Thursday, July 30, 2009

तीन पायाची शर्यत

शनिवारी सकाळी सकाळी एकटीच गाडी घेऊन बाहेर पडले. शनिवार आणि रविवार म्हणजे आमच्या घरी दिवस रात्र झोपण्याचे वार. पण दिवस रात्र झोपणं मला झेपण्यातलं नाहीच आहे. मग काय करा? सकाळी सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता. पतिराजांच्या मानाने ही पहाटच) उठले काढली गाडी आणि निघाले. दोन पर्याय होते. एक म्हणजे जवळच्याच मोठ्या शहरात जायचं किंवा समुद्राच्या कडेकडेनं जाणाऱ्या रस्त्याने लांब भटकायचं.

गाडीत बसले. गॅरेज उघडलं. बाहेर पडणार इतक्यात वाटलं नवऱ्याला विचारावं येतो का ते. नाही म्हणणार हे पुरतं माहीत होतं पण तरीही तिथूनच गाडीत बसल्या बसल्या फोन केला. बराच वेळ वाजून व्हॉईस मेसेजवर गेला. त्याला तिथेच व्हॉईस मेसेज ठेवला की मी जात आहे. दुपारपर्यंत येईन. शेवटी करता करता समुद्राचा रस्ता पकडला. तसा दिवस उगवला असला तरी लोकं उगवायची होती त्यामुळे रस्ते रिकामेच होते. भरभर गाडी चालवत समुद्राजवळच्या रस्त्याला लागले. जिथे जिथे म्हणून थांबता येणं शक्य होतं तिथे तिथे थांबले. नवऱ्याचा नवा कोरा एसएलार कॅमेरा घेतला होताच अशक्य फोटो काढले.

थंडी होतीच. हुक्की आली म्हणून खिडकीच्या काचा उघडल्या. भन्नाट वारा सुटलेला अंगाला झोंबायला लागला. किशोरीताईंचा तोडी लावला होता. एकेक मधामध्ये सत्तर सत्तर वर्ष घोळलेला स्वर. तो कोमल ग. एकदम माझ्या गाण्याच्या बाईंची आठवण झाली. एका स्पर्धेत तोडी म्हणायचा होता. त्याची तयारी करून घेत होत्या त्या. मी लहानंच होते. सूर कळण्याचं वय नव्हतं. पण मी योग्य तेच गावं हा त्यांचा हट्ट. तोडीमध्ये कोमल ग, अतिकोमल लागला पाहिजे. कितीदा रटवून घेतलं होतं. अख्ख्या गाण्यापेक्षा अतिकोमल ग चा रियाज जास्त करून घेतला होता. स्पर्धा झाली. बक्षीस मिळालं. पण बाई रागावल्या. म्हणाल्या एवढं शिकवून आलं कसं नाही तुला? बक्षीस मिळाल्याच्या कौतुकापेक्षा सूर हवा तसा बरोबर लागल्याचं कौतुक त्यांना जास्त. अशा आमच्या बाई. गचकन कुणीतरी हॉर्न मारला आणि बाई आठवणीत हरवून गेल्या परत.

एका ठिकाणी उतरले उंचावरची जागा. समोर अथांग समुद्र पसरलेला. वारा सुटलेला, त्याची सुरावट कानात. किती वेळ झाला कोण जाणे समाधीच लागली. समुद्राचा आणि माझा एक विलक्षण ऋणानुबंध आहे. तो कसाही असला तरी मला आवडतो. अगदी ओहोटीचा हिरमुसलेला दिसणारा असला तरी आणि उधाणलेला भरतीचा असला तरी. अख्खं विश्व पोटात गुडुप करून ठेवण्याची ताकद आहे त्याची. त्याच्याकडे बघताना भारावून जायला होतं.

नवऱ्याच्या फोनने भानावर आले. नुकताच उठला होता. मला म्हणाला मला का नाही उठवलं. म्हटलं मित्रा, मी फोन केला होता. तू उचलला का नाहीस. म्हणाला, काय बाई एका घरात राहून एकमेकांना फोन करतो आपण. मी म्हटलं मग काय बुवा, एका माणसाला झोपण्यापुढे काही सुचत नाही. आणि दोघंही जोरजोरात हसलो. इतकं की बाजूला गाडी लावून उभी असलेलं एक अख्खं कुटुंब माझ्याकडे बघायला लागलं. मग मी गाडीत जाऊन बसले आणि चक्क नवऱ्याबरोबर तासभर गप्पा मारल्या. मी त्याला जेवायला येते म्हणून निरोप ठेवला होता आणि इथे गाडीत अर्ध्या रस्त्यातच जेवायची वेळ झाली.

मग काय फिरले परत. घरी पोचते तर शिरता शिरताच मस्त जेवणाचा वास आला. नवरोबा मुडात होते तर आज. एकदम त्याची लाडकी चिकन करी आणि कोकोनट राईस वाटच बघत होते. मग काय? दोघांनी मिळून फडशा पाडला.

माझं मलाच हसायला आलं. आमच्या वाडीत उत्सवाच्या वेळी दर वर्षी तीन पायांची शर्यत असायची. ती आठवली. मी आणि रमा नेहमी भाग घ्यायचो. रमा म्हणजे माझी बेस्ट फ़्रेंड. अजूनही आहे. माझ्याशिवाय तिचं आणि तिच्याशिवाय माझं अजिबात पान हलायचं नाही. पण तीन पायाच्या शर्यतीत एकदा पाय बांधले की आमची धमालच व्हायची. कधी तिचा पाय पुढे कधी माझा पाय मागे. असं करत करत पंधरा वेळा पडायला व्हायचं. मग ती माझ्यावर चिडणार किंवा मी तिच्यावर चिडणार. कशी बशी आम्ही लाइन ओलांडायचो. ते एकदा मात्र झालं की वेड लागल्यासारखं हसायचो. आम्ही कसे पडलो, लोक आम्हाला कसे हसले, मग आम्हीच एकमेकीवर कसे चिडलो आणि ओरडलो, कधी तिने मला कसं खेचलं कधी मी तिला कसं ढकललं ह्याचीच मजा. तेव्हा वाटायचं एवढ्या आम्ही जीवा भावाच्या मैत्रिणी मग आमचे पाय एका लयीत का पडू नयेत?

आताशा थोडं कळायला लागलंय की हे लग्न प्रकरण म्हणजे पण तीन पायाची शर्यत आहे. एकट्याने चालायचा प्रयत्न केला तरी चालता येत नाही आणि दोघांनी एकत्र चालता चालता एकमेकांच्या चालण्याशी जुळवून घेतानाच दमछाक होते. पडणं होतं, रडणं होतं. पण सगळ्यात शेवटी आपण एकत्र काहीतरी अचीव्ह केला हा आनंदही असतो.

अशी आहे आमची तीन पायाची शर्यत. पडणे, रडणे आणि खळखळून हसणे ह्या चक्रातून जाणारी.

9 comments:

mugdha said...

mastach aahe!! aavadali post..pudhachya lekhanasathi shubhechcha

Dk said...

kuch bolne ki jaroorat hai kya? :P :D :D :D

Anand Sarolkar said...

Saheeee! ekdum perfect analogy dili ahes. Agdi 100% sahamat!

Monsieur K said...

good analogy :)

Unknown said...

atishay awdla post !
khup mhanje khuppach ! :D

Unknown said...

atishay awdla post !
khup mhanje khuppach ! :D

संवादिनी said...

मुग्धा, दीप, आनंद, केतन आणि भाग्यश्री - मनापासून धन्यवाद!

Unknown said...

i feel u take concepts fr other authers n write ..tin payachi sharyat concept i have read in vijay tendulkar s story ...

संवादिनी said...

@ रेवा - मला सुचलेलं कुणाला आधी सुचलं नसेल असा माझा दावा बिलकुल नाही. फक्त एवढंच की मी ती कल्पना आधी वाचली असेल तर माझी म्हणून खपवत नाही. मी चक्क लिहिते की तेंडुलकरांच्या पुस्तकात वाचलं होतं, अमुक तमुक. त्यामुळे ते मी आधी वाचलेलं नाही. खरंतर मला खूप बरं वाटलं तुझी कमेंट वाचून की जे तेंडुलकरांना सुचलं तेच मलाही सुचू शकलं. सांगितल्याबद्दल थँक्स.