Monday, November 28, 2011

देवयानी (33)

नोकरी बदलली. पण ती करणारी तर मीच होते ना? जे प्रॉब्लेम्स आधी होते ते ही नोकरी सुरू झाल्यावरही तसेच आहेत. अर्थात लग्न वगैरे करण्याचा विचारच मी आता सोडून दिलेला आहे. जेवढं काही माझ्या वाट्याला त्याबाबतीत यायचं होतं तेवढं भल्या बुऱ्या मार्गाने मला मिळालेलं आहे. मै और मेरी तनहाई, आम्हा दोघींचीच जोडी कायम राहणार बहुतेक असं मी गमतीनं बऱ्याचदा म्हणते. आणि तेच खरं होणार आहे. असं लिहिताना मनाला थोडंसं बोचतं. पण पुन्हा विषाची परीक्षा घेण्यापेक्षा ही कधीमधी मनाला लागणारी बोच परवडली.

आई आहे तोपर्यंत आई आणि तिच्यानंतर मी एकटी असं मी माझं आयुष्य काढणार आहे. नशिबाने चांगली नोकरी असल्याने वेळ बरा जातो. दिवसा जगाशी लढाई करून रात्री एकटीच मी माझ्या आरामखुर्चीत वाइनचे घोट घेत बसते तेव्हा जीव कसनुसा होतो. नाही असं नाही. पण त्यावर आता काही उपाय नाही. आई होण्याची तीव्र इच्छा मात्र मनात अजूनही आहे. पण हे सगळं आत्याला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं ह्या धाटणीचं आहे.

कुमारी मातांचा प्रश्न कधी मधी पुरवण्यांतून चघळला जातोच. कधी वाटतं आपणही असं काहीतरी करावं. डोनर स्पर्म घेऊन आपलं स्वतःचं मूल जन्माला घालावं आणि मग त्याला किंवा तिला वाढवावं. पण हल्ली ना, माझी कुणाशी भांडण्याची ताकत आणि इच्छा दोन्हीही खूप कमी झालेय. समाजाशी मी गेली अनेक वर्ष भांडतेय. अजून किती भांडू? मग वाटतं नकोच तसलं काही धाडसी. त्यापेक्षा आपण बरं आपली आरामखुर्ची बरी. आई स्वयंपाक करते मी पैसे कमावते आमच्या दोघींचं बरं चाललंय.

पण मध्ये एक सुंदर घटना घडली. एका कॉर्पोरेट फंक्शनला सिंधूताई सकपाळ ह्यांना पाहण्याचा, ऐकण्याचा योग आला. मला मोठी मजा वाटली. सगळी त्यांची मुलंच. आणि त्या सगळ्यांच्या आई. आई होण्यासाठी मूल जन्माला घालण्याची काय गरज आहे? हा एक वेगळाच विचार मनात आला. अर्थात स्वतःचं मूल होणं ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी तो उपाय नव्हे. पण माझ्यासारखी बाई जिला आई व्हायचंय पण होऊ शकत नाही तिनं हा पर्याय का स्वीकारू नये? त्या क्षणी वाटलं की सोडून द्यावं आपलं हे जग आणि जावं त्यांच्याबरोबर आणि एक आई म्हणून काढावं उरलेलं आयुष्य. किती उदात विचार आहे हा नाही का?

पण सर्वसामान्य माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे. आपण ते एक पाऊल उचलू शकत नाही. मला माहितेय की मी खरंच त्या आश्रमात गेले तर मला माझ्या आयुष्यात खूप आनंद मिळेल, पण मला खूप आनंदाबरोबर माझी आरामखुर्चीही हवी आहे. हातात उंची वाइनचा ग्लासही हवा आहे. एसी गाडीही हवी आहे आणि इतर सर्व सुखसोयीही हव्या आहेत. ते कसं काय जमायचं? नुसतं समाजकार्यच नाही, पण उद्या मी खरंच मूल दत्तक घ्यायचं ठरवलं तरी त्या मुलाला किंवा मुलीला पूर्ण न्याय मी देऊ शकणार आहे का हे मला ठरवावं लागेल. त्यासाठी लागणार वेळेची कमिटमेंट मला द्यावी लागेल.

पण ही एक संधी आहे, आयुष्याला एक दिशा देण्याची आणि ती मी सहजासहजी दवडणार नाही. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात दैवाने मला भरभरून दिलं, नाऊ इटस हाय टाइम आय गेट माय शेअर इन माय पर्सनल लाईफ. अजून काही अपेक्षा नाहीतच.

- देवयानी

4 comments:

Anonymous said...

हा गोष्टीचा शेवट समजायचा का.....किंवा एक नवी सुरुवात म्हणू हवं तर......

पण मनाला फार भावला तुझा हा पारदर्शक जीवन प्रवास. अनेक शुभेच्छा.

arti pai said...

gelya don bhagaat farach aawarata ghetala ahe. ekdum goshta sangatanacha flow gelya sarakha. majach geli ekdum vachanatali. :(

Anonymous said...

Very nice Devayani.

Liked it a lot. Very very well written.

Life....its difficult... may be..Acceptance is the key to happiness...

Gouri said...

ही नवी सुरुवात आहे ... पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!