Thursday, April 28, 2011

देवयानी (8)

आयुष्य थोडं सोपं झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. ती पण एक गंमतच आहे. म्हणजे गोष्टी सोप्या होतायत असं वाटायला लागलं की काही ना काही कारणाने काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतातच. असो, पण नव्या ऑफिसातले ते दिवस मात्र खूपच मजेत गेले. ऑफिसात तोरा मिरवायला मिळायचा. वर समोर जे दिसत होतं ते निर्माण करण्यात खारीचा वाटा का होईना आपला आहे हे पाहून अभिमान वाटत होता.

तीन क्लायंट आणि एकशेपन्नासचा हेडकाउंट झाल्यावर सहाजिकंच मार्केटमध्ये आमचं वजनही वाढलं. आतापर्यंत आम्ही कामं हुंगत फिरत होतो, अता कधीमधी एखाद्या कस्टमरची एंक्वायरी स्वतःहून यायला लागली. कंपनीचं काम वाढत होतं तसं माझंही काम वाढत होतं. दौरे वाढत होते. ह्या दरम्यान कधी मिळणार नाही इतकं फिरायला मिळालं. अगदी गल्फ, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, सगळीकडे फिरून आले. कामाची गडबड असायची पण तरीही वेळ काढून आणि मुख्य म्हणजे खिशात खुळखुळत असलेले स्वतःचे पैसे खर्च करून आजूबाजूची ठिकाणं पाहून आले.

प्रवासात आणखी एक छान गोष्ट होते, ती म्हणजे आपल्याला स्वतःला स्वतःचा असा वेळ मिळतो. आणि मला विचार करायला खूप आवडतं. एकंदरित आयुष्याबद्दल विचार करण्यात मी माझे बरेचसे प्रवास खर्च केले आहेत. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या सांनिध्यात घालवलेली संध्याकाळ अगदी मला ताजमहालाची आठवण आणून गेली. आल्प्सची शिखरं कुठेतरी आपल्या धरमशालाची आठवण करून गेली. ह्या सगळ्या गोष्टी पाहताना मनात विचारांचं काहूर उडतं. मला थोडंसं फिलॉसॉफिकल पण व्हायला होतं. का आपण हे सगळं करत असतो? का जीवाच्या आकांताने आल्या दिवसाशी भांडत असतो? का शक्य नसतं आपल्याला त्या दिवसाच्या कुशीत विसावून आयुष्य सुखाने घालवणं?

असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत राहणे. शिवाय पर्सनल फ्रंटवरही बऱ्याच गोष्टी घडत होत्या. आई बाबांचा लग्नासाठी तगादा लागलेला होता. मला तर लग्न करायचं नव्हतंच तेव्हा. करिअर ऐन भरात आलेलं होतं. आकाशाला गवसणी घालण्याची मनिषा होती. आणि लग्न लग्न तरी का करतात लोकं? मला तर वाटतं marraige is easiest way of insuring your life. प्रचंड इनसेक्युरिटी हे लग्न करण्याचं आणि लग्न न करण्याचंही महत्त्वाचं कारण आहे असं मला नेहमी वाटतं.

माझ्या ट्रीप्सच्या विचार करता करता मीही फिलॉसॉफिकल झाले. असो, तर आयुष्य असं छान चाललेलं होतं, आधी लिहिल्याप्रमाणे गोष्टी सोप्या होतायत असं वाटायला लागलं होतं. मी बांद्र्यात स्वतःचा फ्लॅट भाड्यानी घेणार होते. छोटंसं एक माझं घर करायचं होतं, एकटीचं का असेना पण माझं असणार होतं ते. घरापासून दूर जायचं हे तर मी ठरवलेलंच होतं, फक्त नोकरी मुंबईतच असल्याने ते कठीण झालेलं होतं. पण आता मात्र मला बाहेर पडायचंच होतं. जागा पाहून आले आणि नक्की करणार इतक्यात काकांनी आणखी एक धक्का दिला.

आमची कंपनी टेक ओव्हर करण्याची एक ऑफर आली. i must admit it was too good to be true at that time. इन्व्हेस्टर्सनि मिळून ठरवलं की कंपनी विकायची. आणि पुन्हा एकदा सोप्या होऊ घातलेल्या आयुष्यात एक ट्विस्ट आला. ही कंपनी खूपंच मोठी होती. आमची दीडशे लोकं म्हणजे किस झाडकी पत्ती होती त्यांच्यापुढे.

मला अजूनही आठवतंय मराठे काकांनी मला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि ही बातमी सांगितली. ऑफर ऐकून मला धक्काच बसला. खरं सांगायचं तर मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. पण मग अचानक पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला. मी काकांना सांगितलं की मला त्यांच्याबरोबरंच काम करायचं आहे आणि त्यांचा जो काही नवा प्रोजेक्ट असेल त्यात मी त्यांच्याबरोबर काम करीन.

पुढे घडलं मात्र वेगळंच.

- देवयानी (8)

2 comments:

Feelings.... said...

khup chhan lihila ahe.. waiting for next post. Pls lavkar liha ! Thanks

प्राजकताची फुले............ said...

aavadala !!