानात कापसाचे बोळे घातले होते. मला एकदम भडभडून उलटी होईल असं वाटलं. कोंकणातले नातेवाईक सगळे आलेले होते.

कार्डिऍक अरेस्ट. गुरवारी संध्याकाळी बाबांना हार्ट अटॅक आला. माझा फोन अनेकदा वाजूनही मी उचलला नाही. मला त्या गोंधळात आवाज जाणं शक्यच नव्हतं. घरचा फोन तीनदा येऊन गेल्याचं दिसलं पण पुन्हा फोन करावासा वाटला नाही. उद्या करू म्हणून मी झोपले. इतक्या आनंदात मी ती संध्याकाळ घालवली आणि माझे बाबा इथे मरण पावलेले होते. ते असताना त्यांचं माझ्यावर किंवा माझं त्यांच्यावर कणभरही प्रेम असेल असं मलाही वाटलं नसतं. पण आज त्यांना असं पाहून खूप वाईट वाटलं. खरं रडूही आलं असतं. पण अश्रू डोळ्यापर्यंतच येऊन थांबले.

संध्याकाळी हे झालं तेव्हा आई एकटी होती. आमचे शेजारी डॉक्टर आहेत. त्यांना बोलावलं. त्यांनी सांगितलं की ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हालवलं तर काही होऊ शकेल, पण पोचेपर्यंतच बाबा गेले होते. माझ्यासाठी बॉडी थांबवली होती. मला खूप गिल्टी वाटलं. कसेही असले तरी माझे वडील होते ते. नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडताना मी फक्त आईला सांगून गेले होते. बाबांना येते एवढं जरी मी म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण ना मी सांगितलं ना त्यांनी विचारलं.

असो पुढचा पंधरवडा अतिशय निराशेमध्ये गेला. माणसं समाचाराला येत होती. आई तेच रडगाणं गात होती. तिची ती टेप ऐकून माझा जीव नकोसा झाला होता. चीड येत होती पण तिचं कौतुकही वाटत होतं. प्रत्येक वेळी ती तितक्याच प्रमाणे बाबांबद्दल बोलत होती. टोचून बोलण्याशिवाय आणि घरचा पैसा समाजसेवेच्या नावाखाली खर्च करण्याशिवाय आयुष्यभर त्यांनी काहीही केलं नाही, तरीही तिचं त्यांच्यावर निःसीम प्रेम होतं, ते मला दिसलं. प्रत्येक वेळी त्यांना जरा लवकर हॉस्पिटलात नेलं असतं तर ते वाचले असते, हेही ती तितक्याच आशेने म्हणत होती. जसं काही हा सगळा प्रसंग रिवाइंड करता येईल आणि बाबांना लवकर हॉस्पिटलात घेऊन जाता येईल.

सगळे दिवस, त्याची उस्तपास्त. दोन आठवडे गेले आणि मी आईला म्हटलं की मी आता निघते. मला वाटतं, ही शक्यता अजून तिच्या डोक्यात आलेली नव्हती. आता तिला एकटीला राहायला लागणार होतं. तिच्या डोळ्यात ती भीती मला दिसली. तिची नजर टाळत मी माझी बॅग उचलली आणि जिना उतरले. टॅक्सी केली आणि माझ्या घरी पोचले. नव्या कोऱ्या करकरीत घरावर आणि घरातल्या सामानावर तीन आठवड्यात धुळीची पुटं जमलेली होती. मी वेड लागल्यासारखं घर साफ केलं. पंधरा दिवसांचा एवढा शीण आला होता, पण तो घालवायलाच की काय, मी देहभान विसरून घर साफ केलं. नक्की काय साफ करत होते मी?

अंघोळ केली, कपाट उघडलं आणि माझ्या आवडत्या रेड वाइनने ग्लास भरला. आरामखुर्ची बाल्कनीत ठेवली आणि त्याच्यावर झोके देत देत, समुद्राकडे बघत संध्याकाळ घालवली. मनात सतत बाबांचेच विचार येत होते. त्यांनी मला अगदी बिचारं करून टाकलं होतं, शाळेत, कॉलेजात. पण तरीही ते गेल्याचं मला दुःख होत होतं. वाइन पोटात गेली आणि पंधरा दिवस अडलेला बांध फुटला. अगदी धाय मोकलून मी रडले. मी का रडले हे मला सांगता येणार नाही. बाबा गेले म्हणून मी रडले, मला बाबा कधी भेटलेच नाहीत म्हणून मी रडले. की जेवढे मिळत होते तेवढेही घेण्याचे कष्ट मी घेतले नाहीत म्हणून मी रडले?

इतकी विचित्र अवस्था झाली होती माझी. की मी तशीच घर लॉक करून खाली उतरले आणि टॅक्सी करून पुन्हा माझ्या जुन्या घरी आले. आईला म्हटलं की आई तू माझ्याबरोबर राहायला चल. मी हे का केलं? मला माहीत नाही. ज्या आईपासून दूर पळण्यासाठी मी इतकी दिवस तरसले होते त्याच आईला मी स्वतः माझ्या घरी बोलवत होते. ती नाही म्हणाली. त्यानं तर मला आणखीनच वाईट वाटलं. जन्मभर नवऱ्यावर अवलंबून राहिलेली बाई ही. हिचं कसं एकटीने होणार होतं? साधी ट्यूब बदलायची तर काय करायचं असतं हेही तिला ठाऊक नव्हतं.

दुसऱ्या दिवशी माझं सामान आवरून मीच माझ्या जुन्या घरी परत आले.

- देवयानी

2 comments:

Anonymous said...

देवयानी,
इतकं कोरडं व्हायला काय कारण झालं? तुझं लिखाण मात्र प्रामाणिक आहे. मी स्वतः काही अंशी अशा अलिप्ततेत जगले आहे काही दिवस.

अश्विनी

Anonymous said...

korad pekshaa kathor vaatal prem tar aahe pan te attahas swat:la kathor banavanyaacha ,,,

pan he sagal aliptpane lihine aani tehi spasht kharach kamaal aahe ,,

hats off to u devayaani ,,,,

i have started respecting and liking the way u r ,,, independent, honest, emotional still strong ,,

i knw no reason n rite i have got to comment upon how u r ,,,
bt i just adore ur honesty