Friday, April 15, 2011

देवयानी (3)

काही लोकं मला वर्कोहोलिक म्हणतात. पण मला स्वतःला तसं अजिबात वाटत नाही. सकाळी चारला ऑफिसला पोचणे हा कुणाचा छंद कसाकाय असू शकतो? तसा तो माझाही नाही. पण बऱ्याचदा काय होतं, की आवडत नसूनही गोष्टी करायला लागतात. तोंडल्याची भाजी खाणे, जवळ जवळ रोज कितीही आळस आला तरी जिमखान्यावर जाऊन येणे तसंच सकाळी उठून ऑफिसला जाणे. पण माझ्या कामाच्या वेळांमुळे मी भलतीच करिअर ओरिएंटेड वगैरे वगैरे असल्याचा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे.

आणि बरं फारंच थोडे लोकं दहावी झाल्यानंतर त्यांना काय व्हायचंय असं विचारल्यावर जे उत्तर देतात, तेच होतात. दहावी झाल्यावर मला काय व्हायचं होतं? सायंटिस्ट हे माझ्या लिस्टवरचं हॉट फेवरिट होतं. मी अगदी यंग सायंटीस्ट च्या परीक्षा वगैरे दिलेल्या होत्या. कुणाला माहीत असेल तर BCTS, MCTS आणि मग सर्वात शेवटी NCTS अशा चढत्या भाजणीने परीक्षासुद्धा दिल्या होत्या. सगळं एकदम फिट्ट होतं. बी. एस्सी, एमेस, पीएचडी. एकदम लाइनीत शिस्तीने होणार होतं.

पण.

हा पण बघा सगळं आपलं प्लॅनिंग बिघडवून टाकतो. कॉलेजात गेले आणि गाडी रुळावरून घसरली. इतकी की सेकंड इयरला पुन्हा बसायची वेळ आली. कॉलेज हा कदाचित एका दुसऱ्या लेखाचा विषय होईल. कारण इतकी अपरिमित धमाल, आनंद आणि इतकं अपरिमित दुःख सहा वर्षाच्या माझ्या कॉलेज लाइफमध्ये मी अनुभवलं. की असं दहा शब्दात ते लिहिणं कठीण आहे. मी आज जशी आहे, बरी, वाईट त्यात त्या सहा वर्षांचा खूप मोठा वाटा आहे. फक्त पंजाबी ड्रेस ते थाय बेअरिंग ड्रेस इतका पल्ला मी या सहा वर्षात गाठला.

पण त्यामुळे झालं काय, की हवे तितके मार्क ग्रॅज्युएशनला पडले नाहीत. अर्थात फिकीर कुणाला होती? मला फक्त एकंच दिसत होतं की ह्या शिक्षणाच्या कटकटीतून सुटका. आईबापाकडे लाचारासारखं पैसे मागणं, मग गेल्या वेळी त्यांनी दिलेल्या पैशाचा त्यांनी हिशेब मागणं आणि मग सहाजिकच ग्रूपमधल्या इतरांपेक्षा आपण गरीबच आहोत असा गंड. मग घरच्यांवर रागावणं, भांडणं हे सगळं लागून आलं. बरं बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही ना? आणि सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं नाही आणता येत. मग मित्रमैत्रिणींसमोर थोडासा अपमान. ह्या सगळ्यातून सुटायचं होतं. आणि त्यासाठी एकंच मार्ग होता.

नोकरी.

कॉलेल्जातले बरेचसे मित्र हायसो होते, त्यामुळे नोकरी मिळवणं तितकंसं कठीण नव्हतं. त्या सुमाराला जरा बरं इंग्रजी बोलणाऱ्या मुला मुलींना कॉल सेंटरमध्ये सहज नोकरी मिळत असे, मलाही मिळाली. मोजून दहा हजार रुपये खणखणून वाजवून पहिला पगार घेतला. माझ्या बाबांना पंचवीस वर्ष लागली तिथं पोचायला तिथं मी एका फटक्यात पोचले. शिक्षण बिक्षण सगळं झूट आहे. पैसा हे फक्त सत्य आहे असं वाटायला लागलं.

हातात पैसा आल्यावर खर्च वाढले, हॉटेलिंग वाढलं, पब्स सुरू झाले. नोकरीच्या पहिल्या सहा महिन्यातंच दहा हजारही कमी पडायला लागले. पुन्हा चिडचिड, पुन्हा त्रास. खर्चाची बघा एक गंमत असते. जोपर्यंत आपण तो करत नाही तोपर्यंत तो आपल्या ताब्यात असतो, एकदा आपण तो खर्च केला की मग आपण त्याच्या ताब्यात जातो. जी ऐश वाटायची, ती गरज वाटायला लागते. बरं खर्च करायचं व्यसन हे एक व्यसन आहे, बाकीही प्रलोभनं आहेतंच की. दारू आहे, चरस आहे, अगदीच पैसे खुळखुळत असतील तर कोकेनदेखील आहे.

पण माझं नशीब चांगलं होतं. होतं नाही अजूनही आहे म्हणून डॉट कॉम बबल बर्स्ट झाला. टू थाउजंड ते टू थाउजंड टू. आमचं कॉल सेंटर पूर्णपणे अमेरिकन टेलेकॉम कंपन्यावर टेकलेलं होतं. ते पडले तसे टेकून पडलेले आम्हीही पडलो. धडाधड नोकऱ्या गेल्या. सहा महिने घरी बसायची वेळ आली. काम नाही, काम नाही म्हणून पैसे नाहीत. बरं मित्रांकडे मागावेत तर त्यांचीही परिस्थिती माझ्यासारखीच. त्यामुळे बाहेर जाणं बंद झालं. घरी स्वतःला डांबून घेतलं. आई घरीच असते माझी. रात्रंदिवस तिचं तोंड बघायचं, तिची बोलणी ऐकायची, बाबांनी बोलणं कधीच टाकलं होतं.

टाइम सॉल्व्हज मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स, पण ते मग कधीतरी...

- देवयानी (3)

No comments: